अफगाणिस्थान..........
ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य.....एकांडा डॉ. ब्रायडॉन.
जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक सुस्कारा सोडला. त्या डोंगराच्या पलिकडे कोठे तरी काबूलवरुन माघार घेणारे ब्रिटिश सैन्य होते. कोठे होते ते ? आलेल्या खबरीनुसार त्या सैन्याने ६ जानेवारी १८४२ रोजी काबूल सोडले होते व अजूनही त्यांचा पत्ता नव्हता.
अनुभवी कर्नल डेनीच्या मनात पाल चुकचुकली. त्याच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांकडे वळून तो म्हणाला,
‘मला काय होणार याची पूर्ण कल्पना आहे. त्या सैन्यातील फक्त एकच माणूस येथे जिवंत पोहोचणार आहे याची मला खात्री आहे आणि तो सुद्धा त्या सैन्याच्या कत्तलीची हकिकत सांगण्यासाठी !’
दुसऱ्या दिवशी कर्नल डेनीचे सैनिक शहराभोवती संरक्षणासाठी खंदक खोदत होते. त्या इमारतीवर काही सैनिक अजूनही टेहळणी करत होते. तेवढ्यात एका सैनिकाला दुरवर एक घोडेस्वार रखडत येताना दिसला. घोडदळाच्या सैनिकांची एक पलटण त्याच्या दौडत त्या एकांड्या घोडेस्वाराकडे गेली. ते बघून कर्नल डेनी म्हणाला, ‘ मी म्हणालो नव्हतो ? निरोप घेऊन एक माणूस जिवंत परत आला आहे !’
त्या सैनिकांनी त्या रक्तबंबाळ घोडेस्वारापाशी पोहोचल्या पोहोचल्या त्याला पहिला प्रश्न केला, ‘बाकीचे सैन्य कुठे आहे ?’
त्या घोडेस्वाराच्या जखमातून रक्तस्त्राव होत होता. त्याच्या मस्तकाचा एक टवका उडालेला दिसत होता. मोठ्या कष्टाने त्याने पुटपुटत उत्तर दिले,
‘ सैन्य ? मी एकटाच आहे ! डॉ. विल्यम ब्रायडॉन !
त्या सैनिकांनी त्याला जखमी डॉक्टरला काळजीपूर्वक आत नेले. ब्रिटिशांच्या १६००० माणसातील हा एकमेव वाचलेला सैनिक होता. त्याची कहाणी ऐकणाऱ्या सैनिकांना व त्यालाही त्यावेळी कल्पना नव्हती की काही सैनिक व ब्रिटिशांची कुटुंबे अफगाणी सैन्याने पकडली आहेत.
ब्रायडॉनचा जन्म सैनिकी परंपरा असलेल्या एका स्कॉटिश घराण्यात १८११ साली झाला होता. डॉक्टर झाल्यावर त्याने भारतातील जवळजवळ सत्ताधिश झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत चाकरी पत्करली. साल होते १८३५. चारवर्षे भारतात काढल्यावर त्याला अफगाणी बंडाचा बिमोड करण्यासाठी अफगाणीस्थानला सैन्याबरोबर सर्जन म्हणून जावे लागले. ब्रिटिशांनी रशियाच्या अफगाणिस्थानमधील हस्तक्षेपास उत्तर देण्यासाठी हे सैन्य काबूलवर पाठविले होते. त्या बंडात दारुण पराभव झाल्यावर ब्रिटिश सेना व जनता काबूलवरुन पळत सुटली त्यात डॉक्टर ब्रायडॉनही होता. अफगाण टोळ्यांनी त्यांना एका रात्रीचीही उसंत दिली नव्हती. त्या वैराण प्रदेशात त्यांनी एक एक ब्रिटिश सैनिकाला टिपण्याचा सपाटा लावला होता. त्या माघारीच्या पाचव्या दिवशी ब्रायडॉनला एका अफगाण सैनिकाने घोड्यावरुन खाली खेचले व त्याच्यावर त्याच्या तलवारीने वार केला. नशिबाने त्याने टोपीच्या आत ठेवलेल्या एका मासिकाने त्याला वाचविले. त्याला जमिनीवर फेकून त्याचा घोडा उधळला पण तेवढ्यात एका मरणोन्मुख भारतीय सैनिकाने त्याला त्याचा घोडा देऊ केला.
‘मी मरणार आहे ! माझा घोडा घेऊन येथून पळून जा !’
ब्रायडॉनने त्या सैनिकाला त्याच्या खोगिरावर बसते केले पण त्याची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. त्याला एक सलाम ठोकून त्या गोळ्यांच्या वर्षावातून ब्रायडॉनने आपला घोडा फेकला. दुसऱ्या दिवशी अफगाण टोळ्यांनी परत त्यांना घेरले. आता त्यांच्याकडे २१६ अधिकारी आणि काही सैनिक उरले होते. त्या लढाईत फक्त वीस अधिकारी वाचले. उरलेल्या पंचवीस मैलात त्यातील फक्त सहाजण उरले. त्यांनी आता सपाट प्रदेशात प्रवेश केला. तेवढ्यात त्यांना काही शेतकरी त्यांच्याकडे येताना दिसले. त्यांच्या हातातील पावाच्या लाद्या बघून त्यांना हायसे वाटते ना वाटते तोच त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. सहापैकी तीन पळून गेले. एकजण तेथेच ठार झाला. ब्रायडॉन व ले. स्टियर घोडे कमकुवत असल्यामुळे मागे राहिले व त्यामुळे वाचले असे म्हणायला हवे. स्टियरचा घोडा कोसळल्यावर त्याने शेवटच्या झुंजीसाठी एका उंचवट्याची वाट धरली व ब्रायडॉनला जलालाबादला सावध करण्याची ओरडून सूचना केली. काही क्षणांनंतर दमछाक झालेल्या ब्रायडॉनला वीसएक अफगाणी टोळीवाल्यांनी गाठले. ते पायी चालले होते. त्यांनी ब्रायडॉनवर दगडफेक केली. ब्रायडॉनने घोड्याचा लगाम दातात धरला व डावीकडे, उजवीकडे तलवार चालवत त्याने त्या गर्दीतून मार्ग काढला. तेवढ्यात एका अफगाण्याने त्याच्यावर बंदुक झाडली. त्या गोळीने त्याच्या तलवारीची छकले उडविली. त्याच्या हातात आता फक्त तिची मुठ उरली. पुढेच त्याला काही घोडेस्वार दिसले. त्याला प्रथम वाटले की ते वाचलेले भारतीय सैनिक आहेत पण त्याच्या दुर्दैवाने ते अफगाणी निघाले. त्याला पाहिल्यावर त्यातील एकजण त्याच्या मागे लागला. त्याने त्याच्या बाकदार तलवारीने ब्रायडॉनवर एक जोरदार वार केला. ब्रायडॉनने तो मोठ्या शर्थीने त्याच्या तलवारीच्या म्यानाने अडविला पण तो घाव त्याच्या डोक्यावर उतरलाच. त्या अफगाणी घोडेस्वाराने मोठ्या त्वेषाने त्याच्यावर चाल केली पण ब्रायडॉनने हाती आलेली तलवारीची मुठ त्याला फेकून मारली. त्या अफगाणानेही ब्रायडॉनवर अजून एक वार केला जो त्याने मोठ्या शिताफीने चुकविला. पण तोही त्याच्या खांद्यावर उतरला. ब्रायडॉन ती तुटकी मुठ उचलायला वाकला ते बघून तो अफगाणी पळून गेला. बहुतेक त्याला ब्रायडॉन त्याचे पिस्तूल काढतोय की काय अशी शंका आली असावी.
डोक्यात पडलेले दोन वार, हातावरील तीन जखमा, त्यातून भयंकर रक्तस्त्राव होतोय, मरायला टेकलेले घोडे अशा अवस्थेत डॉ. ब्रायडॉन जलालाबादला पोहोचला खरा पण थोड्याच दिवसात जलालाबादवरही हल्ला झाला......
ब्रिटिशांची अशी अवस्था कोणी केली ?
कशी केली ?
त्यावेळचे राजकारण काय होते...?
याची सविस्तर कहाणी आपण आता बघणार आहोत पुढच्या भागापासून..........
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
5 Sep 2014 - 9:02 am | श्रीरंग_जोशी
वाह, पुन्हा एकदा जयंतरावांची युद्धकथांवरील लेखमालिका.
सुरुवात नेहमीप्रमाणेच थरारक.
खूप उत्कंठा वाटत आहे.
5 Sep 2014 - 11:24 am | एस
प्रचंड उत्कंठा आहे.
5 Sep 2014 - 9:03 am | बहुगुणी
चित्र देखील अतिशय बोलकं आहे.
(आजही अफ्गाणिस्थानात परकीय सैन्याची काही फार निराळी अवस्था नाहीये...)
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
5 Sep 2014 - 10:24 am | अनुप ढेरे
आह.. द ग्रेट गेम!
वाट पाहतोय...
5 Sep 2014 - 10:34 am | इरसाल
सरसावुन बसायला हवे आता !
5 Sep 2014 - 11:16 am | सुहास झेले
जबरदस्त सुरुवात.... पुढे वाचण्यास उत्सुक :)
5 Sep 2014 - 11:18 am | सौंदाळा
हेच म्हणतो.
पुभाप्र
5 Sep 2014 - 12:19 pm | खटपट्या
+१
5 Sep 2014 - 12:02 pm | कपिलमुनी
मेजवानी सुरु
5 Sep 2014 - 1:01 pm | आतिवास
"ग्रेट गेम"
अवांतरः तुम्ही मूळ पुस्तकाचं नाव का नाही देत? - फक्त एक कुतूहल. प्रश्न आवडला नाही तर दुर्लक्ष करा ही विनंती.
5 Sep 2014 - 1:15 pm | जयंत कुलकर्णी
कारण सोपे आहे...मी अनेक पुस्तकातून माहिती काढून लिहितो, शिवाय त्यातील नाट्य माझे असते. काही माहिती मी फार पूर्वी केलेल्या अभ्यासाच्या नोंदीवरुन्ही घेतलेली असते. मी जेव्हा एखादा विषय वाचायला घेतो तेव्हा तो पूर्णपणे वाचतो तेव्हा कशा कशाचा संधर्भ देऊ ? मुख्य म्हणजे मी त्यात काही विशेष करतोय असे मला स्वतःला वाटत नाही...:-) मे करतो ते कोणीही करु शकेल फक्त तेवढा पेशन्स ठेवायला पाहिजे.....ग्रेट गेम हे पुस्तक आहे का ? असल्यास मी वाचलेले नाही....मी लिहित आहे ते मुळ ब्रिटिश आर्मीच्या रेकॉर्डसवरुन (जास्तीत जास्त).......
अर्थात मी हे जे लिहितो ते ज्यांना मराठीत वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी किंवा ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठी...ही सर्व माहिती नेटवर इंग्रजीमधे उपलब्ध आहे याची मला जाणीव आहे.... पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे...जर येथे सगळ्यांना ही हकीकत इतर ठिकाणी वाचता येत असेल तर लिहावे की नाही...? विचार करतोय. विचार करुन निर्णय घ्यायला लागेल.....मी मनापासून लिहितोय...राग तर मुळीच नाही....
हा एक दृष्टिकोन लक्षात आणून फिल्याबद्दल धन्यवाद !
5 Sep 2014 - 2:25 pm | प्यारे१
आपलं लिखाण आवडतं म्हणून लिहीण्याचं धाडस.
मागे एका ठिकाणी असाच प्रश्न उपस्थित झाला होता. बहुतेक शेहराजाद ह्या आयडीनं काही लिहीलं होतं.
आपण संदर्भ म्हणून काही पुस्तकांची नावं आणि इतर संदर्भ असं लिहिलंत तर अशा गोष्टी व्हायच्या नाहीत असं आपलं मला वाटतं.
बाकी बर्याचदा वाक्यं भाषांतरीत/अनुवादीत वाटत राहतात हे निरीक्षण आहे.
5 Sep 2014 - 3:20 pm | आतिवास
जे जे काही तुम्ही वाचलं आहे, त्यातल्या काही पुस्तकांचा संदर्भ जरुर द्यावा. अनुवादकांनी हे पथ्य पाळणं माझ्या मते आवश्यक आहे - जरी हा एका पुस्तकाचा अनुवाद नसला तरीही! तुम्ही लिहिताय हे पूर्ण काल्पनिक नाही, अनेकांनी कष्ट करुन ही माहिती एकत्रित केलेली असते; त्यांना न्याय द्यायला हवा. ('देरसू'च्या वेळीही मला हे जाणवलं होतं.)
'ग्रेट गेम' वाचलं नाहीत? जरुर वाचा.
5 Sep 2014 - 3:57 pm | जयंत कुलकर्णी
देरसूच्या प्रथम भागात मे ते भाषांतर आहे हे स्पष्ट लिहिले होते असे मला स्मरते. अर्थात लेखक कोण आहे हे सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे ते लिहिले नव्हते.....तुम्हाला देरसूच्या वेळेस काय जाणवले होते ते लिहिलेत तर बरे होईल..
5 Sep 2014 - 3:41 pm | मृत्युन्जय
इतिहासावर लिखाण करणारा प्रत्येक जण कुठे तरी वाचुनच ते करत असतो. जोवर तुमचे लिखाण बहुतांश एखाद्या मूळ ललित लेखाची नक्कल नाही तोवर संदर्भ द्यायची गरज आहे असे वाटत नाही. १८३५ मध्ये जयंत कुलकर्णी घटनास्थळी हजर होते असे कोणीच म्हणु शकणार नाही. ते जर घटनास्थळी हजर नसतील तर कुठेतरी लिहिलेलेच त्यांनी वाचुन इथे लिहिले असेल हे सुद्धा अध्याहृत आहे. अर्थात तुम्ही लिहिलेले इतर कुठल्याही लिखाणाची सही सही नक्कल किंवा अनुवाद नाही किंवा मोठ्या प्रमाणावर इतर कुठल्या लेखनावर ते बेतलेले नाही एवढी काळजी घ्या. तसे असेल तर मात्र मूळ लेखनाचा संदर्भ हवाच
7 Mar 2020 - 8:20 am | Jayant Naik
तुमचे लिखाण अतिशय सुरेख आहे. अतिशय आवडते आहे. लेखक नक्की काय करतो ? असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. माझ्या मते तो ठीक ठिकाणचे अनुभव आणि निरीक्षणे एका वेगळ्या आणि स्वतःच्या कल्पना शक्ती चा उपयोग करून रंजक पद्धतीने मांडतो. आपण म्हणता तसे हा इतिहास आहे आणि कुठे तरी नोंदला गेला आहे तोच आपण रंजक पद्धतीने मांडताय. लिहावे कि नाही ? असा विचार सुद्धा करू नका. लिहा .
5 Sep 2014 - 2:46 pm | जयंत कुलकर्णी
बरोबर........
5 Sep 2014 - 3:21 pm | जयंत कुलकर्णी
विचाराअंती या प्रकारचे लिखाण मिपावर करु नये या निर्णयाप्रत मी आलेलो आहे. ज्यांना पुढे वाचायचे आहे त्यांनी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्यावी. अर्थात इतर लिखाणाद्वारे आपली भेट होतच राहीलच....
जयंत कुलकर्णी.
jayantpune.wordpress.com
5 Sep 2014 - 3:25 pm | आतिवास
तुमचा 'मिपा'वर अशा प्रकारचे लिखाण न करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. कृपया पुनर्विचार करा!
5 Sep 2014 - 3:27 pm | सौंदाळा
+१
5 Sep 2014 - 3:29 pm | बॅटमॅन
कमाल आहे. चार लोकांनी संदर्भ काय विचारले तर लगेच मिपासंन्यास? हाईट आहे =))
5 Sep 2014 - 4:02 pm | जयंत कुलकर्णी
अरेच्च्या मी मिपासन्यास म्हटले आहे का ? माझे असे मूळ लेखन तर येथे येणारच आहे......तुम्ही माझी प्रतिक्रिया नीट वाचलेली दिसत नाही...ज्यात मी "वाचक इतर ठिकाणी वाचू शकतात ते येथे परत लिहावे का ? या विचारात पडलो आहे असे स्पष्ट म्हटले आहे....त्याचे उत्तर नकारार्थी आल्यावर हा निर्णय घेतला आहे...त्यात हाईट काय आहे हे कळले नाही.....अतिवास यांनी संदर्भ काय हे विचारले म्हणून हा निर्ण्य मी घेतला असे आपल्याला वाटले असेल तर माझा नाईलाज आहे.....:-)
5 Sep 2014 - 4:18 pm | प्रसाद१९७१
जयंत साहेब,
दोन तासापूर्वीच दुसर्या बाफ वरच्या प्रतिक्रियेत मी मिपा वर कोणाचे लेख मुद्दाम वाचतो लिहीले होते.
तुम्ही मिपा वर टाकत जा लेख जरी तुमच्या ब्लॉग वर ओरिजिनल असले तरी. ब्लॉग वर जावुन वाचन होइल असे वाटत नाही.
संदर्भ पुस्तकांची नावे नाही दिलीत तरी काही बिघडत नाही. आणि अश्या लेखांची संदर्भ सुची द्यायची तर शाळेची TextBook पण त्यात include करायला लागतील.
http://misalpav.com/comment/609353#comment-609353
5 Sep 2014 - 11:28 pm | खटपट्या
+१
5 Sep 2014 - 3:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सुरुवात !
कुलकर्णीसाहेब, तुमच्या सारख्या कसलेल्या जुन्याजाणत्या लेखकांने काही शेर्यांना मनावर घेऊ नये असे वाटते. आंतरजालावरच्या लेखनाचा प्रतिसाद हा एक गुणधर्मच आहे... जीवनातल्या इतर गोष्टींसारखाच कधी बरा, कधी वाईट.
"दोन घ्यावे, दोन द्यावे" हा नियम पाळून तुम्हीही प्रतिसादकर्त्यांस उत्तरे देऊ शकता. प्रतिसादाकडे दुर्लक्ष करणे उर्फ फाट्यावर मारणे हे तंत्रसुद्धा येथे परिणामकारकरित्या वापरले जाते हे तुम्ही जाणताच !
तुमचे लिखाण आवडते, यामुळेच इतके लिहिण्याचा खटाटोप केला.
पुभाप्र.
5 Sep 2014 - 4:12 pm | जयंत कुलकर्णी
इस्पिक एक्का साहेब,
माझा मुद्दा जरा मूळ स्वरुपाचा आहे. मला वाटते इतिहासावर संशोधनात्मक लेखन होत नसल्यास ते करु नये या मताशी मी येऊन पोहोचलो आहे. अर्थात ज्यांना फक्त मराठीमधेच वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी व स्वतःसाठी लिहावे हे उत्तम.... येथे ओरिजिनल लिहावे हे ठीक राहील....
7 Mar 2020 - 8:23 am | Jayant Naik
तुमचा निर्णय कृपा करून बदला. काही लोकांसाठी अनेक लोकांचा हिरमोड करू नका.
7 Mar 2020 - 4:33 pm | चौकस२१२
मी मिपा वर नवीन असल्यामुळे आपले लिखाण फारसे वाचले नाही पण हा लेख वाचनीय आहे यात शंका नाही... पण आपण असे रागावून ना लिहिण्याचा निर्णय हि योग्य वाटत नाही .. इतिहासासंदर्भात असल्यामुळे जर एखाद्याने विचारले कि हे भाषांतर? कि संशोधन कि / कलपना तर एवढे काही वावगे नाही.. आपण जर व्यायसायिक पद्धतीने लिहाल गेलात तर सँण्डक पण हे प्रश्न विचारले ..असे वाटते
7 Mar 2020 - 6:18 pm | चौकस२१२
आपण जर व्यायसायिक पद्धतीने लिहू लागलात तर संपादक पण हे प्रश्न विचारेल किंवा थोडासा खुलासा करावा अशी विनंती करेल .. असे मला म्हणायचे होते
5 Sep 2014 - 3:45 pm | प्रचेतस
जयंतकाका, इकडे लिखाण अवश्य करावे.
ह्या कथा आम्हाला माहिती नाहीत मात्र तुमच्या लिखाणाद्वारे यांची माहिती होत राहते.
ह्या कथा मिपावर न लिहिण्याचा आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.
5 Sep 2014 - 4:21 pm | अनुप ढेरे
समहत आहे.
5 Sep 2014 - 3:50 pm | पिलीयन रायडर
लिखाण अगदी मनापासुन आवडले.. जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करत नसाल तर संदर्भ द्यायची गरज नाही... पण दिलेत तर ज्यांना ह्या विषयाची आवड आहे त्यांना बरीच माहिती मिळु शकते असे मला वाटते..
ब्लॉगवर लिहीलतं तरी हे प्रश्न तिथेही उपस्थित होऊ शकतातच ना..? मग मिपावर न लिहीण्याचा निर्णय घेण्याचे कारण कळाले नाही...
16 Jun 2015 - 1:44 pm | निनाद मुक्काम प...
सहमत आहे
संदर्भ दिल्याने ज्याला इच्छा आहे तो वाचू शकेल
मला इम्रान खान ची फार वर्षापूर्वी मुलाखत आठवली त्याची प्रो तालिबानी म्हणून हेटाळणी केली आत होती तेव्हा त्याने प्रत्युत्तर देतांना सांगितले इतिहास चाळून पहा , अफगाणी हे त्यांच्या प्रदेशात अजेय आहेत
मुघल सोडा पण ज्या इस्ट इंडिया कंपनी व ब्रिटन ने अर्ध्या जगावर राज्य केले त्यांच्या इतिहासात त्यांचे सर्वात जास्त सैनिक व अधिकारी अफगाणिस्तानात मारल्या गेले.
त्यातून इंग्रजांनी बोध घेऊन अफगाण सारखा मोक्याचा प्रदेश काबीज करण्याचा मोह सोडून दिला पुढे रशियाने व आता अमेरिकेने हीच घोडचूक केली आहे त्याला पाकिस्तान ने साथ दिली आहे तेव्हा त्यांचे घातक परिणाम आपणास भोगावे लागणार आहेत
आता इतक्या वर्षांनी पराजित अमेरिकन सैन्य माघार घेतांना पाहून व पाकिस्तान पाकिस्तानी तालिबानच्या तडाख्यात सापडले पाहून
खात्री झाली
5 Sep 2014 - 4:00 pm | नि३सोलपुरकर
काका,
मि वल्लीशी १००% सहमत आहे,आपण मिपावर लिखाण अवश्य करावे,(निदान माझ्यासारख्या असंख्य वाचनमात्रांसाठी).
आपला निर्णय मागे घ्यावा ही विनंती.
5 Sep 2014 - 4:20 pm | प्रसाद१९७१
जयंत साहेब,
दोन तासापूर्वीच दुसर्या बाफ वरच्या प्रतिक्रियेत मी मिपा वर कोणाचे लेख मुद्दाम वाचतो लिहीले होते.
तुम्ही मिपा वर टाकत जा लेख जरी तुमच्या ब्लॉग वर ओरिजिनल असले तरी. ब्लॉग वर जावुन वाचन होइल असे वाटत नाही.
संदर्भ पुस्तकांची नावे नाही दिलीत तरी काही बिघडत नाही. आणि अश्या लेखांची संदर्भ सुची द्यायची तर शाळेची TextBook पण त्यात include करायला लागतील.
डॉ खरे आणि जयंत कुलकर्णी ह्या लेखकांच्या लेखातुन बरीच नविन माहीती मिळते आणि ते ती छान पद्धतीने लिहीतात म्हणुन वाचतोच वाचतो.
http://misalpav.com/comment/609353#comment-609353
5 Sep 2014 - 4:44 pm | विनोद१८
आपण इतके मनावर घेउ नका व प्रतिसाद्कर्त्यांनी देखील संदर्भ देण्याचा आग्रह करु नये असे वाटते. या अशा आग्रहामुळे मिपाकर या इतक्या सुंदर व कसदार लिखाणाला मुकण्याची शक्यता दिसते. श्री. जयंत कुलकर्णी म्हणालेच आहेत की 'ज्यांना फक्त मराठीमधेच वाचण्यास आवडते त्यांच्यासाठी व स्वतःसाठी लिहावे हे उत्तम.... ' जर असे संदर्भ दिले नाहीत तर काय फरक पडतो ???
श्री. जयंत कुलकर्णी यांनी आपला निर्णय फिरवावा अशी नम्र विनंती.
5 Sep 2014 - 6:04 pm | श्रीरंग_जोशी
जयंतराव - मी मिपावर सदस्य बनण्याअगोदरपासून तुमचे लेखन वाचतोय. दर वेळी तुमचा नवा लेख दिसल्यावर अधाशासारखा वाचून काढतो.
तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र ही लेखमालिका अन काठमांडू ते कंदहार.. हा लेख लिहिला होता. मध्यंतरी एका परिचितांनी तो वाचला अन लगेच मला फोन करून विचारले अरे तू त्या अपहरण झालेल्या विमानात होता का?
लेखाच्या शेवटी तळटिपेत एवढे स्पष्टपणे लिहूनसुद्धा त्यांनी नेमके तेवढेच वाचले नव्हते. माझ्या निरिक्षणाप्रमाणे बहुतांश वाचक संदर्भयादी वाचत नसतात. मी स्वतः कुठल्याही पुस्तकाच्या शेवटी दिलेली संदर्भयादी काळजीपूर्वक वाचल्याचे स्मरत नाही.
या प्रकारचे लेखन करताना त्या विषयाच्या अभ्यासासाठी किती कष्ट करावे लागतात हे मी चांगलेच जाणून आहे. जवळजवळ दोन वर्षांपासून निवांत वेळ न भेटल्यामूळे माझी लेखमालिका अर्धवट पडली आहे अन ती अर्धवट असल्याने दुसरे काही लिहिणे मला पटत नाही म्हणून लेखनही थांबले आहे (माझ्याखेरीज इतर कुणी ही गोष्ट लक्षात घेत नसेल याबाबत खात्री आहे) :smile: .
5 Sep 2014 - 6:23 pm | पैसा
मी हल्लीच आठवण करून दिलेली मला आठवत आहे.
5 Sep 2014 - 6:21 pm | पैसा
कथा थरारक आहे. पुढचा भाग लौकर लिहा कुलकर्णीसाहेब!
तुमचा लेख म्हणून आरामात वाचण्यासाठी इथे आले तर लेखाबरोबर काही वेगळंच वाचायला मिळालं. हे जे तुम्ही लिहिताय ते इतिहासाचं अभ्यासक्रमासाठीचं पुस्तक नव्हे. जास्त ललित प्रकारातलं आहे. जेव्हा पूर्ण इतिहासावर आधारित लिहिता, तेव्हा लिखाणाच्या शेवट तुम्ही संदर्भ देताच. प्यारे१ म्हणाला तो प्रकार मला चांगला आठवतो आहे आणि त्या लेखातच तुम्ही श्रेय उल्लेख करूनही तो दुर्दैवी प्रकार घडला होता. तशा प्रकाराच्या मागे दुसरेही काही उद्देश बरेचदा असतात असं तेव्हा मी तुम्हाला बोलले होते.
तुम्ही मिपासंन्यास घेत नाही आहात हे मला माहिती आहे. तुमच्या भावना आनी विचारप्रक्रियाही लक्षात आली आहे, पण हे जरूर पूर्ण करा अशी विनंती करते. हा काही सही न सही अनुवाद नाही तर त्या प्रसंगाची कथा सांगत आहात त्यामुळे त्यासाठी आवश्यक त्या औपचारिकता अगदी काटेकोरपणे पाळल्या गेल्या पाहिजेत असे मला वाटत नाही.
5 Sep 2014 - 6:43 pm | कंजूस
इतिहासावर आधारित लेखन करतांना फारच तारेवरची कसरत करावी लागते आणि काही घटनांचे स्पष्टीकरण करावे लागते. वसंत कानेटकरांनी त्यांच्या नाटकांच्या प्रस्तावनेत ते केले आहे .जयंतरावांचा निर्णय बरोबर आहे .दुसरा सोपा उपाय म्हणजे पुस्तक परीक्षण.
इतिहास लिहिणे याहून कठीण असते. पुष्टी असल्याशिवाय एक वाक्यही लिहिता मांडता येत नाही. रंजक इतिहास लिहिणे आणखी कठीण. याचे उत्तम उदाहरण विल्यम डर्लींपल याची दोन पुस्तके 'दी लास्ट मुघल' आणि 'व्हाइट मुघलस'
5 Sep 2014 - 7:08 pm | केदार-मिसळपाव
करा सुरुवात..
5 Sep 2014 - 7:54 pm | कवितानागेश
..वाचतेय.
आणि पुढच्या भागाची वात बघतेय. :)
5 Sep 2014 - 8:47 pm | चित्रगुप्त
अत्यंत उत्कंठावर्धक लेखमाला. पु.भा.प्र.
6 Sep 2014 - 12:05 am | मुक्त विहारि
पुभाप्र..
6 Sep 2014 - 10:52 am | तुषार काळभोर
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
7 Sep 2014 - 5:04 pm | प्रास
या आणि अशा विषयांवरचं तुमचं लिखाण तुम्ही मिपावर करणार नसल्याचा निर्णय घेतला असल्यास तो बदला असं सांगण्यारा मी कोण? तरी याबद्दल चार शब्द लिहू इच्छितो.
शोधून वाचून खूप वेगवेगळी माहिती मिळू शकते पण ती माहिती तिथे आहे किंवा त्या माहितीचा असा काही विषय आहे हेच अनेकांना माहिती नसतं. मग अशांचं काय? तुम्ही तुमच्या वाचनाने, अभ्यासाने असे विषय धुंडाळून त्यावर नाट्यमय काही लिहित असलात तर त्यातून जिज्ञासा जागृत होऊन एखाद्याला जास्तीच्या, पुढच्या अभ्यासाची गोडी लागली तर तेच तुमच्या लेखनाचे महत्त्व मानले जावे.
बाकी निर्णय तुमच्यावर सोडतोय....
अफगाणिस्थान...... च्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत....
7 Sep 2014 - 5:34 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
आपणा सर्वांचे म्हणणे पटले व अतिवास यांनी सूचविल्याप्रमाणे मी संदर्भ लेखमालिकेच्या शेवटी देईन. म्हणजे अगदी संदर्भ नाही तरी काही साहित्याचा उल्लेख मात्र जरुर करेन...जे मी करणारच होतो....मागील वेळी सुद्धा हेच झाले होते. लोक्स वाटच बघत नाहीत...
आणि मला लिहा हे सांगण्याचा अधिकार आपणा सर्वांचा आहेच तो मी नाकारीत नाही.....आता डोक्यातून विषय मागे पडला आहे....थोडा वेळ द्या..मग लिहिण्यास सुरवात करतो..
जयंत कुलकर्णी....
8 Sep 2014 - 2:33 am | खटपट्या
धन्यवाद जयंत काका !! तुम्ही लिहित राहणार हे ऐकून खूप बरे वाटले.
16 Jun 2015 - 8:35 am | मुक्त विहारि
(उत्तम लेखांचा फॅन) मुवि
16 Jun 2015 - 9:32 am | कंजूस
इतिहास एक उकरून काढायची वस्तू आहे.
आम्ही चिचुंद्रीसारखे ( =एक उंदरासारखा प्राणी,डोळे नसतात केवळ तिक्ष्ण वासावर खाद्य शोधत फिरतो. आता चिचुंद्री नामशेष झाली असेल परंतू साहित्यात अजरामर आहे हे आमचे भाग्य आहे -"Taming The Shrew-Shakspere ) साहित्याच्या शोधात असतो.
लेखक महाशय पुन्हा मनावर घेतील का माहित नाही परंतू आताच लिहायला घेतलेली गुजरात पर्यटन मालिका तरी पूर्ण करतील अशी आशा करतो. जामनगरपर्यंत आलो आहोत.
16 Jun 2015 - 10:02 am | जयंत कुलकर्णी
श्री कंजूस,
गुजरात प्रवास वर्णन करायचे ठरविले होते पण प्रवास वर्णन लिहिणे फारच अवघड असते हे लक्षात आल्यामुळे त्यावाटेस परत जाणे नाही. म्हणजे लिहू शकतो आपण पण लिहिल्यावर यात काय विशेष आहे असे वाटत रहाते....
माझा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. हं....पण अफगाणिस्थानचे वेगळे आहे. ही मालिका मला अजुनही पूर्ण करायची आहे.....आणि करेन....
16 Jun 2015 - 10:27 am | खटपट्या
धन्यवाद जयंत काका. पु.भा.प्र.
16 Jun 2015 - 4:18 pm | विनोद१८
या तुमच्या घोषणेबद्दल मनापासुन आनंद व्यक्त करतो व धन्यवाद देतो.
16 Jun 2015 - 10:27 am | सुबोध खरे
जयंत राव,
आपण इतिहासाबद्दल संदर्भ द्यायला पाहिजे सांगणार्या लोकांची मते मला पटत नाहीत. कारण मग तर मला वैद्यकीय बाबींवर काहीच लिहायला नको. कारण कुठलीच गोष्ट माझी स्वयंभू नाही. प्रत्येक गोष्टीला कुठल्यातरी पथ्य पुस्तकाचा किंवा नियतकालिकाचा संदर्भ आहेच. आणि इतकी वर्षे वाचलेले वैद्यकीय ज्ञान कुठून आले हे विचारले तर मला नाही वाटत बहुसंख्य( कि १००%) डॉक्टर हे सांगू शकतील कि ते कुठे वाचले. मग त्यांनी वैद्यकीय ज्ञानावर काही लेख लिहावेत.
असो आपला हा लेख मी अगोदर वाचलेला नव्हता. आज तो अवर आला तेंव्हा पुढे काय याची उत्कंठा लागून राहिली आहे. राहिली गोष्ट कुणाच्याही ब्लॉग वर जाऊन वाचायचा माझ्यासारख्या लोकांना कंटाळा असतो. (कारण बरेच ब्लोग हे मी माझे आणि माझ्यासाठी असतात)आणि त्यातून आपल्याला हवा तो लेख शोधुन काढणे कठीण असते आणि तुमचा तेवढा धीरहि( patience) नसतो.
तेंव्हा हि मालिका लवकरच लिहायला घ्या ( किंवा ब्लोग वर असेल तर इकडे डकवा) हि तुम्हाला प्रेमाची विनंती.
जाता जाता-- काही लोकांनी माझ्या लेखनाला तुलनेत आपल्या पातळीपर्यंत आणले याचा मला अभिमान वाटतो( त्याबद्दल त्यांना धन्यवाद ). परंतु माझी तेवढी लायकी नाही असे मी नम्रपणे सुचवू इच्छितो.
(मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी )
16 Jun 2015 - 11:16 am | जयंत कुलकर्णी
खरेसाहेब,
क्यूं शरमिंदा कर रहे हो......
16 Jun 2015 - 11:58 am | गणेशा
मस्त सुरवात आहे.. पुढील भाग केंव्हा वाचायला मिळतील ?
7 Jun 2019 - 1:44 pm | उदयगिरी
जयंत सर प्लीज हि मालिका सुरु करा।
7 Jun 2019 - 5:21 pm | जॉनविक्क
तसा संबंध नाही परंतु उगाच अक्षय कुमार यांचा केसरी चित्रपट आठवला.
अतिशय उत्सुकतावर्धित वळणावर हा भाग लेखक महोदयांनी संपवला आहे. हॅट्स ऑफ !
7 Jun 2019 - 5:26 pm | प्रसाद_१९८२
ह्या लेखाचे पुढील भाग कुठे वाचायला मिळतील ?
10 Jul 2019 - 12:34 am | diggi12
Ya lehacha tumchya blog varil duva (link) dya
4 Mar 2020 - 1:45 am | diggi12
जयंत सर प्लीज हि मालिका सुरु करा।
6 Mar 2020 - 2:39 pm | सुचिता१
6 Mar 2020 - 3:38 pm | श्वेता२४
हा धागा वर आला ते बरं झालं. पुढील भाग कधी लिहीताय काका?
22 Aug 2021 - 10:15 am | diggi12
जयंत सर प्लीज हि मालिका सुरु करा।
23 Aug 2021 - 12:47 pm | चौथा कोनाडा
थरारक आहे डॉ. ब्रायडॉनच्या पलायनाची कहाणी !