माणसे हिमालयात जाऊन ,भारावून का जातात हे तिथे गेल्याशिवाय समजणं अशक्य आहे.
आम्ही 13000 फुटांवर जिथे गेलो होतो तिथे शांडिल्य ऋषींनी तप केलं होतं. जवळच सौरकुंड नावाचं एक कुंड आहे .7000 फुटांवर मानवी वस्ती नाही. रस्ते इथेच थांबतात.आता अधिक वर जायचं तर पाय वाटांवरूनच जायचं, त्याही निसरड्या आणि खड्या!इथले धनगर या 'वरच्या पहाडात' सात महिने मुक्काम ठोकून असतात.बरोबर हिमालयन शेळ्या मेंढ्यांचे कळपच्या कळप आणि भरीला घोडे आणि खेचरं! बायकासुद्धा जंगलात कळपाबरोबर राहातात.या बायका सतत विणकाम करीत असतात ,एका वेळी विणकामाच्या पाच-पाच सुया वापरतात .बाकी ट्रेक
हा अनुभव ज्यांनी ट्रेक केलेत अश्या (वेडसर!)लोकांनाच समजू शकतो.धूळ भरल्या टेंट मध्ये राहणे ,टोयलेटसारख्या सामान्य सुविधातही तडजोड (हे अनुभवल्याशिवाय समजणार नाही!),कशाही प्रकारच्या हवामानासाठी कायम तयार राहणे आणि भयंकर म्हणजे सहा ते सात दिवस अंघोळ करायला न मिळणे!!
हिमालयात हवा झटक्यात बदलते.थंडी ,पाऊस या इथल्या अगदीच सामान्य बाबी. अति तीव्र उताराचे प्रचंड डोंगर (पर्वत!), देवदाराची जंगलं ,कोसळलेल्या प्रचंड दरडी ,त्यातले अगडबंब दगड ,पाय गुडघ्या इतका आत जाईल इतकं साठलेलं ह्युमस ,पायाखाली भोवळ आणणारी आणि कुठे तरी अंधारात गुडूप झालेली दरी ,तितकंच भीतीदायक आणि पार आकाशात (किंवा ढगात )घुसलेलं त्या पर्वताचं शिखर !
वर जाऊ तशी हवा कोरडी ,अधिक गार आणि विरळ व्हायला लागते. एका level ला जंगल संपून, हिरव्या ,गवताळ ,सुंदर गवत फुलांनी भरलेल्या कुरणा सारख्या टेकड्या दिसतात. 11000 फुटांवर त्या हिरव्या कुरणात बर्फाच्या patches ची भर पडते .बर्फावरून चालणे आणि तेही चढ किंवा उतारावरच्या ,एक वेगळाच पण
भीतीदायक अनुभव आहे . दुरून हे बर्फाचे डोंगर कितीही साजरे दिसले तरी जवळ जाताच त्यांचे खरे रूप कळते .
पण जेंव्हा आपण शिखरावर पोहोचतो ,तो अनुभव विलक्षण आणि अविस्मरणीय असतो.
घरात काहीएक कारणामुळे ट्रेकला जाण्याचे शेवटच्या दिवसापर्यंत निश्चित नव्हते. सगळी बुकिंग फेब्रुवारीत झाली होती. दुरान्तोची तिकिटे संपल्याने आणि इतर गाड्यांची सुटण्याची वेळ आमच्या रिपोर्टिंग दिवसाशी जमत नसल्यामुळे नाईलाजाने विमानाने जावे लागले.कोल्हापूर ते मुंबई रेल्वे ,मुंबई ते दिल्ली विमान ,दिल्ली ते कुलू बस प्रवास. कोल्हापुरातून निघून ३६ तासात आम्ही कुलुत पोचलो;एकूण २१४६ किमी अंतर आहे.
या सर्व प्रकारात खरा त्रास हा वातावरण बदलाचा होतो. कोल्हापुरात जरी उन्हाळा होता तरी तो मुंबईच्या उन्हाळ्या सारखा नसतो ;दिल्लीतले भयंकर वातावरण दिल्लीवालेच सहन करू जाणोत, आणि कुलुत पोचल्यावर चक्क थंडी वाजायला लागली.प्रवास आणि वातावरण बदल यामुळे जे फटिग येतं त्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. सर्वाधिक त्रास गोवा ,समुद्राकिनाऱ्याहून(चेन्नई ,इ.) येणाऱ्याना होतो.
यासाठी तिथे acclimatize होता यावे म्हणून, पहिले दोन दिवस बेस कैम्प वर राहायला लागते.कुलूजवळील 'पतलि कुही' नावाच्या गावाजवळ '१५ मैल' या नावाच्या ठिकाणी आमचा बेस कैम्प होता. पहिल्या दिवशी दिलेल्या टेन्टमध्ये एखादी जागा शोधायची आणि सामान टाकून कैम्प वरील एका कोपऱ्यातील सार्वजनिक बाथमध्ये बर्फासारख्या थंडगार पाण्याने अंघोळ! (यातून त्यांना असं सुचवायचं असावं -"आता सुख विसरा ,आता तुम्ही आमच्या ताब्यात आहात"!) आतापासून पुढे काही गोष्टींची सवय लाऊन घ्यायची - पेपर सोप ,टोयलेट पेपर, चमचा आणि चहाचा मग खिशात ठेवणे(मोठे खिसे असलेली बंडी किंवा जीन्स घालणे) ,मोबा.,कैमेरा आणि इतर सर्व तत्सम किमती वस्तू विविध खिशात घालून फिरणे.
पतली कुही गाव आणि बेसकैम्प मध्ये जो लहानसा अरुंद रस्ता (highway!) आहे ,त्या रस्त्यावर Span Resort नावाचे रिसोर्ट आहे, हेच ते ज्याचे चित्रण 'ये जवानी है दिवानी' नामक चित्रपटात आहे. इथल्या बाजारपेठेत जवळ जवळ प्रत्येक दुकानाच्या 'मालकिणी' दुकान चालवतायत असं आढळतं. इथल्या बायका मोकळ्या, चतुर आणि व्यवहार कुशल आहेत.इथली माणसं खूपशी कोकणातल्या लोकांसारखी वाटतात;लहानसर चणीची,अतिशय कष्टाळू ,सरळ मार्गी,आपलं काम बरं-आपण बरे अशा स्वभावाची. समाधानी वृत्ती हे त्याचं ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यामुळे इथे इतके पर्यटक येऊनही अगदी शांत वातावरण असतं.सधन असूनही शेतमजूरा सारखे कपडे घालून शेतात आणि सफरचंदाच्या बागेमध्ये काम करणाऱ्या बायकाही बऱ्याच दिसतात. आम्ही ज्यांच्या रिसोर्टमध्ये जेवायला गेलो होतो,त्यांची मुले -मुलगा ,सून,मुलगी हि सर्व दिल्लीत सरकारी नोकरीत आहेत ;त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या पूर्वापार असलेल्या सफरचंदाच्या बागा आहेत. वर्षाला साधारण चार ते पाच ट्रक सफरचंदे ते बाहेर पाठवतात ,एका ट्रकाचे सहा ते सात लाख रुपये मिळतात.तरीही हे गृहस्थ इतके साधे आहेत कि स्वतः रोज हॉटेलात येउन काय हवे नको बघतात ,वागणे बोलणे अत्यंत polite; त्यांची बायको अगदी साधे कपडे घालून सफरचंदाच्या बागेत स्वतः काम करते.
इथे नेहमीच्या जेवणात लाल चावल,काली दाल,रोटी आणि सब्जी असते. सणासुदीला गोड करीत असावेत पण एकंदर गोड खाणे कमीच असावे असे वाटते.शेतात मुख्यतः बटाटे ,कोबी , फ्लावर अशी पिके घेतात. तांदूळही स्थानिक पिक आहे. इथली जमीन भुसभुशीत आणि वाळूची आहे ,धूळ सुद्धा खूपच असते.
घरे अतिशय सुरेख बैठी आणि टुमदार असतात. घरांना साधारण दोन मजले असतात,खाली गायींचे गोठे आणि वर घर मालक राहतात. घरांच्या समोरील बाजूची भिंत सगळी काचेच्या खिडक्यानीच बनलेली असते. बहुतेक बाहेरील जास्तीत जास्त ऊन आणि प्रकाश आत यावा म्हणून ही व्यवस्था असावी. इकडे बर्फ खूप पडते. त्यामुळे यांच्या घरात कायमस्वरूपी शेकोटी(लाकडे जाळून) असतेच.कोरड्या महिन्यांमध्ये जेव्हा जेव्हा बायका घराबाहेर पडतात, घरी परत येताना थोडी तरी लाकडे गोळा करून घेऊन येतात ;अर्थात हे जास्त करून हाय वे पासून आतल्या गावात दिसते. इथल्या घरांसमोर सुंदर गुलाबांच्या बागा हमखास दिसतात.इथली गुलाबाची झाडे आणि गुलाबही इथल्या निसर्गासारखेच बहरलेले ,अतीव सुंदर रंग आणि आकारात दिसतात.
रिपोर्टिंग दिवशी सकाळी ७.३० वाजता आम्ही बेसकैम्पला पोचलो. आय कार्ड इ. ऑफिसरच्या ताब्यात देऊन सूचना ऐकल्या(!). सामान कमीतकमी न्यायचे आहे हे माहित होते ,पण तरीही बहुतेक जण 'हे लागेल ते लागेल' असे करीत वाढवून ठेवतात.आमचा ग्रुप १० जणांचा असला तरी त्यात मी एकटीच बाई , लेडीज टेंट वेगळे असल्याने, असतील त्या बहुभाषिक बहुधर्मीय विविध स्वभावाच्या मुली ते बायकांशी मला जुळवून घ्यावे लागणार होते. त्यातच बेस कैम्पला वरून (ट्रेक पूर्ण करून)येणारे गट आणि प्रत्येक दिवशी रिपोर्टिंग करणारे गट अधिक आधी रिपोर्टिंग केलेले आणि आमच्या आधी निघणारे दोन गट अश्या सगळ्यांचा सावळा गोंधळ असतो . माझ्या शेजारी मुक्काम ठोकलेल्या दोन तमिळ मैत्रिणींनी ट्रेकसाठी प्रचंड खरेदी केली होती; दोन दिवस त्या बिचाऱ्या सामान भरत होत्या! वजन नेण्याची एक लिमिट आम्हाला होती- आयडीयली पाच किलो! या ठंबकायांनी आणलेले सामान कितीतरी जास्त होते!
वर पहाडांमध्ये चढून जाण्यासाठी बरीचशी 'अगदी उभी' चढण चढावी लागते; पाठीवर जितकं अधिक सामान तितका ह्या चढणी त्रास देतात. उतरतानाही अधिक सामानाचा त्रास होतो. दोन टी शर्ट ,दोन ट्रेक पैन्ट-सर्व शक्यतो सिंथेटिक (वजनाला हलके ,पटकन वाळतात),थर्मल अंगभर ,स्वेटर, कानटोपी ,वुलन हातमोजे पायमोजे(रात्री झोपताना घालण्यासाठी),सुती मोज्यांच्या ज्यादा जोड्या इत्यादी गोष्टी घ्याव्याच लागतात. पावसासाठी 'बरसाती' म्हणजे रेन-शिट घ्यावे लागते. मोबाईलचे 'लोढणे' आपल्याला सोडवत नाहीच! त्याबरोबर चार्जर हवाच- अश्या वस्तू वाढत जातात.Lap-topघेऊन आलेली उत्साही मंडळीही मी पाहिलेली आहेत.
आमच्या आधी सात दिवसांपूर्वी निघालेला एक ग्रुप दुसऱ्या दिवशी भेटला. त्यांना वाटेत एक दिवसभर पावसातून चालावं लागलं होतं, कैम्पवर पोचल्यावर रात्रभर भिजलेल्या टेंटमध्ये कुडकुडत रात्र काढावी लागली (एरवी सुद्धा चांगलीच थंडी असते) ;लाईट नाही ,जंगलात आणि वस्तीपासून दूर! पण तो सुद्धा एक 'माहोल' असतो! दिवसभर हिमालयाचं उग्र-सुंदर ,महाकाय रूप बरोबर घेऊन आपण चालतो ,ते आत कुठेतर आपल्याला हलवतं! मग कैम्प वर पोचल्यावर तुम्हाला हव तर शेजाऱ्याशी बोला-नाहीतर इतरांचं बोलणं ऐकत बसा: आयुष्यात 'पडणाऱ्या' किंवा 'पडलेल्या' गहन प्रश्नांवर चिंतन करीत बसलात तर, इतक्या शांततेत ,अंधारात मनाच्या गाभ्यात सहज अलगद झिरपता येतं! वेगळ्या ध्यानाची गरजच काय?
आम्ही अक्षरशः एका दिवसात ट्रेकची तयारी केली होती. आधीच्या ट्रेकचे थोडे साहित्य होतेच,तेच घेऊन बाहेर पडलो- विचार केला -'जे होईल ते बघू '.'पतली कुही'मध्ये मेडिकल certificate (डॉक्टर अगदी प्रामाणिक होते -व्यवस्थित तपासल्याशिवाय certificate दिले नाही!) पासून गॉगलपर्यंत सर्व खरेदी केली. येथे सर्व वस्तू मिळतात. पहिल्याच दिवशी नवीन गावात मस्त वेगळ्याच वातावरणातल्या बाजारपेठेत मनासारखी खरेदी करायला मिळाल्यामुळे माझा (स्त्रैण!) आत्मा तृप्त झाला! इथे डॉक्टर आणि दवाखाने अगदी कमी आहेत-आजारी पडण्याचे प्रमाण कमी आहे असे कळाले,विशेष म्हणजे हाडांचे विकार इथल्या माणसांना होत नाहीत म्हणे!
बेसकैम्पला जेवण चांगले होते. पण पुढे(वर) सलाड औषधाला सुद्धा मिळत नाही. दुध नाही (चहा पावडरच्या दुधाचा), फळे नाहीत-त्यामुळे शक्यतो मल्टी-विटामिन गोळ्या बरोबर नेलेल्या बऱ्या पडतात, वजनाची चिंता नसेल तर थोडी स्थानिक टिकाऊ फळे किंवा ड्रायफ्रुट्सचा उपयोग होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लवकर जाग आली-आदल्या रात्री दडपून दहा वाजता झोपायला लावल्यामुळे! रात्री दहा वाजता टेंट मधले लाईट बंद करतात(दडपशाहीचा निषेध असो!).पण त्याचा एक फायदा असा कि चांदण्यांनी भरलेलं आकाश बघायला मिळतं. आजूबाजूला इतके उंच डोंगर(पर्वत!) आहेत, त्यांवरच्या खेड्यातले लाईट तारेच असावेत असे भासतात. इकडे खूप लवकर उजाडते-आपण आता पूर्वेकडे असतो ! चार वाजता किंचित उजेड दिसू लागतो.तारे मंद होतात, पण निळसर पर्वत त्यावरचे ते टिमटिम उजेडाचे ठिपके आणि शिखरांवर निळसर धुरकट दिसणारं बर्फ-एक युनिक कॉम्बिनेशन तयार झालेलं असतं.
सकाळी बेड टी(!!That can be called 'tent tea') साडेपाच ते सहा दरम्यान ,नंतर सात वाजता दोन किलोमीटर जॉगिंग आणि exercise! ज्यांना व्यायामाची अजिबातच सवय नसते त्यांची हाडे कुरकुरतात. कैम्प वर परतून नाश्ता. पहिल्या दिवशी acclimatization walk-साधारण पाच सात किमीचे असते. शेतं आणि बांधांवरून ,गावातल्या आतल्या आणि उंचावरच्या तीन चार फुटी दगडी ,कॉंक्रिट रस्त्यांवरून चालत थोडे वर एखाद्या बागेत वगैरे घेऊन जातात.तिथे ग्रुप मधील सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या घेतल्या जातात.ग्रुप लीडर्स आणि 'पर्यावरण' लीडर ठरतात.दोन ग्रुप लीडर्स पैकी 'धाकटा' सर्वात पुढे चालतो, मुख्य सर्वात शेवटी. ग्रुप लीडरला, सर्व मेम्बर्स पुढे गेले का, कोणी वाट चुकले नाहीय, याची प्रत्येक थांबलेल्या जागी खात्री करून घ्यावी लागते.
अतिशय energetic मनुष्य ट्रेक मध्ये चांगला ग्रुप लीडर बनू शकतो,असं मला somehow वाटतं. Environment leader चं काम खरं तर कचरा उचलणे नाहीय ;इतरांना, त्यांनी कचरा टाकू नये म्हणून प्रवृत्त करणं आहे ,पण माणसे कचरा टाकतात ,आणि त्यांना हे प्रत्येक वेळी सांगत बसणं 'केवळ अशक्य' होतं!मग पर्या. लि. बिचारा तोंडाची वाफ न दवडता कचरा स्वतःच उचलून पिशवीत भरून कैम्पवर घेऊन येतो.हे काम प्रत्येकानंच करायला पाहिजे,पण जंगलातच नव्हे तर बर्फात सुद्धा प्लास्टिक सापडत.
आमच्या बरोबर कर्नाटक, आंध्र ,गुजरात ,काश्मीर ,गोवा ,येथून आलेले ग्रुप होते. महाराष्ट्रीयनांपैकी पुणे, मुंबई ,दिल्ली आणि आम्ही कोल्हापुरी माणसे होतो. नुकतीच नोकरीत लागलेले यंगस्टर्स आणि कॉलेज गोअर्स साधारण सगळ्यात जास्त असतात ;त्याखालोखाल असतात रेग्युलर ट्रेकर्स. फोटो काढणे हा सर्वाधिक महत्वाचा उद्योग यापैकी जास्तीत जास्त लोक करतात.आत्तापर्यंत आम्हांला नेहेमीच चांगली ,in the sense निरुपद्रवी माणसे भेटली आहेत. काही महाभाग असतातही-पण खूपच कमी. प्रेमिक जोडपी असतात ,परंतु यांचा उपद्रव (!) काहीच नसतो. 'जय पंखो वाली मैया' हा नवीन प्रकार आम्हांला हिमालयन ट्रेकमध्येच समजला ;'दारू' प्यायल्यावर इथले खडे चढही पंख लावल्याप्रमाणे आपण चढून जाऊ शकतो असा त्याचा थोडक्यात अर्थ ,'विस्तृत' अर्थ अनुभवींनाच विचारायला हवा!
दुसरा दिवस रैपलिंग. नेहेमीप्रमाणे बेड टी ,जॉगिंग , exercise , नाश्ता इ. झाल्यावर आम्ही 'फिफ्टीन मैल' रस्त्यावरून चालत लांब कुठेतरी नदीकडेकडेने एका खड्या डोंगरापाशी गेलो. तिथे दगडाचा लहानसा 'कडा' होता. प्रशिक्षक मंडळी वर तुरुतुरु चढून गेली. एका तरुण देखण्या प्रशिक्षकाने रैपलिंग साठी काय साहित्य लागते ,ते कसे वापरतात इ. माहिती दिली. त्यानंतर सगळ्या ४८ मेम्बर्सनी आळीपाळीने हेल्मेट्स चढवून त्या दगडी कड्यावरून दोराच्या साह्याने खाली येण्याचा प्रयत्न केला, त्यात बहुतेकजण यशस्वी झाली.
परतून जेवण झाल्यावर sack भरणे कार्यक्रम झाला ; जास्त वजनाच्या sack बाजूला काढण्यात आल्या आणि त्यांच्या मालकांना गोड आवाजात तंबी देण्यात आली. बेसकैम्पला रात्री झोपताना स्लीपिंग बैगच्या आत अंगावर घेण्यासाठी खोळ मिळते, ती बरोबर घेऊन जावे लागते. प्रत्येक कैम्पवर स्लीपिंग बैग मिळते;आपण बरोबर नेण्याची आवश्यकता नसते. प्रत्येकी दोन blanket देखील मिळतात,ती त्या त्या ठिकाणी परत करावी लागतात. मात्र औषधे, टोयलेट किट, कपडे ,मग ,प्लेट ,वाटी ,torch ,आणि तत्सम वैयक्तिक बाबी बरोबर न्याव्याच लागतात; वाटेत दुकाने नाहीत.
पहिला कैम्प सेगली-याच नावाच्या खेड्याजवळ होता. इथली खेडी सपाट नाहीत ,तीव्र उतारांवर असल्याने ती गावं न वाटता लहान वस्त्या वाटतात. चिमुकली शेतं आणि उतारांवरच्या बागा हे याचं वैशिष्ट्य!पहिल्या कैम्पला पोहोचण्याआधी वाटेत हे लक्षात आले कि सिनरी नितांत सुंदर आहे.जितके फोटो काढावे तितके कमीच वाटू लागतात. पाहू तिकडे आल्हाद दायक नवीन दृश्य दिसते.
सेगली सोडल्यास पुढे लाईट नाहीत. कॅमेरा ,मोबाईल इत्यादींच्या अधिकच्या batteries बरोबर घेतलेल्या बऱ्या पडतात, कारण पुढे कमीतकमी चार दिवस तरी बिन लाईटचे काढावे लागतात.'होरा' आणि 'मायली थाच' हे पुढील कैम्प्स. यांच्या पुढे अधिक वर चढून गेल्यावर सौर कुंड लागते. हे लहानसे तळे असावे,जे अर्धवट गोठलेले असते-आम्ही पाहू शकलो नाही कारण 'पास' हा एक मार्ग आहे,त्याची ओळख म्हणजे 'सौर-कुंड'. साधारण पाऊण ते एक किमी अंतरावर एका बर्फाळ टेकडी आड ते होते.सौर कुंड हि या ट्रेकची उंची,साधारण १२८०० फूट. इथून सबंध कुलू valley ३६० अंशातून दिसते. अतिशय उत्कृष्ट panoramic view इथून मिळतो. अनेक शिखरे सर्व सहा दिशांना दिसतात. हनुमान तिब्बा ,देव तिब्बा ,फ्रेंडशिप पिक ,इंद्रासन इत्यादी दिसतात. हे दृश्य शब्दशः अविस्मरणीय आहे.
चढताना एक नवी नवरी भेटली -माहेरी निघाली होती ,पहिल्यांदा आणि एकटीच! बरोबर एक लहानशी पिशवी होती आणि अगदी आनंदात होती. म्हणाली "आमच्याकडे माहेरी पहिल्या वेळी सुद्धा एकटीनेच जातात". सेगलीच्या वाटेवर एक मध्यमवयीन शिडशिडीत स्त्री जवळजवळ चाळीस किलोचे पाणी उपसायचे इंजिन उचलून चढत होती. खालच्या गावातून आलेय -असं म्हणाली. म्हातारी धडधाकट माणसे अगदी commonly दिसतात. अगदी लहान मुले तीव्र उतारांवरून, कठडे नसलेल्या उंच भिंतींवरून आणि दगड धोंड्यातून लीलया बागडताना दिसतात.
मायली नंतरचा कैम्प डोरा थाच. हिरव्या सुंदर कुरणात आणि कुठेतरी वितळलेला बर्फाचा patch असलेल्या ठिकाणी ,जिथून अक्रोडाचे काळसर हिरव्या पानांनी बहरलेले वृक्ष दिसतात अशा जागी ठोकलेले तंबू. सकाळचं कोवळं ऊन पडल्यावर झळाळलेल्या दही दिशा, हवा 'अहाहा' म्हणायला लावते ते कशी याचे स्वर्गीय प्रात्यक्षिक म्हणता येईल,अशी होती. धुक्याची पातळ झिलई ,उंचावर असण्याची जाणीव, भवताल नितळ सोनेरी उन्हात बुडालेलं, चमकदार पण तरीही सौम्य.
सौरकुंड पासून पुढे काही अंतर बर्फावरून घसरत जावे लागते. एप्रिल महिन्यातील बुकिंग असेल तर जवळ जवळ सर्व स्लाईड मिळतात. एकूण आठ असाव्यात. आम्ही सोळा मे ते चोवीस मे दरम्यान या रूटवर होतो. त्यामुळे एकाच स्लाईडचा अनुभव घेता आला. बहुतांश बर्फ वितळले होते.सौर -कुंडाच्या पलीकडे थोडे उतरून गेल्यावर आम्ही उभे होतो तिथून खाली एका काळसर खोल दरीत सुंदरश्या land-scape मधून ते पाणी मोठ्या धबधब्याच्या रुपात कुठेतरी गडप होत होते.
पाऊस कुठेच लागला नाही. या रुटवर पाऊस लागला तर मात्र काहीसे हाल होतात.डोक्यावर रेनशिट पांघरून चालणे एक दिव्यच! पण स्लाईड वर मजा येते. काही क्षण आपले हात आणि इतर अवयव नसावेतच असा भास होतो ,हा भाग वेगळा! बर्फात घसरताना शक्यतो हातमोजे घातलेले बरे. काहीजण बरसातीवर बसून घसरतात. हंटर शूजच्या आत प्लास्टिक पिशव्या (मोज्यांवर) घातल्या तर मोजे ओले होत नाहीत. शूज मात्र चांगलेच हवेत, नाहीतर उतारांवर पाय घसरतात. बर्फात PVC सोल असलेले शूज कदापि वापरू नये; रबरी सोलच हवेत.
High altitude sickness प्रकारच्या आजारात डोके सतत दुखत राहते,डोळ्यातून सारखे पाणी येते, अस्वस्थ वाटते ,मळमळते. अश्या वेळी दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. उंचावर बर्फात सूर्य किरण सरळ पडतात आणि अतिनील किरणे सर्वाधिक परावर्तीत होतात. याचा परिणाम डोळे आणि त्वचेवर होतो. निळी काच सोडता इतर कोणत्याही रंगाचा गॉगल घातला तर डोळ्यांचे ठीक संरक्षण होते. आम्हाला जे मिळाले ते सनस्क्रीन वापरले.
पण कोणतेही सनस्क्रीन वापरण्यापेक्षा 100 SPF असणारे सनस्क्रीन वापरणे चांगले ; सनस्क्रीन वापरलेच नाही तर मात्र 'लेलेंचे' 'करपलेले' होण्याची दाट शक्यता असते!
आपण कितीही साधे असलो तरी वेट टिशूज आणि बॉडी लोशनचा उपयोग आपल्यालाच बरे वाटावे म्हणून होतो. बाकी जर अगदीच बर्फ-थंडीत आपण गेलो (एप्रिल ते आठ मे ) तर स्वतःची ताट-वाटी धुण्याऐवजी नुसतीच टिशू पेपरने पुसण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. मरणाच्या थंडीत गार पाण्यात हात घालणार कोण ! पिण्यापुरते गरम पाणी -तेही किचन स्टाफला विनंती केल्यावर - मिळू शकते. पण एकंदर स्टाफ आणि सुविधा
'चांगल्या' या गटातच मोडतात.
शेवटचा कैम्प एका लाकडी घरात होता. सौरकुंडापासून आम्ही एक कैम्प खाली उतरून आलो होतो.
एखाद्या botanical garden मधून उतरून आलोय असं वाटत होतं ; वाटेत पालकाची (भासणारी)शेतं वाटावीत अशा मोकळया जागा होत्या. तीव्र उतारांवर नाजूक जांभळ्या फुलांनी बहरलेली झाडे आणि वरून घरंगळत आलेले मोठे खडक आणि त्यातून वाहणारे झरे यांनी उत्कृष्ट land -scape तयार झाली होती.
शेवटच्या कैम्पवरील लाकडी घरातील स्वैपाकघरात ट्रेकर मंडळींसाठी बनवलेला एक खास पदार्थ मिळाला. मोमोसारखा तांदळाच्या उकडीपासून बनवलेला आणि आपल्याकडील करंजी पेक्षा आकाराने जवळ जवळ दुप्पट. या उकडीच्या करंजीत आक्रोड आणि सोयाबीन पासून बनवलेलं भरण भरलं होतं. या डिश बरोबर पुदिन्याची तिखट चविष्ट चटणी होती. या पदार्थाचं नाव मी विसरले.
तशा तर बऱ्याच गोष्टी मी विसरून गेलेय. कैम्प साईटवर झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या
गप्पा आणि तावातावाने झालेल्या चर्चा मी विसरले ;त्या त्या वेळी लिहून ठेवायला वेळ आणि एनर्जी नसल्यामुळे
(एक सबब!). अनेक गोष्टी इथे सांगायच्या राहून गेल्या.पण खरतर हे सगळं अनुभवायला हवं ! इथल्या भूभागाविषयी ,वनस्पती ,प्राणी ,इतिहास,इथल्या स्थानिक भाषा यांविषयी माहिती असेल तर एकूण अनुभवात निश्चित फरक पडू शकतो, असे मला वाटते.
काही क्षणचित्रं:
प्रतिक्रिया
11 Dec 2013 - 12:16 pm | गवि
उत्तम लेख आणि स्थळपरिचय..
मिपावरच्या पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा..
11 Dec 2013 - 3:05 pm | तिन तेरा
खूप आभार.
11 Dec 2013 - 12:16 pm | स्पा
फोटो?
11 Dec 2013 - 12:21 pm | यशोधरा
लई भारी आणि सगळ्या लेखाला - खास करुन हिमालयाबद्दलच्या सगळ्या वर्णनाला अगदी अगदी!
फोटो टाका प्लीज.
>>हा अनुभव ज्यांनी ट्रेक केलेत अश्या (वेडसर!)लोकांनाच समजू शकतो >> व्हय व्हय! :)
11 Dec 2013 - 3:09 pm | तिन तेरा
स्पा आणि यशोधरा यांस ,
येथे नवीन असल्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत.
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
11 Dec 2013 - 12:30 pm | मुक्त विहारि
जमल्यास फोटो पण टाका.
11 Dec 2013 - 12:30 pm | प्रचेतस
उत्तम वृत्तांत.
पण फोटू हवेतच. त्याविना मजा नाही.
11 Dec 2013 - 1:05 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
11 Dec 2013 - 1:45 pm | मी_आहे_ना
असेच म्हणतो
11 Dec 2013 - 3:12 pm | तिन तेरा
मुक्तविहारी आणि वल्ली यांस ,
आभार.
फोटो टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत.
11 Dec 2013 - 5:10 pm | गवि
योगिनी..आधी फोटो पिकासा किंवा फ्लिकर किंवा तत्सम ठिकाणी अपलोड करुन घ्या.
मग श्री. रा. रा. वल्ली किंवा मला किंवा यशोधरा यांना व्यक्तिगत निरोपाने किंवा खरडवहीद्वारे फोटोच्या लिंका पाठवून द्या.
आमच्यापैकी कोणी ते फोटो इथे एम्बेड करुन देईल. शिवाय भविष्यकालीन पोस्टसाठी खालील प्रकारे ते अपलोड करता येतील.
१. पिकासावर फोटो चढवणे.
२. त्या फोटोंचे संपूर्ण यू आर एल (दुवा) कॉपी करुन घेणे.
३. इथे पोस्ट लिहीत असताना एडिटर बॉक्सच्या वरच्या टूल्समधे सूर्यास्ताच्या देखाव्याचा आयकॉन (इन्सर्ट /एडिट इमेज) यावर क्लिक करणे.
४. उघडलेल्या चौकटीत योग्य जागी फोटोचा वर म्हटलेला दुवा पेस्ट करणे.
५. अन्य तपशील भरुन ती चौकट बंद करणे.
६. फोटो एम्बेड करणारा एचटीएमएल टॅग आपोआप इन्सर्ट झालेला दिसेल.
11 Dec 2013 - 1:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
वृत्तांत मस्तच....पण फोटुविना अधुरा
९९ मध्ये YHAI बरोबर केलेल्या सारपास ट्रेकची आठवण झाली हे सगळे वाचुन...तेव्हा मोबाईल/लॅपटॉप बोकाळले नव्हते .पण खरेदी आणि जड सॅक हे होतेच.
11 Dec 2013 - 3:17 pm | तिन तेरा
राजेंद्र मेहेंदळे ,
ट्रेकर मंडळी भेटली कि बरे वाटते.
प्रतिक्रियेबद्दल आभार.
11 Dec 2013 - 2:18 pm | सूड
फोटो नायत हो!! फोटोशिवाय प्रवासवर्णन म्हणजे मीठाशिवाय जेवण. थोडं मीठ टाका, चव वाढेल.
11 Dec 2013 - 2:27 pm | सूड
>>महाराष्ट्रीयनांपैकी पुणे, मुंबई ,दिल्ली आणि आम्ही कोल्हापुरी माणसे होतो.
दिल्ली महाराष्ट्रात येते हे नव्याने कळलं. ;)
11 Dec 2013 - 2:41 pm | गवि
..आला का लगेच हा मेला छिद्रान्वेषी.. !?!
11 Dec 2013 - 3:20 pm | तिन तेरा
आदरणीय सूड यांस,
दिल्ली महाराष्ट्रात नाही हे खरेच,पण दिल्लीत बऱ्यापैकी महाराष्ट्र असावा ,असा एक अंदाज:)
11 Dec 2013 - 4:41 pm | सूड
=))
असं आदरणीय वैगरे नसतं म्हणायचं (निदान मिपावर तरी ;) ).
12 Dec 2013 - 9:09 am | नॉन रेसिडेन्षिय...
बरोबर आहे ! कदचित सुड महाशय बाहेर पडले नसतिल कधी महाराष्ट्रच्या ! मनसे त जितके कार्यकर्ते नस्तिल ना त्यापे़क्क्शा जास्त मराठी लोक दिल्लीत आनी आसपास आहेत.
12 Dec 2013 - 3:42 pm | सूड
बरोबर आहे तुमचं!! नाहीच पडलो महाराष्ट्राबाहेर कधी.
तुम्ही मात्र महाराष्ट्राबाहेरच राहिलेले दिसता त्यामुळे माझा शुद्ध मराठीत लिहीलेला मुद्दा कळलेला दिसत नाही. मी हायलाईट केलेलं वाक्य बघा. त्यातून जर तुम्हाला काही कळलं तर ठीक, नाहीतर ते समजून सांगण्याइतका वेळ माझ्या हातात नाही. त्यामुळे तुमचं चालू देत.
11 Dec 2013 - 3:25 pm | यसवायजी
लै भारी ओ साहेब.. आपल्या कोल्लापूरचा झेंडा लाउन आलासा म्हना की..
बाकी, फोटु इथं प्रतिसादातुन दिले तरी चालतील..
12 Dec 2013 - 5:57 pm | यसवायजी
सॉरी हां. गडबडीत चाळला होता. आता पुर्ण वाचलं.
11 Dec 2013 - 4:54 pm | आनंदराव
मस्त. डोल्यपुधे चित्र उभे राहिले.
व्यायाम केला पाहिजे, म्हन्जे अशा थिकानी गेल्यावर फजिती होनर नाही.
आनि हो, तेव्धे फोतो ताकायला विसरु नका.
11 Dec 2013 - 5:02 pm | कवितानागेश
छान लिहिलंय. फोटो टाकाच.
11 Dec 2013 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान वर्णन. हिमालय ज्याला आवडत नाही तो मानव दुर्दैवी म्हणावा असे सौंदर्य निसर्गाने तिथे उधळलेले आहे... आता फोटो बघायची हुरहुर लागली आहे... टाका लवकरच.
11 Dec 2013 - 6:36 pm | राही
भरपूर तपशिलांनी भरलेले खेळकर लिखाण. तपशील असूनही जंत्री वाटत नाही. उलट त्यामुले तिथले लोक, त्यांची रहाणी, तिथला भूप्रदेश यांचे एक सुंदर चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. लिखान आवडले हे वेगळे सांगायला नको.
12 Dec 2013 - 9:21 am | पहाटवारा
खुसखुशीत लिखाण ! 'लेले' .. 'करपलेले' मस्तच :)
आमच्या आवडत्या उत्तरांचलाची आठवण झाली .. जमेल तसे गढवाल - कुमाउंन मधले ट्रेक पण करा ..
सर्वांनी वर म्हट्ल्याप्रमाणे फोटुंनी मजा अजुन वाढली असती ..
-पहाटवारा
12 Dec 2013 - 11:21 am | गवि
फोटो अपडेटवले आहेत. पण कोणता फोटो कोणत्या ठिकाणचा आहे हे समजून घेऊन ते जागोजागी टाकणं कठीण आहे. पुढच्या वेळी अन्य प्रतिसादात दिलेली प्रकिया वापरुन स्वतः धागाकर्तीस फोटो योग्य जागी पेरता येतील.
पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा..
12 Dec 2013 - 12:11 pm | तिन तेरा
Photos.
12 Dec 2013 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
सगळे फोटो बघितले. ट्रेक फँटॅस्टिक झाला आहे ! फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद !
12 Dec 2013 - 12:29 pm | प्यारे१
फोटो मस्तच आहेत. प्रवास वर्णन ओरझतं वाचलं, पूर्ण सावकाशीत वाचणेत येईल.
मिसळपाववर स्वागत.
12 Dec 2013 - 1:57 pm | दिपक.कुवेत
बघुन आणि वाचुन भारावुन गेलोय. फोटो अजुन असले तर टाका. अश्या निसर्गाच्या सान्नीध्यात सतत रहाणार्यांचा खुप हेवा वाटतो.
12 Dec 2013 - 2:05 pm | योगी९००
सुरेख वर्णन...
फोटो तर अतिशय छान... (कोठला कॅमेरा वापरला?)...
पु.ले.शु.
12 Dec 2013 - 2:12 pm | बिपिन कार्यकर्ते
जीवाची घालमेल झाली! अतिशय सुंदर!
(मेरा नंबर कब आयेगा!) :(
12 Dec 2013 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
खालून चवथा फोटो (२२.०५.२०१३ ००:३४) नंबर वन !
अश्याच क्षणांमुळे नंतर "साद देती हिमशिखरे..." असं वाटंत राहतं !
12 Dec 2013 - 5:42 pm | सुहास..
ज ह ब ह रा !!
12 Dec 2013 - 7:11 pm | सौंदाळा
मस्त फोटो आणि वर्णन.
ठंबकाया शब्द आवडला :)
12 Dec 2013 - 7:48 pm | शिद
आता जेवणात मीठ पडले... :)
12 Dec 2013 - 7:49 pm | पैसा
लिखाण आणि फ़ोटो अतिशय आवडले! मिपावर स्वागत!
12 Dec 2013 - 10:27 pm | किसन शिंदे
ट्रेकचं वर्णन आणि फोटो(जितके आहेत तितके) पाहून जाण्याची इच्छा अनावर होतेय! पाच ते सात दिवसांच्या ट्रेकचा खर्च साधारणपणे कितीपर्यंत होतो?
20 Dec 2013 - 4:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
इथे शोधा, http://www.yhaindia.org/program-participate-now.php
बरेच ट्रेक आहेत.. ट्रेकचा खर्च बघता जाण्यायेण्याचाच खर्च जास्त होइल असे वाटते....
13 Dec 2013 - 5:18 am | रेवती
भारी झालाय ट्रेक! फोटू मस्त आलेत.
तुम्ही लेख लिहिल्यानं सौरकुंड हा प्रकार मी जाण्याजोगा अज्याबात नाही याची जाणीव झाली. ;)
धन्यवाद.
13 Dec 2013 - 7:09 am | खबो जाप
लय भारी,
वायीच जरा ज्यादा म्हायती हाय पर लयीच भारी लिवलया…।
जरा आनकी येक भाग काडून फटू टाकाच …………
13 Dec 2013 - 1:00 pm | तिन तेरा
मंडळी, प्रतिक्रियांबद्दल खूप आभारी आहे .
वरील एका प्रतिक्रिया चौकटीत ,
"अधिक फोटोंसाठी गुगल प्लस लिंक"
दिली आहे.
वापरलले कैमेरे Canon sx130 आणि Nikon .
येण्याजाण्याचा खर्च सोडता YHAI ची ट्रेक फी साधारण ४०००/-रु. च्या आतच
असते . ट्रेकचे साहित्य कमीत कमी खर्चात मिळवता येते. सैक बेस-कैम्पवर
मिळते, वेगळी विकत घेण्याची गरज नाही .
कापडी हंटर शूज महाग नसतात-(साधारण ३५०/-रु. पर्यंत मिळतील) ,
पण अत्यावश्यक असतात .
14 Dec 2013 - 10:53 pm | बॅटमॅन
तीन तेरा: तुमचा लेख वाचल्यावर आहे तिथून नऊ-दोन-अकरा होऊन पळून ट्रेकवर जावेसे वाटू लागलेय. लेखनशैली मस्त आवडली अन फटूसुद्धा जबराटच आलेत. मिपावर स्वागत आणि शुभेच्छा!!
बाकी दिल्लीबद्दल सांगायचे तर इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेतली (मोस्टलि १८०३) ती मराठ्यांकडूनच ;)
15 Dec 2013 - 1:08 pm | विजुभाऊ
मस्त. एकदम थेट अनुभवला ट्रेक
15 Dec 2013 - 2:11 pm | प्रकाश घाटपांडे
लेख उस्फुर्त व छानच! फोटोतल भुभार्ड आवडल.
20 Dec 2013 - 4:31 pm | युगन्धरा@मिसलपाव
कोल्हापुरचे आहात का तुम्ही ? फोटोज खुप छान आले आहेत.