कदाचीत हे शिर्षक बघून गोंधळला असाल... पण हा प्रश्न माझा नसून, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलेला प्रश्न आहे, "What the hell is going on in this country,"
टाईम्स ऑफ इंडीया मधील या बातमी प्रमाणे, पुण्यातील उद्योजक हसन अली यांच्या पन्नासहजारकोटी रुपयांच्या करचुकवेगिरी संदर्भात न्या. रेड्डी आणि न्या. निज्जर, वरील शब्दात आपला उद्वेग दाखवत पुढे (दम देत) म्हणाले की, फक्त करचुकवेगिरी म्हणत काळ्या पैशाकडे असे दुर्लक्ष जर सरकार करू लागले तर न्यायालयाला चौकशीप्रक्रीयेवर नियंत्रण ठेवावे लागेल. सकाळ मधील या बातमी प्रमाणे, "हसन अली याने विदेशी बॅंकांत सुमारे आठ अब्ज डॉलर ठेवले असून त्याचे आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यावसायिक अदन खशोगी याच्याशी संबंध आहेत. माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी, पंजाबचे माजी पोलिस प्रमुख के.पी.एस.गिल, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि इतरांनी या काळ्या पैसा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत त्यांनी परदेशात असलेला 70 लाख कोटी रुपये काळा पैसा देशात परत आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती."
आजच्याच वृत्तपत्रात अजून एका महत्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढत, पी.जे. थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य आयुक्तपदावरील नियुक्ती सरकारला रद्द करण्यास भाग पाडले आहे.
एकूणच या सर्व प्रकरणांचे आणि कोर्टाच्या न्यायनिवाडा पद्धतीबद्दल वाच्य करताना टाईम्सने "चळवळी न्यायव्यवस्था" अर्थात "जुडीशिअल अॅक्टीव्हिजम" असे म्हणले आहे. जे काही काळ अस्तित्वात होते. पण मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमुर्ती बालकृष्णन असताना तीन वर्षे गप्प झाले होते. हेच माजी न्या. बालकॄष्णन आता मानवी हक्क आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या जावयासकट अगदी जवळच्या नातेवाईकांवर कोट्यावधी रुपयांच्या करफसवेगिरी आणि इतर प्रकरणात आरोप आहेत. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला देखील चालू आहे.
पण, सधारण दहा महीन्यांपुर्वी न्या. एस एच कापाडीया हे प्रमुख न्यायाधिश झाले आणि परत 'योग्य' जनहितकारी अर्जांना प्राधान्य मिळू लागले. जर "अयोग्य" जनहीतकारी अर्ज असेल तर ते करणार्यांना दंड... "I come from a poor family. I started my career as a Class IV employee and the only asset I possess is integrity." हे न्या. कापडीयांचे शब्द वाचले आणि भारताला खरेच "अधुनिक रामशात्री" मिळाला अशी आशा वाटली.
तरी देखील हे वाचताना अस्वस्थता आली. न्यायालयाने खर्या अर्थाने "आंधळ्या न्यायदेवतेच्या" आदेशाने जरी प्रामाणिक निर्णय घेतले असले तरी, अशी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची हतबल अवस्था येणे, म्हणजे अखेरचा पर्याय वाटतो.
मात्र या संदर्भात डोक्यात प्रश्न आले:
- न्यायालयाने दिलेले निर्णय हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत असले तर अशा न्यायव्यवस्थेस "अॅक्टीव्हिझम" म्हणावे का?
- जर हे न्याय, घटनेच्या आणि कायद्याच्या सीमेच्या बाहेर दिलेले असले तर ते जरी खर्या अर्थाने खर्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असले तरी ते योग्य ठरतात का?
- जर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले काम करत नसतील, अशा लोकप्रतिनिधींचे सरकार जर एका पाठोपाठ एका भ्रष्टतेच्या प्रकरणात अडकत असेल आणि म्हणून जर चांगल्या आणि चळवळ्या प्रमुख न्यायाधीशाच्या जोरावर देश चालू लागला तर खरेच लोकशाही असे म्हणायचे का?
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 4:04 am | पिवळा डांबिस
पुण्यातील उद्योजक हसन अली यांच्या पन्नासहजारकोटी रुपयांच्या करचुकवेगिरी संदर्भात....
आयला, पन्नास हजार कोटी रुपयांची नुसती करचुकवी (म्हंजे उत्पन्न किती असेल!!!) करणारा उद्योजक पुण्यात आहे हे वाचून छाती फुलफुलके हमारे शर्टका बटण टूट गयेला हय!!!
:)
आता सिरियसली,
१. न्यायालयाने दिलेले निर्णय हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत असले तर अशा न्यायव्यवस्थेस "अॅक्टीव्हिझम" म्हणावे का?
माझ्या मते नाही, हा अॅक्टिव्हिझम नाही.
२. जर हे न्याय, घटनेच्या आणि कायद्याच्या सीमेच्या बाहेर दिलेले असले तर ते जरी खर्या अर्थाने खर्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असले तरी ते योग्य ठरतात का?
नाही. ती ज्युडिशियल ओव्हररीच ठरते.
३. जर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले काम करत नसतील, अशा लोकप्रतिनिधींचे सरकार जर एका पाठोपाठ एका भ्रष्टतेच्या प्रकरणात अडकत असेल आणि म्हणून जर चांगल्या आणि चळवळ्या प्रमुख न्यायाधीशाच्या जोरावर देश चालू लागला तर खरेच लोकशाही असे म्हणायचे का?
नाही. ती न्यायालयीन हुकूमशाही ठरेल. अशी व्यवस्था सध्याच्या लोकशाहीपेक्षा अधिक चांगली की वाईट ते अलाहिदा! पण ती लोकशाही नव्हे! देशाची व्यवस्था ९, ११, १३, १५, (जो काय आकडा असेल तो) अशा जनतेला उत्तरदायी नसलेल्या लोकांच्या हाती जाणे ही एक प्रकारची हुकुमशाहीच!!
4 Mar 2011 - 3:56 am | शिल्पा ब
हे एवढाले आकडे वाचूनच डोकं गरगरलं...कुठून आले एवढे पैसे? कोणाच्या आशीर्वादाने? काही पुरावे आहेत का या लोकांना पकडण्यासाठी? काय करतात एवढ्या पैशाचं देव जाणे!!
लोकांना खायला अन्न नाही...खेड्यात विज, पाणी अशा बेसिक गोष्टी नाहीत...आणि ते पुरवणारे रीसोर्सेस असे विदेशी बँकात सडताहेत....आनंद ए!!
4 Mar 2011 - 9:49 am | श्री गावसेना प्रमुख
पिवळा डांबिस यान्ना जर राष्ट्रपति केले तर ते बहुतेक केन्द्रीय मन्त्र्यान्ना न्यायाधीश म्हणुन नेमतील,
)(हे पुर्ण पणे माझ वैयक्तीक मत आहे)नाहीतर कोर्टात खेचायचे.
4 Mar 2011 - 10:59 am | विजुभाऊ
पिडां काकाला राष्ट्रपती म्हणून केले तर?.....
ते
१) सर्वाना शुद्ध लिहायला भाग पाडतील
२) अल्कोहोल या विषयावरच्या प्रबन्धाना अनुदाने देतील
4 Mar 2011 - 12:04 pm | नितिन थत्ते
>>न्यायालयाने दिलेले निर्णय हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत असले तर अशा न्यायव्यवस्थेस "अॅक्टीव्हिझम" म्हणावे का?
या प्रश्नातच एक मेख दडलेली आहे ती म्हणजे स्वतःचे निर्णय कायद्याच्या चौकटीत आहेत की नाही हे स्वतः न्यायालयच ठरवणार. :(
बाकी पिडांशी सहमत आहे.
न्यायालयाच्या गर्जना या "पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक" स्वरूपाच्या आहेत.
हसन अलीच्या केसची एक्झॅक्ट माहिती नाही पण सहसा जे गुन्हेगार उजळ माथ्याने जामीन घेऊन मोकळे फिरत आहेत ते त्यांना न्यायालयानेच जामीन दिल्यामुळे. न्यायालयाला जर हे अयोग्य आहे असे वाटत असेल तर जामीन का दिले जातात? या गोष्टी अशा थराला येण्यात न्यायालयांचाही ५०% सहभाग आहे.
(न्यायालयांच्या या वृत्तीमुळेच "एनकाउंटर" ही कल्पना उदयास आली असे म्हटले जाते).
न्यायालयांच्या निर्णयात "Playing to the gallery" किती हा ही विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
4 Mar 2011 - 12:22 pm | ५० फक्त
उगाच एक आगाउ शंका, हे नक्की काय आहे ?
पर्याय १. व्हॉट द हेल इज गोइंग ऑन...?
पर्याय २ व्हॉट ? द हेल इज गोइंग ऑन...
बाकी, या विषयातलं काही कळत नाही, पण हे विचारणा-या न्यायमुर्तींबद्दलचा आदर वाढला हे निश्चित.
4 Mar 2011 - 9:00 pm | अविनाशकुलकर्णी
मुद्दा इतके पैसे कसे वसुन करणार?
अनेक घोटाळे व लबाड्या झाल्या..लोक पकडले गेले...
पण बुडवलेलया व दडवलेल्या पैश्यांचे का?
का नुसति शिक्षा होणार अन लढाई जिंकली म्हणुन पाठ थोपटणार?
पैसे बुडाले..तो नादार जाहिर करुन घेई ..स्वत्।ला...
4 Mar 2011 - 9:00 pm | अविनाशकुलकर्णी
मुद्दा इतके पैसे कसे वसुन करणार?
अनेक घोटाळे व लबाड्या झाल्या..लोक पकडले गेले...
पण बुडवलेलया व दडवलेल्या पैश्यांचे का?
का नुसति शिक्षा होणार अन लढाई जिंकली म्हणुन पाठ थोपटणार?
पैसे बुडाले..तो नादार जाहिर करुन घेई ..स्वत्।ला...
7 Mar 2011 - 12:36 pm | श्रीरंग
1-2 वर्षांपूर्वी या हसन अलीला अटक देखील झाली होती पुण्यात. कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आणी 3 नकली पासपोर्ट बाळगल्याबद्दल. 1 दिवसात जामिनावर सुटले साहेब्. न्यायव्यवस्थेतच असल्या पळवाटा असताना या लोकांना शिक्षा मिळेल याची सुतराम शक्यता नाही.
8 Mar 2011 - 8:56 pm | विकास
फारच लाज निघालेली असल्याने, कदाचीत काहीतरी होईलही. आजच्या बातमीप्रमाणे हसन अली बेकायदेशीर शस्त्रांच्या व्यापारात पण गुंतलेला होता. असे एकटेच गुंतणे शक्य असते असे वाटत नाही.
दुसरीकडे थॉमस प्रकरणात पंतप्रधानांनी म्हणले आहे की, त्यांना त्यांच्या (थॉमसच्या) विरुद्ध खटला चालू आहे हे माहीत नव्हते/आधी सांगितले गेले नव्हते. याचा अप्रत्यक्ष संबंध हा आता मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांशी लागतो.
9 Mar 2011 - 7:49 pm | प्रदीप
विकास आणि इतर,
हे सर्व फारसे मनावर घेऊ नये. थॉमसच्या केसमधे पहा. कुठल्याही चांगल्या लोकशाहीत त्या व्यक्तिची नियुक्ति करणार्या व्यक्तिने स्वतःहून पद सोडले असते. (पहा: गेल्या एकदोन वर्षांपूर्वी ब्रिटनमधे झालेले भ्रष्टाचाराचे प्रकार. अनेक खासदारांनी व काही मंत्र्यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून सरकारकडून पैसे घेतले, हे उघडकीस आल्यावर त्यातील सर्वांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. त्यातील एकावर तर रीतसर खटला होऊन तो दोषी ठरला व तुरुंगातही गेला आहे. ह्यातील बहुतेल सर्व केसेसमधील रकमा खरे तर अत्यंत नगण्य होत्या, तरीही त्याची परिणीती तेथे अशी झाली).
पण आपली पडली जगातील सर्वश्रेष्ठ, धगधगती, खदखदती, (throbbing and lively) वगैरे -- लोकशाही. तेव्हा आता आपण समस्त झोपूया कसे. zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
8 Mar 2011 - 10:02 pm | नितिन थत्ते
क्वात्रोचीवरील खटला मागे घेण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.
8 Mar 2011 - 10:38 pm | विकास
क्वात्रोचीवरील खटला मागे घेण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.
सर्वप्रथम हार्दीक अभिनंदन! ;)
असो. आता (खरच) प्रश्नः
मला जे समजते त्याप्रमाणे खटला हा क्वात्रोचीला भारतात आणणे शक्य न झाल्याने आणि ते शक्य होईल असे वाटत नसल्याने आणि रु. २५० कोटी फक्त खर्च झाल्याने त्यात अजून भर पडू नये म्हणून, त्याच्यावरील खटला बंद करायला दिल्ली कोर्टाने (हाय कोर्ट अथवा सुप्रिम कोर्टाने नाही) मान्यता दिली.
पण मग तो मिळू शकत नाही म्हणत त्याच्यावरील खटला मागे घेण्याची काय गरज? याचा अर्थ आता त्याचे नाव इंटरपोल अथवा तत्सम आंतर्राष्ट्रीय कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणेतून मागे घेतले जाणार. उद्या तत्वतः तो जर भारतात आला, तर त्याला पकडले जाणार नाही/जाऊ शकणार नाही कारण खटला मागे घेण्यात आला आहे... असा त्याचा अर्थ होत नाही का?
त्याहूनही महत्वाचा प्रश्नः
१९९३ साली क्वात्रोचीने भारत सोडला, नंतर एनडीए सत्तेत आले आणि सिबीआयने खटला भरला ----- अडवानी गृहमंत्री झाले, त्यांना आणि इतर अनेकांना सिबिआयने रामजन्मभुमीप्रकरणात शुद्धीपत्र दिले ---- अडवानी सत्तेतून बाहेर गेले आणि चिदंबरम गृहमंत्री झाले, परत सिबीआयने खटल्याची परवानगी मागितली.----- आता उद्या परत अजून कोणी काँग्रेस विरोधक सत्तेत आले आणि परत सिबीआयने क्वात्रोचीवर खटला भरला तर आश्चर्य नको! ------ अशा अनेक केसेसमध्ये सिबीआयचा कसा वापर झाला हे पहाता येईल...
असे सिबीआयचे खेळणे होणे योग्य आहे का? का सिबीआय मधील अधिकार्यांना पण स्वतंत्र अधिकार देणे योग्य आहे? हा प्रश्न खरेच अवघड आहे आणि माझ्या प्रश्नात कुठल्याच बाजूने उत्तर उर्धृत केलेले नाही...
8 Mar 2011 - 11:02 pm | नितिन थत्ते
माझा प्रतिसाद क्वात्रोची सुटल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी नसून "व्हॉट द हेल इज गोईंग ऑन" या प्रश्नासाठी न्यायव्यवस्था कमीतकमी ५०% जवाबदार आहे हे दर्शवण्यासाठी होता.
The CBI has moved the Supreme Court challenging an Allahabad High Court order that dropped charges of criminal conspiracy against top BJP leaders L K Advani, Murli Manohar Joshi and others in the Babri Masjid demolition case.
अडवाणींना क्लीन चिट विशेष न्यायालयाने दिलेली दिसत आहे. आणि त्याविरुद्धची सीबीआयची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळलेली दिसत आहे.
8 Mar 2011 - 11:12 pm | विकास
माझा प्रतिसाद क्वात्रोची सुटल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी नसून "व्हॉट द हेल इज गोईंग ऑन" या प्रश्नासाठी न्यायव्यवस्था कमीतकमी ५०% जवाबदार आहे हे दर्शवण्यासाठी होता.
अर्थातच! मला समजलं ते! :-)
अडवाणींना क्लीन चिट विशेष न्यायालयाने दिलेली दिसत आहे. आणि त्याविरुद्धची सीबीआयची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळलेली दिसत आहे.
माझा मुद्दा हा अडवाणी, बोफोर्स, क्वात्रोची वगैरेसंदर्भातील नसून असे सिबीआयचे खेळणे करण्यावर कसे नियंत्रण करता येईल या संदर्भात होता. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी आणि पार्टीने या वापराचा अतिरेक केला होता. संजय गांधी तर RAW (Research and Analysis Wing) ला relatives of association of wives असे कुत्सितपणे म्हणत असत आणि वापर करत असत. नंतर गोष्टी फारशा बदलल्या नाहीत तर अधिकच गडद होत गेल्या... असो.
9 Mar 2011 - 1:24 pm | नितिन थत्ते
सीबीआय आणि रॉ या नेहमीच सरकारला जवाबदार असलेल्या संस्था होत्या.
पण घटनात्मक दृष्ट्या स्वतंत्र असलेल्या न्यायालयांनीसुद्धा त्या रॉटला हातभारच लावला आहे.
उलट न्यायालयीन दिरंगाई हीच या रॉटला मुख्यतः कारणीभूत आहे. गुन्हा करताना पकडले गेल्यावर वर्षानुवर्षे खटला चालणार आहे आणि जामीन मिळणार आहे अशी खात्री वाटणे यात मुख्य दोष न्यायव्यवस्थेचा की सीबी आय, पोलीस वगैरे सरकारी संस्थांचा?
9 Mar 2011 - 5:13 pm | विकास
उलट न्यायालयीन दिरंगाई हीच या रॉटला मुख्यतः कारणीभूत आहे.
"मुख्यतः" इतकेच आहे असे अथवा त्या उलट टोक म्हणणार नाही, पण न्यायालयीन दिरंगाई हे एक प्रमुख कारण आहे, इतके नक्कीच वास्तव आहे.
9 Mar 2011 - 6:33 pm | समंजस
"उलट न्यायालयीन दिरंगाई हीच या रॉटला मुख्यतः कारणीभूत आहे. गुन्हा करताना पकडले गेल्यावर वर्षानुवर्षे खटला चालणार आहे आणि जामीन मिळणार आहे अशी खात्री वाटणे यात मुख्य दोष न्यायव्यवस्थेचा की सीबी आय, पोलीस वगैरे सरकारी संस्थांचा?"
-----न्यायालयीन दिरंगाई कमी करायला किंवा ती वाजवी स्तरावर आणायला जबाबदार कोण?
न्यायाधिश, राजकीय सरकार की प्रशासन? कोणी ही जबाबदारी स्विकारायला हवी ? कोणाची या बाबतीत वैधानिक जबाबदारी आहे ? वाढत्या लोकसंख्येच्या/वाढत्या गुन्हांच्या प्रमाणात न्यायालये/न्यायाधिश/कर्मचारी वर्ग आहे का ? तेव्हढी न्यायालये चालवायला लागणारी साधन सामुग्री उपलब्ध आहे का ?
अस्तित्वात असलेल्या परंतू सध्याच्या काळात/परिस्थितीत निरूपयोगी असलेल्या कायद्यांमध्ये आवश्यक तो बदल वेळच्या वेळी करणे ही कोणाची जबाबदारी आहे ?
...वरिल प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. या प्रश्नांची उत्तरे माहित नसल्या शिवाय कोणा एकाला दोष देणे चुकीचं आणि अज्ञानतेचं ठरणार.
9 Mar 2011 - 6:52 pm | नितिन थत्ते
न्यायालयांची आणि न्यायाधीशांची संख्या हे एक कारण खटले रेंगाळण्याचे आहेच. परंतु जेथे त्याचा काही संबंध नसतो तेथे न्यायालये कठोर भूमिका घेत नाहीत. खटल्याची सुनावणीच न होणे ही गोष्ट न्यायालयाम्च्या संख्येवर अवलंबून आहे हे खरेच पण जेव्हा सुनावणी होते तेव्हा न्यायालये जामीन देऊन मोकळी होतात हेही दिसते.
मुद्दा हाच आहे ही "जिनके घर शीशेके होते हैं....." .
"व्हॉट द हेल....." हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार न्यायालयांना नाही.
9 Mar 2011 - 7:42 pm | प्रसन्न केसकर
सुनावणी होते तेव्हा न्यायालये जामीन देऊन मोकळी होतात हे सकृतदर्शनी दिसते. परंतु न्यायालयाचा निर्णय बव्हंशी तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांवर अवलंबुन असतो. भारतात तपासयंत्रणा आणि सरकारपक्षाचे वकील यांच्यात तपासाबाबत समन्वय नाही. आरोपीला अटक केल्यावर जे रिमांड हिअरिंग होते तेव्हा असिस्टंट पब्लीक प्रॉसिक्युटर (हे डायरेक्टोरेट ऑफ प्रॉसिक्युशनशी संलग्न असतात.) सरकारपक्षाचा वकील असतो. त्याचा प्रतिवाद संपुर्णता रिमांड रिपोर्टवर अवलंबुन असतो. प्रकरण जेव्हा सत्र न्यायालयात जाते तेव्हा तेथे वेगळा अॅडिशनल पब्लीक प्रॉसिक्युटर (हे डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्रॉसिक्युटर कार्यालयाशी संलग्न असतात.) सरकारपक्षाचा वकील असतो. त्याचा युक्तीवाद सर्वस्वी सरकारपक्षाच्या से वर अवलंबुन असतो. सत्र न्यायालयातही खटला चालवण्यासाठीदेखील अॅडिशनल पब्लीक प्रॉसिक्युटरच उभे रहातात व त्यांचा युक्तीवाद हा सर्वस्वी तपासयंत्रणेने न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरच अवलंबुन असतो. असिस्टंट पब्लीक प्रॉसिक्युटर किंवा अॅडिशनल पब्लीक प्रॉसिक्युटर यांचा सल्ला तपासकामी सहसा घेतला जात नाही. त्यासाठी बहुतेकदा पोलिस त्यांच्याकडील लीगल अॅडव्हायझर्स (हे असिस्टंट पब्लीक प्रॉसिक्युटर रँकचे असतात) चा सल्ला घेतात. अर्थातच बर्याचश्या प्रकरणात हा सल्ला घेतला जात नाही. कोणत्या कायद्याचे कोणते कलम लावायचे, कोणते पुरावे कश्यासाठी व कसे जमवायचे, कोणत्या आरोपीला कधी व का अटक करायची याचा निर्णय बहुतेकदा तपास अधिकारी घेतात. रिमांड रिपोर्टही बहुतेकदा तपास अधिकारीच तयार करतात. या तपास अधिकार्यांचे कायद्याचे ज्ञान अपुरे असेल (बहुतेकदा ते तसे असतेच कारण त्यांचा कायद्याचा अभ्यास ट्रेनिंग दरम्यानचा एक पेपर व त्यानंतर रिफ्रेशर्स कोर्सेस एव्हढ्यापुरता मर्यादित रहातो.) तर केस बिल्ट करताना तृटी रहाण्याची शक्यता असते आणि त्यांचा फायदा आरोपीना होतो.
जर केस स्ट्राँग बिल्ड केलेली असेल तर आरोपीना जामीन सहजपणे मिळत नाही. जरी मिळाला तरी अपीलात जामीन आदेश फेटाळले जातात. अशीदेखील अनेक उदाहरणे आहेत. अगदी काल परवाच्या तेलगी केसमधील बहुतेक सर्व आरोपींचे जामीन अनेक पातळ्यांवर फेटाळले गेले होते व परिणामी ते आरोपी (यात अनेक वरिष्ठ अधिकारी, राजकारणी होते) प्रदिर्घ काळ तुरुंगात राहिले होते.
याचा अर्थ मी न्याययंत्रणा होलिअर दॅन काऊ आहे असे प्रतिपादन करत आहे असा नाही. परंतु भारतातील न्याययंत्रणा बहुसंख्य देशांपेक्षा स्वच्छ, सक्रिय आणि पारदर्शक आहे हे निश्चित.
10 Mar 2011 - 1:00 am | विकास
परंतु न्यायालयाचा निर्णय बव्हंशी तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांवर अवलंबुन असतो.
याच संदर्भात, सर्वोच्च न्यायालयानंतर स्थानिक न्यायालयाने एफोर्समेंट डायरेक्टोरेट (मराठी?) वर ताशेरे ओढले आहेत. या बातमीतील काही महत्वाचा भाग तसाच चिकटवतो:
आता केस लांबत असेल तर नक्की कोण जबाबदार?
अशीदेखील अनेक उदाहरणे आहेत. अगदी काल परवाच्या तेलगी केसमधील बहुतेक सर्व आरोपींचे जामीन अनेक पातळ्यांवर फेटाळले गेले होते व परिणामी ते आरोपी (यात अनेक वरिष्ठ अधिकारी, राजकारणी होते) प्रदिर्घ काळ तुरुंगात राहिले होते. याचा अर्थ मी न्याययंत्रणा होलिअर दॅन काऊ आहे असे प्रतिपादन करत आहे असा नाही.
सहमत
परंतु भारतातील न्याययंत्रणा बहुसंख्य देशांपेक्षा स्वच्छ, सक्रिय आणि पारदर्शक आहे हे निश्चित.
असहमत नसलो तरी खात्री नाही. आपण नक्की कोणाशी तुलना करत आहात? आपल्या बरोबरीच्या अथवा आपल्याहून विकसीत राष्ट्रांशी का इतर कुणाशी?
12 Mar 2011 - 9:30 pm | प्रसन्न केसकर
न्यायदानातल्या विलंबाबाबत अनेक कारणे जबाबदार धरता येतात. त्यातील काही ठळक कारणे:
१) न्यायव्यवस्थेत अंतर्भुत असलेल्या गोष्टी - आरोपीला अटक केल्यापासुन किमान तीस व कमाल साठ (अपवादात्मक परिस्थितीत नव्वद) दिवस प्रकरण न्यायप्रविष्ठ होत नाही. हा कालावधी तपासासाठी राखीव असतो. अनेकदा हा कालावधीदेखील तपासासाठी पुरेसा ठरत नाही. तज्ञांनी तपासणी करुन अहवाल सादर करण्यात अनेकदा बराच वेळ खर्ची पडतो. त्यासाठीची यंत्रणा पुरेशी सक्षम नाही असे अनेकदा जाणवते.
२) तपास यंत्रणांना भेडसावणारे प्रश्न - भारतातील तपास यंत्रणांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अपुरे मनुष्यबळ व सुविधा. त्यात पोलिसांकडे गुन्ह्यांची नोंद व तपास वगळता अन्य अनेक कामे (बंदोबस्त, दारुबंदी, वाहतुक नियमन, वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेले कौंसिलिंग, गस्त, गुप्तवार्ता संकलन, खात्याअंतर्गत व्यवस्थापन व प्रशासन इ.) आहेत. बहुसंख्य तपास यंत्रणांचे काम यामुळे संथ होते. अश्या परिस्थितीत पोलिसांच्या अनुपलब्धतेमुळे अनेकदा न्यायालयाच्या कामावर परिणाम होतो.
३) न्यायव्यवस्थेकडे मोठ्या संख्येने वर्ग होणारे गुन्हे - भारतात सर्व दखलपात्र गुन्ह्यांमधे प्राथमिक अहवाल दाखल झाल्यावर २४ तासात तो गुन्हा न्याययंत्रणेकडे वर्ग होतो व त्याची निर्गती न्यायालयच करु शकते. (असे युएसए, युके आदी प्रगत देशांमधे देखील होत नाही. तेथे गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीचा आढावा घेऊन खटला चालवायचा निर्णय सरकारपक्षातर्फे सरकारी वकील घेऊ शकतात.) अर्थात हे लोकांना न्याय मिळवण्यासाठी उपकारकच आहे. तपास यंत्रणेने असहार केल्यास न्यायालयात धाव देखील घेता येते. त्यामुळे न्यायालयांकडे दाखल होणार्या प्रकरणांची संख्या वाढते. याखेरीज आरोपीला अटक केल्यावर २४ तासात न्यायायलात रिमांड हियरिंगसाठी हजर करावे लागते (तो न्यायाललीन कोठडीत असला तरी.) व त्यानंतर जामीन मिळेपर्यंत त्याच्या दोन रिमांड हियरिंगमधील अंतर जास्तीत जास्त १५ दिवस असु शकते. हे आरोपींच्या हक्कांची जपणुक करण्यासाठी महत्वाचे आहे. रिमांड व जामीन या सुनावणीपुर्व बाबी कनिष्ठ स्तरावरील न्यायाधीशांचा (जसे मॅजिस्ट्रेट, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश इ.) सरासरी दिवसातला निम्मा वेळ घेतात.
४) वकिल, साक्षीदार, जामीनावर सुटलेले आरोपी, तपास अधिकारी इ. ची अनुपलब्धता किंवा असहकार्य - अनेकदा वकील, साक्षीदार, जामीनावर सुटलेले आरोपी, तपास अधिकारी इ. विविध कारणांनी न्यायालयात हजर राहु शकत नसल्याने खटला लांबत जातो. अश्या आरोपीला पकडुन आणण्यासाठी न्यायालय वॉरंट काढु शकते परंतु ते बजावण्याची जबाबदारी आधीच अपुर्या मनुष्यबळाचा प्रश्न असलेल्या पोलिस खात्यावर असते व परिणामी त्यात बराच वेळ जातो. तपास अधिकारी देखील बदली, सेवानिवृत्ती, वृद्धत्व व तदानुषंगीक अडचणी व अपवादात्मक परिस्थितीत मृत्यु अश्या अनेक कारणांनी गैरहजर राहु शकतो. खटला बराच रेंगाळल्यास साक्षीदार व अगदी फिर्यादीचाही प्रकरणात रस राहत नाही व ते गैरहजर राहु शकतात.
५) मिसलेनियस पेटीशन्स, अॅप्लीकेशन्स इ.- बहुतेक सर्व खटल्यांमधे सुनावणी सुरु होण्याआधी व सुरु असताना अनेक मिसलेनियस पेटीशन्स, अॅप्लीकेशन्स इ. दाखल होतात. त्यामधील अनेक केवळ सुनावणी टाळणे, निकाल लांबवणे यासाठी केलेले फ्रिव्होलस असु शकतात. (कसाबच्या अर्जांबाबत आपण सर्वजण जाणतोच.) परंतु अश्या अर्जांचा निपटारा केल्याखेरीज सुनावणी होणे अशक्य असते.
9 Mar 2011 - 6:04 pm | मदनबाण
व्हॉट द हेल इज गोइंग ऑन = प्रामाणिक जनतेने कर भरावा,आणि हसन सारख्या लोकांनी मजा मारावी. अजुन काय !!!
9 Mar 2011 - 7:59 pm | समंजस
<<# न्यायालयाने दिलेले निर्णय हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत असले तर अशा न्यायव्यवस्थेस "अॅक्टीव्हिझम" म्हणावे का?
>> ह्याला अॅक्टीव्हिझम म्हणणे आवश्यक आहे का? मला नाहि वाटत. न्यायालयाचे निर्णय जो पर्यंत संविधाना प्रमाणे, संविधानात घालून दिलेल्या मार्गदर्शनाला/तत्वांना अनुसरून आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, ज्या मुळे कोणाचेही मुलभूत अधिकार धोक्यात येत नाहित तो पर्यंत अश्या निर्णयांचं स्वागत करायलाच हवं. आणि तसेही न्यायव्यवस्थेने अॅक्टीव न राहता पॅसिव राहणे अपेक्षीत आहे का? का? अशी काही अट भारतिय संविधानात घातलेली आहे का?
न्यायव्यवस्थेचं "अॅक्टीव्हिझम" झालंय हे म्हणणे म्हणजे एखाद्या सरळ घटनेला सनसनाटी मथळा देण्याचा हा वृत्तपत्रांचा एक व्यावसायिक प्रयत्न.
<<#जर हे न्याय, घटनेच्या आणि कायद्याच्या सीमेच्या बाहेर दिलेले असले तर ते जरी खर्या अर्थाने खर्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असले तरी ते योग्य ठरतात का?
>> हे निर्णय न्याय, घटनेच्या आणि कायद्याच्या सीमेच्या बाहेर दिले गेले आहेत असं आतापर्यंत तरी कोणाच कायदे पंडिताने, किंवा सर्वोच्च न्यायालयात वकीली करण्यात आयुष्य घालवलेल्या कोणाच वकीलाने म्हटलेले नाहि.
काहींच्या म्हणण्या प्रमाणे असे निर्णय हे ओवररीच आहेत. ओवररीच म्हणजे काय? कोणाच्या अधिकारावर घाला घालण्यात आला आहे? कोणाचे वैधानिक अधिकार बळकावून घेण्यात आले आहेत? जर असं असेल तर कोणी थांबवलंय त्या व्यक्तींना/संस्थेला कायदेशिररीत्या हरकत घ्यायला? जर अशी हरकत घेण्यात आली नसेल तर ह्याचा स्पष्ट अर्थ आहे की त्या संबंधितांना हे ठाउक आहे की त्यांची ही हरकत संविधानाला धरून नाही आणि त्यामुळेच ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही.
<<#जर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले काम करत नसतील, अशा लोकप्रतिनिधींचे सरकार जर एका पाठोपाठ एका भ्रष्टतेच्या प्रकरणात अडकत असेल आणि म्हणून जर चांगल्या आणि चळवळ्या प्रमुख न्यायाधीशाच्या जोरावर देश चालू लागला तर खरेच लोकशाही असे म्हणायचे का?
>> देश व्यवस्थीत चालवायला तसेच सर्वसामान्यांचे, बहुसंख्यकांचे, अल्पसंख्यकांचे जिवीताचे, मालमत्तेचे, मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही अनेक संस्थांवर आहे जसे की लोकनियुक्त राजकीय सरकार, प्रशासन, पोलिस दल, लश्करी दल, न्यायसंस्था ई. या पैकी एखादी किंवा अनेक किंवा सर्वच संस्थांनी आपली वैधानिक, नैतिक जबाबदारी झटकली किंवा हेतूपुरस्सर दुर्लक्षीत केली तर या देशाच्या सर्वसामान्य, बहुसंख्य, अल्पसंख्य जनतेनी जी आर्थिक दृष्टया किंवा सामाजिक दृष्टया किंवा शारिरीक दृष्टया किंवा शैक्षणिक दृष्टया कमकुवत आहे त्यांनी त्यांच्या अधिकारांचं रक्षण कसं करावं?? अशी परिस्थीती उदभवल्यास त्यास लोकशाहिच्या दृष्टीने चांगले म्हणावे का? चांगलं म्हणावं तर मग आताच्या ह्या लोकशाही भारतात आणि ब्रिटीश सरकार असलेल्या त्याकाळच्या भारतात काय फरक? त्या काळच्या भारतात, पोलीस दल, लष्कर दल, प्रशासन, वाइसराय, न्यायसंस्था ह्या सगळ्या संस्था ब्रिटीश साम्राज्या करता, राणीच्या साम्राज्याच्या भल्या करताच फक्त कार्य करत.
या देशातील सर्वसामान्य जनतेचं भलं करणं हा त्यांचा उद्देश नव्हताच. तीच परिस्थीती आताच्या भारतात निर्माण करायची आहे का? फक्त धनीकांकरताच, नैतिकता गमावून बसलेल्या आणि फक्त पैसाच हे सर्वस्व मानणार्या आणि त्या करता काहीही करण्याची तयारी ठेवणार्या काही कॉर्पोरेटस कंपन्यांच्या फायद्या करीता जर सध्याचं राजकीय सरकार(एकाही पक्षाला स्पष्ट बहूमत नसूनही), प्रशासन, पोलिस दल, लश्करी दल ह्या संस्था देशाच्या साधन संपत्तीचं जर अपहार करत असतील आणि अश्या वेळेस जर एखादी संस्था (न्यायसंस्था) ही या विरोधात उभी राहत असेल, आपली वैधानिक, नैतिक जबाबदारी पार पाडत असेल तर ती फक्त चांगलीच नाही तर एक दिलासा देणारी गोष्ट आहे, लोकशाहीत विश्वास टिकवून ठेवणारी गोष्ट आहे आणि तसेच या देशाचं संविधान लिहीणार्या, तयार करणार्या व्यक्तीचं दुरदृष्टीत्त्व सिद्ध करणारी गोष्ट आहे. त्या व्यक्तींना संस्थेत विश्वास होता परंतू संस्थेत असणार्या व्यक्तींबद्दल नव्हता. मनुष्याची लालसा आणि अधिकारांचा/सत्तेचा गैरवापर ते जाणुन होते. त्याच मुळे की काय परंतू त्यांनी कोणाही एका संस्थेला सर्वाधिकार बहाल केले नाहीत.
फक्त काही निर्णयांमुळे, हा देश न्यायाधिश चालवता असे म्हणणे म्हणजे त्या कर्तव्य दक्ष न्यायाधिशांचा तसेच या देशाचं संविधान लिहीणार्या व्यक्तींचा अपमान केल्या सारखंच होईल.
न्यायाधिशांनी जे काही निर्णय घेतलेत ते निर्णय लहरीपणातून नाही तर त्यांच्या समोर आलेल्या पुराव्यांवर, माहितीवर आधारीत होते. सरकारी तपास यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे तसेच राजकीय सरकारच्या दबावाखाली येऊन जो काही शिथिलपणा दाखवला होता त्या मुळे घेण्यात आलेत.
राजकीय सरकार, प्रशासन, पोलिस दल, लष्करी दल यांनी जर आपलं कर्तव्य चोख बजावलं असतं तर न्यायाधिशांवर असे निर्णय घेण्याची किंवा आपला राग व्यक्त करण्याची वेळ आली नसती.
न्यायसंस्था ही पुर्णपणे निर्दोष आहे असे नव्हे परंतू ज्या वेळेस इतर संस्थांनी आपली जबाबदारी हेतुपुरस्सर पार पाडली नाही त्या वेळेस त्यांच्या हातात हात घालून या देशाला लुटण्याची सामुदायिक कृती न करता त्यांनी इतर संस्थांना रोखलं, त्यांना थांबवलं (काही काळ का होइना) ही जास्त प्रशंसेची गोष्ट आहे.
10 Mar 2011 - 5:27 am | पिवळा डांबिस
काहींच्या म्हणण्या प्रमाणे असे निर्णय हे ओवररीच आहेत. ओवररीच म्हणजे काय?
ओव्हररीच असं मी विचारपूर्वक म्हटलं आहे...
विकासचा मूळ प्रश्न जरा बारकाईने वाचा...
जर हे न्याय, घटनेच्या आणि कायद्याच्या सीमेच्या बाहेर दिलेले असले तर ते जरी खर्या अर्थाने खर्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असले तरी ते योग्य ठरतात का?
यातला जर हा शब्द विलक्षण महत्वाचा आहे. न्यायालयांचं कर्तव्य हे घटनेच्या आणि संसदेने संमत केलेल्या आणि राष्ट्रपतीनी सही केलेल्या कायद्यांच्या कार्यकक्षेत रहाण्याचं आहे. मग विषय कोंणताही असो, कुणाशीही निगडीत असो...
वर प्रश्नात विचारल्याप्रमाणे जर न्यायालये न्याय, घटना आणि कायद्याच्या बाहेर कार्यरत असतील तर ती न्यायालयीन ओव्हररीचच ठरते. जसं देशाचं संरक्षण करण्याचं काम करता-करतांना जर मिलिटरी राजकीय सत्ता हातात घेईल तर ती मिलिटरी ओव्हररीच ठरते. स्वतःच्या विहीत कार्यकक्षेच्या बाहेर जाणे यालाच ओव्हररीच म्हणतात. मग तुम्ही कुणाचे अधिकार घेतलेत, त्याविषयी कुणी तक्रार करतंय का? वगैरे प्रश्न दुय्यम आहेत. कधी अधिकार घेतले गेलेला वर्ग लोकप्रतिनिधी असतील, कधी प्रसारमाधमे असतील तर कधी सामान्य जनता!
आणि जर (पुन्हा जर) एखादी संस्था ओव्हररीच करत असेल तर लोकशाहीचा बॅलन्स डळमळतो. म्हणूनच तिसर्या प्रश्नानुसार जर चांगले न्यायाधीश सत्ता राबवत असतील तर ते अगदी रामराज्य ठरेल, पण ती लोकशाही नव्हे!!! कारण आजचे न्यायाधीश अगदी चांगले आहेत हो पण उद्याच्यांचा काय भरवंसा?
10 Mar 2011 - 10:11 am | विकास
यातला जर हा शब्द विलक्षण महत्वाचा आहे.
बरोबर हाच मुद्दा होता.
म्हणूनच तिसर्या प्रश्नानुसार जर चांगले न्यायाधीश सत्ता राबवत असतील तर ते अगदी रामराज्य ठरेल, पण ती लोकशाही नव्हे!!! कारण आजचे न्यायाधीश अगदी चांगले आहेत हो पण उद्याच्यांचा काय भरवंसा?
सहमत. म्हणूनच आज ह्या न्यायमुर्तींच्या "सक्रीय" न्यायामुळे जरी भ्रष्ट राज्यशकट थोडे नियंत्रणात येत असले तरी ते उपाय म्हणून पटत नाही. जनतेने काहीच न करता, अशा महत्वाच्या बाबतीत न्यायालयांच्या सक्रीय निर्णयापेक्षा त्यावर अवलंबून राहणारी जनतेची निष्क्रीयता देखील लोकशाहीस हानीकारक होऊ शकते असे म्हणायचे आहे.
12 Mar 2011 - 3:52 am | समंजस
यातला जर हा शब्द विलक्षण महत्वाचा आहे.
बरोबर हाच मुद्दा होता.
>> हा क्रमांक दुसरा प्रश्न समजण्यात इथे एकतर माझा गोंधळ झालेला आहे किंवा विकास यांचा तरी.
या प्रश्नात जर हा शब्द वापरण्याची आवश्यकता काय? जर हा शब्द वापरला काय किंवा नाही वापरला काय, या प्रश्नाचं उत्तर एकच असायला हवं आणि ते म्हणजे " हे निर्णय(न्याय नाही) अयोग्य ठरतात, कारण हे निर्णय प्रश्नात दिल्या प्रमाणे घटनेच्या, कायद्याच्या बाहेर आहेत" [न्यायालये न्याय करतात किंवा देतात हे म्हणणे धाडसाचे ठरेल, वस्तुस्थीती बघितल्यास हेच लक्षात येईल की त्यांच्या समोर मांडलेल्या पुर्ण/अपुर्ण माहितीच्या आधारावर तसेच न्यायालयाने मान्य केलेल्या पुराव्यांच्या आधारावर निर्णय दिला जातो]. या व्यतिरीक्त ह्या मुद्या कडे सुद्धा दुर्लक्ष करता येणे शक्य नाही की विकास यांनी हे तीन प्रश्न अकस्मात, कसलाहि संदर्भ न देता किंवा कुठलीही पार्श्वभूमी न वापरता विचारली असते तर या प्रश्नांना उत्तरे तसाच दृष्टीकोण ठेउन देण्यात आली असती परंतु इथे विकास यांनी मागील काही दिवसात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यात चाललेल्या खटल्यांचा तसेच खटल्यांशी संबंधित घेतल्या जाणार्या हरकती, ताशेरे, शेरेबाजी आणि एकमेव निर्णय (फक्त पी.जे. थॉमस यांच्या खटल्याचा) त्यांना अनुसरून, त्यांचा संदर्भ घेउन, ती पार्श्वभूमी वापरून वरील प्रश्न विचारलेले आहेत हा माझा समज आहे आणि तसा विश्वास आहे(चूक की बरोबर ?) आणि त्याच समजूतीला/संदर्भांना धरून मी हे म्हणेण की, यात कुठला निर्णय किंवा न्यायालयाची कुठली हरकत ही घटना बाह्य वाटली? पी.जे. थॉमस यांच्या खटल्याच्या निर्णयात न्यायालयाने घटनेच्या बाहेर जाउन, कायद्याच्या बाहेर जाउन निर्णय दिला आहे किंवा ज्युडीशियल ओवररीच झाली आहे असे कुठल्या आधारावर म्हणता येईल? एक मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे की सर्वोच्च न्यायालयाचं कार्य आणि खालच्या न्यायालयाचं कार्य यात बराच फरक आहे. जे अधिकार भारतिय संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहेत ते अधिकार अर्थातच खालच्या न्यायालयांना दिले नाहित.
वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने (स्वत:च्या स्थापने पासून ते आता पर्यंत म्हणजेच ६० वर्षात) एका मुद्यावर जोर दिला आहे, आग्रही प्रतिपादन केलं आहे ते म्हणजे, ज्या प्रमाणे संसदेला कायदा/घटना तयार करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे त्या प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा/घटनांचा अर्थ लावण्याचा, त्यांची सांगड घालण्याचा सर्वोच्च अधिकार आहे.
पी.जे. थॉमस या खटल्यात एक गोष्ट सरळ स्पष्ट होती ती म्हणजे, सरकारने पी.जे. थॉमस यांच्या नियुक्तीबाबत हेतूपुरस्सर चुक केली होती. विरोधी पक्षाच्या प्रतिनीधीची हरकत धाब्यावर बसवून नियुक्ती करण्यार आली होती(जर १ विरूद्ध २ अश्या प्रकारे संमती मिळवून नियुक्ती करणे योग्य आहे तर मग विरोधी पक्षा च्या प्रतिनिधीचा समावेश निवड समितीत करण्याची गरजच काय?) अश्या आणि इतर चुका सरकारच्या लक्षात आणून देउन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यात काय घटना बाह्य आहे की त्या निर्णयाचा संदर्भ घेउन वरील प्रश्न विचारले जावेत?
राहीला प्रश्न तो ३ क्रमांक चा तर मला व्यक्तीशा: तो प्रश्न अवास्तव वाटतोय, अनाठायी वाटतोय.
हा देश स्वतंत्र झाल्या पासून आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्या पासून(१९५०) आतापर्यंत अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने, राजकीय सरकारला किंवा संसदेला आवडणार नाही असे निर्णय अधुन मधुन घेतलेले आहेत. काही वेळेस ते निर्णय परिस्थीनुसार आणि देशाच्या दृष्टीने योग्य होते तर काही वेळेस अयोग्य परंतू या मुळे या देशातील लोकशाही धोक्यात आली नाही किंवा एखादी अयोग्य व्यक्ती मुख्य न्यायाधीश झाल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाकडे असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून तो हुकूमशाह होऊ शकला नाही [माझ्या मर्यादित वाचनानुसार हे सांगता येईल की जे काही हुकुमशाह निर्माण झालेत ते न्यायसंस्थेतून नाही तर लश्कर, राजकीय नेते/राजकीय पक्ष/राजकीय सरकार यातूनच निर्माण झालेत जसे की हिटलर, मुसोलीनी, स्टॅलिन, अयुबखान, झिया उल हक, ईंदिरा गांधी(अल्प काळा करीता) बरीच नावे आहेत, परंतू एवढी पुरेशी ठरावीत उदाहरण म्हणून.
या देशाला किंवा लोकशाहीला धोका न्यायसंस्थे पासून, न्यायाधिशांपासून नाही तर लश्कर, राजकीय नेते/राजकीय पक्ष/राजकीय सरकार यांपासून आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाला काढायचं झाल्यास संसदेत २/३ बहूमतानी ठराव पास करणे आणि त्या ठरावर शेवटी राष्ट्रपतिंनी सहि करणे पुरेसं आहे. कुठलाही न्यायाधिश डोईजड नाही होउ शकत. हाँ जर न्यायाधिश राजकीय सरकारच्या मर्जितील असेल आणि त्या राजकीय सरकारचं संसदेत बहुमत असेल आणि तसेच त्या राजकीय सरकारच्या मर्जितील/पक्षातील व्यक्तीच राष्ट्रपति असेल तर परिस्थीती वेगळी असु शकते.
काहि तुरळक निर्णयांमुळे देशातील राज्यव्यवस्था चालवीणे शक्य नाही, देश चालवीणे शक्य नाही.
परंतू असे तुरळक निर्णय(न्यायसंस्थेचे) की जे राजकीय सरकारच्या भ्रष्ट/चुकीच्या धोरणांना, निर्णयांना वेसण घालू शकतील, काही प्रमाणात का होईना राजकीय सरकारच्या/प्रशासनाच्या बेबंदशाहीला विरोध करतील अश्या निर्णयांच मी व्यक्तीश: स्वागत करणार आणि भारतिय संविधानाने कोणाही एका संस्थेला सर्वाधिकार बहाल करण्याची घोडचूक न केल्या बद्दल धन्यवाद देणार.
[...जर चांगल्या आणि चळवळ्या प्रमुख न्यायाधीशाच्या जोरावर देश चालू लागला तर खरेच लोकशाही असे म्हणायचे का? ...ह्या प्रकाराला अर्थातच लोकशाही म्हणता येणार नाही. मग ह्या पुढील प्रकाराला लोकशाही म्हणता येईल का, की जिथे सरासरी ५५ टक्के मतदान केलं जात आहे म्हणजेच ४५ टक्के मतदार मतदान प्रक्रीयेत भाग घेत नाहीय म्हणजेच सर्वसाधारणपणे देशातील अर्धी जनता या प्रकारच्या राज्यव्यवस्थेत भाग घेत नाहीय किंवा त्यांनी ह्या प्रकारच्या राज्यव्यवस्थेला नाकारलयं तसेच उमेदवाराला मतदान करण्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी आहेत(जाती/धर्म/पैसा/भिती), तसेच निवडणूकी नंतर असा राजकीय पक्ष सरकार स्थापन करतोय की ज्याला झालेल्या एकून मतदानाच्या ५०% मतं सुद्धा मिळालेली नाहीत म्हणजेच प्रत्यक्षात त्या पक्षाला सरासरी फक्त २५% मतं मिळालेली आहेत असा तो पक्ष सरकार चालवणार. संपुर्ण देशाला प्रभावित करणारी, संपुर्ण देशातील सर्वसामान्य नागरीकांना प्रभावित करणारी, त्यांच्या चांगल्या-वाईटाला निमीत्त ठरणारी धोरणं आखणार ह्याला लोकशाही म्हणता येईल का? ज्या पक्षाला, नेत्याला देशातील सरासरी फक्त २५% जनतेची मतं मिळाली आहेत (१/४) अशा पक्षाने, नेत्याने १००% जनतेवर राज्य करणे, सत्ता चालवणे, देश चालवणे लोकशाहीला पोषक आहे का? ह्याला लोकशाही म्हणायचे का? ]
(हा प्रतिसाद भरपूर लांबल्या मुळे क्षमा असावी, परंतू वरील प्रश्नांना वरवरचं उत्तर देणे शक्य न झाल्या मुळे तसेच भारतिय न्यायसंस्थेविषयी/संविधानाविषयी शंका घेतल्याबद्दल न राहवून हा प्रतिसाद टाकावा लागला)
9 Mar 2011 - 8:23 pm | प्रकाश घाटपांडे
हाच तर कळीचा मुद्दा आहे.ज्युडिशियल अक्टिव्हिझमला ज्युडिशियल इंटफरन्स मानणारे राजकारणी लोक वरचढच ठरतात.
जनहितयाचिकांच्या माध्यमातुन न्यायव्यवस्थेला आपली सत्तेवरील पकड अथवा आपली सक्रियता म्हणा दाखवायची असतेच. त्यात गैर काही नाही. न्यायव्यवस्था व राजकारण यातील सक्रियता परस्परपूरक असेल तर देशाची प्रगतीचा वेग नक्कीच उंचावेल.
कायदेशीर म्हणजे नैतिक व बेकायदेशीर म्हणजे अनैतिक अशात अडकलेले न्यायचक्र तांत्रिक बाबींवरच 'निकाल' देणार त्यालाच आपण 'न्याय' समजत असू तर हे असच चालायच.
9 Mar 2011 - 8:42 pm | नितिन थत्ते
>>काहींच्या म्हणण्या प्रमाणे असे निर्णय हे ओवररीच आहेत. ओवररीच म्हणजे काय? कोणाच्या अधिकारावर घाला घालण्यात आला आहे? कोणाचे वैधानिक अधिकार बळकावून घेण्यात आले आहेत? जर असं असेल तर कोणी थांबवलंय त्या व्यक्तींना/संस्थेला कायदेशिररीत्या हरकत घ्यायला? जर अशी हरकत घेण्यात आली नसेल तर ह्याचा स्पष्ट अर्थ आहे की त्या संबंधितांना हे ठाउक आहे की त्यांची ही हरकत संविधानाला धरून नाही आणि त्यामुळेच ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही.
हीच तर गंमत आहे. हरकत घेतली तरी कायदेशीर काय हे ते न्यायालयच ठरवणार.
न्यायव्यवस्थेला कसलीच अकाउंटेबिलिटी नाही हा आपल्या लोकशाहीचा मोठाच दोष आहे.
नुकत्याच घडून गेलेल्या सडणारे धान्य फुकट वाटण्याच्या प्रकरणात न्यायालयाने "आदेश" दिला होता. तसा आदेश देणे कायद्यानुसार नाही असे नंतर न्यायालयाच्याच लक्षात आले, म्हणून त्याचा पाठपुरावा झाला नाही. परंतु त्यावेळी न्यायालयाने ठरवले असते की तो आदेश कायदेशीरच आहे तर त्यावर दाद मागण्याची कुठलीच सोय घटनेत नाही.
अवांतर : सरकारमध्ये सौम्य प्रकृतीची माणसे असतात तेव्हा न्यायालयांचा (आणि इतर संस्थांचा) अॅक्टिविझम वाढलेला दिसतो. नरसिंहराव पंतप्रधान असतानाच्या काळात तसा तो वाढलेला दिसला (न्यायालये, निवडणूक आयोग-शेषन).
10 Mar 2011 - 6:15 am | विजुभाऊ
एक शंका : अली हसन च्या संदर्भात आम्ही अली हसनला ओळखत नाही असे सांगायची वेळ भुजबळ आणि आर आर आबा यांच्यावर का आली?
आय पी एल घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संबन्ध नाही असे प्रफुल्ल पटेलानी सांगितले होते. त्याचे काय झाले हे सर्वाना ज्ञात आहे.
तेलगी प्रकरणात भुजबळान पायौतार व्हावे लागले.
तीच गोष्ट काहिशी लवासा प्रकरणाची.
या असल्या सर्व प्रकरणात संशयाचे बोट नेहमीच राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्याकडे का दाखवले जाते?