(हा भाग बराचसा वर्णनात्मक आहे त्यामुळे कंटाळवाणा वाटण्याची शक्यता आहे. हा दोष माझ्याकडे पदरी टाकून वाचन करावे.)
स्वामीसोबत या पुढे काम करायचे की नाही याचा विचार करण्यापूर्वीच स्वामी मला दारुखान्यात घेऊन गेला..या वेळी सावध राहून काम करायचे अशी मनाशी बैलगाठ बांधूनच घरून निघालो होतो.
रे रोड स्टेशनच्या पुलाखाली लाडल्याचे दुकान होते.
स्वामीनी ओळख करून दिल्यावर मी लाडलाला वॉटर ट्रीटमेंट केमीलच्या खरेदीसाठी बयाणा दिला.
दुसर्या दिवशी लाडलेचा फोन आला. "सेठ जरा दुकानपे आना."
मी गेल्यावर लाडलेनी एक सुस्कारा सोडला. छातीवर हात ठेवला.बाजूला बसलेल्या एका माणसाकडे बोट दाखवून मला म्हणाला
"सेठ मैने आपको नही बताया लेकीन ये अकबर भाई और मै भागीमे माल लिया था. आपका और मेरा सौदा हो गया लेकीन उनको सौदा पसंद नही आया. दुसरा सौदेवाला जादा भाव दे रहा है."
"फिर बयाणा काय को लिया ? "स्वामीनी त्याला विचारलं .
स्वामी वॉज लिडींग द अॅक्युज्ड असं मला वाटलं.
"मै बयाणा वापस देता हूं सेठ."लाडला म्हणाला.
स्वामीनी मला बाजूला घेतलं " सेठ चार रुपया बढा दो. माल अच्छा है "
यावेळी मी नवशीका नव्हतो. मी स्वामीला म्हटलं
"स्वामी साब देखो ऐसा करो.बयाणा वापस ले लो. "
लाडलाला मी सांगीतलं
"क्या करे सेठ मै भाव बढा देता लेकीन मेरा ताकत बहोत कम है."
"आप ऐसा करो बयाणा लौटा दो .बादमे कोई सौदा करेंगे."
अकबरभाई आणि लाडल्यानी एकमेकांकडे बघीतलं .
लाडलाला अशा ऊत्तराची अपेक्षा नव्हती पण करतो काय ?
पैसे काढून दिले.
मी उठून निघालो.
स्वामीची टकळी सुरु झाली "क्या सेठ भाव बढा देते तो नफा कम होता लेकीन व्यापार बढता था ."
"देखो स्वामीसाब जबरदस्तीका काम नही करेंगे. आपको क्या लगता है अकबरभाईने भागी रख्खा है ?"ये सब भाव बढानेका नाटक है.चलो छोडो."
दोन दिवसानी लाडल्याचा फोन आला "सेठ नया माल माल आया है."
मी म्हटलं " सेठ आज स्वामी साब नही है मै कल आता हूं"
"स्वामी की क्या जरूरत है सेठ.आप आव इधर .."
मला माहीती होतं स्वामी त्याच्या बाजूला बसला आहे.
यावेळी मी एकटाच गेलो. लाडलानी दोन ड्रम कडे बोट दाखवत म्हटलं
"देखो सेठ इसमे क्या है."
मी म्हटलं "सेठ मेरेको रस नही है."
आधीचा माल तसाच पडला होता.
मी जायला निघालो तेव्हा लाडला जागचा उठला .
"क्या नाराज है सेठ."
"सेठ आप आपका पहीला लॉट बेचो ,बादमे मै आता हूं."
लाडलानी हात धरून खाली बसवलं .
"गलती माफ करो सेठ.मै थोडा भाव खिचनेके फिराकमे था ."
"जाने दो सेठ मै आपका माल बिकवा दुंगा "
मी असं उत्तर दे ईन असं लाडलाला वाटलं नव्हतं.
तरीपण त्यानी एक खेळी करून बघीतली.खेळी नाही करणार तो भंगारवाला तो काय ?
"सेठ आप मेरे लिये दलाल बनोगे ?"
मी म्हणालो "सेठ मै आपका पार्टनर बनना चाहता था और आप मुझे दलाल बना रहे हूं."
या अँगलचा लाडलानी विचारच केला नव्हता.त्यानी बराच वेळ विचार केला मग मला म्हणाला "स्वामीका क्या करू ?"
मला जी शंका होती ती खरी होती .लाडला आणि स्वामीनी मिळून माल खरेदी केला होता .आणि न समजणारा माल माझ्या गळ्यात टाकून स्वामी दोन्ही बाजूनी मलई खाण्याचा गेम वाजवणार होता.
आतापर्यंत कधीही न खेळलेले खेळ मी बघत होतो.
"सेठ मेरा दुकान आपका.ये गोडाऊन आपका. मै आपको लाईन सिखाता हूं ."
मी ताबडतोब होकार दिला नाही.
अपेक्षेप्रमाणे चार दिवसानी स्वामी आणि लाडलाची युती फुटली.
स्वामी रागावून बंगलोरला गेल्याची बातमी मिळाल्यावर मी लाडला कडे गेलो.
-----------------------------------------------------------------------
तोपर्यंत सात आठ दिवस मी एकटाच दारुखान्यात फिरत होतो.अंदाज घेत होतो.
रे रोड स्टेशन मी येता जाता बघीतलं होतं .पण माझ्या ओळखीतलं कोणीच रे रोड स्टेशनला उतरणारं नव्हतं.चेंबूरहून येणारी माणसं थेट व्हीटीला जातात. रे रोडला माणसं राहतात की नाही हे पण त्यांना माहीती नसतं. हार्बर लाईनची डॉकयार्ड, रे रोड अशी स्टेशनं आहेत की जी माझगावला जवळ आहेत.माणसं चिकूवाडीत ,अंजीर वाडीत, माथारपाखाडीत राहतात पण दारुखान्यात फारसं कुणी जात नाही.
रे रोडवरून डाव्या बाजूला खाली उतरलं की तोंडाला पाणी सुटेल असा बिस्कीटाचा सुगंध येतो.ब्रिटानीयाची फॅक्टरी हा शहरी जीवनाचा शेवटचा थांबा.या नंतर सुरु होतं ते दारुखान्याचं स्वतंत्र विश्व. मुंबईच्या नागरी वातावरणापेक्षा अगदी वेगळं .
ब्रिटानीया मागे टाकली की डावीकडे पाईपवाल्यांची दुकानं दिसायला लागतात.एक इंचापासून दोन फूट व्यासापर्यंतचे पाईप रचून ठेवलेले दिसतात.पायपांवरती एक मचाण.त्यात ऑफीस.
पुढचा नाका ग्रेस काट्याचा.उजवीकडे गेलं की पावडर बंदर सरळ गेलं की रेती बंदर.
नव्वद अंशाच्या या कवेत एक वेगळं जग आहे.
-----------------------------------------------------------------------
रेती बंदरपासून सुरवात केली तर पहीला धक्का आर्य आणि कंपनीचा, दुसरा बिद्दीचा ,नंतर प्रल्हादमामाचा आणि शेवटचा मेलाराम आणि कंपनीचा. धक्के असे कायमचे दिलेले नसतात पण वर्षानुवर्षं ही मडळी एक जहाज कापून संपायच्या आत दुसरं पाठीमागे उभं करतात. धक्के शेठ्च्या नावानी ओळखले जातात.उदा: आर्य आणि कंपनीचा धक्का रविपवनचा धक्का म्हणूनच ओळखला जातो कारण कंपनीच्या मालकांची नावं रवि आणि पवन अशी आहेत म्हणून .परत आणखी गम्मत अशी की बर्याच शेठलोकांची रुढ नावं खरी नावं नाही आहेत.फुफाजीचा धक्का. आता शिप ब्रेकरचं नाव काही फुफ्फा नाही आहे पण तो कुठल्यातरी एका दुसर्या शिपब्रेकरचा हा फुफ्फा (आतोबा ) म्हणून त्याचं नाव फुफ्फा.कान्या चौधरीचं नाव अभिलाष चौधरी पण त्याला एका डोळ्यानी दिसत नाही म्हणून तो कान्या चौधरी.
मेलाराम शेटचा धक्का त्यांच्या वडलांनी म्हणजे बैजनाथ मेलारामनी सुरु केला होता.हा दारुखान्यातला आदरणीय धक्का.इथे कामाची सुरुवात ज्यानी केली त्याला इतर धक्क्यावर सहज प्रवेश मिळतो.
दारुखान्यातली व्यापार्यांची पण अशीच टोपण नावं आहेत.त्याचण कारण असं की एकाच नावाची बरीच माणसं आहेत.गुप्ता म्हटलं की समोर दहा गुप्ता येतात.मग ओळखायचं कसं जाकीटवाला गुप्ता ,टोपीवाला गुप्ता, लंबू गुप्ता , जनरेटर गुप्ता.काही नावं कामावरून तर काही शरीर वैशिष्ट्यावरून
युसुफ म्हणा आणि त्रा युसुफ समोर येतात मग त्यांचं विभाजन चिकणा युसुफ ,युसुफ हड्डी, गाडी युसुफ ,केबल युसुफ ,शाणा युसुफ वगैरे वगैरे.मुसलमानात आडनावं नसल्यामुळे आण्खीनच टोपण नावाची गरज पडते.उत्तर प्रदेशी भय्यांची नावं पण वेगळीच आतापर्यंत मला राम दयाल रामाधीन ,धनीराम माहीती होते पण आता अलगू ,अदालती. अच्छेलाल, मिठाईलाल यांच्याशी पण ओळखी व्हायला लागल्या होत्या.
-----------------------------------------------------------------------
माणसं वेगळीच.यांना खाणं कपडे म्हणजे लाईफ स्टाईलचं काडीचं कौतुक नसायचं.दारुखान्यात चर्चा फक्त मेटल, लकडा. पलास्टीक एव्हढीच.परीभाषा वेगळी. उदा: माल म्हणजे तांबंपितळ,
पलय्या म्हणजे प्लायवूड, भुसा म्हणजे पार्टीकल बोर्ड.अलमुनीया म्हणजे अॅल्युमिनीयम,गलान दोरी चा अर्थ ग्लँड पॅकींग.
दारुखान्यात येऊन मी काळा चहा (सुलेमानी चहा) प्यायला शिकलो आणि ग्लुकोजची बिस्कीट पाण्यात बुडवून खायला शिकलो.भूक लागली तर बिस्कीट खाणं ठिकच आहे पण ती चहाबरोबर खाणम म्हणजे चैन झाली.इथे कामाशिवाय काहीच विचार होत नाही.व्यापार्यांमध्ये दारू बाई सिनेमा कसलीही चर्चा नसते.दिवस रात्र एकच विचार :आपला धंदा
हिंदू मुस्लीम दोन्ही व्यापारी एकापेक्षा एक सरस आहेत.
बहुतेक मुस्लीम गोंडा बस्ती सिध्दार्थ नगर आंबेडकर नगरचे.आझमगढी वगैरे आहेत पण ते सगळे मोठे श्रीमंत व्यापारी.
आतापर्यंत एकही दंगल दारुखान्यात झालेली नाही.धर्माची चर्चा होत नाही .
फक्त बसण्याउठण्याचे अड्डे वेगळे.मुस्लीम व्यापारी दिलबहारमध्ये जेवतात तर हिंदू भारत हॉटेलमध्ये.
फार वर्षापूर्वी एका शिपब्रेकरला त्याच्या मामानी पळवून नेलं आणि चार कोटी रुपयांची मागणी केली.धक्क्यावर न्युज डेंकालीच्या जंगलासारखी पसरते.सगळ्या व्यापार्यांनी मिळून दोन तासात चार कोटी जमा केले.त्याला सोडवून आणला,त्यानी पण संध्याकाळपर्यंत पैसे परत दिले.मुंबईच्या झवेरीबाजारात जेवढे पैसे नसतील इतके पैसे वरवर फाटक्या दिसणार्या दारुखान्यात आहेत.
भाई लोकांनी शिपब्रेकर कडून आतापर्यंत बर्याच वेळा पैसे उकळण्याचे प्रयत्न केले.चार वर्षापूर्वीच एका ब्रेकर ला महीनाभर धमक्या येत होत्या. ह्या पठ्ठ्यानी पण दाद दिली नाही.पोलीस संरक्षण मागीतले नाही.शेवटचा प्रयत्न म्हणून त्याच्यावर गोळीबार पण झाला पण खंडणी नाही मिळाली.त्यानंतर सगळं बंद.खंडणी देणारा जीवाला घाबरतो .इथे जीवापेक्षा व्यापार आणि पैसा महत्वाचा.
-----------------------------------------------------------------------
शिप ब्रेकींगचा धंदा खरं म्हणजे सुरु केला बोहरी लोकांनी. मारवाड्यांनी पैशाच्या जोरावर बोहर्यांचा धंदा आपल्याकडे खेचून घेतला.बोहरी भावनगरला गेले. आजही भर समुद्रात जहाज कापायची क्षमता फक्त बोहरी कंपनीकडेच आहे.बोहरी या धंद्याचं फॉरवर्ड इंटीग्रेशन करणं म्हणतात तसं काही करू शकले नाहीत. मारवाड्यांनी जहाजापासून निघणार्या भंगारातून सळई बनवण्याच्या रोलींग मिल घालून नफ्याचं प्रमाण वाढवलं.
त्यातून बोहरी तसे शामळू. शिवी गाळ ,मारामारी हा त्यांचा प्रांत नव्हता. आधी आधी जहाजं इंटरनेशनल मार्केट मधून घोळ न होता यायची नंतर भंगार जहाजाचं सर्कीट भाई लोकांकडे गेलं. बोहरी या लोकांशी व्यवहार करेनासे झाले.
मारवाड्यांना काही सोयरसुतक नसल्याने धंदा मारवाड्यांच्या हातात आला. जहाजं हाँगकाँग ऐवजी दुबईहून यायला सुरुवात झाली. मी दारुखान्यात असताना बहुतेक जहाजं विकी नावाच्या डॉन कडून यायची.
जहाजाची अर्धी किंमत चेकनी आणि उरलेली हवाल्यानी.
-----------------------------------------------------------------------
शिप ब्रेकर हा दारुखान्याचा आत्मा. सर्वाधार. जहाज पैसे टाकून आणणं हे त्याचं काम .बिपीटीचा धक्का हातात ठेवणं हे त्याचं कर्तव्य. शिप ब्रेकरचं जहाज कापणारा काँट्रॅक्टर वेगळाच असतो. त्याची संपत्ती म्हणजे त्याची ओरीया लोकांची गँग. काँट्रॅक्टरकडे चार ते पाच हजारांची गँग असते. मंदीच्या काळात हजाराची. ओरीया लेबर जगातलं सगळ्यात स्वस्त लेबर असावं.दहा तासाची शिफ्ट.पगार शंभर रुपये. काम म्हणजे रोज जिवावरची जोखीम.
मी पहील्यांदा गेलो तेव्हा मला मोठं काम कोणी देईल यावर दारुखान्याचा विश्वास नव्हता.याला कारण माझा पार्टनर लाडले हुसेन. लाडले हुसेन म्हणजे दारुखान्याची चालती बोलती हिस्ट्री. दारुखान्याच्या अधिकारक्रमात शेवटच्या पातळीवर.तरीपण लाडल्याला शिपब्रेकर घाबरायचे कारण लाडल्याकडे भीड मुरव्वत हा प्रकारच नव्हता.
भयंकर उर्मट माणूस. तोंड अफाट चालायचं .तसा अधिकारही त्यानी मिळवला होता त्याच्या कामाच्या जोरावर.
अडाणी माणूस. उर्दूत नाव लिहीण्यापलीकडे शिक्षण नव्हतं .पण जहाजावर एक फेरी मारली की जहाजात किती टन केबल किती टन मोटर आणि किती माल निघेल याचा अचूक अंदाज द्यायचा.याचा आवाज शेंदूर खाल्ल्यासारखा घोगरा. केस मेंदीनी तांबडे रंगवलेले. भडक कलरचा सफारी .
लाडले हुसेनच्या हाताखाली माझी शागीर्दी सुरु झाली .भंगारवाले कधीच एकमेकाना काही शिकवत नाही. रेस पोटापाण्याची असते. पण लाडला मला शिकवत होता कारण लाडल्याचे पैसे संपले होते .दोन वर्षं उधारी करून घर चालवत होता. लाडलेला एकूण अकरा मुलं .दोन वर्षापूर्वी त्याला हार्ट अटॅक आला होता म्हणून खंद पडला होता नाहीतर तेरा पण झाली असती.लाडल्याच मोठा मुलगा कमर अब्बास. चोवीस वर्षाचा.अक्कल कमीच. बापाचं बोट धरून फिरायचा.लाडला त्याच्या पध्दतीनी तो मला दारुखान्याची ओळख करून देत होता.
शिप ब्रेकरचं ऑफीस धक्क्यावर एका मचाणासारखं असतं .त्याच्या तळाशी मालाचं गोडाऊन .माल म्हणजे तांबा पितळ गन मेटल वगैरे.या गोडाऊनचा मालवाला म्हणजे ब्रेकरचा खास माणूस.
बाकीची खास माणसं म्हणजे मुकादम. मुकादम ब्रेकरच्या खास मर्जीतले.मेलाराम सेठचा आप्पा मुकादम सेठ दोन महीने आला नाही तरी जहाज कापून मोकळं करतो.एक जहाज मोकळं करणं म्हणजे पंधरा ते विस करोडची उलाढाल. आता खास मर्जी राखायला मुकादमाची वर्दी काही खास नसते.इतरांइतका पगारच त्याला मिळतो पण धक्क्यावर येणारा प्रत्येक व्यापारी त्याला चहापाणी देतो. दारुखान्याचं चहापाणी वर्षभरात साधारण लाख दोन लाखाचं असतं. ब्रेकर एव्हढा कामात व्यस्त असतो की सौदे जवळजवळ मुकादमच पटवतात. शिक्कामोर्तब फक्त मालक करतो.
काँट्रॅक्टरचा मुकादम वेगळा असतो .त्याला लोडींग अन लोडींगची कमाई असते. यानंतरचा मान असतो क्रेन ऑपरेटर आणि विंच चालवणार्यांना.त्यांना थोडसं वर उत्पन्न असतं.
-----------------------------------------------------------------------
बाकी सगळे ओरीये असतात ज्यांना माणसात मोजलं जात नाही.त्यांना नावं असतात गावं असतात, कदाचीत मुलबाळं पण असतील पण धक्क्यावर उरीया एक वस्तू असते. एक उरीया आणि शंभर उरीये.उरीयाला प्रमोशन म्हणजे उरीयाचा बत्तीवाला बनतो. बत्तीवाला म्हणजे गॅस कटींग करणारा.त्यापलीकडे काही नाही. उरीया गावातून येतो. कामाच्या चरकात चाळीशीत म्हातारा होतो.किवा आधीच जहाजात मरतो. सेफ्टी रुल्स काहीच नसल्याने दरवर्षी एखादं दोन उरीये तरी पडून किवा जळून मरतात. त्याची भरपाई जेमतेम पंचवीस हजार रुपये. पोलीस स्टेशनला लाख रुपये. धक्का चालू रहातो. तो तसा चालू रहाणं हा दारुखान्याच्या अस्तीत्वाचा प्रश्न. त्र्याण्णवच्या दंगलीत पलीकडे माझगाव जळत होतं पण दारुखान्याला काम नेहेमी प्रमाणे चालू.
-----------------------------------------------------------------------
सकाळी आठ वाजता धक्क्यावर काम चालू होतं .
व्यापारी यायला सुरुवात होते अकरा वाजता. शेठ येतात दिड वाजता.
ब्रेकरची डोकेदुखी म्हणजे सरकारी माणसं आणि बँक सांभाळणं. कस्टम, एक्साईज, सेल्स टेक्स, ऑक्ट्रॉय, बिपीटी, म्युनीसीपालीटी. आरटीओ, एक्सोप्लोजीव्ह लायसन, आणि लोखंडाचा बाजारभाव. त्यामुळे तो आधीच गरम होऊन येतो .
आल्याआल्या मुकादमासोबत आपल्या धक्क्यावर चक्कर मारतो. आउटपुट तपासतो. लोखंडाचा भाव पडत असेल तर उरीये कमी करतो. वाढत असेल तर ओव्हरटाईम करून घेतो.
त्यानंतर वसूलीची कामं सुरु होतात. फोन वरून प्रचंड शिवीगाळ होते. मिलवाल्याच्या ब्रोकरला आईबहीणीवरून शिव्या दिल्या जातात.
आणि मग आलेल्या व्यापांर्याशी बोलणी चालू होतात. व्यापारी पाचशे रुपयाचा असतो आणि पन्नास लाखाचा पण असतो. दारुखान्याला त्याचं वावडं नसतं. एक जहाज साधारण चार पाचशे व्यापार्यांना रोजगार मिळवून देतो. प्रत्येक व्यापार्याची खासीयत असते.
ब्रेकरचा मोठा पैसा येतो जहाज कापून निघणार्या प्लेटमधून. त्यामुळे प्लेटवाल्याला आधी प्राधान्य मिळतं.बाजार काय आहे ते सगळ्यांनाच माहीती असतं.त्या भावातही दहा विस पैशावरून झकाक्झकी होते. मालक धक्के देत ब्रोकरला मचाणाच्या खाली पण पाठवतो.
हा सगळा पैसे खेचण्याचा कांगावा असतो.थोड्या वेळानी ब्रोकर परत येतो. बोलणी चालू होतात. चारआणी आणि आठआणी अशी चर्चा चालू होते.चार आणी आणि आठाआणी म्हणजे प्लेटची जाडी. नंतर येतात एचेमएस वाले. म्हणजे हेवी मेल्टींग स्क्रॅपवाले. त्यानंतर पाईपवाले. चिल्लर व्यापारी बाजूला वाट बघत उभे असतात. मूड झाला की त्यांच्याशी पण शिपब्रेकर बोलतो. झालेले सौदे मुकादम टिपून घेत असतो.हा गलका संपेपर्यंत डिलीव्हरीच्या गाड्या भरलेल्या असतात. ज्यांनी मागच्या वेळी उशीरा पैसे दिले असतील त्यांच्या गाड्या गेटशी रोखल्या जातात.शिवीगाळ चालू होते. थोडीशी रोख रक्कम काढली जाते. गाडी बाहेर पडते.
----------------------------------------------------------------------
पण हे सगळे जहाज कापायला सुरुवात झाल्यावर. आधी जहाज आणणं फार कष्टाचं काम .त्यातही मेटल कंटेंट जास्त असलेली जहाजं आणली जातात.
टँकर जहाजं मोठ्ठी असतात पण लोखंड कमी निघतं. कापायचं म्हणजे आधी झीरो गॅस सर्टीफीकेट आणायला लागतं. धक्क्यावर येऊनही जहाज बरेच दिवस थांबतं.
कार्गो जहाजात भरपूर लोखंड आणि माल पण .माल म्हणजे तांबं आणि पितळ.रीफर जहाजात भरपूर अॅल्युमिनीयम मिळतं.
पण सगळ्यात मस्त आणि स्वस्त प्रकार म्हणजे बाल्टीक मधून येणारी फिश फॅक्टरी.समुद्रात आतपर्यंत जाऊन मासळी पकडणारी ही जहाजं म्हणजे तरंगती फॅक्टरी. त्या जहाजातचच माशांचं तेल काढलं जातं .आकारानी छोटी पण भरपूर लोखंड असलेली जहाजं म्हणजे शिप ब्रेकरचा पोट भरीचा आहार.
सर्व सामान्यांप्रमाणे प्रत्येक शिप ब्रेकरचं स्वप्न असतं जंगी जहाज आणण्याचं. जंगी जहाज म्हणजे नेव्हीचं जहाज. यात माल साफ असतो. तांब्या पितळेची रेलचेल असते.
एंकरेज मधून ज्या दिवशी जहाज यायचं असेल त्यादिवशी दारुखान्यातली हलचल बघण्यासारखी असते. व्यापारी त्यातल्यात्यात स्वच्छ कपडे घालून सकाळपासून धक्क्यावर भरतीची वाट बघत असतात. भरती सुरु झाली की टाच उंचावून जहाज आलं का ते बघतात.आधी एक पायलट लाँच दिसायला लागते. त्याच्या पाठोपाठ जहाज येतं किनार्या पासून शंभर मिटरवर एंजीन बंद होतं पाण्याची खोली कमी होते.जहाजाचा पंखा चिखलात अडकतो आणि जहाज फसून उभं राहतं.
किनार्यावर जल्लोष होतो. अंदाज बांधले जातात. एक मोठा लोखंडाचा दोर जहाजाच्या नाकात अडकवला जातो. पाणी वाढलं तर जहाज पळून जाउ नये म्हणून दोन्ही बाजूनी दोर बांधले जातात.दोरीच्या शिड्यांनी कॅप्टन आणि बाकीचा क्रू ऊतरतो.शिपब्रेकरची माणसं जहाजाचा ताबा घेतात.
प्रतिक्रिया
30 Sep 2009 - 12:27 pm | श्रावण मोडक
पार्श्वभूमी. लेखन समजून घेण्यापुरती खचितच कळतेय. जगणं समजून घेता येईल का हा अलाहीदा प्रश्न.
30 Sep 2009 - 12:40 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
शिवाय रामदासजी, तुमच्या लिखाणाची आम्ही इतकी अधाशीपणे वाट पहात असतो, की तुम्ही तासाला एक भाग जरी टाकला तरी आम्हाला ते कमीच वाटणार.
30 Sep 2009 - 12:46 pm | विंजिनेर
असेच म्हणतो. पण वेगळे आणि भन्नाट जग दिसते आहे हे खरेच...
2 Oct 2009 - 5:53 pm | स्वाती दिनेश
पार्श्वभूमी. लेखन समजून घेण्यापुरती खचितच कळतेय. जगणं समजून घेता येईल का हा अलाहीदा प्रश्न
असेच म्हणते.
स्वाती
30 Sep 2009 - 12:53 pm | धमाल मुलगा
बाबासेठ ( :) ),
येडा होतोय हे सगळं वाचुन. अशक्य दुनिया दाखवताय.
पहिलीच प्रतिक्रिया मोडकांची..आणि तीही ही अशी अस्सल...आम्ही काय बोलायचं पुढं?
बाकी, कंटाळवाणं वगैरे काहीही नाही हो वाटत..भारीच वाटतंय! आतुरतेनं वाट पाहतोय. :)
30 Sep 2009 - 1:47 pm | मेघना भुस्कुटे
अगदी अगदी. यात काही 'घटना' नसल्या तरी पुढच्या गोष्टी समजून घ्यायला ही दुनिया समजणं आवश्यकच आहे.
30 Sep 2009 - 6:43 pm | रेवती
हेच म्हणते. माझी बोलती बंद!
रेवती
30 Sep 2009 - 12:53 pm | प्रसन्न केसकर
माहिती दिलीत.
एका मित्रानं भावनगरहुन कापलेल्या जहाजाचा माल आणला होता तेव्हा त्याच्याकडुन थोडंफार ऐकलं होतं या धंद्याबाबत. पण एव्हढे डिटेल नव्हते माहिती. अजुन येऊ द्या. वेगळंच आहे हे विश्व!
अवांतरः फॉरिन इंपोर्ट मालाबाबत पण वाचायला आवडेल.
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
30 Sep 2009 - 12:57 pm | बिपिन कार्यकर्ते
सेठ... हा भाग वर्णनात्मक असला तरी कंटाळवाणा अजिबात नाहीये. बरेच नवीन काही कळले. आयुष्य मुंबईत गेलं तरी तिथल्या जीवनाचे अनेकानेक कंगोरे हे कधीच कळत नाहीत, त्यातलाच हा एक. (काळबादेवी प्रिन्सेस स्ट्रीट वरचे जग हा असाच अजून एक कंगोरा). तुमची शैली अगदी प्रवाही असल्याने कुठेही अडखळायला होत नाही.
आता पुढे... भटोबा म्हणतात तसे, तासाला एक भाग आला तर अति उत्तम.
बिपिन कार्यकर्ते
30 Sep 2009 - 1:01 pm | नंदन
- अगदी असेच म्हणतो. पुढच्या भागाची व्यापारी अँकरेजच्या जहाजाची वाट पाहतात, तशी वाट पाहतो आहे :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Sep 2009 - 1:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या लिखाणाची फारच उत्सुकतेने वाट पहात असते. तुमचं अनुभवविश्व आणि वर्णनक्षमता यांना यथायोग्य दाद देण्याएवढीही शब्दसंपदा माझ्याकडे नाही.
अदिती
30 Sep 2009 - 8:32 pm | संदीप चित्रे
प्रत्येक वेळी माहितीचा नवीन खजिना मिळतो.
पुढील लेखाची वाट बघतो आहे(च).
30 Sep 2009 - 12:58 pm | सहज
अगदी शब्दचित्र उभे केलेत पण तरी फोटो टाकायला पाहिजे होते.
ग्रीनपीस चे अहवाल, मधे एक फ्रेंच युद्धनौका कटींगला येणार होती त्यावरुन गदारोळ (बहुतेक राजकारणदेखील असु शकते) पाकीस्तान, बांग्लादेश व भारत इथे जोरात चालणारा हा व्यवसाय, सुरक्षा नियम, प्रदुषण इ इ वरुन थोडेसे ऐकले होते.
थोडे शोधले असता हे दुवे मिळाले. दुवा १, व हे फोटो
30 Sep 2009 - 1:51 pm | गणपा
दासबुवा, हा भागही उत्तम जमलाय. नेहमीप्रमाणे बरीच नव-नवीन माहीती मिळतेय या लेखमालेतुन. मुळीच कंटाळवाणा नाही.
सहजराव, फोटो आणि दुव्या बद्दल आमचा दुवा घ्या.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
30 Sep 2009 - 1:37 pm | घाशीराम कोतवाल १.२
जियो रामदास शेट अहो माझगाव रे रोड डॉकयार्ड मस्त उभा केलात बाय द वे अजुन ही रे रोड ला हा धंदा फुल्ल फॉर्म मधे चालतो
खुप मस्त झाला आहे हा भाग
( माझगावकर ) घाशीराम कोतवाल
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
30 Sep 2009 - 2:03 pm | समंजस
रामदासभाऊ, तुमची ही धातुकोश लेखमाला अप्रतिम आहे!
प्रत्येक भागाला उत्कंठा वाढतेय! तुमच्या लेखनशैली बद्दल तर बोलायलाच नको
इतकी मनाची पकड घेणारी आहे!!
रे रोड च्या भागात मला सुदधा कामा निमीत्त जाण्याची संधी मिळाली होती, खरंच
हा भाग म्हणजे एक वेगळं विश्वच आहे. आपण मुंबईतच आहोत ह्या वर विश्वास बसत नाही एवढं हे विश्व वेगळं आहे! हे विश्व फक्त बघुनंच कळत की काय आहे, अन्यथा कुठलंही वर्णन अपुरं आहे!!
पुढील भागांची वाट बघतोय :)
30 Sep 2009 - 2:18 pm | दिपक
वामसुतांच्या व्हेलाळानंतर पुढिल भांगाची हावरटासारखी वाट बघायला लावणारी लेखमालिका. येउद्यात असेच रोज रोज एक भाग. बरिच माहिती मिळाली.
30 Sep 2009 - 2:40 pm | सुनील
अजिबात कंटाळवाणा वगैरे नाही, याउलट मजा येतेय वाचायला! पार्श्वभूमी समजली आता पुढील कथा येउदे लवकर.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Sep 2009 - 3:05 pm | भोचक
कायच्या काय जग आहे. मोडकसर म्हणतात त्याला पूर्णतः अनुमोदन. तिथल्या माणसांविषयीही सुद्धा सविस्तर लिहा. त्यांना समजून घ्यायलाही मजा येईल. का कुणास ठाऊक तुमच्या लाडले पार्टनरविषयीही खूप उत्सुकता वाटतेय.
बाकी पटापट भाग टाकण्याविषयी इतरांच्या मताशी सहमत.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
30 Sep 2009 - 3:06 pm | llपुण्याचे पेशवेll
सुंदर. या माणसाने काय काय पाहीले आहे कोण जाणे..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
30 Sep 2009 - 3:39 pm | JAGOMOHANPYARE
पाणी वाढलं तर जहाज पळून जाउ नये म्हणून दोन्ही बाजूनी दोर बांधले
लई भारी शब्दप्रयोग.... :)
30 Sep 2009 - 5:02 pm | झकासराव
बिलकुलच माहित नसलेल्या जगाची किती डिट्टेलमध्ये माहिती आहे ही.
बिलकुल कंटाळवाण नाहिये हे. :)
ही लेखमालाच जबरदस्त सुरु आहे.
30 Sep 2009 - 5:09 pm | स्वाती२
मस्त झालाय हा ही भाग.
30 Sep 2009 - 5:09 pm | प्रभो
नादलेस झालय लेखन
--प्रभो
30 Sep 2009 - 6:13 pm | मी-सौरभ
:)
सौरभ
30 Sep 2009 - 9:03 pm | चतुरंग
टाचा उंच करुन बंदरात शिरणारं जहाज बघतोय! :B
बाकी बोलती बंद! [(
(आधाशी वाचक)चतुरंग
1 Oct 2009 - 2:05 am | टुकुल
मला भस्म्या झालाय तुमच्या लेखांचा आणी अनुभवांचा...
लवकर लिहा पुढचे भाग.. जास्त तग नाही धरु शकत :-)
नेहमीसारखेच जबरा लेखन..
--टुकुल
1 Oct 2009 - 2:40 am | प्राजु
काही काही माहिती नव्ह्तं या दुनियेबद्दल..
हे लोखंडाचं जग पृथ्वीतलावरचंच आहे ना?
विलक्षण आहे सारं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Oct 2009 - 3:53 am | धनंजय
रामदासांनी दररोज मेजवानी घालायचे ठरवले आहे. मस्त लेखन.
1 Oct 2009 - 4:46 am | पाषाणभेद
भाय आप बोले तो एकदम झक्कास लिखते है|
आपूनकाभी भंगार का धंदा है अलंग- भावनगर में| कब्बी टैम मिले तो चायपानी के लिये आना जरूर|
साला कब्बी सोचा नही था के इतना बडा आदमी आपुन भंगारवालेके धंदेपे लिखेगा|
-----------------------------------
- नाम तो है पाषाणभेद उर्फ दगडफोड्या लेकीन काम करता है भंगार का!
1 Oct 2009 - 6:48 am | वैशाली हसमनीस
आपल्या लेखमालांतून एका नव्या वास्तवाची ओळख होत आहे.उत्सुकता वाढत आहे.पुढचे भाग लवकर येउ द्यात.
1 Oct 2009 - 10:52 am | अवलिया
जबरा रामदासशेट जियो !!
येवु द्या पटापट पुढचे भाग ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
1 Oct 2009 - 5:24 pm | विनायक प्रभू
तुमचे लेखन अस्वस्थ करते.
समांतर घटना आठवतात.
2 Oct 2009 - 1:40 am | पिवळा डांबिस
मनोरंजक, पण अस्वस्थ करणारं लिखाण लिहिण्यात रामदासबुवा प्रवीण आहेत...
हे सगळं वाचू नये, उगाच जीवाला त्रास, असंही वाटतं, पण त्याबरोबरच पुढील भागाची उत्कंठाही लागून रहाते...
2 Oct 2009 - 12:31 am | ऋषिकेश
हा भाग कधी आला?
फारच रोचक!..
कंटाळा आणि रामदास यांचे लिखाण एकत्र कसे असेल बरे?
लिहित रहा.. वाट बघत वाचतो आहोतच
ऋषिकेश
------------------
नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
2 Oct 2009 - 7:10 am | दिपाली पाटिल
तुम्ही अतिशय वेगळं जग दाखवताय...डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं दारुखान्याचं...
दिपाली :)
2 Oct 2009 - 8:58 am | विसोबा खेचर
अशी सुंदर लेखमालिका आणि इतरही अनेक उत्तम लेखांची वर्षभर रेलचेल सुरू असल्यामुळे मिपाला वेगळा दिवाळी अंक काढावा लागत नाही!
जिजो रामदासभौ. तुम्हाला माझ्याकडून ब्लॅक लेबल लागू! :)
तात्या.
9 Oct 2009 - 10:49 pm | मी-सौरभ
वाट बघत आहोत ;;)
लवकर येउ दे
सौरभ
20 Aug 2013 - 8:40 pm | अमित भोकरकर
याचा पुढचे भाग कुठे आहेत?
20 Aug 2013 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
पहिले तीन भागः
माझा धातुकोष
माझा धातुकोष. - भाग दुसरा
माझा धातुकोष . भाग तिसरा
21 Aug 2013 - 11:32 am | स्मिता चौगुले
याचे पुढ्चे भाग नाहियेत का??
हे ४ भाग वाचून, या वेगळ्याच अशा दूनियेबद्द्ल कुतुहल वाढलय.. आणखी जानून घ्यायला आवडेल.
21 Aug 2013 - 1:12 pm | प्रभाकर पेठकर
१९७८ ते १९८० ह्या कालखंडात ब्रिटानिया कंपनी, हिन्दूस्थान लिव्हर ह्या कंपन्यांच्या आसपास कामानिमित्त फेर्या झाल्या आहेत. आता तो परिसर अजिबात आठवत नाही पण साधारण चित्र डोळ्यांसमोर उभे आहे.
रामदासजी, तुम्हाला अगदी मनापासून विनम्र अभिवादन. आयुष्याला इतक भिडणं फारच थोड्यांना जमत असावं. तुमचं जीवन प्रेरणादायी आहे.
21 Aug 2013 - 2:03 pm | दत्ता काळे
सहजपणे डोळ्यासमोर दारुखान्याचं आणि घडणार्या व्यवहारांचं चित्र उभं राहीलं.. इतकं सकस, दर्जेदार लेखन. सर तुम्हाला नम्र अभिवादन.
शिपब्रेकींगचं विश्व माहीत नव्हतं. उत्सुकता होती. ह्या लेखमालिकेतून आता कळतेय. चौथा भाग पहिल्यांदा वाचण्यात आला. आता सलगपणे सगळे भाग वाचून काढतो.
21 Aug 2013 - 8:42 pm | आशु जोग
चार वर्षापूर्वीचा धागा वर आणलात. पण धन्यवाद मानू का विचार चालू आहे.
28 Mar 2016 - 12:14 am | Rahul D
राका पुढ्चे भाग नाहियेत का??
17 Mar 2019 - 1:38 am | गवि
काही लेखमाला पूर्ण करण्यासाठी सह्यांची मोहीम आवश्यक आहे असं वाटतं.
लेखकाने ही लेखमाला पुढे लिहीपर्यंत हा धागा खाली जाऊ न देता प्रतिसाद द्यावेत.
21 Mar 2019 - 4:33 pm | मिसळपाव
गविच्या सह्यांच्या मोहिमेत ही माझी सही!
21 Mar 2019 - 8:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
चारही भाग आधाशासारखे वाचुन काढले, पुढे काय?
22 Mar 2019 - 11:38 am | बांवरे
मी पण करतो सही ...
लेखक महोदयांनी लिहीण्याचे करावे !
22 Mar 2019 - 12:20 pm | दीपकजी
बरेच नवीन काही कळले. धन्यवद.
22 Mar 2019 - 12:36 pm | खंडेराव
माझीही सही..पुढचे भाग येऊ द्यावेत..