मुली जेव्हा नुकतंच लग्न होऊन सासरी जातात तेव्हा पहिले काही दिवस त्यांची पार गंमत उडालेली असते. काही म्हणजे काही कळत नाही. नवं घर, नवी माणसं आणि लग्नापूर्वी आपला वाटणारा आणि लग्नानंतर अचानक सासरच्या गोटात सामील झालेला नवरा अशा वेगवेगळ्या लेव्हल्सवर तिचा सामना सुरू असतो. गाडं पहिल्यांदा अडतं ते स्वयंपाक करण्यावरून. लग्नाआधी आईने ३ महिन्यांचा क्रॅशकोर्स करून घेतलेला असतो. पण लग्नापूर्वीच्या महिन्याभरात लग्नाच्या तयारीमुळे सगळ्यावर छान बोळा फिरवला जातो. त्यात आजकालच्या मुलींना मी नोकरी करत असूनही घर उत्तम सांभाळते हे दाखवून द्यायची भारीच हौस असते. आणि इथेच लोचा होतो. भरीसभर म्हणून काही नवरे पावलो पावली बायकोची तुलना त्यांच्या आईशी करतात. सगळ्याच बाबतीत. तर अशी एक घटना आपण बघू.
घटना १ - सामान्य दॄष्टीकोन
वेळ - मंमं करायची
पार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.
नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का रे? काय झालं? बटाट्याची आहे ही.
नवरा - ते कळलं गं, पण ही अशी? अशी बटाट्याची भाजी मी मागच्या ३० वर्षात खाल्ली नव्हती.
बायको - मीठ जास्त पडलं का?
नवरा - नाही... मीठ बरोबर आहे, भाजीत बटाटे कमी पडलेत.
बायको - अरे काय झालं नीट सांगशील का?
नवरा - खाऊन बघितलीस तू मला वाढण्याआधी?
बायको - हो...
नवरा - मग कळलं नाही तुला? साधी बटाट्याची भाजी करता येऊ नये म्हणजे कमाल आहे.
बायको - अरे पण...
नवरा - आणि मला खाकरे आवडतात हे बरोबर आहे, पण ते चहाशी. जेवायला नव्हे.
बायको - असं रे काय करतोस? मी पण नुकतीच सुरुवात केली आहे ना?
नवरा - पण साध्या पोळ्या येऊ नयेत म्हणजे कमाल झाली. एकदा माझ्या आईच्या हातचं खाऊन बघ म्हणजे कळेल फरक खाकरे आणि पोळ्यांमधला.
(बायको मुसमुसायला लागते)
नवरा - आता रडू नकोस. एव्हढं काही झालं नाहिये...
बायको - मग तू किती ओरडतोस माझ्यावर...
नवरा - ओरडू नाही तर काय करू...
(नवर्याचं आई पुराण पुन्हा सुरू होतं.)
आता ह्या समर प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी उत्तम स्वयंपाक शिकणे अथवा स्वयंपाकाला बाई ठेवणे हे दोनच उपाय आहेत. पण तोपर्यंत किल्ला लढवण्यासाठी निर्लज्जपणाच तुमच्या मदतीला धाऊन येईल.
----------------------------------------------------------------------------------------
घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन
वेळ - मंमं करायची
पार्श्वभूमी - तुम्ही मर मर मरून कमी करपलेल्या पोळ्या आणि करायला सोप्पी म्हणून बटाट्याची भाजी केली आहे. नवरा पहिला घास तोंडात टाकतो.
नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस?
नवरा - अगं भाजीत मीठा किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का?
बायको - बघितली, मीठ जास्त वाटलं म्हणून पुन्हा थोडे बटाटे घातले तर भाजी अळणी झाली. म्हणून चवीपुरतं मीठ टाकलं तर तू म्हणतोस भाजी खारट झालेय.
नवरा - खरंच झालेय अगं. साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.
बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते?
नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.
बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.
नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं?
बायको - नाही रे...
नवरा - मग?
बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...
नवरा - ते आहेच गं. पण...
बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.
नवरा - हे कुणी सांगितलं तुला?
बायको - अरे परवा तुला तिसर्यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास?
नवरा - अगं ते वेगळं
बायको - वेगळं बगरे काही नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...
नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)
बायको - काहीही गरज नाहिये... जमेल
नवरा - कशासाठी अगं...
बायको - नाही तर अजून आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात
नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,०००? त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००)
बायको - पण त्याला वेळ लागेल रे...
नवरा - वेळ सगळ्यालाच लागतो अगं. जाऊ दे, ये जेवायला...
घटना १ समाप्त
अशा साध्या साध्या घटनांतून आपल्याला निर्लज्जपणाचं महत्त्व संसारात पावलोपावली पटू लागेल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
निर्लज्जपणा जर सगळ्यात जास्त कुठे उपयोगी पडत असले तर तो संसारात. A perfect marriage is based on perfect mutual misunderstanding असं कुणी एक थोर तत्त्ववेत्ता सांगून गेला ते खरंच आहे. पण ह्या पलिकडे जाऊन आपल्या नवर्याच्या मर्कटलिलांकडे दुर्लक्ष करण्यासाठी निर्लज्जपणाच उपयोगी पडतो. "किती वेळा सांगितलं तरी हा काही सुधारत नाही" ही जगातल्या समस्त बायकांची तक्रार आहे. आणि त्यावर कुणालाही अजूनही सोल्यूशन शोधणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्या फंदात पडूच नये.
नवर्यांचं सुधारणं हे सिनेमात नितंब उडवत नाचणार्या (शब्दप्रयोग कणेकरांकडून साभार) बार बाला कम आयटम गर्लला एके दिवशी होणार्या "अरे, आपण अभिनयाशी संबंधीत क्षेत्रात काम करतो" ह्या साक्षात्कारासारखं असतं. ते फारसं मनावर घेऊ नये. एखाद्या सिनेमात ५-६ मिनिटं मेक-अप शिवाय दर्शन देऊन आणि अंगभर खादीची साडी गुंडाळून गंभीर आवाजात संवाद म्हटल्यावर त्या जशा पुन्हा नितंब उडवायला मोकळ्या होतात तसंच नवर्यांचंही आहे. अचानक एके दिवशी ह्यांना 'अरे, संसाराचा गाडा दोन चाकांवर चालतो आणि आपल्या चाकाची गती दुसर्या चाकाच्या मानाने जरा कमी आहे" हा साक्षात्कार होतो. आणि त्यावर उपायही सुरू होतो. पण तो रुमाल जागेवर ठेवणे, सोसायटीच्या वॉचमनला दळण आणायला पाठवणे इत्यादि पुरता मर्यादित असतो. ह्या दोघांमधलं अजून एक साम्य म्हणजे ह्या बार बाला / आयटम गर्ल जशा त्या ५ मिनिटांच्या भुमीकेची आठवण पुढल्या प्रत्येक मुलाखतीत काढतात तसेच नवरेही एखाद्यावेळी जागेवर ठेवलेला रुमाल, ऑफिस बॉयला पाठवून भरलेलं बिल, इत्यादी कामांची आठवण प्रत्येक भांडणात काढतात. त्यामुळे नवर्यांच्या सुधारित आवॄतीला फारसं मनावर घेऊ नये. नवरा आणि तेरड्यातलं साम्य ओळखावं.
मुळात लग्न झालं तरी नवर्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. घर तेच, मित्र तेच, कट्टा तोच. "त्यामुळे लग्नानंतर तू बदललास" म्हणजे नक्की काय झालं हेच नवर्यांना कळत नाही. उलट "मी होतो तसाच आहे, मग आता कसला त्रास होतोय" हे त्यांना कळत नाही. ह्यावर उपाय म्हणून नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवायला हवा. हा नवरे-स्पेसिफिक निर्लज्जपण अंगी बाणवून संसार सुखाचा कसा करावा हे कळण्यासाठी नवर्यांचे काही गुण आणि खास सल्ले इथे देत आहे.
संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना काही सल्ले:
१. "कल्पवॄक्ष कन्येसाठी" ह्या पि. सावळाराम ह्यांच्या गाण्यातला कल्पवॄक्ष म्हणजे नवरा नव्हे हे कॄपया ध्यान्यात घ्यावे.
२. नवर्यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.
३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.
४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.
५. नवर्यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे.
६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्यांना अजिबात त्रास होत नाही.
७. नवर्यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.
८. आई पेक्षा चांगला स्वयंपाक जगात कुणालाही येत नाही. आईचा ३०-३५ वर्षांचा अनुभव आणि बायकोचे नवर्यावर चालणारे प्रयोग ह्यांची तुलना होऊ शकतच नाही.
९. आईशी तुलना करायची असेल तर आधी किमान आईने जसं लाडाऊन ठेवलंय ते कंटिन्यू करण्यापासून सुरुवात करावी.
१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे.
ह्या काही गोष्टी बायकांनी लक्षात ठेवल्या तर जगातले यच्चयावत नवरे आणि पर्यायाने जगातले यच्चयावत संसार सुखाचे होतील.
आणि संसार सुखाचा करण्यासाठी आता नवर्यांना एकमेव सल्ला:
"आपल्या देवाने दोन कान दिलेत हे कधिही विसरू नका."
प्रतिक्रिया
28 Oct 2010 - 10:05 am | आदिजोशी
ह्या भागात वापरलेल्या काही अमूल्य इनसाईट्स बद्दल खंबीर बायका समितीच्या अध्यक्षा आदितीताई जोशी ह्यांचे आभार.
28 Oct 2010 - 1:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वानुभवावर आधारित निर्लज्जपणा वाचून आनंद झाला! पण या वेळेस निर्लज्जपणा कमी पडल्यासारखा वाटतो आहे.
====================================
नवरा - अगं ही कसली भाजी केली आहेस? मी ऑफिसमधून उशिरा आल्याची इतकी भयानक शिक्षा?
बायको - का उगाच आरडा-ओरडा करतोयस? येवढ्या उशीरा घरी आल्यानंतर बसल्या जागी खायला मिळतंय हे काय कमी आहे का?
नवरा - अगं भाजीत मीठ किती जास्त आहे? वाढण्याआधी चव घेऊन नाही बघितलीस का?
बायको - मी काय तुझ्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबू काय? मला एवढं मीठ लागतंच भाजीत.
नवरा - .... साधी भाजी करता येऊ नये तुला म्हणजे कमाल आहे.
बायको - कमाल काय त्यात? मी काय खाणावळ चालवते?
नवरा - तसं नव्हे. पण... जाऊ दे... तू एकदा आईच्या हातचं जेऊनच बघ म्हणजे तुला कळेल.
बायको - आई सारखी भाजी हवी होती तर लग्न कशाला केलंस, दत्तक जायचंस कुणाला तरी. आणि २०-२५ वर्षांनी मी सुद्धा टकाटक स्वयंपाक करेन.
नवरा - म्हणजे तोवर मी असंच जेवायचं?
बायको - नाही रे...
नवरा - मग?
बायको - एक आईडिया आहे... आपण सासूबाईंना बोलावून घेऊ... त्यांच्या हाताला खरंच चव आहे...
नवरा - ते आहेच गं. पण...
बायको - आणि तशीही त्यांना आवड आहेच तुला रोज वेगवेगळं काही तरी करून खायला घालायची.
नवरा - हे कुणी सांगितलं तुला?
बायको - अरे परवा तुला तिसर्यांदा डब्यात बटाट्याची भाजी दिली तेव्हा तूच नाही का म्हणालास?
नवरा - अगं ते वेगळं
बायको - वेगळं बगरे काही नाही... ठरलं तर, आपण आता जरा मोठं घर घेऊ आणि सगळे एकत्रच रहायला लागू, प्रश्नच मिटला...
नवरा - (प्रकट) नको... इतकं काही वाईट झालं नाहिये. (स्वगत - अजून मोठं घर म्हणजे अजून मोठा हफ्ता, म्हणजे खर्चावर अजून लगाम. काय च्यायला वैताग आहे.)
बायको - काहीही गरज नाहिये... जमेल
नवरा - कशासाठी अगं...
बायको - नाही तर अजून आईडिया... आपण बाई ठेऊ स्वयंपाकाला... माझ्या ओळखीत आहेत एक मावशी... दोन्ही वेळच्या जेवणाचे फक्त ५,००० घेतात
नवरा - (प्रकट) इतकी काही गरज नाहिये गं, जमेल तुलाही हळू हळू... (बापरे, फक्त स्वयंपाक करायचे ५,०००? त्यापेक्षा मी शिकतो, मला दे ते ५,०००)
बायको - पण मला शिकायला फार वेळ लागतो. तू किती हुशार आहेस, तुला जर सकाळी नऊ वाजता गर्दीतून गाडी चालवून ऑफिसला जाता येतं तर स्वयंपाक किस झाड की पत्ती! उद्यापासून भाजी आणण्यापासून करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी तुझी!
नवरा - ... खुद के सांथ बातां: ठेवशील पुन्हा आयत्या हातात मिळालेल्या गोष्टींना नावं, ठेवशील??
====================================
पुन्हा एकदा, स्वानुभवावर आधारित.
28 Oct 2010 - 7:58 pm | स्वाती२
:D :D :D
28 Oct 2010 - 11:53 pm | शिल्पा ब
माझा नवरा फार्फार हुशार आहे त्यामुळे असल्या भानगडीत तो कधीच पडला नाही...अगदी पापड पोळ्या, खारट अन जळलेली भाजी वगैरे प्रकारातून गेलेला आहे तरी..
जे देईल ते खातो...आणि नाही दिलं तर स्वतः करतो आणि मला देतो.
आता लग्न जुनं झाल्याने अन रोज रोज केल्याने मी स्वयंपाक खूप चवदार करते हे नमुद करु इछीते.
28 Oct 2010 - 10:11 am | रेवती
अंतिम भाग म्हणजे वर्मावर बोट ठेवण्यासारखं झालं.;)
असो, बर्याचजणांना मार्गदर्शक ठरावा असे लेखन.
28 Oct 2010 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रसंग मस्तच. संसार सुखाचा करण्यासाठी बायकांना दिलेले सल्ले तर लै भारी. :)
निर्लज्ज व्हा या भागाचा समारोप करु नका राव. जमेल तेव्हा लिहित चला.
- दियुत्सु. :)
28 Oct 2010 - 10:19 am | छोटा डॉन
अॅड्या, मस्त लिहले आहेस रे.
छानच लेखमाला !
मात्र ह्यानंतर अॅड्याला घरात रहायला जागा मिळेल ह्याची शक्यता कमी वाटतेय, फ्लॅट बघु का रे एखादा तुझ्यासाठी ? ;)
- छोटा डॉन
28 Oct 2010 - 10:24 am | sneharani
मस्त लिहलयं
सगळे भाग वाचताना मजा आली!
हाही भाग अगदी मस्तच जमलाय.
28 Oct 2010 - 10:27 am | नितिन थत्ते
च्यामारी !!! या अॅड्याने १-२ वर्षात लयच अभ्यास केला बॉ.
28 Oct 2010 - 3:12 pm | आदिजोशी
लग्नाला वर्ष नाही झालं अजून मालक :-)
28 Oct 2010 - 7:57 pm | नितिन थत्ते
पण लेखनावरून तुझी २-३ लग्ने आधी झाली असावीत असे वाटते. =))
(पळतो आता).
28 Oct 2010 - 10:31 am | सहज
बारबाला ५ मिनिटे भुमीका व नवर्याचे कधी काळी काम केल्याचे बरेच वेळा भांडवल करणे... लै भारी
हाही भाग उत्तम.
एकंदर वाचनीय लेखमाला!!!
(सदासुखी) सहज
28 Oct 2010 - 10:36 am | स्पा
झकास अरे आदि......................
मजा आली जाम.................. :)
28 Oct 2010 - 10:59 am | रन्गराव
आपले लेख वाचून बीबीसी वरील कप्लिंगची आठवन येते :)
28 Oct 2010 - 11:13 am | स्पंदना
हम्म्म !!
आत्ता वेळ गेल्यावर लिहिल तुम्ही . पण काय हरकत नाही, माझ्या मुलीला गुरु मंत्र देइन मी खासा !
__/\__ रे आदीजोशी !! सगळ्या आदीं प्रमाणे संसाराचे पुनर्र्र्र्र्रीजीवन तुमच्या मुळे होउ शकते.
28 Oct 2010 - 12:47 pm | टुकुल
अॅड्या लेका, कै च्या कै लिहिल आहेस.. जबरदस्त एकदम..
--टुकुल
28 Oct 2010 - 1:11 pm | रामदास
लग्न वगैरे ठीकच आहे पण दुसर्याच्या मुलीला आयुष्यभर सांभाळायचे म्हणजे जरा जास्तच झाले.
28 Oct 2010 - 2:26 pm | आदिजोशी
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
28 Oct 2010 - 7:35 pm | भाऊ पाटील
जबरा वाक्य आहे हे!
28 Oct 2010 - 6:49 pm | रेवती
काय हे रामदास? तुम्हीसुद्धा यामधे सामिल?
28 Oct 2010 - 6:52 pm | निशदे
हे वाक्य तुफान आहे........:D
बाकी लेख नेहेमीप्रमाणे उत्तम.....
10 Jun 2016 - 2:14 pm | शाम भागवत
हा मुद्दा कधी लक्षातच आला नव्हता.
:))
28 Oct 2010 - 3:56 pm | मेघवेडा
क-ड-क रे अॅड्या! एकदम चौफेर! झकास!
28 Oct 2010 - 6:43 pm | प्रभो
रा डा !!! रे अॅड्या....
28 Oct 2010 - 6:59 pm | पैसा
यावर माझं उत्तर असं असतं, "तुला पोळ्या आयत्या खायला मिळाल्यायत त्या काय आकाशातून पडल्यायत का तुझ्या आईने पोस्टाने पाठवल्यायत?"
बाकी बरंचंस बरोबर! तुमच्या लग्नाला एक वर्षच झालंय म्हणजे आताशी कुठे तुम्ही कॉलेजात प्रवेश घेतलाय. पण तुम्ही स्कॉलर दिसताय, आणखी काही वर्षात डॉक्टरेट कराल यात काही शंका नाही! माझ्या मुलीला लग्नाआधी तुमच्या घरी शिकवणीला पाठवीन म्हणते, म्हणजे तिला दोन चांगले गुरु भेटतील. (आधीचे भाग तुमच्या बायकोने लिहून दिले होते ना? म्हणजे एकसे भले दो!)
28 Oct 2010 - 7:15 pm | आदिजोशी
हा भाग पण बायकोनेच लिहून दिला आहे :-)
28 Oct 2010 - 8:03 pm | पैसा
तुम्ही ज्या कॉलेजात प्रवेश घेतलाय त्याची ती प्राचार्य आहे! हे आणखीच छान!
28 Oct 2010 - 7:10 pm | ज्ञानेश...
एकदम झक्कास.
28 Oct 2010 - 7:36 pm | टिउ
एकच नंबर!
सगळी मालिका क ड क!!!
पण अंतिम भाग का म्हणे? अजुन पण येउ दे... :-)
28 Oct 2010 - 7:53 pm | नुसती बडबड
अंतिम भाग नको हो, आणखी येवू देत....
28 Oct 2010 - 8:01 pm | स्वाती२
लेखमाला आवडली. :)
28 Oct 2010 - 8:53 pm | शुचि
__/\__
28 Oct 2010 - 9:13 pm | प्राजु
तुफ्फान!!! एकदम भारी!!
29 Oct 2010 - 11:53 am | utkarsh shah
२. नवर्यांना कामाचा कंटाळा येतो. कुठल्याही.
३. रविवार सकाळी उशिरा उठणे आणि दुपारी लोळत पडणे हे नवर्यांच्या सुखाच्या परमावधीचे क्षण असतात. त्यात बाधा आणू नये.
४. साड्यांच्या दुकानात अख्खं दुकान खाली काढायला लाऊन "नाही आवडलं काही" ह्या शब्दात दुकानदारांची बोळवण करून बाहेर पडण्याची नवर्यांना मनापासून लाज वाटते. त्यामुळे नवर्यांना किमान साड्यांच्या खरेदीला नेऊ नये.
५. नवर्यांचा खर्चाला आक्षेप नसतो, तो खर्च होण्यासाठी रविवार संध्याकाळ खर्ची घालण्याला असतो हे कॄपया समजून घ्यावे.
६. ब्रँडेड दुकानांत बार्गेन करता येत नाही ह्याचा नवर्यांना अजिबात त्रास होत नाही.
७. नवर्यांना सासरी जाणं हे एक मोठ्ठ संकट वाटतं.
१०. लग्न झालं तरी नवरे सुंदर मुलींकडे बघायचं सोडत नाहीत. मी मुलांकडे बघितलं तर चालेल का हा प्रश्न गैरलागू आहे.
एकदम सहमत. याचा अनुभव घेतोय पदोपदी.
एकदम झकास लेख. आणि सल्ले तर एकदम सहीच आहेत.........
फक्त अजुन (निर्लज्ज) Councer होण्यास हरकत नसावी. (ह.घ्या)
29 Oct 2010 - 11:55 am | utkarsh shah
Councer ऐवजी Counceller असा वाचावे....
29 Oct 2010 - 11:55 am | utkarsh shah
Councer ऐवजी Counceller असा वाचावे....
29 Oct 2010 - 6:04 pm | धमाल मुलगा
किती रे भाबडा आशावाद हा!
बाकी, 'आयुष्याचे नाटक' चे प्रयोग हाऊसफुल्ल चाललेले दिसतायत ;) नाही, हे असले काहीतरी सल्ले सुचतायत..म्हणून म्हणलं हों ;)
हॅ हॅ हॅ!!!! ही उपजत बुध्दी असते हो..ते काय वेगळं शिकावं लागतं? :D