(मागच्या वेळी केलेल नमन आता या वेळी सुद्धा आहे, पण गणपा भाउ, जागुताई अन केशवजीं बरोबर फोटो अन व्हिडिओ साठी आदरणीय बहुगुणी अन आपले सर्वांचे लाडके धमाल मुलगा यांचे जाहिर रित्या आभार!!
तुम्ही मदत केली नसती तर, कुठली अपर्णा, अन, कुठला हा लेख!!)
अरे हो राहिल प्रिय डॉन रावांनी मला अक्षर रंग अन इतर सुविधा देण्याच आश्वासन दिल्या मुळे इथुन पुढे मीही थाटात रंग बदल बदल के लिहिणार आहे!! ठ्यांक्यु ह डॉन साहेब!!
आला क्षण , गेला क्षण.
कसे जगायचे ठरवा आपण !!!
गेले दोन दिवस राखी बांधायच्या कल्पनेन कळवळलेले, काय ओवाळणी घालावी या विचारानं तळमळलेले, अन राखी बांधून घेण्या आधी जिम जॉईन कराव आणि बहिणीच रक्षण करण्यास समर्थ व्हाव असे सगळे मुद्दे मि.पा वरील बंधूंनी चर्चिले.
माझ्या नजरेन पाहाल तर सण आहे साजरा करा! ज्या भावनेन त्याचा उपज झाला त्या भावनेचा आदर करा अन आला क्षण साजरा करा!
कुणास ठाऊक उद्या सण असेल पण साजरा करायला सोबत नसेल? उगाच डोक आहे म्हणून सारख चालवलच पाहिजे का? कधीतरी रूढी म्हणून; परंपरा म्हणून; अश्या चांगल्या पद्धतिं समोर मान तुकवावी, म्हणजे मनाला रुख रुख नाही रहात!! काय ? खर ना?
तर चला आज काय करायचं माहिती आहे? हो राखी बांधायची! पण मग स्वयंपाक काय?
आज असतो साखरभात ! नारळी पौर्णिमा साजरी करण्या साठी अगदी स्पेश्शल!. हो हो नारळी भात पण म्हणतात पण माझ्या सासूबाई साखर भात करतात आज.
तर घ्या साहित्य:
१ वाटी बासमती तांदूळ.
३/४ वाटी साखर.
२ टेबल स्पून साजूक तूप. ( नुसत तूप म्हंटल तर काय वेगळ असत?)
३ लवंगा.
२ दालचिनीचे तुकडे.
४-५ वेलदोडे.
जायफळ .
केशर
थोडस मीठ
झाल!
अरे हो मेन इंग्रेडियअंट राहिला ना? लिंबू ! चांगले दोन!!.
आत्ता कृती :-
तांदूळ धुवून निथळत ठेवा. केशर दुधात भिजत घाला. भांड्यात तूप गरम करायला ठेवा. दुसरया एका भांड्यात भाता साठी पाणी गरम करायला ठेवा.
तूप तापल की लवंग दालचिन वेलदोडे तडकावून घ्या.
अन तांदूळ छान वास सुटे पर्यंत भाजून घ्या. थोड मीठ घालून वरून गरम पाणी घाला अन भात अगदी चांगला सुटसुटीत असा तयार होऊ द्या .
हा भात तयार होई पर्यंत ३/४ वाटी साखरेत तेव्हढंच पाणी घालून चांगल खळ खळ उकळवून घ्या. जवळ जवळ एक तारी पाक तयार होतो याचा!. आता तयार होत आलेल्या भातावर थोड जायफळ किसून घाला अन वरून हा तयार झालेला पाक ओता.
अगदी हलक्या हातां फक्त बाजूने हा पाक खाली पर्यंत पोहोचतो आहे ना याची खात्री करण्या करता भात हळुवार उचलून परत सेट होऊ द्या. परत एकदा भात मुरत आला अगदी सगळा पाक कोरडा होत आला, की केशर खलुन ते दुध घेवून एक अधिक चिन्ह काढा. म्हणजे भाताला केशराचा वास तर येईल पण थोडा केशरी अन थोडा पांढरा असा सुरेख भात तयार होईल. तुम्हाला नारळी भातच हवा असेल तर आत्त्ता त्यावर खोवलेला नारळ पसरवुन परत एकदा हलक्या हाताने मिसळा.
सगळा भात तयार झाला की मग शेवटी जवळ जवळ १ टेबल स्पून एव्हढा लिंबाचा रस या भातावर पिळा, अन आच बंद करा.
हा घ्या भात.
आता एव्हढी तयारी झाल्यावर राखी पण बांधलीच पाहिजे ना? बस एव्हढा एक दिवस निरागस व्हा अन सण साजरा करा.
कसा? अस्स्स्सा !!!!
प्रतिक्रिया
24 Aug 2010 - 9:40 pm | स्पंदना
नॉट अगेन !!
सार कसब पणाला लावल पण आमचे फोटो लहाण ते लहाणच अन वर त्यांच्या मागे ते शेपुट कसल आलय धुमकेतु सारख?
माय बाप संपादक जरा आमच्या लेखावर झाडणी फिरवुन साफ सुफ करा हो. प्लिज!!
24 Aug 2010 - 10:18 pm | अनामिक
अपर्णा, तु पिकासावरुन लिंक टाकलीयेस ना. तर तिथे फोटोच्या बाजूला एम्बेड इमेज दिसते ना त्या खाली एक ड्रॉप डाऊन मेनु आहे... त्यात थंबनेल च्या जागी स्मॉल, मेडियम, किंवा ओरिजीनल साईझ कर आणि मग डकव ती लिंक इकडे. फोटो मोठे होतात की नाही बघ :)
साखर्/नारळी भात खायची खूप खूप इच्छा होतेय आत्ता!
24 Aug 2010 - 11:06 pm | मेघवेडा
अच्छा पाकृ आहे होय ही! शीर्षकावरून एखादा भावनात्मक लेख असावा असं वाटलं होतं. ;)
मस्त! भाताची मूद छान सजवली आहे.
25 Aug 2010 - 11:03 am | बहुगुणी
पण ती व्हिडिओतली दोन छोटुकली लईच ग्वाड!!
25 Aug 2010 - 3:18 pm | अवलिया
मस्तच !! ग्रेट !!
25 Aug 2010 - 3:19 pm | इंटरनेटस्नेही
खरचं अप्रतिम! शब्द तर अगदी भावनाप्रधान आणि प्रसंगाला अनुरुप!