मराठी मातीवर आणि ह्या मातीच्या सन्मान्य इतिहासाचा अभिमान बाळगणार्या सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन.
नुकताच आम्ही शिवशौर्य ट्रेकर्स द्वारे कुलाबा किल्ला - पद्मदूर्ग - जंजिरा - खांदेरी आणि कणकेश्वर मंदिर असा दौरा करून आलो. त्यात पद्मदूर्गाला भेट देणे हा अनुभव विशेष संस्मरणीय होता. कारण पद्मदूर्ग किल्ल्यावर सहजासहजी जाता येत नाही. मुरुड किनार्यावरील कोळीबांधवांशी काही दिवस अगोदर बोलून तिथे जाण्यासाठी बोट निश्चित करावी लागते. ती मिळतेच असे नाही. मिळाली तर कोळीबांधव आपले नित्याचे व्यवहार सोडून आपल्या सवे येत असल्या कारणाने बोटीचे भाडे थोडेफार जास्त असू शकते. मात्र आयत्या वेळी बोट भाड्याने मिळणे केवळ अशक्य. त्यामुळे जंजिर्यापासून हाकेच्या अंतरावर असूनही ह्या किल्ल्यावर पर्यटकांचा राबता अतिशय कमी आहे.
पद्मदूर्ग हा किल्ला मुरुड गावापासून अगदी जवळ आहे. तो नऊ एकरावर फैलावलेला असून किल्ल्याचे बांधकाम पाहून डोळ्याचे पारणे फिटते. असा हा बुलंद, बेलाग, अवाढव्य किल्ला जंजिरेकर सिद्ध्याच्या नाकावर टिच्चून बांधणे सोपे नव्हे. मराठेशाहीचे हे अस्तित्व आणि ते ही हाकेच्या अंतरावर हे जंजिरेकर सिद्धीच्या अवघड जागीचे दुखणेच बनले होते. एक वेळ तर अशी आली होती की पद्मदूर्गाच्या मदतीने महापराक्रमी लाय पाटील हा जंजिरेकर सिद्ध्याचा खेळच आटोपणार होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून सिद्ध्याची गादी टिकून राहिली (पार १९४७ पर्यंत). असो.
असा हा दुर्लक्षित दूर्ग खरोखरच पाहण्या जोगा आहे आणि हा किल्ला समुद्र सपाटीवर असल्याने कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट न होता ह्या किल्ल्यावर जाता येते. त्यामुळे एक पर्यटक म्हणून आपण आपल्या कुटुंबियांना घेऊनही ह्या किल्ल्यावर जाऊ शकता. तसेच केसरी, सचिन सारख्या मोठ्या पर्यटन संस्थांनी ठरवले तर तिथे नियोजित पर्यटन सुद्धा होऊ शकते. केवळ एकच अडचण म्हणजे तिथे बोटी लावण्यासाठी धक्का बांधलेला नसल्या कारणामुळे पाण्यात उतरावे लागते. पण सोबत एखादी छोटी शिडी नेली तर ही अडचण सुद्धा दूर होऊ शकते.
सिद्धीच्या प्रतिकाराची तमा न बाळगता दौलतखानाच्या अतुल योगदानाने निर्माण झालेला हा किल्ला नऊ एकरावर वसलेला आहे. कमळाचा आकार असलेला पडकोट हे ह्याचे मुख्य वैशिष्ट्य. तसेच किल्ल्याचे बांधकाम करताना काळ्या पत्थरापेक्षा जास्त बळकट असे वापरलेले चुना आणि इतर घटकांचे मिश्रण जे आजही पुरातन वास्तु कौशल्याची साक्ष देत खंबीरपणे उभे आहे. गडाला एकूण सहा बुरुज असून त्यात ३८ तोफासुद्धा आहेत. असा हा अनवट किल्ला पाहताना क्षणोक्षणी मनात विचार येत होता की जंजिर्यासारखाच महत्त्वाचा असून ही हा दूर्गाधिराज दुर्लक्षित का? पर्यटक जंजिरा पाहायला आवर्जून येतात तर पद्मदूर्ग पाहायला का नाही?
अधिक चौकशी करता असे कळले की जंजिरा हे आज मोठे पर्यटन केंद्र आहे जे तिथल्या लोकांना आज मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देत आहे. तेथे वसलेले सिद्धीचे वंशज पद्मदूर्गाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. कारण पद्मदूर्गाला महत्त्व प्राप्त झाले तर त्याचा फायदा मुरुड गावास तसेच मुरुड समुद्र किनार्यावरील हिंदु कोळी बांधवांना होईल. ह्या सिद्धीच्या वंशजांना पद्मदूर्ग म्हणजे वैर्याचे अस्तित्व वाटते. वाईट इतकेच आहे की महाराष्ट्र शासन आणि स्थानिक आमदार-खासदार हे त्यांचीच पाठराखण करत आहेत. निदान शिवसेना आणि मनसे ह्यांनी तरी राज्यपातळीवर प्रयत्न करून पद्मदूर्गाला गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे. पद्मदूर्गावर बोटी लावण्यासाठी एक साधा धक्का बांधला तरी पर्यटकांचे पद्मदूर्गावर येणे जाणे चालू होईल आणि मुरुड गावाला त्याचा आर्थिक फायदा पण होईल.
पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ति हवी जी सध्यातरी दृष्टिक्षेपात नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात जंजिरेकरांचे असलेले आर्थिक वर्चस्व आणि हे वर्चस्व आले आहे जंजिरा किल्ल्याला भेट देणार्या पर्यटकांना लुटून.
"लुटून" हाच शब्द खरा आहे कारण किनार्यावरील दुकाने, किल्ल्यातील वाटाडे हे पर्यटकांकडून अवास्तव किंमती वसूल करतात. वाटाड्यांनी तर बोट मालकांच्या साथीने एकाधिकार निर्माण केला आहे. साधा किल्ला दाखवण्याचे आणि माहिती सांगण्याचे वाटाड्यांने आमच्याकडून रु. १२०० मागितले. इतके होऊनही श्री. सुशील जे एक स्थानिक आहेत आणि ज्यांनी आम्हाला पूर्ण मोहिमेत सोबत केली ते असे म्हणाले की हे वाटाडे (हबशी) सिद्धीचे थेट वंशज आहेत आणि जो इतिहास सांगतात तो केवळ सिद्धीच्या पराक्रमाचा सांगतात आणि त्यांच्या सोयीचाच सांगतात.
ह्या सर्व परिस्थितीत मराठी इतिहास प्रेमी सर्व भारतीयांना एकच करणे शक्य आहे आणि जे अत्यंत आवश्यक सुद्धा आहे ते म्हणजे पद्मदूर्गावर आवर्जून आणि वारंवार जाणे. एकदा का राबता वाढला की शासनाला पण नाईलाजाने पद्मदूर्गावर जाण्यासाठी धक्का तसेच नौका-सेवा द्यावीच लागेल. ह्यामुळे मुरुडकर एतद्देशीयांना पण लाभ होईल.
Photo courtesy - www.shivchhatrapati.com
प्रतिक्रिया
13 May 2012 - 7:01 pm | पैसा
या किल्ल्याबद्दल थोडंफार ऐकलं होतं. पण तुम्ही लिहिलेलं धक्कादायक आहे. अर्थात आम्हाला अशाच प्रकारचा अनुभव फतेहपूर सीक्री इथे आला होता. तेव्हा खरं म्हणजे नवल वाटू नये. पण महाराष्ट्रात हे प्रकार चालतात हे माहिती नव्हतं. पुढच्या अलिबाग भेटीत पद्मदुर्ग पाहणं नक्कीच जमवणार!
13 May 2012 - 7:04 pm | किसन शिंदे
मुरूड जंजिर्याहून अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता महाराजांचा पद्मदुर्ग, पण जायला जमलं याची खुप खंत वाटतेय. :(
तिथल्या या लुटींबद्दल तर काही बोलायलाच नको.
याच्याशी लाख वेळा सहमत!
बोटीतून किल्ल्याकडे जाताना बोटीचा नावाडी सिद्दीच्या पराक्रमाचे गोडवे गातानाच "शिवाजी महाराजको लास्ट तक ये किल्ला जितने को जमा नही" यांसारख्या अनेक वाक्यांवर अगदी जोर देऊन बोलत होता.
13 May 2012 - 7:06 pm | सृष्टीलावण्या
सीमाताई भांबुरकर ह्या जंजिर्याला भेट द्यायला गेल्या होत्या. त्यांनी तिथल्या वाटाड्याकडे सहज
चौकशी केली की पद्मदूर्गावर जाता येते का तर वाटाड्या म्हणाला की तिथे जायला नौदलाची अनुमति लागते पण प्रत्यक्षात असे काही नाही.
पद्मदूर्गावर लोक जाऊ नयेत म्हणून हे जंजिरेकरांचे प्रयत्न.
28 Aug 2012 - 2:55 pm | वैनतेय
उत्तर मलाही मिळाले होते.... पण आता मात्र नक्की जाणार...
13 May 2012 - 7:19 pm | सृष्टीलावण्या
सांगायचे ना - शिवाजी राजे अजून १० वर्षे जिवन्त असते तर तुझे पूर्वज आफ्रिकेला पळाले असतात.
आमची संख्या जास्त असल्याने आणि सर्वांची देहबोली दणकट असल्याने त्यांनी ट्याव ट्याव केली नाही. नाहीतर तिथेच त्यांना गप्प केले असते
13 May 2012 - 7:23 pm | सृष्टीलावण्या
गणसंख्या कमी असेल तर पद्मदूर्गाला जाणे आर्थिक दृष्ट्या महाग पडते आणि मुरुडकर कोळी आयत्यावेळी टांग पण देतात (कोकणी बाणा).
आम्हाला शेवटच्या क्षणी बोट उपलब्ध नाही सांगितले ते पण आम्ही १० दिवस आधी कळवून सुद्धा.
13 May 2012 - 7:58 pm | परिकथेतील राजकुमार
देव करो आणि सर्वच गडांवरती लोकांची वर्दळ बंद होवो.
लेखकास :- कृपया राग मानू नये. वरील वाक्य तुम्ही किंव इतर कुठल्याही दुर्गप्रेमीला दुखावण्यासाठी लिहिलेले नाही. मात्र जे काही २/३ किल्ले पायाखालून गेले तिथे आलेल्या अनुभवातून, नालायक आणि भिकारचोट लोकांनी तिथे मांडलेल्या उच्छादातून, कचर्यातून जे काही मनात उमटले तो हा प्रतिसाद आहे.
14 May 2012 - 10:41 am | नाना चेंगट
सहमत आहे.
किंवा असे वाटते की काहीतरी भुकंप वा प्रलय यावा आणि अशा गडकिल्ल्यांवरच्या इतिहासाच्या सर्व खाणाखुणा नष्ट व्हाव्यात. किमान त्यामुळे तरी आयुष्यभर केवळ परकियांचीच चाकरी करुन मिळणार्या पैशाच्या उबेने गडकिल्ल्यांवर विकांताची भटकंती करुन आम्ही किती राष्ट्रप्रेमी याचा कुल्लेटिपरीताडननाद करत फिरणार्या बाजारबुणग्यांपासून त्या पवित्र स्थळांचे रक्षण होईल.
13 May 2012 - 8:09 pm | सृष्टीलावण्या
१०१% सहमत पण केवळ जंजिर्याला भेट देऊन एकांगी इतिहास ऐकून सिद्धी हा अतुल पराक्रमी होता आणि मराठेशाही त्याला दबकून होती असा गैरसमज करून घेणे पण योग्य नव्हे.
मुंबई, ठाणे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये जागोजागी किल्ले बांधून आणि जमीनीवर विजय मिळवून राजांनी सिद्धीला गुदमरवूनच टाकले होते.
13 May 2012 - 9:12 pm | बॅटमॅन
३८ तोफा????? सर्व अजूनही शिल्लक आहेत? नाही म्हणजे फोटोमध्ये दिसत नाहीत म्हणून विचारलं. शिवाय तुम्ही फोटो का नै टाकले हो? मस्त मजा आली असती अजून.
13 May 2012 - 10:41 pm | सृष्टीलावण्या
सदर माहिती http://trekshitiz.com/marathi/MI_DefaultUser.asp?SearchValue=P&FortName=... वरून घेतलेली आहे.
फोटोंची मजा http://www.misalpav.com/node/18354 इथे घ्यावी.
13 May 2012 - 11:37 pm | बॅटमॅन
धन्यवाद :)
14 May 2012 - 1:48 am | शिल्पा ब
राजकारणी मुसलमानांच्या मतांसाठी देश विकताहेत याच्याबद्दल दुमत नसावे...पण हे हळुच बोला हो नैतर लोकं रागावतात!!
14 May 2012 - 6:54 pm | सृष्टीलावण्या
ती मते तशी एकगठ्ठा मिळतात सुद्धा हे उ.प्र. च्या निकालांवरून सिद्ध झालेच आहे.
14 May 2012 - 2:19 am | निनाद मुक्काम प...
ह्या लेखातून मांडलेली व्यथा सामन्यातून किंवा इतर मराठी वृत्तपत्रातून मांडली पाहिजे.
जंजिर्याचे महत्व माझ्यामते ह्या किल्ल्याच्या प्रकाशझोतात येण्याने वाढेल किंबहुना दोन किल्यांमधील अंतर व त्यांच्या मधील झालेल्या जल युद्धाच्या हकिगती स्वकीयच नाही तर परकीय पर्यटकांना सुद्धा भूलावातील. केसरी किंवा इतर मराठी पर्यटक कंपन्यांनी ह्याची दखल घ्यावी.
हि कल्पना आवडली.
14 May 2012 - 6:58 pm | सृष्टीलावण्या
व्यावसायिकतेतून पैसा येतो आणि राजकारण्यांना / सरकारला तोच कळतो / समजतो.
14 May 2012 - 3:20 pm | कपिलमुनी
इथला गाइड आम्हाला माहिती देत असताना सतत शिवाजीने .. सीवा .. असे एकेरी उल्लेख ते सुद्धा अनादराने करत होता ..आम्ही त्याला समजावले पण ऐकेना ...मग आमच्यातल्या एका मावळ्याने गचांडी पकडून 'समजावले' तेव्हा त्याने किल्ल्यावरून परत नेण्यास नकार दिला ...दुसरी बोट करून किनार्या वर गेलो तर 'हबशी' तयारच होते ..
थोडी 'बा'चा -'बा'ची झाली ...आणि आम्ही सुखरूप निघालो ते केवळ न घाबरता नडलो म्हणून ..पण अक्षरशः मिनी पाकीस्तानात असल्यासारखे वाटले क्षणभर
14 May 2012 - 4:48 pm | इनिगोय
हे असं सगळं करण्याची मुजोरी फक्त या 'महान' देशातच शक्य होत असेल नाही?
14 May 2012 - 7:03 pm | सृष्टीलावण्या
भले शाब्बास!
ठकासी व्हावे ठक,
खटासी व्हावे खट,
उद्धटासी उद्धट,
लौंदासी आणून
भिडवावा दुसरा लौंद
- श्री रामदास स्वामी.
23 May 2012 - 7:29 pm | सृष्टीलावण्या
ह्या किल्ल्याकडे जाताना समुद्रात पाण्याचे निळा, मातकट आणि हिरवा असे तीन प्रवाह अनुभवायला मिळतात.
24 May 2012 - 11:06 am | ऋषिकेश
बरं आहे तिथे सहज जाता येत नाही. नाहितर त्याही किल्यावर जंजिर्यासारख्या प्लास्टिक पिशव्या, सुंदर शिल्पांवर कुंकु/भंडार्याचे डाग दिसले असते!
किल्यांचे जतन जरूर व्हावे मात्र पर्यटनासाठी काहि मोजकेच किल्ले उघडे ठेवावे. अन्य गड-किल्ल्यांवर केवळ प्लास्टिक पिशव्या, सिगारेटी-गुटखे यांची पाकिटे (याशिवाय जमत नसेल तर सिगारेटी सुट्या बाळगा. पाकिट संपल्यावर ते किल्यावर टाकलेले आढळते) , मद्याच्या काचेच्या बाटल्या न बाळगणारे गिर्यारोहक व इतिहास संशोधक यांनाच अनुमती द्यावी. (ते किल्ले पवित्र आहेत की नाहि हा वेगळा मुद्द आहे, या गोष्टींनी किल्ल्याचे सौदर्य कमी होते)
30 May 2012 - 9:40 am | सृष्टीलावण्या
जंजिरेकरांची मस्ती उतरवणार असाल, त्यांचे एकांगी इतिहास कथन बंद पाडणार असाल आणि तेथील पर्यटकांची लूट थांबवणार असाल तर आणि तरच हा पर्यावरण प्रेमाचा पुळका खरा मानता येईल.
नाहीतर दुर्बलांचे पर्यावरण प्रेम आणि भारताची शान्तिप्रियता सारखीच म्हणावी लागेल.
30 May 2012 - 9:57 am | ऋषिकेश
मला पर्यावरणचहा तथाकथित पुळका अजिबात नाही. प्लॅस्टीक पर्यावरण वाचण्यासाठी म्हणून नव्हे तर स्वच्छतेसाठी नको असे माझे मत आहे.
केवळ तुम्हाला आमची भुमिका खरी वाटावी म्हणून असली कामं करायला काय दुसरी कामं नाहित काय? ;)
30 May 2012 - 10:31 am | सृष्टीलावण्या
ज्या त्वरेने उत्तर आले आहे ते पाहून असेच वाटते ;)
30 May 2012 - 11:28 am | ऋषिकेश
वाटते त्याला कोण काय करणार.. स्वगतः ज्याची त्याची समज जाण इत्यादी इत्यादी! :P
30 May 2012 - 4:43 pm | सृष्टीलावण्या
हो बुवा, आम्हाला स्वतःलाच वाटते... आम्ही काही त्याचे (वाटण्याचे) आऊटसोर्सिंग केलेले नाही :) :D :P