" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा." ...

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
13 Sep 2008 - 2:50 am
गाभा: 

वाचता वाचता वाचनात आलं म्हणून,ह्या विषयावर आज मी आणि प्रो.देसाई आणि त्यांच्या नविन पाहूण्या बरोबर जरा
"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं."
ह्या विषयावर चर्चा करायचं ठरवलं.

त्याचं असं झालं,बराच वेळ मी तळ्यावर भाऊसाहेबांची वाट बघत बसलो होतो.अर्थात बरोबर पाडगांवकरांचं कवितेचं पुस्तक चाळण्यात वेळ घालवला.इतका उशिर झाल्याने येत नाहित असं समजून दूरवर एकदा न्याहाळून पहावं म्हणून नजर टाकली असता चार जण हलक्या पावलाने येताना दिसले.बरोबरचे एक गृहस्थ वॉकर घेऊन चालत होते.भाऊसाहेब थांबा,थांबा म्हणून मला हाताने खुणावत होते.जवळ आल्यावर त्या तिन गृहस्थांशी माझी त्यानी ओळ्ख करून दिली.
"हे प्रो.घारपुरे,हे डॉ.तुळपुळे आणि हे श्री. नेरूरकर.
प्रो.घारपुरे आय.आय.टी खरगपूर मधून अलीकडेच रिटायर्ड झाले.डॉ.तुळपुळे व्ययसाय सोडून आता पंधरा एक वर्ष झाली.आणि नेरूरकर ए.जी.-अकौन्ट्न्ट जनरलच्या- ऑफीस मधे चाळीस वर्ष काम करून रिटायर्ड झाले."

सर्व वृद्ध एकत्र जमल्यावर वृद्धत्वाच्या गोष्टी निघणं स्वाभाविक होतं.
"वृद्धत्व शाप केव्हा ठरतं."
ह्या विषयावर बोलूया असं भाऊसाहेबानीच सुचवलं.
म्हणाले,
"वृद्ध व्यक्तिचे सर्व साधारण दोन भाग पाडले जातात.जे वृद्ध ६० ते ७० वयोगटात असतात,त्याना तरुण वृद्ध म्हणतात,आणि जे सत्तर पेक्षा अधीक वयाचे असतात त्याना जास्त वृद्ध असं म्हणतात.
ही वृद्ध मंडळी सर्वसाधारणपणे क्रियाशील नसतात. त्यांचं जास्त प्रमाणात वास्तव्य कुटुंबातच असतं.
त्यांना आपलं वृद्धत्व वरदान किंवा शाप वाटतं."
डॉ.तुळपुळे म्हणाले,
"ज्यांना आपलं वृद्धत्व शाप वाटतं त्याला काही कारणं ही असतात.
त्यांच्या सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते,की त्यांना आपल्या वृद्धत्वाची चीड येते आणि त्यामुळेच त्याना आपलं वृद्धत्व एक शाप असल्याची जाणीव होते."
मी डॉ.ना म्हणालो,
"अशी का चीड यावी?"
त्यावर प्रो.घारपुरे सांगू लागले,
"मी सांगतो माझाच अनुभव आठवून.
ज्यावेळी ही मंडळी तरुण, वाढत्या वयाची आणि कार्यव्रत असतात,तेव्हा ते कामावरून घरी परत आले की त्यांची विशेष काळजी घेतली जाते.
कधी त्यांची आई तर कधी त्यांची पत्नी आगतस्वागत करते.
घरात आल्या आल्या विचारपूस केली जाते.त्याना गरमागरम चहा किवा कॉफी करून दिली जाते.
त्यासोबत काही खायला दिलं जातं.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे होत असतं."
मधेच भाऊसाहेब इंटरव्हेन करून म्हणाले,
"कारण ते कमवणारे म्हणून घरच्यांसाठी महत्वाचे असतात.
त्यांचं मन सांभाळणं हे घरच्यांची जबाबदारी बनते.त्यांच्यासाठी प्रत्येकजण आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतो."
मी डॉ.तुळपुळयाना म्हणालो,
"हे भाऊसाहेबांच म्हणणं तुम्हाला पटतं का?"
डॉ.तुळपुळे आपल्या व्यवसायाच्या विषयातल्या मानसिक परिस्थितीचा विचार करून म्हणाले,
"ह्या परिस्थितीत वृद्धत्वातामुळे स्वाभाविकपणे कळतनकळत बदल होत जातो.त्यांच्या निवृत्तीमुळे ही मंडळी अधिक काळ घरातच असतात.
बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांच्या परत येण्याची फारशी दखल घेतली जात नाही,असं काहींच्या बाबतीत घडतं.काहींना तर पाण्याची किवा चहाची देखील घरच्यांकडे मागणी करावी लागते."

इतका वेळ गप्प बसून ऐकत असलेले नेरूरकर हाताने खुणावत सांगू लागले,
"अहो,मला तर,
"इतक्या लवकर घरी कसे परत आला "
अश्या प्रकारच्या अनपेक्षित प्रश्नाना सामोरं जावं लागत होतं.
अशा वृद्ध व्यक्तींनी जास्त वेळ घराबाहेर रहावं,आणि आपल्याला मोकळीक मिळू द्यावी असं घरातील व्यक्तिना मनातून वाटतं.अशा परिस्थितीत आपलं वृध्दत्व हा एक शाप आहे,असं त्यांना वाटलं तर त्याना आपल्याला कसा दोष देता येईल?"
मी डॉ.तुळपुळ्याना विचारलं,
"डॉ.साहेब,हे आपल्याच घरातल्या प्रेमळ लोकाना असं कसं मनात येतं?"
डॉ.तुळपुळे जरा विचार करून म्हणाले,
"घरातील या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्याना अवघड जातं,व त्यामुळे मानसिक कोंडी होते.त्यांच्या तरुण सुनामुलांना त्यांची सदासर्वकाळ घरातली हजेरी नकोशी किवा अडचणीची वाटु लागते."
"असं कसं म्हणता तुम्ही डॉक्टर"असं म्हणत,नेरूरकर आपला वॉकर पुढे सरकावून म्हणाले,
"तरुणपणात किवा वाढत्या वयात काही मंडळी काबाडकष्ट करून पैसा जमा करतात.
काटकसरीचं जीवन जगून पैसा साठवतात,या पैशाच्या आधारे घरदार उभं करतात.
सर्व भौतीक सुखसोयी घरात निर्माण करतात.हे सारं काही त्या व्यक्ती केवळ आपल्यासाठी निर्माण करीत नाहीत.त्यात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं पण हित समावलेलं असतं.खरं ना?"
प्रो.देसाई आपला विचार सांगू लागले,
"कुटुंबियांच्या सुखासाठीच ते हे सर्व करीत असतात. त्यात त्यागापेक्षा कर्तव्याचीच भावना अधिक असते.पण वृद्धापकाळात याच व्यक्ती पैशाचा होणारा अपवय आपल्या डोळ्यानी पाहू शकत नाहीत.
कुटुंबातील काही व्यक्ती बेजबाबदारपणे खर्च करीत असतात.मात्र,त्यावर ते नियंत्रण घालू शकत नाहीत.
त्यांना असा पैसा उडविणं सहन होत नाही.म्हणून त्याना जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,तर त्या व्यक्ती समजावून घेण्याऐवजी उलट जेष्टांचा अपमान करतात.
त्यांनी केलेले काबाडकष्ट विसरले जातात.काटकसर नजरे आड केली जाते."

प्रो.घारपुरे जणू आपलाच अनुभव सांगण्याच्या अविर्भावात म्हणाले,
"त्यागाची खिल्ली उडवली जाते.उलट त्याना कडवट शब्दात सुनावलं जातं.
"कटकट करून नका,सहन होत नसेल तर डोळे बंद करून घ्या."
"घरात शांततेने रहा"
अशा वृद्धाना,
"तोंड बांधून बुक्याचा मार"
सहन करावा लागतो.
या वृद्धव्यक्ती वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मनातून दुःखी होतात.
आणि त्याना
"परमेश्वराने मला हे दिवस का दाखवले?" असे वाटतं.
अशा व्यक्तीना आपले वृद्धत्व शाप वाटलं तर त्यांचा दोष किती?"

डॉ.तुळपुळे पेशंट कडून जमविलेल्या माहितीच्या आधारावर म्हणाले,
"अहो,माझा एक पेशंट होता.त्याला वरचेवर आजारी पडण्याचं कारण विचारताना मी त्याल म्हणालो,
"तुम्हाला काही मानसिक त्रास आहे का तुमच्या घरी?"
त्यावर मला कळलं,की काही कुटुंबात मुलं एकेकाळी कर्तबगारी दाखवणाऱ्या आपल्या आईवडिलांची रवानगी अडगळीच्या खोलीत करतात.आणि इतर सुसज्य खोलीत आपण राहतात.
अशा अडगळीच्या वा अडचणीच्या खोलीत राहताना आईवडिलांचं मन खूप दुःखी होतं.
पण परिस्थिती मुळे ते शरणांगत होतात.आणि तशा परिस्थितीत दिवस व्यथीत करतात.
पण त्यापेक्षाही त्याना दुःख होतं ते की आपली मुलं आपल्या जवळ येत नाहीत,जवळ बसत नाहीत.
बातचीत करीत नाहीत.विचारपूस करीत नाहीत.आपल्या आवडीनिवडी जपत नाहीत.
याचं दुःख ते सहन करू शकत नाहीत.पण त्यांचा नाइलाज होतो."

हे ऐकून नेरूरकर म्हणाले,
"म्हातारपणी त्याना आपल्या जवळच्या लोकांकडून प्रेमाची, व दोन गोड शब्दांची गरज भासते.
पण ते ही त्यांच्या नशिबी नसतं.काही मुलाना तर आपले आईवडिल अडचणिचे वाटु लागतात.
अशा स्थितीत त्या आईवडिलाना आपले वृद्धत्व शाप वाटलं नाही तर नवलच.
अशा कुटुंबातली मुलं आपल्या आईवडिलांची आजारपणात घ्यावी तशी काळजी घेऊ शकत नाहीत."
डॉं.तुळपुळे म्हणाले,
"त्यांना आपला औषधोपचार स्वतःच करावा लागतो. हातपाय साथ देत नसले तरी आणि डॉक्टरांकडे धड जाता येत नसलं तरी मुलं सोबत येत नाहीत.
आपली मुलं आपल्या म्हातारपणी आपली काठी बनतील आणि आपल्याला सुखात ठेवतील ही आशा फोल ठरतं."

प्रो.देसाई बराच वेळ हे सर्व ऐकत होते.ते म्हणाले,
"अहो,मी तुम्हाला पुढे जावून सांगतो,की काही व्यक्ती आपण काही दिवसानी आजी अजोबा होवू,आपल्या नातवंडाना खेळवू त्यांच्याशी खेळू अशी स्वपनं बघतात.
मात्र, ते आजीआजोबा झाल्यावर त्यांच्या नशिबी वेगळंच दुःख येतं.
आजीअजोबा आपल्या नातवंडाना अर्थात आपल्या जमान्यातल्या गोष्टी सांगतात.
त्यांच्याशी खेळतात गप्पा मारतात.या त्यांच्या गोष्टी मुलाला किंवा सुनेला पसंत पडत नाहीत त्यामुळे सून किंवा मुलगा मुलाला रागवतात,मारतात हे आजी आजोबाना आवडत नाही.
आजीआजोबाना ओरडतात तुमच्यामुळे तो असा वाइट वागतो.
तुम्ही त्याच्यावर वाइट संस्कार करता अशी कडवट भाषा वापरतात.
नातवंडाना त्यांच्या पासून दूर करतात अशातऱ्हेने आजीआजोबांची स्वपनं धुळीला मिळतात.
आणि वरून अपमान सहन करावा लागतो.याचं त्याना दुःख होतं.
स्वाभाविकपणे त्याना त्यांचं म्हातारपण शाप वाटू लागतं."

हे ऐकून प्रो.घारपुरे म्हणाले,
"अशा अनेक गोष्टी सांगता येतील.काही मुले त्याना खर्चाला पैसे देत नाहीत.
पण त्यांच्या देखत नको त्या गोष्टीवर मात्र नको तेव्हडा पैसा खर्च करतात.
हे पाहून त्या वृद्धाना आपण लाचार झाल्यासारखं वाटतं.
काहींची मुलं त्यांच्या गावात दूसरं घर घेऊन राहतात.आपल्या आईवडिलांशी तुटकपणे वागतात. याचं मरणप्राय दुःख झाल्याशिवाय कसं राहील.तर काहीजण फारच अभागी ठरतात.त्यांची रवानगी त्यांच्याच मुलांकडून वृद्धाश्रमात होते,ते मरण येत नाही म्हणून नशिबाला दोष देत जगतात."

हे सर्व ऐकून मी डॉ.तुळपुळ्यांना विचारलं,
"सांगा डॉक्टर,हे सगळं ऐकून आणि बघून पुढे वृद्ध होणार्‍या मंडळीनी काय करावं?"
डॉ.तुळपुळे म्हणाले,
"पन्नाशीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या सर्व गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आपल्या भावी जीवनाची आखणी त्याप्रमाणे करायला हवी.
म्हणजे त्यांना वृद्धापकाळात अशा परिस्थितीला सामोरं जाणं शक्य होईल.
त्यांनी इतरांच्या अनुभवावरून शहाणं व्हावयाला हवं."

ह्या चर्चेला समारोप करताना प्रो.देसाई म्हणाले,
"अर्थात ज्या वृद्धाना आपलं वृद्धत्व वरदान वाटतं त्यांच्या नशिबाचा हेवाच करायला हवा."
हे बोलून झाल्यावर भाऊसाहेब माझ्याकडे बघून हंसले.
"समजने वालोको इशारा काफी है"
उठता उठता मी मनात पटपुटलो,
" दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा." ...

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

13 Sep 2008 - 8:54 am | प्रकाश घाटपांडे

सामंत साहेबांचे लेख नेहमीच विचार करायला लावणारे असतात. ते अंतर्मुखही करतात आणि नि:शब्द ही.
प्रथम पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा या लेखाची आठवण आली होती.
प्रकाश घाटपांडे

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Sep 2008 - 6:37 am | श्रीकृष्ण सामंत

प्रकाश घाटपांडेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपण दिलेल्या लिंकवर जाऊन मी त्यावरचं सर्व काही वाचलं.
माझ्या माहितीतला एक गम्मतीदार प्रसंग सांगतो.
एका ज्योतीषाकडे एक जण आपल्या घरी जन्माला आलेल्याची कुंडली मांडायला गेला.वेळ काळ दिवस घटका पळं माती धोंडे जे काय त्याला हवी होती ती सर्व माहिती त्याने त्या जोतिषाला दिली.ते सगळं मिळाल्यावर त्याने कुंडली मांडून त्याची पत्रिका पण लिहिली. आयुष्यात काय होणार,काय करणार पासून येणारी संकटं आणि ती टाळावित कशी ते सर्व.
"हा ज्योतिषी चांगला नाही "असं कुणी तरी म्हणू नये म्हणून तो आणखी दहापांच मानलेल्या ज्योतिष्यांकडे जावून तेच करून आला.
इकडे तिकडे प्रत्येकाची "फलांची भाकितं" वेग वेगळी होती पण एकूण सर्व जवळ पास होतं
घरी आल्यावर ते वाचून झाल्यावर त्या गृहस्थाने कपाळावर हात मारून घेतला.
कारण ते जन्मलेलं मुल-वासरूं- "गाईचं" होतं.

अवांतर--नारळीकरांची आणि माझी tifr मधली ओळख आहे.
"काय सामंत कसं काय?"पर्यंतची.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 9:06 am | विसोबा खेचर

लेख चांगला आहे. काहीही झालं तरी वृद्ध मंडळींचा मान आणि आदर घरच्यांकडून, मुलाबाळांकडून राखला गेला पाहिजे असं वाटतं!

परंतु लेख वाचून आपल्याच माणसांकडून आपल्याला विचारले जाईल ना, आपली दखल घेतली जाईल ना, ह्याच भितीची छाया सबंध लेखात एकंदरीत दिसते आहे! :)

साला, वृद्धपकाळात हीच भिती बाळगायची? धत तेरीकी....! :)

साला आयुष्यभर दुनियेला फाट्यावर मारत एखाद्या वाघासारखं जगायचं आणि वृद्धापकाळात मुलांबाळांच्या प्रेमाचं कुरण मिळेल ना? या चिंतेत शेळी व्हायचं? छ्या! किती भयानक शोकांतिका आहे ही!

असो...!

व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं तर या बाबतीत तरी मी सुखी आहे! लग्न न करून मुलंबाळं विचारतील की नाही, मान देतील की नाही ही भानगडच आपण ठेवली नाही! आम्हाला आमच्या वृद्धापकाळात तिच्यायला त्या मुलासुनांचं प्रेमही नको आणि त्यांचा तिरस्कार -हेटाळणीही नको! साला, दुनियेला फाट्यावर मारत जगलेलं आयुक्ष असं मुलाबाळांसमोर, लेकीसुनांसमोर मिंध व्हावं हे आपल्याला मंजूर नाही!

आमचा बुढापा हा एकट्याचाच असेल, अकेला असेल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु निदान मुलानातवंडांचे पाश तर नसतील! मुलं विचारतील की नाही? सूनबाई आदर ठेवेल की नाही? नातवंड खिल्ली तर उडवणार नाहीत ना? असल्या नसत्या चिंता मागे लागणार नाहीत! साले नकोच ते सांसरिक पाश!

एकटा आलो होतो, एकटा राहीन आणि एकट्यानेच मुकाट जाईन! :)

आमचे काकाजी तर म्हणतात की म्हातारपणी एकट्यानेच मस्तपैकी जंगलात जाऊन रहावं. सालं इथे मुलांच्यात राहिलं की पोट्टीसोट्टी सुद्धा दाढ्या ओढायला लागतात! साला, त्यांना गरज असेल तर येतील जंगलात विचारायला...! :)

आता मला जंगलात जाऊन राहणं शक्य नाही परंतु उद्या हातपाय थकले तर एखाद्या स्टार-वृद्धाश्रमात जाऊन नक्कीच राहीन. तिथे पैसा फेको तमाशा देखो असा सिंपल मामला असतो! :)

साला, स्वत:च्याच घरी वृद्धाश्रमात ठेवल्यागत रहायचं किंवा मुलाबाळांनी उचलून वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं त्यापेक्षा स्वत:हूनच आपल्याच मर्जीने, आपल्याच मस्तीत तिथे गेलेलं बरं! :)

आपला,
(मागे कोणतेही पाश नसलेला अविवाहित!) तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

15 Sep 2008 - 12:14 am | श्रीकृष्ण सामंत

नमस्कार तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिया नेहमीच मला आवडतात,कारण माझ्या पुढच्या विचाराना आपण नकळत चालना देता.

"साला, वृद्धपकाळात हीच भिती बाळगायची? धत तेरीकी....! "

वयाच्या एका सीमेवर असं वाटणं कुणालाही स्वाभाविक होतं.पैसा असला,नोकर चाकर असले तरी आपल्या माणसाची गैरहजेरी खूप भासते.भाड्याने जमलेले लोक आणि आत्मियता असलेले आपले लोक ह्यातला फरक प्रकर्षाने जाणवतो."मला आता नर्सिंग होम नको मला माझ्या घरी सोडा.त्याना पहात पहात मी प्राण सोडीन."असं आवर्जून सांगणार्‍याना, डॉक्टर घरी जावू देतात,ते ह्याच कारणाने.पैसा संपतो म्हणून नव्हे.

"साला, दुनियेला फाट्यावर मारत जगलेलं आयुक्ष असं मुलाबाळांसमोर, लेकीसुनांसमोर मिंध व्हावं हे आपल्याला मंजूर नाही!"

तात्याराव,सर्व दिवस सारखे नसतात.काही दिवस असे येतात की पैशानी कामं होत नाहित.
"शारिरीक हतबलते तुझंच दुसरं नाव मिंधेपणा काय?"
असं आपल्यालाच आपण विचारतो.
दुनियेला फाट्यावर मारण्याचे दिवस इतिहास जमा होतात.
"ह्याचंच ना रे त्या वयात पाणी जळायचं?आता बघ ह्याचं पेट्रोलपण पेट घेत नाही."
(हे उदाहरण मी पुर्वी कुठे तरी दिलं आहे)
हे ऐकून,
"देवा नको रे अंत पाहू सोडव आता "
असं वाटू लागतं असं जाणकार सांगतात.

"एकटा आलो होतो, एकटा राहीन आणि एकट्यानेच मुकाट जाईन!"

एकटे आलेला नाहित.आता म्हातारी म्हणता तिच्या सोबती शिवाय जमलं नसतं.माणूस सोडून सर्व प्राणी जन्मल्याबरोबर आपल्या पायावर उभी राहतात,माणसाचं तसं नाही.त्या माऊली शिवाय कसं शक्य आहे.तिचीच सोबत घेऊन चालायला शिकावं लागतं, मुकाटही जाणार नाहित.कमीत कमी चार लोक तरी लागणार जाताना.फाट्यावर मारलेल्या पैकी.

"त्यापेक्षा स्वत:हूनच आपल्याच मर्जीने, आपल्याच मस्तीत तिथे गेलेलं बरं! "

तेथे गेला नाही तो पर्यंत असं वाटतं."दूरून डोंगर साजरे".वृद्धाश्रमाचा अनुभव घेतलेले
सांगतील.
"अहो आजोबा,आश्रमाला पैसा देता म्हणून मी तुमचा खासगी नोकर नाही.परत परत बेल वाजवून बोलवू नका.मला इतराना पण बघावं लागतं.मॅनेजरकडे तक्रार करणार म्हणता!.जा करा."
मॅनेजर म्हणतात,
"अहो आजोबा,माणसं मिळत नाहित हल्ली.त्याला मी ओरडलो तर सोडून जाईल.दुसरा मिळे पर्यंत तुमचीच पंचाईत होईल. जरा सबूरीने घ्या."
"अडला हरी...." असं मनात येतं आणि नंतर
फाट्यावर मारलेल्यांची आवर्जून आठवण आल्याशिवाय राहवत नाही.
("घूटूं" न घेता लिहिणारा) श्रीकृष्ण सामंत

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2008 - 11:00 am | प्रभाकर पेठकर

वृद्धापकाळातील सुख दु:खाची मुळं तारुण्यात असतात. मुलांवर विसंबून राहायचे दिवस कधीच संपले. बाहेरील जगातील वाढती महागाई, वाढती स्पर्धा, वाढती आत्मकेंद्रित वृत्ती पाहता प्रत्येकाने वृद्धापकाळातील आर्थिक, मानसिक, भावनिक गरजांचा विचार आणि तजविज तरूणपणातच करायला सुरुवात केली पाहीजे.
आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे. ह्या वानप्रस्थाश्रमात संसारात राहून संसारातून मन काढून घेण्यास सांगितले आहे. हे वाचायला सोपे वाटले तरी आचरणात आणणे कठीण असते. ह्याला कारण जसे स्त्री लग्न झाल्या पासून स्वयंपाकघर हाताळत असते. संपूर्ण घरात तिचा वावर आणि हुकुमत असते. हेच म्हातारी झाल्यावर सुन आल्यामुळे तीच्या हाती सर्व ताबा द्यावा लागतो आणि स्वतःला दुय्यम स्थानावर उतरावे लागते. हे 'डाऊन साईझींग' स्वीकारणं कठीण जातं. जिथे हुकूम सोडायची (चांगल्या अर्थाने), मार्गदर्शन करण्याची सवय लागलेली असते तिथे हुकूम ऐकण्याची (चांगल्या अर्थाने) आणि मार्गदर्शन स्विकारण्याची वेळ येते. इथे सासू सूनेत खटके उडायला सुरूवात होते. म्हातारपणात सुख कमी आणि दु:ख जास्त अशी परिस्थिती येते. गमतीने असे म्हणतात की 'सासू' म्हनजे 'सारख्या सूचना' आणि 'सुन' म्हणजे 'सुचना कोत'.
जी स्थिती स्त्रीयांची तिच स्थिती पुरुषांची. आजवरच्या आयुष्यात संपूर्ण घर त्यांच्या भोवती नाचत असतं. घरात काय हवं, काय नको, घर कसं सजवावे वगैरे निर्णय त्यांच्या इच्छेनुसार होत असतात. स्वतः कमवत असल्याने 'स्वेच्छेने' खर्च करण्याची मुभा असते. निवृत्ती नंतर मुलगा नोकरीत स्थिरावलेला असतो. हळूहळू तो 'कर्ता' पुरूष होत असतो. नव्या जमान्याच्या नव्या कल्पना त्याला सत्यात उतरवायच्या असतात. हाती पैसा असतो. (कित्येकदा मागिल पिढीच्या तुलनेत कितीतरी अधिक). नविन काळाची गरज अणि भरपूर पैसा हाताशी असल्यामुळे लॉ ऑफ मार्जिनल युटीलीटीच्या नियमानुसार तो मुक्त हस्ते खर्च करीत असतो. जे मागील पिढीला उधळणे वाटते. आपण इतक्या काटकसरीत संसार केला पण मुलांवर त्याचा व्हावा तसा परिणाम, संस्कार झाला नाही अशी वैफल्यपूर्ण भावना ज्येष्ठांच्या मनात घर करू लागते. तसेच आता घरात आपले काही चालत नाही. सगळे निर्णय मुलगा घेतो. (आणि त्याची आई त्याला साथ देतेय, हे दुसरे दु:ख) आपली पत्नीही आपल्या सोबत नाही, तिलाही आपल्याबाबतीत सहानुभूती वाटत नाही असे एकांगी विचार मनात घोळायला लागतात. एकेकाळचा कर्ता, कर्तबगार माणूस दुखावतो, कोषात जातो, विक्षिप्त वागायला लागतो. ल्हान मुलं जशी स्वतःकडे मोठ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात, हट्ट करतात, मस्ती करतात त्या प्रमाणे ती ज्येष्ठ व्यक्ती लहान सहान निर्णयात दखल देऊ लागते, न विचारता सल्ले देऊ लागते, स्वतःचे ज्येष्ठत्व इतरांवर ठसवू पाहते. ते इतरांना जाचक होते. संघर्ष, वादावादी सुरू होते. ज्येष्ठ दुखावतात एकटे पडू लागतात.
हे सर्व पूर्ण नाही तरी अंशतः टाळणे शक्य असते. आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी. ज्यातून स्थायी स्वरूपात काही मिळकत होत राहील अशी गुंतवणूक करावी. भावनेच्या आहारी न जाता, व्यवहारी वृत्तीने काही गुंतवणूक संपूर्णपणे स्वतःच्या नांवावर, जमल्यास मुलांना अंघारात ठेवून करावी. कारण वडीलांची आर्थिक गुंतवणूक माहित असेल तर कधी कधी मुले ती त्यांच्या किंवा घराच्या वाढत्या गरजांसाठी भावनिक दडपण आणून (आम्ही तुम्हाला सांभाळत नाही का? तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?) मोडायला लावतात. सर्वच मुले असे वागतात असे नाही. पण अनेक दु:खी ज्येष्ठांची ही शोकांतिका आहे. तसेच आजारपणाचा स्वतःचा आणि पत्नीचा विमा असावा.

दुसरी गोष्ट आहे मानसिक. इतकी वर्षे घर चालविल्या नंतर म्हातारपणी स्वखुषीने सुत्रे मुलांच्या हाती सुपूर्त करावीत. त्याना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. त्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ द्यावा. त्यांना त्यांचा 'संसार ' उभा करण्याचा आनंद मिळवू द्यावा. त्यांच्या चांगल्या निर्णयांचे तोंड भरून कौतुक करावे. त्यांनी विचारला तरच सल्ला द्यावा. चूका फार सौम्य करून दाखवून द्याव्यात. आता ते 'कर्ते' आहेत हे मनाने स्विकारावे. आपण एक पाऊल मागे घ्यावे.

भावनिक पातळीवर, 'प्रेम करावे म्हणजे प्रेम मिळते' (मिळतेच असे नाही) हे तत्व अंगीकारावे. मुलांशी, नातवांशी प्रेमाने वागावे. म्हणजे आम्ही काय क्रुरतेने वागतो की काय? असे कोणी म्हणेल. पण प्रेम जे त्यांना समजेल, दिसेल, रुचेल ते असावे असे मला म्हणायचे आहे. पुरुष निवृत्त होतात पण बायकांना सहजासहजी निवृत्ती मिळत नाही. त्यांना ती मिळावी असा विचारही आपल्या मनात येत नाही आणि कित्येक केसेस मध्ये त्यांनाही ती नको असते. पण वयोमानानुसार त्यांचेही हातपाय थकतात. रजोनिवृत्तीनंतर हाडांचा ठीसूळपणा वाढीस लागतो. घरातील माणसे संखेने वाढलेली असतात. शारिरीक काम वाढलेले असते. म्हणजे एकीकडे ताकद कमी झालेली असते तर दूसरीकडे श्रम वाढत असतात. पत्नी आता आपले न ऐकता मुलाचे ऐकते ही भावना पतीच्या खुळ्या मनात घर करत असते त्यामुळे एकीकडे कुरकुरणारा पती आणि दूसरीकडे 'डिमांडींग' तरून पिढी ह्या चरकात ती बिचारी पिळून निघते. अश वेळी पुरुषाने तिला घरकामात शारिरीक मदत करावी. तिने आपल्याशी कसे वागावे ह्याच्या अपेक्षा न ठेवता आपण तिच्याशी चांगलेच वागावे, बोलावे. तिच्या कामाचा भार कमी करावा. वाटून घ्यावा. कमी कमी होऊ पाहणारा 'संवाद' चालू ठेवावा. तिची होणारी ससेहोलपट समजून घ्यावी. ती कमी करण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. तिला, मुलांना भावनिक आधार द्यावा तुम्हाला तो आपोआप मिळत जातो.

मोकळा वेळ कसा वापरावा, हा एक मोठा प्रश्न असतो. मानसोपचार तज्ञांशी, फॅमिली डॉक्टरांची विचारविनिमय करून शारिरीक व्यायामासाठी पोषक अशा हालचाली होतील असे पाहावे. समविचारी (रडणारे, कुढणारे नाही) मित्र जमवावेत. (अमिताभच्या 'विरुद्ध' चित्रपटात दाखवले आहेत, तसे) वाचन करावे, थोडेफार आध्यात्मिक वाचन करण्यासही हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ देऊ नये. आयुष्यभर नोकरीच्या/व्यवसयाच्या धबडक्यात न जमलेल्या हौशी (वयानुरुप) भागवाव्यात. निसर्गाला वाचावे, जाणून घ्यावे. म्हातारपणी बागकाम 'निर्मिती आनंद' मिळवून देतो. नातवंडांमध्ये आपले बालपण शोधावे. आपल्या मनःस्वास्थासाठीही हे चांगले असते. दुधापेक्षा साय जास्त महत्त्वाची, मुद्दलापेक्षा व्याज अधिक प्रिय. ही नातवंड आपली असली तरी ती 'दुसर्‍यांची' मुलं आहेत हे विसरू नये. 'त्यांच्या' इच्छेचा मान राखून नातवंडांवर संस्कार करावेत. नातवंडांसमोर आपल्या मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे दुर्गुण उगाळू नये.

मुलांनी म्हातार्‍या आईवडीलांचा मान राखावा. त्यांनी त्यांच्या काळात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलं आहे हे विसरू नये. त्यांच्या मानसिक अवस्था जाणून घेऊन निर्माण होणारे गुंते अतिशय हळूवार हाताने सोडवावे. थोडेफार त्यांच्या कलाने घ्यावे, थोडेफार आपले घोडे दामटावे. म्हातारपणी आई-वडीलांच्या अपेक्षा असतात मुलांनी त्यांना 'वेळ' द्यावा. वेळ द्यावा म्हणजे नुसता तास आणि मिनिटात मोजता येईल असा नाही. एकत्रित कुटुंबाचा आनंद मिळवून देईल असा वेळ द्यावा. त्या वेळात आई-वडीलांच्या इच्छा आग्रहपुर्वक पूर्ण कराव्यात. त्यांच्या इच्छेनुसार कार्यक्रम आखावेत. त्यांना अतिश्रम होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. त्यांची शारीरिक, भावनिक सेवा करावी. हे कायम करावे लागत नाही पण महिन्यातून एकदा किंवा दोन तिन महिन्यातून एकदा जमवून आणले तरी चालते. ज्येष्ठांना आपल्याला अडगळीत टाकलेले नाही, आपल्याला स्वयंपाकीण बाई किवा मुलांना साभाळणारी आया म्हणून वागविले जात नाहीए तर आपले ही ह्या कुटुंबात काही स्थान आहे. मुलं आपल्याला प्रेमाने वागवताहेत ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. त्यांना जगायला नवा हुरूप मिळतो. दोघांनीही लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे 'शब्द' हे शस्त्र आहे. सांभाळून वापरावे. संतापाच्या भरात तत्क्षणी प्रतिक्रिया व्यक्त करण्या ऐवजी शांत झाल्यावर हळू शब्दात, शब्दांची चांगली निवड करून आपली भूमिका संमजावून सांगावी.

अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही.

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 11:11 am | विसोबा खेचर

आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी.

हे वाक्य कळीचे ठरावे..!

साला पैसा बोलता है...! :)

असो,

सुंदर विवेचन...

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Sep 2008 - 8:39 pm | श्रीकृष्ण सामंत

प्रभाकर पेठकरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
किती अभ्यासू वृत्तिने,किती पोटतीडकीने,किती सामंजस्य ठेऊन,आणि किती बॅलन्स ठऊन आपण हे लेखन केलंत.
कुणी ह्याला "वृद्धापकाळाचा मॉग्ना कार्टा" म्हटलं तर गैर होणार नाही.
"अशा प्रकारे सर्व पक्षांनी आपापले कार्य, स्वार्थ आणि गर्व विसरून, केले तर वृद्धापकाळ हा शाप ठरणार नाही."
ह्या वाक्यात सर्व भरून आलं.
आणि त्यासाठी मी म्हणतो,
"प्रेम आणि त्याग ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.आणि समजूतदारपणाच्या धातूने ते बनले आहे.आणि ते नक्कीच खणखणून वाजते.ह्या तिन्ही गोष्टीत जरा सुद्धा कमतरता आली की ते नाणे खणखणून वाजणार नाही.अशी सर्व खणखणीत नाणी कुटुंबात असली तर त्या कुटुंबाचा खजिना खणखणत्या नाण्यानी भरलेला असणार."
पण एव्हडी परफेक्ट टांकसाळ असेल तर!

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अभिज्ञ's picture

15 Sep 2008 - 1:01 am | अभिज्ञ

पेठकर काका,
अतिशय सुंदर प्रतिक्रिया.

अभिज्ञ.

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2008 - 10:31 am | प्रभाकर पेठकर

तात्या,

आजकालच्या काळात आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय तरूणपणातूनच करायला हवी.
हे वाक्य कळीचे ठरावे..!
साला पैसा बोलता है...!
वाढती महागाई आणि अनिवार्य बनत चाललेले राहणीमान नाईलाजाने स्विकारताना कित्येकांच्या नाकी नऊ येतात. त्यांची ओढाताण पाहून आपल्या गरजांसाठी त्यांच्याकडे पैसे मागणे आई-वडीलांना अवास्तव वाटते त्याच बरोबर स्वतःची पुंजी नसेल तर फार कुचंबणा होते.
ह्यावर, मुलांनी उच्च राहणीमानाच्या मागे धावू नये, अंथरूण पाहून पाय पसरावेत असे सल्ले देता येतील. पण आजकाल मुलांचे शालेय, कॉलेजचे, उच्च शिक्षणाचे खर्च इतके आवाक्या बाहेर गेले आहेत की आई-वडीलांना कित्येक वेळा स्वतःच्या हौशी-मौजीही दूर ठेवाव्या लागतात. मुंबई-पुण्यात एक फ्लॅट घ्यायचा म्हंटले तरी HDFC ची जन्मठेप सुरू होते. ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपण आपला भार मुलांवर न टाकता शक्यतोवर स्वयंपूर्ण म्हातारपणाची सोय करावी असे मला वाटते. इथे पैशाला अवास्तव महत्त्व आणि आई-वडीलांवरील प्रेमाला गौण स्थान दिलेले नाही.

श्री. श्रीकृष्ण सामंत,

पण एव्हडी परफेक्ट टांकसाळ असेल तर!
म्हणूनच हा प्रयत्न प्रत्येकाने तरूणपणापासून (म्हणजे मुलांच्या लहानपणापासून) करावा. जे संस्कार आपण लहान मुलांवर करतो त्याचीच फळे म्हातारपणी आपल्याला मिळतात. आपल्या मुलांसमोर आपण आपल्या आई-वडीलांचा अपमान केला, त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले तर, आपल्या म्हातारपणी आपल्याही वाट्याला तेच येण्याची शक्यता जास्त असते. असो.

श्री. अभिज्ञ,

धन्यवाद.