खिंडारात तर आजकाल कुणीही सापडतं. गावभर चर्चा वगैरे होते तो भाग वेगळा. मुळात खिंडारात कुणीही गेलं प्रेमाचे नवेनवे अविष्कार साजरे होतात. बर, बघणारे त्यावेळी तिथेच कसे हजर असतात हा ही मला प्रश्न आहे. परवा रात्री म्हणे तिथे निलम सापडली. नक्की कशाला गेलती किंवा नक्की कोणत्या पोझिशनमध्ये सापडली याचे डिटेल्स अजूनतरी आलेले नाहीत.
मी काय अमोलची गाठ घेतली नाही. त्याला काही विचारलंपण नाही. उगाचंच त्याला डिवचणे योग्य नव्हते.
अमोल एकतर फारंच लुकडा. डोक्यालापण अर्धवट टक्कल पडायला सुरुवात झालेली. आणि याने तिला फ्रेंडशीप डे ला हातात हात देऊन विश वगैरे केलेलं.
निलम म्हणजे तिला रुपवान, सौदर्यवती वगैरे विशेषणे लावलीच पाहिजेत. ती त्याच्याशी तुरळक वगैरे बोलायची. पण त्याला अफेअर वगैरे म्हणणे फारंच चुकीचे ठरेल.
लंगूर के हाथ मे अंगूर असा विचित्र प्रकार. तो तिचे नाव वगैरे वहीवर गिरवत बसायचा. एकतर तो तिच्यापुढे कधी जातच नव्हता. गेलातर एकदोन वाक्ये बोलून रुमवर येऊन प्रसन्न हसत बसायचा.
हा प्रकार बरेच दिवस चालू होता.
दुसरं एक प्रकरण म्हणजे खुद्द सुनील. त्याला स्मिता नावाच्या एका मुलीने डायरेक प्रपोजच केले होते. खरंतर सुनीलला रानटीच म्हटले पाहिजे. तो पहिल्यापासूनच तिला टाळत होता. नक्की त्याचं काय बिनसलेलं त्याचे त्यालाच माहित. तिचा फोन वगैरे आला तर हा सरळ सांगायचा, "तिला मी नाही म्हणून सांग"
मग तो निरोप घेऊन आलेला मुलगा पुन्हा फोनवर जायचा तेव्हा ती मुलगी त्याला बोंबलून सांगायची, "तो तिथेच आहे. मला माहीत आहे. बोलव त्याला"
हे असलं रानटी प्रेम.
एकदा तिनं फोन करुन याला गर्ल्स होस्टेलवर बोलवलं. मग हा पण गेला. तिथं गेटवरंच ती तिच्या आईवडीलांना घेऊन थांबली होती. यानं बघितलं आणि तिथूनच यू टर्न मारुन पसार.
आता तिसरे प्रकरण. याचा नायक आहे गौरव. आणि नायिका आरती.
गौरव नापास होत होत वगैरे आमच्याच बॅचला येऊन बसला. हे एक काळं काटकुळं पोरगं होतं. तंबाखू वगैरे भरपूर खायचं. सिनीयर असल्याने आम्ही त्याला फुकाचा मान वगैरे द्यायचो. याचा फक्त एकच उद्योग, आरती लायब्ररीत आली की हा लांबच्या कोपऱ्यात बार वगैरे लावून बसायचा. बस. एवढंच. संपली याची स्टोरी.
तिन्ही प्रकरणांचा अभ्यास वगैरे केल्यास असे दिसून येते की,
पहिल्यात समोरचा शत्रू युद्धाच्या तयारीत. आणि आपली पार्टी युद्ध जिंकल्यानंतरचा जाहीरनामा वगैरे कसा असावा या विचारात गढून गेलेली.
दुसऱ्या प्रकरणात, समोरचा शत्रू हत्यारे वगैरे परजून चाल करुन आलेला. आपली पार्टी हत्यारे वगैरे घेतलेली. पण बरोबर उलट्या दिशेने पळत सुटलेली.
तिसऱ्या प्रकरणात तर दूर दूर कुठे शत्रूचा मागमूसच नाही. आपली पार्टी फुकाची हत्यारे घेऊन तयार.
------------
-------------
पहिल्या वर्षी रॅगिंग वगैरे आमच्यावर कोणी केलंच नव्हतं. उगाचच हुरहूर लागून राहिलेली. याचा काय तसा संबंध नाही पण त्यावर्षी नवीनच आलेल्या बिहारी पोरांवर भयानक रॅगिंग झालं. एकूण आठ जण होते. रात्री एक दिडला आले. सगळ्या होस्टेला त्यांनी बाहेरुन कड्या घातल्या. वरच्या मजल्यावर एकेक सिलेक्टेड बिहारी पोरगं बाहेर काढलं. आणि हॉकी स्टिकनं बेदम मारहाण. याचं कारण होतं कुठलातरी आदेश त्यांनी मान्य केला नव्हता. मारणारे पण बिहारी. मार खाणारे पण बिहारी.
त्यांनी तिघा चौकांना धुतलं. त्यातले दोघे पहाटे हॉस्पिटलमध्ये. एकजण अत्यवस्थ.
सकाळी भरपूर गदारोळ वगैरे. प्रिन्सीपल वगैरे आले. पाहणी करुन गेले. मग पोलिस वगैरे आले. ते आठ नमुने कोण हे मलाही पाहायचं होतं. म्हणून आम्ही सकाळपासूनच कॉलेजच्या मुख्य चौकात हिंडत बसलो होतो. कुठूणतरी एक नमुना पोलिसांनी पकडला. आणि सगळ्यांसमोर आणून त्याच्या बरोबर गालावर भयानक मुस्काटात मारली. अबब! कसला तो आवाज.
एकजण म्हणाला, हाच तो संजूबाबा. गँगचा लीडर.
एकतंर हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. आणि हा प्राणी पहिल्यांदाच बघत होतो.
मग पोलिसांनी त्याला गाडीत घातलं आणि घेऊन गेले स्टेशनात. तिथं त्याला दोन दिवस कैद केलं. मग दिलं सोडून.
माझा एक बिहारी मित्र आहे. शितलकुमार. अगदीच गरीब मुलगा. त्यानं माशीसुद्धा कधी मारली नसेल. तो मला पोर्चमध्ये भेटला. तो म्हणाला,
आजसे हमने सबकुछ बंद किया है. हम बाल नही कटवायेंगे. हम शर्ट-इन नही करेंगे. 'हैलो सर' तो किसीके बाप को भी नही बोलेंगे.
त्याच्या मुठी वगैरे आवळल्या होत्या. तो शांतपणेच पण जरा जोर देऊन बोलत होता. म्हणाला,
"बदला लेंगे, हम इसका बदला लेंगे. एकबार पढाई खतम होने दो. हम उसे नही छोडेंगे. बिहारमे उसे ढूंढके मारेंगे. अब ये मेरे जिंदगीका मक्सद बन गया है."
याचे विचारतर एकदम क्रांतीकारी होते. नंतर संजूबाबाला खल्लास करणे हे बऱ्याच जणांच्या आयुष्याचं ध्येय वगैरे होऊन बसले.
संजूबाबा नंतर बुलेट वगैरे घेऊन कॉलेजवर चकरा मारुन गेला. हा पण जब्बारच्याच बॅचचा वगैरे असावा. फारंच जुना खेळाडू.
एकजणानं सांगितलं की तो भरपूर गांज्या वगैरे पिऊन गावात दोन दिवस पडला होता. मेल्यासारखा.
संजूबाबा मला डॉन वगैरे वाटला होता. पण त्यानं पुन्हा कुठं माऱ्यामाऱ्या केल्याचं ऐकिवात नाही. तो जसा आला तसाच अकस्मात गायब झाला.
नंतर बऱ्याच दिवसांनी खबर आली. संजूबाबा खिंडारात सापडला. ते पण निलमबरोबर.
------
चष्मीश सागर खरंतर माझा मित्र वगैरे कोणी नव्हता. तो एक मठ्ठच मुलगा होता. त्याला काही विचारल्यास खूप उशिरा उत्तर द्यायचा. एकदिवस तो स्मिताला गाडीवर घेऊन जाताना दिसला. नंतर म्हणे त्याला कुणीतरी सांगितलं की, स्मिता सुनीलवर मरते.
नंतर खबर आली की त्या दोघांनी लग्न करायचं ठरवलंय.
सुनील मात्र नंतर नंतर स्मिता कसं त्याच्यामागे लागली होती. आणि तो कसं तिला नाही म्हटला वगैरे बरेच दिवस सांगत सुटला होता.
-----------
लायब्ररी आहे. टेबल आहे. टेबलावर मी आहे. आरती आहे. कोपऱ्यात गौरव आहे. ते पण बार लावून.
खरंतर जागाच नव्हती म्हणून आरती माझ्यापुढे येऊन बसली होती. तशी माझी तिची ओळख नाही. पण ती एक वर्षानं मला ज्युनियर आहे. याचाच फायदा घेत मी तिला म्हटलं,
"तुझं APM चं पुस्तक दे मला, मला जरा काम होतं"
शेवटी सीनीयरची पण काही इज्जत असते.
तिनं दिलं मला.
मग मी त्याची पाने वगैरे चाळली. म्हटलं, उद्या देतो तुला.
ती फक्त मुंडी हलवून हो म्हटली. बोलली नाही अजिबात.
मग मी पुस्तक घेऊन होस्टेलवर आलो. तिथं अमोल वगैरे पोरं मला म्हणाली, इथली पोरं कुठं मेलीत का रे? तिचं पुस्तक मागितलास.
नंतर सुन्या बिन्या रुमवर आली. मला कॉन्ग्रेट्स करुन गेली. मी पण असंच पेटवून दिलं. एक जण म्हणाला की, तू पुस्तकातून चिठ्ठी वगैरे पाठव.
मी म्हटलं, मी अभ्यास करायला पुस्तक आणलंय. मला अभ्यास करु द्या.
मग सगळीजण खदाखदा हसून निघून गेली.
त्यादिवशी मी मोकळ्या हवेत आलो असताना, गौरव अंधारात एका कठड्यावर बसलेला दिसला. तो भरपूर सिगारेट वगैरे पित होता. त्याचा मूड वगैरे बराच खराब वाटला. एकतर आरती त्याची लाईन. मी कशाला मध्येच लुडबूड करु.
मी आपलं 'आलं मनात, मागितलं पुस्तक' एवढंच केलं होतं. मला वाटलं तो माझ्याशी काही बोलेल. पण त्यानं तसंही काही केलं नाही.
साधारण दोन दिवस पोरांनी मला तंगवलं. मग एका प्रसन्न वेळी तिला स्मित करुन पुस्तक वापस देऊन टाकलं. तिच्याबरोबर हवापाण्याच्या गप्पाही मारल्या.
त्यादिवशी गौरवनं भरपूर बिड्या वगैरे ओढल्या. कारण आधीच काळा त्याचा चेहरा भयानक काळा पडला होता. मी काय जास्त लक्ष दिलं नाही. मग निघून गेलो.
त्यादिवशी रात्री माझा टेपरेकॉर्डर चोरी गेला. मला पक्की खात्री आहे तो गौरवनेच चोरला असणार.
च्यायला याने असला कसला बदला घेतला.
-------------------------------------------------------------------------------
क्रमशः
बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा , सात
------------------------
प्रतिक्रिया
15 Aug 2016 - 9:34 pm | रषातु
मी पहिला...एकदम सही.. पुलेशु
15 Aug 2016 - 10:49 pm | पैसा
मस्त!
15 Aug 2016 - 11:05 pm | रातराणी
कुठे चालली आहे कथा आता कळेना. पण छान लिहिताय.
15 Aug 2016 - 11:24 pm | निर्धार
भारी लिहिता तुम्ही....
15 Aug 2016 - 11:26 pm | ज्योति अळवणी
खूपच छान.इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये स्वतः असल्याचा फील येतो. असेच लिहीत रहा
16 Aug 2016 - 12:29 am | अर्धवटराव
तेव्हढं ते 'वगैरे' फार जास्त येतय असं वाटतय. प्रासंगीक असेल, पण शब्दप्रभू जव्हेरभौंना एखादा शब्द इतका रिपीट करावा लागु नये.
16 Aug 2016 - 2:04 am | पिलीयन रायडर
नक्की स्टोरी शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीये कारण काय म्हणायच ते समजल्यासारखं वाटतंय. आपण नाही का उगाच किस्से सांगत बसतो, तसंच काही तरी वाटतंय! चांगलय.. लिहीत रहा..
16 Aug 2016 - 10:01 am | संत घोडेकर
काही प्रसंग आणि वाक्य डायरी लिहिल्यासारखी वाटली, पण आवडीने वाचतोय.
16 Aug 2016 - 10:37 pm | आनन्दा
+११
16 Aug 2016 - 3:09 am | खटपट्या
मस्त चालू आहे कथा. सद्या बादली कोणाकडे आहे ?
16 Aug 2016 - 11:03 am | अजया
वाचतेय.पुभाप्र
16 Aug 2016 - 12:15 pm | इशा१२३
वाचतेय.
16 Aug 2016 - 1:04 pm | सानझरी
आधी बादली, आता टेपरेकॉर्डर चोरी गेलाय.. झकास लेखन. पुभाप्र.
17 Aug 2016 - 7:17 am | जव्हेरगंज
धन्यवाद!
17 Aug 2016 - 7:41 am | क्षमस्व
मस्त रंगलीय लेखमाला।
17 Aug 2016 - 8:28 am | नाखु
टेपरेकॉर्डतक (व्हाया संजूबाबा बदला आणि मनीची बदली)
जसं आहे तस्म जराही सपक आणि मसाला न टाकता..
रोचक आहे.
नितवाचक नाखु
17 Aug 2016 - 9:17 am | झपाटलेला फिलॉसॉफर
लै भारी जव्हेर काका
आपुन तो जव्हेर काका चा फ्यान हाये
18 Aug 2016 - 2:30 am | अभिजीत अवलिया
लय भारी.
22 Aug 2016 - 1:41 am | वगिश
सर्व भाग मस्त जमलेत. ह्यात "वैगेरे" जास्त झालाय.