अजंठा ...........भाग-१
अजंठा ...........भाग-२
या भागात आपण अजंठाची चित्रे कशी केली असतील व त्या चित्रांच्या संवर्धनासाठी आत्तापर्यंत काय काय प्रयत्न केले गेले, त्यात मूळ रंग कसे बरबाद झाले इत्यादि घटनांची माहिती घेऊ....
विष्णोधर्मोत्तरम् या ग्रंथाच्या चाळीसाव्या प्रकरणात, चित्रसुत्रात भित्तीलेपचित्रासाठी पृष्ठभाग कसा तयार करावा याबद्दल माहिती आढळते. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, भाजलेल्या विटांचा तीन प्रकारचा चुरा – वस्त्रगाळ पूड, मध्यम आकाराची पुड व खरबरीत चुरा यांचे मिश्रण करत असत. त्यात माती मिसळत. सगळ्याचे प्रमाण सारखे असावे. यात सुवासिक गोंद, मधमाशांच्या पोळ्याचे मेण, कुंदरा गवत, (याच्यात अंबाडीच्या भाजीमधे असतात तसे तंतू असतात. आपल्याला माहित असेलच की पूर्वीच्या काळात बांधकामाच्या चुन्यात अंबाडी घालत असत.) तेलात भिजवून ठेवलेली कुसुम्बाची फुले, काकवी याचे समप्रमाणात केलेले मिश्रण करायचे. या दोन्ही मिश्रणात वाळलेली चुन्याची भुकटी, बेलफळाचा लगदा व तेलाच्या दिव्याची काजळी घालायची. हे सर्व मिश्रण एका मातीच्या घड्यात महिनाभर भिजवत ठेवत असत. त्याची उत्तम एजजिनसी मऊ अशी राळ तयार झाली की कलाकाराने अत्यंत काळजीपूर्वक त्याचा लेप भिंतीवर द्यायचा. हा लेप अत्यंत गुळगुळीत असावा, त्यात उंच सखल पट्टे नसावेत. जास्त दाट किंवा जास्त पातळही नसावा. असा थर देऊन झाला की तो थर तेलाच्या सहाय्याने चांगला घोटत. असे एकदा झाले की तो थर परत दुधाने धुवून काढायचा. असे अनेक वेळा केल्यावर कलाकाराच्या मनासारखा तो थर झाला की त्याने तो थर वाळला की पुढील चित्रकारीस सुरुवात करावी. त्यासाठी त्याच्यावर रेखाटन करत व नंतर त्यात रंग भरायचे. या रंगात, ते चिकटून रहावेत यासाठी त्यात वाकुल व सिंदूर नामक झाडांचा चिकही घालावा लागे.
आता अजंठाच्या चित्रकारांनी अगदी हीच प्रक्रिया वापरली असेल असे निश्चितपणे सांगता येत नाही पण पुढे जो काही अभ्यास झाला त्यात याच्या जवळपास प्रक्रिया वापरली गेली आहे यावर एकमत झाले आहे.
एक आवाक झालेला कोरियाचा पर्यटक.............
१९२९ साली रॉयल एशियाटिक सोसायटीच्या कलकत्यातील एका सभेमधे अजंठाच्या शोधाविषयी एक शोधनिबंध मांडण्यात आला. या निबंधाने सोसायटीचे संचालक एवढे प्रभावित झाले की त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना ताबडतोब या भित्तीलेपचित्रांचे संवर्धन व प्रतिकृती तयार करण्याचा आदेश दिला. त्यावेळी ब्रिटिशांच्या मद्रास रेजिमेंटमधे एक ग्रॅहॅम गिल नावाचा चित्रकार होता त्याच्यावर ही कामगिरी सोपविण्यात आली. या माणसाने सतत २५ वर्षे अतोनात परिश्रम करुन या भित्तीलेपचित्रांची कॅनव्हासवर चित्रे काढून घेतली. तो स्वत:ही त्यात सहभागी झाला होता. दुर्दैवाने क्रिस्टल पॅलेसला लागलेल्या आगीत ही चित्रे भस्मसात झाली. हा काळ होता १८४४ ते १८७१.
क्रिस्टल पॅलेस आधी.........
व नंतर आगीच्या भक्षस्थानी पडल्यावर........
शेवटी बॉंबे स्कूल ऑफ आर्ट्सच्या जॉन ग्रिफिथ व त्याच्या विद्यार्थ्यांवर ही कामगिरी सोपविण्यात आली. पुढे दहा वर्षे ही मंडळी त्यावर काम करत होती. दुर्दैवाने या १२५ चित्रांपैकी ८५ चित्रे अलबर्ट म्युझियमला लागलेल्या आगीत नष्ट झाली. १८९६ साली ग्रिफिथने परत अजंठाला मुक्कम ठोकला व अनेक चित्रे रंगविली व एक पुस्तक प्रकाशित केले. १९०६ मधे एका ब्रिटिश महिलेने तीनवेळा अजंठाला येऊन चित्रे काढली व एक पुस्तक प्रकाशित केले. ब्रिटिशांचेच राज्य असल्यामुळे अजंठाला कोणीही येऊन त्याची चित्रे काढीत असत. १९१८ मधे चित्रकार मुकुल देव अजंठाला गेले असता त्यांना दोन जपानी माणसे चित्रे काढत असताना आढळली. अधिक चौकशी नंतर ते प्रो. सवामुरा व त्यांचा चित्रकार काम्पो असल्याचे कळाले. पण सगळ्यात महत्वाचे काम केले ते हैद्राबादच्या निजामाच्या आशिर्वादाने श्री गुलाम याझदानी यांनी. त्यांच्या पुस्तकांना अजुनही तोड नाही. या जपानी द्वयीनेही कष्टाने ते काम केले. अंधाऱ्या गुहेत मिणमिणत्या दिव्यात त्यांनी ती भित्तीचित्रे खराब होणार नाहीत अशी काळजी घेऊन ते काम केले. नंतर मात्र ब्रिटिशांनी जेव्हा हेच काम हाती घेतले तेव्हा त्यांनी सगळ्या भिंतींना वॉर्निश फासले ज्यामुळे मूळ रंगाची पार वाट लागली. त्या सगळ्या भिंती तेलकट झाल्या. रंग मद्दड झाले. विशेषत: ज्या सोनेरी रंगाने दागिने रंगविले होते त्यातील चमक नाहीशी झाली.
त्यानंतर १९२० साली इटालियन तज्ञांनी तेच काम परत हाती घेतले. मागे उल्लेख झालेल्या प्रकरणात जे वॉर्निश फासले होते त्याचे आता पोपडे पडायला सुरुवात झाली. इटालियन तज्ञ प्रो. चेकोनी याला ही चित्रे खराब होण्याची अजून काही कारणे सापडली. त्यातील एक महत्वाचे होते ते म्हणजे ही चित्रे ज्या थरावर चितारली गेली होती त्यात असलेले तंतू. या तंतूंचा खाद्य म्हणून वापर किडे करत असल्याचे आढळून आले. याशिवाय काही ठिकाणी पाणीही झिरपत होते व छताला व भिंतींना लटकणारी वटवाघुळेही होती. चेकोनीपुढे आता दुसरे आव्हान उभे होते ते म्हणजे रंग खराब न करता वॉर्निशचा थर काढणे. ते त्याने कॉस्टीक सोडा, अल्कोहल इ. वापरुन बऱ्यापैकी यशस्वी केले. काही ठिकाणी रसायने इंजेक्शन देऊन वापरण्यात आली. पाणी झिरपणे बंद करण्यासाठी पाण्याला वाटा काढण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांमुळे चित्रे अजून खराब होण्यापासून वाचली.
१९३० साली श्री परमशिवन यांनी या प्रयत्नात मोलाची भर घातली. त्यांनी नुसत्या अजंठाच नव्हे तर तंजावर, लेपाक्षी अशा अनेक ठिकाणच्या भित्तेलेपचित्रांचा अभ्यास केला. अजंठाची चित्रे ज्या थरावर आहेत तो खरेतर चार थरांचा बनला आहे व त्यात लोहयुक्त माती जास्त प्रमाणात आहे असेही आढळून आले. सर्वात खालचा थर सगळ्यात जास्त जाडीचा होता व त्यात तंतूमय पदार्थ भरपूर प्रमाणात आढळले. याच भाजीपाल्याच्या तंतूंनी अजंठातील चित्रांचा खरा घात केला असे म्हणण्यास हरकत नाही. आत्ता आपल्याला दिसत नाहीत पण किड्यांनी भरपूर छिद्रे पाडलेली त्यावेळी आढळून आली. आपण जुन्या पुस्तकात चंदेरी रंगाचे किडे बघतो ते किडे कागद खाऊन आपला निर्वाह करतात अशा किड्यांनीच ते वनस्पतीजन्य तंतू खाऊन आपले पोट भरले असणार. अर्थात नंतर त्यांचाही बिमोड करण्यात तज्ञांना यश आले आहे असे मानले जाते. पण त्या दृष्टीकोनातून मी त्या भिंतींकडे पाहिले नाही हेही खरे.
एक रंगवलेले छत.........
या चित्रांचा दुसरा शत्रू म्हणजे बाष्प. मी १६ क्रमांकाच्या विहारात जेव्हा छायाचित्र काढत होतो तेव्हा मला आढळले की भिंगावर बरेच बाष्प जमले होते व फोटोही त्यामुळे धुरकट येत होते. नशीब वेळेवर लक्षात आले. आता हे बाष्प कुठून येते हा एक प्रश्र्नच आहे. मी तेथे होतो तेव्हा तेथे गर्दीही नव्हती. त्या ऋतूत हवेतही बाष्प नसते. जेव्हा तापमानात फरक येतो तेव्हा बाष्प तयार होते हे आपण आपल्या गाडीत नेहमी अनुभवतो. बाहेर तापमान जास्त व आत कमी अशा अवस्थेत हे बाष्प तयार होत असावे का ? बहुतेक हो ! यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आतील वा बाहेरील तापमान सारखे ठेवण्याचा प्रयत्न करणे व ते सहज शक्य आहे असे मला वाटते.
अजंठाची लेणी रंगविताना त्या काळातील कलाकारांनी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक खनिजरंगाचा पुरेपूर वापर केलेला आढळतो याला अपवाद फक्त निळ्या रंगाचा. ते कसे तयार केले ते आता बघुया.
पांढरा रंग ते चुना व शाडूपासून तयार करीत तर काळा दिव्याच्या काजळीतून.
पिवळा रंग ते पिवळ्या ऑकरमधून तयार करत. ऑकर म्हणजे जमिनीत सापडणारा नैसर्गिक रंग.
पिवळा ऑकर......
लाल रंग लाल ऑकरमधून ते तयार करीत.
तर ग्लुकॉनेटमधून ते हिरवा रंग तयार करीत असत.
हे सर्व लोह खनिजाचे क्षार आहेत.
निळ्यारंगासाठी ते लॅपिस लाझुलीपासून तो तयार करीत असत. याच्या खाणी हल्लीच्या पाकिस्तानात क्वेटा व अफगाणिस्तानात गांधार प्रदेशात आहेत.
हे सर्व क्षार पाण्यात सहज विरघळतात. त्यात एखादा चिकट पदार्थ टाकून त्याने रंविल्यास पाणी उडून जाते व रंग घट्टपणे त्या मातीच्या थरात शोषला जातो व टिकून राहतो. मला आश्चर्य वाटते की ते सगळे प्रकरण एवढेही कोरडे होत नाही की त्याचे पोपडे पडावेत.
हे प्रयत्न किती पूर्वीपासून होत आहेत हे आपण पाहिले. अजूनही या लेण्यात हा ठेवा जपण्याचा प्रयत्न चालूच आहेत. उदा खालचे छायाचित्र बघा. त्यात वसंत पगारे नावाचे कलाकार एका मूर्तीचा पाय दुरुस्त करायचा प्रयत्न करत आहेत.
त्यांच्याशी बोलताना त्यांचे काम किती अवघड आहे याची कल्पना आली. ते प्रथम ज्या दगडात मूर्ती घडवली आहे त्याचा अभ्यास करतात. त्याचा रंग, पोत कुठल्या प्रकारचा आहे याचा अभ्यास करतात. मग त्या प्रकारचा दगड त्या डोंगरात शोधतात. त्याची वेगवेगळ्या आकारात यंत्रामधे भुकटी करतात. या भुकटीत मग रेझिन मिसळतात व ते त्या मूर्तीला लावून त्याला उरलेला आकार देतात. हे काम सगळ्यात अवघड आहे कारण त्या शिल्पाच्या रेषा पुढे कशा जाणार आहेत याचा त्यांना पूर्ण अभ्यास करावा लागतो. हे झाल्यावर त्यांना परत मूर्तीच्या पृष्ठभागाचा पोत व नवीन भागाचा पोत घासून (किंवा टाके पाडून) समान करावा लागतो. मला या कलाकारांचे कौतुक वाटते व अभिमानही वाटतो.
पुढच्या भागात विहार क्रमांक १७ला भेट देऊ..........त्याआधी त्या लेण्यातील एक फोटो.........
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
3 Mar 2014 - 9:09 am | खटपट्या
नेहमीप्रमाणे सुरेख भाग.
तांत्रिक माहिती खूपच छान
3 Mar 2014 - 9:32 am | सुहास झेले
सुंदर आणि माहितीपूर्ण :)
3 Mar 2014 - 9:42 am | अनुप ढेरे
मस्तं !
3 Mar 2014 - 10:08 am | जेपी
माहितीपुर्ण ---^---
3 Mar 2014 - 10:24 am | सौंदाळा
सुंदर.
वसंत पगारेंना सलाम.
6 Mar 2014 - 3:43 pm | एस
मस्त लेख..
5 Mar 2014 - 7:28 pm | आत्मशून्य
.
5 Mar 2014 - 7:28 pm | आत्मशून्य
.
5 Mar 2014 - 7:58 pm | मुक्त विहारि
पु भा प्र
5 Mar 2014 - 8:09 pm | प्रचेतस
सुरेख.
हा भाग वाचायचा राहूनच गेला होता.
5 Mar 2014 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतिशय माहितीपूर्ण आणि रोचक लेख. पुभाप्र.
१९२९ साली रॉयल एशियाटिक सोसायटीच्या... ...हा काळ होता १८४४ ते १८७१.>>> या पॅरॅग्राफमध्ये सनांना तपासून पहायला पाहिजे काय?
5 Mar 2014 - 10:23 pm | अजया
पु.भा. प्र.
6 Mar 2014 - 12:56 am | मधुरा देशपांडे
सुंदर. माहिती अगदी सोप्या भाषेत आणि रोचक पद्धतीने दिलेली आहे.
7 Mar 2014 - 4:08 am | कंजूस
छान
.
प्रेक्षक लेण्यांत फिरतात त्यांची संख्या फार आहे .उच्छवासांतली पाण्याची
वाफ आतच राहाते .ती आता बाहेर काढण्यासाठी यंत्रे ( dehumidifiers )लावली
आहेत .तरीही बाष्प बरेच राहात असेल .
10 Mar 2014 - 4:33 pm | पैसा
खूपच माहितीपूर्ण!
11 Mar 2014 - 10:23 am | सुधीर कांदळकर
लेणी पाहतांना अनेक प्रश्न पडले होते. त्यापैकी बहुतेकांची उत्तरे या लेखात सापडली.
ध्न्यवाद, पुभाप्र
11 Mar 2014 - 10:40 am | वेल्लाभट
सही! मस्त वाटलं वाचून आणि फोटो बघून.