स्व. श्री. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे यांच्या परिवारात ते ही डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या पोटी जन्माला येणे हे माझे खरोखरच भाग्य आहे. जन्मापासून गडचिरोली जिल्ह्यातील लोक बिरादरी प्रकल्पात वाढलोय. तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. दुर्दैवाने बाबा आणि साधनाताई आमटे (आजी-आजोबा) यांचा अतिशय थोडा सहवास मला लाभला. बाबा - आजी दोघही चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांचा कर्मभूमीत आनंदवनात राहायचे. ३-४ महिन्यातून एकदा त्यांची लोक बिरादरी प्रकल्पाला भेट असायची. १-२ दिवस राहून ते आनंदवनाला परतायचे. आनंदवन-हेमलकसा हे अंतर २५० किलो मीटर आहे. १९७३ ते १९८६ या काळात नागेपल्ली ते हेमलकसा हा ६० किलोमीटरचा प्रवास रस्ताच नसल्याने फार अवघड होता. बैलगाडीच्या रस्त्यावरून घनदाट जंगलातून वाट काढीत नागेपल्ली येथून हेमलकसाला पोहोचायला ५-६ तास सहज लागायचे. पावसाळ्यात ६ महिने जगाशी संपर्क संपूर्णपणे तुटायचा. पावसाळ्यात हेमलकसाला जायचेच असेल तर २ दिवस चालत, सायकलीने किंवा बैलगाडीने जावे लागायचे.
आई-बाबा यांचे कार्य मी आणि माझ्या थोरल्या भावाने (डॉ.दिगंत) जन्मापासूनच अनुभवलंय. त्यांचा कामाचा प्रभाव आमच्या मनावर कायमचा कोरला गेला. नकळत घडलेले संस्कारच आम्हाला या हेमलकसा येथील आई-बाबांची कर्मभूमी असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या या मातीत परत घेऊन आलेत. जगाकडे पाठ फिरवून केलेले आई-बाबांचे हे निरपेक्ष कार्य आमच्यापुढे नेहमीच आदर्श राहील.
लोक बिरादरी प्रकल्पाचा सुरवातीचा काळ फारच खडतर होता. असे म्हणणे खरे तर चुकीचे ठरेल. कारण आई-बाबा व त्यांचा सोबतीला असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी हा मार्ग जाणून बुजून स्वीकारला होता. त्याबद्दल त्यांना कधीच पश्चाताप झाला नाही. उलट कार्याचा - दवाखान्याचा आदिवासी लोकांना फायदाच झाल्याने त्यांना समाधान मिळाले. वन्यजीवान प्रमाणे जगणाऱ्या - जंगलावरच १०० टक्के उपजीविका करणाऱ्या या अतिमागास अश्या माडिया-गोंड आदिवासींनी बाबा आमटे/प्रकाश आमटे यांना आमच्याकरिता दवाखाना किंवा शाळा सुरु करा असे कधी सांगितले नव्हते. या भागात प्रकल्प सुरु करणे म्हणजे आपली गरज होती. त्यांची नव्हती. स्वतःच्या समाधानाकरिता हे सुरु झालेले काम होते. हे काम आता त्याच पद्धतीने आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आदिवासींना अन्न-वस्त्र-निवारा मिळावा, त्यांच्यावर नीट उपचार व्हावे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे ही आजही आमची गरज आहे. हे काम आम्ही फक्त स्वतःच्या स्वार्था करिता व समाधाना करिता करतोय हे महाराष्ट्रातील समाजकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. समाधाना पेक्षा अजून काय हवे असते आयुष्यात?
शिक्षणा अभावी आदिवासींची भरपूर लुट व्हायची. या भागातील आदिवासींना मीठ, तेल, साखर काहीच माहिती नव्हते. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी मीठा साठी त्यांची भरपूर लुट केली. शहरातून व्यापारी यायचे १ किलो मीठाच्या बदल्यात १ किलो चारोळी, डिंक किंवा मध घेऊन जायचे. त्या काळात १० पैसे किलो मीठ होते. आणि मध, चारोळी आणि डिंक याला २५ ते ४० रुपये भाव शहरात मिळायचा. अन्नात मीठ टाकल्यावर अन्नाला चव येते हे लक्षात आल्यावर मिठाच्या मोबदल्यात जंगलातील मध-चारोळी-डिंक आदिवासी व्यापाऱ्याला देऊ लागलीत. हे आदिवासी अशिक्षित आहेत म्हणून नागविल्या जाताहेत हे आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की या भागातील लोकांना मीठ आणून पोहोचवायचे. वर्षातून एकदा एक मोठा ट्रक भरून मीठ या भागात आणले जायचे. ट्रक आल्यावर आमचे कार्यकर्ते गावा-गावात जाऊन लोकांना मीठाचा ट्रक आल्याची माहिती द्यायचे. या भागातील किमान ७०-८० खेड्यातील लोकांना मीठ वाटप केले जायचे. ज्या किमतीत विकत घेतल्या जायचे त्याच किमतीत आदिवासींना विकायचे असे सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले होते. मीठ वाटप प्रकल्पाला प्रचंड प्रतिसाद आदिवासी बांधवांनी दिला. वर्षभराचा मीठाचा साठा लोक करून ठेवायची. मीठ घेण्याकरिता लोकांची भलीमोठी रांग लागायची. मीठा प्रमाणेच केरोसीन (रॉकेल) साठी सुद्धा या लोकांची लुट व्हायची. म्हणून केरोसीनचे ही वाटप लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत होत असे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरवातीची १०-१२ वर्षे हा उपक्रम प्रकल्पाने यशस्वीरित्या राबविला. याभागातील आदिवासीनच्या अंगावर अतिशय कमी कपडे असायचे. फारसा पैसा हाताशी नसल्याने त्यांना नविन कपडे विकत घेणे परवडायचे नाही. म्हणून सुरवातीचे २५ वर्षे आई (डॉ.मंदाकिनी) ने या भागातील लोकांकरिता स्वत नविन कपड्यांचे दुकान चालविले. नागपुरातून जनता साड्या आणि आनंदवनातून टावेल, पंचे, धोतर होलसेल मध्ये अतिशय कमी दरात विकत आणायचे आणि इथे त्याच दरात लोकांना विकायचे. सकाळी दवाखान्याची OPD आटपल्यावर दुपारी दोन तास हा उद्योग आई करीत असे. या कामाला पण अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. छंद म्हणून दुपारच्या फावल्या वेळात बाबा (प्रकाश) लोकांचे रेडियो व घड्याळ दुरुस्तीचे काम करीत असे. आदिवासींकडे असलेला थोडाफार पैसा ठेवायला त्यांच्याकडे काहीच नसायचे. झोपडीत कुठेतरी वरती खोपच्यात ते नोटा लपवून ठेवायचे. अनेक वेळा त्या नोटा उंदीर कातरून टाकायचे. मग ते लोक बाबा-आई कडे यायचे. त्या नोटा नागपूरच्या रिझर्व बँकेत जाऊन बदलून आणायचे काम पण आई-बाबाचं करत. अनेक वेळा उंदराने नोटांवरील नंबर खाल्याने पैसे बरेच कमी होऊन मिळायचे. याला पर्याय म्हणजे बँक. म्हणून गडचिरोली जिल्हा को-ओपरेटीव बँकेची शाखा आमच्या प्रकल्पात सुरु करण्यात आली. आदिवासी अशिक्षित असल्याने अनेकांचे बँकेत खाते काढण्याचे काम सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनीच अनेक वर्ष केले. आदिवासी बांधवांचा लोक बिरादरी प्रकल्पावर असलेला प्रचंड विश्वास हाच आमच्या कामाचा श्वास आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यानी ही आदिवासींची पिळवणूक-फसवणूक केली होती. आदिवासींकडून काम करवून घ्यायचे पण हातात एकही पैसा देत नसत. तुम्ही जंगलात राहता म्हणून तुम्हाला हे काम करणे बंधनकारक आहे असे सांगून त्यांच्या कामाची सर्व मजुरी स्वतः हडप करायचे. अशा अनेक प्रकारे या अर्धनग्न - अशिक्षित आणि अतिशय भोळ्या आदिवासी लोकांची पिळवणूक - फसवणूक आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांकडून व्हायची. म्हणून लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी १९७६ साली या भागात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे हक्क कळावे, अन्याया विरुद्ध लढण्याची ताकत निर्माण व्हावी तसेच रोजगार मिळविण्या पुरते शिक्षण आदिवासींना देण्या करिता १ जुलै १९७६ साली लोक बिरादरी आश्रमशाळेची स्थापना झाली.
अनिकेत आमटे
(संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा)
लोक बिरादरी प्रकल्प,
मु. हेमलकसा, पोस्ट-तालुका. भामरागड,
जिल्हा. गडचिरोली- ४४२ ७१०. मो. ९४२३२०८८०२
ईमेल - aniketamte@gmail.com वेबसाईट - www.lbphemalkasa.org.in & www.lokbiradariprakalp.org
प्रतिक्रिया
12 Oct 2011 - 9:58 pm | अप्पा जोगळेकर
आजच वर्तमानपत्रात लोक बिरादरी प्रकल्प आर्थिक अडचणीत अशी बातमी वाचली. आणि आत्ता हा धागा. हा योगायोग नसेल तर चांगलेच आहे. तुमच्या कार्यासाठी आणि आर्थिक अडचणींचे निवारण होण्यासाठी शुभेच्छा.
12 Oct 2011 - 10:19 pm | मितभाषी
पदोपदी पसरुन निखारे आपुल्याच हाती
बेभान होऊन धावलो जेव्हा ध्येयपथावरती.
लेख वाचून ह्या ओळी आपसूक ओठावर आल्या. बाबांनी सुरु केलेल्या ध्येयमार्गावरुन चालणारी ही तिसरी पिढी..
ही भावना अत्यंत प्रामाणिक वाटली. पुढील वाटचालीस शुभेच्छा मित्रा.
12 Oct 2011 - 10:20 pm | प्रचेतस
असेच म्हणतो.
लोकबिरादरी प्रकल्पाच्या इतरही हकीकती जाणून घ्यायला आवडेल.
12 Oct 2011 - 11:05 pm | विलासराव
मला तिथे हेमलकसा आणी आनंदवनला भेट देण्याची ईच्छा आहे.
कधी येता येईल त्याबद्दल काही माहिती दिलीत तर बरं होईल.
12 Oct 2011 - 11:19 pm | मन१
वेगळ्या जगाची नवीनच माहिती मिळते आहे.
माझी काही दिवस श्रमदान करायची तयारी आहे, आमच्यासारख्यांसाठी आपल्याकडे काही काम आहे का?
ह्याच संदर्भात खरडही टाकली आहे आपल्याला, उत्तर आल्यास बरे होइल.
12 Oct 2011 - 11:24 pm | अर्धवटराव
मित्रा,
तुमच्या प्रकल्पात मला खारीचा वाटा नक्कीच उचलता येईल, तेव्हढच एक समाधान :)
व्य.नि. तुन संपर्क करीलच.
अवांतरः असला कुळधर्म/घरणेशाहीचा वारसा इज मोस्ट वेलकम. आमच्या राजकारण्यांना ("हात" वाल्यांना इन पर्टिक्युलर) कधी हे जमेल काय??
अर्धवटराव
13 Oct 2011 - 10:30 am | अर्धवट
अर्धवटरावांशी पुर्ण सहमत..
काउंट मी इन.
13 Oct 2011 - 4:14 pm | प्यारे१
मी थ्री.
-प्यारेर्धवट.
12 Oct 2011 - 11:25 pm | रेवती
लेखन आवडले.
ज्याप्रकारे अदिवासींचे कष्ट वापरले गेले ते वाचून त्या अधिकार्यांच्या, व्यापार्यांच्या निष्ठूरतेची कल्पना आली.
अजून यापेक्षाही सुन्न करणारे अनुभव वाचवणार नाहीत.
12 Oct 2011 - 11:27 pm | वसईचे किल्लेदार
आम्ही (LRN India pvt. ltd.) वर्षातुन दोनदा आदीवासींना कोणत्यातरी संस्थेमार्फत कपडे आणी श्रमदान करतो (हे ही फक्त स्वतःच्या समाधाना करिता). तरी आपणास आर्जव आहे की जरूर भासल्यास कळवीणे. (vikasmanze2@gmail.com).
12 Oct 2011 - 11:45 pm | मी-सौरभ
मी या वर्षी सोमनाथ शिबीराला आलो होतो आणि सध्या 'समिधा' वाचतोय त्यामुळे हा धागा अजून जवळचा वाटतोय.
तुमच्या या धाग्याने सुरवात छान झाली आहे...
म.से.स. च्या वेगवेगळ्या उपक्रमांची वेळोवेळी माहिती दिलीत तर मिपाकर आपल्याला नक्कीच जमेल ते सहकार्य करतीलच....
13 Oct 2011 - 12:06 am | प्राजु
संपूर्ण आमटे कुटुंबाबद्दल नेहमीच आपुलकी आणि आदर वाटत आला आहे.
आपल्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा!
13 Oct 2011 - 1:28 am | प्रभाकर पेठकर
निस्वार्थ समाजसेवेचा वसा उचलणे, स्वखुशीने खडतर मार्गावर स्वतःचे आयुष्य ढकलणे, दुर्लक्षितांच्या हितासाठी झटणे ह्याला लागणारी मनस्विता अंगिकारून श्री. आमटे आणि कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श, एक दीपस्तंभ उभा केला आहे.
तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. जमेल तशी मदत करण्याची इच्छा जरूर आहे.
13 Oct 2011 - 9:39 am | ५० फक्त
तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा अन जेंव्हा मला शक्य होईल तेंव्हा निश्चितच मदत करायला येईल हे वचन.
13 Oct 2011 - 3:41 pm | नि३सोलपुरकर
बाबा आमटे आणि कुटुंबियांनी समाजासेवेचा जो एक आदर्श उभा केला आहे,त्यापुडे नतमस्तक.
आपल्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा!
13 Oct 2011 - 4:31 pm | धनंजय
प्रकल्पाला शुभेच्छा
13 Oct 2011 - 4:42 pm | विसुनाना
-आदर्श विचार.
(म्हणूनच) आमटे कुटुंबियांना सलाम.
13 Oct 2011 - 7:06 pm | पैसा
तुमच्या दोन्ही प्रकल्पांना शुभेच्छा! असंच जमेल तेव्हा आणखी माहिती द्या अशी विनंती. म्हणजे ज्याना काही काम करायची इच्छा आहे पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाही त्याना काही दिशा मिळेल.
13 Oct 2011 - 7:45 pm | वाहीदा
दिव्यत्वाची जेथ प्रचिती,
तेथे कर माझे जुळती ||
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाहि पणती
जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती
मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती
आमटे कुटुंबियांसमोर नतमस्तक !! ___/\____
मला शक्य होईल तितकी निश्चितच मदत करायला मला आवडेल
14 Oct 2011 - 5:32 pm | सुहास..
मटामधील बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10347783.cms
संसदेतील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ व कंसात त्यांचे दर (रुपयांत) असे - खिचडी (10), बिर्याणी (51), फळांचा ताजा रस (14), मेदूवडा व इडली (4), मसाला दोसा (6), सूप ( 8 ), मिनी पिझ्झा (19.50), ढोकळा (9), सामोसा (6.50), तंदुरी चिकन एक मोठा किंवा दोन लहान पीस, एका माणसाला पुरेल एवढे (31), चिकन किंवा मटण कटलेट (29), व्हेज कटलेट (10), फिश फ्राय-चार लहान पीस (25), व्हेज-नॉन व्हेज थाळी (20), तीन कोर्स मील- व्हेज-सूप, मुख्य जेवण व डेझर्ट (61). हे दर गेल्या अधिवेशनादरम्यानच वाढविण्यात आले आहेत. जे गोड पदार्थ किंवा मिठाई-मिष्टान्न संसदेच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध केले जातात, त्यांना अनुदान दिले जात नाही; परंतु हळूहळू हे अनुदान नियमितपणे कमी होताना आढळत आहे. अर्थात "आम जनते'ला संसदेच्या कॅन्टीनमधील दर पाहून हेवा वाटण्याचे कारण नाही. हे दर केवळ संसदसदस्यांसाठी नाहीत. सरसकट संसदेत काम करणाऱ्या सर्वांना ते लागू होतात.
:( ईतर काही लिहीणासारखे नाही !
16 Oct 2011 - 12:08 pm | मितभाषी
.
16 Oct 2011 - 12:33 pm | निनाद मुक्काम प...
प्रकल्पाला शुभेच्छा
नाना म्हणतो ते अगदी योग्य आहे .
आमट्यांची तिसरी पिढी व सूना बाबांच्या कार्यात हातभार लावत आहेत .
आजपर्यत राजकारण घराणेशाही आपण खूप पहिली ,पण परोपकारांची घराणेशाही सुद्धा असू शकते .हे आमटे कुटुंबियांकडे पहिले तर सिद्ध होते .
त्यांचा प्रकल्प आर्थिक दृष्ट्या अडचणीत याहून मोठे दुर्दैव नाही .