# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय
षड्रिपु - एक चिंतन
रिपु शब्दाची व्युत्पत्ती - रपति इति रिपु अशी आहे. अनिष्ट बडबड करतो तो रिपु . अनिष्ट म्हणजे काय तर ज्याच्या योगे मनाला व्याकुळता उत्पन्न होईल असे बोलतो ते रिपु.
आपल्या सनातन संस्कृतीत ६ रिपु मानलेले आहेत ते षड्रिपु ह्या प्रमाणे - काम क्रोध लोभ मद मोह मत्सर.
१. काम
काम हा सर्वात पहिला आणि सर्वात मोठ्ठा रिपु ! पण काम ह्या शब्दाचे बोली भाषेतील भाषांतर सेक्स अर्थात संभोगाची इच्छा असे केल्याने त्यातील मूळ अर्थ काहीसा अलभ्य होउन जातो. संस्कृतात एक सुभाषित आहे -
स्त्रीणामष्टगुणः कामः ||
पण हे ऐकुन सामान्य माणुस बावचळुन जातो. स्त्रीयांमध्ये पुरुषांच्या आठपट काम वासना असते असे भाषांतर केल्याने सगळा घोळ होतो . स्त्रीया बहुतांश करुन संभोगाविषयी अनासक्त असतात. आठपट सोडा , पुरुषांच्या इतकी तरी तीव्र कामवासना स्त्रीयांअध्ये असते का हा संशोधनाचा विषय ठरु शकेल ! संभोगातुरता , कामातुरता हा विशेष करुन पुरुषांचा गुणधर्म आहे. कारण स्वाभाविक आहे. एखादी गोष्ट सहज शक्य असल्यास आपले मन त्याची वासना धरत नाही , ती गोष्ट प्राप्त करुन घेते. जी गोष्ट मिळवण्यास कठीण आहे , दुर्लभ आहे , त्या विषयीच आपले मन आसक्त होऊन राहते . स्त्रीयांना संभोग मिळवणे हे काही जास्त कष्टप्रद नाही, पुरुषांना मात्र संभोग सुख मिळवण्याकरिता १७६० उपद्वव्याप करावे लागतात, प्रणयाराधन करावे लागते , स्त्रीला भुरळ पाडावी लागते तेव्हा जाऊन कोठे त्याला संभोगसुख प्राप्त होते.
तस्मात काम ह्या शब्दाचा सेक्स , संभोगेच्छा असे भाषांतर चुकीचे ठरते.
काम ह्या शब्दाचे भाषांतर कामना, desires, wants हे जास्त योग्य ठरते. आणि ह्या परिप्रोक्ष्यातुन पाहिल्यास स्त्रीणामष्टगुणः कामः || ह्या सुत्राचा उलगडा होतो.
कसे पहा की पुरुषाची संपुर्ण सांसारिक धडपड , नोकरी मिळवणे , व्यापार करणे, घर घेणे , गाडी घेणे , अजुन मोठ्ठी गाडी घेणे हे सर्व स्त्रीयांना आकर्षित करण्याकरिता चालु असते. अर्थात पुरुषांना खर्या अर्थाने एकाच गोष्टीचे "काम" असते, मात्र स्त्रीयांच्या बाबतीत असे नसते. स्त्रीयांना सोने , दागिने , साड्या , अत्तरे , परफ्युम्स . मेकअप , हे सर्व मिरवायला मोठ्ठे मोठे सण उत्सव , लग्न, बारशी, हळदीकुंकुं, वगैरे , नंतर प्रापंचिक स्थैय , त्यासाठी बॅन्क बॅलन्स , अशा अनेक गोष्टींच्या कामना असतात. ह्या सगळ्या लिस्ट मध्ये , प्राधान्यक्रमात स्त्रीयांसाठी संभोगसुख हे अत्यंत खालच्या पातळीवर असते.
अनेक दाखले देऊन हे विधान सिध्द करता येईल . इथे फक्त २ च दाखले पाहु. जे लोकं लग्नाच्या मार्केट मध्ये आहेत , त्यातील कोणालाही विचारा - मुलींच्या डीमान्ड्स काय असतात , तुम्हाला लगेच उत्तर मिळुन जाईल. मुलींना पुण्यात स्वतःचे घर असलेला नवरा हवाय , नुसतं घर नघे , घराचे कर्ज फिटलेला . घरी आई वडीलांची जबाबदारी नसलेला , ज्याच्या सोबत त्याचेच पैसे मनसोक्त निश्चिंतपणे उडवता येतील असा !
आणि पुरुषांच्या बाबतीत कोणत्याही सुज्ञ पुरुषाला प्रश्न विचारा की - कियारा आडवाणी , अनन्या पांडे , नोरा फतेही किंवा तत्सम कोणीही सुंदर स्त्री साधे पांढरे कपडे , ना मेकप , ना दागिने , ना परफ्युम , अशी तुमच्या समोर आली आणि त्याच वेळेस मायाव दी , ममता दी , सुषमा दी तस्तम कोणी स्त्री भरजरी शालु , किलोभर सोन्याचे दागिने , पावशेर मेकप करुन तुमच्यासमोर आली तर तुम्ही कोणाला निवडाल ? मी अनेक मित्रांमध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि आजवर तरी लोकांनी एकच पहिल्या पर्यायाची निवड केलेली आहे. दुसरा पर्याय निवडणारा अजुनतरी मला कोणी भेटालेला नाही.
असो. तर तात्पर्य इतकेच की काम ह्या शब्दाचा अर्थ कामना असा आहे. आणि त्याला रिपु का म्हणले आहे ? तर जो व्यक्ती आत्मतृप्त आहे त्याला कोणत्याच वस्तुची कामना होणार नाही, कारण आहे हे पुरेसे असेल ना ! काही तरी कमी आहे , काही तरी हवंय हा विचारच अपुर्णतेचे प्रतिबिंब आहे , जो मनामध्ये व्याकुळता , आस , ओढ निर्माण करत आहे. म्हणुन काम हा पहिला रिपु !
२. क्रोध
आता एकदा कामना , काम उद्भवला की दोन शक्यता निर्माण होतात - पहिली शक्यता म्हणजे काम पुरा होणे , आणि दुसरी शक्यता म्हणजे काम अपुर्ण राहणे !
काम अपुर्ण राहणे ही शक्यता क्रोधाला जन्म देते. मला एखादी गोष्ट हवी आहे , माझ्या मनानुसार हवी आहे पण ती तशी झाली नाही की जो निर्माण होतो मनाचा विकार तो क्रोध आहे. क्रोध हा स्त्री आणि पुरुषांमध्ये भिन्न भिन्न रुपे घेऊन प्रकट होतो . क्रोध पुरुषांमध्ये रागराग , चिडचिड , शिव्या देणे , मारामारी हिंसादि करणे ह्या रुपाने प्रकट होतो. मात्र स्त्रीयांमध्ये शाररिक क्षमतेचा अभाव असल्याने क्रोध हा अन्य रुपे घेऊन प्रकटतो - जसे की अपमान करणे , कट कारस्थाने करणे , बदनामी करणे , अगदी तेही शक्य नसते तेव्हा क्रोध रडणे आणि निराश होणे, स्वतःला त्रास करुन घेणे , इत्यादी रुपांमध्ये बदल होऊन स्त्रीयांमध्ये अभिव्यक्त होतो.
३. लोभ
पण आता समजा पहिली शक्यता पुर्ण झाली , अर्थात कामना पुर्ती झाली की "अहाहा, कसलं भारी आहे ही जाणीव" असा विचार मनात येतो "मला हे अजुन हवंय" असे जे वाटते तो झाला लोभ ! हाही स्त्रीयां पुरुषांमध्ये वेगवेगळी रुपे घेऊन अभिव्यक्त होतो. स्त्रीया वस्तुंचे संगहण करण्याच्या मागे लागतात, वर्षभरात एखाद दुसर्या सणाला घालतात अश्या कैक साड्या ड्रेसेसने बायकांची कपाटे ओथंबुन भरलेली असतात. कितीही सुवर्णालंकार केले तरी तुम्ही दुसर्या दिवशी स्त्रीला पु.ना. गाडगीळ मध्ये घेऊन जा आणि विचारा - "अजुन काही घ्यायचे का कि मन तृप्त झाले आता काहीही दागिने नकोत ?" "अहाहा , मन तृप्त झालं आता काहीही नको" असे म्हणणारी स्त्री तुम्हाला भेटल्यास तुम्ही जगातील सर्वात सुखी संसारी पुरुष आहात असे समजायला हरकत नाही.
अर्थात हे जनरलायझेशन्स आहेत , स्त्री पुरुषांच्या वैयक्तिक आवडी निवडी नुसार लोभ वेगवेगळी रुपे घेउन प्रकट होतो.
पुरुषांच्या मध्ये राजसत्तेने कृत्रिम अशी १ ची मर्यादा घातली असल्याने पुरुष स्त्री संग्रहण करु शकत नाही , पण ह्याचा अर्थ पुरुषांना लोभच होत नाही असा नव्हे. पुरुषांच्या बाबतीत लोभ हा घरें घेत सुटणे , गाड्या घेणे, अंगवस्त्र बाळगणे , जमीन घेणे , बंदुक घेणे , राजकारण करणे, पॉवर गेम्स खेळणे, व्यसने करणे , ह्या अन इत्यादी अनेक भिन्न रुपात प्रकट होताना दिसतो.
४. मद
हा चौथा रिपु - मद अर्थात उन्मत्तपणा . आहे त्या कामाचे आणि लोभाचीही ओसंडुंन प्राप्ती झाल्यावर लोभाचे रुपांतरण मदात होते. मद म्हणजे काय ह्या संबंधी भगव्द्गीतीत काय सुंदर श्लोक आहेत !
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्।।16.13।।
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी।।16.14।।
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः।।16.15।।
म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया ।
आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी ? ॥ ३४८ ॥
ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
मग दिठी पडे तया । उरों नेदी ॥ ३५१ ॥
मी मनें वाचा देहें । करीं ते कैसें नोहे ।
कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥ ३५५ ॥
ही मदाची अभिव्यक्ती आहे.
५. मोह
मोह ह्या शब्दाचे दोन अर्थ लागतात - एक सर्वसामान्य म्हणजे लोभ ह्या अर्थाच्या जवळ जाणारा , "मला हे हवंय" असं मोहित होणे आणि दुसरा अर्थ म्हणजे भ्रमिष्ट होऊन झपाटल्यासारखे काहीबाही करत राहणे . तुम्ही झालात लाख श्रीमंत , पण जेफ बेझॉस च्या पायपोसाला तरी उभे राहु शकाल का ? त्याच्याकडे यॉट आहे, नुसती यॉट नाही तर त्यावर "पाळलेली" माणसे आहेत , मध्यंतरी एकेठिकाणी यॉट जाऊ शकत नाही म्हणुन त्याने व्यवस्थित सरकारी यंत्रणे तर्फे नेदरलंन्ड मधील पुल उध्वस्त केला होता ! ही पैशाची ताकत आहे . आहे का तुम्हाला जमणारं ?
पण तरीही तुम्ही तुमच्या क्षमतेत जे आहे तसले उपद्व्याप करतच राहता, मग तुम्हीही असे झपाटल्यासारखे वस्तुंच्या मागे लागता तो म्हणजे मोह ! आणि एवढं टोकाचे उदाहरण कशाला ? माझ्या पाहण्यात असे कित्येक लोकं आहे ज्यांना त्यांच्या कामातील ताण तणावांमुळे हृदय विकाराचा झटका येऊन गेलाय , अँजिओप्लास्टी करायला लागली आहे , अनेकांना लाईफ स्टाईल विकार जडले आहेत तरीही आहे तो कामाचा उरका पाडतच राहिलेत ! "आता बास. पुरेसे आहे इतके" अशा विचार करणारी माणसेच दुर्मिळ ! बाकी झपाटल्यासारखी धावत आहेत, ह्याला मोह नाही तर दुसरं काय म्हणणार !!
स्त्रीयांमध्ये मोहाचे सर्वोत्कृष्ठ उदाहरण म्हणजे नानासाहेब पेशवे ह्यांच्या पत्नी - गोपिकाबाई ! ऐश्वर्याच्या वैभवाच्या परमोच्च पदी विराजमान होऊन देखील बाई आयुष्यभर काहीबाही कुरबुरी काढुन पिसाटल्यासारखी वागत असल्याचे निदर्शनास येते . मोठ्ठा मुलगा विश्वास युध्दात गेल्यावर , पती त्या धक्याने गेल्यावर, धाकटा माधव सत्तेत स्थिरस्थावर झाल्यावर देखील त्याचा अभिमान बाळगायचा अन आनंदाने आयुष्य व्यतीत करायचे सोडुन ही बाई माझ्या भावाचा ( माधवरावांनी रास्तेमामाचा) अपमान केला म्हणुन मरेपर्यंत अबोला धरुन राहीली. नुसती कल्पना करा - स्वतःचा पोटचा पोरगा , तोही इतका प्रचंड कर्तृत्ववान तो मरणासन्न अवस्थेत श्रीचिंतामणीपुढे ध्यान धरुन पडुन राहिला आहे अन तरीही ही बाई पुर्वायुष्यातील रुसव्याफुगव्यांमुळे मौन धरुन आहे ! आणि माधवराव मेल्यानंतर देखील रमाबाईंना सती जाण्याविषयी आडवणे तर दुरच राहिले पण काही काही इतिहास साधनांच्या अनुसार चक्क आग्रह धरणारी ही बाई ! ह्या असल्या पिसाटपणाला , भंजाळलेपणालाच मोह , भ्रमिष्टासारखे वागणे म्हणणार नाही तर काय !
६. मत्सर
आणि सर्वात शेवटचा रिपु म्हणजे मत्सर - ही म्हणजे मोहाच्याही पुढील अवस्था ! तो मोह पुर्ण झाला नाही , तर समोरच्या व्यक्तीकडे जे आहे ते माझ्याकडे नाही हे पाहुन त्या अन्य व्यक्ती विषयी वाटाणारा इर्ष्येचा भाव म्हणजे मत्सर !
पुरुषांमध्ये हा त्यामानाने कमी दिसुन येतो कारण ह्या अवस्थेला जाईपर्यंत पुरुष काही तरी हिंसक कृती करुन रिकामा झालेला असतो. पण स्त्रीयां मध्ये मात्र अगदी तीव्र स्तराचा मत्सर प्रकर्षाने दिसुन येतो. ह्या संबंधी आवर्जुन स्मरणारा एक विनोदी प्रसंग म्हणजे - अगं बाई अरेच्च्या ह्या चित्रपटात नायकाला जेव्हा स्त्रीयांच्या मनातील ऐकु येऊ लागते तेव्हा त्याला काही बायका वटसावित्री निमित्त वडाची प्रदक्षिणा घालत असतात तेव्हा एका स्त्रीच्या मनात विचार चाललेला अस्सतो - "ह्या सुर्या बरोबर लग्न होण्या ऐवजी विलास बरोबर झालं असतं तर अमेरिकेत राहिले असते आज " =)))) पण विनोदाचा भाग बाजुला ठेवला , आणि सुक्ष्म दृष्टीने निरिक्षण केले तर ह्या प्रकारचा मत्सर तुम्हाला अगदी सहजपणे निदर्शनास येईल !
------------------------------------
हां तर असे हे झाले षड्रिपु ! पण सुरुवातीला आपण काय म्हणालो - कि जो मनात व्याकुळता निर्माण करतो तो रिपु. अर्थात ह्या सहांना बाजुला सारले की मनात व्याकुळताच निर्माण होणार नाही अन आपण आपल्या आत्मतृप्त भावात तल्लीन राहु शकु !
मला काहीही नकोय . बस्स आता. आहे इतकं पुरेसें आहे.
एखादी गोष्ट मिळाली - ठीक . नाही मिळाली ठीक. जशी रामाची इच्छा !
रागे भरावे कवणासी ? आपण ब्रह्म सर्वदेसी | ऐसी सम दृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा !
जेवढं प्रारब्धात आहे , तेवढं मिळालं आहे , मिळत आहे आणि मिळणारच आहे . मग कसला त्रागा करायचा ?
अरे पण हे कसं शक्य आहे सामान्य प्रापंचिक माणासाला ?
काम क्रोधाचे विकार उठतच राहणार आहेत . तुम्ही लाख व्यवस्थित गाडी चालवाल , पण कोणततरी कधी तरी येऊन तुम्हाला धडकणारच आहे , शिव्या धालणारच आहे, आर.टी.ओ ला चिरिमिरी द्यावीच लागणार आहे , क्रोधाचा विकार उठणारच आहे .
किंवा ऑफिसात किंवा अन्यत्र सोशल सेट अप मध्ये गेल्यावर चित्रांगदा सारखी कोणीतरी स्वर्गीय सुंदर दिसणारच आहे जिला पाहुन - आह, मला ही हवीय असे वाटणारच आहे . लोभ मद ही येणार आहेत काम क्रोधाच्या मागे ! एक घर असुन दुसरं घर घ्यावं वाटणार आहे . स्वतःची उत्तम गाडी असुनही फॉर्च्युनर , इन्डेव्हर , हिलक्स, टेस्ला वगैरे अजुन गाडी घ्यावीशी वाटणार आहे.
आणि आजवर ज्या अचिव्हमेंट केल्या त्याचे स्मरण करुन "मी म्हणजे लय ग्रेट ! " असा विचार कधी ना मनात येणार आहेच ! मोह मत्सराचे आवेग उठणारच आहेत . मग आता काय करता ?
ह्याला माऊलींनी काय सुंदर उत्तर दिले आहे -
तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी ।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
तु मनात एक नियम कर , तुझ्या ह्या षड्रिपुमुक्त स्वरुपाशी निश्चळ हो , आणि मग ही कर्मेंद्रिये सांसारिक व्यापारात सुखाने गुंतुन राहुदेत , आपला त्याच्याशी संबंध नाही ही मनाशी ठाम धारणा असली म्हणजे झाले , सुटलो.
देह आहे तोवर देहाचे विकार राहणारच , भुक लागणार , तहान लागणार , मल मुत्र शौच विसर्जनादि करावेच लागणार तसेच , कामाचा आवेगही उद्भवणार , इंद्रिये अक्षरशः फरफटत ओढुन नेल्यासारखी मनाला त्या विषयांच्या मागे ओढणारच आहेत . पण ठीक आहे ना , तुला काय फरक पडतो . तू निश्चळ रहा , मग बाकी देहातर्फे काय व्हायचे ते होऊ दे.
देह वैराग्यासारखा अलिप्त राहिला तर ठीक .
देह सामान्य गृहस्थ मर्यादिक उपभोगात रत राहिला तरी ठीक.
आणि देह झपाटल्यासारखे देहोपभोग घेत राहिला तरीही ठीकच .
शुन्य , एक आणि अनेक ह्या तिन्हींना वृत्तीरुपाने पाहिल्यास तिन्हीही समान आहेत !
योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गवीहिनः ।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ॥
आता शेवटचा प्रश्न म्हणजे की हे ब्रह्मणि रमते चित्तं ही अवस्था कशी कायम ठवणार ? कारण ब्रह्म मुळातच अनुभवातीत , आकलनातीत , incomprehensible आहे , only "be" able आहे , त्याचे स्मरण कसे ठेवणार !
आणि ह्या इथे ज्ञानेश्वरमाऊली , नामदेव , एकनाथ , तुकोबा , समर्थ , गोंदवलेकर महाराज, नीमकरोली बाबा आदी सर्वच जण गालातल्या गालात हसुन उत्तर देतील - अरे उपाय आधीच सांगितला आहे - "नामस्मरण".
|| श्रीराम जयराम जयजय राम ||
|| राम कृष्ण हरि ||
|| अलख निरंजन ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ||
|| जगदंब जगदंब ||
कुठलंही नाव घ्या , काही हरकत नाही , बस स्मरण राहणे हे महत्वाचे !
नीमकरोली बाबांच्या डायरीतील एक पान :
आता माळाच ओढल्या पाहिजेत अशातला भाग नाही, बस स्मरण राहिलं पाहिजे. तुम्हाला एकदा नाम घेऊन स्मरण टिकत असेल तर उत्तम , स्मरण नसेल टिकत तर करा माळा . शेवटी महत्वाचं काय तर स्मरण !
न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥
एकदा का रामाच्या रुपाचे स्मरण राहिले कि तीच सहजावस्था होऊन जाते ! त्यानंतर मग तुम्ही कोण्हीही असा, काहीही करा , कामक्रोधाधिकांचे विकार उमटो अथवा शांत राहो, काही फरक पडत नाही .
कामापासूनि सुटला । क्रोधापासूनि पळाला ।
मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५॥
अविद्येपासूनि फडकला । प्रपञ्चापासूनि निष्टला ।
लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥
भेदाचा मडगा मोडिला । अहंकार झोडूनि पाडिला ।
पाईं धरूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९॥
मोहासि मध्येंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें ।
शोकासि खंडून सांडिलें । एकीकडे ॥ ४५॥
द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचे ॥ ४६॥
असो. ज्याला समजायचं त्याला समजलं आहे !
देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें ।
जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥
इत्यलम्
______________________________________
राम
प्रतिक्रिया
10 Aug 2025 - 9:15 pm | गामा पैलवान
प्रगो,
जबराट चिंतन आहे. ऐसेचि लिहिते राहो.
मला वाटतं की मत्सर सर्वात छुपा म्हणूनंच सर्वात प्रबळ शत्रू आहे. कामापासनं सगळ्यांची सुरुवात जरी होत असली तरी तरी लक्ष्य ( फोकस ) मीच असतो. पण मत्सराच्या बाबतीत फोकस माझ्यावरून उडून इतरांवर जातो. तोही नकळत. लै ड्यांजर भौ !
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2025 - 5:40 am | कर्नलतपस्वी
धन्यवाद.
11 Aug 2025 - 6:21 am | चित्रगुप्त
उत्तम लेख आहे. षड्रिपुंपासून मुक्ती, म्हणजे एकाअर्थी सर्व सिद्धी मिळवणे. त्यासाठी सदा 'प्रसन्न' असणे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" तर मन सदा प्रसन्न ठेवण्याचा प्रत्यक्ष-प्रायोगिक-व्यवहार्य उपाय सांगणारे ( - ज्यांना 'नामस्मरण' पटत/जमत/आवडत/शक्य नसेल, आणि मानसशास्त्रात रुची असेल, त्यांचासाठी-) एक अत्यंत उपयोगी पुस्तक हे आहे:
अॅमेझॉनवर सुमारे ३८० रुपयात उपलब्ध आहे. अवश्य वाचा.
11 Aug 2025 - 8:49 am | युयुत्सु
"आता बास. पुरेसे आहे इतके" अशा विचार करणारी माणसेच दुर्मिळ ! बाकी झपाटल्यासारखी धावत आहेत, ह्याला मोह नाही तर दुसरं काय म्हणणार !!
"आता बास. पुरेसे आहे इतके" हा विचार मी वयाच्या ~२५ वर्षापूर्वी स्वीकारला तेव्हा मला समाजाने खूप मनःस्ताप दिला (तसा तो या ना त्या स्वरूपात अजुन ही चालू असतो). शेपूट तुटलेल्या कोल्ह्यांना शेपूट असलेल्या कोल्ह्यांचा राग येतो. त्यांना सर्वांनीच शेपूट तोडून टाकावे असे वाटते. ज्यांना थांबता येत नाही, त्यांना "आता बास. पुरेसे आहे इतके" असा विचार करणार्यांचा राग येतो.
11 Aug 2025 - 2:17 pm | चित्रगुप्त
हेही बघून घ्या
दुवा:
https://youtu.be/e9dZQelULDk?si=HqTBM-qU6s1zlXWl
'Happiness" (4.16 min).... 54M views.
by - Steve Cutts. 1.97M subscribers (15 videos)
11 Aug 2025 - 5:29 pm | प्रसाद गोडबोले
नका आठवण करून देऊ काका.
हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा मी न्यू यॉर्क मध्ये होतो.
माझा अक्षरश: दिनक्रम होता हा !
इथं भारतात किमान मी जे लिहितोय ते मला तरी शक्य आहे अशी आशा आहे. अमेरिकेत शक्यच नाही ह्या rat race मधून बाहेर पडणे.
तिथं षड्रिपुंचे जाळे इतके स्ट्राँग आहे की त्यातून बाहेर पडणे निव्वळ अशक्य आहे. आणि त्यात जे अडकले आहेत ते "हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग" आहे हे स्वतःचेच स्वतःला समजून सांगत आहेत.
Consumerism can never lead to a content life.
Most of the luxuries, and many of the so called comforts of life, are not only indispensable, but positive hinderances to the elevation of mankind. With respect to luxuries and comforts, the wisest have ever lived a more simple and meagre life than the poor.
-
Henry David Thoreau
12 Aug 2025 - 10:49 am | Bhakti
प्रगो चांगलं विवेचन केले आहे.
पण सर्वच रिपुंमध्ये स्त्रीयांना खुपच स्वार्थी वर्णन केल्या सारखं वाटतं.तुम्ही वर्णन केलेल्या स्त्रीया १८००-१९०० मध्ये सापडत असतील.आताची स्त्री एकमेकींना ,घराला,सर्वांना सांभाळणारी आहे.अशा स्त्रिया आता मला दिसत नाही.
आणि मला तुमचे दुसऱ्या धाग्यावरचे मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं हे विचार अजिबात नाही आवडले.
मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही.
अहो तुमच्यासारख्या हुशार लोकांनी बदलत्या काळानुसार बदल मान्य केले पाहिजे.(माफ करा मला खूप खेद वाटलं वाचून)
ज्ञान,कर्म,भक्ति,योग हे मार्ग सर्वांसाठी खुले आहेत,यात स्त्री पुरुष दोघेही आचरण करून शांती घेऊ शकतात.
12 Aug 2025 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले
ठीक आहे भक्ती. सर्वच विचार पटले पाहिजेत असा माझा अट्टाहास नाही.
कदाचित तुम्ही तुमच्या कोशात आहात म्हणून असे असावे.
अनेक पराकोटीच्या स्वार्थी स्त्रिया मला माहिती आहेत.
उदाहरणे लिहित बसलो तर विषयांतर होईल. तरीही एक उदाहरण लिहितो जे अत्यंत जवळच्या मित्रासोबत झाले आहे , होत आहे - त्याच्या पत्नीने डिव्होर्स साठी अर्ज केला, 6-8 लाख रुपये "सेटलमेंट" म्हणून मागितले , तेही द्यायला तो तयार झाला तेव्हा अचानक कोर्टात फिरली अन् म्हणाली की मी मानसिक दृष्ट्या तयार नाहीये. मी मित्राला विचारलं की बाबारे, पण तू कशाला डिव्होर्स वगैरे भानगडीत पडतो, तो म्हणाला - तीने लग्नाआधी तिच्या प्रियकरासाठी कर्ज काढले होते , लग्नानंतर देखील ती त्याचे हप्ते भरत आहे. मी म्हणाली बरं ठीक आहे पण किमान मुलाच्या कस्टडी साठी तरी प्रयत्न कर , आपल्या संस्कृतीनुसार मुलं ही पूर्णपणे बापाची असतात. बापाचाच अधिकार असतो. त्यावर तो काही बोलला नाही. ( आता तुम्हाला समजायचं ते तुम्ही समजून घ्या.)
आणि ही एक गोष्ट नाहीये अशी किमान अजून 3 -4 उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. जास्त लिहू शकत नाही कारण ह्या अत्यंत खाजगी गोष्टी असतात, बोलून पुरुषांचीच बदनामी होते आणि बायका ह्याचाच गैरफायदा उचलतात.
बाकी दुसऱ्या धाग्यावरील चर्चा तिथे केल्यास उत्तम. इथे विषयांतर होणार नाही.
मी उदासीन अवस्थेत रहात असल्याने हे सगळं फार "वरून" पहात असतो.
18 व्या वर्षी मातृत्व हा विचार तुम्हाला सहन होत नाही ह्या बद्दल खंत वाटते. 18व्या वर्षी मातृत्व हे निसर्गाचे डिझाइन आहे, निसर्गाची तशी इच्छा नसती तर मुली 24 व्या वयात आल्या असत्या , 14व्या नाही.
आणि जग फार बदललं आहे ताई. बाहेर अशा अशा घटना घडत आहेत की तुमचा विश्वास बसणार नाही.
माझे घर एका शाळेजवळ आहे. मी घरी जात असताना मला 2 मुली दिसल्या , युनिफॉर्म वरून 8वी 9वी मधील असाव्यात असा अंदाज बांधला मी. एकदम गालातल्या गालात हसत लाजत बघत होत्या. मी चकित होऊन विचार केला हे काहीतरी भलतं चालू आहे म्हणून मी इकडं तिकडे पाहिलं तर , माझ्या मागून 2 छपरी पोरं, मिसरूड देखील न फुटलेली , एक्टिवा वर आली, पोरी पटकन त्यांच्या मागे बसल्या, अन् माझ्या कडे पाहून हसत हसत सुसाट निघून गेले. मी आवाक होऊन पाहत राहिलो .
हे असं जग बदललेले आहे. 18 व्या वर्षी असं casual sexploration करण्यापेक्षा रीतसर लग्न करून गृहस्थाश्रम करणे हे कधीही उत्तम असे माझे स्पष्ट मत आहे.
अर्थात जे असे sexploration करत आहेत त्यांना माझा मुळीच विरोध नाही. समाजात अशा मुलींची गरज आहेच . ;)
बाकी बरेच आहे बोलण्यासारखे. बोलू एकेक करून.
12 Aug 2025 - 6:44 pm | Bhakti
आधी होते कोशात,बायकांनी असंच वागायचं, असं नाही,ढिमकं फलानं आता तर कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू आहे तेही खुप सुंदर, खुप मोठं ;) ;)
वाईट उदाहरणे मलाही माहिती आहे पण दुरुक्ती कशाला करायची.सगळीकडे स्त्रिया वगैरे कशाला सरसकटीकरण कशाला??असो.
छान , नेहमीप्रमाणे अद्भुत लिहा!
12 Aug 2025 - 8:36 pm | प्रसाद गोडबोले
सरसकटीकरण
ह्या लेखाच्या संदर्भाने , षड् रिपु आणि त्यांच्या स्त्री आणि पुरुषांमधील भिन्न भिन्न अभिव्यक्ती मधून प्रकट होणे हे मी माझ्या निरीक्षणावरून मांडलेले आहे. मी ह्याला जनरलायझेशन न म्हणता on an average असे म्हणेन.
आणि हो मला फुलपाखरे मनापासून आवडतात. आमची अवस्था "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नहाने" अशीच आहे ;)
त्यामुळे माझा फुलपाखरांना विरोध नाहीच.
( असो. जाऊ दे, जास्त लिहू शकत नाही. )
13 Aug 2025 - 3:48 pm | स्वधर्म
>> मुलींचं आठव्या वर्षी लग्न ,१४ का १८ वर्षी बाळंतपण,४ मुलं हे विचार अजिबात नाही आवडले.
मी एका मुलीची आई आहे.१८ व्या वर्षी मातृत्व हा विचार अजिबात अजिबात सहन करू शकत नाही.
वरील प्रतिसादात तुंम्ही स्त्रियांची बाजू अगदी नेमकेपणाने मांडली आहे. सनातनींना अर्थातच स्त्र्यियांना देवी मानून, मखरात बसवून त्यांचे संरक्षण करायचे असते. असं वागवलेलं सनातनी स्त्र्यियांना आवडतं व त्यांना त्याचा गौरवही वाटत असतो. परंतु तुंम्ही इथे त्यांच्या लग्नाच्या बाबतीतल्या स्वयंनिर्णयाबद्द्ल जरी थेट बोलला नसला तरी स्त्रिया आता बदलल्या आहेत व लवकर लग्न करणे, मातृत्व वगैरे आपणांस सहन होत नाही असे म्हटले आहे.
सनातनी पुरुष मुलींकडे एक संपत्ती, जिच्यातून लवकरात लवकर सुटायचे आहे अशी जोखीम म्हणून पाहतात हे धाग्यातील विचारांमधून स्पष्टच आहे. मुलीला जगात स्वतः चं स्थान निर्माण करणं व त्यासाठी तिला लग्नाच्या आधी हवा तेवढा वेळ देणं हे सनातनी विचारात बसत नाही.
टिळकांचाही मुलींचे संमतीवय ९ वरून १३ करायला विरोध होता. तसेच त्यांनी 'कुणब्यांना व स्त्रियांना राष्ट्रीय सभेत पाठवून तिथे काय नांगर चालवायचा आहे का पोळ्या लाटायच्या आहेत?' असे उद्गार काढले होते हे आपणांस माहितच असेल.
बाकी तुंम्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते.
13 Aug 2025 - 3:58 pm | अभ्या..
म्ही टिळकांच्या गीतारहस्याबद्दल लिहीत आहात, त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आहात, पण तुमचे भान जागृत आहे. स्त्रियांना हे भान शिक्षणामुळे आले, जे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केल्याने आले. त्यांच्याबद्दल स्त्रियांनी लिहावे असे वाटते.
परफेक्ट..
म्हणून तर सनातन्यांचा महात्मा फुल्यांना विरोध.
त्यांनी वृत्तीचा उल्लेख केला की सन्यातन्यांनी जातीवर घ्यायचे आणि त्यांच्यामुळे मिळालेले फायदे चोखत वरुन जातीयवादी म्हणत झोडपायचे हे वारंवार दिसत आले आहे.
13 Aug 2025 - 4:23 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद स्वधर्म !
तुमच्याकडून टीका करणारा प्रतिसाद दिसला की मला शाब्बासकी मिळाल्याचा आनंद होतो !
No sarcasm intended. खरंच धन्यवाद !
13 Aug 2025 - 4:39 pm | स्वधर्म
मी धाग्यात काय लिहिलंय ते बघतो, तुंम्ही 'कुणी' लिहिलंय ते बघता. माझा फोकस मुद्द्यावर असतो.
तुम्ही शक्यतो व्यक्तींवर रोख ठेवता, त्यांना गटात टाकता, त्यांना काय काय म्हणत असता.
तुम्ही लिहिलेलं कुणाला समजलं नाही म्हटलं की तुंम्हाला ग्रेट वाटतं, म्हणून तुंम्ही मग त्यांची प्रशंसा सुरू करता. मी लिहिलेलं कुणाला समजलं नाही तर मला तो गौरव न वाटता उणीव वाटते.
फर्क साफ है| असो.
13 Aug 2025 - 5:06 pm | प्रसाद गोडबोले
फर्क साफ है|
>>>
अगदी अगदी. म्हणूनच तर म्हणालो की मला तुमचा प्रतिसाद शाब्बासकी वाटतो !
अवांतर:
बाकी ह्या लेखनात संमती वय हा मुद्दाच नव्हतो. ते भक्तीताईंनी केलेलं विषयांतर होते. तो मूळ धागा युयुत्सु ह्यांचा असून अन् त्यावरील माझा प्रतिसाद ह्या इथे आहे -
http://misalpav.com/comment/1196962#comment-1196962
13 Aug 2025 - 6:14 pm | Bhakti
होय होय आत्मभान जागृत झाली आहे.आणि अक्षरशः सनातनी पुरुषांची मानसिकताही पाहिली,अनुभवली आहे.मला एकच मुलगी म्हणून सनातनींनी एकटी मुलगी हट्टी होईल वगैरे म्हणून अजून अपत्य पाहिजे अस टोमण्याने सांगायचा प्रयत्न केला ,अरे तुम्ही सांभाळायला येणार का नंतर (असं मनातच हसून म्हटलं)(प्रगोने तिकडे ४ अपत्य पाहिजे असं लिहिलंय ..हे राम ;))
नोकरी सोड इ.अजून खुप किस्से आहेत ;)But I am daughter of strong mother!!! नाही बधणार या भुलभुलैय्याला!
खरंय अशा पुरूषांनी बायकांनी कर्मकांडातच गुरफटून राहायला पाहिजे,ती त्यातच गेली तर फरक पडणार नाही तिला 'देवी' करतील.
आता टिळकांनी बद्दल, भारतीय अध्यात्माचा अभ्यास हा मला लहानपणापासून करायचा होता.गीतारहस्यापर्यंत शुद्ध बुद्धीने पोहचायला प्रगोमुळेच जमलं.अध्यात्मात रूची असल्याने त्याचे लेख आवडायचे.एका ठिकाणी त्याने नमूद केले होते,"गीतारहस्य" वाचले पाहिजे. जानेवारी वाचायला सुरुवात केली,अहाहा! 'फिटे अंधाराचे जाळे,झाले मोकळे आकाश!" अशी अवस्था झाली.सारे सारे प्रश्न मिटले.
मग टिळकांविषयी उत्सुकता जागृत झाली.भारतभूमी धन्य झाली आहे अशा महान रत्नामुळे!!दोन मासिकं त्यांच्या कार्याविषयी घेतली आहेत.त्यांच्यावरचा 'होमरूलचा' लेख तुम्ही वाचला असेलच.
आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते.माझी तर लायकीच नाही अशा नेत्यांबद्दल असं काही लिहायची.
महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे.
त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले.
संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत.
एकंदरीत मला ठोकळ्यासारखे /पूर्वग्रहदूषित विचार कधीच करता येत नाही.
13 Aug 2025 - 6:31 pm | अभ्या..
महात्मा फुले यांचेही चरित्र मी खूप अभ्यासपूर्ण समजून घेतले आहे.
त्यांना दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी केला तेव्हा त्यांनी सावित्रीलाही दुसरा नवरा आणा अशाप्रकारे १२०-१३० वर्विषांपूर्वी विरोध दर्शविला होता,हे वाचून अक्षरश: नतमस्तक झाले.
संविधान लिहिणारे आंबेडकर माझ्या लेकीचे आवडते आहेत.अ.हं सांळुंखे वाचायचे आहेत.
वाहवा....
आणि हे मनापासून आहे.
वाचलेच पाहिजे. वाचले, समजून घेतले/नाही समजले आणि आवडले/न आवडले हे टप्पे पाहिजेतच.
संविधान लिहिणार्या आंबेडकरांना हेच तर अपेक्षित होते. छोट्या मुलीलाही शुभेच्छा
13 Aug 2025 - 6:38 pm | स्वधर्म
>> आता टिळकांचे स्त्रियांविषयी जे मतं तुम्ही लिहिलेत,किंवा इतर जण लिहितात.अशा पद्धतीने एकाच बाजू मुद्दामहून सांगायची,यात आपली बुद्धी शुद्ध नाही हे खेदाने म्हणते.
ठीक आहे, त्यांनी स्त्रियांविषयी आणखी काय लिहिलंय ते तुंम्ही दुसरी बाजू म्हणून सांगा. समजून घ्यायचा प्रयत्न राहील. पण ठोक स्वरुपात कोणतीही व्यक्ती पूज्य किंवा तिरस्करणीय नसते असे मत आहे. त्यामुळे टिळकांच्या इंग्रजांविरूध्द केलेल्या असंतोषाच्या कार्याचा आदर आहे. महात्मा फुले यांनी त्यांना देशद्रोहाचा खटला लढण्यासाठी १० हजार रुपयांची मदत केली होती. महात्मा फुले जेंव्हा गेले, तेंव्हा केसरीने त्यांची बातमी मात्र छापली नाही. कितीही अध्यात्मावर पकड असली तरी मनाचा उमदेपणा नाही. तोच प्रकार वेदोक्त प्रकरणात, पंचहौद प्रकरणात. टिळकांच्या बाबत या सगळ्या बाजूसुध्दा माहित असल्याने, तसा भक्तीरस पाझरू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व.
बाकी प्रगो अनेकदा अभिमानाने स्वतःला सनातनी म्हणवून घेतात. तुंम्हाला सनातनी पुरूषांची चीड आहे असे तुंम्ही लिहिता.
बुध्दी मात्र आमची शुध्द नाही म्हणता. त्याचा आदर करून थांबतो.
13 Aug 2025 - 7:03 pm | प्रसाद गोडबोले
आता एवढे विषयांतर झाले आहे त्यात अजून थोडी भर म्हणून ही विनंती करतो की
वेदोक्त प्रकरण, पंचहौद प्रकरण ह्या दोन्ही विषयांवर आपण दोन स्वतंत्र , छोटेखानी का होईना लेख लिहावेत. मला उत्सुकता आहे तुमचे ह्या प्रकरणाचे आकलन आणि अभ्यास समजून घेण्याची . कारण माझ्या अल्पशा अभ्यासानुसार ह्या दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते.
आणि
तिसरा स्वतंत्र लेख ताई महाराज बलात्कार प्रकरण ह्यावर लिहिल्यास मी आपल्या धाडसाचे कौतुक करेन. कारण टिळकांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्यावर बलात्कार सारखा नीच आरोप करणाऱ्या स्त्रीला कोणाचे पाठबळ होते हे देखील समाजापुढे येणे तितकेच गरजेचे आहे .
13 Aug 2025 - 10:02 pm | स्वधर्म
>> दोन्हीही बाबतीत टिळकांची काडीमात्र चूक नव्हती. त्यांनी घेतलेले निर्णय हे माझ्या लेखी एकदम परफेक्ट च होते.
हे आधीच ठरलेले आहे, त्यामुळे काहीही लिहिले तरी फरक पडणार नाही हे स्वयंस्पष्ट आहे.
त्यामुळे आपली विनंती मान्य करू शकणार नाही. कारण मत आधीच ठरवले गेलेले असेल तर चर्चेत कितीही मुद्दे आले तरी त्याचा उपयोग नसतो.
उदा. वरती भक्ती यांनी स्वतः च सनातनी पुरुषांची मानसिकता अनुभवून त्यांना भान आले आहे, त्यांनी बंडही केले आहे असे लिहिले. पण तशीच मानसिकता टिळक यांची दाखवून दिली, तर माझी बुध्दी अशुध्द असे म्हटले. हे माझ्यासाठी अतिशय खेदकारक व अनाकलनीय आहे. जर माझी माहिती खोटी दाखवून दिली असती, तर मी माझे मत नक्कीच दुरूस्त केले असते. शिवाय टिळक त्यांच्या काही प्रतिगामी मतांमुळे लहान ठरत नाहीत की त्यांचे योगदान कमी होत नाही. तेवढी परिपक्वता मला अपेक्षित होती. पण आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते. दे जस्ट शूट द मेसेंजर, मग सत्य किंवा वस्तुस्थिती काहीही असो.
माझी या चर्चेतून निवृत्ती _/\_
13 Aug 2025 - 10:57 pm | प्रसाद गोडबोले
Ok.
14 Aug 2025 - 9:46 am | सुबोध खरे
आपल्या समाजात लोक सर्रास दैवतीकरण करतात व दैवताला धक्का बसला तर पचवण्याची क्षमता फार कमी लोकात दिसून येते.
बाडीस
अशी स्थिती लोकमान्य टिळकांबदलच नव्हे तर सुभाष बोस, भागात सिंह, गांधीजी पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांबद्दल दिसून येते.
यामुळे कोणत्याही नेत्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे अशक्य होऊन बसलेले आहे.
20 Aug 2025 - 4:56 pm | अप्पा जोगळेकर
https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shetkaryacha_asud_fule.pdf
- हे पुस्तक प्रताधिकार मुक्त आहे. आपापल्या कुवतीनुसार योग्य अयोग्य ठरवावे.
13 Aug 2025 - 9:58 pm | कॉमी
+१
13 Aug 2025 - 4:30 pm | प्रसाद गोडबोले
"भक्ती ताई, आपने युयुत्सु के धागे का TRP चुराया है. "
=))))
13 Aug 2025 - 5:40 pm | Bhakti
सेम पिंच,आणि तुझ्या या धाग्याने माझ्या गीतारहस्य धाग्याची जाहिरात केली आहे :) वाह =))))
धागा धागा खेळायला आवडतं नाही.आपण काय रोबोट आहोत का? एका धाग्यापुरते स्वीट ऑन/ ऑफ व्हायला.
समग्र आक्षेप/कौतुक आवडतं.मला असंच आवडतं.
सॉरी युयुत्स काका ;) ;)
12 Aug 2025 - 7:57 pm | कर्नलतपस्वी
छळताना कोणालाच सोडत नाहीत.
वाईट चांगले सगळीकडेच, भेदाभेद करणे वादाचा विषय होऊ शकतो. बाकी काळानुसार जगरहाटी बदलणार.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा॥
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥
13 Aug 2025 - 12:16 am | राजेंद्र मेहेंदळे
थोडा कळला, थोडा डोक्यावरुन गेला. पण नेहमीच "अरे हा तर माझ्याही पुढे गेलाय" असे अनुभव येत असल्याने फार मनाला लावुन घेतले नाही. कुठेतरी थांबायला हवे हे मात्र खरे. नाहीतर ती सुर्यास्तापर्यंत जमिनीसाठी धावणार्या माणसा सारखी अवस्था व्हायची.
नीमकरोली बाबांच्या डायरीतील पान आवडले. जाताजाता--एकदा त्यांचा एक भक्त त्यांना भेटायला आला. त्याच्याकडे आर्सेनिक या विषाची बाटली होती. बाबांनी त्याला विचारले की काय आणले आहे? त्याने बाटली दाखवली. त्यावर बाबांनी त्यातील मूठभर तोंडात टाकले. सगळे लोक घाबरुन रडु लागले की हे आता मरणार. त्यावर बाबांनी एक ग्लासभर पाणी प्यायले आणि म्हणाले काही होत नाही. बोलो राम राम. पुढे ते वाचले.
13 Aug 2025 - 5:11 pm | विजुभाऊ
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपु जिवंत मानवाला आवश्यक आहेत.
काम नसेल तर मानवाचे पुनरुत्पादन कसे होणार ( ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे)
क्रोध हा गुण नसेल तर निर्णय क्षमता हरवून बसते.
वैयक्तिक मोह ( फलाची अपेक्षा) नसेल तर प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
मत्सर ( ईर्ष्या ) नसेल तर उत्तमतेचा ध्यास सम्पून जाईल.
मद नसेल तर लीडरशीपच रहाणार नाही. त्यामुळे अनागोंदी होईल.
त्यामुळे हे षडरिपु अगदी आवश्यक आहेत. निदान सांसारीक मानवासाठी.
अर्थात त्यांचा अतिरेक वाईटच. तसा पाणी पिण्याचा अतिरेकही वाईट जीवघेणा ठरू शकतो
13 Aug 2025 - 5:26 pm | युयुत्सु
मी पण हेच लिहीणार होतो. पण टंकायचा कंटाळा आला. या भावनांवर मेंदूतील उपाग्रखण्डाचे नियंत्रण असते. तो विकसि त नसेल तर प्रश्न निर्माण होतात. उपाग्रखण्डाचा विकास ताण, आहार, ध्यान, कौशल्य विकास इ० वर अवलंबून असतो. ताणाचा उपाग्रखण्डावर घातक परिणाम होतो आणि भावनिक नियंत्रण अवघड बनते.
13 Aug 2025 - 5:38 pm | प्रसाद गोडबोले
+१
हे अगदी बरोबर आहेच . संसाराचा निषेध कोणत्याही सनातनी साहित्यात मला तरी आढळलेला नाही आजवरच्या वाचनात. अर्जुनाला 4 पत्नी होत्या, कृष्णाला किमान 8. क्रोधाच्या आवेशात कृष्णाने भीष्म पितामहांच्यावर चक्र उगारल्याच्या प्रसंग सुप्रसिद्ध आहेच. आणि लोभाच्या बाबतीत बोलायचे झाले तर खांडव वन दहन प्रकरणात दोघांनी मिळून नागांचा संहार केलेला स्पष्ट दिसून येतो तोही इंद्रप्रस्थ आणि त्या जमिनी करिता!
कृष्णार्जुनाची उदाहरणे दिली कारण ती पटकन सुचली म्हणून , एरव्ही जवळपास सर्वच सनातनी हिंदू साहित्यातील राजांची उदाहरणे थोड्याफार फरकाने देता येतील.
शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्।
वार्धके मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।” (रघुवंशम्–1.6)
आणि इथेच खरे गमक आहे. संसार, प्रपंच कोठवर करत रहायचे ? ह्या सहा रिपूंच्या चक्रात किती आणि कसे खेळत रहायचे ह्याची नियम रीतसर घालून दिलेले आहेत ज्याला वर्णाश्रम व्यवस्था म्हणाले आहे. These people have made frameworks for everything.
सुचत जाईल तसे लिहित जाईन .
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
14 Aug 2025 - 4:14 pm | सोत्रि
सांसारिक मानव षडरिपुनी ग्रासलेला असतो. पण ते अगदी आवश्यक नाहीत, सांसारीक मानवासाठीसुद्धा आणि मुमुक्षुसाठीही.
संसारात (जन्मृत्युच्या जंजाळात) अडकून राहण्यासाठी पुनरुत्पादन कारणीभूत आहे, पर्यायाने काम, त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी काम ह्या रिपूवर विजय मिळवावा लागेल.
(तसंही, फक्त वंश पुढे चालवायचा म्हणून एका अपत्याला जन्माला घालून थांबल पाहिजे, तसं न होता आमोदासाठी कामाच्या आहारी जाण होत)
बरोबर उलट आहे, क्रोधामुळे निर्णय क्षमता हरवून बसते, क्रोधाच्या भरात घेतलेले निर्णय रियॅक्शन असते रिस्पॉन्स नसतो.
वैयक्तिक मोह स्वार्थाला जन्म देतो त्यामुळे योग्य आणि यथार्थ प्रयत्न करणे सोडून दिले जाते.
मत्सर ( ईर्ष्या) ह्यामुळे घेतलेला ध्यास उत्तमतेचा ध्यास नसतो, दुसऱ्याच्या आनंदाकडे किंवा क्षमतेकडे बघून येणाऱ्या नकारात्मकतेने घेतलेला ध्यास असतो.
मदमस्त लीडरशीपमुळे अनागोंदी होईल. (उदा. विजय माल्या).
- (मुमुक्षू) सोकाजी
13 Aug 2025 - 8:43 pm | चित्रगुप्त
वाचतो आहे.
13 Aug 2025 - 10:14 pm | कॉमी
लेखातले स्त्रियांविषयक विचार निव्वळ TRP साठी लिहिलेले वाटले. उगी ओढून ताणून. तसा फारसा लेखाच्या मूळ विषयाशी संबंध नाही. आता स्त्रीला कामेच्छा जास्त का पुरुषाला ह्यावर परिच्छेद पाडण्याचे प्रयोजन समजले नाही.
त्यामुळे इंटरनेट वर ज्याला रेजबेट म्हणतात तसले लिखाण वाटले. एक उदाहरण बघू-
ह्या असो नंतर वरचा स्त्री का पुरुष जास्त कोण कामुक हा थ्रेड पूर्णपणे फेकून दिला आहे आणि मूळ टायटल वाला रिपू खाली काही वाक्यात संपवला.
बरेचसे विचार हास्यास्पद आहेत. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त कामुक असतात हे उदाहरण म्हणून घ्या.
13 Aug 2025 - 10:55 pm | विंजिनेर
काय रे गोडबोल्या, स्त्री-पुरूषांच्या कामेच्छांची मोजणी करायला तू काय तिथे कंदील पकडून उभा होतास की काय?
झालंच तर मत्सर - दोन-चार सासु-सुनेचे पिक्चर पाहून आणि चार दिवस न्युयॉर्क मध्ये राहुन हिरवा माज दाखवला की "मत्सराची भावना पुरूषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी असते" अश्या पिंका टाकायला मोकळा झालास वाट्टं?
तीच गोष्ट लोभाची - तूला तुझ्या आयुष्यात असलेल्या (किंवा येतील अशी लोभी आशा असलेल्या) स्त्रियांची हवी ती हौस-मौज पुरवता पुरवता जेरीस आल्यानंतर इथे येऊन त्यांच्या नावाने खडे फोडतोस होय? शिवाय मत्सराचा संबंध कामुक समाधानाशी जोडतोयस - तुझं बोळा तुंबलेला दिसतोय - चिल मार, अंमळ
प्रतिसाद आणि ट्यर्र्पीसाठी उगाच प्रक्षोभक आचरट लेख पाडायचा अन् काय. उगीच मिपावर लेख लिहून आपण योगी महर्षि असल्याचा आव आणू नकोस.
13 Aug 2025 - 10:59 pm | प्रसाद गोडबोले
@ संपादक मंडळ
ह्या अशा प्रतिसादावर कारवाई होणार का ?
13 Aug 2025 - 11:09 pm | विंजिनेर
कारवाई करण्यासारखं काय आहे बुवा? मूळ लेखातले उतारे प्रतिसादात दिले तर लगेच खूपले की काय?
13 Aug 2025 - 11:21 pm | प्रसाद गोडबोले
धाग्यातील विषयांवर स्वतःची मते मांडायचे सोडुन , वैयक्तिक टिप्पणी , तीही खालच्या थराला जाऊन केलेली आहे स्पष्ट . हे मिसळपावच्या धोरणात बसत नाही.
बाकी संपादक कारवाई करतील योग्य ती.
तुम्ही तुमची संस्कृती दाखवुन दिलीत हे मात्र एक झाले !
२
13 Aug 2025 - 11:44 pm | विंजिनेर
प्रतिसादात वैयक्तिक सोडून इतरांची मतं मांडत नाही मी
लेखाच्या थराला जाऊन टिप्प्णी केली असं म्हणायचंय का?
माझ्या संस्कृती मिपावरच्या सवंग लेखाला शाब्दिक चपराक देऊन ठरण्याइतकी उथळ नाही रे....
14 Aug 2025 - 10:08 am | सुबोध खरे
विंजिनेर साहेब
पेरिले ते उगवते
बोलण्यासारिखे उत्तर येते
मग कर्कश्य बोलावे
काय निमित्य?
वैयक्तिक पातळीवर उतरणे हे सभ्यपणाचे लक्षण नाही.
षड्रिपू नसलेली माणसं एक तर संत असतात किंवा मनोरुग्ण. सामान्य माणूस नव्हे.
आपण या दोन्हीत नाही तेंव्हा हा विषय काथ्याकुटासाठी उत्तम आहे.
प्रगो यांची बरीचशी मते मला सुद्धा पटत नाहीत.
त्यात अध्यात्म जास्त आहे आणि सत्य कमी आहे. त्याचे खंडन सहज करता येईल.
पण त्यासाठी वैयक्तिक पातळीवर उतरणे बरोबर नाही
14 Aug 2025 - 3:49 pm | सोत्रि
डॉक, नक्की ना?
- (युयुत्सूंच्या धाग्यांवरील प्रतिसादात सभ्यपणा शोधणारा ) सोकाजी
14 Aug 2025 - 7:45 pm | सुबोध खरे
माझा असभ्य खालच्या पातळीचा प्रतिसाद ससंदर्भ दाखवून द्या हि नम्र विनंती आहे.
याउलट त्यांनी अनेक वेळेस पातळी सोडून माझ्यावर टीका केली आहे तरी मी संयम च बाळगलेला आहे.
17 Aug 2025 - 8:00 pm | मारवा
लोभ आणि मोह हे एकच आहेत त्यात धर्मशास्त्र लिहिणारे जे कोणी होते त्यांची पुनरुक्ती झालेली आहे असे नेहमी वाटते.
फरक स्पष्ट स्वच्छ काटेकोर नाही.
अर्थात काही फरक त्याने पडत नाही
अजून एक विरोधाभास एकीकडे
धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे असा ही गौरव आहे.
हाच काम रिपु म्हणजे शत्रू पण आहे आणि पुरुषार्थ ही आहे.
एकूण धार्मिक साहित्यात विसंगती आणि पुनरुक्ती अतार्किकता असल्याशिवाय ते धर्मग्रंथ या पदाला प्राप्त होत नाही.
दुसरे टिळक हे अत्यंत सनातनी मागास विचार करणारे होते हे त्यांनी त्यांच्या काळाच्या आसपास जगलेल्या सुधारकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावरून घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते.
त्याहून रोचक.म्हणजे टिळक स्वतः खोत होते खोती संदर्भातील टिळकांची भूमिका तर चक्क स्वार्थी म्हणावी इतकी संकुचित होती.
पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत
असो
अजून एक क्रोध काम यांना एक मोठे उत्क्रांतीमूल्य आहे. अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले.
सदरील काम क्रोध या मानवी नॉर्मल भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय संकुचित आणि नकारात्मक आहे .
स्वधर्म यांनी टिळकांचा दाखवलेला दाखला अचूक आहे .
20 Aug 2025 - 5:14 pm | अप्पा जोगळेकर
अर्थात उत्क्रांती च्या सिद्धांताची जाणिव असण्याची अपेक्षा धर्मशास्त्रकरांकडून करणे म्हणजे खूप झाले.
- उत्क्रांतीवाद हि थिअरी (मराठी शब्द?)आहे, सिद्धांत नाही.
अशा बऱ्याच वेगवेगळ्या थिअरीज आहेत. शेतीचा शोध ८००० वर्षाम्पूर्वी लागला अशीसुद्धा एक थिअरी आहे.
मास्क लावला कि कोविड पासून बचाव होतो अशीसुद्धा एक थिअरी सांगितली गेली होती.
सिद्धांत proven असतो. उदा - पृथ्वी सुर्याभोवती फिरते.
20 Aug 2025 - 7:35 pm | सुबोध खरे
"पण एकदा व्यक्तिपूजा म्हटली की मग भारतीय कुणाला जुमानत नाहीत"
आपल्या कडे नेत्याला सर्वगुणसंपन्न समजण्याची पद्धत आहे यामुळे त्यांच्यात काहीही दोष नाहीत असेच समजले जाते.
यामुळे त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशक्य होऊन जाते.
आणि तसे केल्यास आपल्याकडे अस्मितेची गळवे ठसठस करू लागतात. मामला दंगलीपर्यंत जाऊ शकतो
यातून लोकमान्य टिळक, सुभाषबाबू, भगतसिंह, गांधीजी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून श्रीमती इंदिरा गांधी, श्री नरसिम्ह राव, अटळ श्री बिहारी वाजपेयी डॉ मनमोहन सिंह आणि श्री नरेंद्र मोदी यांचीही सुटका झालेली नाही.
आणि आपली रेष मोठी करण्यासाठी दुसरी रेष लहान आहे दाखवण्यातही अहमहमिका असते.
आपण मिठाई खावी, कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये. - श्री व्यंकटेश माडगूळकर
20 Aug 2025 - 8:43 pm | अभ्या..
हा खरा खरे डॉक्टरांचा प्रतिसाद.
उमदा, अनुभवी, सर्वांगिण आणि लॉजिकल.
आम्हाला हेच डॉक्टर चांगले माहितेत.
.
डॉक्टरसाहेब नका ते बरनॉल आणि इनो वाटप केंद्र चालवू. प्रतिसादातूनही उगा वस्सकन अंगावर आल्यासारखे वाटता. ;)
23 Aug 2025 - 9:52 am | सुबोध खरे
मला असे प्रतिसाद देण्याची अजिबात हौस नाही.
परंतु मिपावर तीन चार व्यक्तिमत्वे अशी आहेत कि ज्यांना कोणत्याही गोष्टीत मोदीद्वेष आणल्याशिवाय जेवण जात नाही. अशा लोकांना केवळ अशीच भाषा समजते.
क्लिंटन हे फार सहनशीलतेने अशा लोकांच्या प्रतिसादाला मुद्देसूद उत्तरे देत असतात. पण हे लोक सुधारण्यातले नाहीत हि काळ्या दगडावरची रेघ आहे.
कारण people will accept what they want to accept.
कालच एक बाई आल्या होत्या ज्यांना पाळीचा त्रास होता. मागच्या डिसेंबर मध्ये आपल्याला कर्करोग होण्याची बरीच शक्यता आहे असे जीव तोडून सांगितले असताना सुद्धा त्या गेले ८ महिने होमिओपॅथीची औषधे घेत होत्या त्याचा काहीही फायदा झाला नाही म्हणून काल परत आल्या.
आता जी शक्यता होती ती वस्तुस्थितीत रूपांतरित झालेली आहे. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. कालही त्यांना परत स्त्रीरोगतज्ञाकडे जायला सांगितले आहे. पुढचे त्यांच्या नशिबावर !
इतके स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगूनही लोक ऐकत नाहीत याची आता सवय झाली आहे.
24 Aug 2025 - 1:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयडी हॅक झाला की काय.. =))
-दिलीप बिरुटे
20 Aug 2025 - 11:10 am | अप्पा जोगळेकर
सुपर.
23 Aug 2025 - 10:01 am | युयुत्सु
आपल्याकडे अस्मितेची गळवे ठसठस करू लागतात.
हे वाक्य अत्यंत आवडले आहे. मनापासून दाद !!!!!!!