नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग...
एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे?
त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला.
आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.
या एकाच पार्श्वभूमीवर मला सध्या माध्यमांवर चालू असलेली आरडाओरड ’समर्थनीय’ वाटते.
मी ७१ चे युद्ध अनुभवले असल्याने (६५ च्या युद्धाच्यावेळेस मी २ वर्षाचा होतो) ते अनुभव जमेस धरून घरातील सर्वांना ट्रेन केले आहे.
पण माझ्यासारखे समाजात किती असतील?
प्रतिक्रिया
9 May 2025 - 11:15 pm | शैलेश लांजेकर
"घरातील सर्वांना ट्रेन केले" म्हणजे नक्की काय काय शिकवले आहे? आणि कसे शिकवले आहे? तुम्हाला सविस्तर प्रतिसाद लिहिता आला तर बघा, खूप बरं होईल.. कारण प्रत्यक्ष अनुभव कोणत्याही बाबतीत एक पाऊल पुढे असतो म्हणतात...
10 May 2025 - 7:54 am | युयुत्सु
अ. घरात किमान १५ दिवस पुरेल इतकी कोरडी शिधा साठवून ठेवा.
ब. ३ दिवस पुरेल एवढे पिण्याचे पाणी व २ बादल्या सामान्य पाणी अग्निशमनासाठी ठेवा. शक्य असल्यास ५ किलोचा फायर एक्स्टिंग्विशर घरी ठेवा (अंदाजे किंमत ₹१८००/-).
क. प्रथमोपचार पेटी पूर्ण व अद्ययावत ठेवा. सर्व औषधे १५ दिवस पुरतील इतकी ठेवा.
ड. १० ते १५ फूट लांबीची व ०.७५ इंच व्यासाची रबरी नळी (जोडणीसह) ठेवा.
इ. वाहनात किमान १०० ते १५० किमी प्रवासासाठी इंधन भरून ठेवा.
फ. बँकेची महत्त्वाची कामे पुढील २ दिवसांत पूर्ण करा आणि १५ दिवस पुरेल एवढी रोख रक्कम जवळ ठेवा (नेट बँकिंग/UPI व बँक व्यवहार विस्कळीत होऊ शकतात).
ग. सर्व ओळखपत्रे हाताशी ठेवा. बाहेर जाताना गळ्यात अडकवून ठेवा. विमा, मालमत्ता कागदपत्रे व्यवस्थित ठेवा.
ह. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी ७ दिवसांच्या बाहेर राहण्याच्या तयारीसाठी छोट्या बॅगा तयार ठेवा.
इ. घराच्या काचांवर क्रॉस आकृतीत पारदर्शक Tixo टेप लावा – एक आडवा व एक उभा, तसेच एक तिरपा क्रॉस. स्फोट झाल्यास काचांचे तुकडे उडून लागण्यापासून बचाव होतो.
ज. काळोखाच्या सूचना आल्यावर खिडक्यांना झाकण्यासाठी तपकिरी कागद व चिकट टेप तयार ठेवा.
झ. प्रथमोपचार, जखमींना वाहून नेणे व अग्निशमन याचा सराव करा.
ञ. कोणतीही हानी झाल्यानंतर घाबरून न जाता शांतता राखा, रस्ते अनावश्यक गर्दीने भरू देऊ नका.
ट. युद्ध सुरु झाल्यावर सायंकाळचे कार्यक्रम, पार्ट्या रद्द करा.
ठ. परिस्थितीविषयी सामान्य संदेश सोशल मीडियावर पाठवून मोबाईल नेटवर्कला भार देऊ नका. सार्वजनिक माहितीतून कोणतीही बातमी पसरवू नका. शुभ सकाळ/फार्सिकल मेसेजेस टाळा. मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा.
ड. पोलीस, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स यांचे क्रमांक जवळ ठेवा.
ढ. घरातील प्रत्येकास सुरक्षित जागा – कॉलम आणि बीम यांचे संगम बिंदू – माहित असाव्यात.
ण. बाल्कनी, जिने व लिफ्ट्स या सर्वात असुरक्षित जागा आहेत.
त. गॅस सिलेंडर राखीव ठेवा. वापरत नसल्यास रेग्युलेटर बंद ठेवा.
थ. प्रत्येकासाठी दोन मास्क ठेवा. स्फोटाजवळ असल्यास, ओलसर करून वापरा.
वरील सूचना व्हॉटसअॅप्वर आल्या होत्या. पण त्या ७१च्या युद्धाची आठवण करून देतात. यातील अनेक सूचना कशा अमलात आणायच्या हे मी घरात समजाऊन सांगितले आहे.
10 May 2025 - 8:05 am | युयुत्सु
यात माझी स्वतःची भर
० राज्याबाहेरचा प्रवास शक्यतो टाळावा
० आपण राहतो त्या भागात हल्ला/घातपात याचा धोका किती याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा. उदा० पुण्यात पाषाण, खडकी, हिंजवडी अशा भागाना पेठांपेक्षा जास्त धोका आहे.
० वैयक्तिक औषधांचा साठा मी ३ महिन्यांसाठी केला आहे
० अग्निशमन यंत्र अमेझॉनवरून ऑर्डर केले आहे.
10 May 2025 - 10:43 am | Bhakti
मला तर उद्या खडकीला जायचं आहे,जाऊ का नको मग??
अशी नावं थेट माध्यमांवर लिहू नये.हीच प्रतिक्रिया पूर्ण सोमिवर फिरेल मग लोकांमध्ये भीती पसरेल.
10 May 2025 - 5:05 pm | युयुत्सु
https://youtu.be/cYe1RzEbekw?si=pvh8r9bXthDbXSW3
10 May 2025 - 12:56 pm | युयुत्सु
संपादक
Pls remove my above reply. It is interpreted in wrong way.
13 May 2025 - 7:41 pm | शैलेश लांजेकर
धन्यवाद!! आता मी पण या सूचनांनुसार माझी वैयक्तिक आणि कुटुंबाची तयारी कितपत आहे ते बघतो आणि आवश्यक असल्यास सुधारणा करायला घेतो.. आता आणखी उशीर नको...
10 May 2025 - 5:14 am | nutanm
12 May 2025 - 7:05 am | nutanm
मी ७१ चे युद्ध चान्गलेच अनुभवलेय कारण जरी मुम्बईचया उपनगरात रहात होतो तरी मुंबई असलयाने blackout, महागाई वडिलाचा तुटपन्जा पगार आणिकच कमी येणे व महागाई व गरिबीचया गर्तेत अधिकच ढकलले जाणे याचा फारच दाहक अनुभव वयाचया १४ वया वर्षी घवावा लागणे फारच वाईट.
12 May 2025 - 7:35 am | गवि
सध्याच्या काळात, म्हणजे आपण प्रसंगी स्वतःच्या घरी देखील गूगल मॅप्स - जीपीएस - वापरून पोचतो, त्या काळात पहिल्या दुसऱ्या महायुद्धासारखे किंवा सत्तरच्या दशकात होते तसे अंधार करून (चिकटपट्टीने खिडकीला कागद वगैरे लावत ब्लॅक आऊट करून) शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे हा एक हास्यास्पद उपाय वाटतो. आपल्या इतर यंत्रणा सक्षम आहेत शत्रूंची विमाने डिटेक्ट करून रोखायला. आणि सीमेच्या आत अनेक किलोमीटर तर येणे जवळपास अशक्य आहे आपल्या इथे.
12 May 2025 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती पाहता अशा तात्पुरत्या अंधाराचा फारसा फायदा तितकासा होत नसावा असे वाटते.
-दिलीप बिरुटे
12 May 2025 - 10:57 am | सुबोध खरे
सत्तरच्या दशकात होते तसे अंधार करून (चिकटपट्टीने खिडकीला कागद वगैरे लावत ब्लॅक आऊट करून) शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे हा एक हास्यास्पद उपाय वाटतो.
पाकिस्तानकडून येणारी सर्वच अस्त्रे काही जिपीएस वर आधारित नाहीत. केवळ अत्याधुनिक क्षेपणास्त्रे यात जिपी एस वर आधारित लक्ष्य वेधाची सोय आहे परंतु अशा एका अस्त्राची किंमत काही कोटी रुपये असते.
बरेच ड्रोन उडवणारे पाकिस्तानात बसून ड्रोन च्या कॅमेऱ्यावर दिसणाऱ्या लक्ष्यावर वरून बॉम्ब टाकतात ज्याची किंमत एक लाखापेक्षा कमी आहे. अशा स्थितीत आपण दिवाळी केली तर त्यांची आयती सोय होते.
अशा फडतूस ड्रोन उडवण्यासाठी आकाश किंवा S ४०० प्रणालीतील क्षेपणास्त्र वापरणे म्हणजे उंदीर मारायला तोफ गोळा वापरल्या सारखे होईल. म्हणून हि असली स्वस्त ड्रोन उडवायला बोफोर्सची L ७० हि तोफ वापरली जाते,. ह्या तोफेच्या गोळ्याचा व्यास ४ सेमी असतो आणि या तोफेची ३०० गोळे एका मिनोटात मारण्याची क्षमता आहे. याला लेसर रेंज फाईंडर बसवलेला असतो. यामुळे लक्षाचे अंतर आणि वेग अचूक मोजून त्यावर याचे गोळे मारून असली फडतुस ड्रोन उडवली जातात. याचा टप्पा १२ किमी पर्यंत असतो
रात्रीच्या वेळेस आपले शहर जर झगमगाट असेल तर अशी द्रोण पाहणे आपल्याला कठीण होते मग लेसर रेंज फाईंडर मधून त्यावर गोळे वर्षाव करणे कठीण जाते. https://en.wikipedia.org/wiki/Bofors_40_mm_Automatic_Gun_L/70
याशिवाय जर आपली विमानविरोधी संरक्षण यंत्रणा नीट काम करत नसेल तर शत्रूची विमाने आपल्या हद्दीत प्रवेश करू शकली तर त्यांना सुद्धा लक्ष्य स्पष्ट दिसत असेल तर साधे बॉम्ब टाकणे अगदी सोपे जाते. एका स्काल्प बॉम्बची किंमत २० कोटी रुपये आहे तेंव्हा असा बॉम्ब हाय व्हॅल्यू टार्गेट असेल तरच वापरणे परवडते त्यापेक्षा विमान उडवून बॉम्ब टाकून परत येणे हे किती तरी स्वस्त पडते
या कारणांमुळे रात्री ब्लॅक आऊट करून शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे आवश्यक ठरते.
12 May 2025 - 12:02 pm | गवि
ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. माझे अर्धवट माहितीवर आधारित म्हणणे मी मागे घेत आहे.
12 May 2025 - 3:54 pm | मूकवाचक
महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद.
12 May 2025 - 1:36 pm | युयुत्सु
पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याजवळ हल्ला झाल्याने किरणोत्सर्ग चालू झाल्याची बातमी जर खरी असेल तर माझ्या दृष्टीने आपण हे युद्ध जिंकले आहे. किरणोत्सर्ग आटोक्यात आणताना त्यांचा दम निघेल हे नक्की.