स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपल्या देशासमोर प्रामुख्याने गरिबी, अशिक्षित वर्ग असे दोन तीनच प्रश्न होते. स्वप्नं मात्र भरपूर होती. आता इतक्या वर्षांनंतर पाहिले तर काय दिसते? सगळ्या स्वप्नांचा चुराडा आणि भरपूर जटील प्रश्न! सरकारी संस्कृतीप्रमाणे कुठलेच प्रश्न मुळाशी जाऊन सोडवायचेच नसतात. आता जे मोठे प्रश्न आहेत त्याची जंत्री पहा.
१. काश्मीर प्रश्न
२. अतिरेकी
३. नक्षलवाद
४. बांगलादेशी घुसखोरी
५. स्थानिक पक्षांची दादागिरी
६. भ्रष्टाचार
७. नैतिक अवमूल्यन
८. रुपयाचे अवमूल्यन
९.प्रदूषण
१०. जातिवाद
११. आरक्षण
१२. अंधश्रध्दा
१३. भाववाढ
१४. लोकसंख्या
ही यादी अशीच वाढणे शक्य आहे. पण मला तरी बहुतांशी सर्व प्रश्नांचे मूळ हे अमाप लोकसंख्या हेच आहे असे वाटते,आणि सरकार या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे.
यातले कुठले प्रश्न नजिकच्या काळात निकाली निघतील असे आपल्याला वाटते?
प्रश्नमालिका
गाभा:
प्रतिक्रिया
10 Apr 2010 - 5:38 pm | मदनबाण
कुठलेही प्रश्न निकालात निघणार नाहीत्..झालच तर अजुन ढीगभर प्रश्न वाढतील याची खात्री बाळगावी...कारण प्रश्न सोडवले तर राजकारण्यांना आपल्यावर राज्य कसे करता येईल ?सामान्य माणुस जितका प्रश्नांमधे गुंतुन राहिल तितकेच ते राजकारण्यांच्या तब्येतीसाठी उत्तम आहे.सामान्य माणुस नव्या नव्या प्रश्नात कसा अडकला जाईल हेच त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहे कारण तसे झाले तरच ह्यांना त्यांच्या तुंबड्या भरता येतील ना !!!
१. काश्मीर प्रश्न ---हा प्रश्न सोडवायला कोण भविष्यात देखील तयार होणार नाही.
२. अतिरेकी--- संसदे पासुन ताज पर्यंत यांनी सगळीकडेच हल्ला बोल केला आहे.
३. नक्षलवाद:--- यांच्या कारवायांची मुळे झालेल्या हानीचा आकडा बोलका आहे.
४. बांगलादेशी घुसखोरी :--- यांच्याकडे रेशन कार्ड पासुन सर्व काही आहे.
५. स्थानिक पक्षांची दादागिरी :--- याच्या बद्दल न बोललेचं बरं
६. भ्रष्टाचार :--- ह्या ह्या ह्या...ट्रॅफिक हवालदार ते मंत्री-संत्री सर्व शामील.
७. नैतिक अवमूल्यन:--- बलात्कार हा कशाचे द्योतक आहे ?
८. रुपयाचे अवमूल्यन :--- काय बोलणार ?
९.प्रदूषण :--- धुर सोडणार्या वाहनांनी पीयुसी करायची नसते हो...
१०. जातिवाद:--- येकमेकांची टकुरी फोडु अवघे भांडुनी होवु दंग.
११. आरक्षण:--- राजकारण्यांचा सर्वात मोठा आधार.
१२. अंधश्रध्दा:--- अंगात वार आलं माझ्या येता का आशिर्वाद घ्यायला?
१३. भाववाढ:--- हे हेहे...आम्ही आयपीयलची मॅच बघुन पोट भरतो.
१४. लोकसंख्या:--- हम दो हमारे .... सोडुन द्या... चीन शाहणा आहे या बाबतीत.
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
10 Apr 2010 - 6:13 pm | देवदत्त
मला तरी बहुतांशी सर्व प्रश्नांचे मूळ हे अमाप लोकसंख्या हेच आहे असे वाटते,आणि सरकार या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे
जाऊ द्या हो... नाही तरी आपण सर्वजणसुद्धा हेच एक कारण समजून सगळीकडे दुर्लक्ष करीत आहोत.
10 Apr 2010 - 7:20 pm | अरुंधती
जे जे आपणासी ठावे ते ते लोकांसी सांगावे.....
आपल्या परीने आपण नैतिक अवमूल्यन न होऊ देता आयुष्य घालवावे....
जिथे जिथे अन्याय, भ्रष्टाचार दिसत आहे तिथे तिथे तो चव्हाट्यावर आणण्याचा यत्न करावा....
लोकांमध्ये अनाठायी असंतोष भडकेल, असमाधान -प्रक्षोभ पसरेल असे वर्तन/ वक्तव्य/ लेखन / कृती टाळावे / टाळावी...
चार चांगल्या सेवाभावी उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून घ्यावे जेणेकरून आपण व आपला मेंदू व्यस्त राहील.... एक प्रकारची अफूची गोळीच म्हणा ना!
बाकी लोकसंख्या नियंत्रण, लोकशिक्षण ह्याला पर्याय नाही. पण जोवर बुळबुळीत, भुसभुशीत लोक सत्तेवर आहेत आणि त्यांचा पाय ओढणारे तेवढेच लुच्चे आहेत तोवर लोकसंख्या नियंत्रण व लोकशिक्षण कितपत साध्य होईल हे मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे!!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
11 Apr 2010 - 12:25 am | इंटरनेटस्नेही
सहमत!
10 Apr 2010 - 8:23 pm | सुनील
८. रुपयाचे अवमूल्यन
रुपया गेले काही काळ सातत्याने वर चढत आहे. सध्या ४४ असलेला डॉलरचा भाव ह्या वर्षखेरीस ३९ पर्यंत उतरला तर आश्चर्य वाटायला नको!
बाकी चालू द्या.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Apr 2010 - 8:59 am | राजेश घासकडवी
स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतातली जनता भुकेकंगाल, अडाणी, रोगराईग्रस्त आणि अतोनात गरीब होती. शाळा नव्हत्या, इंग्रजांनी पूर्णपणे खच्ची केल्यामुळे उद्योगव्यवस्था नव्हती. धरणं नव्हती, वीज नव्हती, फोन नव्हते. दुष्काळ पडला की लाखो लोक टपाटपा मरायचे. .(४३ चा बंगालमधला दुष्काळ - एक कोटी मेले) रोगराईच्या साथींमध्ये किती लाख खंदे कर्ते पुरुष, तरुण मुलं, लहान जीव गेले याला गणती नव्हती. हजारो, लाखो कुटुंबं त्यामुळे उघड्यावर येत. स्वत:ची अब्रू विकायची, आपली मुलं विकायची वेळ त्यातल्या कितींवर आली असेल? हे नैतिक अवमूल्यन नाही तर काय?
आता फ्लूच्या साथीत काही शे गेले तर घबराट होण्याइतके मध्यमवर्गाळलो आपण. दुष्काळात भूकबळी हजारोंनीदेखील पडत नाहीत -कोटीची गोष्टच सोडा. बालमृत्यू कित्येक लाखांनी कमी झाले आहेत. लोकसंख्यावाढ मर्यादेत आली आहे. सरासरी शिक्षण वाढलेलं आहे. आरोग्यमान सुधारून सरासरी आयुर्मर्यादा वाढलेली आहे. एकंदरीत सुबत्ता वाढलेली आहे. यामागे सरकारने राबवलेल्या कार्यक्रमांचा काहीच हातभार नाही असं म्हणायला काही विदा आहे का? तसा नसल्यास हे प्रश्न असेच राहाणार या म्हणण्याला तरी अर्थ आहे का?
लेखात दिलेल्या यादीतले बहुतेक सगळे प्रश्न स्वातंत्र्यकाळात होते. आणि बरेचसे आजच्यापेक्षा कितीतरी पटींनी भयानक होते. केवळ भावनेच्या आधारे विधानं करून त्यावर चर्चा मांडण्यापेक्षा काहीतरी ठोस आकडेवारी आधी द्यावी.
आकडेवारी नसेल तर किमान आपल्यापैकी किती पुरुष आपल्या आजोबांचं आयुष्य पत्करतील? आणि किती स्त्रिया त्यांच्या आज्यांचं आयुष्य अधिक चांगलं होतं म्हणतील?
राजेश
11 Apr 2010 - 1:24 pm | हेरंब
आकडेवारी ही नेहमीच फसवी असते. संख्याशास्त्राचा आधार घेऊन कुठलाही प्रश्न लहान किंवा मोठा करुन दाखवता येतो.
ज्यांनी चांगला काळ बघितला आहे त्यांना तरी आजचा काळ निव्वळ भौतिक प्रगती झाली म्हणून जास्त चांगला वाटत नाही.
भारताची प्रगती झाली नाही असे मुळीच नाही. पण स्वातंत्र्यानंतर ती ज्या वेगाने व्हायला हवी होती तशी ती झाली नाही. पारतंत्र्य हे केंव्हाही नरकयातना देणारे होते. पण आपलीच सत्ता आल्यावर त्यात बदल होईल अशी भाबडी आशा होती.
11 Apr 2010 - 1:46 pm | Nile
यावर कृपया विस्तार करुन लिहावे. कदाचित चर्चेच सहभागी होण्यास मदत होइल.
धन्यवाद.
11 Apr 2010 - 2:32 pm | हेरंब
विस्ताराने लिहायला मिपावर माझ्यापेक्षा खूप ज्ञानी व्यक्ती आहेत. तरी प्रगती ज्या वेगाने व्हायला हवी होती तशी झाली नाही याबद्दल असे सांगता येईल की,
१. लोकसंख्येवर इच्छाशक्ती नसल्यामुळे अंकुश ठेवता आला नाही .
२. भ्रष्टाचारामुळे रुपयातले १६ पैसेच गरीबांसाठी खर्च होतात असे राजीव गांधीच म्हणाले होते.भ्रष्टाचार कमी असता तर उघडच आहे की जास्त प्रगती झाली असती.
३. शिक्षणपध्दती सुधारता आली असती ,कमीत् कमी त्याचा बट्याबोळ तरी झाला नसता.
४. ईशान्य भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे तो हातचा जायची वेळ आली नसती.
५. खेड्यांमधे रोजगार उपलब्ध न करुन दिल्यामुळे शहरी लोंढे वाढले.
६. लोकांना शिस्त लावण्याऐवजी मतांवर डोळा ठेवून सवलती वाटल्याने सगळीकडे बेशिस्तपणा वाढला आणि कायद्याची भीति कोणालाच राहिली नाही.
७. काश्मीरप्रश्नात तो भाग लवकरात लवकर भारताशी एकरुप कसा होईल या दृष्टीने पावले न उचलता तेथील प्रजेचे लांगुलचालन केल्यामुळे तो चिघळणारा प्रश्न बनला.
८. निधर्मी राज्य म्हटल्यावर सरकारने कुठल्याच धार्मिक सवलती देण्याचे कारण नव्हते. तसेच सरकारी पातळीवर कुठल्याही धर्माप्रमाणे पूजा, भूमिपूजन वगैरे करायला नको होते. धार्मिक सण फक्त चार भिंतींच्या आत, हे धोरण ठेवायला हवे होते. ते न केल्याने काय झाले ते आपण बघतोच आहोत.
९. परराष्ट्र धोरणाची हेळसांड केल्याने चारी दिशांना शत्रु करुन ठेवले.
या सगळ्या मुद्यांवर एकमत असेलच असे नाही पण या मुद्यांना खोडून काढणारी आंकडेवारी कोणाकडे असेल तर त्याने जरुर द्यावी.
11 Apr 2010 - 3:45 pm | राजेश घासकडवी
समर्थनार्थ आकडे द्या.
अंकुश ठेवता येणे, शिक्षणपद्धती सुधारता येणे, शहरी लोंढे वाढणे, बेशिस्तपणा वाढणे या सर्वांना काही मोजता येण्याजोगे निकष आहेत की ते केवळ आपल्या आतल्या आवाजाचे बोल आहेत?
तुम्ही काही ढोबळ निकष किंवा काहीतरी आकडे दिले तर ते खोडून टाकण्याचा प्रश्न येतो. अथवा हे अंधश्रद्धा निर्मूलनासारखंच बुवाबाजी थोतांड असल्याचं सिद्ध करण्याची वैज्ञानिकांवर जबाबदारी टाकण्यासारखं होतं.
राजेश
11 Apr 2010 - 4:03 pm | Nile
एकीकडे तुम्ही म्हणता:
दुसरीकडे तुम्ही म्हणता:
मला वाटतं, तुम्हाला प्रगती अजिबात होत/झाली नाहीए असे वाटत असल्याने आकडेवारी तुम्हीच द्यावी. तुम्ही आकडेवारीने प्रश्न लहान,मोठा केला आहे की वास्तवच ठेवला आहे यावर चर्चा करुयात.
12 Apr 2010 - 6:57 am | हेरंब
माझ्याकडे आकडेवारी नाही. पण प्रत्येक मुद्दा सिध्द करायचा माझा अट्टाहासही नाही. हे म्हणजे सहज कुणाला 'आज खूप उकडताय' असे म्हटले आणि ,
'उगाच मोघम बोलू नका, आजचे आणि कालचे तापमान, हवेतील आर्द्रता, तसेच गेल्या सबंध आठवड्यातली आकडेवारी, तसेच गेल्यावर्षी याच दिवशी काय आकडे होते ते सांगा नाहीतर तुमचे विधान मागे घ्या'
असा प्रतिसाद मिळाला तर जसे वाटेल तसे वाटले.
12 Apr 2010 - 8:40 am | राजेश घासकडवी
पूर्व अमेरिकेत या वर्षी थंडीची प्रचंड लाट आली. त्यावरून जर तिथे राहाणाऱ्यांनी सरसकट 'ग्लोबल वॉर्मिंग हे थोतांड आहे - केवढी थंडी आहे बघा ना' असं म्हटलं तर कसं वाटेल, तसं तुमचं लेखन वाचून वाटतं. स्वत:शीच काय वाटेल ते म्हणायला काहीच हरकत नसते. जेव्हा मिपावरच्या काथ्याकूटात ती सरसकट विधानं होतात तेव्हा त्यांना काही आधार असावा असं वाटतं.
राजेश
11 Apr 2010 - 5:30 pm | चिरोटा
खर आहे.मला अफाट लोकसंख्या/घसरलेली मुल्ये ही मुख्य कारणे वाटतात. जगातले १/३ गरीब लोक भारतात रहातात.सरकारी धोरणांमुळे काही प्रमाणात दारिद्र्य कमी झाले आहे हे ही खरे आहे.
१९४७ मध्ये साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण आता बरेच वाढले असले तरी पुन्हा अफाट् लोकसंख्येमुळे सर्वात जास्त निरक्षरता भारतात आहे.बाकी आपण ईतर प्रश्न मांडले आहेत त्याची कारणे घसरलेली मुल्ये,सरकारी दूरदृष्टीचा अभाव,एकूणच भारतिय लोकांमध्ये असलेली बेशिस्त ही वाटतात.
भेंडी
P = NP