खरतर हे लिखाण आधीच लिहुन ठेवलं होतं पण बोका — ए — आझमच्या दुखद बातमीने अचानक स्मशान वैराग्य आल्यासारखं झालंय , सतत हे आठवतंय....
भेट... एक ठरवुन न ठरवलेली.... असेल कदाचित ती मागच्या जन्मी ठरलेली, किंवा त्याहुन आधीची... नाहीतर उगाच का माणसे येतात समोरासमोर काहीही लागेबांधे नसताना? उगाच का पहिल्यांदा पाहिल्यावर जन्मोजन्मीची खुण पटते? चेहरा जरी बदलला असला तरीही आत्मा आत्म्याला बरोबर ओळखतो. कुणाला पाहुन आनंद होतो तर कुणाला पाहुन राग येतो. आधी पाहिलेच नाही तर अशा भावनांचं कारणच काय?
कदाचित सर्वच आहोत प्रवासी , अनादि काळापासुन , काळाचा फेरा आला की लागतो प्रवासाला. जुळतात नाती अन् होतात ओळखी पाळखी, मग सुरु होतो खरा प्रवास , सुखासाठी धडपड. राग— रुसवे , हेवे—दावे, अहंकार , अपमान , दु:ख कशीचीच ददात राहत नाही. या सगळ्यात कधी आपण खर्या जगण्याला पारखे होतो कळतच नाही. जबाबदारीचे ओझे पेलवत नाही. नाती लुळी—पांगळी होतात.
मग होते संध्याकाळ... आयुष्याची.. नको असलेली. कशातच राम वाटत नाही, आयुष्याचा जमाखर्च पाहण्याची हिंमतच होत नाही. किती नाती कमावली किती गमावली.. हिशेबच लागत नाही. फक्त परतफेड ठळकपणे दिसत राहते आपल्या कर्मांची आणी मग शेवटच्या स्टेशनाची वाट पाहणं सुरु होतं, एकेक करुन प्रवासु उतरायला लागतात. काही लगबगीने उतरुन जातात कुणाचाही निरोप न घेता तर काही आरामात सर्वांचा निरोप घेतात आयुष्याचे कर्ज फेडुन, पुन्हा सज्ज होतात पुढच्या भेटीला...
कुणी कुणाला हसु नये बरं आज त्याची तर उद्या आपलीही वेळ येणारे , खाकाचा लाख आणि लाखाचा खाक व्हायला वेळ लागत नाही. "वक्त के सितम... कमी हसीं नही.... आज है यहाँ.. कल कही नही..." काहीच आपल्या हातात नसत, अगदि आपला श्वासही. मग का करावा इतका अभिमान , इतकी शिरजोरी.
जिथे देवालाही भोगणे आले तिथे माणसाची काय कथा. सोडुन द्या तो अहंकार जो माणसा माणसामधे फरक करतो. करा राखरांगोळी त्या द्वेषाची जो आपल्याला सतत जगु देत नाही. वागुन तर पहा प्रेमाने, जरा हात तर धरा वात्सल्याचा पहा कसे आनंदांचे कारंजे फुलतात, मन कसं शांत होत. जीवन करं सुपीक होत. हो सुपीकच . सुपीक जमीन जशी सुदृढ आणि भरघोस पीक देते तसं सुपीक जीवन आपल्याला सुदृढ आणी भरघोस सुख का नाही देणार.
सुखाची व्याख्या तरी काय?? गाडी , बंगला , नोकरचाकर , सोनेनाणे? याला सुख म्हणतात ? नाही हो सुखी माणसाची व्याख्याच पार जगावेगळी.
प्रतिक्रिया
30 Nov 2018 - 4:58 pm | वेदांत
"वक्त के सितम... कमी हसीं नही.... आज है यहाँ.. कल कही नही..." काहीच आपल्या हातात नसत, अगदि आपला श्वासही.
30 Nov 2018 - 6:38 pm | प्रमोद पानसे
सुन्न्......
30 Nov 2018 - 7:41 pm | मित्रहो
सकाळी बातमी वाचल्यावर दिवसभर अस्वस्थ वाटले. आता परत त्यांचेच काही मला आवडलेले लेख परत वाचले.
बोका-ए-आझम यांनी स्वतःविषयी लिहिलेला लेख
https://www.misalpav.com/node/32837
फार सुंदर रहस्यकथा गॅलरी
http://misalpav.com/node/37865