आम्हा घरी धन..

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
26 May 2013 - 12:53 pm

राम्राम मंडळी.

खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली.

चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.

लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.

मी सुरूवात करतो..

********************************************************

गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन...

ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील.

त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात.

तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो.

किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्‍यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही.

हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं.

महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो...

********************************************************

संस्कृतीवाङ्मयभाषाप्रकटनप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

धन्यवाद मोदकराव! सविस्तर भर घालेनच.

गोनिदांसारखं लिहिता यायला पाहिजे होतं...

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2013 - 5:08 pm | प्रसाद गोडबोले

गोनिदांसारखं लिहिता यायला पाहिजे होतं.
>>> मनातलं बोललात !!

आधी या उतार्‍या बद्दल लोटांगण स्विकारा मोदकराव. अहो चारी बाजुने धुई अंगावर आली वाचता वाचता.
मला आवडलेली कविता आहे वसंत बापटांची "केवळ माझा सह्यकडा"

भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा ।गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा॥
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिवरथडी ।प्यार मला हे कभिन्न कातळ प्यार मला छाती निधडी ॥
मधु गुंजन लखलाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला ।ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला ॥
धिक तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबीन मी माती
इथल्या मातीचे कण लोहाचे तृण पात्यांना खड्ग कळा ।कृष्णेच्या पाण्यातुनी अजुनी वाहतसे लाव्हा सगळा ॥
कबिर माझा तुलसी माझा ज्ञानेश्वर परी माझाच ।जयदेवाचा जय बोला परी माझा 'नाम्याचा' नाच ॥
जनी जनार्दन बघणारा तो 'एका' हृदये एकवटे ।जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खुण पटे ॥
इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली ।ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली ॥
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करु देत भले । माझ्यासाठी भिमाकाठी भावभक्तीची पेठ खुले ॥
रामायण तर तुमचे आमुचे भारत भारत वर्षाचे । छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचे ॥
रजपूतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुचते । हृदयाच्या हृदयात परंतु बाजी बाजीची सुचते ॥
अभिमन्युचा अवतारच तो होता माझा जनकोजी । दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजुन हृदयामाजी ॥
बच जाये तो और लढे
पाऊल राहिल सदा पुढे
तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजुक नखरा । माझ्या साठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा ॥
तुमचे माझे ख्याल तराणे दोघेही ऐकु गझला । होनाजीची सोन लावणी वेड लावीते परी मजला ॥
मृदंग मोठा सुमधुर बोले मंजुळ वीणा अन मुरली । थाप डफाची कडकडता परी बाही माझी फुरफुरली ॥
कडाड्णारा बोल खडा जो दरीदरीमधुनी घुमला । उघडुनी माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला ॥
तटा तटा तुटती बंद
भिवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जाते । उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासाशी दृढ नाते ॥
कळे मला काळाचे पाऊल दृत वेगाने पुढती पडे । कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणो क्षणी अधिकची उघडे ॥
दहा दिशांचे तट कोसळले ध्रुव दोन्ही आले जवळी । मी ही माझे बाहु पसरुनी अवघ्या विश्वाते कवळी ॥
विशाल दारे माझ्या घरची खुशाल ही राहोत खुली ।मज गरीबाची कांबळ वाकळ सकळांसाठी अंथरली॥
मात्र भाबड्या हृदयात
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करु झंझावात । कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारु निमिषात ॥

अशी ही कविता वाचत असताना अंगावर काटा उमलतो माझ्या तरी.

मराठीप्रेमी's picture

28 May 2013 - 7:47 am | मराठीप्रेमी

हि कविता माझीपण आवडती आहे. याचे उत्तम सादरीकरण येथे आहे.
http://www.youtube.com/watch?v=EMXefJY5jME&feature=player_detailpage#t=52s

पैसा's picture

26 May 2013 - 3:17 pm | पैसा

वरचे दोन्ही उतारे आणि कविता आवडीचे आहेतच. आणखी आवडते उतारे आणि कविता खूप आहेत. कोणते देऊ आणि कोणते नको असं वाटलं तरी लगेच आठवणारे काही म्हणजे कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत, गोनीदां, बाबासाहेब पुरंदरे, वसंत बापट आणि कितीतरी. पण सगळ्यात पहिल्यांदा इथे देते ते शब्दप्रभू बाकीबाब बोरकरांची अजरामर कविता. ज्यात त्यांनी सामान्यातल्या असामान्यत्वाला विनम्र वंदन केलं आहे.

----------------

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती ॥४॥

----------

बा.भ.बोरकर

----------

_/\_

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2013 - 3:32 pm | परिकथेतील राजकुमार

चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.

नको नको !

तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.

मालोजीराव's picture

27 May 2013 - 10:59 am | मालोजीराव

तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.

तो मजकूर टाकल्यास या धाग्याचा तात्काळ समारोप होईल काय :P

उत्तम धागा. गोनीदांच्या उतार्‍याची निवडही फार सुरेख!

आवडते उतारे कुठले द्यावेत हा बिकट प्रश्न आहे. तूर्तास प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया आणि त्यांची फोफावलेली तत्सम/तद्भव तिरपी वाटचाल पाहून यावर 'उतारा' म्हणून ज्ञानेश्वरीतल्या नवव्या अध्यायातल्या ह्या दोन आवडत्या ओव्या:

अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥

यशोधरा's picture

26 May 2013 - 7:21 pm | यशोधरा

निवड करुन लिहिणं खरंच कठीण आहे. हाताशी आहेत त्या २-३ कविता आत्ता लिहिते.

किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.

काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!

- बा. सी. मर्ढेकर

रात्र थांबवुनी
असेच उठावे
तुझ्यापाशी यावे
क्षणासाठी

डोळियांच्या व्हाव्या
वेड्या गाठीभेटी
आणि दिठी दिठी
शब्द यावे

तूही थेंब थेंब
शब्दापाठी द्यावा
अर्थ ओला व्हावा
माझ्यासाठी

आणि उजाडता
पाठीवर ओझे
वाटेपाशी तुझे
डोळे यावे

- ग्रेस

पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
होता पायांतही वारा
कालपरवा पावेतो.
आज टपोरले पोट
जैशी मोगरीची कळी;
पडे कुशीतून पायीं
छोट्या जीवाची साखळी.
पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायाचे घेईतों!

-बा. सी. मर्ढेकर

चौकटराजा's picture

26 May 2013 - 7:42 pm | चौकटराजा

मोदकभौ. मस्त उतारा .आप्पा लेखनिकाला बाहेरच्या खोलीत बसवीत व तिथल्या तिथे य्रेरझारी घालत मजकूर सांगत असे मी याची देही याची डोळा पाहिलेले दृश्य आठवले.तसे स्वता: लिहिताना उतरत्या मेजावर कागद टाकून हिरव्या शाईच्या पेनाने लिहित.हे ही आठवले.
माझ्या आवडीची एक कविता देत आहे. म्हातारपाणामुळे एक दोन शब्द इकडे तिकडे झाले तर माफी असावी. कविता नक्की कुणाची हे आठवत नाही.

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी

हळू थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूंच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज

शिंपावी डोई ही फुळे बकुळीची सारी
गाळुनी जांभभुळे पिकली भुळभुळ तीरी

लावुबी अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार

दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी

स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2013 - 11:33 pm | प्रभाकर पेठकर

झुळुक

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

- दामोदर कारे

चौकटराजा's picture

27 May 2013 - 6:39 am | चौकटराजा

पुख विदस लाले म्यातुळे केय नोद ळोई कियडे कितडे लेग्या ! णूर्प वकिता लिद्या दब्बल भाआरी !

बॅटमॅन's picture

27 May 2013 - 11:57 am | बॅटमॅन

म्हाईपण बुहत भाआरी!!

प्रभाकर पेठकर's picture

27 May 2013 - 3:33 pm | प्रभाकर पेठकर

तोह सअं धकी धकी. रतीणप म्हुताला पुखच ठाअणव हेआ. लमा रत केअही वकिता ठाअवत हानी. सओ. लाचायचच यव लाझं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 May 2013 - 11:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे

प्रतिदिनी आपल्या शारीरिक, सामाजिक गरजा आपणच निर्माण करायच्या आणि त्या पूर्ण करण्याकरिता अधिकाधिक पैसे देणारी नोकरी अथवा काम पत्करायचे आणि ते करता करता एक दिवस संपून जायचे हा आणि एवढाच आजच्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनाचा हेतू झाला आहे.
केवळ स्वत:च्या गरजा पूर्ण करणे हे जर सुख असेल तर ते तरी त्याला लाभते काय, ह्या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही.
आमच्यावेळी तरुणांभोवती निर्भीड, निर्भय आणि निग्रही अशी माणसे पहाडासारखी आकाशाला मस्तक भिडवून ताठ मानेने उभी होती. ह्या पहाडातुन तेव्हा एकच ध्वनी उमटायचा - "स्वातंत्र्य,स्वराज्य, सुराज्य." आम्हा तरुणांपैकी अनेक जणांच्या जीवनाचा तोच उद्देश होता, आणि प्रसंगी मरणाचाही !
स्वातंत्र्य मिळाले, स्वराज्य झाले. आता त्या मंत्राच्या जागी दुसरा कोणता शब्द जीवनाचा हेतू म्हणुन आला आहे? चांगली नोकरी, सुस्वरूप पत्नी, ब्लोक, पैसा, सत्ता ?
शांतपणे बसून कधितरी स्वत:ला विचार, "मी कशाकरता जगतो आहे? ह्या जीवनापासून माझी काय अपेक्षा आहे? असं काय आहे जे मला काहीही झालं तरी मिळवायचंच आहे? आणि त्यापलिकडे असं काय आहे की ज्याकरता मी नोकरी, ही प्रतिष्ठा, फार काय हे जीवनदेखील झुगारून देईन?"
हे एकदा मनाशी ठरवलेस तर द्विधा मन:स्थिती संपेल, मनात निर्माण होणारा संघर्ष थांबेल.
स्वत:शीच प्रामाणीक राहण्याला आणि आपल्या सद्सदविवेकबुद्धीला पटलेल्या रस्त्याने जाण्याला विलक्षण धैर्य लागते. ते तुला लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना.

"रारंग ढांग" मधून

प्यारे१'s picture

27 May 2013 - 12:28 am | प्यारे१

सगळेच आवडले.
गोनिदांच्या शब्दसामर्थ्याला सलाम. भिजलो.

प्यारे१'s picture

29 May 2013 - 8:44 pm | प्यारे१

ह्या धाग्याबद्दल मोदकाला पायजे तिथं पार्टी. :)
काय वाचू नि काय नको असं झालंय. ;)
एखाद्या बाईला सोन्याच्या दुकानात नेऊन पाहिजे ते दागिने फुकट न्या असं म्हटल्यासारखं झालंय.
लौ यु रे!

पहिले वाक्य वाचून झालेला आनंद शेवटचे वाक्य वाचून मावळला आणि मनाच्या तळागाळातून एकच प्रतिक्रिया उमटली...
"प्यार्‍या.. जा घर्ला!" :D

प्यारे१'s picture

29 May 2013 - 11:43 pm | प्यारे१

अरे ????????
आमच्या 'लौ'ला काय किम्मत हाय का न्हाय? का गविंसारका एक लेख टाकू?
मला त्या मोदकाला प्यार्टी द्यावीशी वाटली पण देता नाही आली वगैरे :D

गविशेट हलकं घ्या. ;) (मोदक घेईलच.)
बाकी हा प्रतिसाद उडवला तर आवडेल. धागा मस्त आहे. आमची ठिगळं नकोत.

यशोधरा's picture

27 May 2013 - 1:54 am | यशोधरा

आत गोठलेले आसू,
वर विटलेले हसू,
ओठी आलेले, मावळे...
"थोडे नदीकाठी बसू"

घ्यावा कशाला मागोवा,
जीव अहंतेचा गोवा,
चार पावली यायचा,
वीस कोसांचा पस्तावा...

नदी रोडावली आहे,
खडे मात्र बोचायाचे,
रान राहिलेले नाही,
आता पान पाखरांचे...

वृथा सारवासारव,
फोल शब्दांची रांगोळी,
आता पाचोळ्यात जमा,
लय चुकलेल्या ओळी...

-बा.भ.बोरकर

यशोधरा's picture

27 May 2013 - 1:56 am | यशोधरा

आत गोठलेले आसू,
वर विटलेले हसू,
ओठी आलेले, मावळे...
"थोडे नदीकाठी बसू"

घ्यावा कशाला मागोवा,
जीव अहंतेचा गोवा,
चार पावली यायचा,
वीस कोसांचा पस्तावा...

नदी रोडावली आहे,
खडे मात्र बोचायाचे,
रान राहिलेले नाही,
आता पान पाखरांचे...

वृथा सारवासारव,
फोल शब्दांची रांगोळी,
आता पाचोळ्यात जमा,
लय चुकलेल्या ओळी...

-बा.भ.बोरकर

आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्‍याचे दार उघडावे

संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा स्वप्नभास
जीवी कासावीस झाल्याविना

तेह्वा सखे आण तुळशीचे पान
तुज्या घरी वाण नाही त्याची
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल
भुलीतली भूल शेवटली

-बा. भ. बोरकर

यशोधरा's picture

27 May 2013 - 1:56 am | यशोधरा

देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे
जे कोंडीती सार्‍या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या
सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे
ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा
स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये
सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां
निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने
जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे
शुभ्र पार्‍यासारखे ॥
देखणा देहान्त तो
जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो
रात्रगर्भी वारसा ॥

-बा. भ. बोरकर.

चौकटराजा's picture

27 May 2013 - 6:44 am | चौकटराजा

देखणे ते काव्य
ज्याने श्रवण होते सार्थकी
देखणे ते 'बाकी'
ज्यांची शब्दा वरी हो मालकी

आदूबाळ's picture

27 May 2013 - 10:46 am | आदूबाळ

यशोधरातै - धन्यवाद!

चौराकाका - चार चांद लावलेत!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 May 2013 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे

नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

कवी - बा. भ. बोरकर.

बोरकरांच्या तशा सगळ्याच कविता इथे टाकायला हव्या.

मैत्र's picture

29 May 2013 - 9:25 pm | मैत्र

मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो

जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो
चराचरांचे हो‍उनि जीवन स्‍नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो

सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनांवर घन हो‍उनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो

दूरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित हो‍ऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन्‌ परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो

आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रम्ह सनातन घरीच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळले हो

-- बा. भ. बोरकर

देखणे जे चेहरे, संधिप्रकाशात, गडद निळे असे मोती पाहून अतिशय तीव्रतेने आठवल्या त्या ओळी..
कालातीत होऊन जातात ही कवी, गायक, लेखक मंडळी.. ७०-८० वर्षांनंतरही इतक्या अप्रतिम वाटतात या कविता ..

सुधीर's picture

31 May 2013 - 10:22 pm | सुधीर

+१ टू बोरकरांच्या सगळ्याच कविता इथे टाकाव्या लागतील

देखणे ते चेहरे, हीच इथे पोस्ट करावीशी वाटत होती. आधीच हे काम केल्याबद्दल धन्यवाद.

बोरकरांची कविता एकूणच उत्तम.

यशोधरा's picture

27 May 2013 - 1:56 am | यशोधरा

काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?
द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना
जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन?
तिचा वाढता बहर वेचण्यासाठी
उतावीळ तुमच्या अभिलाषा,
ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण?
स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी
तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी,
तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून?
अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर
तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं
संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन?
रोजच्या रोज घरात बळी जाणारं
सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत
तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून?
उमलण्याच्या आणि दरवळ्ण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून
जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून
ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन?
कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी,
हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर?
आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे
तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर...

-अरुणा ढेरे

समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा म्हैना

वाकले माडांचे माथे , चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली कार्तिक नौमीची रैना

कटीस अंजिरी नेसू , गालात मिस्कील हसू
मयूरपंखी मधुरडंखी उडाली गोरटी मैना

लावण्य जातसे उतू वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना

- बा भ बोरकर.

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

स्पंदना's picture

27 May 2013 - 4:03 am | स्पंदना

देवा परमेश्वरा!
काय हे शब्द सामर्थ्य!

चिगो's picture

27 May 2013 - 2:37 pm | चिगो

मन दिपवणार्‍या कविता आहेत 'अरुणा'जींच्या.. जबरदस्त ताकदीच्या कविता..

पिशी अबोली's picture

27 May 2013 - 11:47 am | पिशी अबोली

अप्रतिम.. भारावणारं...

गोनिदांचं अजून एक नितांतसुंदर शब्दलेणं.

कादंबरी- जैत रे जैत

हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत.
मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो.
मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे.
मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गगनी धाडून देतो.
पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

चौकटराजा's picture

27 May 2013 - 2:36 pm | चौकटराजा

हे वर्णन वाचून आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ चिम्ब होऊन रोमरोमातून फुलताहेत असे वाटतेय ! आप्पा आपल्या निसर्ग वेडाला दंडवत !!
@ म्हादेवा, आरं बाबा तुला मोकळ्या कोरड्या डोंगरांची काळजी हाय ना मग मिपावर अनेक डोगरमाथे भिजायची वाट पाहाताहेत रे.....सरी वर सरी दे ना पाठवून आता....काय म्हंतो .?. ब्रह्मदेवाला कळीवतो म्हून ?

छान आहे धागा. आमच्यासारख्या सामान्य वाचकांना यातून सुरेख शब्दमौक्तिके सापडतील यात शंकाच नाही.

आदूबाळ's picture

27 May 2013 - 10:56 am | आदूबाळ

"सखी मंद झाल्या तारका" - भीमसेन जोशींच्या आवाजात

या धाग्यात हे बसतं का माहीत नाही. फारच फटकून असल्यास उडवलं तरी हरकत नाही.

पैसा's picture

27 May 2013 - 11:05 am | पैसा

पण माझी आवडती गाणी असा वेगळा धागा काढलात तर जास्त छान होईल ना?

तू काढ असा धागा,मी टाकीन हवी तेव्हढी भर ! ;)(मला आवडणारी आणि मी पाहतो ती गाणी टाकेन चालेल काय ?)

इनिगोय's picture

27 May 2013 - 8:13 pm | इनिगोय

आहे की. हा घ्या..

अद्द्या's picture

27 May 2013 - 12:20 pm | अद्द्या

सुंदर :)

मोदक's picture

27 May 2013 - 2:01 pm | मोदक

सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशिल का, येशिल का

मधुरात मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का

ह्रूदयात आहे प्रीत अन् ओठात आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सुर तू होशिल का

जे जे हवेसे जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पुर्तता होशिल का

बोलावल्यावाचुनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का

(शेवटचे कडवे अफाट आहे!!!)

यस! शेवटच कडव म्हणताना अजुनही आवाज दाटतो.
अप्रतिम शब्द रचना.

५० फक्त's picture

28 May 2013 - 11:16 am | ५० फक्त

अगदी असंच होतं,

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, या गाण्यातली - का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना' ही ओळ म्ह्णताना, यातल्या श्वासवर श्वास कोंडला नाही तर विचारा.

मैत्र's picture

27 May 2013 - 11:08 am | मैत्र

गोनीदांची पावसाची शब्दलेणी पाहून राहून राहून बुधाची, त्याच्या मणरंजेणाची, नांदुरकीच्या झाडातल्या दुबेळक्याची आठवण येते आहे. पुस्तक हाती नाही.. त्यातला नांदुरकीमध्ये बसल्यावर जो दूर दिसणारा पाऊस जवळ येऊन भिजवून जातो त्याचे वर्णन कोणी जमल्यास जरूर टाका इथे..

सौंदाळा's picture

27 May 2013 - 11:53 am | सौंदाळा

आणि 'शितु' मधले देखिल काही असेल तर जमल्यास जरूर टाका इथे..
त्यातले काही वर्णन पण खुपच छान आहे.

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे

-मंगेश पाडगावकर

स्पा's picture

27 May 2013 - 12:01 pm | स्पा

मस्त धागा :)

बिपिन कार्यकर्ते's picture

27 May 2013 - 12:08 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

गोनीदांचे सगळेच लेखन छान आहे.
अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला रात्रीच्या जेवणानंतर मागच्या अंगणात बसुन आजोबांकडुन ज्या गोष्टी सांगितल्या जातात तोच हळुवारपणा आणि तीच मंत्रमुग्धता गोनीदांच्या लेखनात आहे.

त्यांच्या महाराष्ट्रदर्शन ह्या पुस्तकातली सुरवात मला फार रोमांचक वाटली, आता नक्की शब्द आठवत नाहीत पण काहीशी अशीच आहे.
-------------------------------------
हा महाराष्ट्र-पुरुष अति प्राचिन आहे. कधी दक्षिणापथ, दक्षिणखंड, 'म्हराष्ट्र' देश, दंडकारण्य अशा अनेक नावांनी व साजांनी ओळखला जाणारा.
अशा या वॄद्ध महाराष्ट्र-पुरुषाचे हे अस्फुट स्तोत्र आहे, हे रचण्यांतला हेतु काय ?
एवढाच की तो महाराष्ट्र-पुरुष दॄष्टीसमोर उभा ठाकावा, त्याचं झांवळें झांवळें दर्शन घडावं, परिचितांना पुनर्प्रत्ययाच्या लाभ व्हावा, जाणत्यांना खुण पटावी, अबोधांना बोध व्हावा व त्यांचे बाहु फुरफुरावेत.

आम्ही महाराष्ट्रिक कसें ? आमचे वैभव काय ? आमची महत्ता कशी ? आमचे गुण-दोष काय ? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळावीत हाच या स्तोत्र-रचनेचा हेतु आहे.
महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या तर तो जे जे सांगेन ते ऐकुन प्रेते उठतील, कबंधे जिवंत होतील, षंढांच्याही अंगी वारे भरेल !
स्वातंत्रप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती.
इंग्रजांना संपुर्ण भारत जिंकण्यापुर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश अजुनही मावळला नाही, कधी मावळेल असे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरुन वहात येणार्‍या भन्नाट वार्‍याचा आहे. कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे.
महाराष्ट्र श्रीमंत आहे, स्वाभिमानी तर आहेच आहे, कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही, मित्रांसाठी जीव देणारा आहे, भक्तिभावाने गहिवरणारा आहे, लढताना प्राण तळहाताशी घेणारा आहे, थोडासा भांडखोरही आहे आन थोडीशी हिरवटपणाची झाकही आहे. पण किती ? अहो चंद्रावरल्या डागाएवढी हो !
ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता भोळा हा महाराष्ट्र आहे, आतिथ्यशील आहे.
किंबहुना तो आहे त्या गिरिशिखरावरील दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा !
संतापला तर ट्रिभुवने पेटवील आणि संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील ...
त्या महाराष्ट्राचे हे दर्शन ... !!! "
----------------------------------------------

- छोटा डॉन

इनिगोय's picture

27 May 2013 - 2:58 pm | इनिगोय

पांढरे निशाण उभारण्याची
घाई करु नकोस
मूठभर हृदया,
प्रयत्न कर
तगण्याचा, तरण्याचा.

अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे.

काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत
लढत रहा
तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी.

वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत
ते तपासण्यासाठी नव्हे
काय होऊ शकतो
हे आजमावण्यासाठी..

- पद्मा गोळे.

------------------------

आणि हे ग्रेस..

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी

पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले

सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ मिळाले नाही ते नाहीच

स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला

प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!

राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?

कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली

असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

- ग्रेस

साहित्याची श्रीमंती मिरवताना 'गदिमा' हे नाव घेतल्याशिवाय कसे राहता येईल?

योगायोगाने सावळा आणि गोरा या रंगांवर लिहिलेल्या त्यांच्या दोन कविता लागोपाठच वाचायला मिळाल्या. दोन्ही कवितांमध्ये सावळ्या आणि धवल रंगासाठी त्यांनी इतक्या वेगवेगळ्या उपमा वापरल्या आहेत!

त्यापैकी पहिलं गाणं हे माणिक वर्मांनी गायलेलं भावगीत..

सावळांच रंग तुझा, पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी ॥ ध्रु ॥

सावळांच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या, नाग खेळती विखारी ॥ १ ॥

सावळांच रंग तुझा, गोकुळीच्या कॄष्णापरी
आणि नजरेत तुझ्या, नित्य नांदते पांवरी ॥ २ ॥

सावळांच रंग तुझा, माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र, पाहू केव्हा उगवतो ॥ ३ ॥

सावळाच रंग तुझा, करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या, झालो गडे बंदिवान ॥ ४ ॥

आणि दुसरं बलरामाचं मनोगत..

बोबडा बलराम:

दूद नको पाज्यू हलीला काल्या कपिलेचे
काला या मनती आइ ग, पोल गुलाक्याचे

तूच घेउनी पगलाखाली
पाजत जा या शांज-शकाली
तुजियाशम गोले, होउदे लूप शोनूल्याचे

तूही गोली, मीही गोला
काला का हा किशन् एकला?
लावु नको तित्ती, नको ग बोत काजलाचे

थेउ नको ग याच्यापाशी
वाल्यामधल्या काल्या दाशी
देउ नका याला, नहाया पानी यमुनेचे

पालनयात तू याच्या घाली
फुले गोजिली चाप्यवलली
लावित जा अंगा, पांधले गंद चंदनाचे

नकोश निजवू या अंधाली
दिवे थेव ग उशास लात्ली
दावु नको याला कधीही खेल शावल्यांचे

नको दाखवू, नको बोलवू
झालावलचे काले काउ
हंश याश दावी, शाजिले धवल्या पंखांचे

हंशाशंगे याश खेलुदे
चांदाशंगे गोथ्थ बोलुदे
ल्हाउ देत भवती, थवेही गौल-गौलनींचे

मथुलेहुन तु आन चिताली
गोली कल ही मूल्ती काली
हशशी का बाई, कलेना कालन हशन्याचे ?

... धन्य ती प्रतिभा.

|| ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे ||
|| माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ||

गदिमांचे हे शब्द वाचून काय वाटले ते आजही सांगू शकणार नाही.

__/\__

मैत्र's picture

27 May 2013 - 11:04 pm | मैत्र

+१११११११११११११११११११११
प्र चं ड स ह म त मोदका..

चौकटराजा's picture

28 May 2013 - 8:12 am | चौकटराजा

मोदक तसेच मैत्र, आपल्याला असे का वाटते याचे उत्तरच 'सावळाची रंग; तुझा यात आहे. त्यातील प्रत्येक पहिल्या ओळीतील मांडलेल्या कल्पनेचा संबंध दुसर्‍या ओळीतील कल्पनेशी आहे. गदिमा कधी ही आपले काव्य भरकटत नेत नसत.
त्यांची प्रतिभाच त्याना तसे करू देत नसावी.
नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे अशी चुकीची कल्पना अण्णा माडगूळकर कशी करू शकतात . चांदण्याचा गुण रंग , शीतलता असे काही असेल त्याला गंध येईलच कसा ? असे वाटे. पण पूर्ण गीताची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर " अशा अलौकिक जगात नाविका मला घेउन चल " असे म्हणायवे आहे हे उलगडते.

अभ्य's picture

27 May 2013 - 4:54 pm | अभ्य

वपुर्झा : व पु काळे … मराठीतील समग्र लेखक … त्यांनी कायम सामान्य माणसाच्या नजरेतून लिहील…

मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत.

संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !

कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ....
म्हणूनच खडक झिजतात
प्रवाह रुंदावत जातो

पोरगी म्हणजे वाऱ्याची झुळूक. अंगावरून जाते, अमाप सुख देवून जाते पण धरून ठेवता येत नाही.

जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा अपोआप विझते

खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रोब्लेम
अस्तित्वातच नसतो.

आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणारयाची ऐपत नेहमीच कमी असते

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भीती वाटते.

बोलायला कुणीच नसण यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण.

अभिषेक कांदळगावकर

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते

जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही

सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत

पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो

हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते,
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!

-अनिल

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया

त्या वेली नाजूक भोळ्या
वारयाला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी
मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई

-कवि ग्रेस

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे

- शांता शेळके

कसे केंव्हा कलंडते
माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा
दूर पोचतो ओघळ

उरे तुडुंब तयांत
काळोखाचे मृगजळ
रितेपणाच्या डोहाची
आत ओढी उचंबळ

मंत्रविद्ध मध्यरात्र
उभी झुकून काठाशी
जन्मोजन्मीच्या दु:खाचा
राळ धरूनी उशाशी

ओढ घेऊन पाण्याची
सूर मारते सरल
एक गाठायचा तळ
आणि तळींचा अनळ

पेट घेई मध्यरात्र
पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये
उभी तुळस वेल्हाळ

-इंदिरा संत

संत नामदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग लिहिले आहेत. त्यातला हा अभंग वाचताना अगदी कासावीस व्हायला झालं होतं.

------------

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्‍ही कर । जातो ज्ञानेश्‍वर समाधीसी ॥१॥
नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥
दाहीदिशा धुंद उदयास्‍तविण । तैसेचि गगन कालवले ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्‍वर बैसले आसनावरी । पुढा ज्ञानेश्‍वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्‍हणे सुखी केले देवा । पादपद्मी ठेवानिरंतर ॥५॥
तीन वेळा जेव्‍हा जोडिले करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेव ॥६॥
भीममुद्रा डोळा निरंजनी लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्‍हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्‍थ ॥८॥

-------------

भाऊसाहेब पाटणकरांची आठवण कशी काय निघाली नाही..??

************************************

भ्रमरापरी सौंदर्यवेडे आहोत जरी ऐसे आम्ही...
इश्कातही नाही कधी भिक्षुकी केली आम्ही...
खेळलो इश्कात.. ऐसे बेधुंद आम्ही खेळलो..
लोळलो मस्तीत.. नाही पायी कोणाच्या लोळलो..
अस्मिता आमुच्या सार्‍या केंव्हा नव्हतो विसरलो..
आली तशीच वेळ तेंव्हा इश्क सारा विसरलो..

************************************

.

************************************

दोस्तहो, दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला
येवूनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला
हाय, हे वास्तव्य माझे, सर्वास कळले शेवटी
सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी. :D

************************************

( प्राडॉ. - वाचताय ना..? आम्ही ऐकले होते भाऊसाहेब तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे! :-) )

चौकटराजा's picture

28 May 2013 - 8:19 am | चौकटराजा

हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये
पाउल ना टाकू तिथे बाग जी आमची नव्हे

सांग वा सांगू नको काल झाले काय ते
सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते

हे कवि तुझ्या कल्पनेची कीव करावी वाटते
सांगितले कुणी प्रणयाला रात्र व्हावी लागते ...?

हे कवि तुझ्या कल्पनेची कीव करावी वाटते
सांगितले कुणी प्रणयाला रात्र व्हावी लागते ...?

क्या बात है चौरा!!!!

************************************************

तुला न सांगता तुला, गीतात माझ्या गुंफतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो

असेच रोज न्हाऊनी, लपेट ऊन कोवळे,
असेच चिंब केस तू, उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी, हळुच येथे हुंगतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो

अशीच रोज अंगणी, लवून वेच तू फूले,
असेच सांग लाजूनी, कळ्यांस गूज आपुले,
तुझ्या कळ्या, तुझे फूले, येथे टिपून काढतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो

अजून तू अजाण ह्या, कुंवार कर्दळीपरी,
गडे विचार जाणत्या, जुईस एकदा तरी,
दुरुन कोण हा तुझा, मकरंद रोज चाखतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो
...सुरेश भट

लॉरी टांगटूंगकर's picture

29 May 2013 - 2:04 pm | लॉरी टांगटूंगकर

लई झ्याक !!

तिरकीट's picture

29 May 2013 - 7:13 pm | तिरकीट

तुला न सांगता तुला, गीतात माझ्या गुंफतो,
स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो

माझ्या वाचनात ध्रुवपद असे आले आहे:

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो....

इनिगोय's picture

29 May 2013 - 7:35 pm | इनिगोय

हो बरोबर.
जालावर एका ठिकाणी वर दिलेल्या ओळी सापडतायत.
पण मूळ पूर्ण कविता अशी आहे.

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!

असेच रोज न्हाऊनी लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो !

अशीच रोज अंगणी लवून वेच तु फुले,
असेच सांग लाजुनी कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे तिपुन काढतो!

अजून तू अजाण त्या, कुवार कर्दळीपरि;
गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी :
"दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?"

तसा न राहिला अता उदास एकटेपणा;
तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!

या धाग्याबद्दल मोदकाचे आभार मानावे तितके थोडेच. वर दिलेली कविताही आवडली. वृत्तही चपखल वापरले आहे.

बाकी धाग्याची संकल्पनेबद्दल त्रिवार सलाम......

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे

घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा

घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे
अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे

घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके

घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे
कुरवाळीती मज स्‍नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे

- शांता शेळके

स्पंदना's picture

28 May 2013 - 5:36 am | स्पंदना

जग हे बंदीशाला
कुणी न येथे भला चांगला
जो तो पथ चुकलेला !

ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी
प्रिय हो ज्याची त्याला !

जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलिकडे
उंबरातले किडे-मकोडे
उंबरि करिती लीला !

कुणा न माहीत सजा किती ते
कोठुन आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते
जो आला तो रमला !

ग.दि.मा

अभय आणि राणी बंग यांचे "अ‍कॅडमीक क्वालिफिकेशन" दर्शवणारा हा उतारा.. स्वत: अनिल अवचटांनी मान्य केले आहे की, "हे आणि इतकेच" त्यांना दीड वर्षांच्या गप्पा / चर्चांमधून समजले.

पुस्तकाचे नाव - कार्यरत
लेखक - अनिल अवचट
लेखाचे नाव - "शोध" आरोग्याचा

*************************************************************************

अभय, राणीला स्वतःविषयी बोलायला नको असायचं. विशेषतः राणीला काही विचारलं तर ती म्हणायची, "ते तू अभयला विचार." हळूहळू त्यांचं मागचं समजायला लागलं तेंव्हा लक्षात आलं, की ही दोघं म्हणजे भलतेच स्कॉलर लोक आहेत. आपल्याकडे मेडीकलला अ‍ॅडमिशन मिळणं हेच मुळात केवढं अवघड असतं. अ‍ॅडमिशन मिळाल्यावर मुलं तर चार बोटं वर चालायला लागतातच; पण त्यांचे पालकही तरंगू लागतात. इथं अभय आणि राणी MBBS काय MD काय सगळ्या विद्यापीठात पहिले तर आलेच, पण ते ही सुवर्णपदक मिळवून. अभयला MBBS ला तीन विषयांत सुवर्णपदकं होती. राणीला MD ला मिळालेलं सुवर्णपदक विद्यापीठात त्या आधी कितीतरी वर्षं कुणालाच मिळालेलं नव्हतं. MBBS नंतर अभय चंदीगडच्या, संपूर्ण भारतात अग्रगण्य असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल रिसर्च (PGI) मध्ये गेला. तिथे काही काळ काम करून नंतर प्रवेशपरीक्षा असते. तिथं तो रेकॉर्ड मार्क मिळवून पहिला आला, नंतर दोघंही अमेरिकेतल्या बाल्टिमोर येथील जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात शिकायला गेले. 'पब्लीक हेल्थ' या क्षेत्रातला जगातला 'लास्ट वर्ड' समजली जाणारी ही संस्था. सर्व जगातून तिथं विद्यार्थी येतात. तिथल्या सगळ्या विद्यार्थांत तर अभय पहिला आलाच; पण त्याला ९९% मार्क पडले. त्या विद्यापीठाच्या इतिहासात कुणाला इतके मार्क पडले नव्हते आणि अजूनपर्यंत कुणाला पडले नाहीत. राणीची आई त्या काळात वारली. तिला थोडे दिवस इकडे यावं लागलं तरीही तिला ८०% मार्क पडले. हे सर्व मला तुकड्या तुकड्यानं दीड वर्षांच्या काळामध्ये समजलेले तपशील. याहून किती आहे, ते माहिती नाही.

अभय नागपूर मेडिकल कॉलेजात गेला, तिथं तो खादीचे कपडे घालीत असे. राहणी अगदीच साधी असे. मी विचारलं, "तुला तिथं त्यामुळे बाजूला पडल्यासारखं नाही का झालं?" तो म्हणाला, "मी जरी शिकायला तिथं गेलो, तरी मनानं तिथल्या वैद्यकीय जगातला 'आऊट सायडर'च होतो. तिथं असताना पगारवाढीसाठी हाऊसमन रजिस्टर लोकांचा संप झाला. "मार्ड"नं आयोजीत केला होता. माझा वैचारिकदृष्ट्या विरोधच होता. कदाचित हे माझ्या गांधीवादी बॅकग्राऊंडमुळे असेल; पण मी एकटा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करीत होतो आणि संपावर गेलेले उरलेले सगळे डॉक्टर्स माझ्यावर दातओठ खात होते!"

अभयचा हा सामाजिक दृष्टीकोन त्याच्या प्रत्येक अवस्थेत उठून दिसतो. चंदीगडला गेला, तिथल्या, भारतातल्या हृदयरोगावरच्या सर्वोत्तम केंद्रात तो काम करत होता. तिथं वापरला जाणारा एकेक कॅथेटर (नळी) तीन तीन हजार रूपयांचा होता. याच्या मनात संघर्ष उभा राही. ग्रामीण आरोग्य केंद्रात औषधाला पैसे नाहीत, तर सरकारनं इतक्या महागड्या यंत्रणेवर अशा तर्‍हेचा खर्च करण्यात "सोशल रेलेव्हन्स" काय? तिथं होणार्‍या संशोधनाचे विषयही असेच असत - 'अमुक द्रव्याचं माकडाच्या हृदयाच्या स्नायूंवर होणारे परिणाम' भारतीय प्रश्नांचं आणि त्या सरकारी पैशातून चालणार्‍या संस्थेचं काहीही घेणं देणम नाही. तिथं MD झालेला विद्यार्थी दुसर्‍या दिवशी विमानानं अमेरीकेला पळतो. इथले ७०% विद्यार्थी अमेरिकेत स्थायीक झालेले आहेत. जे.पीं.चं आंदोलन चालू होतं त्यावेळी 'पोलिटीकल अकाऊंटिबिलटी' हा शब्द नव्यानं पुढं आला होता. अभयला वाटलं, तशीच 'सोशल आणि मेडिकल अकाऊंटिबिलटी' असली पाहिजे. तो म्हणाला, "त्या काळात मी इतका अस्वस्थ होतो, की जवळपास 'ऑन द व्हर्ज ऑफ डिप्रेशन' होतो. मला आठवतंय, २३ सप्टेंबर हा माझा जन्मदिवस. त्या रात्री मी निर्णय घेतला, मी इथं राहू शकत नाही. काय करायचं ते ठरलं नव्हतं; पण हे सोडायचं, एवढं मात्र ठरवलं.
दुसर्‍या दिवशी मी कार्डिऑलॉजीच्या प्रोफेसरांना सांगितलं. त्यांना आश्चर्य वाटलं; पण कौतुकही वाटलं. त्यांनी सर्व प्रोफेसर्सचा ग्रूप बोलावला. माझं म्हणणं त्यांना ऐकायला लावलं. त्यांना त्यात तथ्य वाटलं. त्यांनी सांगितलं, की पण तरीही तू इथल्या प्रवेशपरिक्षेला बस आणि नंतर सोड. ती परिक्षा अखिल भारतीय पातळीवरची असते. तिला मी बसलो आणि पहिला आलो."

तिथली एक परंपरा आहे. सगळेजण तिथल्या ऑडिटोरियम मध्ये जमतात. मेरीट लिस्टमधल्या एकेकाचं नाव पुकारलं जातं. तो स्टेजवर येतो. त्याला कुठल्या विषयात पोस्ट ग्रॅज्यूएट करायचं आहे हे विचारलं जातं. हा एकप्रकारचा सन्मानच असतो. आवडीच्या शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी सगळ्यांची मोठी धडपड असते. अभय पहिला आल्यानं त्याला पहिल्यांदा बोलावलं. कुठल्या शाखेत जायचंय, असं विचारल्यावर त्यानं, "आपण ही संस्था सोडतोय" असं सांगितल्यावर सगळ्यांना धक्काच बसला. त्यांनी नंतर सर्व स्टाफ, कौन्सील मेंबर्सची एक सभा घेतली... "व्हॉट इज राँग विथ पीजीआय?" त्या चर्चेतून एक बदल झाला, की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना तीन महिने ग्रामीण सेवा सक्तीची केली. अभयला परत येताना सांगितलं "तुझा विचार बदलला तर कधीही या संस्थेत परत ये, तुझ्यासाठी आम्ही एक पोस्ट रिकामी ठेवतो"

*************************************************************************

असे भयानक हुशार अन बुद्धिमान लोकं आहेत म्हणुन जग चाललंय.

मराठीप्रेमी's picture

28 May 2013 - 8:38 am | मराठीप्रेमी

माझी एक अत्यंत आवडती चित्रदर्शी कविता. कितव्या इयत्तेत ते आठवत नाही, पण हि कविता मराठीच्या पुस्तकात होती. कोणाला कवी/कवयित्री माहित असतील तर कृपया सांगावेत.

माथ्यावरती उन्हे चढावी,
पावलात सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्यांच्या,
पाकोळ्या अन् मंद झुलाव्या

डोंगर व्हावे पेंगुळलेले,
पोफळबागा सुस्त निजाव्या
अंगणातल्या हौदावरती,
तहानलेल्या मैना याव्या

लुकलुकणारे गोल कवडसे,
निंबाच्या छायेत वसावे
खारीचे बावरे जोडपे,
बकुळीखाली क्षणिक दिसावे

कुरणाच्या हिरवळीत ओल्या,
ऊन हिरवे होऊन जावे
कुठे कधीचे नांगरलेले,
शेत पावसासाठी झुरावे

कोमल's picture

28 May 2013 - 10:46 am | कोमल

कवी सदानंद रेगे
कवितेचे नाव : दुपार

चौकटराजा's picture

31 May 2013 - 5:52 pm | चौकटराजा

येथील ज्याना ज्याना कविता करायची जाग. आग, आस खाज जे काही असेल त्यानी या कवितेचा फार लक्षपूर्वक अभ्यास करावा. म्हणजे कवीने वर्णन करताना कविकल्पना वापरायचे झाल्यास वास्तवाचे, परिसराचे, भान कसे व किती असले पाहिजे याचा धडाच इथे दिलेला आहे. क्या बात है !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2013 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त वाचनीय धागा. धन्स.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2013 - 10:25 am | ज्ञानोबाचे पैजार

भंगु दे काठिण्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे ‘कार्पण्य’ ‘मी’ चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी

कवी – बा.सी.मर्ढेकर

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2013 - 10:33 am | प्रभाकर पेठकर

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौरचैत्रीची कशास जुनी येती
रेशमाची पोलकी छीटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

लाट उसळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळूनी लावण्य बर वहावे

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"

कवी - बी

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2013 - 10:38 am | ज्ञानोबाचे पैजार

फुलराणी-

हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला-
“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी -

“कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान !”
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता – वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला !

श्रावण मासि

श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे

कोमल's picture

28 May 2013 - 10:59 am | कोमल

मी "श्रावणमासी"चीच वाट पाहात होते.

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

अप्रतिम...

१. कणा: कुसुमाग्रज
२. प्रेमाचा गुलकंदः केशवकुमार

अरे दाद्या.. तुला काठावर पण पास करणार नाही कोणी. ;-)

आवडीच्या कविता गुगलून चिकटव की येथे!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2013 - 4:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

'ओळखलत का सर मला' पावसात आला कोणी

कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:

'गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली चुल विझली होते नव्हते नेले

प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेवुन संगे सर, आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे'

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नही कणा

पाठीवर हात ठेउन नुसते लढ म्हणा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2013 - 5:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने
गुलाबपुष्पे आणूनी द्यावीत तिजला नियमाने

कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!

गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या!
लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!

प्रेमदेवता प्रसन्न हो या नैवेद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतराणे!

कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा
परी न सोडीला तिने आपुला कधीही मुग्धपणा

या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल
तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल!

अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात
खंडन पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!

अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्र्चर्या
रंग दिसे ना खुलावयाचा तिची शांत चर्या

धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला देवी
दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी

बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज!
तरी न उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज?

गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग सुंदरी फुकट का ते सगळे गेले?

तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वॄथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्या पैकी'

असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनी ये बाहेर कसलीशी बरणी!

म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!

का डोळे असे फिरवता का आली भोंड
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड

क्षणीक दिसले तारांगण त्या, परी शांत झाला
तसाच बरणी आणि घेउन खांद्यावरी आला!

प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच,गुलकंद तरी कशास हा दवडा?

याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला,
ह्रदय थांबूनी कधीच ना तरी असता तो खपला!

तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे!

चौकटराजा's picture

31 May 2013 - 5:55 pm | चौकटराजा

दाद्या त्याबरोबर सतारीचे बोल, नव्या मनूतिल नव्या दमाचा या केशवसुतांच्या कविता ही जोड रे !

बहुगुणी's picture

29 May 2013 - 7:55 am | बहुगुणी

माणसाला माणूस दिसत नाही
अशी गडद संध्याकाळ
जवळपास रात्रच

पण बोळांतून गल्ल्यांतून घराकडे वळत गेलेली
पायाखालची वाट दिसत जाते
रस्त्यावर दिवे नसतानाही
पायांना सापडत जाते

जुन्या घराचे सारवलेले अंगण
वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या
दरवाजाचा काळा मखमली स्पर्श
वेचीत माझे हात दार ढकलतात

साखळी वाजते
आतून हळू आवाज येतो
आलीस बाई, ये!

- प्रभा गणोरकर

शेवटच्या आजारात चिं. त्र्य. खानोलकर के. ई. एम. रुग्णालयात भरती झाले होते. भेटायला जयंत धर्माधिकारी नियमित येत. नवीन कवितेबद्दल त्यांनी खानोलकरांना पृच्छा केली तेव्हा त्यांनी खालील काव्य म्हटले,

शेवटच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा

एवढे म्हटल्यावर त्यांना धाप लागली. त्यांचे डॉ. देवल यांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगून उरलेली उद्या म्हणायला सांगितली. परंतु उद्या काही उजाडलाच नाही. तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

धाग्याचा उद्देश पाहून 'आयुष्य समृद्ध करणार्‍या ओळी उधृत करणं' हा निकष पूर्ण करणार्‍या गुलजार यांच्या काही काव्यपंक्ति देतो आहे:

किताबे झांकती है बंद अलमारी के शीशों से
बड़ी हसरत से तकती है
महीनों अब मुलाकाते नही होती
जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर
गुजर जाती है कंप्युटर के परदों पर
बड़ी बेचैन रहती है किताबे ....
इन्हे अब नींद में चलने की आदत हो गई है
बड़ी हसरत से तकती है ..

जो कदरें वो सुनाती थी
की जिन के सैल कभी मरते थे
वो कदरें अब नज़र आती नही घर में
जो रिश्ते वो सुनाती थी
वह सारे उधडे उधडे हैं
कोई सफहा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है
कई लफ्जों के माने गिर पड़े हैं
बिना पत्तों के सूखे टुंडे लगते हैं वो सब अल्फाज़
जिन पर अब कोई माने नही उगते
बहुत सी इसतलाहें हैं
जो मिटटी के सिकूरों की तरह बिखरी पड़ी है
गिलासों ने उन्हें मतरुक कर डाला

जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
बहुत कुछ तह बा तह खुलता चला जाता है परदे पर
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है
कभी सीने पर रख कर लेट जाते थे
कभी गोदी में लेते थे
कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बना कर
नीम सजदे में पढ़ा करते थे ,छुते थे जबीं से
वो सारा इल्म तो मिलता रहेगा बाद में भी
मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल
और महके हुए रुक्के
किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा
वो शायद अब नही होंगे !!
********************

आणि या अटलजी वाजपेयींच्या ओळी:

अटलजींची 'उंचाई ही कविता:

ऊँचे पहाड़ पर,
पेड़ नहीं लगते,
पौधे नहीं उगते,
न घास ही जमती है।
जमती है सिर्फ बर्फ,
जो, कफ़न की तरह सफ़ेद और,
मौत की तरह ठंडी होती है।
खेलती, खिलखिलाती नदी,
जिसका रूप धारण कर,
अपने भाग्य पर बूंद-बूंद रोती है।

ऐसी ऊँचाई,
जिसका परस
पानी को पत्थर कर दे,
ऐसी ऊँचाई
जिसका दरस हीन भाव भर दे,
अभिनंदन की अधिकारी है,
आरोहियों के लिये आमंत्रण है,
उस पर झंडे गाड़े जा सकते हैं,
किन्तु कोई गौरैया,
वहाँ नीड़ नहीं बना सकती,
ना कोई थका-मांदा बटोही,
उसकी छाँव में पलभर पलक ही झपका सकता है।

सच्चाई यह है कि
केवल ऊँचाई ही काफ़ी नहीं होती,
सबसे अलग-थलग,
परिवेश से पृथक,
अपनों से कटा-बँटा,
शून्य में अकेला खड़ा होना,
पहाड़ की महानता नहीं,
मजबूरी है।
ऊँचाई और गहराई में
आकाश-पाताल की दूरी है।
जो जितना ऊँचा,
उतना एकाकी होता है,
हर भार को स्वयं ढोता है,
चेहरे पर मुस्कानें चिपका,
मन ही मन रोता है।

ज़रूरी यह है कि
ऊँचाई के साथ विस्तार भी हो,
जिससे मनुष्य,
ठूँठ सा खड़ा न रहे,
औरों से घुले-मिले,
किसी को साथ ले,
किसी के संग चले।
भीड़ में खो जाना,
यादों में डूब जाना,
स्वयं को भूल जाना,
अस्तित्व को अर्थ,
जीवन को सुगंध देता है।

धरती को बौनों की नहीं,
ऊँचे कद के इंसानों की जरूरत है।
इतने ऊँचे कि आसमान छू लें,
नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें,
किन्तु इतने ऊँचे भी नहीं,
कि पाँव तले दूब ही न जमे,
कोई काँटा न चुभे,
कोई कली न खिले।

न वसंत हो, न पतझड़,
हो सिर्फ ऊँचाई का अंधड़,
मात्र अकेलेपन का सन्नाटा।
मेरे प्रभु!
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
ग़ैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरल्या नभाची सूर्यास्तछाया,
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण

एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल,
विलग पंखांचे मिटते मन
एखाद्या प्राणाचे विजनपण,
एखाद्या फुलाचे फेडीत ऋण

गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां,
प्राजक्तचुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्मांचे सावळेपण,
एखाद्या प्राणाची मल्हार धून

एखाद्या प्राणाचे सनईसूर,
एखाद्या मनाचे कोवळे ऊन
निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण.

-आरती प्रभू

अन्योक्ती - कृष्णशास्त्री चिपळूणकर
सूर्यान्योक्ति

(शार्दूलविक्रीडित)

देखूनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी,
शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरीं जाउनी,
देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभीं, भास्करा,
अत्त्युच्चीं पदिं थोरही बिधडतो हा बोल आहे खरा.

-----------------------------------------------------------------

गजान्योक्ति

(स्त्रग्धरा)

ज्याची स्पर्धा कराया इतर गज कधीं शक्त नाहीच झाले
सांगावे काय? ज्याच्या मृगपतिहि भयें रान सोडून गेले,
तो पंकामाजिं आजी गजवर फसला, युक्ति नाहीं निघाया.
अव्हेरिती, पहा, हे कलकल करुनी क्षुद्र कोल्हे तयाला.

-----------------------------------------------------------------

हरिणान्योक्ति

(शार्दूलविक्रीडित)

जाळे तोडुनियां बळें हरिण तो टाळोनि दावाग्निला,
व्याधाचे चुकवूनि बाणहि महावेगें पुढें चालिला,
तों घाईंत उडी फसूनि पडला आडामधें बापडा;
होती सर्वहि यत्न निष्फळ, जरी होई विधी वांकडा.

-----------------------------------------------------------------

आंब्याविषयी

(शार्दूलविक्रीडित)

ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी
गंधें युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी,
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचें, भला
आम्रा त्या पिक सेवितां समसमां संयोग कीं जाहला!

-----------------------------------------------------------------

बगळ्याविषयी

(शिखरिणी)

उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनियां
तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनियां,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती.

-----------------------------------------------------------------

चंदनाविषयी

(पृथ्वी)

वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे,
तयांत मज चंदनासम न एकही सांपडे,
जयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी,
शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी.

-----------------------------------------------------------------

कोकिलान्योक्ती

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का मधुर भाषणे तू करिशी अनेक
हे मूर्ख, यांस नसे किमपी विवेक
रंगावरुन तुजला गमतील काक

पांथस्थ's picture

29 May 2013 - 10:35 am | पांथस्थ

मोदकराव धाग्याची संकल्पना मस्तच! आवडणार्‍या कविता/ललित लेख तस बरच आहे, जस आठवेल तसे इथे देतो!

"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचही तिला भान राहत नसे..."

"सावित्री" - पु.शि. रेगे