एक दिवसीय आणि टेस्ट मॅचेस च्या ICC नामांकनात भारत भले पहिल्या क्रमांकावर असेल. पण ICC's Best Dramebaaz अशी लिस्ट काढल्यास बांगलादेश चा क्रमांक निश्चितच पहिला लागेल. परवाच्या सेमी-फायनल मध्ये अटीतटीच्या सामन्यात एकापेक्षा एक ड्रामे करून जिंकल्यानंतर शेवटी बांगला क्रिकेटर्स ने मैदानावर नागीण डान्स केला. एवढ्याने समाधान झालं नाही म्हणून ड्रेसिंग रूम चे दरवाजे फोडले.
T20 च्या फायनल ला आपली नेहेमीची टीम नसून देखील बांगलादेश विरुद्धची मॅच सहज जिंकू असे वाटत होते. १६७ धावसंख्येचा पाठलाग देखील बऱ्यापैकी चालला होता. मात्र शिखर धवन आणि रैना पाठोपाठ बाद झाले आणि बांगला नाग बिळाबाहेर येऊन दंश करू लागले. नागांवर 'विजय' मिळवण्यासाठी खुद्द 'शंकर' मैदानावर आला, पण त्याचे देखील काही चालले नाही. लवकरच 'शंकरा'च्या गळ्याभोवती असलेल्या बांगला नागाने भारतीय टीम चा गळा आवळण्यास सुरुवात केली.
पौराणिक कथांत शंकरानंतर कार्तिकस्वामी येतात. तसेच काल देखील १२ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या तेव्हा 'शंकराच्या साथीला 'दिनेश कार्तिक' मैदानावर आला. आल्या-आल्या षटकार आणि चौकार मारून सुरुवात तर जोरदार केली. तरीदेखील शेवटच्या षटकात १२ धावा हव्या होत्या. बांगला कप्तानाने मेहदी हसन ऐवजी पार्ट टाइम गोलंदाज 'अबकी बार सौम्या सरकार' धोरण अवलंबिले. २ चेंडूत ५ धावा हव्या असताना 'विजय शंकर' महाराज तिसरा डोळा उघडण्याच्या नादात बाद झाले. बांगला फॅन्स नागीण डान्स करण्यास हात उंचावून सज्ज झाले.
भाग्यवान लोकं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात. दिनेश कार्तिक डोक्यावर बर्फाची लादी घेऊन जन्माला आला असावा. शेवटच्या चेंडूवर ५ धावा हव्या होत्या तरीदेखील इतका शांत आणि संयमी दिसत होता. एक्सट्रा कव्हरला फ्लॅट षटकार मारून सामना जिंकून दिला. कार्तिकच्या बॅटरूपी पुंगीने बांगला क्रिकेटर्स 'नागीण' झाल्यासारखे निपचित पडले. बांगलादेश च्या हातातोंडाशी आलेला विजय कार्तिक ने ८ चेंडूत २९ धावा ठोकून अलगद काढून घेतला. इतका जबरदस्त खेळ करून सामना जिंकल्यावर कसे वागावे हे बांगलादेशी क्रिकेटर्स ने कार्तिक कडून शिकावे!
काल भारतात जरी चैत्र महिना सुरु झाला असला तरी कोलंबो च्या क्रिकेट ग्राउंडवर 'कार्तिक' महिना बहरात होता आणि बांग्लादेशमध्ये 'भाद्रपद'!
प्रतिक्रिया
19 Mar 2018 - 1:14 pm | एस
:-D
19 Mar 2018 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
उपमा, उत्प्रेक्षा आणि विनोदाचे विजयी अॅटम बाँब ! =)) =))
19 Mar 2018 - 1:23 pm | manguu@mail.com
नागीण झाल्यावर निपचित पडतात. ??
19 Mar 2018 - 2:41 pm | श्रीगुरुजी
काल मज्जा आली. शंकरला वर पाठविण्याचा निर्णय अंगाशी आला होता. रोहित कायमच बांगलाचा नडतो.बांगलाचे खेळाडू व प्रेक्शक अत्यंत छपरी, उर्मट, माजलेले व उन्मादी आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील एका प्रादेशिक पक्शाच्या नेत्यांची आठवण होते.
19 Mar 2018 - 7:35 pm | प्रचेतस
उपमांच्या अतिरेकी वापराने लेख वाचायची मजा निघून जाते.
20 Mar 2018 - 10:07 am | सरनौबत
कोट्या म्हणायचंय का तुम्हाला?
20 Mar 2018 - 10:10 am | प्रचेतस
हो.
20 Mar 2018 - 12:02 am | फेरफटका
काल कार्थिक मस्त खेळून गेला. अशा इनिंग्ज वन्स इन अ लाईफटाईम असतात.
बांग्लादेश कधीतरी, 'आपल्याला सतत कुणीतरी उपेक्षेनं मारून राह्यलाय' मोड मधून बाहेर येतील ही आशा आहे.
21 Mar 2018 - 10:35 am | पगला गजोधर
.
'आपल्याला सतत कुणीतरी उपेक्षेनं मारून राह्यलाय' या मोड मधून बाहेर पडण्यासाठीचं बहुतेक ते बांगलादेशी नागीन ड्यान्स
करत असावे का ?
20 Mar 2018 - 10:19 am | विजुभाऊ
'आपल्याला सतत कुणीतरी उपेक्षेनं मारून राह्यलाय'
तुम्हाला विदर्भ मोड असे म्हणायचं आहे का
20 Mar 2018 - 9:44 pm | फेरफटका
कशाला मोड / फाटे फोडता? जाऊ द्या. जे म्हणायचं, तेच म्हटलय मी. :) हा खूप स्लिपरी मोड आहे. ;)
20 Mar 2018 - 2:50 pm | चिगो
लै म्हणजे लैच भारी मॅच झाली ही.. अठराव्या ओव्हरनंतर वाटलं होतं की गई भैंस पानी में.. 'नॉन-स्पोर्ट्समनशिप'चा दोष पत्करुन मान्य करतो, की बांग्लादेशासोबत हारणं अजिबात पचलं नसतं. They are very bitter and clumsy winners as well as losers. श्रीलंकेसोबतच्या सामन्यात त्याची झलक दाखवलीच होती त्यांनी..
कार्तिकने कमाल केली.. जबराच..
लेख आवडला, सरनौबत..
20 Mar 2018 - 4:59 pm | दुश्यन्त
कुणाचा कधी दिवस येईल सांगता नाही. कार्तिकला खरेच मानायला पाहिजे. केकेआरचा कर्णधार झाला म्हणून सोशल मीडियावर याची खिल्ली उडवली गेली पण पट्ठ्याने दोनच आठवड्यात बांगला टीम आणि सगळ्यांनाच नागीण डान्स करायला भाग पाडले.
21 Mar 2018 - 1:42 pm | दुर्गविहारी
या सगळ्या प्रकारात एक महत्वाची गोष्ट सगळेच विसरत आहेत. मुळात रोहीत आउट झाल्यानंतर विजय शंकरला पुढे पाठवण्याचे कारणच काय होते? एक तर आपण अंतिम सामना खेळत होते, ती वेळ असले प्रयोग करायची होती? दिनेश कार्तिकने षटकार मारला म्हणून आपण जिंकलो, पण कल्पना करा, आपण तो सामना हरलो असतो तर त्याचे खापर विजय शंकरसारख्या नवख्या खेळाडूवर फोडले गेले असते आणि एका उदयोन्मुख खेळाडूचे करियर बरबाद झाले असते तर जबाबदार कोण?
हे पहा विजय शंकर काय म्हणतोय.
कार्तिकने तो षटकार खेचला नसता तर माझं काही खरं नव्हतं
वास्तविक आधीचा सामना मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक याच जोडीने जिंकून दिला असताना असले प्रयोग करायची ती वेळ नव्हती.
पण हा सामना चित्तथरारक झाला यात काही शंका नाही.
21 Mar 2018 - 2:13 pm | पगला गजोधर
हे असे एक्सपेरिमेंट(टाकीचे घाव सोसल्यावरचं देवपण येतं )अश्याच सिरीजच्या फायनलमध्ये करता येतात.. वर्ल्डकप मध्ये नाही...
ठराविक खेळाडूवर अवलंबून राहण्याची स्टाईल आता जुनी झाली, या चेन इज ऍज वीक ऍज इट्स विकेस्ट लिंक ...
21 Mar 2018 - 3:08 pm | श्रीगुरुजी
मुस्तफिजूर शेवटच्या ४ षटकात गोलंदाजी करणार होता. त्याच्यासमोर अनुभवी फलंदाज असावा यासाठी कार्तिकला खाली ठेवले असावे.
21 Mar 2018 - 7:29 pm | फेरफटका
ह्यात बरीच गृहितकं आहेत.
१) कार्थिक १२ व्या ओव्हर ला आला असता, तर शेवटपर्यंत टिकू शकला नसता.
२) कार्थिक सेट न होता, नुसती बॅट फिरवून चौकार, षटकार मारू शकतो
३) शंकर - पांडे जोडी 'योग्य वेळेत' फुटली असती आणी कार्थिक ला मॅच विनिंग खेळी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता.
४) प्रेशर मुळे किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे कार्थिक आल्या-आल्या आऊट झाला नसता.
फायनल मॅच ला टॉस जिंकल्यावर पहिली बॅटींग घेऊन स्कोअर करून समोरच्या टीम वर दडपण आणण्याऐवजी आपण बॉलिंग घेतली हे अनक्न्व्हेन्शनल होतं. बॅटींग ऑर्डर मधले बदलही अनाकलनीय होते. ते सगळं मॅच जिंकल्यामुळे - त्यातूनही इतक्या रोमांचक पद्धतीनं जिंकल्यामुळे नजरअंदाज केलं जातय.
21 Mar 2018 - 8:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मजा आली. कार्तिकचा षटकार अप्रतिम होता. शंकरला पाणी आणायला ठेवा काही दिवस. बोगस साला, बॉलसुद्धा कनेक्ट होत नव्हता त्याला.
-दिलीप बिरुटे
21 Mar 2018 - 8:59 pm | श्रीगुरुजी
शंकरला जमत नव्हते हे मान्य. परंतु फक्त एका डावावरून मी त्याला मोडीत काढणार नाही. हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय डाव. त्याचेही दडपण असणार. तो खेळायला आला तेव्हा ४० चेंडूत ६९ धावा अशी ब-यापैकी अवघड स्थिती होती. कार्तिकच्या आधी आल्यामुळे अपेक्शांचेही दडपण असणार.