✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिवस्मारक – मुंबई

स
सुहास झेले यांनी
Mon, 03/19/2012 - 17:09  ·  लेख
लेख
२००२ साली लोकसभा निवडणुका आधी कोंग्रेस सरकारने शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारक मरीन लाईन्स इथे अरबी समुद्रात बांधायचे, असं पिल्लू सोडलं. शिवाजी महाराजांबद्दल असलेली आत्मीयता, ह्या स्मारकाच्या माध्यमाने जगभर पोचवायची होती. त्याच साली ह्या स्मारकासाठी ३५० कोटींचं बजेट मंजूर झालं देखील होतं (२०१२ चा आकडा नक्कीच हजार कोटींवर असेल, महागाई वाढलीय नं). मरीन लाईन्सला समुद्रात एक किलोमीटर आत समुद्रात भरती टाकून, हे स्मारक बांधायचे नक्की झाले. शिव "स्मारक" प्रेमी आनंदून गेले. सरकारचा उदोउदो झाला आणि त्यानंतर ते सत्तेत आले. मग पुन्हा २००९ मध्ये विधानसभा निवडणुका व्हायच्या बरोबर अगोदर, त्यांनी एकदम धुमधडाक्यात स्मारकाचा आराखडा मंजूर केला आणि व्हायचं तेच झालं. सरकार पुन्हा सत्तेत आलं. चांगली साडेतीन वर्ष सत्ता भोगून झाली, आदर्श घोटाळे करून भागले. जिथे पैसा तिथे "आपला" माणूस आदर्शपणे (हा शब्द आहे की नाही माहित नाही, असावा बहुतेक) पेरावा, हे काँग्रेसी डावपेच कोणाला माहित नाही? (संदर्भ मुंबई क्रिकेट असो.) असो, आता पुन्हा हा स्मारकाचा विषय ऐरणीवर आलाय. तीन दिवसांपूर्वी दादा पवारांनी सांगितलं, की मरीन लाईन्सला स्मारक बांधायचं तूर्तास रद्द झालंय. त्याला पर्यावरण समितीची परवानगी, मुंबईच्या सुरक्षेची कारणे दिली गेली. वर त्यांनी हेही सांगितलं, की वरळी भागात जागेचा पर्यायी जागेचा शोध सुरु आहे. त्या दिवसभरात शिव "स्मारक प्रेमींनी" प्रचंड गोंधळ घातला, मग संध्याकाळी मुखमंत्री (अरेरेरे स्वारी टायपो झाला) मुख्यमंत्री ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, कोणी परवानगी नाकारली नाही आणि आम्ही स्मारक बांधणार म्हणजे बांधणार. आम्ही केंद्र सरकारकडे याचा नक्की पाठपुरावा करून, लवकरात लवकरात परवानगी मिळवून घेऊ. मिडियाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नाही, ही ब्रेकिंग न्यूज दिली. त्यावर मान्यवरांचे विचार ऐकवले, आणि स्मारकामुळे महाराजांचा आपल्याला किती अभिमान वाटतो हे आपण जगाला दाखवून देऊ, हे कळकळीने सांगितले. (डोळे पाणावल्याचा स्मायली) शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, आरमार, सह्याद्री, महाराजांची दूरदृष्टी, त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि आपल्याला त्यांच्याबद्दल असलेला अभिमान, ह्या गोष्टी पुन्हा नव्याने सांगायला नकोत. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेलं हे किल्ल्यांच वैभव आपण नशीबवान आहोत म्हणून अनुभवायला तरी मिळतंय. महाराजांनी बघितलेलं आरमाराचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली अफाट परिश्रम, म्हणूनच आपल्याला हे भव्य जलदुर्ग दिमाखात समुद्रात उभे दिसतायत. ह्या किल्ल्यांच्या तटबंदीवर, तो महाकाय समुद्र डोकं आपटून हतबलपणे मागे फिरतो. त्या सह्याद्रीच्या कुशीत उन-वारा-पाऊस ह्याची तमा न बाळगता उभे असलेले ते बुरुज बघून, कोणाची छाती अभिमानाने न फुगली तर नवलचं. आता थोडं अवांतर २००७ साली रायगडावर फिरताना, एक पन्नाशीच्या आसपास दिसणारा माणूस किल्ल्याबद्दल, तिथल्या लोकांना काही माहिती देत होता. मी पण ती माहिती ऐकत उभा होतो, आणि त्यांची माहिती सांगून झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारले तुम्ही गाईड आहात काय? तर ते नुसते हसले आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांची ओळख करून दिली, हे निनादराव बेडेकर. हे मोठे इतिहास तज्ञ आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही २०-३० मिनिटे थांबलो आणि ते एकदम भरभरून बोलत होते. बोलताबोलता त्यांना आम्ही किल्ल्यांच्या ह्या वाईट अवस्थेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "अरे राजा, गेली १५ वर्ष मी आपल्या सरकारकडे किल्ले पुन:बांधणीचा प्रस्ताव घेऊन फिरतोय आणि त्याला केराची टोपलीशिवाय अजून काही मिळालं नाही. मी पाठपुरावा करणे सोडणार नाही, पण ह्या लोकांची कातडी गेंड्याची आहे. मी त्यांना त्यांचा फायदा कसा होईल हे देखील समजावून सांगितले, पण काही नाही. त्यांना हा इतिहास पुसून टाकायचा आहे" आणि ते परतीच्या वाटेला निघाले. २०११ साठ्ये कॉलेजमध्ये निनादराव पुन्हा भेटले, आणि मला बघताच म्हणाले, " आपण रायगडावर भेटलो होतो. मस्त गप्पा मारल्या होत्या आणि आता त्या प्रस्तावाचे, माझे आणि रायगडाचे वय चार वर्षांनी वाढलेय, बाकी प्रगती शून्य आहे" हे ऐकून काळजात खोलवर धस्स झाले. त्यानंतर ते पुन्हा एकदा तिथेच जनसेवा समितीच्या कार्यक्रमात भेटले होते, आणि त्यावेळी त्यांनी महाराजांचे दुर्ग आणि त्यांची बांधणी ह्यावर अभ्यासवर्ग घेतला होता. त्यावेळी त्यांनी युरोपातील जुन्या किल्ल्यांचे वैभव, कसे टिकवले आहेत हे कळकळीने सांगत होते. हाच प्रस्ताव त्यांनी आपल्या सरकारकडे दिला होता. तुम्ही किल्ले वाचवा, परत होते तसे बांधून काढा, आम्ही तुम्हाला सगळी माहिती देतो कुठे काय होतं आणि तुम्ही किल्ले बघायाला येणाऱ्या लोकांकडून प्रवेशासाठी पैसे घ्या. शिवाजी महाराजांबद्दल असलेली आपुलकी दाखवणे म्हणजे, त्यांचे जागोजागी पुतळे उभारायचे, त्यांच्या दोन-दोन जयंत्या साजऱ्या करायच्या, त्यांच्या नावे टपाल तिकीट काढायचं, किंवा त्याचे लॉकेट-अंगठ्या घालणे होत नाही. आपल्या सरकारला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्याहून उंच पुतळा बांधून, अमेरिकेपुढे जायचं आहे हे पाहून गंमतच वाटली. चला बांधा तुम्ही स्मारक, मी नक्की भेट देईन, अगदी पहिल्याचं दिवशी. महाराजांच्या अतिभव्य स्मारकासमोर उभं राहण्यात मीसुद्धा धन्यता मानेन. पण त्या स्मारकासाठी भर समुद्रात मोठ्ठं मानवनिर्मित बेट तयार करणे (त्यासाठी लाखो टन ब्राँझ आणि १५०-२०० एकर भराव घालणे), मोठाले निधी उभारणे, निसर्गाला आव्हान देणे, सुरक्षितता (स्मारकाची आणि अनायसे मुंबईची) आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं राजकारण करणे हे कधी थांबणार? काल सेनापतींनी (रोहन चौधरी) ठरवल्याप्रमाणे खांदेरी-उंदेरी हे दोन्ही सागरी किल्ले बघून आलो. समुद्रात खोल पाण्यात दोन नैसर्गिक बेटांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेले हे दोन किल्ले. उंदेरी किल्ला सिद्दीने बांधला, आणि खांदेरी महाराजांच्या काळात बांधायला घेतला गेला. मुंबई बंदराच्या सुरक्षतेच्यादृष्टीने हे दोन्ही किल्ले बांधण्यात आले. दोन्ही किल्ले एकदम खस्ता हाल आहेत. उंदेरी तर पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि खांदेरीवर वेताळदेव मंदिर आणि कान्होजी आंग्रे लाईट हाउस असल्यामुळे लोकांची वर्दळ आहे. उंदेरीच्या तटबंदी खूप ढासळल्या आहेत. गडावर १६ तोफा आहेत, ज्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत. काही तोफा समुद्रात पडलेल्या (फेकलेल्या) आहेत. जलदुर्ग - उंदेरी - जलदुर्ग - खांदेरी तटबंदीचे महाकाय दगड समुद्रात वाळूत रुतून पडले आहेत. त्यातल्या एका दगडावर शांत बसून होतो. वाईट वाटतं होतं. ह्या दोन किल्ल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे, निखळलेल्या दगडाचे सांत्वन मी तरी काय करणार आणि अश्या किती दगडांचे पर्यायाने किल्ल्यांचे सांत्वन मी करणार. आपलं नशीब की, आपल्याला ह्या तुटलेल्या तटबंदी का होईना बघायला मिळाल्या. तो इतिहास थोडाफार अनुभवता आला, पण... पुढे? :( जर अश्या बेटावर पर्यायाने किल्ल्यावर शिवस्मारक झाले, तर किल्ला पण सुरक्षित राहिलं आणि स्मारकाचे स्मारक देखील होऊन जाईल. मुंबई गेट वेपासून, फक्त ४०-४५ मिनिटे बोटीचा प्रवास बस्स... पण हे होईल का? :( :( - सुझे !! (दोन्ही फोटो साभार रोहन चौधरी)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10165 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

मस्त लेख आणि फोटो

अमोल खरे
Mon, 03/19/2012 - 17:26 नवीन
निनाद बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या महाराजांप्रति निष्ठा वादातीत आहेत. पण उठसुठ जातीचे राजकारण करणारे शिवस्मारक उभारतील ही अपेक्षा करणे म्हणजे आशावादीपणाची हद्द आहे. बाकी वैयक्तिकरित्या बोलायचे तर अरबी समुद्रात स्मारक उभारायचा काय फायदा असेल असे मला वाटत नाही. पैशांवर पैसे खर्च होतील, बांधकामाला अफाट वेळ लागेल, आणि जो फिल एखाद्या गडावरचे स्मारक बघताना येतो तो समुद्रात येणार नाही. एखाद्या गडावर स्मारक करणे उत्तम. पण निनाद बेडेकरांचं नाव ऐकुनच जातीचं राजकारण होतं, त्यामुळे स्मारक वगैरे काहीच होणार नाही ह्याची खात्री बाळगावी .
  • Log in or register to post comments

तुम्ही लिहिलेले एकदम मनातील

गणेशा
Mon, 03/19/2012 - 17:34 नवीन
तुम्ही लिहिलेले एकदम मनातील आहे, मला वाटते सर्व शिवप्रेमी, दुर्गप्रेमींचे अगदी हिच मते आहेत. खरेच मुंबईत नकोय स्मारक .. पण आपले ऐकणारे कोण आहे ? मरीन ड्राईव्ह जसा आहे तसा चांगला आहे. आनि शिवस्मारक येथेच काय कोठे ही बांधण्यापेक्षा सरकारणे तोच पैसा शिवदुर्ग संवर्धनासाठी वापरला तर आणखिनच चांगले आहे. शिवाय लोक प्रत्येक किल्याला पैसे भरतील ... उलट आनंदाने देणगीही देतील. --------- महाबळेश्वर आणि तत्सम ठिकाणी नाही का लोक प्रवेश फी देत ? शिवस्मारक समुद्रात बांधुन करायचे काय ? तर तिथे आत जाणार्‍या रस्त्यावर हाजिआली प्रमाणे भिकारी बसवायचे. ओळखिच्या लोकांची दुकाने आणि हॉटेल्स काढुन १० रुपयाची वस्तु ५० रुपयांना विकायची ... आजुन बरेच काही.. शिवस्मारक नको शिवस्मृती जपा असे कळकळीने सांगु वाटते...
  • Log in or register to post comments

आनखिन एक ..उदाहरणाखाली देतो

गणेशा
Mon, 03/19/2012 - 17:50 नवीन
आनखिन एक .. उदाहरणाखाली देतो : आनखिन एक .. उदाहरणाखाली देतो : आत्ताच बाबासाहेबांचे स्मारक दादर मध्ये व्हावे म्हणुन तोडफोड झाली.. मला लोकांचे खरेच कळत नाही.. तोडफोड का .. कश्यासाठी ? आंबेडकरांनी .. गांधीजींनी जी आंदोलने उभारली, जी तत्वे बाळगली ती तुम्ही अशी धुळीस मिळवुन .. त्या तत्वांच्या होळीवरती उलटे त्यांचेच पुतळे उभारणार ? राजकारणाची तर लाज वाटते आहे, पण हे जे लोक बघतो ना तेंव्हा कीव वाटते त्यांची .. घरी बापाच्या फोटोला हार घालायचे सोडा, साधा नमस्कार करायला पण ह्यांना वेळ नसतो आण ह्यांनी तोडाफोडीने मागणी करायची कशयसाठी हवी आहे जागा ? कशासाठी स्मारक ? कोण का म्हणत नाही, की स्मारकांपेक्षा ही माणुस महत्वाचा आहे.. वाचणारा पैसा त्या माणसाच्या उन्नती साठी द्या .. कश्यास हव्या आहेत वोट बँकांचे राजकारण .. अरे ह्या वोट देणार्‍यांना पण कश्यास हवा हव्यास ? बाबासाहेबांचे/शिवरायांचे स्मारक झाले नाहि म्हणुन त्यांची किर्ती पुढील पिढीस कळणार नाहियेका ? कश्यासाठी अट्टाहास ? कश्यापायी राजकारण ?
  • Log in or register to post comments

:(

पैसा
Mon, 03/19/2012 - 17:49 नवीन
काहीही होणार नाही सुहास. ना पुतळा, ना किल्ल्यांची देखभाल. रत्नागिरीच्या रत्नदुर्गाचे बुरुज मच्छीमारांसाठी जेटी बांधायला तोडून काढले आणि काही बुरुजांचे दगड लोकांनी घरं बांधायला सरळ काढून नेले. हे आमच्या डोळ्यासमोर घडलंय. निनाद बेडेकर धडपड करत रहाणार आणि आम्ही हळहळत रहाणार.
  • Log in or register to post comments

खर तर स्मारका ऐवजी महाराजांच्या नावाने एखादी कंपनी चालु करावी

निश
Mon, 03/19/2012 - 17:59 नवीन
खर तर स्मारका ऐवजी महाराजांच्या नावाने एखादी कंपनी चालु करावी. त्या योगे जर २५० कोटी रुपये वापरुन कंपनि काढली तर कमीत कमी ५००० लोकाना कायम स्वरुपि काम मिळेल. लोकांचि घर त्या योगे उभि राहु शकतिल. शिवाजी महाराज हे नेहमि जनतेच हित पहात असत त्यामुळे हेच खर बरोबर असाव अस माझ मत आहे.
  • Log in or register to post comments

महाराजांच्या नावाने एखादी कंपनी चालु करावी..

मोदक
Mon, 03/19/2012 - 18:45 नवीन
>>>महाराजांच्या नावाने एखादी कंपनी चालु करावी पन्नाशीला आलेली एक कंपनी आहे.. (मी शिवाजी पेपर मिल, शिवाजी सूत गिरणीबाबत बोलत नाहिये.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

पन्नाशीला आलेली एक कंपनी

धन्या
Tue, 03/20/2012 - 10:51 नवीन
पन्नाशीला आलेली एक कंपनी आहे..
सुरुवातीला लोकांच्या उद्धारासाठी सहकार तत्वावर सुरु झालेली ती कंपनी आज काहींची खाजगी मालमत्ता आणि त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग झाली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

डु.का.टा.आ.

मोदक
Mon, 03/19/2012 - 18:52 नवीन
डु.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

अगदी मनातलं बोललात. उत्तम

बॅटमॅन
Mon, 03/19/2012 - 19:00 नवीन
अगदी मनातलं बोललात. उत्तम लेख. फालतू गोष्टींना मानबिंदू बनवून त्यांच्यासाठी झगडे करायचे, साप साप म्हणून भुई धोपटायची, हे आपल्या राजकारण्यांचे स्पेशलायझेशन आहे. त्यात देखील महाराष्ट्राचे राजकारणी देशात अग्रेसर आहेत. जिथे अस्मितेचा खरा मुद्दा असेल, तिथे मात्र या साल्यांचे वैयक्तिक अभिमान उफाळून येतात आणि खरे महत्वाचे प्रश्न भिजत राहतात. महाराष्ट्राची लॉबी केंद्रात नाहीये ती याचमुळे. निनाद बेडेकर जसे म्हणाले की केंद्र सरकारकडे ते पाठपुरावा करताहेत परंतु प्रतिसाद नाही. पण गल्लीतच नाही तिथे दिल्लीत कुठून येणार? आणि हा प्रश्न निव्वळ दुर्गसंवर्धनापुरता मर्यादित नाही. मराठ्यांच्या इतिहासाची सर्वात अमुल्य साधने जी जुनी कागदपत्रे, त्याची काय व्यवस्था आहे आज? सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ आणि पुणे स्टेशन जवळ पेशवा दफ्तर अशी दोन ठिकाणे वगळली तर काहीच नाहीये. भारत इतिहास संशोधन मंडळात १५ लाख आणि पेशवा दफ्तरात ३-४ कोटी इतकी कागदपत्रे आहेत. नुसती पडून आहेत. मेंटेनन्स साठी पैसा नाममात्र. मंडळाला तर राज्य शासनाकडून दर वर्षी २५००/- अशी भरघोस रक्कम मिळते. काय घंटा होणारे त्यात? मी कोलकात्याला एशियाटिक सोसायटी आणि न्याशनल लायब्ररी स्वत: पहिली आहे. इतकी सुसज्ज व्यवस्था की चकित व्हायला होतं. मेम्बर्शीप साठी झीरो शुल्क आणि उत्तम व्यवस्था. तिथेही अर्थात ब्युरोक्रसी आहेच- त्याबद्दल नंतर कधीतरी. पण त्यांनी मूळ साधनांचे जतन असे केले आहे की बस. केंद्राकडून फंडिंग येते आणि बिनबोभाट सर्व चालते. तरी नशीब भांडारकरला त्या हल्ल्यानंतर फंडिंग मिळाले तरी. मंडळाला फंडिंग मिळण्यासाठी अजून एका हल्ल्याची वाट पहावी लागेल की काय कोण जाणे. या बाबतीत तामिळनाडू आणि कर्नाटक चा आदर्श घेण्यासारखा आहे. कन्याकुमारीला विवेकानंद स्मारकाशेजारी संत तिरुवल्लुवर यांचा १३३/१४३ फूट उंचीचा दगडी भव्य दिव्य पुतळा तामिळनाडू शासनाने त्या खर्चाचा सिंहाचा वाटा स्वत: उचलून उभा केला. कर्नाटक शासनाने तर बेंगळूरू मध्ये टाऊन हॉल जवळच कन्नड भावनाची स्थापना केली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेपेक्षा त्याचा आवाका बराच मोठा आहे. इतकेच काय, प्रख्यात इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांचे समग्र साहित्य हे आंध्र मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेय, पुण्या-मुंबईतील कोणाला हे सुचले नाही. भाषा आणि संस्कृती यांचे जतन करावे तर या दाक्षिणात्यांनीच. त्याखालोखाल बंगाली. साहित्य-संस्कृती जतन करणे हे काम ब्राह्मणांचे, अशी जी पारंपरिक समजूत होती, तिचाच पगडा महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या मनावर अजून आहे असे वाटते. त्याचाच हा परिपाक असावा.
  • Log in or register to post comments

राज ठाकरे बरोबर म्हणाले

गोंधळी
Mon, 03/19/2012 - 21:23 नवीन
राज ठाकरे बरोबर म्हणाले आहेत.शिवरायांच्या किल्ल्यांचे योग्य रितीने जतन करण्याची गरज आहे. बाकि मनातल्या तीव्र भावना येथे लिहीने योग्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments

लेख अतिशय कळकळीने लिहिलास

प्रचेतस
Mon, 03/19/2012 - 22:35 नवीन
लेख अतिशय कळकळीने लिहिलास सुझे. सर्वच मुद्दे पटले. समुद्रात स्मारक उभारण्यापेक्षा एखाद्या किल्ल्यावर उभारणे जास्त उचित आहे.
  • Log in or register to post comments

+१

दिपक
Wed, 03/21/2012 - 16:00 नवीन
सहमत. लेखामागची कळकळ जाणवली सुझे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरबी समुद्रातून आता जलप्रवास

निनाद मुक्काम …
Mon, 03/19/2012 - 23:33 नवीन
अरबी समुद्रातून आता जलप्रवास सुरु होत असल्याचे वाचले आहे. आता स्मारक भर समुद्रात बांधण्यापेक्षा बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या नवी मुंबई लगत शिव नगरी निर्माण करत आहेत त्यास भरगोस मत करावी. माझ्या मते निनाद बेडकर ह्यांनी सरकावर अवलंबून न राहता आम जनतेत जाऊन आपली योजना व प्रकल्प सादर केला. व ह्यासाठी मेळावे व आख्यान माला आयोजित केली तर अनेक जण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या मदत करतील- निवासी आणि अनिवासी महाराष्ट्रीयन व शिवाजी महाराज्यांना मानणारे अनेक भारतीय सुद्धा ह्यास हातभार लावतील. "जो सरकार वारी विसंबला ,त्याचा कार्यभाग बुडाला"
  • Log in or register to post comments

गोची ..

सुहास झेले
Tue, 03/20/2012 - 00:22 नवीन
गोची ही आहे की, सर्व किल्ले पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारच्यावतीने प्रस्ताव आल्या खेरीज आपण काही बदल करू शकत नाही... ते जे करतील ते निमुटपणे बघायचं :( नाणेघाटाच्या गुहेचे काय झालंय माहित आहे का? हा फोटो २४ फेब्रुवारीचा आहे, एका ट्रेक ग्रुपने फेसबुकवर शेअर केला होता... बोला काय करायचं? आम्ही रात्रभरात निघून हे तोडलं असतं देखील, पण हे थांबवू शकत नाही नं आपण :( :( Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

नाणेघाटाच्या गुहेला दरवाजा

प्रचेतस
Tue, 03/20/2012 - 17:43 नवीन
नाणेघाटाच्या गुहेला दरवाजा आवश्यकच होता सुझे. त्याने गुहेचं मूळ सौंदर्य नक्कीच कमी झालेय यात काहीच शंका नाही. पण निदान त्यामुळे गुहेतले शिलालेख, मूळ शिल्पाकृतींचे शिल्लक राहिलेले अवशेष बर्‍यापैकी सुरक्षित राहतील. सातवाहनांची ही एकमेव ऐहिक लेणी आहे. ती सुरक्षित राहिलीच पाहीजे. पण सध्या पुरातत्व खात्यातर्फे नाणेघाटातली नळीची मूळ वाट तोडून सध्या जो पायर्‍या बनवण्याचा घाट घातला जात आहे तो अक्षम्य आहे. सध्या पुरातत्व खातं आणि वनखात्याच्या हद्दीच्या वादात याचे काम थांबले आहे. पण जेव्हा पूर्णपणे थांबेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

हम्म्म्म... पण काही झालं तरी,

सुहास झेले
Tue, 03/20/2012 - 19:00 नवीन
हम्म्म्म... पण काही झालं तरी, मला नाही बघवत हे. डोक्यात तिडीक गेली हे बघून. :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कोण शिवाजी??

अर्धवटराव
Tue, 03/20/2012 - 03:49 नवीन
हे स्मारक वगैरे नकोय पब्लीकला. कशाला त्या गड-किल्ल्यांच्या डागडुगीवर पैसा खर्च करायचा? जे हाती आहे ते तर नीट सांभाळणं होत नाहि... फुकटच त्या जीर्ण अवशेषांवर नक्राश्रू ढाळायचे... अरे इथे आतंकवाद विरोधी दलाला शिरस्त्राण आणि बुलेटप्रूफ जॅकॅट्स घ्यायला सरकार जवळ वेळ आणि पैसा नाहि. नको ते खर्च का म्हणुन वाढवायचे मग? अर्धवटराव
  • Log in or register to post comments

कायच्या काय...

चिगो
Tue, 03/20/2012 - 12:12 नवीन
आता हळूहळू निवडणूका जवळ येताहेत. तोपर्यंत हे तापत ठेवायचं. इलेक्शन मध्ये मग "शिवप्रेमी विरुद्ध इतर" असा सामना रंगवायला बरं पडतं.. "दुर्गपुनर्निर्माण" ही कल्पना चांगली आहे, पण खरंच आपल्या जनतेला इतिहासाची, त्याच्या रक्षणाची एवढी आवड आहे !? नाही, प्रत्येक किल्ल्या-महालात "प्रेम-प्रताप" लिहीलेले पाहीले आहेत म्हणून म्हटलं. आता, तिथे भेट द्यायला आलेल्यांतले बहुतांश महाराष्ट्रीयनच असतील, असे मानतो.. समुद्रात बेट-बीट निर्माण करुन स्मारक बांधण्यात काही हशील नाही. महाराजांनी किंवा त्यांच्या आधीही ज्यांनी जलदुर्ग बांधले, त्यांनी त्यांच्या शक्ती + युक्तीच्या आधारे निसर्गावर मात केली होती. आता जेसीबी आणि इतर विशाल मशीन्सच्या सहाय्याने हे काम बरेच सोपे झाले आहे. मग तो संदेश वगैरे पोहचत नाही लोकांपर्यंत.. त्यापेक्षा गड-संरक्षण आणि संवर्धन केले, तर "त्याकाळी एवढं केलं होतं पहा" हे मुर्तीमंत रुपाने लोकांसमोर मांडता येईल.. बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments

हुम्म्म....

इरसाल
Tue, 03/20/2012 - 12:59 नवीन
कोणी दुसर्या देशाने सप्रेम भेट म्हणुन दिल्याशिवाय मुंबैला समुद्रात महाराजांचा पुतळा उभा करु नये. अमेरिकेने नाही का (कधी काळी) अर्थव्यवस्था मजबूत असताना (फुकटेपणाकरुन) फ्रान्स कडुन (ढापला) मिळवला होता.
  • Log in or register to post comments

सध्या काय झालं हो ?

कपिलमुनी
Sat, 11/21/2020 - 03:53 नवीन
स्मारकाचं काय झालं पुढे ??
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा