चांभारगड उर्फ महेंद्रगड ( Chambhargad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
11 Sep 2020 - 12:53 pm

सावित्री नदीच्या तीरावर वसलेले महाड हे एक प्राचीन बंदर होते. इ.स.पुर्व २२५ मध्ये महाडची पहिली नोंद आढळते. त्यावेळी ते महिकावती नावाने प्रसिध्द होते. ईसवी सनाच्या पहिल्या शतकात ईथे कुंभोजवंशीय बुध्दधर्मीय राजा विष्णूपुलित राज्य करत होता. महाडच्या तीन कि.मी. वर गंधारपाले लेणी व दक्षीणेस तीन कि.मी.वर कोल येथील लेणी महाडचे प्राचीनत्व सिध्द करतात. बौध्द काळापासून महाडला महा-रहाट" म्हणजे मोठी बाजारपेठ म्हणत. ( आजही आपण बाजारहाट असा शब्द वापरतो )  या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी मान्यता आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड ही या परिसरातील मोठी बाजारपेठ होती. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. सावित्री नदीचा हा मार्ग गाळाने भरून गेल्याने महिकावंती बंदर आणि दासगाव बंदर या बंदरांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड उर्फ चांभारगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली.बौध्द काळानंतर महाडचा फार ईतिहास ज्ञात नाही, परंतु नंतर क्षत्रप्,सातवाहन,कोकणचे मौर्य, शिलाहार ईत्यादी राजवटींनी कोकणवर राज्य केले. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांचा अंमल असताना महाड बंदराचे महत्व खुप वाढले. पुढे बहामनी राजवटीच्या विघटनानंतर महाड परिसर आदिलशाही राजवटीच्या अंमलाखाली आला. आदिलशाही राजवटीत बहुधा महाड शहराभोवती कोट उभारला असावा. सन १५३८ मध्ये पोर्तुगीज गव्हर्नरने महाडचा उल्लेख गव्हाची मोठी पेठ असलेले शहर आणि सावित्री नदीचा उल्लेख मधुसरिता असा केला आहे. त्याकाळी महाबळेश्वरवरुन गहु आणि जंगलातील मध खुष्कीच्या मार्गाने महाडला येउन जलमार्गाने निर्यात होत असे. स.न. १६५६ मध्ये मोर्‍यांची जावळी ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी महाडच्या भुईकोटाची डागडुजी करुन बर्‍याचदा वास्तव्य केले, 

       अर्थात महाडबंदरातून नेण्यात येणारा माल रायगडाजवळच्या कावळ्या घाटातून आणि मढ्या घाटातून नेला जात असे. सहाजिकच महाडवरुन उत्तरे दिशेने जाणार्‍या या मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि व्यापारी तांड्याच्या संरक्षणासाठी लष्करी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. यापैकी एक चांभारगड उर्फ मंहेद्रगड.

महाड, सोनगड, चांभारगड परिसराचा नकाशा

महाडकडून रायगडच्या वाटेने निघाले कि उजव्या बाजुला डोंगर लागतो, त्यावरच या चांभारगडाची उभारणी झाली आहे.  उत्तरेकडील रायगडापासून सुरु होणारी डोंगररांग चांभारगड व सोनगड ह्या गडांपाशी येऊन थांबत असल्याने स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड झाल्यावर रायगडाच्या प्रभावळीत समुद्राच्या दिशेने असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले.रायगडच्या या दक्षीण बाजुने सिद्दीच्या आक्रमणाचा सतत धोका असल्यामुळे सोनगड व चांभारगड या किल्ल्यांच्या साखळीमुळे येथून रायगडावर सहज हल्ला करणे कठीण होते.सह्याद्रीत कुंभ्याघाटाजवळून दक्षीणेला पसरलेल्या रायगड रांगेचे चांभारगड हे शेवटचे टोक आहे.भुशास्त्रीय दृष्ट्या हि काही कि.मी. पसरलेली डाईक आहे.

        यातील चांभारगडची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी गडावरची खांबटाकी पहाता गड शिवपुर्व काळापासूनच अस्तीत्वात असावा. रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता.शिवाय नजीक असणारी गंधारपालेची लेणी हि या गडाच्या प्राचिनत्वाचा आणखी एक पुरावा.

     चांभारगडावर जाण्यासाठी महाड गाठावे. महाड बसस्थानकातून समोरच गडावरचा भगवा डौलात फडकताना दिसतो.

  महाड- पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखिंड गावात पोहोचावे. गोवा महामार्गाला लागुन असलेल्या चांभारखिंड गावाच्या मागील बाजुस असलेल्या डोंगरावर या किल्ल्याचे अवशेष पहायला मिळतात. महाड एस.टी. स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात.

गडावर जाण्यासाठी गावातुनच वाट आहे. गावाच्या टोकाशी असलेल्या शाळेकडून एक वाट डोंगराच्या दिशेने जाताना दिसते.

या वाटेने ५ मिनिटे पुढे आल्यावर एक लहान धरण दिसते. या धरणाच्या डावीकडील टेकाडावर चढल्यावर गडाकडे जाणारी वाट सुरु होते. गडावर फारसा वावर नसल्याने वाट मळलेली नाही त्यामुळे गडाच्या उजव्या बाजुस असलेल्या खिंडीचा अंदाज घेतच त्या दिशेने चढाई करायची.

अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण या खिंडीत पोहोचतो. खिंडीत आल्यावर कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे.
 
येथुन वर जाणारी वाट पकडुन १५ मिनिटात भग्न झालेल्या पायऱ्यांनी आपण गडमाथ्यावर पोहोचतो.

       गडावर प्रवेश केल्यावर ४-५ भल्या मोठ्या शिळा इकडेतिकडे पडलेल्या दिसतात.

गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठार असुन गडमाथ्यावर भगवा झेंडा फडकताना दिसतो.

 पठारावर थोडे फार वास्तुंचे अवशेष असुन पठारावरून सरळ उत्तरेला गेल्यावर खालच्या भागात पाण्याची ३ टाकी दिसतात.

 
 एका ढासळलेल्या बुरूजाशेजारून पायवाट खाली या पाण्याच्या टाक्याकडे उतरते.


टाक्याजवळ खांब रोवण्यासाठी काही खळगे कोरलेले दिसतात. खाली उतरल्यावर या टाक्याशेजारी अजुन एक पाण्याचे टाके पहायला मिळते. खडकात खोदलेली हि खांबटाकी पहाता गड पुरातन असल्याचा अंदाज करता येतो. याशिवाय गडाच्या पुर्वेला व त्याच्या विरुध्द बाजूस म्हणजे पश्चिमेला प्रत्येकी एक अशी दोन टाकी पहायला मिळतात. पठारावर आपण वर चढलो त्या खिंडीच्या दिशेला एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. गडमाथ्यावरून दौलतगड,सोनगड,मंगळगड,रायगड हे किल्ले तसेच पोटला, गुहिरी व कळकाई डोंगर इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो.

माथ्यावरून संपुर्ण महाड शहर नजरेस पडते. चाभारखिंड गावातुन गडावर येण्यास एक तास तर गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. 

       गडावर ना मुक्कामायोग्य ना जागा ना काही खाण्याची व्यवस्था. फक्त पिण्यायोग्य पाणी आहे. तसेही महाडपासून अडीच ते तीन तासात गड फेरी होत असल्याने त्याची फार गरज नाही. पुन्हा आल्या वाटेने महाडला जाउ शकतो किंवा पुन्हा चांभारगड उतरुन खिंडीत यायचे. खिंडीतुन पलीकडे रस्ता उतरतो. या वाटेने उतरताना दोन खांब टाकी दिसतात तसेच पुढे आणखी एक टाके दिसते. ईथून तासाभराच्या चालीनंतर आपण महाड-रायगड रस्त्यावर येतो.
     चांभारगडबद्दल इतिहासात फारशा नोंदी उपलब्ध नाहीत. शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांकडून जावळी ताब्यात घेतली, त्यावेळी या चांभारगड उर्फ मंहेद्रगडाचा ताबा घेतला असा उल्लेख येतो.
कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहीलेल्या सभासदाची बखरमध्ये "नवे गड राजियांनी वसवले,त्याची नाव निशीवार सुमारी सुमार १११". या दुर्गांच्या यादीत महींद्र्गड किंवा महिधरगड हे नाव येते. पुढे इ.स. १६७१-७२ मध्ये स्वराज्याच्या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते, त्यात महिधरगडासाठी २००० होन ईतक्या रकमेची तरतुद केलेली होती.
      पुढे संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर झुल्फीकारखान रायगड घेण्यासाठी येथे आल्यानंतर त्याने शहाजादा आलम याला लिहीलेल्या पत्रात उल्लेख असा आहे," मी पाचाड येथे पोहचलो असून येथे रतनगडाचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ठाणी पण उध्वस्त केली. आजही महाडच्या वाटेवर सोनगडाच्या डोंगरावर शत्रु जमले आणि त्यांनी आमच्यावर तोफांचा व बंदुकीचा मारा केला. आमच्या सैनिकांनी शत्रुना मार देत किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत रेटले". वरील पत्रात रतनगडाचा उल्लेख आहे, तो बहुधा चांभारगडाशी संबधीत असावा. पण त्यावेळी झुल्फीखारखानाने दोन्ही किल्ले घेतले हे नक्की.

        मात्र या गडाबध्दल एक मजेदार दंतकथा आहे. शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानी वसविल्यानंतर  रायगडाच्या रक्षणासाठी त्यांना परिसरात नवे किल्ले वसवायचे होते. हे काम महत्वाचे असल्याने त्यासाठी कोणावर हि जबाबदारी न सोपवता स्वतः महाराज वेष पालटून डोंगरदर्‍यात फिरत होते. एक दिवस ते फिरता फिरता चांभारखिंडीजवळच्या झोपडीपाशी आले.त्या झोपडीत एक वृध्द बाई एकटीच रहात होती. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्याबरोबरचे लोक झोपडीत शिरले आणि जेवणाची व्यवस्था होउ शकेल का? याची विचारणा केली. तीनेही मोठ्या आपुलकीने सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. जेवणाचा बेत अगदी साधा होता, कढी आणि भात. वेषांतर केलेले शिवाजी महाराज जेवायला बसले. वृध्द बाईने आधी भात आणी मग कढी वाढली. शिवाजी राजांच्या ताटातील कढी भातातून पसरून ताटाबाहेर वाहू लागली. त्यावर ती वृध्दा महाराजांना म्हणाली, "साध कढीला पाल घालायला जमत नाही ! तुझं अगदी त्या शिवाजी राजासारखं आहे, तो एकीकडे गड-मुलुख जिंकत जातो अन दुसरीकडून शत्रु हल्ला करुन तो भाग पुन्हा ताब्यात घेतो". म्हातारीच्या या परखड बोलण्यामुळे महाराज चांगलेच चपापले. राज्याला बळकट गडांची किती गरज आहे ते त्यांच्या चांगलेच लक्षात आले. चांभाराने पारणी टोचावी तसे त्या म्हातारीचे बोल त्या जाणत्या राजाच्या चांगलेच लक्षात राहीले. पुढे महाराजांनी त्या टेकडीवर गड उभारला व त्याला नाव दिले चांभारगड.
      अर्थातच या दंतकथेत कोणतेही तथ्य नाही. एकतर शिवाजी महाराज पहिल्यापासून किल्ल्यांचे महत्व जाणत होते,प्रत्येकवेळी मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी नवे दुर्ग उभारले, त्यासाठी अश्या कोण्या वृध्देच्या सल्ल्याची गरज नव्हती. दुसरे महत्वाचे म्हणजे चांभारगड आधीच अस्तित्वात होता, शिवाजी राजांनी त्याची उभारणी केली नाही.
      याच चांभारगडासंदर्भात आणखी एक दुर्गकथा. चांभारगडावर शिवाजी महाराजांनी एका शुर चर्मकाराची गडकरी म्हणून नेमणूक केली. शत्रु आला तर गडमाथ्यावर जाळ करुन त्याची सुचना रायगडाला देण्याची व शत्रुसैन्याचा हल्ला झाला तर प्रसंगी त्यांचा मुकाबला करण्याची कामगिरी या वीरावर सोपवली होती. अर्थात या वीरपुरुषाने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी चोख बजावली. त्यावर महाराजांनी खुष होउन त्याला ईनाम देण्याचे ठरविले. त्यावर शुरपुरुष म्हणाला, 'मला गायवाट चामड्याच्या दोर्‍याईतक्या लांबीची जमीन बक्षिस द्यावी'. अर्थातच हि मागणी महाराजांनी मान्य केली. त्याने एखाद्या कसबी कारागिराकडून बारीक दोर काढून घ्यावा आणि तो चांभारखिंडीतील एखाद्या जागी बांधून दोर तुटेल तिथंपर्यंत चालत जायचे. जिथे तो दोर तुटेल तिथपर्यंत जमीन त्या चर्मकार वीराची असे ठरले. हा दोर तुटला तो महाडच्या वीरेश्वर मंदिरापाशी. ती सर्व जमीन अर्थातच त्याच्या मालकीची झाली. या हि दंतकथेत फार अर्थ नाही.
    असे म्हणतात कि चांभारगडावर एक शिलाखंड असून त्यावर चांभारकामासाठी लागणार्‍या हत्याराच्या आकृती कोरल्या आहेत. तसेच महाडच्या चवदार तळ्याशेजारी पुर्वी चांभारतळे होते. या तळ्यातील पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्याने हत्यारांना धार लावली तर ती उत्तम लागत असे.
( तळटीप- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

चांभारगडाची व्हिडीओतून सफर

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भः-
१) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
४) रायगड जिल्हा गॅझेटीयर-
५) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर
६) www.durgbharari.com   हि वेबसाईट७) www.trekshitiz.com   हि वेबसाईट

प्रतिक्रिया

कंजूस's picture

11 Sep 2020 - 2:48 pm | कंजूस

छान माहिती आहे.

कपिलमुनी's picture

11 Sep 2020 - 3:26 pm | कपिलमुनी

लेख आवडला, बाईक घेउन गेले तर पायथ्यापर्यंत जाता येइल का ?

दुर्गविहारी's picture

11 Sep 2020 - 4:27 pm | दुर्गविहारी

धन्यवाद ! बाईक घेऊन गेले तर चांभारखिंड गावापर्यंत जाता येईल.

खुपच छान लेख ..छायाचित्रे आणि व्हिडीओ.मस्त !!

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Sep 2020 - 10:35 am | अनिरुद्ध.वैद्य

!

बेकार तरुण's picture

16 Sep 2020 - 12:59 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणे उत्तम लेख....

दुर्गविहारी's picture

18 Sep 2020 - 12:35 pm | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांना आणि वाचकांना मनापासून धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2020 - 2:26 pm | चौथा कोनाडा

दुर्गविहारी,

👌
खुप सुंदर !