बरेच दिवस मी आणि विनायक प्रभू अनेक शैक्षणीक विषयांवर आणि एकूण स्पर्धात्मक परीक्षांबद्दल चर्चा करत होतो. काही दिवसानंतर चर्चेचा रोख हळूहळू शहरी आणि ग्रामीण या फरकाकडे वळला. आर्थीक परीस्थीती आणि व्यावसायीक कोर्सेसला ऍडमिशन याची पण चर्चा झाली .सीईटीच्या परीक्षेतील यश ज्या गोष्टींवर अवलंबून आहे त्याची पण चर्चा झाली.
सर्वसाधारणपणे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील यशापयशाचे टप्पे ठरवतात.
दहावीला चांगले गुण मिळाले तर अकरावीला चांगल्या ज्युनीअरकॉलेज ला प्रवेश .
ग्रामीण भागात हा फरक नाही कारण मार्क चांगले किंवा वाईट कॉलेज जवळजवळ तेच असते.
आता, शहरात हा फरक आहे. चांगले गुण म्हणजे मान्यवर कॉलेज .उत्तम मार्गदर्शन .
आता गंमत पहा यामुळे बारावीला चांगले मार्क मिळाले तर खेड्यात काय आणि शहरात काय काहीच फरक नाही कारण व्यावसायीक कॉलेजच्या ऍडमिशन बारावीच्या मार्कांवार अवलंबून नाही. त्या ऍडमिशन ठरवणार बोर्डाची सीईटीची परीक्षा.
इथे मात्र शहर -गाव असा फरक लक्षात येण्याइतका जाणवतो.(लातूर अपवाद आहे).
गरीब आणि श्रीमंत असा फरक करीअरची दिशा बदलू शकतो.
फरक कसा पडतो हे वाचण्यापूर्वी सीईटी च्या परीक्षेबद्दल एक महत्वाचा मुद्दा.
महाराष्ट्र शासनाच्या बारावीच्या अभ्यासक्रमात सीईटीच्या परीक्षेची तयारी करून घेतली जात नाही.
मग होतं काय? बारावीला चांगलं पर्सेंटेज आणि सीईटीला मात्र केवीलवाणे रँकींग.
खाजगी वर्गांना याची जाणीव असल्यामुळे त्यांनी सीईटीच्या तयारीवर जोर देऊन बारावी आणि सीईटी असा संयुक्त अभ्यासक्रम बनवला.
जे काही चार पाच नामवंत वर्ग आहेत त्यांची फी भारी भक्कम आहे.
छोट्या गावांमध्ये ती फी देणारा पालक वर्ग नसल्यामुळे हे खाजगी वर्ग तिथे जात नाहीत.
या वर्गांची फी शहरात सुद्धा बर्याच जणांना परवडत नाही.
थोडक्यात भौगोलीक आणि आर्थीक फरक हे दोन्ही फॅक्टर सीईटीचे यशापयश ठरवू शकतात.
आता परत बारावीच्या अभ्यासक्रमाचा विचार केला तर तो अभ्यासक्रम सीईटीची तयारी करून घेत नसला तरी त्यातले नैपुण्य सीईटी ला उपयोगी पडू शकतं.
सीईटीची परीक्षा M.C.Q. पद्धतीची असते. यासाठी सराव करावा लागतो. सराव खाजगी वर्गात करून घेतला जातो आणि यशाचे प्रमाण वाढते.
सरावात एक गोष्ट नेहेमी दुर्लक्षीत केली जाते ती म्हणजे उत्तरपत्रीकेचे स्वरुप.
ही उत्तरपत्रीका O.C.R.असते.काही ठिकाणी याला ओएमाअर शीट म्हणतात. योग्य उत्तराची काळ्या ठिपक्याच्या स्वरुपात नोंदणी केली जाते.जवळजवळ सगळ्या वर्गात ही उत्तरपत्रीका दिसत नाही.सराव साध्या कागदावर करून घेतला जातो.अगदी साठ ते सत्तर हजार फी घेणार्या वर्गात पण अशी उत्तरपत्रीका वापरली जात नाही.
हा आहे या उत्तर पत्रीकेचा नमुना
परीणामतः दहा ते बारा मार्कांचे नुकसान त्या उत्तरपत्रीकेशी जुळवून घेण्यात जाते.वेळ आणि अचूकता यांची सांगड बरोबर घातली जात नाही आणि सीईटी चे मानांकन खाली घसरते.
या सराव परीक्षेवर सगळ्या विद्यार्थ्यांचे करीअर अवलंबून असते.शहरातल्या नामवंत वर्गांमध्ये ओसीआर ची व्यवस्था नसते. अगदी डमी ओसीआर ची सुद्धा नसते.
शहरात या सराव परीक्षेची किंमत साधारण आठ हजारापासून बारा हजारापर्यंत आहे.गावात तर ही सुविधापण उपलब्ध नसते.
आणखी थोडी माहीती या परीक्षेतील प्रश्नांबाबत.
मार्गदर्शक तत्वे माहीती असली तरी नेमके काय स्वरुपाचे प्रश्न येत असतीला या बाबतीत साशंकता कायम असते.ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांच्या बरोबर विचार विनीमय करून सराव परीक्षेचा रोख ठरवला जातो.सांगायचे ते असे की शहराबाहेरच्या विद्यार्थ्यांना सीईटी पार करणे फार कठीण जाते.जर बारावीची तयारी व्यवस्थीत केली असेल तर सराव परीक्षेची सांगड घालून मानांकन चांगले मिळण्याची शक्यता अनेक पटीनी वाढू शकते.
आता या बाबत आम्ही काय करणार आहोत याची माहीती .
या प्रकल्पाचे नाव - उद्याचे आकाश.
१
प्रभू सरांच्या अनुभवाचा आणि जन संपर्काचा फायदा घेऊन सराव परीक्षेचे एकूण आठ पेपर तयार केले जातील.
२
मुंबईच्या बाजूची गावे उदा: अंबरनाथ, शहापूर, पेण, मुरबाड, चिपळूण या गावातल्या ज्युनीअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल .
३
या परीक्षेचे गुणांकन आणि वातावरण सीईटीच्या परीक्षेचे असेल. (याला इंग्रजीत रीअल टाईम असे म्हणतात काय?)
४
परीक्षा ओसीआर सारख्या डमीवर घेतली जाईल.
५
दोन परीक्षांमध्ये एकदा प्रभू सरांचे समुपदेशन असेल.
६
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल.
७
या परीक्षा ना नफा ना तोटा या स्वरुपाच्या असतील. रामदास आणि प्रभू यांच्या सेवा विनामूल्य घेतल्या जातील.
८
या वर्षीचे लक्ष्य एक हजार विद्यार्थ्यांचे ठेवण्यात आले आहे.
आता खर्चाची बाबः प्रत्येक विद्यार्थ्यामागे सातशे पन्नास ते आठशे पन्नास.(काही विद्यार्थी फक्त सहा पेपरच देतील ).
बर्याच ठिकाणी बारावीला पालक हा खर्च करू शकत नाहीत.अशा परीक्षेत चांगले मानांकन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त संधी मिळावी आणि तळागाळापर्यंत लाभ मिळावा यासाठी या विद्यार्थ्यांचा ख्रर्च काही मिपा सदस्य उचलू शकतील का? याचा अंदाज घेण्यासाठी ह्या लेखाचा प्रपंच मांडला आहे.
एका दात्यानी कमीतकमी पाच विद्यार्थ्यांचा खर्च करावा अशी अपेक्षा आहे.इच्छुकांनी सविस्तर माहीती व्यनीतून मागवावी.
या विद्यार्थ्यांचे ट्रेक रेकॉर्ड आणि मुख्याध्यापकांची शिफारस यावर भर देऊन त्यांना ही सवलत देण्याचा मानस आहे.पुरस्कृत केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापक पुरस्कर्त्यांना पाठवतील याची खातर्जमा केली जाईल.
हा लेख प्रकाशीत करण्यापूर्वी मिपाचे मालक श्री. तात्या अभ्यंकर यांची तोंडी परवानगी घेतली असली तरी मालक आणि संपादक मंडळ यांचा या आवाहनाशी व्यक्तीशा किवा एकत्र असा काही संबंध अथवा जबाबदारी नाही.
पूर्णपणे व्यक्तीगत जबाबदारी रामदास , प्रभू सर यांचीच राहील.
अधीक माहीती प्रतीसादातून येणार्या प्रश्न-उत्तरातून मिळेल.
वि.सू.- दहा अगर जास्त विद्यार्थी पूरस्कृत करणार्यांना आवश्यकता असल्यास आयकर सवलतीची व्यवस्था करून देण्यात येईल.
प्रतिक्रिया
19 Nov 2008 - 7:22 pm | बिपिन कार्यकर्ते
साहेब... या प्रकल्पाला पूर्ण शुभेच्छा.
या विषयावर आधीच तुमच्याशी आणि विप्रसरांशी बोलणे झाले आहे. माझे विचार मांडले आहेत. त्या प्रमाणे जरूर कळवा.
एक सूचना...
६
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल.
स्तुत्य. पण जे विद्यार्थी प्रॉमिसिंग वाटत नाहियेत त्यांच्यावर पण त्या दृष्टीने विशेष मेहनत घेतली जावी का? नाहीतर मुंबईतल्या बर्याच प्रतिथयश शाळा / कॉलेज / क्लासेस सारखे, ऍडमिशन देतानाच क्रीम विद्यार्थी घ्यायचे, त्यातून परत वरचे बाजूला काढायचे त्यांच्यावर विशेष मेहनत घ्यायची आणि मग आमचे एवढे बोर्डात आले असे सांगत सुटायचे पण एकूणात निकाल किती चांगला लागला याबद्दल अवाक्षरही न काढणे, असे न व्हावे.
बाकी मी ५ विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलायला तयार आहे. बाकीचे डीटेल्स कळावेत.
बिपिन कार्यकर्ते
19 Nov 2008 - 7:18 pm | टारझन
लैच्च भारी .. फारच उपयुक्त लेख ...
बाकी मेडिकल ला जाणे हल्ली आपलं आर्ध आयुक्ष बरबाद करणे आहे असं ऐकून आहे.... कारण एम.बी.बी.एस. नंतर २ वर्षे इंटर्नशीप आणि १ वर्ष एम.ओ.शीप आहे. वाढलेल्या शिक्षण शुल्काबद्दल आम्ही काय बोलावे ? आणि नुसतं एम.बी.बी.एस. असुन भागत नाही ..पी.जी. ला जावंच लागतं .. आणि तिथं पहिल्यावर्षी लंबर लागला तर आपण लैलैलै लक्की .. २-२ वर्ष रगडतात मुले .. आणि म्हणून पी.जी. होइ पर्यंत वयाची बत्तीशी झालेली असते ...
रामदास सर , लोकांना याही गोष्टी विचारात घ्यायला सांगाहो . हल्ली मेडिकलच्या मुलांमधे आत्महत्येचं प्रमाण बाकी शिक्षणक्षेत्रांपेक्षा जास्त आहे.
- (सि.ई.टी.च्या जाळ्यातून एवळ एक वर्षाने हुकलेला)
टारझन
19 Nov 2008 - 7:24 pm | नितीनमहाजन
उपक्रम नक्की स्तुत्य आहे. ग्रामीण भागातील मुलांना अशी संधी मिळत नाही. एक सूचना करावीशी वाटते.
६
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल.
या पर्यायापेक्षा
या परीक्षांमध्ये प्रॉमीसींग न वाटणार्यांना विशेष मार्गदर्शन केले जाईल. असे हवे कारण ९०% गुण मिळविणारा थोड्या मार्गदर्शनाने सहज ९५% - ९८% गुण कमावू शकतात. खरी आवश्यकता असते ती ५०% - ७०% गटातील मुलांना.
मि. पा. सदस्यांना काय वाटते.
नितीन महाजन
19 Nov 2008 - 8:23 pm | विनायक प्रभू
आम्ही कुठलेही कोचींग क्लासेस चालविणार नाही. फक्त त्यांना न बघायला मिळालेली सुविधा पोचविणे हा उद्देश. त्यामुळे १० ते १५ मार्कांची वाढ होईल ही अपेक्षा. विशेष मार्गदर्शन एड्मिशन प्रोसेस समजावणे त्रिशंकू मार्क वाल्यांना.१२० च्या विद्यार्थ्यांनी त्याना मिळेल ते स्विकारायचे असते. आणी १८० वाल्याना त्याची गरज नसते. गोंधळ असतो तो फक्त १४० ते १७० वाल्यांचा. त्यांना ही प्रोसेस खूप कठीण जाते.
19 Nov 2008 - 9:33 pm | लिखाळ
आपल्याला या स्तुत्य उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा !
-- (प्रभावित) लिखाळ.
19 Nov 2008 - 11:05 pm | भाग्यश्री
स्तुत्य उपक्रम ! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
19 Nov 2008 - 11:14 pm | विसोबा खेचर
माझ्याशी मनापासून शुभेच्छा..!
परंतु नुसत्या कोरड्या शुभेच्छा देऊन भागणार नाही.. मी माझ्या कुवतीप्रमाणे काही आर्थिक मदत नक्कीच करेन आणि त्याबाबत फोनवर प्रत्यक्ष बोलेन..
रामदासराव आणि प्रभूमास्तरांचं निश्चितच कौतुक वाटतं!
तात्या.
20 Nov 2008 - 3:21 pm | विनायक प्रभू
तात्या,
धन्यवाद.
20 Nov 2008 - 5:24 pm | कुंदन
तात्यांशी सहमत ....
मी बी जमल तसा हातभार लावीन. बाकी सविस्तर व्य नि द्वारे कळवत आहे.
21 Nov 2008 - 6:17 pm | लिखाळ
>> परंतु नुसत्या कोरड्या शुभेच्छा देऊन भागणार नाही.. <<
विप्र आणि रामदास यांचा उपक्रम चांगला आहे म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या. प्रत्यक्ष मदत करु शकत नाही तरी प्रामाणिकपणे आणि आपुलकीने देलेले प्रोत्साहन काही किंमतीचे नाही असे आपल्या वरिल वाक्यावरुन वाटले. शुभेच्छा कोरड्या आहेत ही टिप्पणी तुमच्या सहकार्याची किंमत वाढवते का?
मला आपली टिप्पणी वाचून वाईट वाटले.
-- लिखाळ.
21 Nov 2008 - 8:30 pm | प्रमोद देव
विप्र आणि रामदास जे काही चांगले आणि लोकोपयोगी काम करत आहेत त्याला माझ्या नुसत्याच म्हणजे कोरड्या शुभेच्छा! :)
22 Nov 2008 - 2:03 am | विसोबा खेचर
प्रत्यक्ष मदत करु शकत नाही तरी प्रामाणिकपणे आणि आपुलकीने देलेले प्रोत्साहन काही किंमतीचे नाही असे आपल्या वरिल वाक्यावरुन वाटले.
पूर्णत: गैरसमज...इन फॅक्ट लिखाळराव, असा आपला गैरसमज झाला याचेच आश्चर्य वाटले..!
प्रत्येकाच्याच शुभेच्छा, सदिच्छा या महत्वाच्या असतात. शुभेच्छा देणारा प्रत्येकजणच काही आर्थिक साहाय्य करू शकेल असे नव्हे, किंवा त्याने केलेच पाहिजे असेही मुळीच नव्हे...!
शुभेच्छा कोरड्या आहेत ही टिप्पणी तुमच्या सहकार्याची किंमत वाढवते का?
प्रश्न कळला नाही..
मला आपली टिप्पणी वाचून वाईट वाटले.
लिखाळराव, आपण गैरसमज करून घेतला आहे. ते विधान मी फक्त माझ्यापुरते केले होते! नुसत्या शुभेच्छा देणे हा केवळ एक उपचार होईल असे मला वाटले म्हणून मी तसे लिहिले! याचा, इतर मंडळी-जी केवळ शुभेच्छाच देतात त्यांच्या शुभेच्छा मोलाच्या नव्हेत असा सरसकट अर्थ आपण कसा काय घेतलात ते खरंच कळले नाही..!
असो, यापेक्षा अधिक कुठलाही खुलासा मी करू शकत नाही...
तात्या.
23 Nov 2008 - 11:21 pm | लिखाळ
तात्या,
खुलाश्या बद्दल आभार..
आता मनात काही नाही :)
-- लिखाळ.
21 Nov 2008 - 9:13 am | विजुभाऊ
प्रभुसर मी पण आहे तुमच्या सोबत. पाच विद्यार्थ्यांच्या खर्चाची जबाबदारी माझी.
शिवाय प्रत्यक्षात येउन आणखी काही मदत करायला मिळणार असेल तर आनन्दाने येइन.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
21 Nov 2008 - 1:12 pm | ब्रिटिश
शेरातल्या न आमेरीकेतल्या सूक्षिक्शीत (जल्ला लीवता बी येत नाय )लोकांनो, आमच्या खारपाड्यासारक्या बरेच पाड्यावरच्या विद्यार्थ्याना जागतीक कोंपीटीशन मदी आनन्यासाटी रामदासभौ न परभूसर जे कष्ट करताईत त्याला जरा खुल्या दिलान बॅकिंग करा की.
जल्ला तुमच्या पैशाची गरज त्यांना नाय वो, पन यकदा त्यांच्या पाटीवर हात ठेवून लढ तरी म्हना
रामदासभौ न परभूसर, कई बी काम सांगा आमी हाव तुमच्या संगट
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
23 Nov 2008 - 11:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विषयाशी (जवळजवळ) असंबद्ध लिहिणे, एखाद्या चांगल्या चर्चाविषयात अवांतर प्रतिसाद टाकणे, संबंध नसताना (आपल्या विरुद्ध बोलणार्या) व्यक्तिंचे दाखले (हिणवण्यासाठी) देणे हे पण ओ.सी.डी.खालीच मोडतं का हो, विप्रकाका?
(बाकी हा प्रतिसाद अवांतरच आहे, संपादकांनी वाटल्यास खुशाल उडवावा, पण अनेक चांगल्या चर्चाविषयात असला एकसुरी कचरा पाहून आता कंटाळा आला आहे.)
विषयाशी (जवळजवळ) असंबद्ध लिहिणे, एखाद्या चांगल्या चर्चाविषयात अवांतर प्रतिसाद टाकणे, संबंध नसताना (आपल्या विरुद्ध बोलणार्या) व्यक्तिंचे दाखले (हिणवण्यासाठी) देणे हे पण ओ.सी.डी.खालीच मोडतं का हो,
अदितीशी सहमत आहे.. सर्किटरावांनी ब्रिटिशरावंना उत्तरादाखल दिलेले -चर्चा भरकटवणारे दोन प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने ब्रिटिशरावांचा एक प्रतिसाद अप्रकाशित करण्यात आला आहे..
सदर धाग्याचा विषय महत्वाचा आहे, कृपया विषयाला धरूनच चर्चा व्हावी..
-- आणिबाणीचा शासनकर्ता.
24 Nov 2008 - 6:05 am | सर्किट (not verified)
सदर धाग्याचा विषय महत्वाचा आहे, कृपया विषयाला धरूनच चर्चा व्हावी..
सहमत आहे. शासनक्र्त्याने असे सर्व "महत्वाचे धागे" मार्क करावेत, म्हणजे सदस्य अवांतर प्रतिसाद देणार नाहीत.
(हल्ली स्वघोषित अवांतर प्रतिसाद कर्त्यांची संख्या खूप वाढलेली आहे, असे दिसून येते.)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
21 Nov 2008 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते
शाब्बास बाला....
मला पण हेच म्हणायचे आहे. अश्या प्रकारच्या एखाद्या विधायक कार्याची दखल तरी घेतली असती तरी बरे दिसले असते. पाठिंबा द्या नाही तर नका देऊ, पण कमीत कमी दखल तरी घ्या रे... आणि पटत नसेल तर सुधारणा तरी सुचवा. जवळ जवळ ३५० वाचने आणि प्रतिसाद फक्त १२. धन्य आहे आपलीच. एखादा तथाकथित ज्वलंत विषय मांडलेला नाहिये म्हणून असे झाले का?
सर्किटने मांडलेली सूचना खरोखर विचार करण्याजोगी आहे. पण ही सूचना यायला इतका वेळ का लागला? हाच प्रतिसाद त्यांना आधीपण देता आला असता. किंवा त्यांनी ते व्यनि द्वारे कळवले असेल, तसे असेल तर माझी टिप्पणी रद्द.
असो. इथे व्यक्तिगत काही नाही. मनात आले ते लिहिले.
बिपिन कार्यकर्ते
21 Nov 2008 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रामदास साहेब आणि प्रभू सर,
आपल्या सीइटीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या प्रकल्पासाठी माझ्या शुभेच्छा. मार्गदर्शनाच्या अभावामूळे, विद्यार्थी केवळ औपचारिकता म्हणून परिक्षा देतात असेही माझ्या पाहण्यात आहेत. खेड्यापाड्यात शहरात अगदी तालूक्याच्या ठिकाणीही मार्गदर्शनाचा अभाव दिसतो. तेव्हा विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेण्याचा आपण जो विडा उचलला आहे, तो प्रकल्प कौतुकास्पद आहे. त्यासाठी सही दिलसे शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
21 Nov 2008 - 8:25 pm | चतुरंग
शहरी भागाबाहेरच्या विद्यार्थ्यांना बर्याच गोष्टींशी मानसिकरीत्या जुळवून घेण्यातच बरीचशी शक्ती खर्च होते. बुजलेपणामुळे विचारण्याचे धाडस असतेच असे नाही. नेमका प्रश्न विद्यार्थ्यांना कुठे येतो हे हेरुन आपण काम केलेले दिसते.
तुमच्या ह्या कार्याला मनापासून शुभेच्छा!
(अधिक पत्रव्यवहार व्य. नि. तून करेनच.)
चतुरंग
21 Nov 2008 - 10:56 pm | ऋषिकेश
वा! मस्त प्रकल्प.. शुभेच्छा!..
आर्थिक मदतीशिवाय इतर प्रकारे काही मदत करता येईल का?
-(निर'अर्थ'क) ऋषिकेश
22 Nov 2008 - 7:33 pm | विनायक प्रभू
तशी काही लागेल सारखे वाटत नाही. पण लागल्यास जरुर कळविन. धन्यवाद.
22 Nov 2008 - 7:28 pm | सुहास कार्यकर्ते
सर आपला उपक्रम फारच चान्गला अहे . यथाशाक्ति मदत करेन
22 Nov 2008 - 8:12 pm | शक्तिमान
>>एका दात्यानी कमीतकमी पाच विद्यार्थ्यांचा खर्च करावा अशी अपेक्षा आहे
ही अट जरा शिथील केल्यास जास्तीत जास्त सदस्य मदत करतील असे नाही का वाटत ?