पूर्वतयारी
हुश्श..!! चला आज चारधाम यात्रेची बुकिंग करून झाली.. मोठा टप्पा पार केलाय.. केदारनाथाची कृपा .. त्याच्या बोलावण्याशिवाय आपण त्याला भेटू शकत नाही.. पांडव भेटू शकले नाहीत तर आपण काय चीज..!सुरुवात चांगली बॅग विकत घेण्यापासून झाली ती पण यात्रेच्या आदल्यादिवशी.. स्टारबाझार मधून 15 किलो सामान राहील अशी सफारी बॅग घेऊन आलो.. बाकी वायफळ खरेदी आई बरोबर असेल तर होतंच नाही..या आधी हिमालय काय चीज आहे याचा थोडा अनुभव असल्यामुळे त्या वातावरणाला साजेशे असे गरम कपडे त्यावेळी घेऊन ठेवले असल्यामुळे फक्त सुका मेवा तेवढा घेतला. विमानाने जायचं म्हणजे सामानाच्या वजनाकडे लक्ष द्यावेच लागते.. हिमालयात जाताना तुम्ही किती कपडे घेऊन जाता या पेक्षा कोणते कपडे घेऊन जातंय याला जास्त महत्व आहे.. सगळे गरम कपडे एक किलो प्रत्येकी असल्यामुळे ते जुळवाजुळव करताना नाकी नऊ आले.. त्यात माझा ट्रायपॉड अडीच किलोचा.. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.. 2 दिवसाला 1 जोड कपडे असा हिशोब करून वजन करण्याच्या काट्यावर बॅग ठेऊन बरोबर 15 किलो वजन जेव्हा झळकले तेव्हा कुठे आईचं समाधान झाले.कॅमेरा बॅग मध्ये लॅपटॉप आणि माझा तिसरा डोळा 2 लेन्स सोबत विराजमान झाला.. त्या मध्ये पण वजनाचे वांदे..7 किलो वजन बॅग मध्ये बसवताना 3 लेन्स काढून ठेवताना जीव तुटत होता.. अश्या प्रकारे माझी पॅकिंग पूर्ण झाली.रोज 5 किलोमीटर चालण्याचा सराव 4 महिने अगोदर चालू केल्या असल्यामुळे थोडं फिट वाटत होतं, पण हिमालयात फिरणं म्हणजे फिटनेसचा चांगलाच कस लागतो..!ती रात्र काही झोप लागली नाही..लहानपणी पिकनिक ला जाताना कशी झोप लागत नाही तशीच हुरहुर मनात चालू होती.
मुंबई ते हरिद्वार
सकाळी ५ चा अलार्म वाजला आणि खडबडून जाग आली.. बाहेर कुठे भटकायला जायचं असेल तर एक वेगळाच उत्साह असतो माझ्या मध्ये.. सगळं आवरून ७ वाजता तयार होऊन टूर ऑपरेटरच्या फोनची वाट बघत बसलो. वेब चेक-इन आदल्या दिवशीच केल्या मुळे बराच अवकाश होता. आकांक्षा टूर्सचे देवेंद्र सरांचा फोन आला आणि माझा प्रवास सुरु झाला. काली-पिली टॅक्सी सर घेऊन आले आणि सामान डिक्की मध्ये लोड करून आमच्या गप्पा सुरु झाल्या. सरांचा पायाला लागलं असल्यामुळे ते काही येणार नव्हते. पण खूप काही माहिती आणि सूचना त्यांनी केल्या ज्या नंतर तंतोतंत उपयोगात आल्या. एअरपोर्टला उतरल्यावर माझी स्वारी सामान चेक-इन करायला काउंटर वर गेली.. मोठ्या बॅगच वजन बरोबर १५ किलो डिस्प्ले झाल्यावर सगळ्या इंडिगोच्या स्टाफ ने टाळ्या वाजवून दाद दिली. मी पुणेरी खवचटपणे "I tried my level best" असं म्हणत बोर्डिंग पास घेऊन सिक्युरिटी चेक ला रांग लावली. माझ्यासाठी हा टप्पा सर्वात कंटाळवाणा असतो.. लॅपटॉप, कॅमेरा आणि लेन्स सगळ्या बाहेर काढून ट्रे मध्ये ठेवा.. चेक झाल्यावर पुन्हा ते बॅग मध्ये भरा..! हा टप्पा पार पडला की मग आपण आझाद.. जो पर्यंत विमान धक्क्याला लागत नाही तो पर्यंत..! विमान आलं आणि बॅग वर रॅक मध्ये अलगद ठेवली.. "कॅमेऱ्याची किती ती काळजी घ्यावी" असे टोमणे याच साठी ऐकायला मिळतात मला..! अजून ग्रुप मधले अजून कोण भेटलं नव्हतं.. एअरहोस्टेस ने विचारलं की काही ब्रेकफास्ट ला घेणार का.. मेनूकार्ड मध्ये १५० चा एक समोसा वाचून मी १ ग्लास पाणी मागितलं. विमान विनाविलंब दिल्लीला उतरले आणि बॅग काउंटर वरून सामान घेऊन टूर लीडर ची वाट बघत बाकी ग्रुप मेंबर्सना फोन करून सगळ्यांशी ओळख करून घेतली.. माझा उत्साह बघून त्यांना मीच टूर ऑपरेटर आहे की काय असा गैरसमज झाला होता. तेवढ्यात आमचे टूर ऑपरेटर राठोड सर आले.. सगळं सामान बस मध्ये चढवल्यावर बस हरिद्वारला निघाली. पहिला पाडाव हरिद्वार..तिथे बस बदलावी लागते. तिथल्या बस वेगळ्या.. ड्राइवर वेगळे.. हिमालयात गाडी चालवण्यासाठी वेगळे लायसन्स..त्याला ग्रीन लायसन्स म्हणतात.. जशी जशी बस हरिद्वार जवळ यायला लागली तशी हवा गार होण्यास सुरुवात झाली.. मावळता सूर्य आणि सोबत गंगा मैया.. हरिद्वारला पोहोचण्यास साधारण रात्रीचे १० वाजले.. आमचे आचारी अगोदरच ट्रेन ने आदल्या दिवशी पोहोचले असल्यामुळे गरमागरम जेवण तयार होते.. प्रवासामुळे दमलो होतो म्हणून जेवून कधी झोपतोय असं झाल होतं.. इतक्यात राठोड सर आले आणि उद्या सकाळी ७ वाजता आपल्याला यमुनोत्री साठी निघायचं आहे अश्या सूचना मिळाल्या.! सगळ्याचा निरोप घेऊन मी निद्रादेवीच्या हवाली झालो.
हरिद्वार ते यमुनोत्री
सकाळी ७ वाजता नाश्ता करून आम्ही सगळे तयार होऊन बसची वाट बघत राहिलो आणि बस आली ८:३०ला.. तुम्ही जेवढे लवकर निघालं प्रवासाला तेवढं चांगलं .. कारण हिमालयात रात्री ८ नंतर गाडी चालवायला परवानगी नाही..सगळे रस्ते जंगला मधून जातात.. या हिमालयन ड्रायव्हर्स चे कौशल्य पणाला लावणारे असे वळणदार असे रस्ते..!
ह्रिषिकेशला चारधामला जाणाऱ्या प्रत्येकाचे नोंदणीकरण करावेच लागते.. हा नवीन नियम ३ वर्षापूर्वी झालेल्या महापुरात मनुष्यहानी नंतर लागू करण्यात आला आहे.. पण तिकडे सगळा सावळा गोंधळ.. २ तास वाट बघून आमचं ग्रुप रेजिस्ट्रेशन करून सगळ्यांना ओळखपत्र वाटप करून आम्ही खऱ्या चारधाम प्रवासाला निघालो..!
हळू हळू हवा थंड होण्यास सुरुवात झाली.. मी थंडी सहन होईल तो पर्यंत गरम कपड्याना हात लावायचा नाही अश्या थाटात कुडकुडत बाहेरच निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवायला लागलो.
दुपारचे जेवण मिळेल त्या धाब्यावर गरम करून आम्ही जेवढं लवकर जानकीचट्टी ला पोहोचता येईल तेवढा पोहोचायचं प्रयत्न केला कारण रात्री 8 नंतर गाडी चालवायला परवानगी नाही. तरीही आम्हाला उशीर हा झालाच आणि आमची गाडी पोलिसांनी साधारण 9 च्या सुमारास अडवली, भाविक आहेत, रस्ते मे जाम लग गया था.. अशी कारण आमचा ड्राइव्हर देत होता, पण पोलीस काही ऐकायला तयार नव्हते, पण नंतर गाडी मधले सिनियर सिटिझन्स बघून त्यांनी परवानगी दिली पण त्या अगोदर त्यांनी मोठा घोळ घालून ठेवला, त्यांनी आमच्या नकळत आमच्या हॉटेल वर सांगितलं कि आम्ही काही येत नाही बुकिंग कॅन्सल करा. हे आम्हाला हॉटेल वर पोहोचल्यावर कळलं कि आमचे रूम्स त्याने दुसऱ्यांना देऊन टाकले आहेत आणि आता फक्त धर्मशाळेत रूम शिल्लक आहेत. एक तर बाहेर कडाक्याची थंडी आणि त्यात हे असे भयानक रूम्स, मी कुठेही राहायची तयारी करून आल्यामुळे जी रूम मिळते ती घेऊन सामान ठेवून जेवायला बसलो, बाहेर भाविकांची गर्दी होती, काहीनि आतापासूनच चालायला सुरवात केली होती.
मी जेवून माझ्या हॉटेल च्या गच्चीवर कुडकुडत उभा होतो आणि फोटो काढायची लहर आली, त्यातला हा एक प्रयत्न.
यमुनोत्री
सकाळी 8 वाजता सगळं यावरून दर्शना साठी तयार झालो, प्रत्येकाने आपापल्या परीने जसं जमत तसं दर्शन घेऊन या हे रात्रीच ठरलं होतं.
दर्शनाला येणार्या भाविकांसाठी घोडे,खेचरं,तसंच डोल्या,छोटे पिट्टू अशी सोय आहे, पण मी आणि माझे दोन साठीतले तरुण मित्र असे आम्ही पायीच जायचं ठरवलं, हळू हळू चालत निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही अंतर कापत होतो, सकाळी एवढी थंडी जाणवली नाही, उजव्या हाताला यमुना नदीने आम्हाला मंदिरापर्यंत साथ दिली ती अशी
रस्ता चांगला आहे पण खूप चढण आहे, त्यात एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची कमी जाणवतेच, 5 तास चालल्यावर आम्हाला मंदिर दिसायला लागलं, नकळत हात जोडले गेले. थकवा कुठे नाहीसा झाला कळलं नाही.
सध्याचे मंदिर हे 1959 मध्ये महाराज प्रतापसिंग यांनी बनवलेले आहे, या आधीचे मंदिर पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहे.
थोडं यमुना नदी बद्दल :
यमुना नदीचा उगम हा उत्तराखंड या राज्यामध्ये 4421 मीटर म्हणजे साधारण 14504 फुटावर कलिंद पर्वतामध्ये होतो, पण यमुनोत्री हे मंदिर 3165 मीटर म्हणजे 10383 फुटावर वसलेले आहे. मंदिरापासून 10 किमी चा ट्रेक करून आपल्याला उगम स्थान जवळ जात येते.
पुराणात असं मानलं जात की यमुना नदीची निर्मिती ही भगवान विष्णूंच्या अश्रूपासून झाली आहे, सूर्यदेवांच्या दोन पत्नी, एकीचा नाव छाया तर दुसरीचे संज्ञा, सूर्य आणि संज्ञा यांना तीन मुले होती त्यातील यम आणि यमुना ही जुळी भावंडे, तिसऱ्या भावंडाचं नाव आता मला आठवत नाहीये. म्हणून जो यमुनेच्या पाण्यात स्नान करेल त्याची सगळी पापे नष्ट होतील असा वर यमाने दिला होता.
तसेच सूर्य आणि छाया यांचा मुलगा म्हणजे शनी, म्हणून यमुनेच्या पाण्यात स्नान करेल त्याची साडेसाती नष्ट होईल असा वरदान शनी देवांनी दिले होते.
यमुनोत्री मंदिराच्या बाजूला एक तप्त कुंड आहे ज्याला सूर्यकुंड असे म्हणतात, याच सूर्यकुंड मध्ये तांदळाच्या दाणे असलेल्या छोट्या पुरचुंड्या सोडल्या जातात थोड्या वेळाने तांदूळ शिजून भात तयार होतो व तो भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो.
मंदिर परिसरात फोटो काढायला सक्त मनाई आहे म्हणून मंदिर गाभाऱ्याचे आणि सुर्यकुंडाचे फोटो काढायला मिळाले नाहीत.
दर्शन घेऊन बाहेर आलो आणि यमुने नदीच्या प्रति उगम स्थानाजवळ बसून पूजा केली, तो पर्यंत बाहेर वातावरण उघडलं होतं, रणरणतं ऊन, त्यात एवढ्या उंचीवर ऊन म्हणजे चटकेच बसत होते, सकाळी फक्त पोहे खाऊन बाहेर पडलो होतो, साधारण 2 च्या सुमारास भूक लागली होती, मंदिर वाटेवर खूप दुकानं आणि छोटी हॉटेल आहेत, स्थानिक लोकांना हाच रोजगार आहे, यात्रा चालू झाली कि भाविकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करायची.
मी आणि दिलीप सर एका हॉटेल मध्ये जिलेबी आणि कॉफी मागवून संजय सरांची वाट बघत बसलो, संजय सर कुठे गायब झाले ते कळलं नाही, दिलीप सर त्यांना शोधायला परत मंदिर परिसरात निघून गेले, मी आपला जिलेबी संपवत वाट बघत होतो इतक्यात एक सत्तरीकडे झुकलेली आजी हॉटेल मध्ये आली, तिच्या घरच्या बरोबर तिची चुकामुक झाली होती आणि तिच्या जवळ पैसे सुद्धा नव्हते काही खाण्यासाठी, घसा कोरडा पडला होता, ती त्या हॉटेल वाल्याला म्हणाली कि "रोटी मिलेगी क्या" तर हॉटेल वाला द्यायला तयार नव्हता.
"पैसा देना पडेगा फिर रोटी मिलेगी" मला राहवलं नाही, मी म्हणालो त्या माउलीला काय हवं ते दे खायला पैसे मी देतो, त्या माउलीला पोटभर जेवताना बघून माझं पोट सुद्धा भरलं. माझ्या डोकयावर हात फिरवत म्हणाली "बेटा चारधाम करणे आये हो? पर तुम्हारी यात्रा तो यहा पे हि सफल हो गयी, यात्रा करनेका असली उद्देश ये होना चाहिये" मी हसलो फक्त आणि पाय पडलो, हॉटेल वाल्याला पैसे दिले आणि मागे वळून बघितलं तर ती माउली कुठेच दिसली नाही, मी दिलीप सर येई पर्यंत तिला शोधलं पण नाही दिसली. दिलीप सर आले पण संजय सरांचा काहीच पत्ता नव्हता..
खाली उतरताना घोडा करायचा हे ठरलं, आणि आम्ही २ घोडे निवडून खाली उतरायला सुरवात केली, २५ वर्षाचा तरुण घोडा सांभाळत मला खाली घेऊन निघाला, आणि माझ्या गप्पा चालू झाल्या, मी विचारलं "सर यात्रा के बाद क्या करते हो?" कोण तरी त्याला सर म्हणतंय हे ऐकून तो गोंधळला.. म्हणाला "उत्तरकाशी से आते है हम सब लोग, मैने BED किया है पर यहा पे नौकरी नही मिलती" मुंबई जाके हॉटेल में काम किया था थोडे साल पर दम घुटता है शहरं कि हवा मैं." मध्येच थांबला आणि म्हणाला साहब यहा उतरना पडेगा, यहा से पैदल चलो, घोडे फिसलते यहा पे".. खूप उतार आहे या पट्टया मध्ये.. पुन्हा घोड्यावर रपेट मारून हॉटेल जवळ आलो.. ५०० रुपये ठरलेले होते, मी ७०० दिले म्हणालो "घोडे को खिलाना मेरी तरफ से" हसला. म्हणाला "रुको".. दुकानात गेला, २०० चं घोड्याच खाणं विकत घेतलं.. "आप के खिलादो "शेरा" को" "शेरा च्या खास भांड्यामधे ते चणे आणि काहीतरी असा मिश्रण असलेला खाद्य खायला घालून मी निघालो.. विचार केला २०० रुपये त्याने सहज स्वतः जवळ ठेवले असते, आपण कुठे बघायला जाणार होतो के त्याने ते घोड्याला खायला दिलं की नाही ते. पण इमानदारी खूप जपतात काही लोक त्यातला हा "सुरेश".. लक्षात राहशील "मित्रा".
हॉटेल मध्ये आलो तर समोर संजय सर, मी म्हंटल. वाह! तुम्ही इथे आलात पण आणि आम्ही तुम्हाला मंदिर जवळ शोधत होतो, ते म्हणाले की मी मंदिरात आलोच नाही, गर्दी एवढी होती के हिम्मतच झाली नाही पुढे जायची. तो पर्यंत आम्हाला नवीन रूम्स दिल्या होत्या, ५ वाजता जेऊन आमच्या हॉटेल मालक बरोबर गप्पा चालू झाल्या आणि नंतर खिचडी भात खाऊन, सामान आवरून आम्ही आडवे झालो.
गंगोत्री
सकाळी ६ ला निघायचं ठरलं, पुढचा पाडाव उत्तरकाशी, आजचा दिवस उत्तरकाशीला पोहोचून आराम करण्याचा होता, त्यात श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणे हाच एक कार्यक्रम होता.
श्री काशी विश्वनाथ मंदिर सर्वात जुने आणि पवित्र असे भागीरथी नदीच्या तिरावर वसलेले उत्तरकाशीमध्ये आहे,. मंदिर परिसर आणि सोबत भागीरथी नदी वातावरण मोहित करून टाकते. त्याच्या या लोकप्रियतेमुळे अनेक चारधामच्या यात्रेला येणारे यात्रेकरू प्रसिद्ध चारधाम सोबत या मंदिराला भेट देतात.
काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान महादेवाला समर्पित आहे आणि ते सुरुवातीला भगवान परशुराम आणि नंतर महाराणी खनेती यांनी १९५७ मध्ये नूतनीकरण करून होते,
याच मंदिराच्या समोर शक्ती मंदिर आहे जे आई पार्वतीला समर्पित आहे, येथे मुख्य आकर्षण एक प्रचंड 6 मीटर 90 सें.मी.असा जड, त्रिशूल आहे, असं म्हणतात की महिषासुर या राक्षसाचा वध हा याच त्रिशुळाने केला होता..
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही गंगोत्री ला निघालो, बाहेर पावसाळी वातावरण होतं, मधेच एक पावसाची सर येत होती, असं वातावरण थंडी मध्ये अजून भर घालते, पण तेवढा निसर्गही खुलून दिसतो, ऊन पावसाचा खेळ कॅमेरा मध्ये टिपत आम्ही गंगोत्री ला पोहोचलो,
साधारण १ किलोमीटर अगोदर पार्किंग मध्ये बस थांबली आणि आम्ही पायी निघालो, इथे वातावरण एकदम साफ होतं, पण ऊन तेवढंच कडक, ऑक्सिजन कमी असल्यामुळे गरगरल्या सारखं झालं, पण आयुर्वेदिक कापूर गळ्यातच बांधून ठेवला असल्यामुळे पुढे त्रास झाला नाही, कपूर हुंगत आम्ही पोहचलो मंदिर परिसरात!
आता थोडं गंगोत्री मंदिर बद्दल: यमुनोत्री पासून गंगोत्री हे अंतर २२८ कि.मी आहे, हे मंदिर ३१४० मीटर म्हणजेच १०३०० फूट उंचीवर वसलेले आहे,
प्राचीन काळात सगर नावाचा राजा राज्य करत होता, इंद्राला त्याच्या सामर्थ्याची भीती वाटायला लागली तेव्हा त्याने राजाचा अश्वमेध यज्ञाचा घोडा कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवला, सगर राजाचे ६०००० मुले तो घोडा शोधत असताना त्यांना तो घोडा आश्रमात बांधून ठेवलेला दिसला, आश्रमाची नासधूस करत त्यांनी तो घोडा परत घेऊन जायचा प्रयत्न केला तेव्हा कपिल ऋषींनी त्यांना भस्म करून टाकले, जेव्हा सगर राजाला हे कळले तेव्हा त्याला फार दुःख झाले आणि त्यांनी ऋषींना आपल्या मुलांना मुक्ती देण्याची याचना केली, तेव्हा ऋषींनी सांगितले की आता तुझी मुलं तर काही परत येऊ शकत नाहीत पण जर स्वर्गातली गंगा कुणी पृथ्वीवर आणली तर तुझ्या मुलांना मुक्ती मिळेल, सगर राजाने खूप प्रयत्न केले, पण सगर राजाचा नातू भगीरथ यांनी हिमालयात घोर तपस्या केली तेव्हा गंगा माता त्यांना प्रसन्न झाल्या व त्यांनी पृथ्वीवर प्रकट होण्याचे वचन दिले, पण एक अडचण अशी निर्माण झाली की या अफाट धारेचा वेग सहन कोण करेल, तेव्हा भगीरथाने भगवान महादेवाकडे प्रार्थना केली आणि त्यांच्या विनंतीला मान देत महादेवाने आपल्या जटे मध्ये गंगे ला धारण केले आणि त्यानं नंतर गंगा ही पृथीवर अवतरली, जिथे गंगा अवतरली ते ठिकाण म्हणजे गंगोत्री, इथे गंगेला भागीरथी या नावाने ओळखतात,
गंगेचा उगम हा गोमुख या ठिकाणी होतो जो गंगोत्री पासून १८कि.मी वर आहे, गोमुख ला जायला पहिली परवानगी घ्यावी लागते, दिवसाला १०० असे पर्यटक आणि भाविक जायला परवानगी मिळते, तिथे हरणांचे कळप फिरत असतात, जरा कुठे खुट्ट झाला के ते बेभान पळत सुटतात, आणि त्याच्या या पळण्याने जमीन कंप होऊन हिमकडे कोसळतात, म्हणून तिथे शांत राहायला बजावतात. भोजबासा गावात राहायची आणि जेवणाची सोय होते, तिथे मौनीबाबा यांचा आश्रम सुद्धा तपोवन या ठिकाणी आहे, हिमालयन अश्या भल्या मोठ्या गुफे मध्ये गंगेचा उगम होतो, पण ग्लोबल वॉर्मिंग मुळे हा ग्लेशियर हळू हळू मागे सरकत चालला आहे, गंगा आईने बोलावलं तर या ठिकाणी एक दिवस नक्कीच भेट देईन.
केदारनाथ
उत्तरकाशी वरून सकाळी गुप्तकाशी साठी आम्ही सकाळी थोडा उशिराच निघालो, तसे ८ वाजले निघायला पण वातावरण पावसाळी असल्या मुळे पाय निघत नव्हते, गुप्तकशी ला जाताना वाटेत अगस्तीमुनीचा आश्रम लागतो, तेथे थोडावेळ थांबून आम्ही गुप्तकाशी साठी प्रवास सुरू केला,
गुप्तकाशीला खूप पाऊस पडून गेला होता, संध्याकाळी पोहोचलो तर लाइट गेलेले होते, चहा घेत समोर भागीरथी नदीचे रौद्ररूप अनुभवत कधी डोळा लागला कळलंच नाही, दिलीप सर मला शोधात आले आणि माझी झोपमोड झाली, खबर अशी होती की केदारनाथला आमचा हेलिकॉप्टरचं ऍडव्हान्स बुकिंग केलं नव्हतं आणि गेले २ दिवस पाऊस पडत असल्या कारणाने हेलिकॉप्टर सेवा बंद होती, आज पाऊस थोडा शांत होता म्हणून उद्या हेलिकॉप्टर सर्विस ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करायच ठरलं, एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा बुकिंग मिळत नसल्या कारणाने सगळे हिरमुसले होते, आता सकाळी जे मिळेल त्या मार्गाने केदारनाथ ला रवाना व्हायचं असं ठरवून आम्ही जेवून झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी ४ ला सगळे तयार होऊन निघालो ते पवनहंसच्या ऑफिस बाहेर येऊन थांबलो, ६ वाजता ऑफिस सुरू झालं आणि सगळे बुकिंग झालेला आहे पुढच्या आठवड्यात या असा निरोप मिळाला, आणि सगळे निराश झाले, ग्रुप मध्ये काही जणांनी ओळखीने ३ सीट्स मिळवल्या तेव्हा त्यांचा निरोप घेऊन आम्ही गौरीकुंडला निघालो, गौरीकुंड वरून केदारनाथ ला जायला ट्रेक आहे, जसा यमुनोत्रीला करावा लागतो तसाच, पण हा थोडा लांब आणि अवघड आहे, ३ वर्षपूर्वीच्या प्रलयात गौरीकुंड संपूर्ण उध्वस्त झालेले आहे, तिथेच एक गरम पाण्याचे कुंड होते, पण आता फक्त छोटीशी धार आहे कुंड मध्ये. माता पार्वती महादेवांची तपश्चर्या करत असताना त्यांना थंडी वाजू नये म्हणून महादेवांनी या गरम पाण्याच्या कुंडाची निर्मिती केलेली आहे असा म्हणतात.
हेलिकॉप्टर च्या बुकिंग मध्ये एवढा वेळ निघून गेला होता की आता घोडे आणि डोली वाले पण वर निघून गेले होते, तिथली एकूण परिस्थिती बघून दिलीप सर आणि संजय सर म्हणाले आम्ही परत हॉटेल वर जातो, आता माझ्याकडे २ पर्याय होते, १७ की.मी चा ट्रेक करत वर जायचं की हॉटेल वर परत जाऊन आराम करायचा, वर गेलो तर रात्रीच्या कडाक्याच्या थंडी मध्ये राहावं लागणार होतं आणि वर राहायची सोय कशी आहे याची काहीच कल्पना नसल्यामुळे मी हॉटेल वर परत जायचा निर्णय घेतला. आमच्या ग्रुप मधले बाकीचे जे मिळेल त्या मार्गाने वर निघाले. केदारनाथच्या मनात नक्की काय चाललंय, त्यालाच माहित!
हॉटेल वर आलो तर अजून लाइट आले नव्हते आणि हॉटेल समोरचे झाड कोसळून विजेचा खांब मोडला होता, मुसळधार पाऊस पडून गेला होता अस हॉटेल मालक म्हणाला, आम्ही पुन्हा हेलिकॉप्टरच बुकिंग कसा मिळेल याचे प्रयत्न चालू केले,
आकांशा टूर्स च्या महेश सरांबरोबर माझं बोलणं झालं, तेही त्याच्या परीने प्रयत्न करत होते, शेवटी ओळखीनेच सकाळी पहिल्या हेलिकॉप्टर चं बुकिंग मिळेल असा निरोप आला, आणि आम्ही खुश झालो, केदारनाथा सांभाळ रे बाबा!
सकाळी पुन्हा ४ वाजता आम्ही निघालो, आणि आमची स्वारी पवनहंस च्या ऑफिस समोर हजर झाली, बुकिंग आणि वजन करून गेटपास घेऊन हेलिकॉप्टरची वाट बघत मी वेटिंग रूम मध्ये बसलो होतो, तेवढ्यात आमची नाव विचारत एक कर्मचारी आला आणि आम्ही त्याच्या मागे मागे हेलिपॅड वर पोहोचलो, कोणी कुठे कसं बसायचं हे आम्हाला समजावून सांगण्यात आलं आणि समोरून हेलिकॉप्टर हेलिपॅड वर उतरलं . मनात धाकधूक चालू झाली, तसं विमानात बरेच वेळा बसलो आहे पण हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची पहिलीच वेळ, मला कोपऱ्यात बसायला मिळाल पण कॅमेरा वापरू शकतो का विचारला? तर "नहीं" असं राकट आवाजात पायलटचं उत्तर मिळालं. तरीही डोळ्यात निसर्ग साठवून घ्यायचाच असं ठरवून बाहेर बघत असताना हेलिकॉप्टर उडालं. हिमालय किती भव्य आहे हे आकाशातून फार सुरेख दिसत, आणि जमीनीवरून हिमालयासमोर आपण किती शूद्र आहोत हे कळतं.
साधारण ७ मिनिटात आम्ही केदारनाथ मंदिर पासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या हेलिपॅड वर उतरलो, आणि हिमालयन थंडी काय असते याचा प्रत्यय आला. नाकातून पाणी वाहायला लागलं, हात गारठून गेले,बॅग सांभाळत हळू हळू चालत मी मंदिर समितीच्या ऑफिस मध्ये पोहोचलो, साधारण १५ ते २० मिनिटे लागली ५०० मीटर अंतर चालायला, एवढ्या उंचीवर ऑक्सिजन अगदीच विरळ असल्यामुळे थोडा चाललं तरी दम लागत होता, ऑफिस मध्ये पोहोचल्यावर VIP दर्शन कसं मिळेल याची चौकशी केली,मंदिरासमोर भली मोठी रंग लागली होती दर्शनाची, पण हेलिकॉप्टरने येणाऱ्या भाविकांसाठी VIP रांगेची व्यवस्था केली होती, अर्थातच पैसे भरून, ११०० रुपये. कारण परतीचा प्रवास १ तासात करायचा असतो.
एक पंडित आमच्या बरोबर देण्यात आला, आणि आम्हाला मागच्या दरवाज्या मधून थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाला, प्रवेश मंदिरात केल्यावर मला काही वेगळचं अनुभवायला मिळालं, एक वेगळीच शक्ती आपल्याभोवती आहे असा सतत जाणवत होतं , माझी कॅमेरा बॅग बाजूला ठेऊन मी केदारनाथा समोर बसलो, आणि डोळ्यातून महापूर चालू झाला, याच साठी केला होता हा अट्टाहास, भरून पावलो! साधारण १५मिनिटे मी समोर बसून होतो, हिप्नॉटिझ झाल्यासारखा.. तो पंडित मला पूजेचे विधी एका मागून एक करायला सांगत होता आणि मी ते सगळं तंतोतंत पाळत होतो, साधारण १५ मिनिटे पूजा झाली आणि मी केदारनाथला तुपाने अभिषेक घालून तिथून निघालो, पुन्हा मंदिर बाहेर छोटीशी पूजा झाली आणि पंडिताला दक्षिणा देऊन मी भानावर आलो. वेगळाच अनुभव होता तो. आता माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला, आणि मी मन भरत नाही तो पर्यंत फोटो काढत सुटलो.
आता थोडं केदारनाथ मंदिर आणि परिसराबद्दल...
केदारनाथ हे गंगोत्री पासून ३४६ कि.मी अंतरावर आहे, हे मंदिर समुद्र सपाटी पासून ३५८१ मीटर म्हणजे ११६५० फुटावर वसलेले आहे, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अश्या या मंदिराचा जीर्णोद्धार आदी शंकराचार्यांनी केला आहे, मूळ मंदिर पांडवांनी बांधले होते, त्याची गोष्ट हे अशी, महाभारतातील युद्धात ब्रह्महत्याचे पाप मोक्षासाठी पांडवांनी महादेवाची उपासना करण्यासाठी काशी हे ठिकाण निवडले, पांडव आपल्या भेटीला येत आहेत हे बघून महादेव कशी मधून निघून हिमालयाकडे निघाले, पांडवांना जेव्हा हे समजले तेव्हा तेहि त्याच्या मागे मागे हिमालयात पोहोचले, परंतु महादेव गुप्त रूपाने हिमालयात वावरत होते, पांडव गौरीकुंड जवळ आले असता पांडवांना चुकवण्यासाठी महादेवाने महिषरूप धारण केले व जवळ असलेल्या म्हशींच्या कळपात प्रवेश केला, नकुल-सहदेवाना तो रेडा-म्हैसा दिसला, त्यांनी भीमाला तो रेडा दाखवला, भीमाने नकुलाला सांगितले की मी या दोन दगडावर पाय ठेऊन उभा राहतो तू या सगळ्या कळपाला माझ्या दोन पायामधून जायला सांग, महादेव या मध्ये रूप बदलून आले असतील तर ते काही असं करणार नाही आणि आपण त्यांना ओळखू शकू, तसाच झालं, महादेव काही पायाखालून गेले नाहीत आणि एकवेळ अशी आली की ते महादेवांच्या खूप जवळ पोहोचले, आता पुन्हा महादेव लुप्त होणार हे भीमाच्या लक्षात आले. त्याने रेडय़ाला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रेडय़ाने जमिनीत प्रवेश केला व भीमाच्या हाती रेडय़ाचे फक्त शेपूट आले. पण यामुळे भूगर्भात प्रवेश केलेल्या रेडय़ाच्या हालचालीवर प्रतिबंध आले व त्याच्या शरीराचे पाच भाग भूपृष्ठावर प्रगट झाले. त्यापैकी पाठीचा भाग म्हणजे केदारनाथ, नाभीस्थळ- मद्महेश्वर, बाहु- तुंगनाथ, चेहरा- रुद्रनाथ व जटा म्हणजे कल्पेश्वर! ही पाच पवित्र स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून ओळखली जातात.
राहण्याची आणि जेवणाची सोय इथे सरकारने केलेली आहे, राहायला उत्तम प्रतीचे तंबू आहेत आणि गरम अंथरून-पांघरून देण्यात येते.
मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठा दगड आहे, त्यावर नाव लिहिलं आहे "भीमशीला", ३ वर्षापूर्वी आलेल्या महाप्रलयात याचं दगडामुळे मंदिर बचावल होता, पण बाकी आजूबाजूचं संपूर्ण गाव उध्वस्त आलेलं आहे. मंदिराच्या मागचा परिसर केदार पर्वतरांगांनी व्यापून गेलेला दिसतो, मंदिराच्या परिसरात आदी शंकराचार्यची समाधी होती, पण मला कुठे ती दिसली नाही, प्रलयात तिचं खूप नुकसान झालं होतं एवढं ऐकून होतो. मंदाकिनी नदीचा परिसर धुंद करून टाकतो, पुढच्यावेळी इथे ट्रेक करून यायचं आणि रात्री इथेच थांबून निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असं ठरवून जास्त वेळ न दवडता आम्ही पुन्हा हेलिपॅड जवळ आलो, आमचा नंबर अर्ध्या तासाने आला, वातावरण लगेच खराब होत होतं, म्हणून हेलिकॉप्टरला यायला उशीर होत होता. पुन्हा ७ मिनिटं मध्ये आम्ही फाटा ला उतरलो, सध्या तिथे ७-८ खासगी हेलिकॉप्टर सेवा देणाऱ्या कंपनी आहेत, तिथे ऍडव्हान्स बुकिंग करून जायला काहीच हरकत नाही पण जर वातावरण खराब असेल तर मग पंचाईत होते.
बद्रिनाथ
आमचे दोन दिवस केदारनाथ दर्शन मधेच गेल्यामुळे बद्रीनाथला राहणे शक्य नव्हते, म्हणून आम्ही पिपलकोटीला रहाण्याचा निर्णय घेतला, सकाळी लवकरच गुप्तकाशी वरून पिपलकोटी ला निघालो, वाटेत चालत्या बसमधून जसे जमले तसे फोटो काढण्यात संपुर्ण प्रवास निघून गेला. दुसऱ्या दिवशी आमच्या ग्रुप मधल्या एका मॅडम यांचा गायनाचा कार्यक्रम बद्रीनाथ मंदिर समितीने आयोजित केला होता, म्हणून सकाळी किती वाजता निघायचं हे ठरवून दिवस संपवला.
दुसऱ्या दिवशी ८ वाजता आम्ही सगळे निघालो, पिपलकोटी ते बद्रीनाथ मार्ग फारच सुंदर आहे, आजूबाजूला हिमालय आणि सोबतीला अलकनंदा नदी, साधारण ११ च्या सुमारास आम्ही बद्रीनाथला पोहोचलो, नर आणि नारायण पर्वतांच्या मध्ये हे सुंदर असं मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून ३१३३ मीटर म्हणजेच १०२७८ फूट उंचीवर बद्रीनाथ मंदिर वसलेले आहे, १ कि.मि रांगेत उभे राहून आजूबाजूचा परिसर न्याहाळत १ तास कसा निघून गेला कळलंच नाही, म्हणावी तेवढी आज थंडी नव्हती, रान-तुळशीच्या माळा बद्रीनाथला आवडतात म्हणून सगळे भाविक त्या स्थानिक लोकांकडून विकत घेत होते, मी मंदिरात काहीच प्रसाद घेऊन जात नाही, म्हणून मी आपला रिकाम्या हाताने मंदिरात प्रवेश केला, साधारण ५० सेकंद दर्शन मिळालं, मुख्य गाभाऱ्यात बद्रीनारायणाबरोबर गरुड, उद्धव, नार आणि नारायण अश्या मूर्ती आहेत, वरून तुळशीचे पान डोक्यावर पडलं आणि तोच आशिर्वाद समजून मी बाहेर आलो. हा तुळशीचा पाला परत हार करण्यास वापरत नाहीत, तो सुकवून त्याचा चहा बनवला जातो.
दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाजूच्या सभामंडपामध्ये गायनाचा कार्यक्रम सुरू झाला, मे ५ मिनिटे हजेरी लावून मी कॅमेरा सावरत बाहेर भटकू लागलो, तिथे २ लहान मुले बद्रीनाथ मंदिराचे शिक्के विकत होती, १० रुपयाला एक, मी म्हंटलं "अरे उस्ताद स्कूल नहीं गये क्या". तर त्यातला एक हसत म्हणाला "नहीं, माँ की मदत कर रहा हूँ" मी म्हंटलं "कितने सिक्के है आपके पास", तर म्हणाला की "२५" मी म्हंटलं "सब दे देना" तो माझ्याकडे बघतच बसला. मी त्याला २५० रुपये दिले, म्हंटलं "गिनके ले लेना".. स्वारी एकदम खुश झाली होती, मी घेतलेले शिक्के बघून संजय सरांनी पण अजून शिक्के त्याला आणायला सांगून ते सगळे विकत घेतले. एक भेट म्हणून नक्कीच देता येतील नातेवाईक आणि मित्रमंडळींना.. कोणाला हवे असतील तर सांगा आहेत शिल्लक माझ्याकडे अजून. तो पर्यंत २.३० वाजले होते, मला आठवल की आपल्याला हिंदूस्थान मधलं शेवटचं गाव "माणा " याला अजून भेट द्यायचीचं आहे, ग्रुप मधले बाकीचे कोणीही दिसले नाहीत म्हणून मग आम्ही तिघे निघालो, माणा गावाला जायला प्रायव्हेट टॅक्सी करावी लागते, आम्ही ४०० येऊन जाऊन अशी बुक केली आणि माना गावात पोहोचलो.
या माणा गावात व्यास गुफा, गणेश गुफा आणि भीमपूल अशी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. स्वर्गारोहिणीचा रस्ता पण याचं गावातून जातो, हि ठिकाणं थोडी उंचीवर असल्यामुळे वर चढुन जावं लागतं, पहिली गणेश गुफा लागते, महाभारत याच गुफे मध्ये बसून समजून गणेशाने लिहिले होते. नंतर लागते व्यास गुफा, महर्षी व्यास यांनी इथेच बसून महाभारत गणेशाला सांगितले होते, पण एक अट होती की गणेशाने ते श्लोक समजून मगच ते लिहायचे आणि गणेशाने सुद्धा एक अट घालती होती के मध्ये कुठेच थांबायचं नाही.
गुफेच्या बाहेर फोटो काढून आम्ही सरस्वती नदीच्या उगमाजवळ जाऊन पोहोचलो, तिथे एक दगडाचा पूल आहे, असं म्हणतात की स्वर्गाकडे जाताना द्रौपदी ला सरस्वती ओलांडायला जमत न्हवते म्हणून भीमाने एक दगड ठेवून तिथे पूल बनवला होता. इथे छोटे सरस्वती नदीचे मंदिर आहे, अस म्हणतात की कैलास मानसरोवरून एक प्रवाह या सरस्वती नदी मध्ये येऊन मिळतो.
स्वर्गारोहिणीला जायचा विचार केला पण तेव्हा ४ वाजले होते, म्हणून परत मागे फिरायचा निर्णय घेतला तो पुन्हा परत येण्याचा निश्चय करून, बहुतेक पुढच्या वर्षी मी इथे परत येईन स्वर्गारोहिणी ट्रेक साठी.
अश्या रीतीने चारधाम संपवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, वाटेत देवप्रयाग लागले, हे पंचप्रयाग पैकी एक पवित्र असे ठिकाण आहे, इथेच गंगेचा जन्म होतो, गौमुखातून भागीरथी जन्म घेते आणि सतोपंथमधून अलकनंदा, या दोन नद्यांचा संगम देवप्रयाग ला होतो व पुढे तिला गंगा असे म्हणतात. इथे स्वच्छ पाणी दिसते ती अलकनंदा आणि गढूळ पाणी दिसते ती भागीरथी.
हरिद्वारला ह्रिषीकेश करून पोहोचायचे होते म्हणून सकाळी लवकर निघालो पण ट्रॅफिक मुळे ह्रिषीकेश फिरणे जमलं नाही, लांबूनच लक्ष्मणझुला आणि रामझुला बघितला आणि हरिद्वार गाठले. गंगाआरती पण मिळाली नाही पण थोडा हरिद्वार चा परिसर पालथा घातला.
दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली साठी निघालो, खूप अश्या आठवणी मनात आणि कॅमेरा मध्ये साठवून विमानात बसताना नकळत हात जोडले गेले, आणि आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण झाले.
इथे थोडकेच फोटो आहेत, संपूर्ण अल्बम इथे पाहायला मिळेल, अभिप्राय नक्की द्या
अल्बम इथे आहे ==> Album
प्रतिक्रिया
31 Jul 2016 - 11:56 pm | टवाळ कार्टा
लेख पूर्ण वाचता आला नाही, उद्या वाचेन पण फोटो भारी आहेत :)
1 Aug 2016 - 6:29 am | संदेश
धन्यवाद!
31 Jul 2016 - 11:58 pm | किसन शिंदे
फोटो अप्रतिम आलेत! आणि केवढं ते लेखन. दोन भागात टाकलं असतं तर वाचायला सोयिस्कर झालं असतं..
1 Aug 2016 - 1:13 am | मितभाषी
मला दोनच फोटो दिसत आहेत .
1 Aug 2016 - 6:36 am | संदेश
हो, लेख मोठा आहे, 12 दिवसांचं प्रवास वर्णन असल्या कारणाने शक्य तितक्या मोजक्याच शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे :) , खरं तर 3 भागामध्ये लिहायचा ठरवलेलं पण वाचायची लिंक तुटते.
1 Aug 2016 - 1:37 am | आदूबाळ
क्या बात! छान लिहिलंय.
----
पुढच्या वेळेसाठी: ब्यागेचं वजन लेन्सबिन्समुळे जास्त व्हायला लागलं तर सरळ त्या लेन्सेस कोटा/जाकिटाच्या खिशात ठेवा. ते वजनात धरलं जात नाही. सिक्युरिटी चेक झाल्यावर त्या सुरक्षितपणे हँडबॅगेजमध्ये हलवा.
1 Aug 2016 - 6:45 am | संदेश
नक्कीच, लेन्स मोठ्या असल्या कारणाने त्या कोणत्याच खिशात मावत नव्हत्या :)
1 Aug 2016 - 1:35 am | पद्मावति
अप्रतिम फोटो आणि लेख!
दिल अभी भरा नही....पुन्हा पुन्हा वाचावासा वाटणारा लेख आहे. वाचनखूण साठवली आहे.
1 Aug 2016 - 6:51 am | संदेश
धन्यवाद! :)
1 Aug 2016 - 6:03 am | कंजूस
चांगला आटोपशीर झालाय लेख.भाविकपणा असल्याशिवाय इकडे जाण्यात अर्थ नाही असं वाटतंय.फोटो बरे आहेत.इमारतींचे फोटोंत तिरपेपणा जाणवतोय.
1 Aug 2016 - 6:47 am | संदेश
धन्यवाद!
1 Aug 2016 - 7:21 am | कंजूस
आता तुम्हाला प्रवासमार्ग,सोयी याची माहिती झालीच आहे तर पुढच्या वेळेस स्वतंत्र दोनएक ठिकाणंच शांतपणे केलीत तर{तीस टक्के खर्चात } भरपूर वेळ देऊन ट्रिप आखा.उदा० बद्रीनाथ-हेमकुंड-फुलों की घाटी.
1 Aug 2016 - 7:38 am | संदेश
हो नक्कीच, must visit लिस्ट मध्ये आहे, स्वर्गारोहिणी पण!
1 Aug 2016 - 8:45 am | अजया
कंजूस काकांशी सहमत फोटोंबाबत.बाकी लेख छानच.
1 Aug 2016 - 8:56 am | संदेश
wide angle लेन्स मुळे तसं वाटत असेल.
1 Aug 2016 - 10:00 am | कंजूस
जी नावाजलेली २८एमेम प्राइम लेन्सीज आहेत ते एकच आणि कॅम्रा पुरेसे आहे अशा ठिकाणी.( पण किंमत फार असते.)ट्राइपॅाड ही नको कारण १५च्या खाली शटर स्पिड निसर्ग दृष्यांसाठी लागत नाही.करेक्टेडलेन्स तर फारच महाग असतात.
1 Aug 2016 - 10:44 am | संदेश
हो, मी 11-16mm ने सगळे फोटो काढले आहेत, ट्रायपॉड night फोटोग्राफी साठी घेऊन गेलो होतो, तसा एक प्रयत्न पोस्ट केला आहे.
1 Aug 2016 - 12:54 pm | कंजूस
कॅम्रा तिरपा केला असेल.
1 Aug 2016 - 2:07 pm | संदेश
:)
1 Aug 2016 - 6:04 am | चांदणे संदीप
फोटोही आवडले! :)
याची एक एक उत्तम लेखमालिका होऊ शकली असती असे वाटून गेले. प्रत्येक स्थळासाठी एक विस्तृत लेख!
Sandy
1 Aug 2016 - 6:50 am | संदेश
हो, लेखाचं शीर्षक चारधाम असल्या कारणाने थोडा आटोपशीर लिहावं लागलं, पण माझ्याकडे प्रत्येक ठिकाणाची विस्तृत माहिती आहे :)
1 Aug 2016 - 7:42 am | मंजूताई
याची एक एक उत्तम लेखमालिका होऊ शकली असती असे वाटून गेले. प्रत्येक स्थळासाठी एक विस्तृत लेख!+ १
1 Aug 2016 - 7:42 am | मंजूताई
याची एक एक उत्तम लेखमालिका होऊ शकली असती असे वाटून गेले. प्रत्येक स्थळासाठी एक विस्तृत लेख!+ १
1 Aug 2016 - 8:10 am | चंपाबाई
छान
1 Aug 2016 - 8:39 am | यशोधरा
छान लिहिलंय आणि फोटो आवडले.
1 Aug 2016 - 9:22 am | तिमा
फोटो छान आहेत.
मी पूर्णपणे नास्तिक असूनही ही यात्रा केली होती, निसर्गसौंदर्य बघण्यासाठी. त्यावेळचा माझा लेख तुम्ही वाचला नसेल तर लिंक देत आहे.
http://www.misalpav.com/node/25041
1 Aug 2016 - 9:51 am | खेडूत
मस्त लेख, सविस्तर वर्णन आणि पौराणिक संदर्भ यामुळे विशेष आवडला!
धन्यवाद.
अफाट आहे सगळंच..
पाहुया कधी योग येतो ते!
1 Aug 2016 - 9:51 am | सामान्य वाचक
2 3 विस्तृत भाग लिहिले असते तर जास्त चांगले झाले असते
1 Aug 2016 - 10:05 am | कंजूस
मला लेखातला मजकूर पुरेसा वाटला.प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभव घ्यावाच लागतो.शब्दांत सौंदर्य पकडणे अवघड आहे.
1 Aug 2016 - 10:07 am | वेदांत
छान लिहिलय ..
1 Aug 2016 - 10:42 am | प्रसन्न३००१
चांगला जमलाय लेख... फोटू तर ब्येष्ट आहेत.
1 Aug 2016 - 11:57 am | संत घोडेकर
फोटो आणि सुरेख वर्णन,एकाच भागात आटोपण्यापेक्षा थोडे विस्तृत वर्णन चालले असते.
1 Aug 2016 - 12:14 pm | पैसा
खूप छान लिहिलंत आणि फोटो अप्रतिम आहेत. म्हणजे ज्यासाठी ते ट्रायपॉड आणि कॅमेरा वागवला त्याचं चीज झालंय. एकच मोठा लेख लिहिण्यापेक्षा ना तयारीसाठी पहिला, यमुनोत्री दुसरा, गंगोत्री तिसरा असे मालिकेत टाकले असते तर सगळ्याना चवीने वाचता आले असते, आणि तुम्हाला अजून फोटोही देता आले असते.
1 Aug 2016 - 2:07 pm | संदेश
विचार तोच होता कि प्रत्येक दिवसाचं वेगळं वर्णन लिहावं, पण पहिलाच प्रयत्न असल्या कारणाने हात आखडता घेतला. तसे सगळे फोटो फे.बु वर आहेत, https://www.facebook.com/media/set/?set=a.10154356511888866.1073741869.5...
1 Aug 2016 - 12:15 pm | प्रमोद देर्देकर
सफर आवडली. पण फक्त ४ च फोटो दिसत आहेत.
1 Aug 2016 - 12:57 pm | नाखु
माझ्यासारखे कुणी आहेतर (चारच फोटो) दिसणारे...
सगळे दिसले की येतो...... परत.
नाखुशी वाला
1 Aug 2016 - 1:37 pm | वेदांत
तुम्हाला ४ फोटो तरी दिसत आहेत, मला तर एकही दिसत नाही..
1 Aug 2016 - 1:43 pm | संदेश
नक्की माहित नाही प्रॉब्लेम काय आहे ते, पण संपूर्ण अल्बम फे.बु वर इथे बघायला मिळेल.
https://www.facebook.com/media/set/?set=a.10154356511888866.1073741869.5...
1 Aug 2016 - 2:01 pm | पैसा
मला सगळे फोटो दिसत आहेत.
1 Aug 2016 - 4:33 pm | नाखु
पुण्यवान व्यक्ती आहेत ह्याचा हा पुरावा समजावा काय?
पुन्हा वाचकांची पत्रेवाला नाखु
1 Aug 2016 - 5:57 pm | पैसा
फोटो दिसत नसतील त्यांनी खरीखुरी चारधाम यात्रा करून या असा आदेश दिसतोय! =))
1 Aug 2016 - 5:59 pm | संदेश
हा हा हा..!! अल्बमची लिंक आहे हो शेवटी, 80 फोटो आहेत!
1 Aug 2016 - 9:33 pm | कंजूस
१)लेखातले फोटो आपल्या फेबुला लॅागिन नसले तरी सर्व दिसतात.
२)वर दिलेल्या फेबु अॅल्बमच्या लिंकमधले फोटो अर्थातच फेबुखात्याला लॅागिन केल्यावर दिसतात.
नो प्रॅाब्लेम.क्रोमवाल्यांचे सिक्युअरटी सेटिंग असेल काही.
1 Aug 2016 - 10:42 pm | संदेश
अल्बमची लिंक अपडेट केली आहे, आता फे.बु खात्याला लॅागिन करावे लागणार नाही.
1 Aug 2016 - 12:52 pm | कंजूस
कोणता डिवाइस/ ब्राउजर प्रमोद?
1 Aug 2016 - 12:59 pm | प्रमोद देर्देकर
नेहमीच गूगल क्रोम.
1 Aug 2016 - 1:12 pm | विनायक प्रभू
बसल्या ठिकाणी चार धाम यात्रा झाली की
1 Aug 2016 - 2:06 pm | नीलमोहर
सुंदर लेख आणि फोटो.
1 Aug 2016 - 2:17 pm | मोहनराव
फोटोज अप्रतिम आहेत.
1 Aug 2016 - 2:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
फार सुंदर लेख, खुप वर्षांपूर्वी हि यात्रा केली होती (प्रलयाआधी). तेव्हा फार लहानही होतो. त्यामुळे फोटो वगैरे काढायची अक्कलही नव्ह्ती आणि कॅमेरापण रोलवाला होता. पण तेव्हा हिमालय हा काय प्रकार आहे याचा अंदाज आला होता.
माझ्या अधुंक आठवणी प्रमाणे, बद्रीनाथला आम्ही मुक्काम केला होता तेव्हा तिथे मंदीराबाहेर भलामोठा तंबू टाकून रामकथा सुरु होती. कां कुणास ठाऊक पण ती ऐकता ऐकता उगाच रडू फुटले होते.
असो. पण तुमचा लेख वाचून माझ्या आठवणी चाळवल्या. शक्य झाल तर जाऊन या परत.
अवांतरः
यात अल्बमचा दुवाच नाहीये!!
1 Aug 2016 - 7:14 pm | संदेश
बाणासकट अपडेटेड..
1 Aug 2016 - 2:44 pm | एस
फोटो फारच छान आहेत. विशेषतः अलकनंदा आणि भागीरथीच्या संगमाचे छायाचित्र सुरेख. Tokina 11-16 ला थोडा डिस्टॉर्शनचा प्रॉब्लेम आहेच. Perspective Control लेन्स फारच महाग असतात. पण तरीही प्रकाश छान टिपलाय व फोटो शार्पही आलेत.
1 Aug 2016 - 2:45 pm | एस
फोटो फारच छान आहेत. विशेषतः अलकनंदा आणि भागीरथीच्या संगमाचे छायाचित्र सुरेख. Tokina 11-16 ला थोडा डिस्टॉर्शनचा प्रॉब्लेम आहेच. Perspective Control लेन्स फारच महाग असतात. पण तरीही प्रकाश छान टिपलाय व फोटो शार्पही आलेत.
1 Aug 2016 - 7:09 pm | संदेश
हो, तो प्रॉब्लेम आहेच tokinaचा, पण पोस्टप्रोसेसिंग मध्ये ते झाकलं जातं.
1 Aug 2016 - 2:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
फोटो सुद्धा लाजवाब आहेत!
हेलिकॉप्टरने येणाऱ्या भाविकांसाठी VIP रांगेची व्यवस्था केली होती, अर्थातच पैसे भरून, ११०० रुपये. कारण परतीचा प्रवास १ तासात करायचा असतो.
एक पंडित आमच्या बरोबर देण्यात आला, आणि आम्हाला मागच्या दरवाज्या मधून थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाला, हेलिकॉप्टरने येणाऱ्या भाविकांसाठी VIP रांगेची व्यवस्था केली होती, अर्थातच पैसे भरून, ११०० रुपये. कारण परतीचा प्रवास १ तासात करायचा असतो.
एक पंडित आमच्या बरोबर देण्यात आला, आणि आम्हाला मागच्या दरवाज्या मधून थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाला,
इथे मात्र थोडी चुटपुट लागली, वैयक्तिक रित्या असले प्रकार आवडत नाहीत म्हणून कदाचित, असो.
1 Aug 2016 - 3:53 pm | संदेश
दुसरा पर्याय नव्हता, हेलिकॉप्टरच परतीचं वेळ ठरवून देतात, साधारण 1 तास मध्ये परत हेलिपॅड जवळ यावं लागतं.
1 Aug 2016 - 3:04 pm | जगप्रवासी
थोडक्यात सगळं महत्वाचं सांगून मोकळे झालात, प्रत्येक ठिकाणावर एक भाग लिहिता आला असता पण हा पूर्ण लेख आटोपशीर असल्यामुळे वाचायला मजा आली. लिंक कुठेही तुटली नाही. फोटो पण खूप सुंदर आलेत. तुमच्यामुळे घरबसल्या चारधाम यात्रा करून आलो त्याबद्दल धन्यवाद.
1 Aug 2016 - 3:37 pm | बरखा
व्वा ! बसल्या बसल्या चारधाम यात्रा करवुन आणलीत. मस्त लीहीलाय लेख. मला फोटो दिसत नाहीयेत त्या मुळे थोडी निराशा झालीये. पण तुमच्या लेखनाने चित्र डोळ्यांसमोर उभ केल.
1 Aug 2016 - 3:51 pm | संदेश
फोटो सगळे फेसबुकं वरचे असल्या कारणाने जर फेसबुक ब्लॉक असेल तर फोटो दिसत नाहीत.!
1 Aug 2016 - 4:06 pm | कवितानागेश
छान वाटले वाचून.
1 Aug 2016 - 5:23 pm | tusharmk
छान लिहिले आहे ...म्हणजे तुम्ही फक्त उत्तराखंड चार धाम यात्रा केली आहे.
1 Aug 2016 - 5:35 pm | संदेश
हो, बरोबर.
1 Aug 2016 - 7:53 pm | भम्पक
क्काय लाजबाब फोटो आहेत हे.....
1 Aug 2016 - 8:23 pm | मुक्त विहारि
फोटो पण मस्त..
2 Aug 2016 - 2:06 pm | नि३सोलपुरकर
बसल्या बसल्या चारधाम यात्रा करवुन आणलीत.
सुंदर लेख आणि फोटो.
पुलेशु.
2 Aug 2016 - 3:23 pm | नितीन पाठक
भारी वर्णन आणि
त्याहून भारी फोटो
मस्त .................. एकदम मस्त
2 Aug 2016 - 9:55 pm | रंगासेठ
आज पाहिले फोटो. केवळ अप्र्तिम. __/\__
केदारनाथ सुंदर आहे.
2 Aug 2016 - 10:51 pm | संदेश
4 Aug 2016 - 1:15 pm | Vishvnath Shelar
फोटो आणि सुरेख वर्णन,एकाच भागात आटोपण्यापेक्षा थोडे विस्तृत वर्णन चाललेअसते.....