✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जप

न
निनाद यांनी
Tue, 10/11/2016 - 05:15  ·  लेख
लेख
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो. ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही. इशारा संपला! --- हा लेख येथे का? पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी. त्यांची आज्ञा पाळून हे लिखाण येथे देत आहे. ते गोड मानून घ्यावे. लिखाण करताना ते कायप्पा साठी केलेले असल्याने त्यात विस्तारभय आलेलेले आहे म्हणून लेखाची लांबी कमी आहे. यातील अनेक मुद्दे विस्ताराने चर्चा करण्याजोगे आहेत. तशी मुद्द्याला धरून चर्चा झाल्यास विषय अधिक उलगडला जाऊ शकतो. मिपा वर या विषयावर अनेक अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी उदार मनाने यावर अधिक लिहावे. तसेच माझ्या लेखनात काही चुका झाल्या असल्यास दाखवून द्याव्यात व त्यासाठी माफ करावे. गुरूदेवांच्या कृपेने हे लिखाण झाले, यात माझे असे काही नाही. त्यामुळे कोणताही प्रताधिकार नाही. (तुम्ही हा लेख आनंदाने कॉपी पेस्ट करून शेयर करू शकता. मात्र लेखनात बदल करण्यापुर्वी माझी परवानगी आवश्यक राहील) जप प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान व त्यातील पद्धती वापरल्यास हे मनुष्याचा सर्वांगिण विकास करण्यास मदत करते करते. त्यातले अगदी छोटेछोटे उपायही सबळ असतात आणि मोठा परिणाम करून जातात. उदाहरणार्थ जप. आता जप केल्याने कसला काय फरक पडणार म्हणून झिडकारून टाकणे सहज शक्य आहे. पण याच वेळी 'करून तर पाहू या' असा विचारही करता येईल. निव्वळ मनाला शांतता म्हणून हवा असल्यास जप कुठे ही करता येतो. जप केला की चटकन मन एकाग्र व्हायला मदत होते. काही वेळा जप केल्याने आपला आत्मविश्वास वाढला असेही अनुभवास येते. जप हा भक्ती मार्गातला साधनेचा सर्वात सोपा प्रकार आहे. फक्त इष्टदेवतेचे स्मरण, असा जप सहज शक्य असतो. किंवा हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हा सर्वगुरू मान्य जपही करता येतो. पण जप करण्या आधी त्याची पद्धती व्यवस्थित माहिती करुन घेणे आवश्यक राहील. जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील तीन प्रमुख प्रकार आपण पाहू या. खालील माहिती वाचल्या नंतर लगेच जप करण्याची घाई करू नये. ज्या प्रकार चा जप गुरू ने दिला असेल तोच करावा. यासाठी योग्य गुरू फार महत्त्वाचा असतो. मन एकाग्र करून जप केला पाहिजे. जप ही एक प्रकारची सिद्धी आहे आणि ती साधनेतून मिळवावी लागते हे ध्यानात ठेवावे. तर अशा या जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्रमुख जपांचे प्रकार व परिणाम आपण पाहू या. वाचिक जप - वाचेने केलेला जप म्हणजे वाचिक जप. म्हणजे मोठयाने उच्चार करून मंत्रांचे पठण. प्रत्येक शब्द त्यातील वर्ण सुयोग्य प्रकारे अनेकवार उच्चारले जातात. अत्यंत साधी आणि सोपी क्रिया असते. परंतु मनाची एकाग्रता यात अपेक्षित आहे. वाचिक जप केल्याने मेंदु मध्ये काही घटना घडू लागतात. यामुळे मेंदूतील Broca या विभागावर परिणाम होतो. हा विभाग जप केल्याने उद्दीपित होती असे म्हणतात. ब्रोका हा विभाग मेंदू मध्ये फ्रंटल लोबच्या खाली असतो. ब्रॉडमन एरिया 44 आणि 45 असे त्याचे दोन भाग आहेत. ब्रोका आणि फ्रंटल लोब यांचे एकमेकातील संबंध अजून पूर्णपणे सुस्पष्ट झालेले नाहीत. परंतु ते उद्दिपीत होतात हे आढळते. पण एरिया 45 हा प्रि फ्रँटल कॉर्टेक्सला जास्त जोडलेला आहे. यांचा संबंध अर्थात भाषा या विषयाशी आहे. आणि वाचिक जप हा भाषेतूनच केला जातो. त्याच वेळी निर्णय क्षमता हे महत्त्वाचे कार्य फ्रंटल लोब करतो. आणि निर्णय शब्दबद्ध करण्यासाठी ब्रोका विभाग मदत करतो असा त्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे सिद्ध झाले आहे. यानुसार वाचिक जपाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जप कसा करावा याची शास्त्रशुद्ध विवेचन आपल्या ऋषींनी केलेले आहे. ते ग्रंथ शोधून त्याचे अधिक अध्ययन आपण केले पाहिजे असे वाटते. उपांशु जप मन एकाग्र करणे आणि भाषिक केंद्राची मदत म्हणून वाचिक जप कार्य करतो. आता उपांशु जप आणि त्याचे परिणाम पाहू या. वाचिक जपामध्ये मन एकाग्र होण्याची प्राथमिक सवय झाली आहे. त्या पलिकडे पोहचण्याची साधना झाली की मग उपांशु जपाची साधना सुरू होते. वाचिक जप ही जप साधनेतील पहिली पायरी आहे उपांशु जप ही पुढील. हा जप करतांना जिभेची हालचाल होते परंतु स्वर मात्र निव्वळ आपल्याला ऐकु येतील इतके कमी असतात. याचे कारण म्हणजे आता बाह्य आवाज 'दाबून टाकण्याची आवश्यकता' उरलेली नसते. मनाचा ताबा अधिक प्रबळ झालेला असतो. अर्थात बाह्य जगात कितीही कोलाहल असला तरी मन स्थिर व एकाग्र असल्याने त्याचा आपल्या साधनेवर परिणाम होत नाही. आणि स्थितप्रज्ञता हे कोणत्याही भारतीय अध्यात्मिक साधनेतील उद्देश्य असते. उपांशु जप करत असताना मेंदुच्या सर्व भागांवर परिणाम होतो. कारण सर्व भाग आपल्याला एकाग्रतेसाठी मदत करतात. परंतु त्यातीलही मेंदुतील पुढील भागावर म्हणजे फ्रंटल लोबवर जास्त परिणाम होते असे आढळते. हा विभाग स्वतः वरील नियंत्रण राखण्याचे कार्य करतो. या शिवाय मनाची एकाग्रता ठेवण्यासही हा भाग मदत करतो. रोज केलेल्या उपांशु जपाने या भागात कायमचे बदल घडतात. हे बदल एकाग्रता आणि स्व-नियमन यासाठी उपयोगी पडतात. या शिवाय काही प्रमाणात सेरेबेलम या स्मरणशक्तीचे नियंत्रण करणार्‍या भागावरही या जपाचा परिणाम होतो. तसेच ब्रेन स्टेम म्हणजे मेंदुचा मध्य भाग, हा संदेशांची देवाणघेवाण नियंत्रित करतो. हा भाग उपांशु जपात कार्यरत होतो. उपांशु जपामध्ये हा विभाग एकाग्रतेचे संदेश फ्रंटल लोबला देतो आणि मग फ्रंटल लोबला तसे कार्य करण्याची सवय लागते. मानस जप अतीव आनंदही नको आणि दु:खी मन:स्थिती ही नको. स्थितप्रज्ञपणे समत्वाने जगाकडे पाहण्याची दृष्टी आणण्यासाठी आपल्या ऋषींनी अनेक साधना विकसित केल्या होत्या त्यातली प्राचीन साधना म्हणजे जप! स्थितप्रज्ञतेकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. पण स्थितप्रज्ञ राहणे फार अवघड आहे. पण मनाला सवय करून जास्तीत जास्त काळ स्थितप्रज्ञ राखता यावे यासाठी सामान्यजनांचा मार्ग जप हा आहे. वर आपण वाचिक जप, उपांशु जप व त्याचे मेंदूवरील परिणाम पाहिले आहेत. आता आपण सर्वात उच्च कोटींचा जप म्हणजे मानस जप याचा विचार करू या. हा जप करताना आपल्याला मिळालेल्या गुरूमंत्रावर संपूर्ण एकाग्रता अपेक्षित आहे. त्यातील प्रत्यके अक्षराचा विचार करायचा आहे. वाचिक जपात इतर आवाज आपल्याला येऊ नयेत म्हणून आपण मोठ्याने जप करून स्वतः ला या भौतिक जगापासून वेगळे करतो. उपांशु जप करताना बाहेरील आवाजापेक्षा मनातील प्रभावी एकाग्रता वाढलेली असते. पण मानस जपात निव्वळ विचारांच्या आधारे आपण स्वतःला स्थितप्रज्ञतेकडे नेतो. या एकाग्रतेचा उपयोग आपल्या मेंदुला अनेक प्रकारे होतो. वाचिक जपामध्ये भाषेचे केंद्र उद्दीपित, उपांशु जपात फ्रंटल लोब कार्यरत तसा मानस जपात प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे विभाग काम उद्दिपित होत असावेत. हे दोन्ही विभाग मेंदुमध्ये विचार प्रोसेस करतात. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स कपाळापासून ते ब्रह्मरंध्रा पर्यंत हा पसरलेला असतो. हे दोन्ही मिळून आपल्या विचारांना प्रोसेस करण्याचे कार्य करतात. तसेच यांच्या खालचा भाग स्मृती म्हणूनही काम करतो. इन्फेरियर फ्रंटल जायरस हे आपल्या विचारांचा पैलू बदलण्याचे काम करतात. म्हणजे कल्पना सुचण्यासाठी आवश्यक बाबी पुरवत असते. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे दोन्ही मिळून अतिशय प्रभावी कल्पना सुचू शकतात. या जपात बहुदा ब्रेन स्टेमही काम करत असावा कारण ब्रेन स्टेम सर्वच मेंदुतील कार्याचे नियोजन करत असतो. अशा रितीने मानस जपाने आपण आपल्या विचार पद्धतीला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वापरू शकतो. मेंदुतील न्युरॉन्स जपाने कसे प्रभावित होतात हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे. परंतु त्यावर ठाम असे काही लेखन सहजतेने हाती लागले नाही. तज्ञांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. नियम आता या माहितीमुळे 'आपणही जप करावा' असे वाटत असेल तर लगेच तसे करू नका. कारण याचे काही नियम आहेत. त्याविषयी अधिक विवेचन पुढील भागात. जप हा कुठेही करता येतो. परंतु साधना म्हणुन करत असल्यास नियम आवश्यक असतात. म्हणून जप नेहमी गुरूदेवांच्या सल्ल्यानेच करावा. जप या साधनेचे तीन प्रकार वाचिक, उपांशु आणि मानस हे आपण पाहिले. अजुनही जपाचे प्रकार आहेत परंतु ते योग साधनेत मोडतात व प्राणायाम सहीत करावयाचे आहेत जसे रेचक कुंभक इत्यादी. जप करून मनाची एकाग्रता साधण्याची सोपी युक्ती वापरायची आहे. आपली प्रज्ञा आणि बुद्धी तेज करण्यासाठी याचा वापर व्हायला हवा आहे. जप आणि त्याचा मेंदुच्या भागांवर होणारे परिणाम पाहिले आहेत. तेव्हा भारतीय ऋषींनी जप हा साधन म्हणून वापरला आहे असेही कदाचित म्हणता येईल. आपले गुरू या जप साधना संदर्भात देतील तो मंत्र जपावा. आपल्या गुरूदेवांच्या मार्गदर्शनानुसार जप करावा. जप शक्यतो सकाळच्या वेळी करावा. आधी गार पाण्याने स्नान करावे. जप करण्यासाठी एक जागा असेल तर उत्तम. ही जागा नित्य स्वच्छ असावी. या जागेवर बसण्यासाठी सुती वस्त्र असावे. जप करण्याचा संख्या संकल्प सोडणार असल्यास संकल्प सोडल्यानंतर त्याची कोणतीही वाच्यता करू नये. कारण एकदा संकल्प सोडला की सोडला! जपाआधी कुणाचीही निंदा करू नये. हिंसा क्रोध काम मोह आणि असत्य या विकारातून दूर असण्याचा प्रयत्न असावा. भुक अथवा तहान लागलेली नसावी. मन विचारांवर वाहू लागले तर तर त्याला परत एकाग्रतेकडे आणावे. जपा आधी कुणाशी वाद असू नये तसेच कुणाचे आशिर्वाद घेऊनही जपास बसू नये. काही प्रसंगी जप पुर्ण होत नाही. सर्वांना संसारीक बंधने असतात. अशावेळी मनाला त्रास असु नये. चित्त स्थिर असु द्यावे. जप झाला नाही अशी रुखरुखही असू देऊ नये. जे झाले ते ईश्वर चरणी सोडावे आणि स्वस्थ मनाने कार्यास लागावे. जी नियतीची इच्छा त्या प्रमाणे होणार आहे हे ध्यानात असावे. परत पुढील वेळी शांतपणे जपास बसावे. जप करण्या आधी मन निर्भय असावे. थोडक्यात निर्विकार मनाने जपास बसावे. परंतु ईश्वर आणि गुरू यांच्या प्रति श्रद्धा व विश्वास मनात असावा. माळ जपा साठी माळ वापरणार असल्यास माळ एकशे आठ मण्यांची असावी असे म्हणतात. माळ सिद्ध करून घेतल्यास उत्तम. यासाठी निरनिराळे मंत्र आहेत. आपले गुरूजी ही माळ सिद्ध करून देऊ शकतील. जप करताना माळेचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये. तसेच माळेचा मध्य - या सुमेरू म्हणतात- तो पार करू नये. त्यावेळी माळ सुलट करून जप पुढे न्यावा. काही वेळा माळ वस्त्राखाली झाकलेली असावी असे म्हणतात. परंतु यावर मतांतरे आहेत. टिपः माळ कशी वापरावी, कोणत्या बोटांचा कसा स्पर्श करावा या विषयी काही पाठभेदही आहेत. त्यासाठी आपल्या गुरूदेवांचे किंवा गुरुजींची मार्गदर्शन घ्यावे. कदाचित येथे सदस्य ही यावर लिहू शकतील. काही वेळा जप करताना मनावर काही ताण येत आहे असे वाटल्यास जप थांबवावा! मन शांत झाल्यावर परत सुरू करावा. जप हा आपल्या इष्टदेवतेसाठी आहे तसाच आपल्या आनंदासाठीही आहे हे नित्य ध्यानात ठेवा. अशा रितीने जप लेख संपन्न झाला. आपल्याला आपला जप आणि त्यातून मिळणारा आनंद लाभू देत हीच प्रार्थना! ||जय श्री गुरूदेव दत्त||
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
समाज
तंत्र
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
माहिती

प्रतिक्रिया द्या
44766 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

प्रतिसादही देऊ नयेत हेही

एस
Tue, 10/11/2016 - 05:55 नवीन
प्रतिसादही देऊ नयेत हेही लिहायचे होते का त्या इशाऱ्यात? ते पराचं सुप्रसिद्ध वाक्य आठवले, 'खिडकी'बद्दलचं. असो.
  • Log in or register to post comments

हा हा हा

निनाद
Tue, 10/11/2016 - 06:02 नवीन
हा हा हा! प्रतिसाद देऊ नका म्हणणारा मी कोण? असे काही म्हणू शकत असतो तर कशाला कायप्पा समुह तयार केला असता? :) फार तर इशार देऊ शकतो म्या पामर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

खिडकी!!! अरारारा एस भाऊ,

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/18/2016 - 21:23 नवीन
खिडकी!!! अरारारा एस भाऊ, उटीवला बाजार अर्ध्या वाक्यात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लेख वाचला ह्याची पोच. इशारा

यशोधरा
Tue, 10/11/2016 - 06:12 नवीन
लेख वाचला ह्याची पोच. इशारा वगैरेची काय आवश्यकता? जर खुल्या मंचावर तुम्ही काही विचार मांडणार तर चर्चा, वाद, प्रतिवाद होणारच. ते ऐका वाचायची तयारी नसेल तर अशा ठिकाणी लिहिणे टाळावे. नाही का?
  • Log in or register to post comments

ह्म्म

निनाद
Tue, 10/11/2016 - 06:20 नवीन
तुमच्या म्हणण्यातही तथ्य आहे. फक्त त्या इशार्‍याचीच चर्चा होत असेल असेल तर तो तसा नसलेला बरा. लेख का दिला याचे कारण वर दिले आहेच. जे काही मिपा कारणेन तयार झाले त्याचा फीड येथेच परत देऊन च्रक्र पुर्ण करणे हा ही एक उद्देश आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असो :) मला तरी लेख साध्य

यशोधरा
Tue, 10/11/2016 - 07:09 नवीन
असो :) मला तरी लेख साध्य ह्यापेक्षा साधनांवर अधिक भर देणारा वाटला, पण व्यक्ती तितक्या प्रकृती हेही खरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/15/2016 - 06:15 नवीन
+१ . वाचक म्हणून इशारा अपमानस्पद वाटला. आणि खरं सांगतो. इशा-यानंतर लेख वाचला नाही. -दिलीप बिरुटे (स्वाभिमानी वाचक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१११

टवाळ कार्टा
Sat, 10/15/2016 - 09:12 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा

निनाद
Fri, 10/28/2016 - 02:44 नवीन
हल्ली इशारा देऊनही लोक ऐकत नाहीत, तेथे तुम्ही इशारा अंमलात आणला याबद्दल तुमचे कौतुक या आणि आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचक म्हणून इशारा अपमानस्पद

असंका
Fri, 10/28/2016 - 09:15 नवीन
वाचक म्हणून इशारा अपमानस्पद वाटला. आणि खरं सांगतो. इशा-यानंतर लेख वाचला नाही.
+१... वाचायची इच्छाच राहिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी फक्त प्रतिसाद वाचले आणि

मोदक
Fri, 10/28/2016 - 10:03 नवीन
मी फक्त प्रतिसाद वाचले आणि येथे आदरणीय सरांची एंट्री बघून फक्त प्रतिसादच वाचत राहीन अशी शक्यता आहे. ...पण बिरुटे सर माझ्या कंपूतले असल्याने त्यांनी मांडलेल्या भुमिकेला सहमती दर्शविणे आद्य कर्तव्य आहे, सो, "वाचक म्हणून इशारा अपमानस्पद वाटला" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

chitraa
Tue, 10/11/2016 - 09:48 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लेख आवडला. खूप चांगली माहिती

श्रीगुरुजी
Fri, 10/14/2016 - 23:23 नवीन
लेख आवडला. खूप चांगली माहिती आहे.
  • Log in or register to post comments

गुरु विन नाही दूजा आधार

झेन
Sat, 10/15/2016 - 08:59 नवीन
महाराजा तूमच्या हेतू बद्दल किंचितही संदेह नाही. पण यात गुरू ही जर बेसिक गरज असेल तर योग्य गुरू मिळवण्यासाठी मार्गदर्शन करावे. तो पर्यंत ही सगळी फोलपटेच नाही का.
  • Log in or register to post comments

कोणत्याही प्रकारचा जप असो

वैभव पवार
Sat, 10/15/2016 - 15:58 नवीन
कोणत्याही प्रकारचा जप असो तो लिमिट मध्ये ठीक आहे जास्त जप केला कि मेमरी लॉस होते. आणि एका लिमिट पर्यंत जो जप माणसाला क्रीटीव्हिटी देतो तोच जप लिमिट नंतर माणसाची क्रीटीव्हिटी नष्ट करतो. ज्ञानेश्वरीत ६ व्य अध्याय मध्ये कुठे हि जप करण्यास सांगितलेले नाही . आजपजाप हि गोष्ट साधकाला आपोआप सिद्ध होते . माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे कि जप साक्षातकराच साधन नाही . पतंजली योगसूत्र मध्ये हि अष्टांगयोग मध्ये कुठेही जपाचा उल्लेख नाही . पण समाधी पाद मध्ये केवळ मनाच्या शुद्धी साठी ओमcha जप सांगितला आहे. पण त्यातही एकाक्षरी मंत्राचा जप करणे संसारी किंव्हा सामान्य (काळात नाही काय म्हणावं ) माणसासाठी पायावर धोंडा मारून घ्या सारखे आहे. त्यामुळे हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हा मला वाटत सगळ्यात गोड़ सुंदर आणि सेफ मंत्र आहे.
  • Log in or register to post comments

सेफ??????

अभ्या..
Sat, 10/15/2016 - 16:12 नवीन
सेफ?????? मंत्रात पण असते असे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार

सेफ म्हणण्या पेक्षा कानाला

विशुमित
Sat, 10/15/2016 - 16:28 नवीन
सेफ म्हणण्या पेक्षा कानाला खूपच सुंदर वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओके ओके, मला वाटलं मंत्रांचे

अभ्या..
Sat, 10/15/2016 - 16:36 नवीन
ओके ओके, मला वाटलं मंत्रांचे पण काही साईड इफेक्ट वगैरे असतात काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

हो नक्कीच

वैभव पवार
Sat, 10/15/2016 - 17:16 नवीन
सिम्पल लाॅजिक आहे . एक व्यक्ती एकच शब्द रिपीट करत असेल तर तर त्याचा परिणाम नक्कीच होतो । सब दिमाग का खेल है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हो नक्कीच

वैभव पवार
Sat, 10/15/2016 - 17:27 नवीन
सिम्पल लाॅजिक आहे . एक व्यक्ती एकच शब्द रिपीट करत असेल तर तर त्याचा परिणाम नक्कीच होतो । सब दिमाग का खेल है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा मुद्दा बरोबरआहे.

शाम भागवत
Mon, 10/17/2016 - 15:47 नवीन
सब दिमाग का खेल है
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशीराजे सकल सिध्दी |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार

कोणत्याही प्रकारचा जप असो तो

शाम भागवत
Mon, 10/17/2016 - 15:54 नवीन
कोणत्याही प्रकारचा जप असो तो लिमिट मध्ये ठीक आहे जास्त जप केला कि मेमरी लॉस होते.
अति तेथे माती हे सगळीकडेच असते. मात्र जप करणे आणि तो व्हायला लागणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा जप व्हायला लागतो तेव्हा मात्र मेमरी लॉस वगैरे काही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार

हो बरोबर

वैभव पवार
Tue, 10/18/2016 - 20:35 नवीन
आजपजाप हि गोष्ट साधकाला आपोआप सिद्ध होते.....अस हि बोल्लो न मि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

जप आपोआप व्हायला लागणे ही

शाम भागवत
Tue, 10/18/2016 - 20:41 नवीन
जप आपोआप व्हायला लागणे ही पहिली पायरी आहे. अजपाजप ही तर खूपच पुढची पायरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार

:)

वैभव पवार
Tue, 10/18/2016 - 21:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

धन्यवाद!

पैसा
Sat, 10/15/2016 - 16:37 नवीन
लेखासाठी धन्यवाद! जपात इतके प्रकार असतात हे माहीत नव्हते. माझा विश्वास नसला तरी इतर कोणाचा असेल तर माझी हरकत नाही. या सगळ्याने कोणाला थोडेफार मानसिक बळ मिळत असेल तर ते ठीकच म्हटले आहिजे. डॉ. नरेन्द्र दाभोलकरांची मते याबाबत सर्वश्रुत आहेत. केवळ माहिती म्हणूनही लेख वाचायला हरकत नसावी. विधायक चर्चा झाली तर ओके. नाहीतरी वाईट वाटून घ्यायचे नाही. निनाद, तू तर माझ्यापेक्षाही मुरलेला मिपाकर आहेस. :)
  • Log in or register to post comments

..

राघव
Tue, 10/18/2016 - 20:30 नवीन
जप का करायचा हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण असा काय फरक पडतो साधा जप केल्याने की माणसाची अध्यात्मिक प्रगती व्हावी? जप हा मंत्राचाच का करावा? अध्यात्मिक दृष्ट्या नक्की कसा कसा फरक पडत जाणार? काय अनुभव येतात? अनेक आहेत प्रश्न. अनेकांची अनेक मते. मी प्रा. के. वि. बेलसरे यांचे मत प्रमाण मानून पुढे जातो. त्यांची अनेक विवेचने दृक्-श्राव्य माध्यमांत उपलब्धही आहेत. शिवाय स्वानुभवाशिवाय बोलायचे/लिहायचे नाही हा प्रण असल्याने ते जास्त भिडते. असो. अवांतरः इशारा देण्यात चूक आहे असं नाही. तो देतांना वाचू नये हा सल्ला देणं चूक आहे.
  • Log in or register to post comments

वॉव

शाम भागवत
Tue, 10/18/2016 - 20:38 नवीन
के व्ही बेलसरे व गोंदवलेकर महाराज ही तर माझी दोन दैवते. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

अरे वा!

राघव
Tue, 10/18/2016 - 21:21 नवीन
खूपच छान. आपण दोघेही एकाच जातकुळीतले एकुणांत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

पण गुरू कुठून शोधायचा?

आदूबाळ
Tue, 10/18/2016 - 22:01 नवीन
पण गुरू कुठून शोधायचा? (महागुरू चालणार नाहीत ना?)
  • Log in or register to post comments

जप किंवा नामस्मरण या विषयावर

श्रीगुरुजी
Wed, 10/19/2016 - 14:50 नवीन
जप किंवा नामस्मरण या विषयावर श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. प्रत्येक तारखेचे एक याप्रमाणे एकूण ३६५ प्रवचने आहेत. त्यात नामस्मरण या विषयाचे अगदी सोप्या व प्रभावी भाषेत विवेचन केले आहे. प्रवचने वाचताना श्रद्धाळूंना शांतीचा अनुभव येतो.
  • Log in or register to post comments

अधिक

निनाद
Fri, 10/28/2016 - 00:58 नवीन
अधिक माहिती देता येईल का पुस्तकाची? पुस्तकाचे नाव, कुठे मिळेल? मला वाटते की विनोबा भावे आणि गांधीजींच्याही कोणत्यातरी प्रवचनात (इशावस्य वर भाष्य करताना?) नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नक्की नाव लक्षात नाही. परंतु

श्रीगुरुजी
Fri, 10/28/2016 - 14:15 नवीन
नक्की नाव लक्षात नाही. परंतु हे खूपच प्रसिद्ध पुस्तक आहे. 'श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचने' हे नाव सांगितल्यास कोणत्याही मराठी पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक मिळेल. फेबुवर प्रवचनांचे एक अधिकृत पान आहे. तिथे रोजच्या तारखेचे प्रवचन प्रसिद्ध होते. खालील लिंकला जॉईन झाल्यास फेबुवर रोजच्या तारखेचे प्रवचन वाचावयास मिळेल. http://shrigondavalekarmaharaj.org/pravachane/details/MzQ2 श्री महाराजाचे "अमृतवाणी" या नावाचे अजून एक छोटेसे सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात जप, नामस्मरण, नामस्मरण का करावे, कसे करावे, इ. अनेक शंकांचे निरसन प्रश्नोत्तरे स्वरूपात केलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

गुगल प्ले वर जा.

शाम भागवत
Fri, 10/28/2016 - 15:24 नवीन
गुगल प्ले वर जा. jai shriram app टाईप करा. अशुतोष ए मालेगांवकरांनी तयार केलेले अ‍ॅप मोबाईलवर चढवा. फुकट आहे. प्रवचन या मेनूवर टिचकी मारली की त्या दिवशीचे प्रवचन उघडते. ऑप्शनवर टिचकी मारली की कोणत्याही महिन्यातली कोणतीही तारीख निवडून डन वर टिचकी मारा. फार सोप आहे आता हव असलेले प्रवचन निवडणे. किंवा ऑप्शनवर टिचकी मारली की त्यानंतर स्पेशल बटणावर टिचकी मारून ३ विशेष प्रवचनांपैकी (राम नवमी, दास नवमी आणि गुरू पौर्णिमा) यापैकी एक प्रवचन निवडू शकता. तुम्ही जर एखादे प्रवचन सुरू केले आणि असे वाटले की नीट दिसत नाहीय्ये, चष्मा लावायला लागणार आणि तो तर जवळपास नाहीय्ये. हरकत नाही एकदम वरच्या उजव्या कोपर्‍यात लिसन नावाचे एक बटण आहे. ते दाबा. तुम्हाला ते प्रवचन वाचून दाखवले जाईल.(आंतरजाल जोडणी आवश्यक आहे) ही सोय प्रथम विश्वास भिडे यांनी जालावर उपलब्ध करून दिली होती. तीच सोय श्री. भिडे यांच्या सौजन्याने इथे मिळते. शिवाय झूम इन व झूम आऊट बटणे खालच्या बाजूला आहेतच. मोबाईल ऐवजी संगणकावर अ‍ॅप चढवलेले असेल तर तेव्हा ती बटणे उपयोगी पडू शकतील. याशिवाय मेन मेनू मधे नाम नावाचे बटण आहे. नामसंकीर्तन सूरू होते. आपण फक्त सहभागी व्हायचे. नुसते ऐका. डोळे मिटून ऐका. एखादा ठेका धरून किंवा टाळ्या वाजवत ऐका. किंवा त्या आवाजात आपलाही आवाज मिसळून समरस व्ह्यायचा प्रयत्न करा. किंवा एक धून सुरू करता येईल व त्यात रंगून जाऊन तुम्हाला तुमच्या पध्दतीने नाम घेता येईल. शिवाय काही व्हिडिओ आहेत मात्र त्याला आंतरजाल जोडणी आवश्यक आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा whatsapp group आहे

nanaba
Fri, 10/28/2016 - 19:22 नवीन
मायबोलिकर किरू चालवतातं उत्तम पद्धत आहे त्यांची वाचायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

किरुचे प्रवचन वाचनही उत्तम

यशोधरा
Fri, 10/28/2016 - 20:05 नवीन
किरुचे प्रवचन वाचनही उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

३६६ आहेत

शाम भागवत
Wed, 10/19/2016 - 15:22 नवीन
२९ फेब्रुवारीचे पण आहे.
  • Log in or register to post comments

जप

चित्रगुप्त
Wed, 10/19/2016 - 19:51 नवीन
मी स्वतः अजिबात धार्मिक वगैरे नाही, मात्र जप हा एक प्रकारचा मानसिक व्यायाम आहे, कदाचित त्याहूनही गहन अर्थही त्याला असावा, असे मला वाटते. निष्णात ज्योतिषी जातकाच्या कुंडलीप्रमाणे योग्य तो जप सुचवतात, तो परिणामकारक असतो असेही मी अनुभवलेले आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

शाम भागवत
Wed, 10/19/2016 - 20:50 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चपखल

निनाद
Fri, 10/28/2016 - 02:53 नवीन
मानसिक व्यायाम ही अगदी चपखल शब्द योजना आहे. हे म्हणायचे आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

स्टॉप द जप !

संजय क्षीरसागर
Sat, 10/22/2016 - 01:51 नवीन
दृक, वाक आणि श्राव्य या तीन स्तरांवर मनाचं काम चालतं . पैकी जप हा मुख्यत्वे वाक या फॅकल्टीवर (आतले संवाद आणि बाहेरचं बोलणं) नियंत्रण मिळवण्यासाठी केलेली योजना आहे. तो काही प्रमाणात श्राव्य परिमाणावर काम करतो पण ते नगण्य आहे. आणि दृक या सर्वात महत्त्वाच्या परिमाणावर तर जप काहीही परिणाम साधत नाही. तस्मात जपसाधना पार्शल आहे आणि दीर्घकालीन साधना भ्रमीष्टावस्थेत नेते. अजपा या अंतीम चरणात मन सर्वस्वी नियंत्रणाबाहेर जाऊन जप चालू ठेवते. खरं तर वाक या परिमाणावर हुकूमत म्हणजे फक्त बोलायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करायचा असेल तरच मनाची ती फॅकल्टी अॅक्टीवेट झाली पाहिजे आणि इतर वेळी संपूर्ण शांतता हवी. अर्थात, जनसामान्यांना ही कल्पना सुद्धा अशक्य आहे पण वास्तविकात स्वास्थ्यपूर्ण मन म्हणजे आतला संवाद संपूर्ण थांबलेला (कारण तो बराचसा अनावश्यक आणि बव्हंशी नेगटीव असतो) आणि त्याचा परिणाम म्हणून आजूबाजूला चाललेलं सुस्पष्टपणे ऐकू येणं (मनाची श्राव्य ही फॅकल्टी सक्षम असल्याचं ते एकमेव लक्षण आहे). परंतु अजपा या अवस्थेत नेमकी विपरित अवस्था होते. आतला मंत्र थांबण्याच्या पलिकडे जातो आणि त्यामुळे श्राव्य फॅकल्टीचा बाजा वाजतो. कारण जेवढी आत शांतता तेवढी उत्तम श्रवणक्षमता असा सरळ हिशेब आहे. अजपामधे साधकाचं सरळ विचार करतांना सुद्धा बॅकग्राऊंडला चालू असलेला जप लक्ष वेधून घेतो आणि त्याला लिनिअर विचार करणं अशक्य होतं. म्हणजे नॉर्मल व्यक्तीला एकसंध विचार करणं अशक्य होण्याचं कारण इतर अवांतर आणि नकारात्मक विचार इंटरसेप्ट करुन लक्ष वेधून घेतात. पण अजपात साधक आपणहून बॅकग्राऊंडला चालू असलेला मंत्र ऐकतो आणि अवधान हेच इंधन असल्यानं अजपाचा वॉल्यूम आणखी वाढतो. परिणामी श्राव्य फॅकल्टीचा पुरता बाजा वाजायला लागतो (म्हणजे आजूबाजूला चाललेलं ऐकू येणं कमीकमी व्ह्यायला लागतं) आणि एकसंध विचार करण्यात खंड पडल्यानं कामाची वाट लागते ती वेगळीच. तस्मात, समस्तांच्या हितार्थ इतकंच म्हणता येईल : स्टॉप द जप. बाकी तुमची मर्जी .
  • Log in or register to post comments

सुई

चित्रगुप्त
Sat, 10/22/2016 - 02:40 नवीन
जप म्हणजे कुसळ काढण्यापुरती कधीतरी सुई शरीरात घुसवण्यासारखं. अतिरेक झाला तर भ्रमिष्टावस्था ठेवलेलीच. मी स्वतः अगदी क्वचित, वर्षातून एक-दोनदा फक्त पाच-सात वेळा जप करतो, तेही ठरवून नाही तर आपोआपच होतो, आणि तेवढा पुरेसा ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दीर्घकालीन साधना भ्रमीष्टावस्थेत नेते...

nanaba
Fri, 10/28/2016 - 09:02 नवीन
Hi, Any references for this? (Requesting sincerely)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एका मित्राच्या वडिलांना दीर्घकालीन जपसाधनेमुळे

संजय क्षीरसागर
Fri, 10/28/2016 - 10:43 नवीन
डिमेंशिया झाला होता. सध्या दुसर्‍या एका मित्राच्या आईला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीत स्वामी दिसायला लागले आहेत. साध्या कल्पनेनं सुद्धा एकाच गोष्टीचा सतत उच्चार केल्यानं वाक या मनाच्या फॅकल्टीवर विपरित परिणाम होईल हे उघड आहे आणि सतत एकच जप ऐकून श्राव्य परिमाणाची यथावकाश वाट लागेल हे सुद्धा तितकंच संयुक्तिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

धन्यवाद

nanaba
Fri, 10/28/2016 - 22:43 नवीन
मी ही एका मैत्रिणीच्या वडीलांना तेच तेच बोलताना ऐकलेलं नामस्मरण सतत केल्यानंतर. म्हणून विचारलं. तरीही माझा नामाचा अनुभव अतिशय चांगला आहे. मी गेले ३ महिनेच जप करते झोपण्यापूर्वी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जपापासुन जपलेलंच बरं

Ram ram
Sat, 10/22/2016 - 03:11 नवीन
जपापासुन जपलेलंच बरं
  • Log in or register to post comments

माझ्या अनुभवानुसार आपोआप

शाम भागवत
Tue, 10/25/2016 - 14:05 नवीन
माझ्या अनुभवानुसार आपोआप चाललेल्या जपातली मजा खूप वेगळी असते. आपण खूप म्हणजे खूपच सजग असतो. इतरांचे विचार तर नीट कळतातच. त्यांच्या भाव भावनांचा परिणाम त्यांच्या विचारांवर कसा झालाय हेही लक्षात येते. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या विचारांवर उमटणाऱ्या आपल्या मनातील प्रतिक्रियांकडे अत्यंत तटस्थपणे पहाता येते व तेही त्या उमटत असतात त्याचवेळी. घटना घडून गेल्यावर काही काळाने नवहे. मात्र ही स्थिती मला जास्त काळ टिकवता येत नाही. अजून मला साधना करणे जरूरी आहे. मात्र इतरांचे अनुभव यापेक्षा वेगळे असू शकतात हेही मान्य.
  • Log in or register to post comments

सहमत

श्रीगुरुजी
Tue, 10/25/2016 - 15:46 नवीन
सहमत जप करणे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यातून आनंदाचा अनुभव येतो. इतरांना काय अनुभव येतो याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मनात म्हणजे मेंदूत सतत काही तरी अ‍ॅक्टीविटी चालू असण्यापेक्षा

संजय क्षीरसागर
Wed, 10/26/2016 - 18:08 नवीन
`नो मेंटल अ‍ॅक्टीविटी, वेन नॉट रिक्वायर्ड'; थोडक्यात `संपूर्ण शांतता'! ही स्थिती नॉर्मल आहे... म्हणजे असायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

अति

निनाद
गुरुवार, 10/27/2016 - 06:08 नवीन
अति जप करावा असे मी तरी कुठे ही वाचलेले नाही. जपाचा उपयोग करून मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे असे वरील लेखात म्हंटले आहे. जप हा थोड्या काळासाठी करायचा आहे. नियम या विभागात तसा उल्लेख आहेच. काही प्रसंगी जप पुर्ण होत नाही. सर्वांना संसारीक बंधने असतात. अशावेळी मनाला त्रास असु नये. चित्त स्थिर असु द्यावे. जप झाला नाही अशी रुखरुखही असू देऊ नये. जे झाले ते ईश्वर चरणी सोडावे आणि स्वस्थ मनाने कार्यास लागावे. जी नियतीची इच्छा त्या प्रमाणे होणार आहे हे ध्यानात असावे. परत पुढील वेळी शांतपणे जपास बसावे. जप करण्या आधी मन निर्भय असावे. यात ला अर्थ असाच आहे की काही काळ जप करावा. मन एकाग्र करण्याची सवय करावी. आणि आपल्या उद्योगाला लागावे. जसे देव पुजा केल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून केलेला जप वगैरे. यातून आनंदच मिळतो. मन शांत होते, राहते. निर्णय क्षमता चांगली होते. संसारिक स्थितीत सदासदैव जपच करत बसावा असे कुठे ही म्हंटलेले नाही. तसे काही माझ्या वाचनातही आलेले नाही. (सन्यस्त मंडळी मात्र निराळे असु शकतात त्यांची साधना वेगळी असते. ती योगिक स्वरुपाची असते. सदर लेखात त्याचा संदर्भ नाही व तो विषयही नाही.)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा