आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - ३

पंकज's picture
पंकज in जनातलं, मनातलं
7 Jun 2008 - 11:40 am

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २

आर्यांच्या मुळस्थानबद्दल डॉ. आंबेडकरांचा मुळ लेख हा बराच मोठा आहे, त्यात ऋग्वेदांतील तसेच इतर धर्मग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत, जसे वर्ण या शब्दाचा उल्लेख इराणी वांङ्मयात येतो. "वर्ण" किंवा "वरेण" हा शब्द "झेंद अवेस्ता"(Zenda Avesta) मध्ये ६ वेळा वापरलेला आहे. "झेंद अवेस्ता" मधिल "वर्ण" किंवा "वरेण" च्या उल्लेखाबद्दल दिलेले स्पष्टिकरण जवळजवळ दोन ते तीन पानांचे आहे. त्यामुळे आंबेडकरांचा मुळ लेख इथे उतरवणे शक्य नव्हते, मला जो भाग महत्वाचा वाटला तो इथे उतरवला आहे. त्यामुळे कदाचीत हे लेख अपुर्ण वाटू शकतात.( तसे असल्यास त्यास मी जबाबदार ठरतो.)

आर्य वंशाचे दोन पंथ होते.

आर्यांनी भारतावर स्वारी केली व दास व दस्यू यांना जिंकले या सिध्दांताला जे लोक उचलून धरतात त्यांनी ऋग्वेदातील काहि ऋचांकडे कानाडोळा केलेला आहे. या ऋचा लक्षात न घेता त्या सिध्दांताची ज्यांनी उभारणी केली त्यांचा सारा खटाटोप व्यर्थ आहे, असे त्या ऋचा वाचल्यानंतर लक्षात येते. त्या ऋचा खाली देत आहे.

१. ऋग्वेद, ६-३३-३ - "हे इंद्रा! आमचे शत्रु दास व आर्य या दोघांनाही तू ठार केले आहेस."
२. ऋग्वेद, ६-६०-३ - " सन्मार्ग आणि सध्दर्म यांचे पालन करणार इंद्र व अग्नी यांनी आम्हाला घायाळ (दुखापत) करणारे दास व आर्य यांना नेस्तनाबूद केले."
३. ऋग्वेद, ७-८१-१ - "सुदामाचे शत्रु दास व आर्य यांना इंद्र व वरूण यांनी ठार मारले व त्यांनी दास व आर्य यांच्यापासून सुदामाचे रक्षण केले."
४. ऋग्वेद, ७-२४-२७ - "हे इंद्रा! सिंधू नदिच्या तीरावर राहाणार्‍या क्रूर राक्षसांच्या आणि आर्यांच्या तावडीतून तू आम्हाला मुक्त केलेस. तू दासांच्या हातातून त्यांची शस्त्रे हिरावून घे."
५. ऋग्वेद, १०-३८-३ - "हे परमपूज्य इंद्रा! अधार्मिक दास व आर्य हे आमचे शत्रू आहेत. त्यांचा सहजपणे पाडाव करण्याचे सामर्थ आमच्यात येवो, तु आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या साहाय्याने आम्ही त्या शत्रूंना ठार करू"
६. ऋग्वेद, १०-८६-१९ - "हे ममेयूं! जो तूझी प्रार्थना करतो त्याला तू सर्वप्रकारचे सामर्थ देतोस. आपले शत्रू आर्य व दस्यू यांचा आम्ही तुझ्या मदतीने संहार करू."

वरील ऋचा आर्य ऋषींनी तयार केलेल्या असल्या पाहिजेत. त्या ऋचांतील अर्थ आर्य वंशाविरूध्द आहेत. या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर असे अनूमान काढता येते की आर्यांचे दोन वर्ग होते व ते परस्परांपासून सर्व दृष्टीने भिन्न होते व म्हणूनच ते वैरभावाने परस्परांशी वागत व झगडत होते. आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते हे सत्य होते व ते सत्य सिध्द करणारे अनेक पुरावे आहेत.

आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते. त्याचा एक पुराव असा की, निरनिराळ्या वेदांना पवित्र मानण्याबद्दल आर्यांत पुष्कळ दिवस वितंडवाद चालला होता. वेदांचा ज्यांनी कसून अभ्यास केलेला आहे त्यांची खात्री झालेली आहे की, खर पाहिले असता ऋग्वेद व अथर्ववेद हे दोन ग्रंथ वेद या पदवीला योग्य आहेत. सामवेद व यजुर्वेद हे ऋग्वेदाचे केवळ निरनिराळे भाग होत.
ऋग्वेदाला जितके पवित्र मानावे, तितकेच अथर्ववेदाला पवित्र मानावे, या गोष्टीला ब्राम्हण लोकांनी पुष्कळ वर्षे विरोध केलेला होता, ही गोष्ट वेदाभ्यासी पंडितांना माहित आहे.
ऋग्वेद व अथर्ववेदाला समसमान पवित्रपणा देण्यस ब्राम्हण का तयार नव्हते?
ऋग्वेदाला पवित्र तर अथर्ववेदाला अपवित्र मानण्याकडे ब्रांम्हणांची मनोवृत्ती का धावत होती?
माझ्या मते या प्रश्नांचे उत्तर असे आहे की. ऋग्वेद हा एका वर्गातील आर्यांनी रचला व अथर्ववेद हा दुसर्‍या वर्गातील आर्यांनी रचला, आणि हे दोन्ही वर्ग परस्परात मिसळून आर्यांचा एक वर्ग तयार झाला. तेंव्हा ऋगवेद व अथर्ववेद यांना समसमान पवित्रपणा देण्यात आला.

याशिवाय दुसरे पुरावे सर्व ब्राम्हणी वांङ्मयात इतस्ततः विखुरलेले आढळून येतात. हे पुरावे विशेषतः विश्वोत्पत्तीसंबंधी जे दोन सिध्दांत मांडण्यात आलेले आहेत त्यात दिसून येतात. या दोन सिध्दांतावरून असे सूचित होते की, ते आर्यांच्या दोन वर्गाने मांडलेले असावेत.

तैत्तिरीय संहिता, शतपथ ब्राम्हण, तैत्तिरीय आरण्यक, महाभारताचे वनपर्व, महाभारताचे आदिपर्व, रामायणातील दुसरे कांड, रामायणातील तिसरे कांड, तसेच पुराणातील काहि संदर्भ- जसे सूर्यवंशी लोकासंबंधी विष्णू पुराणातील गोष्ट, तशाच स्वरूपातील सोमवंशी लोकांसंबंधी गोष्ट...(मूळ लेखामधील सिध्दांताचे सविस्तर वर्णन मी इथे देत नाही , तर फक्त त्या ग्रंथांचा उल्लेख येथे करत आहे)

विश्वोत्पत्तीसंबंधीचे उपरिनिर्दिष्ट खुलासेवजा सिध्दांताची तुलना केली तर आपणाला काय दिसून येते? मला वाटते कि, या तुलनेतून पुढील मुद्दे उपस्थित होतातः-
१. विश्वोत्पत्तीसंबंधीचा एक सिध्दांत धार्मिक स्वरूपाचा आहे; तर दुसरा धर्मांतीत स्वरूपाचा आहे. (one is sacerdotal in colour and character, the other is secular()
२. मनू हा मानव असून तो सृष्टीचा कर्ता होय असे एक सिध्दांत मानतो; तर दुसरा सिध्दांत असे मानतो की, सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेव किंवा प्रजापती आहे.
३. एक सिध्दांत ऐतिहासिक घटना सांगणारा आहे; तर दुसरा सिध्दांत अलौकिक घटनांची कथा सांगणारा आहे.
४. एक सिध्दांत जलप्रलयाची कथा सांगतो; तर दुसरा सिध्दांत त्याबद्दल ब्रसुध्दा काढीत नाही.
५. एक सिध्दांत चार वर्णांचे स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवितो; तर दुसरा सिध्दांत समाजाची उत्पती कशी झाली, याचेच स्पष्टीकरण करण्याची मनीषा दाखवितो.

दोन प्रकारच्या सिध्दांतामध्ये असलेले उपरिनिर्दिष्ट फरक हे संख्येने बरेच व स्वरूपाने प्रमुख दर्जाचे आहेत हे स्पष्ट होते. चातुर्वर्ण्यासंबंधी जे निरनिराळे स्पष्टीकरण या दोन सिध्दांतांनी दिलेले आहे त्यातील फरक हा विशेषतः स्थूल मानाचा आहे. धार्मिक स्वरूपाचा जो सिध्दांत आहे त्यात चातुर्वर्ण्याला महत्व दिलेले आहे. धर्मविरहित स्वरूपाचा जो सिध्दांत आहे त्यात चारुर्वर्ण्याचे नावही नाही. मनूच्या संततीचे स्थित्यंतर चार वर्णात कसे झाले, हे दाखविण्याच्या हेतूने दोन्ही प्रकारच्या सिध्दांताची एकजूट करण्याचे प्रयत्न झाले, हे खरे आहे. ही गोष्ट रामायण व पुराणे यातील सिध्दांत लक्षात घेतले तर कळून येते. परंतू दोन्ही ध्येयवादी सिध्दांत एकत्र करण्याचा हा प्रयत्न होता हे स्पष्ट आहे. हा प्रयत्न जाणूनबुजून आणि पूर्वयोजनेनुसार झालेला आहे. परंतु या दोन्ही प्रकारच्या ध्येयवादी सिध्दांतात एवढा स्थूल मानाचा फरक आहे की, ते सिध्दांत एकत्र करण्याचा प्रयत्न झालेला असतानाही तो फरक स्पष्टपणे दृग्गोच्र होतो. या बाबतीत अशी गंमत झालेली आहे की, चातुर्वर्ण्याबद्दलचे एकच स्पष्टीकरण असण्याएवजी दोन स्पष्टीकरणे झालेली आहेत. एक पुरूषाने उत्पन्न केलेले चातुर्वर्ण्य व दुसरे मनूच्या पुत्रांनी पायरीपायरीने तयार केलेले चातुर्वर्ण्य. दोन्ही ध्येयवादी सिध्दांत एक करण्याचा प्रयत्न जो झाला त्याचा परिणाम अगदी ओंगळ स्वरूपाचा झाला. यावरून हेच सिध्द होते कि, ते सिध्दांत मूलतः वेगळ्या स्वरूपाचे आणि परस्परांशी न जुळणारे असे आहेत. हे भिन्न स्वरूपाचे दोन प्रकारचे सिध्दांत ब्राम्हणी वांङ्मयात असतानासुध्दा या विषयाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, अशा पंडितांनी त्याची दखल घेतलेली नाही, ही एक शोचनीय गोष्ट आहे. परंतु ते सिध्दांत अस्तिवात आहेत व ते विशेष प्रकारचे आहेत हि बाब डोळ्याआड करता येणार नाही. या सिध्दांताच्या अस्तिवात्वाचे जे महत्व आहे ते कोणते? मला असे वाटते की, परस्पर भिन्न अशा स्वरूपाचे जे हे दोन्ही प्रकारचे सिध्दांत आहेत ते निरनिराळ्या दोन आर्य वंशीयांनी मांडलेले असावेत. एक आर्य वंश चातुर्वर्ण्याला मानणारा असावा तर दूसरा आर्य वंश चातुर्वर्ण्याला मानणारा नसावा. हे दोन्ही वंश काहि काळानंतर परस्पारात मिसळले असावेत व त्यांना एकाच आर्य वंशाचे लोक म्हणून संबोधण्यात आले असावे. ही तर्कपध्दती जर सबळ वाटली तर दोन्ही सिध्दांतातील स्थूल भेद जो ब्राम्हणी वांङ्मयात दाखविण्यात आलेला आहे तो आपल्या नव्या सिध्दांताला (आर्य वंशाचे दोन पंथ होते) पोषक असाच पुरावा होतो.

क्रमशः (मूळ लेख इंग्लिशमध्ये आहे. हवा असल्यास व्य. नि. ने पाठवू शकतो.)

इतिहासमत

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Jun 2008 - 11:52 am | llपुण्याचे पेशवेll

पंकज,
आपला उपक्रम छान आहे.
पुण्याचे पेशवे