सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १६: रेपणपल्ली- आष्टी (८१ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
19 May 2023 - 3:03 pm

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १५: सिरोंचा- रेपणपल्ली (६३ किमी)

✪ निबीड अरण्याचा सत्संग
✪ मोहीमेतील सर्वाधिक कठीण रस्ता
✪ लोकांकडून मिळणारं प्रेम
✪ जवानांसोबत झालेली भेट
✪ आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद
✪ १५ दिवसांमध्ये ११९६ किमी

नमस्कार. सायकल मोहीमेचा १५ वा दिवस, ८ ऑक्टोबर २०२२. काल रेपणपल्ली गावामध्ये मुक्कामाचा अनुभव सुंदर होता. हा सगळा प्रवास स्वप्नवत आहे! रेपणपल्लीमधून सकाळी पुढे निघालो तेव्हा हवामान रमणीय आहे. धुकं पसरलं आहे. आजच्या राईडमध्येही‌ घनदाट वनं लागतील आणि मी आष्टीला पोहचेन तेव्हा एक प्रकारे वनांच्या टोकाला पोहचलो असेन. आजचा रस्ताही चांगला असेल. पण अनेकदा आपल्याला वाटतं तसं होत नसतं!

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/05/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

नितांत आल्हाददायक हवेत राईड सुरू केली. रस्ता सायकलसाठी ठीक वाटतोय. सहजपणे जात राहिलो. सर्वदूर रमणीय वन! राईड सुरू करताना धुक्यामुळे दृश्यमानता जेमतेम ठीक आहे. हळु हळु ती वाढत गेली. रस्त्यावर वाहनं अगदी थोडी. सगळीकडे मोहात पाडणारा निसर्ग. रस्त्यालगत अगदी थोडी घरं किंवा वाड्या. एका अशाच वाडीजवळून जात असताना एकदम मला मिलिटरीचे जवान दिसले आणि त्यांनी मला थांबायला सांगितलं. मी लगेचच थांबलो व त्यांना जय हिंद केलं. त्यांनी माझी सगळी चौकशी केली. मी कोण आहे, इथे काय करतोय वगैरे सगळं विचारलं. नक्षलवादाचं सावट ह्या जिल्ह्यावर असल्यामुळे हे अपेक्षितच होतं. मी लगेचच उत्तर देऊन त्यांचं समाधान केलं. सिरोंचात मला भेटलेल्या पोलिस अधिका-यांची नावं सांगितली. मग त्यांनी मला सायकल बॅनरवर तेलुगू का लिहीलंय असं विचारलं. मग त्यांना सांगितलं की, मी महाराष्ट्र- गोवा- कर्नाटक- तेलंगणा असं आलोय. मग ते हसले व मला शुभेच्छा दिल्या. पुढे एका चहाच्या हॉटेलवर थांबलो. इथेही अनेक जवान नाश्ता करताना दिसत आहेत. त्यांनीही माझी चौकशी केली आणि मी अशी राईड करतोय हे कळाल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्याशी बोलत असतानाच जवळच्याच आश्रमशाळेतले एक सर आले व त्यांनी मल विद्यार्थ्यांना येऊन भेटायला सांगितलं. त्यामुळे त्या शाळेतही जाऊन आलो आणि विद्यार्थ्यांशी थोडं बोललो. मुलांना प्रश्नही विचारले. ह्या भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी माउंट एव्हरेस्टवर चढाई केलेली आहे, हे माहिती आहे का असं विचारलं. छोटी पण छान भेट झाली शाळेत. त्यानंतर पुढे आलापल्लीच्या दिशेने निघालो.

आलापल्लीमध्येही अनेक जणांशी भेट झाली. माझ्या मित्राचे मित्र श्रीनिवासजी तिथे भेटले. अनेक संघ कार्यकर्ते भेटले. छोटा कार्यक्रमच झाला. मला माझे अनुभव सांगता आले. मी राईडसाठी हा रूट घेतल्याचा आनंद स्थानिकांनी बोलून दाखवला. महाराष्ट्राच्या ह्या भागातही सायकलिस्ट येतात. पण फार थोडे आणि क्वचितच. इथेही एका व्यक्तीने माझ्या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली, ती मला घ्यायला लावली. आलापल्लीपासून ६० किमी अंतरावरच हेमलकसा आहे! पण माझ्या पुढच्या टप्प्याच्या विपरित बाजूला ते आहे. शिवाय तिथे जायचं तर २ दिवस लागले असते. त्यामुळे तिथलं काम व ती भेट होऊ शकली नाही आणि आष्टीच्या दिशेने निघालो. इथे लोकांनी सांगितलं आहे की, पुढे सगळा रस्ता धुळीने आणि ट्रक्सच्या गर्दीने भरलेला आहे!


.

.

.

आणि तो खरंच तसा आहे! इथे सूरजागढ़ लोहखनिज खाण जवळ असल्यामुळे ह्या टप्प्यामध्ये अतिशय जास्त जड वाहनं धावतात. रस्त्यावर भयानक धूळ आहे आणि खड्डेही भरपूर आहेत. त्याशिवाय ट्रक हळु जातात आणि रस्त्याची जागाही अडवत आहेत. त्यामुळे आलापल्ली ते आष्टी हे अंतर पार करायला फार जास्त वेळ लागेल असं दिसतंय. पुढे पुढे तर इतका कठीण रस्ता होता की, ह्या पूर्ण मोहीमेमध्ये सर्वाधिक त्रासदायक रस्ता हाच वाटलं. ट्रक्स सतत मागे लागल्यासारखे येत आहेत आणि धूळ नाका- तोंडात जाते आहे. ह्याच भागात काही दिवसांपूर्वीच एका ट्रकने एका व्यक्तीला उडवलं होतं व त्यामुळे लोकांनी चिडून अनेक ट्रक जाळले होते.

हळु हळु वन विरळ होत जातंय. आष्टीच्या आधी एक डोंगर लागला आणि दाट वन लागलं. वनाचा हा शेवटचा टप्पा खोलवर अनुभवला आणि नंतर वनांचा निरोप घेतला! जेव्हा रस्ता डोंगर आणि वनातून बाहेर पडला, तेव्हा कुठे चांगला मोठा झाला. आष्टी शहर! पोहचलो तेव्हा दुपारचे २ वाजले आहेत. घनदाट वन प्रदेशाचा शेवट झाल्यासारखं वाटतंय. इथून पुढे आता चांगला हायवे असेल, अगदी विरळ वन असेल आणि गावं आणि शहरं असतील. पण काय राईड होती आजची! आणि तशाच भेटीही.

आष्टीमध्ये श्री. भारत पांडेजींनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती. संध्याकाळी काही लोकांना भेटलो आणि गावातही थोडं फिरून आलो! आज खूप दिवसांनी मराठी बोलणारे लोक बघितले! आधीचे दोन मुक्काम महाराष्ट्रात असले तरी तिथे बोलली जाणारी भाषा तेलुगूसारखीच होती. आता फक्त ३ दिवस राहिले आहेत! शेवट फारच लवकर होणार आहे, फार वाईट जाणीव आहे ही. आणि माझ्या मुलीला- अदूला भेटायलाही आता फक्त ८८ तास राहिले आहेत, कारण ती नागपूरला येते आहे! पण हा सगळा प्रवास किती स्वप्नवत आहे!

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १७: आष्टी- गडचिरोली (७६ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

समाजजीवनमानलेखअनुभव