थँक यू मिस्टर ड्रॅगन – 3
थँक यू मिस्टर ड्रॅगन – ३
पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली. प्रत्यक्ष युद्धात आपण हिंदुस्थानसमोर टिकणार नाही, असाही भयगंड पाकला असल्यामुळे आयएसआयमार्फत दहशतवादी कारवाया देशावर लादत प्रॉक्सी वॉर पाक करत आहे. अमेरिकेला इराकवर ताबा मिळवण्यासाठी आशियात मित्रराष्ट्राची गरज होती. ती आज संपलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी, दि. 13 जानेवारी रोजी अमेरिकी संसदेसमोर जे भाषण केले, त्यात कोणा एका देशावर लष्करी कारवाई करणे याचा अर्थ अमेरिका महासत्ता आहे, असा होत नाही, अशी कबुली दिली. अफगाणिस्तान, इराकच्या बाबतीत अमेरिकेचे धोरण चुकले, हे त्यांनी मान्य केले. तसेच यापुढे अमेरिका अशा प्रकारच्या कारवाया करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी अमेरिकी सिनेटने पाकला एफ-16 ही लढावू विमाने देण्यात येऊ नयेत, अशा सूचना केल्या आहेत. पाक त्यांचा गैरवापर करेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. गेली दोन दशकांहून अधिक काळ पाक दहशतवादी कारवायांना बळ देत आहे. त्यावेळी अमेरिकेला असा निर्णय घ्यावा, असे का वाटले नाही?
अफगाणबाबत अमेरिकेचा अंदाज पूर्ण चुकला. इराकबाबतीतही तेच घडले. आपल्या अफाट लष्करी सामर्थ्याच्या जोरावर इराकला एका दिवसात शरणागती पत्करायला लावू, हा त्यांचा अंदाज चुकीचा ठरला. सद्दाम हुसेनने त्यांना कित्येक महिने झुंझवले. कोवळे अमेरिकी युवक इराकमध्ये मारले गेले. पिसाटून जात अमेरिकेने अक्षरशः इराकला बॉम्बगोळ्यांनी भाजून काढले. तरीही सद्दाम सहजी शरण आला नाही. लादेनला पाकने आश्रय दिल्यामुळे तर पाकला यापुढे मदत का करावी, असा प्रश्न अमेरिकेत उपस्थित झाला. त्या प्रश्नाचे उत्तरच बराक ओबामा यांनी दिले आहे, असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 20 महिन्यांच्या कालावधीत जवळपास जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांना भेटी दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावर आमंत्रित करून, हिंदुस्थानी लष्करी सामर्थ्य काय आहे, ते दाखवून दिले. त्यानंतर ते स्वतः दोन वेळा अमेरिकेला भेट देऊन आले. प्रत्येक भेटीत त्यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध कसे वृद्धिंगत होतील, याचीच काळजी घेतली. चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, कॅनडा, रशिया या बलाढ्य देशांबरोबरच त्यांनी शेजारील राष्ट्रांनाही भेटी दिल्या. प्रत्येक देशात त्यांचे स्वागत सारे शिष्टाचार बाजूला ठेवत झाले. हिंदुस्थान हा आता अविकसीत देश राहिलेला नाही, हाच संदेश यातून मिळत होता. अफगाणमध्ये त्यांनी केलेले भाषण उभय देशांतील संबंध मजबूत होण्यात झाले. अफगाणवरून परतत असतानाच, त्यांनी साऱ्यांनाच चकीत करणारा पाकचा थांबा घेतला. त्यांच्या या भेटीचे राजकारण करण्यात आले. मात्र, पठाणकोट वायू दळाच्या तळावरील हल्ल्यातील मास्टरमाईंड मसूद अजहर याला पाकने आज अटक केल्याचे वृत्त आले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात गेली अनेक वर्षे देशात दहशतवादी हल्ला झाला की, अमेरिकेकडे रडगाणे गात, पाकची तक्रार करायची, ही चुकीची प्रथा रुढ झाली होती. मोदी यांनी ती मोडून काढत, थेट पाकलाच दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करा, अन्यथा द्विपक्षीय चर्चा होणार नाही, अशा सज्जड शब्दांत इशारा दिला. पाकचे कोठेही नाव न घेता, त्यांच्यापर्यंत सारे पुरावे सोपवण्यात आले. मोदी यांच्या पाक भेटीचा परिणाम दिसून आलेला आहे. गेली पंधरा वर्षे जो मसूद अजहर पाकमध्ये असूनही त्याचा तपास लागत नव्हता, त्याला अटक करण्यात आली आहे. कालपर्यंत पुरेसे पुरावे नाहीत, अशी तक्रार करणाऱ्या पाकने ही कारवाई केली आहे. पाकी सूत्रांनुसार त्याच्या मुसक्या तीन दिवसांपूर्वीच आवळल्या गेल्या होत्या.
पाकने ही कारवाई का केली?
ज्यावेळी मोदी देशांतर्गत विरोधकांना न जुमानता आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद या एका मुद्यावर जनमत आपल्याबाजूने वळवत होते, त्यावेळी शरीफ हे पुन्हा पुन्हा काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्र संघाची मनधरणी करण्यात मग्न होते. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे मोदी जगभरात ठणकावून सांगत असताना, पाक मात्र हिंदुस्थानात हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आले आहे, त्यामुळे तेथील मुस्लीम बांधव धोक्यात आले आहेत, असा कांगावा करण्यात मग्न होते. आज पाकचे चीन सोडल्यास कोणाशीही मित्रत्वाचे संबंध नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो पूर्णतः एकटा पडलेला आहे. मोदी यांनी फ्रान्स येथे दहशतवादाविरोधात एकत्रित लढा देण्याची गरज तीव्र केलेली असतानाच, पॅरीसवर आत्मघाती दहशतवादी हल्ला लादला गेला. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या भूमिकेचे स्वागत होणे, अपरिहार्य असेच होते.
काश्मीरला हिंदुस्थानपासून वेगळे करणे, या एकाच हेतूने पाकने दहशतवाद्यांना आश्रय दिला. त्यामुळेच दहशतवाद्यांचे नंदनवन अशी पाकची ओळख बनली. हाच दहशतवाद भस्मासूर होऊन पाकला भस्म करू पहात आहे. दहशतवादाला बळ देण्यासाठी आपली सारी ताकद पणाला लावणाऱ्या पाकने देशातील नागरिकांसाठी ज्या मूलभूत सोयीसुविधा लागतात, त्यांची पूर्तता केलीच नाही. म्हणूनच देशांतर्गत बेरोजगारी वाढली. शिक्षणाची व्यवस्था नसल्याने, युवकांनी हातात काही हजार रुपयांसाठी एके-47 घेतल्या.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकने घुसखोरी करून जो प्रांत बळकावलेला आहे, तेथून त्याने आपले सैन्य माघारी घ्यावे, असा ठराव संसदेत दि. 22 फेब्रुवारी 1994 रोजी करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पाकवर असे करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. पाकने जम्मू-काश्मीरचा काही भूभाग चीनला सप्रेम भेट म्हणूनही दिला. मात्र, काँग्रेसी सरकार केवळ पहात राहिले.
1965 तसेच 1971 च्या युद्धात सडकून पराभव झाल्यामुळे पाकचे नितिधैर्य खालावलेले आहे. थेट युद्ध टाळण्यावर त्यांचा भर आहे. पाकपाशी अण्वस्त्रे असली, तरी पाकने एका अण्वस्त्राचा वापर केला तरी हिंदुस्थान संपूर्ण पाकची राखरांगोळी करू शकतो, इतकी अण्वस्त्रे आपणापाशी आहेत. मात्र काश्मीरसाठी पाक सुन्नीबहुल पंजाब प्रांत गमावेल का, हा प्रश्न असल्याने पाककडून अण्वस्त्रे वापरली जाणार नाहीत, हे नक्कीच. सौदी अरेबियाने पाकमधील सुन्नीपंथीयांना पाठिंबा दिला आहे, तर इराणने शियापंथियांच्या मागे आपली ताकद लावली आहे. शिया-सुन्नी वादात पाकमध्ये यादवीसदृष्य परिस्थिती आहे. यादवीत निष्पाप पाकी नागरिक हकनाक मरत आहेत. त्यामुळेच पाकला वास्तवाचे भान आले आहे, असे वाटते.
ज्या मसूर अजहरच्या सुटकेसाठी दि. 24 डिसेंबर 1999 रोजी पाच दहशतवाद्यांनी एअर इंडियाच्या आईसी-814 या विमानाचे काठमांडू येथून अपहरण केले होते, त्याच मसूर अजहरला आज पाकने ताब्यात घेतले आहे. मसूर अजहर हा हिंदुस्थानातील मोस्ट वाँटेड अतिरेकी आहे. त्याच्या सुटकेसाठीच विमान अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे हिंदुस्थानला त्याचा ताबा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजपाप्रणित रालोआ सरकारच्या काळात त्याची सुटका करणे हिंदुस्थानला भाग पडले होते, कारण प्रश्न 178 प्रवाशांचा होता. त्याच मसूर अजहरच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. आणि काव्यगत न्याय हा आहे की, आजही केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचेच सरकार आहे.
(क्रमशः)
पाकला १९७१ च्या युद्धात नमवणारे लेफ्टनंट जनरल जेकब यांचे बुधवारी, दि. १३ जानेवारी रोजी निधन झाले. पाकी सैनिकांना ढाका येथे शरण आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. केवळ ३ हजार जवानांच्या बळावर त्यांनी सुमारे ३० हजार पाकी सैन्याला गुडघे टेकायला लावले. पूर्व पाकची राजधानी पाडणारे लेफ्टनंट जनरल जेकब यांचे पश्चिम पाकने हिंदुस्थानी मुत्सद्देगिरी समोर शरणागती पत्करली, त्याच दिवशी निधन झाले. त्यांना अखेरचा सलाम…
संजीव ओक
प्रतिक्रिया
अभिनिवेशी लेख. बरीचशी विधाने
+१
हे सगळे
अमान्य आहे