सिंधू आणि साक्षी यांनी ऑलिंपिक्स मध्ये पदके मिळवल्यावर त्यांच्या वर सर्व देशातून अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुक होत असताना त्या दोघींची जात कोणती आहे याचा गुगल वर मोठ्या प्रमाणात शोध घेतला गेला अशी बातमी वाचनात आली.
या निमित्ताने पडलेले काही प्रश्न...
अजूनही भारतीय समाजमानसिकतेमध्ये जातीची मुळे किती खोलवर रुजली आहेत हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्या दोघी एका विशिष्ट जातीच्या आहेत किंवा नाहीत हे कळल्यामुळे शोध घेणाऱ्याला काय फरक पडणार आहे? त्या दोघी भारतीय आहेत हे पुरेसे नाही का? फारतर त्या कुठल्या प्रशिक्षण केंद्रात सराव करतात, त्यांचे प्रशिक्षक कोण आहेत, त्यांनी आत्ता पर्यंत किती स्पर्धा जिंकल्या आहेत असे प्रश्न पडले तर समजण्या सारखे आहे. कदाचित या सर्वांचा शोध घेतला गेला असेलही परंतु याच बरोबर त्यांच्या जातीचा देखील शोध घेतला हे खरेच आश्चर्यजनक नाही का?
या निमित्ताने पूर्वी उर्मिला धनगर, वैशाली भैसाने-माडे, कार्तिकी गायकवाड या व इतर कारणांमुळे आंतरजालावर झालेल्या ट्रोलिंगची (मराठी शब्द?) आठवण झाली.
या शोधा मागची आदिम प्रेरणा काय असावी? आणि आजच्या जगात त्याचे नेमके स्थान काय? पूर्वीच्या काळी मानव जमात जेव्हा टोळ्या करून गुहेत रहात असतील तेव्हा हा आपल्या टोळीतला म्हणून मित्र आणि तो परक्या टोळीतला म्हणून शत्रू हे तर त्याचे मूळ नसावे? किंवा थोड्या अलीकडच्या काळाचा विचार करायचा झाला तर एका विशिष्ट जीवन पध्द्तीने जगणारा, विशिष्ट आचार विचार आणि रूढी परंपरा पाळणारा समाजातला एक गट म्हणजे एक जात आणि मग त्या जातीच्या गुण वैशिष्ट्यांचा (??) अतिरेकी दुराभिमान हे तर कारण नसावे.
समाज धुरीणांनी वारंवार प्रयत्न करूनहि आजच्या आधुनिक युगात जाती व्यवस्था तग धरून आहे एव्हडेच नव्हे तर वेगवेगळ्या जातींचे मंडळे, ज्ञाती संस्था, लग्न कार्यालये, वधू-वर मंडळे, चॅरिटेबल ट्रस्ट इत्यादी चांगलेच फोफावले आहेत. वरवर पाहता सर्व काही आलबेल दिसले तरी थोडं खोलवर पाहिलं तर जाती जातीतील, एकाच जातीतील वेगवेगळ्या उपजातींतील अत्नर्गत हेवेदावे, भांडणे दृष्टीपथात येतात. समाजाच्या सर्वांगीण प्रगती साठी एकसंघ समाज निर्मितीच्या कामामधला हा मोठाच अडथळा म्हंटला पाहिजे.
पूर्वीच्या काळात सुरक्षितेसाठी आपल्या टोळीला धरून राहायची जी प्रवृत्ती होती त्याची मानवाच्या उत्क्रांती मध्ये मागच्या पिढी कडून पुढच्या पिढीला मिळत गेलेली जनुकीय वैशिष्ट्ये म्हणजेच आजची जात व्यवस्था आहे काय?
या सर्व गोष्टींचा समाज शास्त्रामध्ये अभ्यास नक्कीच झाला असेल परंतु जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मिपातील समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र तज्ज्ञांकडून उत्तरांची अपेक्षा !
शेवटी काय " जात नाही ती जात " नाही का?
प्रतिक्रिया
22 Aug 2016 - 5:40 am | दिगोचि
गूगलवर हा शोध करून भारतीयानी आपण किती दाम्भिक आहोत हे परत दाखवून दिले आहे.आपण फक्त देवळात जातोपव गीता वाचतो स्तोत्रे म्हणतो पण त्यातली शिकवन आत्मसात करत नाही.देवळात जातो ते देवाकडून काही तरि मागायला नाही तर तेथे जाऊन कल्लोळ करयला. त्यात धार्मिक भाव नसतो. देशात आज किती राजकारणी जे विट्ठलाच्या देवळात पुजा करण्यासाठी गर्दी करतात पण प्रत्यक्षात कसे वागतात हे मी सान्गायल नको.
22 Aug 2016 - 5:52 am | चौकटराजा
जात अशी प्रत्यक्षात असते का ? नक्कीच असते. पण ती जन्मावर अवलंबून नाही. विशिष्ट जातीत विशिष्ट आवडी निवडी असतातच.त्या अर्थाने जात असते. बुद्धी,कलाकारी, कल्पकता यांची मात्र जात नाही. काही जातीत संस्काराने विशिष्ट प्रवृती दिसत नाहीत. उदा. भारतातील गुन्हेगारांची वर्गवारी केलीत तर सी के पी सारस्वत को़ब्रा देब्रा यांचे प्रमाण जवळ जवळ नाहीच. ब्राहमणामधे घरात गुलाबी रंग भिंतीला लावलेला क्वचित दिसेल. मराठा समाजात शास्त्रीय संगीताची आवड॑ कमी दिसेल. अशी अनेक निरिक्षणे आहेत.तूर्तास एवढीच.
23 Aug 2016 - 4:25 am | लीना कनाटा
चौरा काका,
तुमचे म्हणणे अपवाद वगळता काही अंशी खरे असले तरी एखादा गट / समूह / जात यांचा आणि रंगाचा संबंध मात्र झेपला नाही. जरा इस्कटून सांगता का?
23 Aug 2016 - 3:59 pm | चौकटराजा
संक्रान्त सोडली तर काळा रंग हिंदुच्या बर्याच जातीत पसंत केला जात नाही. पण मुस्लीमात त्या रंगाला प्रधान स्थान स्त्री वर्गात आहे. आपण गर्द तांबडा शर्ट घालून गेलो तर " काय खड्की दापोडी ड्रेस घातलाय असे मित्र चिडवतील पण चीन मधे गर्द तांवडा रंग सर्रास वापरला जातो. जपानात गोल्डन यलो रंग कारला दिसेल आपल्या इकडे तो दिसणार नाही.कोणी एक जण सफेद रंगाला त्यागाचा तर कोणी त्यालाच शरणागतीचा तर तिसरे त्याला शोकाचा रंग समजतात. राज कपूर त्याला सेक्स सिम्बॉल मानत असे. लाईट पि़ंक रंग ख्रिस्ती लोकाना जास्त आवडताना दिसतो. गर्दे केशरी रंगाची साडी ख्रिस्ती बाई नेसल्याचे क्वचितच दिसेल.मुलीमाच्या घरात भितीला भगवा रंग दिसणार नाही. सुरेश वाडकर व अजय अतुल यांची जात वेगळी आहे त्यांचे कपडेही .सुरेश वाडकर काळ्या शर्टात कधी पाहिले आहेत का ? मी तरी नाही. एक चमकीचे चे उदाहरण घ्या कोकणस्थ ब्राह्मणात हे प्रमाण नगण्य आहे तर देशस्थात ते सर्रास पहावयास मिळेल.
23 Aug 2016 - 6:51 pm | अभ्या..
चमकी नाय म्हणायचं काका, मोरणी मोरणी
24 Aug 2016 - 7:30 am | चौकटराजा
अभ्या म्या कोब्रा हाय त्वा देब्रा . म्या तिला ल्हानपनापासून चमकी या नावानंच वळकतू हाय ! माजी बायको देब्रा हाय त्यी मातुरे मोरणी म्हणतीया !
24 Aug 2016 - 8:43 am | उडन खटोला
अभ्या ची जात कशाला काढताय काका?
त्ये निव्वळ माणूस जातीचं पोट्टं हाय.
उगा जातीच्या चर्चा नका करु.
-डेव्हिल जातकुळीतला
24 Aug 2016 - 8:46 am | चौकटराजा
त्ये मानुस पेक्षाही म्होट्टं जातीचं हाय ! त्ये जात म्हंजी मैतराची जात !
25 Aug 2016 - 1:37 pm | किंबहुना
मी चुकून "म्हैसराची" असे वाचले.
स्वारी बर्का अभ्या.
22 Aug 2016 - 6:30 am | हुप्प्या
हा माध्यमांचा खोटारडेपणा आहे. साधारण २१०० लोकांनी सिंधूच्या जातीचा शोध घेतला. भारताच्या इंटरनेट वापरणार्या लोकांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या नगण्य आहे. तेव्हा हा शोध मोठ्या प्रमाणात केला गेला हा जावईशोध खोटारडेपणाचा आहे.
ज्यांना भारतीयांना जात्यंध म्हणून झोडपून काढायचेच आहे त्यांना हा २१००चा आकडाही पुरेसा आहे. पण ही इतकी भयावह समस्या वाटत नाही. इतक्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला २ पदकांवर समाधान मानावे लागते हे माझ्या लेखी जास्त भयंकर आहे.
22 Aug 2016 - 8:11 am | मुक्त विहारि
.....समाधान मानावे लागते हे माझ्या लेखी जास्त भयंकर आहे."
+ १
22 Aug 2016 - 9:20 am | नाखु
सनसनाटी बातमी दिल्याखेरीज लोकांचे लक्ष वेधले जात नाही..
साल २००५ पर्यंत पुण्याला मनपा स्थानकावर/बसमध्ये संध्यान्ण्द चा खप ही अश्याच "अतरंगी आणि अतर्क्य बातम्यांच्या मथळयावर चालायचा ते आठवले...
कुत्रा माणसाला चावला ही नेहमीची बातमी पण माणुस कुत्र्याला चावला तर ती लक्षवेधी बातमी (भले ती केनीय्/ग्वाटेमालू येथील असली तरी)
सध्या (सगळीकडेच) आनंद असलेला नाखु
22 Aug 2016 - 10:14 am | अनुप ढेरे
http://indiafacts.org/lie-graphs-newsminute/
हे वाचा.
ही बातमी वाचून आधी वाईट वाटलेलं पण मग हे वाचलं.
23 Aug 2016 - 7:43 am | आजानुकर्ण
हुप्प्याशेठशी सहमत!
23 Aug 2016 - 1:40 pm | बोका-ए-आझम
असहमत. पदक मिळणं - न मिळणं यात आपलं आणि प्रतिस्पर्धी खेळाडूचं कौशल्य हे मुद्दे आहेत. एकही पदक मिळालं नसतं तरी माझ्या मते काही फरक पडत नाही कारण त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. बीजिंग आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवणा-या अभिनव बिंद्राला रिओ आॅलिंपिकमध्ये एकही पदक मिळालं नाही, पण त्याने त्याचा खेळाडू म्हणून दर्जा कमी होत नाही. पण जात लोकांच्या मनातून अजूनही जात नाही आणि तंत्रज्ञानामुळे जातीचा पगडा कमी होण्याऐवजी त्याचा वापर जातीविषयक गोष्टींसाठी होतोय हे जास्त भयावह आहे. २५०० किंवा काही भारतीयांनी सिंधूची जात गूगलवर सर्च केली पण कितीतरी जणांनी सर्च न करताही असा विचार केला असेल. असा विचार मनात येणं हे जास्त भयावह आहे.
23 Aug 2016 - 3:17 pm | सोनुली
असा विचार मनात येणं हे जास्त भयावह आहे.//
सहमत
22 Aug 2016 - 9:09 am | जेसीना
माझ्या मते त्यांची जात "भारतीय" हि असावी ......
22 Aug 2016 - 9:47 am | संदीप डांगे
पाश्चात्य माध्यमांचा भारतास बदनाम करण्याचा हा डाव आहे,
23 Aug 2016 - 8:41 am | लालगरूड
तिची जात बॅडमिंटन
23 Aug 2016 - 11:41 am | आदिजोशी
खोट्या बातमीवर आधारीत धागा काढून लेखक महाशयांनी आपणही फार रिसर्च न करता बातम्या देणार्या मठ्ठ पत्रकारांच्याच जातकुळीतले आहोत हे सिद्ध केलेले आहे.
थोडं खोलात जायचा प्रयत्न केला असता तर ही वेळ आली नसती. अनुप ढेरेंनी दिलेल्या लिंक मधे ह्या खोट्या बातमीची लक्तरं काढण्यात आलेली आहेत. त्यामुळे पुढल्यावेळी पराचा कावळा करून पानभर लिहिण्याआधी शहानिशा करावी ही नम्र विनंती.
23 Aug 2016 - 8:10 pm | बोका-ए-आझम
बातमीचा सारांश असा आहे की - १. सिंधूला रौप्यपदक मिळण्याआधी बरेच दिवस तिच्याबद्दल माहिती शोधणं चालू होतं.
२. त्यामुळे तिच्या जातीबद्दल केवळ ती जिंकल्यानंतरच search चालू आहे असं अजिबात नाही.
३. २१०० वगैरे लोकांनी नाही पण २५० वगैरे लोकांनी तिची जात search केली असेल.
यात कुठेही एकाही माणसाने सिंधूची जात शोधण्यासाठी शोध घेतला नाही आणि हे कुभांड आहे असं म्हटलेलं नाही. आक्षेप असलाच तर तो search कधी घेतला आणि किती लोकांनी घेतला यावर आहे, म्हणजेच सर्च घेतलाय हे खरं आहे ना? माझ्या मते एका माणसाने जरी असा (जातविषयक) सर्च केला तरी ते चुकीचं आहे कारण जर जातीयवाद हे विष आहे तर मग ते फक्त एखाद्या ठराविक संख्येला विष आहे असं म्हणता येत नाही. जसं १ रूपयाची असो किंवा १ कोटी रुपयांची - चोरी ही चोरी असते, तसाच एका माणसाने दाखवू दे किंवा १ हजार किंवा एक लाख - जातीयवाद हा वाईटच असतो. त्यामुळे इथे लक्तरं काढली आहेत असं अजिबात वाटत नाही.
23 Aug 2016 - 8:28 pm | संदीप डांगे
बोकाशेठ, मुद्दा थोडासा हुकतोय बरं. मुद्दा आहे की अडिचशे लोकांनी सर्च केले म्हणून समस्त भारतातले लोक म्हणजे "भारतीय" लोकांची प्रतिमा मलिन केल्या जात आहे. आता तुमच्याच उदाहरणानुसार एका व्यक्तिने जरी बलात्कार केला तरी समस्त भारतीयांना माध्यमे 'बलात्कारी पुरुषांचा देश' म्हणायला लागले तर कसं चालेल? या अडिचशेपेक्षा जास्त तर आपल्या तुरुंगांमधे वेगवेगळ्या गुण्ह्याखाली अटक झालेले गुन्हेगार असतील, त्या प्रत्येकासाठी समस्त भारतीयांनी ते बिरुद मिरवावे का?
माध्यमांमधून भारतीयांची प्रतिमा मलिन करणे तेही सत्याचा विपर्यास करुन हे खटकलेले आहे. तुमचा आदर्शवाद मान्य आहे की एकाही व्यक्तिने असे सर्च करणे चुकीचे आहे. पण त्यासाठी सर्व भारतीयांना वेठीस धरणे तेही काहीतरी चमचमित बातमी मिळावी म्हणून हेही चुकीचे.
23 Aug 2016 - 11:40 pm | बोका-ए-आझम
बलात्कार आणि जातीबद्दल सर्च या वेगळ्या गोष्टी आहेत. एक सरळसरळ गुन्हा आहे आणि एक प्रथमदर्शनी निरूपद्रवी वाटणारी आणि गुन्हा नसणारी पण अत्यंत घातक potential असणारी कृती आहे. त्यामुळे ही तुलना मला बरोबर वाटत नाही.
माझा विरोध प्रसारममाध्यमं जे बातमीचं चमचमीकरण करतात त्याला आहेच पण लोकांनी एका खेळाडूच्या जातीबद्दल सर्च केला हे पूर्णपणे, धादांत खोटं नाहीये ना? माझं तर म्हणणं आहे की - forget numbers. काही क्ष लोकांनी आपल्या देशाच्या खेळाडूची जात सर्च केली ही बातमी बाहेर येण्याला देशाच्या सन्मानाशी जोडण्याची काय गरज आहे? अशा लोकांनी देशाचा अपमानच होणार आहे आणि या बातम्या बाहेर येणंही गरजेचं आहे कारण जे चुकीचं आहे ते बाहेर यायलाच पाहिजे. उडता पंजाबवर पंजाबची बदनामी होते म्हणून बंदी घालण्याची मागणी लोकांना पटली नव्हती,कारण वस्तुस्थिती जशी आहे ती कळायलाच पाहिजे हा त्यामागे विचार होता. मला वाटतं, इथेही तेच आहे. आपल्या प्रसारमाध्यमांनी त्याचं sensationalization करुन ' गयी भैस पानी मे ' हे दाखवून दिलं आणि त्याबद्दल मी सहमत आहे पण अशी बातमी आल्याने देशाचा अपमान होतो यावर सहमत नाही. अपमान जातिविषयक सर्च करणाऱ्यांनी केलाय. त्याबद्दल बातमी देणाऱ्यांनी नाही.
24 Aug 2016 - 12:04 am | संदीप डांगे
sensationalization वरच रोष आहे सर्वांचा. आजकाल जे वातावरण चाललंय जातीयवादासंदर्भात त्याचा अचूक फायदा उचलण्याचं काम नतद्रष्टांनी केलं. दोन अर्था अर्थी संबंध नसलेल्या गोष्टी चिकटवऊन चमचमीतपना वाढल्या जातो. ओलिम्पिक खेळाडू आणि जात हे बादरायण संबंधवाली छोटीशी न्य्युज हाती लागली आणि त्याचा राईचा पर्वत केला गेला.
असे अनेक दिव्य सर्चेस लोक करत असतात हे माझ्या गूगल अॅडसेन्सच्या कामानिमित्त बघितले आहे. त्यात अगदी काहीच्या काही क्वेरीज असतात लोकांच्या. हे सर्व सर्चेस जगजाहिर व्हायला लागले तेही भारतीय लेबल लावून तर ते योग्य नव्हे इतकाच माझा मुद्दा आहे. मागे सेक्स सर्चेसमधे भारतीय अग्रेसर अशी ही न्युज होती. मी बघितलेले काही सर्चेस ह्यापेक्षाही दिव्य होते.
एकाही व्यक्तिने सिंधूची जात शोधणे हे निश्चितच नालायकपणाचे काम आहे हे तुमचे मत शतशः मान्य व सहमतही आहे. पण ज्या देशात सर्व संतांना, महापुरुषांना जातीपातीत वाटुन घेतले आहे तिथे एखाद्या खेळाडूवर ही वेळ यावी यात मलातरी नवल वाटत नाही. ह्यातली सोनेरी किनार अशी बघेन की सिंधूने अचाट कामगिरी केली आहे म्हणून काही लोकांना इतकी आवडली की त्यांनी ती आपल्या जातीत आहे का ह्याबद्दल शोधले असेल. कदाचित त्यांना लग्न करायचे असेल तिच्याशी, काही सांगता यायचे नाही हो आजकाल, आपणच का नेहमी वाकड्यात बघायचे =))
24 Aug 2016 - 10:00 am | हुप्प्या
जातीयवाद विष आहे. ठीक. पण जात शोधणे म्हणजे जातीयवादच हे कशावरून? जातीवर आधारित भेदभाव हे वाईट आहे. निव्वळ जातीचा उल्लेख हे विष नव्हे. कुणाची जात काय आहे हे शोधले म्हणजे तो आता भेदभाव करणारच असा निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल. अनेक लोक लग्न जमवताना आपल्या जातीची व्यक्ती शोधतात. हा कायद्याने तरी गुन्हा नाही. आपल्या मुलाकरता जोडीदार म्हणून सिंधू कशी वाटेल अशा विचाराने जर कुणी तिची जात शोधली असेल तर लगेच तो जात्यंध प्रतिगामी असल्याचा निष्कर्ष काढणे आततायीपणाचे आहे. कुणाला असा विचार करणे हास्यास्पदही वाटेल पण तरी तो गुन्हा नक्कीच ठरत नाही.
१ रु ची चोरी आणि एक लाखाची चोरी सारखी नाही. कायदादेखील त्यात भेदभाव करतोच. किती रकमेचा अपहार केला आहे त्यावरच कोर्ट शिक्षा सुनावते. कोट्यावधीचा गंडा घालणार्याला जास्त शिक्षा होते. उलट १००-१५० रु. च्या चोरीकरता कुणी कोर्टातही जाणार नाही. गेले तर शिक्षा होण्याची शक्यता फार कमी.
गेल्या ५०-६० वर्षांत जातीबंधने मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहेत. आणखी काही वर्षांनी जात हा प्रकार लयाला जाणे शक्य आहे. पण तोवर थोड्याफार प्रमाणात जातीचे अस्तित्त्व जाणवणे अपरिहार्य आहे. जुलुमशाहीचा वरवंटा न फिरवता, लोकांचे प्रबोधन जातीनिर्मूलन करण्याची प्रक्रिया संथ असणारच पण ती जास्त प्रभावीही असते.
24 Aug 2016 - 11:27 am | बोका-ए-आझम
जात्यंध, प्रतिगामी होत नाही हे मान्य पण ती तसं होण्यातली पहिली पायरी आहे. जातीबद्दल जाणीव ->अभिमान ->दुराभिमान ->अहंकार ->दुस-या जातींबद्दल तिरस्कार या मार्गाने कधी माणसाचं अध:पतन होईल ते सांगता येत नाही. जातीबद्दल सर्च करणं ही जरी निरुपद्रवी गोष्ट वाटली तरी त्याचं potential भयंकर आहे. जर जात या गोष्टीचं समूळ उच्चाटन व्हायला हवं असेल तर अशा बाबतीतही zero tolerance हवा. Atrocity act लावायची वेळ येईपर्यंत थांबणं परवडणार नाही आपल्याला.
24 Aug 2016 - 11:56 am | हुप्प्या
==माणसाचे कधी अधःपतन होईल ते सांगता येत नाही.
तसे अधःपतन होणार म्हणून आधीच स्वातंत्र्यावर गदा आणणार का? मद्यपान करणार्याचे कधी अधःपतन होऊन ते व्यसनाधीन होऊन आपले आणि कुटुंबियांचे आयुष्य बरबाद करतील म्हणून आधीच मद्यावर बंदी आणणार का? अशाने मद्यपान कमी होत नाही उलट तसे केल्यास मद्याचा व्यापार हा गुन्हेगारी विश्वातून चालवला जातो असे इतिहास सांगतो.
झीरो टॉलरन्स वगैरे नावाखाली हुकुमशाही, दडपशाही, स्वातंत्र्याची गळचेपी अशा गोष्टी वावरत असतात. अशा गोंडस नावाखाली बंदी खालणार्या सरकार नामक संस्थेचे अधःपतन होण्याची शक्यता खूपच जास्त असते. अशातूनच स्टालिन, माओ, हिटलर, आयसिस, तालिबान वगैरे उन्मत्त लोक व संस्था माजल्या आणि त्यांनी मोठे नरमेध घडवले.
झिरो टॉलरन्सचा अट्टाहास करुन उलटाच परिणाम होतो त्या ऐवजी कलाकलाने, सिनेमे, नाटके, पुस्तके, लेख व अन्य माध्यमे वापरुन लोकांचे प्रबोधन केले तर ते जास्त शाश्वत असते. दडपशाहीने लादलेले कायदे लोक संधी मिळताच उखडून टाकतात.
कायदा तरी जातींच्या उल्लेखाला नाकारत नाही. जात वापरुन भेदभाव केला तर मात्र त्याकरता कायद्याचा बडगा असतो. पण ते झालेले नसताना ते होईलच असे भाकित करणे आततायीपणाचे आहे.
सरकारदरबारी काही जातींना आरक्षण मिळते. निदान त्या जातींना त्या सवलती मिळण्याकरता आपली जात कागदोपत्री सिद्ध करावीच लागते. ज्यांना तसे मिळत नाही त्यांचीही जात आरक्षित वर्गातली नाही हे सिध्द करण्याकरता ती माहित असावीच लागते. हे सगळे एका रात्रीत झिरो टॉलरन्सच्या नावाखाली बंद होणार नाही हे नक्की.
25 Aug 2016 - 11:53 am | बोका-ए-आझम
ते मान्य आहेच. साहित्याद्वारे प्रबोधन म्हणालात तर महात्मा फुल्यांच्या किंवा त्यांच्या आधीच्या काळापासून जातिभेदाविरोधात लिहिलं गेलेलं आहे पण तरीही खैरलांजी किंवा बाथे लक्ष्मणपूर अशा घटना घडतात. कलाकलाने लोकांचं प्रबोधन होईल ही अपेक्षा ठीक आहे पण तो long term चा विचार आहे आणि in the long run, we all will be dead.
मी या बाबतीत सिनिकल आहे. लोकांचा कल नकारात्मक गोष्टींकडे जास्त असतो. वर्गात पर्यवेक्षक नसताना शांतपणे आणि एकाग्रतेने स्वतःचाच पेपर लिहिणाऱ्या मुलांपेक्षा काॅपी करणारी मुलं नेहमीच जास्त असतात.
24 Aug 2016 - 7:19 am | लीना कनाटा
आदिजोशि काका,
मोठे व्हा !
विचारांना विरोध करा, व्यक्तींना नको.
वैयक्तिक आणि हीही टीका असल्याने (समर्पक प्रत्युत्तर देण्याचा मोह टाळून) पास
23 Aug 2016 - 11:51 am | अत्रुप्त आत्मा
@सिंधू आणि साक्षी यांनी ऑलिंपिक्स मध्ये पदके मिळवल्यावर›› चुकून सिंधू आणि संक्षी... असं वाचलं. ;)
बाकी चालू द्या..
जातीवरचा धागा आहे, तेंव्हा योग्य वेळी टनाटनी , फुर्रोगामी वग्रे मंडळी येतीलच. .. असो.
24 Aug 2016 - 9:33 am | गणामास्तर
गुर्जी कोण कोण आहेत हो इथं टनाटनी वैग्रे मंडळी? मला पण कळू द्या कि प्लिज. .
23 Aug 2016 - 7:56 pm | माम्लेदारचा पन्खा
जातवापसी सुरु करायची आहे काय या लोकांना ? मूर्ख कुठचे !
अवांतर- खेळात अजूनही आरक्षण आलं नाही हे केवढे मोठे उपकार आहेत देशावर....
25 Aug 2016 - 7:08 am | लीना कनाटा
पन्खा काका,
आजच्या जगात देखील लोकांना त्या दोघींच्या जातींचा धांडोळा घ्यावासा वाटतो हे खरेच अनाकलनीय आहे.
अवांतर - आरक्षणा बद्दल
हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयांवर आत्ता पर्यंत जे काही वाचलंय, ऐकलंय, बघितलंय, अनुभवलंय त्या मध्ये मुळात हि आरक्षण देण्याची वेळ का आली यांवर कोणीच काही बोलत नाही. याचं विश्लेषण कोणीच करत नाही.
अगदी अमेरिका खंडा मध्ये देखील आरक्षण आहे, मूळच्या भूमिपुत्रां साठी. तेथे बाहेरून आलेल्या युरोपिअन लोकांनी मूळ भूमिपुत्रांवर अत्याचार, अन्याय केलाय. त्यांच्या हत्या केल्यात, जमिनी बळकावल्यात, त्यांना देशोधडीला लावलेय इत्यादी, इत्यादी. त्याची भरपाई म्हणून आरक्षण आहे.
भारतात तर सगळे आपलेच होते ना? तरीही अशी वेळ का यावी? .......
25 Aug 2016 - 8:24 am | संदीप डांगे
Are you real??
25 Aug 2016 - 11:07 am | माम्लेदारचा पन्खा
बाकी कुछ भी कहो...गाली दो...काका मत कहो ना !
24 Aug 2016 - 11:47 am | जागु
२१०० हा आकडा काहीच नाही हे अगदी पटले. आणि मिडीयावाल्यांनीही हे उचलून एवढा इश्यु करणे गरजेचे नव्हते.
नशीब सिलेक्शनच्या वेळी असल्या फाल्तु गोष्टी फैलावत नाहीत.
25 Aug 2016 - 2:19 pm | कपिलमुनी
लग्नाळू मुलांनी शोधली असेल . अॅरेंज मॅरेजसाठी योग्य वधू :))
25 Aug 2016 - 2:21 pm | संदीप डांगे
तेच म्हणत होतो ;)