...पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील !
आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम !
यापूर्वी आपण पाहिले की पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये सुखाचा अथवा वैभवाचा विचार करताना उपभोगाची अधिकाधिक साधने आणि ती मिळावावीत म्हणून त्यासाठी लागणारा अधिकाधिक पैसा म्हणजे सुख अथवा वैभव !
मात्र भारतीय पूर्वसूरीनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वंकष समाधान देणारी अशी परिपूर्ण जीवनपद्धती विकसित केली.
योगी अरविन्दानी यांवर मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे, ते म्हणतात ..
१. प्रत्येकाला त्याच्या मगदूराप्रमाणे काम असावे , त्याचा त्याला सुयोग्य मोबदला मिळावा.
२. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा अशी सामाजिक परिस्थिती असावी. ( सामाजिक सुरक्षा)
३. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा इतका पुरसा वेळ त्याच्याकडे असावा.
४. अशी स्थिती असेल तर ताण विरहित सुखी जीवन तो जगू शकेल.
यापैकी प्रत्येक मुद्द्यावर आजची भारतीयांची स्थिती {जे पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करतात} पाहता काय दिसते ?
१. आपण सारे जण आपले जन्मजात कौशल्य विसरून गेलो आहोत. "कारागिर" लयाला जाऊन "कामगार" निर्माण झाले आहेत. आमचा मगदूर विसरुन गेला असून आमची सृजनशक्ती नष्ट झाली आहे. मोबदला सुयोग्य असला तरी कमीच आहे असेच आम्हांला वाटते, कमी कामाचा अधिक मोबदला ही आमची वृत्ती होत चालली आहे.
२. मिळालेल्या सुखाचा उपभोग आम्ही घ्यावा अशी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आज नाही.कष्टाने मिळवलेले सोने -नाणे आपण अंगावर घालून सुखाने फिरु शकत नाही.
३.वेळ ? तेवढे सोडून बोला. पैसे मिळवण्याच्या नादात आमच्याकडे वेळच नाही.आम्ही विकांत सुद्धा टाकणं टाकल्यासारखा टाकतो..(मला त्या परिस शोधणार्या तरुणाची गोष्ट आठवते. परिस शोधायचा म्हणून तो समुद्र किनार्यावरचा प्रत्येक दगड गळ्यातील लोखंडाच्या साखळीला लावून पहात असे व सोने झाले नाही म्हणून फेकून देत असे. या कंटाळवण्या प्रक्रीयेत सारा दिवस संपून जातो आणि आता थकून परतावे म्हणून तो साखळी काढून हातात घेतो , तो ती केव्हाच सोन्याची झालेली असते !] असे कितीतरी परिस आपण न कळत फेकून देत असतो.
४. आणि या सार्या धावाधावीत आम्ही शारिरिक आणि मानसिक ताणाचे शिकार झालो आहोत.
कचकड्याच्या अशा खोट्या सुखाचाच आपण पाठलाग करत आहोत हे आपल्या सहज ल़क्षात येते..
सुखाची भारतीय संकल्पना ही नव्हे ! एकात्म सुख हीच सुखाची भारतीय संकल्पना होय !
एकात्म सुख
"मी" म्हणजे कोण याचा शोध घेत गेल्यावर प्राचीन भारतीय तत्ववेत्त्याना असे लक्षात आले की, हे फक्त "शरीर अथवा इंद्रिये " म्हणजे मी नव्हे , त्याचबरोबर " मन " आहे, त्या मनाच्या पलिकडे " बुद्धी" आहे आणि बुद्धीच्याही पलिकडे "आत्मा" आहे ! या सार्याला मिळून "मी" म्हणतात.
माझा आनंद, माझे सुख म्हणजे माझ्या शरिराचा+ मनाचा+ बुद्धीचा+आत्म्याचा आनंद ! आणि हे सारे कप्पेबंद नसून एकमेकांत विलक्षण मिसळलेले आहेत, शरिराचा अथवा मनाचा असा स्वतंत्र आनंद अथवा सुख उपभोगता येत नाही !
सुग्रास भोजनाचा आनंद घेत असताना, आप्त अत्यवस्थ असल्याची बातमी समजली तर सुग्रास भोजनाचे सुख लाभेल काय ?
लता मंगेशकरांचा आवाज ऐकल्यावर, एखादी सुंदर कविता वाचल्यावर होणारा आनंद , वाट्णारे सुख आपले डोके दुखत असताना अथवा पोटात तीव्र दुखत असेल तर घेता येईल का ?
बुद्धीचा आनंद म्हणजे सृजनाचा आनंद ! मन अस्वस्थ असेल तर आपण लतादिदीसारखे गाण्याचा प्रयत्न करु काय ? ल्रेख लिहिण्याचा प्रयत्न करु काय ?
आत्म्याचा आनंद म्हणजे आनंद वाट्णे.. आपल्या एखाद्या कृतीने एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे !
आत्मनो मोक्षार्थ जगदहितायच !
सुखाची चढती भाजणी
आपल्या असे लक्षात येईल की , शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे अधिक सुख देणारे ( सुखाची मात्रा ) आहे.
आपल्या असेही लक्षात येईल की,शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे अधिक काळ टिकणारे ( सुखाचा कालावधी) आहे.
पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे कमी कष्टात अधिक मात्रेत सुख ( सुखाचे फल ) देणारे आहे.
मात्र, शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे कमी साधनसामुग्री लागणारे( सुखासाठी लागणारी साधन सामुग्री ) आहे.
तसेच, सुखाची गरज मात्र उतरत्या भाजणी प्रमाणे आहे.भूक लागल्यावर आपोआप जाणीव होते, वयात आल्यावर योग्य ती प्रेरणा होऊन मनुष्य सुखाच्या शोधार्थ निघतो आणि तसा प्रयत्न करतो. मनाच्या आणि त्याही पेक्षा बुद्धीच्या आणि आत्म्याच्या सुखासाठी तशी गरज सामान्यपणे होत नाही , त्यासाठी तश्या प्रकारे सुसंस्कारित झालेला मनुष्य असावा लागतो !तरच ती प्रेरणा निर्माण होईल.
थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे !
(क्रमशः)
प्रतिक्रिया
10 Sep 2013 - 1:42 am | विटेकर
लिहयचे रहिले आहे
10 Sep 2013 - 7:31 am | मुक्त विहारि
आधीच्या भागाची लिंक पण दिलीत तर उत्तम..
11 Sep 2013 - 9:46 am | पैसा
रोजच्या वापरातली उदाहरणे देत लिहिलेला लेख आवडला. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत!
11 Sep 2013 - 10:51 am | आशु जोग
आत्म्याचे सुख हे कमी कष्टात अधिक मात्रेत सुख ( सुखाचे फल ) देणारे आहे.
एक प्रश्न पडतो. कमी कष्टात असेल तर राजा विश्वामित्राचा ब्रह्मर्षि विश्वामित्र बनताना त्याला एवढे कष्ट का पडले ?
11 Sep 2013 - 12:34 pm | विटेकर
मला तुमच्या प्रश्नाचा नेमका संदर्भ समजला नाही. पण मला जी माहीती या पौराणिक कथेसंदर्भात आहे , त्यावरुन असे म्हणेन की " अहंकार " विश्वामित्रांना आड आला. अहंकारी माणसाला आत्मानंद मिळणे के व ळ अशक्य ! आत्म्याच्या आनंदात " मै नही तु ही " हीच भावना महत्वाची आहे. तोच सर्वोच्च आनंद आहे.
11 Sep 2013 - 4:56 pm | आशु जोग
माझा मुद्दा असा होता, आत्मोन्नती करुन घेतल्यावर सुख आहे पण तिथवर पोचतानाचा मार्ग अवघड आहे. विश्वामित्रालाही प्रगती अधोगती अश्या सापशिडीचा अनुभव आला.
11 Sep 2013 - 11:55 am | अनिरुद्ध प
वाचत आहे पु भा प्र.
11 Sep 2013 - 12:19 pm | आतिवास
रोचक.
फक्त 'भारतीय' म्हणताना एक गोष्ट आहे की एक (किंवा त्याहून जास्त) भारतीय विचारप्रणाली हा विचार (किंवा हे विचार) सांगते. पण विचार प्रत्यक्षात आणण्याचा वकूब फार कमी माणसांत नेहमीच राहिलेला आहे. भारतीय 'विचार' आणि भारतीय 'व्यवहार' यात अन्य समाजांप्रमाणे नेहमीच अंतर राहिले आहे. अर्थात त्यामुळे विचारांचे मूल्य कमी होत नाही हे आहेच.
11 Sep 2013 - 12:53 pm | विटेकर
मला असे वाटते की ही जीवनाची शाश्वत मूल्ये आजही भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. उदाहर्णार्थ .. आपल्या बहिणीचा विवाह होत नाही तोपर्यन्त भाऊ अविवाहित राहतो हे त्यागाचे परिणामी आत्मिक सुखाचे उदाहरण आपल्या आजूबाजूला आपण आजही पाहतोच ना ? अशी उदाहरणे पाश्चिमात्य जगतात तुरळक्च आढळ्तील.
भारतीय " विचार " आणि "व्यवहार" यांतील अंतर हे मु़ख्यतः आत्मविस्मृतीमुळे आणि पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे आहे.पाश्चिमात्य ते सारे वाईट असा माझा दावा नाही पण आपण विवेक गहाण टाकून केवळ अनुकरण करतो हा माझा मुद्दा आहे.
प्राचीन भारतीयांनी समतोल विचार करून सर्वंकष जीवनपद्धती विकसित केली आणि त्यात कालानुरुप बदल करता येतील अशी लवचिकता ही ठेवली. दुर्दैवाने ही लवचिकताच घातक ठरली !
पण तरिही मला असे वाटते की , काही शाश्वत भारतीय मूल्ये ( कोअर) आजही आपल्या रक्तात आहेत ( पॅथॉलॉजी) आणि त्यातूनच पुनः पुन्हा गाडी रुळावर आणली जाते.
यूनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिट गए जहाँ से
अब तक मगर है बाक़ी नाम-ओ-निशान हमारा
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा
11 Sep 2013 - 1:00 pm | बॅटमॅन
पाश्चिमात्यांशी संपर्क येण्याअगोदरही आत्मविस्मृती होतच होती. हे पीरिऑडिक असतं. अगदी बुद्धपूर्व काळ घेतला तरी ब्राह्मणकाळातल्या कर्मकांडाची रिअॅक्शन म्हणूनच उपनिषदे तयार झाली. नंतरही अधूनमधून असे ढवळणे चालूच असते. तेव्हा पाश्चिमात्य येण्याअगोदर "आल इझ वेल" होते असे काही नाही.
ही लवचिकताच आपला यूएसपी आहे. झापडबंद विचारातून बाहेर पडण्याचे लायसन्स आहे. ती लवचिकता घातक ठरली असे सरसकट विधान करणे चूकच.
11 Sep 2013 - 2:32 pm | विटेकर
पाश्चिमात्यांशी संपर्क येण्याअगोदरही आत्मविस्मृती होतच होती.
हे मान्यच आहे म्ह्णून मी आत्म विस्मृती " आणि " अंधानुकरण असे म्हंट्ले आहे. धर्माला पुनः पुन्हा ग्लानी येते हे तर स्वतः भगवंताने सांगितले आहे तेव्हा तुमच्या पिरिऑडिक मुद्द्याशी सहमत!
ही लवचिकताच आपला यूएसपी आहे
हे ही मान्य ,पण त्यामुळेच अपप्रवृत्ती शिरल्या कारण त्यातला " विवेक " हरवला. सरसकट नव्हे पण त्याने दिर्घ कालीन परिणाम झाले हे ही खरे.
11 Sep 2013 - 2:42 pm | बॅटमॅन
समजा लवचिकता नसती तर विवेक असता असे म्हणावयाचे आहे काय? तसे असेल तर मग लैच असहमत. लवचिकतेचे दीर्घकालीन काही परिणाम आहेत हे मान्य. पण जिथे आचारविचारात लवचिकता अलाउड नसते तिथे विवेक कितपत राहतो??? उलट अशाच ठिकाणी विवेकाची मुस्कटदाबी सर्वांत जास्त होते. लवचिकता हे स्वातंत्र्य आहे. अपप्रवृत्ती शिरायला स्वातंत्र्यापेक्षा पारतंत्र्य जास्त कारणीभूत असते. स्वातंत्र्य असले की आचारविचारांत रोगटपणा तुलनेने कमी असतो. जितकी लवचिकता कमी तितके स्वातंत्र्य कमी.
11 Sep 2013 - 2:53 pm | विटेकर
विवेक विरुद्ध लवचिकता .. असा हा विषय नाही. तर विवेकाने लवचिकता असा आहे. समांतर उदाहरण द्यायचे तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार. विवेकाने स्वातंत्र्य उपभोगले नाही तर तो स्वैराचार ठरतो. हक्क आणि कर्तव्ये हातात हात घालून येतात. यापैकी फक्त हक्कच घेईन म्हणाल तर ते आपोआप संपून जातीलच.दिलेल्या सवलतीचा अतिरेक कराल तर सवलत लुप्त होईलच.
11 Sep 2013 - 3:06 pm | बॅटमॅन
सहमत!
12 Sep 2013 - 11:01 pm | प्रसाद गोडबोले
जस्ट टू अॅड
>>> ह्याचावरुन आठवले की मागे कोणीतरी इन्टर्नेट वर एक मस्त विधान केले होते की
हिंदुधर्म लिनक्स सारखा आहे ...ओपन सोर्स... कोणीही घ्या काहीही आवडतील ते बदल करा अन खुष राव्हा ....बाकी चे धर्म (विशेष करुन मध्यपुर्वेतील ) हे विंडोज सारखे आहेत ...फिक्स्ड ...
अवांतर : मला उबुंटु फार आवडते आणि मॅक ओएस विषयी थोडासा तिरस्कारच आहे =))
13 Sep 2013 - 3:45 am | बॅटमॅन
=))
13 Sep 2013 - 7:28 pm | आशु जोग
अहो तुम्हाला मी काय समजत होतो ?
तुम्हीपण आय टी इंजिनीयर निघालात !
11 Sep 2013 - 1:43 pm | आतिवास
उदाहर्णार्थ .. आपल्या बहिणीचा विवाह होत नाही तोपर्यन्त भाऊ अविवाहित राहतो हे त्यागाचे परिणामी आत्मिक सुखाचे उदाहरण आपल्या आजूबाजूला आपण आजही पाहतोच ना ?
याच्या विपरीतही उदाहरणे पाहण्यात आहेत; आणि त्यात (थोरल्या भावाने बहिणीच्या विवाहाआधी स्वतः विवाह करणे) माझ्या मते काहीही गैर नाही!
शिवाय समजून-उमजून मूल्य पाळणे आणि रुढी-परंपरा - 'लोक काय म्हणतील' म्हणून - एखादा रीतीरिवाज पाळणे यात फरक आहे. कोण नेमके कशामुळे अमूक एखादा व्यवहार करत आहे हे समजून घेणे अवघड आहे.
नि:स्वार्थीपणाचा, त्यागाचा विचार नि:स्वार्थी आणि त्यागी लोक बहुसंख्य असलेल्या समाजात सांगायची वेळ येत नाही असा एक अंदाज आहे. ज्याअर्थी इतके 'विचार' सांगावे लागले त्याअर्थी त्याची गरज त्या काळच्या समाजधुरिणांना भासली असावी. (या विधानाचा व्यत्यास खरा नाही - म्हणजे विचार सांगितले नसतील तर तसा सगळ्यांचा व्यवहार असेलच असे नाही!! :-)' क्रिटिकल मास' तयार होणे ही एक प्रक्रिया आहे. शिवाय एका भारतीय समाजात किती समाज आहेत - हे पाहिले की वेगळे चित्र दिसते . चांगले-वाईट लोक सर्वच समाजांत, सर्वच काळात असतात. परिस्थितीवश कुणाचे प्रभावक्षेत्र जास्त आहे हे ठरते. ही परिस्थिती ठरण्याला मूल्येही कारणीभूत ठरतात - इतका संबंध नक्कीच आहे.
पण आता हे विषयांतर होते आहे - म्हणून थांबते.
मी पुन्हा नमूद करते की चांगल्या विचारांना आणि भारतीय विचारप्रणालीत ते सांगितले गेले आहेत याविषयी काही दुमत अथवा आक्षेप नाही.
11 Sep 2013 - 2:19 pm | बॅटमॅन
पूर्ण प्रतिसादाशी सहमत. थोरल्या भावंडाआधी धाकट्याने लग्न करणे किंवा एका बहिणीचे लग्न झालेले नसताना भावाने लग्न करणे यात गैर काहीच नाही. लोक याला कसलेकसले नैतिक रंग देतात त्याचं नवल वाटतं.
अन "आमच्या पूर्वजांनी असं केलं म्हणून आम्ही असं करतो" यापलीकडे बहुतेककरून घंटा कुणालाही काही कळत नसतं हेही तितकंच खरंय. मग ते देवासाठी एखादा बळी देणे असो किंवा उजव्या सोंडेचा गणपती न पुजणे हे असो. सर्वच गंडके, त्यात प्रतवारी ती कसली लावायची?
अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतील ज्यांना रूढींचा उगम माहितीये. अन असे लोक त्यांबद्दल कधीच फारसे आग्रही नसतात.
एक महत्त्वाची गोष्ट म्हंजे "व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी" केला जातो बहुतेकदा. अन तोच खरा व्हर्च्यू म्हणून कवटाळल्या जातो, वरिजिनल नेसेसिटी संपल्यावरदेखील. पण हे सांगणे म्हंजे तात्कालिक नेसेसिटीदेखील नजरेआड करणे असा सूर प्रंप्राभिमान्यांकडून लावला जातो., जे चूक आहे.
11 Sep 2013 - 2:31 pm | अनिरुद्ध प
हे जरा,
"एक महत्त्वाची गोष्ट म्हंजे "व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी" केला जातो बहुतेकदा. अन तोच खरा व्हर्च्यू म्हणून कवटाळल्या जातो, वरिजिनल नेसेसिटी संपल्यावरदेखील. पण हे सांगणे म्हंजे तात्कालिक नेसेसिटीदेखील नजरेआड करणे असा सूर प्रंप्राभिमान्यांकडून लावला जातो., जे चूक आहे.
नीट मराठीतुन समजावुन सान्गाल का?
11 Sep 2013 - 2:44 pm | विटेकर
थोरल्या भावंडाआधी धाकट्याने लग्न करणे किंवा एका बहिणीचे लग्न झालेले नसताना भावाने लग्न करणे यात.....
हे केवळ सामान्य त्यागाचे उदाहरण म्हणून घेतले ! त्या रुढीचे अथवा परंपरेचे ( अशी प्रथा असलीच तर ) उदात्तीकरण करावे असा हेतु नव्हता. त्यागामुळे मिळणारा आत्मिक आनंद असा असतो असे सांगण्यचा तो प्रयत्न होता. याऐवजी महात्मा गांधीनी समाजासाठी केलेला त्याग अथवा सावरकर घराण्याने केलेला त्याग हे उदाहरण घ्यावे. पुराणातील उदाहरण द्यायचे झाले तर दधिचीचे अथवा शिबी राजाचे घ्यावे. इतिहासातील उदाहरण घ्यायचे तर फतेसिंग- जोरावर सिंग आहे. सध्याचेच घ्यायचे तर आमटे परिवार अभय बंग ही उदाहरणे आहेत. फार मोठी उदाहरणे न देता, आजूबाजूची उदाहर्णे द्यावीत म्हणून हे उदाहरण दिले होते. मुद्दा हा आहे की. त्यागातून मिळणारे आत्मिक समाधान !
11 Sep 2013 - 2:47 pm | बॅटमॅन
मग ठीक आहे. त्या उदाहरणाशी इतका सहमत नसलो तरी या मुद्द्याशी सहमत आहे.
11 Sep 2013 - 2:57 pm | उद्दाम
बहिणीचे लग्न झाले नाही, म्हणून भावानेही लग्न केले नाही, यात नेमका कसला त्याग झाला?
कुणाकडे पैसे नसतील, तर मी त्याला दोन रुपये देऊन त्याच्या सुखाची व्यवस्था केली तर मी त्याग केला असे म्हणता येईल.
पण त्याच्याकडे नाही, म्हणून मीही माझ्याकडचे पैसे टाकून देऊन उपाशी रहाणं, याला त्याग म्हणतात का? या त्यागाने नेमका कुणाचा आणि कसला फायदा झाला?
11 Sep 2013 - 3:04 pm | अनिरुद्ध प
ते टाकुन न देता त्या गरज्वन्ताला देवुन स्वता उपाशी राहिले तर तो नक्किच उच्च्कोटितला त्याग मानला जातो.
11 Sep 2013 - 3:35 pm | दादा कोंडके
+१. सहमत. उलटपक्षी भावाने लग्न केल्यावर त्याच्या वधूपक्षाच्या गोतावळ्यातून वर संशोधन सोप्पं होउ शकेल.
11 Sep 2013 - 3:40 pm | बॅटमॅन
म्हणूनच म्हटले, की ते उदाहरण पटलं नाही. त्या उदाहरणाद्वारे सांगायचा मुद्दा पटला.
11 Sep 2013 - 12:58 pm | मृणालकेदार
सुख हे मनाची जाणीव आहे. आत्म्याचे सुख ही सर्वोच्च व अत्यन्त सूश्क्म जाणीव असल्याने मन निर्वीकार आणि निर्वीकल्प करण्यासाठी मानसीक कष्ट हे त्याच प्रमाणात घ्यावे लागतात.....
अर्थात प्रत्येकाच्या मनोबला प्रमाणे...
11 Sep 2013 - 2:50 pm | सस्नेह
'मूल्ये' ही समाज, काल, सुबत्ता यांच्याप्रमाने बदलत आली आहेत. आजच्या समाजासाठी कालची मूल्ये स्वीकारार्ह असतीलच असे नाही.
आत्मिक सुखात काय मोडते याविषयी वाचायला आवडेल.
12 Sep 2013 - 10:30 am | विटेकर
'मूल्ये' ही समाज, काल, सुबत्ता यांच्याप्रमाने बदलत आली आहेत. आजच्या समाजासाठी कालची मूल्ये स्वीकारार्ह असतीलच असे नाही.
" Values are like Lighthouses! It is you who break them and not the lighthouse !!"
- 7 Habits of Highly effective people Chapter 1 - Character & Personality
11 Sep 2013 - 2:53 pm | उद्दाम
लेख आवडला. पण पाश्चात्यान्नी शोध लावलेल्या विजेवर चालणार्या पाश्चात्यानी शोधलेल्या क्याम्पुटरसमोर बसून पाश्चात्यान्नी शोधलेल्या शर्ट प्यान्टीत अंग घालून हा लेख वाचणं म्हणजे माझा तो शिंचा अंतरात्मा तळमळला.
हाच लेख भूर्जपत्रावर लिहून गवताने शाकारलेल्या झोपडीत शेणाने सारवलेल्या जमिनीवर लाल मुटका नेसून बसून वाचावं म्हटलं तर किती लोक तयार होतील?
पण लेख मात्र छान आहे.
11 Sep 2013 - 3:08 pm | बॅटमॅन
'शिंच्या' अंतरात्म्याची तळमळ हुकलेली आहे, इतकेच तूर्तास सांगू इच्छितो.
11 Sep 2013 - 4:36 pm | arunjoshi123
पूर्तेच्छा व सर्वेच्छांचे गुणोत्तर ही सुखाची व्याख्या तितकीशी 'पूर्ण' नाही. कारण -
१. माणसाच्या इच्छा इतक्या जास्त असतात कि असा खरोखरीचा भागाकार काढला तर प्रत्येक माणूस 'वैफल्यग्रस्त आहे' असे निघेल.
२. माणूस सुज्ञ आणि प्राजंळ असेल तर माझ्या सुखविषयक इच्छा करण्याची माझी क्षमता सिमित आहे हे मान्य करेल.
३. सुख हे जाणिव असे पर्यंत असते, स्मृती असेपर्यंत नाही. म्हणजे २% जास्त बोनस मिळाल्याचे पत्र मिळाल्यानंतरचे ४० एकक सुख हे तत्काल लहान भावाला गुडघ्याला लागले असा फोन आला तर ० एकक होते.
४. सर्व इच्छांची सुखप्रदानाची क्षमता समान नसते. आपल्या सूत्रात न्यूमरेटर मधे जोडला जाणारा 'घर बांधून झाल्याचा' इच्छेचा १ आणि लघवीला जागा मिळाल्याचा १ यांचे मूल्य समान आहे. इच्छांची संख्याच नव्हे तर तीव्रता, महत्त्व इ महत्त्वाचे आहे.
५. हे सूत्र कमी सुखी कि जास्त हे सांगते पण सुखी कि दुखी हे सांगत नाही. म्हणजे हे उत्तर माझ्या केसमधे ०.३४ आणि गोम्याच्या केसमधे ०.५६ असेल तरी गोम्या साला दु:खीच असू शकतो आणि मी सुखी असू शकतो. स्वतःला सुखी म्हणायची थ्रेशोल्ड कूठून चालू करायची ही व्यक्तिसापेक्ष बाब पण सुखाच्या व्याख्येत महत्त्वाची आहे.
चारपैकी दोन इच्छा पूर्ण झालेले लोक समान सुखी नसतात.
६. निरीच्छ माणसाच्या सुखाची व्याख्या करता येत नाही.
७. इतर
बाय द वे, एकात्म म्हणजे काय? त्याचे कितीही संधी आणि समास केले तरी सुख शब्दाशेजारी हा शब्द विशेषण म्हणून मला नीट समजून घेता येत नाहीय.
12 Sep 2013 - 10:26 am | विटेकर
पूर्तेच्छा व सर्वेच्छांचे गुणोत्तर ही सुखाची व्याख्या तितकीशी 'पूर्ण' नाही
ही व्याख्या पूर्ण नसेल ही पन मग सुखाची पूर्ण व्याख्या काय आहे ?
१ आणि २
माणसाच्या इच्छा इतक्या जास्त असतात
आणिसुखविषयक इच्छा करण्याची माझी क्षमता सिमित आहे
???? सूज्ञ आणि प्रांजळ ची व्याख्या काय ? आणि सर्वच सूज्ञ आणि प्रांजळ माणसे सुखी असतात का ? याचा व्यत्यास सर्वच सुखी माणसे सूज्ञ आणि प्रांजळ असतात का ?
३.
सुख हे जाणिव असे पर्यंत असते, स्मृती असेपर्यंत नाही.
म्हणजे नीट उलग्डून सांगाल का ? ( कॉलिंग संक्षी.. साहेब तुमचा प्रांत सुरु झालाय )
४. माझ्या समजुतीप्रमाणे " एकक " आणि "व्याख्या" अशा स्वरुपात मांडण्याचे हे गणितच नव्हे ! माझ्या लेखात जे सूत्र सांगितले ते विषय ध्यानात यावा म्हणून !त्या प्रमेयाची सिद्धता करण्यापेक्षा ते विषय समजण्याच्या द्रूश्टीने अंगुलीनिर्देश करते - शाखा -चंद्र न्यायाप्रमाणे ! शाखा सोडा - चंद्र ध्यानात घ्यावा. आणि लघुशंका करण्याचे सुख शारिरिक तर घर बांधण्याचे सुख मनाचे आणु बुद्धीचे सुख , त्याची बरोबरी कशी होईल? एकक एकच असला तरी वेक्टर वेग्वेगेळे आहेत. आणि हे लॉजिकल नाही सायकालॉजिकल आहे !
५. पुन्हा तेच ! तुम्ही गणित मांडत आहात .. येथे फजी लॉजिक (मराठी शब्द ??) चालते बायनरी नाही.० किंवा १ असे उत्तर मिळणार नाही, सारेच सापेक्ष आहे.
६. निरिच्छ माणूस हीच सुखाची अंतिम अवस्था आहे. निरिच्छ म्हणजेच इच्छा नसलेला, ज्याचा छेद शून्य आहे ,त्याचे सुख अनंत ( इन्फिनिटी)
७. अन्य
एकात्म म्हणजे सर्वसमावेशक ! एकात्म शब्द असलेल्या या लिंक पहाव्यात. ekaatma upachaar
ekaatm maanavi darshan
12 Sep 2013 - 4:46 pm | संजय क्षीरसागर
अरुणश्री, प्रतिसाद देण्यापूर्वी तुमचे दोन्ही लेख वाचले.
बिफोर वी गो, एक गोष्ट नक्की, तुमच्याकडे लाईन ऑफ थिंकींग आणि मांडणी दोन्ही आहे. तरीही तुमच्या साडेतीन वर्षाच्या सदस्यावधीत या संकेतस्थळावर आपला हा पहिला संवाद आहे याचं नवल वाटतं.
तुमच्या `पुरोगामीत्वाचा शोध' वर मला काहीही म्हणायच नाही (तो वेगळा विषय आहे).
पहिल्या लेखात (स्वत्वाचा शोध) तुम्ही या तात्पर्याला आला आहात :
थोडक्यात, तुमच्या विचारांचा बेस हा आहे:
यू आर डिनाइंग योरसेल्फ!
याचा परिपाक म्हणून वरच्या प्रतिसादात मांडलेला प्रश्न तुम्हाला सतत पडत राहणार :
आणि तुम्ही नेहमी हेच विचारत राहणार :
कारण स्व एकसंध आहे त्याच्या संधी आणि समास होत नाहीत.
पहिल्या लेखात तुम्ही जे म्हटलंय : "अवकाश नावाची काही गोष्ट आहे की काहीच नसण्याच्या संकल्पनेलाच अवकाश म्हणतात?"
हा खरा प्रश्न आहे! आणि जोपर्यंत अवकाश किंवा स्पेसचा तुम्हाला बोध होत नाही तोपर्यंत एकत्त्वाचा बोध होणार नाही कारण अवकाश हेच एकत्त्व आहे.
विटेकरांनी आमंत्रण दिल्यानं इथे आलो अन्यथा मूळ लेखावर चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही.
या प्रतिसादाच्या शीर्षकात नमूद केलेलं तुमचं वाक्य अर्धसत्य आहे. सुख जाणीव असेपर्यंत असतं असं नाही. तरजाणीवेचं स्थिरत्व हे सुख आहे.
मनाची किमया अशी आहे की जाणीवेत घडणारी घटना आपल्याला सुख किंवा दु:ख देते असा आपला समज त्यानं करुन दिलाय. आणि ते खरं दु:खाचं कारण आहे. वास्तविकता अशी आहे की आपण स्वतःच सुख आहोत.
फक्त एकत्व साधायचंय, स्वतःची स्वतःशी एकरूपता जाणायची आहे. हा `एकसंध स्व गवसणं' (ज्याला सत्य म्हटलंय) ते सुख आहे.
त्यामुळे जोपर्यंत माणूस जाणीवेत किंवा स्मृतीत सुख शोधतोय (नॉस्टालजिया हे जाणीवेत निर्माण झालेलं स्मृतीसुख आहे).. तोपर्यंत त्याला ते गवसणार नाही. किंवा गवसलं तरी ते निसटून जाईल कारण प्रत्येक घटना कालबद्ध आहे; मग ती स्मृती असो की प्रत्यक्ष घटना.
आणि ज्या क्षणी त्याला स्वत:च्या एकत्त्वाचा बोध होईल तेंव्हा आपण स्वयेच सुख आहोत हे लक्षात येईल.
12 Sep 2013 - 5:35 pm | arunjoshi123
@ विटेकरजी
१. सुखाची संपूर्ण शास्त्रीय व्याख्या अजून बनायची आहे. सध्याला सुख ठरवायची प्रत्येकाची तर्हा वेगळी आहे.
२. सुज्ञता, प्राजंळता आणि सुख यांचा संबंध आहे असे मी म्हटले नाही. पूर्ण आणि अपूर्ण इच्छांची संख्या मोजताना प्रांजळ माणूस 'आपले सौख्य कशाकशात आहे' हे नीटसे माहित नसल्याची कबूली देऊ शकतो असे म्हणायचे होते.
३. अन्य मतांशी सहमती.
४. अवांतर - 'आजची भारतीयांची स्थिती' म्हणून आपण जे मुद्दे मांडले आहेत त्यांच्याशी शतशः सहमत आहे. परंतु नंतर आपण स्वतः, मन, बुद्धी, आत्मा अशा चार वेगवेगळ्या बाबींचे सुख वर्णिले आहे. आता मला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक अशा वेगवेगळ्या सौख्योर्जा जाणवत नाहीत. सबब शुद्ध मानसिक सुख केवळ मनाला कसे होते, बुद्धिला कसे होत नाही त्याची उदाहरणे द्यावीत. अशा स्पष्टीकरणाच्या अभावी आत्मा या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कि नाही याबद्दल मत नसलेला माणूस हा लेख विशेष गांभीर्याने वाचणार नाही.
५. शब्दार्थाबद्दल धन्यवाद
@संजयजी -
१. मी सहसा केवळ वाचन करतो. क्वचित लिहितो. आपले लेखन मी वाचत आलो आहे. सहसा मला ते आवडते.
२.
मला काय म्हणायचं होतं हे अधिक उचित शब्दांत लिहिलं आहे.
३. स्वत्वाच्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे असे लिहिले आहे. विचाराअंती असे निघाले आहे. कर्मणी प्रयोग करून वाक्य वाचावे. जे विचाराअंती सिद्ध झाले तर ते नाकारणार कसे? मला काय स्वतंत्र नसण्याची हौस आहे का?
४. एकात्म सुख म्हणजे 'एका आत्म्याचे सुख', 'आत्म्याचे एक सुख', 'एक आत्मा असलेले सुख' असे अर्थ मी लावत होतो. सर्वसमावेशक सुख हा सोपा अर्थ चांगला आहे.
५. एकत्व माझ्यामते गणिती संकल्पना आहे. त्याचे दोन अस्पेक्ट आहेत. १. ही क्रिया एक होण्याची आहे कि एकसमान होण्याची आहे कि संख्यने एक असण्याची/बनण्याची क्रिया २. काय काय असे 'एक' होणार आहे.
असे आपण म्हटले आहे तेव्हा कोणती क्रिया होणार आहे नि कोणाकोणात होणार आहे हे कळले नाही. सबब वाक्य पहिल्या झटक्यात कितीही श्रद्धेने वाचले तरी पटत नाही.
12 Sep 2013 - 6:52 pm | राही
"विवेक विरुद्ध लवचिकता .. असा हा विषय नाही. तर विवेकाने लवचिकता असा आहे. समांतर उदाहरण द्यायचे तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार. विवेकाने स्वातंत्र्य उपभोगले नाही तर तो स्वैराचार ठरतो. हक्क आणि कर्तव्ये हातात हात घालून येतात. यापैकी फक्त हक्कच घेईन म्हणाल तर ते आपोआप संपून जातीलच.दिलेल्या सवलतीचा अतिरेक कराल तर सवलत लुप्त होईलच."
वर काही सवाल-जबाब झडले आहेत, त्या संदर्भात : 'विवेकहीन लवचिकतेमुळे आपले नुकसान झाले आणि आम्ही फक्त हक्कच लक्षात ठेवले, कर्तव्य विसरलो; आणि हे सर्व पाश्चिमात्यांच्या प्रभावामुळे/अंधानुकरणामुळे झाले' असा काहीसा अर्थ मला लागला, तो चूकही असेल पण कर्तव्यविस्मृती हा पाश्चिमात्यांचा स्वभाव नाही. उलट ते लोक सेक्यूलर कर्तव्यांविषयी अतिशय तत्पर असतात. नागरिकांच्या जबाबदार्या, उत्कृष्ट वर्कमनशिप या बाबतीत दक्ष असतात.
13 Sep 2013 - 2:10 am | संजय क्षीरसागर
नाही. एकत्त्व हा अनुभव आहे.
नाऊ ट्राय टू अंडरस्टँड धिस :
`सुख ही जाणीवेची स्थिर अवस्था आहे' हा फंडा आहे. त्यामुळे घटना काहीही असो, ज्या क्षणी जाणीव स्थिर होईल त्या क्षणी व्यक्ती सुखी होईल (खरं तर स्वस्थ होईल). याचा अर्थ सुख घटना किंवा स्मृतीवर अवलंबून नाही.
आता मानवी मनाची किमया अशीये की ते जाणीवेचं स्थिर होणं; प्रसंग, घटना किंवा प्रक्रियेशी जोडतं त्यामुळे आपल्याला वाटतं सुख जाणीवेत आहे.
साधी गोष्ट घ्या. प्रणय हे भूतलावरचं सर्वोच्च शारीरिक सुख आहे. तुम्ही जर कधी प्रणयाचा अत्यंत स्वस्थपणे (म्हणजे उद्याचा दिवस शून्य करुन) उपभोग घेतला तर तुम्हाला असा अनुभव येईल की द प्रोसेस जस्ट कनेक्ट्स द पार्टनर्स टू देमसेल्व्ज! थोडक्यात, प्रणयी युगुलाची (दिवसभराच्या व्यापात) सैरभर झालेली जाणीव स्वतःप्रत येते. हे जाणीवेचं स्वतःप्रत येणं सुख आहे. त्याला जाणीव स्थिर होणं म्हटलंय. यू आर कनेक्टेड टू योरसेल्फ. (ऑर रियली बोथ पार्टनर्स आर कनेक्टेड टू देअरसेल्व्ज). बुद्ध या अवस्थेला शून्यावस्था म्हणतो!
कारण काय? तर वेन वन इज कनेक्टेड टू वन सेल्फ, देअर इज नो सेल्फ!... देअर इज ओन्ली स्पेस. एक स्वास्थ्य, संपूर्ण शांतता असते. त्याला व्यक्तीत्वाचा किंवा अहंकाराचा लय होणं म्हटलंय. बरेच लोक दुसर्याला अहंकारी ठरवायच्या नांवाखाली काहीही खपवतात कारण त्यांना स्वतःलाच काही कळलेलं नसतं.
तर ही स्पेस, हे निराकार अवकाश, जे आपलं मूळ रुप आहे ते एकत्त्व आहे. आणि तो स्वतःचा अनुभव होणं सत्य गवसणं आहे.
पण मन सांगतं सुख प्रणयात आहे!
पुढे तर आणखी मजा आहे. मन सुखाची प्रतवारी करतं. प्रणायाच सुख (क्षूद्र), देवभक्तीचं सुख (श्रेष्ठ), नातेसंबंधातली सुखं (आवश्यक), संपत्तीलाभाचं सुख (जगायला अनिवार्य), पर्यटनाचं सुख (नेहमी शक्य नाही पण अधूनमधून हवंच)... आणि कायकाय प्रकार आहेत याची तुम्हाला कल्पना आहेच.
अशाप्रकारे माणूस अनुभवजन्य सुखाच्या मागे लागतो आणि ते कालबद्ध असल्यानं (वरुन काहीही दाखवो) आतून नेहमी अस्वस्थ राहातो .
पण ज्या क्षणी व्यक्तीला स्वत:च्या एकत्त्वाचा बोध होतो तेंव्हा आपण स्वयेच सुख आहोत हे लक्षात येतं. हा सार्या अध्यात्माचा मथितार्थ आहे.