मी माझ्या एका अविवाहीत स्नेह्याना म्हणालो,समजा क्षणभर आपण विवाहित आहात असं समजू.
आपल्याला सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधान पत्नी असती तर तिच्या सहवासात राहून,
आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम, वृत्तिला थोडा आळा बसला असता.
आपण लग्न बंधनात एकदाचे पडल्याने आपल्या आईला पण सुटकेचा निश्वास देता आला असता.
आपल्याला एक दोन मुलगे आणि एक दोन मुली असत्या तर एखाद्दा मुलाने आपल्यात असलेले संगीताचे कौशल्य आत्मसात करून आपला वारसा कायम ठेवला असता.दुसर्याने आपला व्यवसायाचा अभ्यास करून आपल्याला हातभार लावला असता.
मुलीने आपल्या सुंदर गळ्याचा वारसा घेऊन प्रख्यात गायीका झाली असती.
आपण अमक्या अमक्याची मुलं का?असं विचारणार्याला त्या मुलानी होय! म्हणून छाती फुगवून सांगितलं असतं.
आपण पण होय मी त्यांचा पिता आणि मला त्यांच्या बद्दल अभिमान आणि समाधान आहे.असं म्हटलं असतं.
एव्हड्या संस्कारीत कुटुंबात एकमेकानी एकमेकाची काळजी घेतली असती.
आणि इतरानी आपल्या वृद्धापकाळात आपल्याकडे बोट दाखवून
"वृद्धत्व हे वरदान कसं हे ह्यानाच विचारा"
असं सांगितलं असतं.
मी हे सर्व सांगत असताना आमचे स्नेही ऐकण्यात तल्लीन झाले होते.मला म्हणाले,
"अरे हो खरंच! मी असा कधीच विचार केला नाही.जगात आणि आजूबाजूला काय चालंय,वृद्धत्व आल्यावर त्यांचे कसे हाल होतात हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं.आणि मी लग्नच केलं नाही हे मला बरं वाटत होतं."
मी म्हणालो,
"काही हरकत नाही.झालं ते होऊन गेलं.आपण समजू कदाचीत ते विधीलिखीत होतं.पण लग्नच न करण्याचं जाणून बुजून जर प्रत्येकाने केलं तर हे जग पुढे कसं जाणार?निर्मिती कशी होणार?एका पिढीतून दुसर्या पिढीत वारसा कसा जाणार? ज्ञानाचा फैलाव कसा होणार?
श्री.पेठकरजी काय म्हणतात बघा,त्यानी तर खूपच लिहिलंय पण थोडक्यात असं,ते म्हणतात,
"वृद्धापकाळातील सुख दुःखाची मुळं तारुण्यात असतात.भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी.तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा.
भावनिक पातळीवर, 'प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते' .
दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती 'दुसर्यांची' मुलं आहेत हे विसरू नये. '
मुलांनी म्हातार्या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये.दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे 'शब्द' हे शस्त्र आहे. सांभाळून वापरावे.
अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही."
मी माझ्या स्नेह्यांना म्हणालो,
"माझं पण आपल्याला एक सांगणं आहे.
प्रेम आणि त्याग ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.आणि समजूतदारपणाच्या धातूने ते बनले आहे.आणि ते नक्कीच खणखणून वाजते.ह्या तिन्ही गोष्टीत जरा सुद्धा कमतरता आली की ते नाणं खणखणून वाजणार नाही.अशी सर्व खणखणीत नाणी कुटुंबात असली तर त्या कुटुंबाचा खजिना खणखणत्या नाण्यानी भरलेला असणार.एव्हडी परफेक्ट टांकसाळ असल्यावर काय बिशाद लागली आहे,
"वृद्धत्वाला शाप ठरायला!"
माझ्या स्नेह्यांच्या लक्षात आलं आणि ते त्यांच्या आवडत्या शैलित मला म्हणाले,
"च्याआयला! प्रत्येक वादाला दोन बाजू असतात हे माझ्या लक्षातच आलं नाही.घोड्याचा चष्मा लाऊन मी एकाच बाजूला बघत होतो."
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
15 Sep 2008 - 10:49 pm | विसोबा खेचर
ठीक आहे! एखादी छानशी, मला शोभेल अशी जोडीदारीण भेटली की लगीन करेन! :)
(बेलगाम स्नेही!) तात्या.
:)
16 Sep 2008 - 12:06 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"दुहे बोले सुने लागे" असं आपल्याला वाटणं सहाजीक आहे.
भविष्य कुणालाच माहित नसतं हिचतर जीवनातली मजा आहे.कुणास ठाऊक अशीच मी म्हणतो तशी एखादी माळ घेऊन तयार असेल आणि आपल्याला मोह होऊन आपण आम्हाला सरप्राईज दिलत तर?
अशा घटना घडलेल्या आहेत.जगातली सर्वांत सुखी व्यक्ति आपली परमपूज्य माऊली असेल,ह्यात तीळ मात्र शंका नाही.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Sep 2008 - 10:57 pm | यशोधरा
तात्या, =))
डायरेक हल्ला बोलच!!
15 Sep 2008 - 11:00 pm | विसोबा खेचर
डायरेक हल्ला बोलच!!
चलता है! सामंतसाहेबांचा माझ्यावर जीव आहे! :)
तात्या.
16 Sep 2008 - 12:23 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
खरंच माझ्या मनातलं बोललात.आणि हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे.
"अपनोका वादा कर जो गेर बन जाते हैं उनसे क्या शिकायत करे जो वक़्त आने पर पराए हो जाते हैं"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Sep 2008 - 11:11 pm | धनंजय
आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम स्नेह्याबद्दल ऐकून वाईट वाटले.
पण बोलण्या-विचारात तितके बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम वाटले नाहीत. सामंत यांच्या सुहृदय बोलण्यासमोर सगळेच ऋजू होत असावेत.
काही म्हणा, लग्न न करताही श्री अंतरकर यांच्या अपप्रवृत्तीला काही प्रमाणात आळा बसलेला दिसतो. ज्या काही मार्गाने त्यांच्या वाईट प्रवृत्तींना त्यांनी काबूत आणले, त्याबद्दलही श्री. अंतरकर यांना बोलते करायला हवे होते. किंवा पुढच्या संवादात कराच. म्हणजे त्यांच्या अनुभवापासून अजून अविवाहित तरुणांना विवाह होईल त्या काळापुरती ती शिकवणही मिळेल.
16 Sep 2008 - 12:37 am | प्राजु
तात्या,..
अहो हे काय पाहते आहे आणि वाचते आहे?? एकदम जोरदार "चैंग कुली की मैन कुली की चैंग"?
तात्या,
भेटलीच कुणी अशी सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधानी... तर मला कळवा हो.. लग्नाला भरपूर भेटवस्तू घेऊन येईन. :)
.. - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Sep 2008 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधानी.....
एवढे गुण एकीत शक्यच नाहीत. बहुतेक तात्यांना ३-४ लग्नं करावी लागणार.
16 Sep 2008 - 11:11 pm | श्रीकृष्ण सामंत
प्रभाकर पेठकरजी,
हे सर्व गुण तात्यारावांच्या डोळ्यांना आणि मनाला त्यांच्या भावी पत्नीत दिसत असतील तर ते त्यांच्या पुरते शक्य नाही का होणार?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
16 Sep 2008 - 11:32 pm | प्रभाकर पेठकर
नियम अपवादानेच सिद्ध होतो असे पुन्हा म्हणावेसे वाटेल.
17 Sep 2008 - 7:37 am | सुनील
आपल्याला सुंदर,सुलक्षणी,सुस्वभावी,सुगृहिणी,सुदृढ,समाधान पत्नी असती तर तिच्या सहवासात राहून,
आपल्या बेफिकीर, बेफाम,बेसुमार,बेधडक,बेपर्वाई,बेभान,बेलगाम, वृत्तिला थोडा आळा बसला असता.
अनुप्रासाचे चांगले उदाहरण...
बाकी कथा आवडली..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Sep 2008 - 9:29 am | श्रीकृष्ण सामंत
सुनीलजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
17 Sep 2008 - 8:44 pm | भास्कर केन्डे
तात्या,
आपला पहिला प्रतिसाद पाहून वाटले की तुम्ही उगीच नसती उठाठेव अंगावर ओढून घेताय. कारण हा स्नेही म्हणजे आपले "ब्रम्हचारी तात्या" असतील असे वाटलेच नव्हते. पण तदनंतर झालेल्या चर्चे वरून असे दिसते आहे की सामंत साहेबांचा रोख तुमच्यावरच होता आणि तुम्ही पण तो बरोब्बर अंगावर (का शिंगावर?) घेतलात.
बाकी लग्नाचे आमंत्रण आम्हा सर्व मिपाकरांना मिळाले पाहिजे बरं का. प्राजू ताई म्हणतात तसे आम्ही पण एखादं गाठोडं सोबत घेऊन येऊ.
तर मग वेळ कशाला दवडताय - शोधा म्हणजे सापडेल.
आपला,
(वर्हाडी) भास्कर
17 Sep 2008 - 11:48 pm | विसोबा खेचर
धन्यवाद भास्करराव! :)
सर्वांनी मिळून जर जोडे झिजवलेत तरच हा तात्या लग्नाच्या बाजारात खपेल! नायतर तिच्यायला आपल्याला कुणी पोरगी पसंद करणं कठीण आहे! :)
आपला,
(बिवलकरकाकूंच्या वांगीभाताच्या आठवणीने अजूनही हळहळणारा!) तात्या.
:)
18 Sep 2008 - 7:52 pm | भास्कर केन्डे
तात्या, लग्नाच्या बाजारात तुम्हाला खपवल्यावर नक्की आणखी कोणीतरी खपणार.... एकतर ती, दुसरे तुम्ही वा तिसरे तुम्हाला खवणारे आम्ही.... तशी तुमच्या सारख्या अनेक रांगड्यांना आम्ही खपवले आहे व त्यावर त्यांचे खरे "खपने" आम्ही जवळून पाहिले पण आहे.... अधिक विष्लेशनाची गरज नसावी असे वाटते. ;)
बिवलकरकाकूंच्या वांगीभाताच्या आठवणीने अजूनही हळहळणारा!
-- हो मात्र, त्या आठवणींच्या तोडीस तोड हादडण्याची सोय होण्याची शक्यता आहे हे सुद्धा अनुभवावरुन सांगतो. आमच्या मंडळींनी आम्हाला आजतगायत असले भन्नाट काही काही खायला घातले आहे की घराबाहेर खायची वेळ आली तर मन होत नाही.... मार्केटींग नव्हे, खरेच सांगतोय, तुमची शप्पथ्थ!!!
आपला,
(खपलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
18 Sep 2008 - 10:32 pm | विसोबा खेचर
मात्र, त्या आठवणींच्या तोडीस तोड हादडण्याची सोय होण्याची शक्यता आहे हे सुद्धा अनुभवावरुन सांगतो. आमच्या मंडळींनी आम्हाला आजतगायत असले भन्नाट काही काही खायला घातले आहे की घराबाहेर खायची वेळ आली तर मन होत नाही....
ठीक आहे, वहिनींना सांगा की तात्या एक दिवस जेवायला येणार आहे.. :)
माझ्याकरता वधू शोधण्याची जिम्मेदारीही मी वहिनींवरच टाकीन! :)
तात्या.
3 Oct 2008 - 3:08 pm | विजुभाऊ
या संशोधनाची प्रगती कुठवर आली?
वांगीभाताची चर्चा सुरु झालीय्ये म्हणजे केटरर फायनल झाला बहुतेक
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
3 Oct 2008 - 5:16 pm | विसोबा खेचर
या संशोधनाची प्रगती कुठवर आली?
अरे का रे मला लग्नाच्या बेडीत अडकवू पाहताय? एकटा आहे तो बरा आहे की! :)
3 Oct 2008 - 9:04 pm | प्रभाकर पेठकर
एकटा आहे तो बरा आहे की
लाखाची गोष्ट..
पिंजर्यातला पक्षी, आकाशात स्वच्छंद विहरणार्या पक्षाचा, मनापासून हेवा करतोय.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
3 Oct 2008 - 8:06 pm | ब्रिटिश
जल्ला क भारी लीवलाय र आजूस !
दीसभरचे कामान आवरा येल कस भेटतं तूला ?
तुजी परतीभा, तुजी ईविधता, तुज नालेज, तुजे लेकनाचा येग ह्ये सगल्यांस लाक लाक सलाम
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)