इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?

Shantanu Abhyankar's picture
Shantanu Abhyankar in जनातलं, मनातलं
10 Feb 2021 - 3:53 pm

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?
एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच का करतात?’, असा प्रश्न ‘लेकुरे उदंड झाली’, या नाटकात एका जोडप्याला पडलेला असतो. अर्थात यांचे रीतसर लग्न झालेलेच असते. याच चालीवर, ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?’, असा प्रश्न विचारता येईल.
आस्तिकांच्या मते देव आहेच, आपले अस्तित्व तो विविध लीलांनी दाखवून देत असतो आणि नास्तिकांच्या मते देवाचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही सबब तो नाहीच. तेंव्हा देव आहे का नाही ह्याची चर्चा फारशी उद्बोधक ठरणार नाही.
पण देव मानणारे, ‘असे कसे काय बुवा देव मानतात?’ ह्या प्रश्नाचा शास्त्रीय मागोवा बरंच काही शिकवून जाईल. अशा काही मागोव्यांचा हा मागोवा. आधुनिक काळात मानसविद्येमध्ये महत्वपूर्ण संशोधन झाले आहे आणि या प्रश्नाच्या उत्तराची निदान रूपरेषा आता स्पष्ट आहे.
जगातील यच्चयावत धर्मकल्पनांमध्ये विलक्षण साम्य आढळून येतं. आढळणारच; कारण यच्चयावत देव-दानव नरे निर्मिलेलेच आहेत. माणसाच्या मन-मेंदूचीच ही करामत. या सर्व-धर्म-समभावांची ही छोटीशी जंत्री. अतीनैसर्गिक शक्तींवर विश्वास. सचेतन आणि अचेतन शक्तींवर विश्वास. मरणोत्तर घटिताबद्दल दावे. ‘आपले’(धर्मबांधव) आणि ‘इतर’, असा सरासर भेद आणि इतरांप्रती दुष्टावा. नित्य आणि नैमित्तिक कर्मकांडे. स्वप्नांचा, शकुनांचा अर्थ लावणारे ठोकताळे. नृत्य आणि संगीत. काही शब्द आणि काही अन्नपदार्थांवर बंधने. पावित्र्य-अपावित्र्य, सोवळे-ओवळे अशा कल्पना, विभूति-शरणता, धार्मिक आणि म्हणून नैतिक अशा जबाबदाऱ्या, आपोआप होणारी दैवी शिक्षा आणि बक्षिसी, वगैरे, वगैरे.
इतकी सारी साम्य आहेत म्हटल्यावर ज्या मनात आणि समाजमनात धर्म उगम पावला त्यांचाही अभ्यास आलाच. त्यातही बरीच साम्यस्थळे गवसली आहेत.
भावनाप्रधान माणसं अधिक देवभोळी आणि विवेकप्रधान, विचार करणारी माणसं, अधिक नास्तिक असल्याचं आढळून आलं आहे. एकलकोंडी, समाजापासून तुटलेली माणसं, अनिश्चिततेच्या गर्तेतील माणसं, मृत्यू समोर दिसत असलेली माणसं; देवात सोबत शोधतात, आधार शोधतात. छुपी नास्तिक किंवा ‘भोंदू आस्तिक’ मंडळीही असतात. आसपासची इतकी सगळी प्रजा आस्तिक असताना आपले नास्तिकपण मिरवणे सोपे नसते. फायद्याचे तर नसतेच नसते. बरेचदा तोट्याचेच असते. तेंव्हा मनातून नास्तिक आणि तोंडदेखले आस्तिक असतात. मानसिकतेबरोबर सामाजिक रचनेचाही भाग येतो. उत्तम सामाजिक, आर्थिक, मानवविकास निर्देशांक असलेल्या देशी, नास्तिकांचे प्रमाण जास्त असते. समृद्ध, सर्वार्थी अर्थव्यवस्था असलेल्या देशात नास्तिक जास्त. इथे अस्मानी संकट आलं तर सुलतान मदतीला येईल अशी सोय असते. मग आपोआपच आभाळातल्या बापावरचे अवलंबित्व कमी होते.
पण या सगळ्याला ओलांडून जाणारे, देवकल्पनेची उत्क्रांती मांडणारे, काही संशोधन आता पुढे येते आहे.
उत्क्रांतीच्या ओघात आपले कपी वा मानवरुपी पूर्वज देव मानत नसावेत. मग नेमक्या कोणत्या टप्प्यावर हा देव नामक किडा माणसाच्या मेंदूत शिरला असावा बरे? ही कल्पना सर्व खंडात, सर्व संस्कृतीत आढळते. तेंव्हा भाषेचे प्रारूप जसे माणसाच्या मेंदूत आदिम काळापासून कोरले गेले आहे तसेच देव-धर्माचा एक तयार कोनाडा, एखादं मखर, काही रूपरेषा, मेंदूत आदिम काळापासून आहेच की काय?
मेंदूत निश्चित असे ‘देवाचे केंद्र’ (God Centre), ‘चेतापेशींची खास वीण’ (Network) किंवा (तीर्थ)‘क्षेत्र’ (God Area) नाहीये. इतर अनेक कार्यांसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक यंत्रणा, देवाधर्माचं करताना उद्दीपित होतात. या यंत्रणा देवकल्पनेच्याही आधीच्या आहेत. यांच्याच पायऱ्या करून, देवाचे देव्हारे सजवले गेले आहेत. म्हणजे देव, हा तर करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा प्रकार आहे. इतर व्यवहारांसाठी म्हणून जी कौशल्ये, उत्क्रांत झाली; त्यांचा उपयोग देवकल्पना, धर्मभावना वगैरे रुजायला झाला.
हे काहीसं लिहिण्या-वाचण्यासारखं किंवा संगीतासारखं आहे. मेंदूत लिहिणे-वाचणे उपजत नाहीये. भाषा (व्याकरणाचे प्रारूप) आहे, दृष्टी आहे, चिन्हांची समज आहे आणि बोटांच्या नेमक्या हालचाली उपजत आहेत. या साऱ्यांचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठी होतो म्हणून ह्या उपजत आहेत. माणसाने आपलं डोकं वापरुन ह्या कौशल्यांचा वापर करून लिहिणे-वाचणे ही भलतीच गोष्ट शोधून काढली आहे. भाषेतील स्वर आणि व्यंजनांची नादमय रचना करून, सुरवातीला हृदयाशी ठेका जुळवत, संगीत ही भलतीच गोष्ट शोधून काढली.
तसेच मुळात समाज-धारणा करणारी, लोकव्यवहार सुलभ करणारी, मनरचना देव-धर्म धार्जिणी ठरली आणि देवाधर्माचं तण माजलं असं ताजं संशोधन सांगतं. देव-कल्पनेचं बीज तरारून फुटेल अशी मेंदूच्या कार्याची मऊसर रचना उत्क्रांत झाली. तेंव्हा ही कशी उत्पन्न झाली?, कोणत्या औत्क्रांतिक ताण्याबाण्यातून उत्पन्न झाली?, ह्याचा शोध उद्बोधक ठरेल.

मेंदूतील औत्क्रांतिक कोरीवकाम
गवतात खसखस ऐकू आली तर आपल्या भटक्या पूर्वजांच्या मनात दोन शक्यता चमकायच्या, गवतात कोणी जनावर तर नाही? वाघ? का नुसतीच वाऱ्याची सळसळ? जर वाघ समजून लांबची वाट धरली आणि तिथे वाघोबा नसेलच तर थोडे सावध, थोडे दुरून निघून जाण्याने, फारसं काही बिघडलं नाही. पण जर वाघ असताना, वाघ नाही असं समजलं तर? तर मग जीवावर बेतेल ना! मग वाघोबा तुमचा चट्टामट्टा करेल, तुम्ही उत्क्रांतीच्या स्पर्धेतून बाद. तुमचा वंशखंड. वाघ आहे हा गैरविश्वास (श्रद्धा) आपलं फारसं काही बिघडवत नाही पण वाघ नाही असा फाजील विश्वास जीवावर बेततो. आपल्या पूर्वजांच्या लाखो वर्षाच्या अतूट साखळीचे आपण वारसदार. आपले पूर्वज सावधपणे वागले, नसलेल्या वाघोबालासुद्धा घाबरले, म्हणून आपण आहोत. थोडक्यात आपण सारे, अतीसावध, सतत वाघोबा शोधणाऱ्या, मेंदूंचे वारस (Hyperactive Agency Detection) आहोत. त्यामुळेच जिथेतिथे, ज्यातत्यात आपण वाघोबा शोधत असतो. निसर्गात वाघोबा क्वचित आणि वाऱ्याची सळसळ अधिक. पण आपल्या मेंदूला निरनिराळी टिंब जोडून वाघोबाचं संगतवार चित्र जुळवायची खोड आहे.
भासणारी चित्रसंगती हेच सत्य असं आपला मेंदू मानून चालतो. आपण प्रत्येकवेळी सत्यान्वेषी विचार करत नाही. बहुतेक श्रद्धांमागे माणसाचे हे संगती-शोधक, संगती-रत मन आहे. ह्याच मनानी, मनानी लावलेल्या सावध संगतीने तर आपण आजवर तगलो आहोत, वाघापासून वाचलो आहोत.
अतीसावध संगती बरोबर प्रत्येक घटीताला कर्ता आणि प्रत्येक कर्त्याला हेतू चिकटवण्याचीही आपल्याला अभिजात खोड आहे (Folk Psychology). हिसका दिला की फांदी तुटते, झाड हलवले की फळे पडतात, आपल्या हेतुतः केलेल्या कृतीतून काही परिणाम घडतो, हे लक्षात येताच तोच तर्क माणसांनी आसपास सगळ्यालाच लावायला सुरवात केली. हा कर्ता मग कधी प्राणी असतो, कधी मनुष्यप्राणी असतो वा कधी निसर्ग असतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कोणीतरी ‘घडवणारा’ आहे आणि त्या घडवणाऱ्याचा काहीतरी ‘हेतू’ आहे, अशी समजूत मानवी मनात दृढ झाली. मग वाऱ्यात वरूण, पावसात इंद्र, जलाशयात अप्सरा आणि वडा-पिंपळावर हडळ सहजच सापडायला लागते. त्यातून वाऱ्या-पावसाची, जळा-पिंपळाची, एकूणच निसर्गाची ‘वागणूक’ इतकी बेभरवशाची, इतकी बेदरकार, की त्यांना कोणतेही नियम किंवा नियमन अशक्य. तेंव्हा त्यांच्या वागणुकीला ‘त्यांची इच्छा’ हे कारण फिट्ट बसणारे.
गोष्टीरूप पुराव्यावर झटकन विश्वास हा देखील आपल्या संगती–रत मनाचाच छंद. माझ्या काकाचा कॅन्सर होमिओपॅथिने बरा झाला, मंत्राने सापाचे विष उतरले, वास्तूशास्त्राने भरभराट झाली, अशी विधाने सहज स्वीकारली जातात. संगतींचा सत्यान्वेषी शोध दरवेळी शक्य असतोच असं नाही. भासलेल्या संगतीची सत्यासत्यता पडताळून पहाणारी पद्धत म्हणजे विज्ञान.
तर्कदुष्टतेचं हे पाप फक्त पूर्वजांच्या माथी मारण्यात अर्थ नाही. आजचेही बरेचसे तसाच विचार करत असतात. सृष्टी सत्असत् शक्तींनी भरलेली आणि भारलेली आहे, झाडापानाफुलाला आणि मानवनिर्मित गोष्टींनाही; ‘मन’ आणि ‘इच्छा’ आहे आणि ह्या साऱ्याची आपल्यावर कृपादृष्टी अथवा वक्रदृष्टी आहे; अशा कल्पना आजही सर्व संस्कृतीत आहेत. काही कृतींनी अथवा पूजा-प्रार्थनेनी, या अचेतन वस्तूंना पाझर फुटतो, त्या आपल्या भल्यासाठी सहाय्यभूत होतात, ही ह्याच विचाराची पुढची कडी. नव्या गाडीला नारळ फोडणे असो वा नव्या कॉम्प्यूटरची पूजा करणे असो, हे सारे प्रकार या चीजांना आपण स्वतंत्र ‘इच्छा’, ‘मन’ बहाल केल्याचे दर्शवतात.

मोठ्या टोळ्या आणि देवकल्पना
सुमारे २,५०,००० वर्षापूर्वी माणूस म्हणावा असा प्राणी या ग्रहावर उत्क्रांत झाला. अगदी परवा परवापर्यंत तो भटक्या शिकारी होता. शे-दीडशेच्या टोळ्या टोळ्यांनी रहात होता. याहून मोठा गट भटकत, शिकारीवर गुजराण करूच शकत नाही. शेतीचा शोध लागला आणि शे-दिडशे माणसाची टोळी हजारांची झाली. अर्थात आपल्या कपी पूर्वजांच्या टोळ्यात तर वीस-पंचवीसजणच असायची. त्या मानानी मानवी टोळ्या मोठ्ठ्याच मोठ्ठ्या म्हणायच्या. ह्या मोठ्या टोळ्या टिकायच्या आणि तगायच्या तर अंतर्गत सहकार्य अत्यावश्यक ठरते. सहकार्यासाठी काही खास जाणीवा असणे अनिवार्य ठरते. या अशा जाणिवांतून देव कल्पनेचा उगम झाला असावा.
पुढे गावं, शहरं वसली. आता बरेचसे व्यवहार अनोळखी माणसांत होऊ लागले. छोट्याश्या टोळीत बनेल कोण, लबाड कोण, हे सहज ओळखणं शक्य होतं. तिथल्यातिथे शासन शक्य होतं. पण हजारोंच्या टोळीत हे कसं जमावं बरं? मग युक्त व्यवहारांना संरक्षण देणारे आणि फसवेगिरीला शासन करणारी अशी व्यवस्था आणि असे रखवालदार आले. हे अपुरेच. तेंव्हा ‘काल्पनिक रखवालदार’ आले. ह्या रखवालदारांच्या काठीला आवाज नसतो, ह्यांचे कुणालाही ज्ञात न होणारे विचित्र नेमानेम असतात. शिक्षा होते खास, पण ती मृत्युनंतरही असू शकते, पुढच्या जन्मीही असू शकते; अशा अनेक कल्पना आल्या. शपथ देणे, शपथ घेणे, दिव्य करणे, पापपुण्य, त्यांचा संचयाचे आणि क्षालनाचे अनेकविध मार्ग हे सारे ह्याच कल्पनांचे विलास. नागरी जीवनाबरोबरच, समाजव्यवहार सुरळीत चालू रहायला धर्मकल्पना विकसित झाल्याचं दिसतं. जगरहाटी चालायची तर सहकार्य वाढेल पण त्याचवेळी ऐतखाऊ पोसले जाणार नाहीत अशी रचना पुरवणाऱ्या दोन संस्था, धर्मसंस्था आणि राज्यसंस्था. टोळीपासून स्थिर समाज निपजला तशा ह्या दोन्ही संस्था उदयाला आल्या.
धर्मामुळे समाजाच्या संघशक्तीला एक दिशा मिळते. गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय धार्मिक (अथवा इतर) संघटनेमुळे वारंवार येतो. एक मन, एक मनगट; असा समाज दिलेली उद्दिष्टे सफल करू शकतो. प्रत्यक्ष देवाजीची इच्छा न मानणाऱ्यास; या, अथवा पुढील, अथवा जन्मोजन्मी शिक्षा; म्हटल्यावर माणसं ऐकतात. शिस्त पाळतात. प्रचंड पिरॅमिड देखील बांधतात. पण शेवटी धर्मानी दिलेला ‘आदेश’, ‘दिशा’, ‘उद्दिष्ट’, म्हणजे धर्म-धुरीणांच्या दृष्टिकोनाची परिणीती. प्रत्यक्षात कुठलाही देव येऊन कोणताही आदेश देत नाही. तेंव्हा धर्माचार्य जी ठरवतील ती दिशा असाच मामला असतो. काल्पनिक कार्यकारणभावावर बेतलेली, वास्तवाची बूज न राखणारी ही दिशा अर्थातच चुकू शकते. नव्हे बरेचदा चुकते असाच इतिहासाचा दाखला आहे.

टोळ्या म्हटलं की युद्ध आलीच. धर्माचे युद्धोपयोगी गुण तर आजही उधळले जात आहेत. लढायचं तर अनेक गुणांचा समुच्चय लागतो. सहकाऱ्यांप्रती निष्ठा, निधडी छाती, विजयाचा विश्वास, शौर्याचा उदोउदो, आपलीच बाजू नीतीची अशी खात्री आणि प्रणार्पणाची तयारी. धर्म हे सगळं सहज जुळवून आणतो. कर्मकांडातून लहानपणापासूनच धर्मसंघटनेला निष्ठा वाहिलेल्या असतात. आपलीच बाजू धर्माची असल्याचा विश्वास असतो, शत्रू दानव असल्याची खात्री असते, विजयाची खात्री असते आणि धर्मासाठी प्राणाहुती देणाऱ्यांना स्वर्गसुखाची गॅरंटी असतेच असते. शत्रूसंगे संगरासाठी धर्म असा एकोपा पुरवतो. म्हणून तो रूजला, वाढला. अर्थातच ज्याच्या बुडाशी धर्मपीठाची गादी, ज्याच्या तोंडाशी धर्मप्रवक्तेपदाचा माइक, त्याच्या हाती युद्धाचे रणशिंग अशी अवस्था होती आणि काही प्रमाणात आहे. धर्माधिष्ठित देशात एकदा ‘धर्मयुद्ध’ म्हटलं की प्रश्न बंद होतात. पण धर्मनिरपेक्ष देशात युद्धाच्या अपरिहार्यतेची साधकबाधक चर्चा शक्य आहे.
नागर व्यापार उदीम बहरायचा तर विश्वासार्हता महत्वाची. ती विश्वासार्हता पूर्वी (आणि काही प्रमाणात आजही) धर्म बहाल करतो. तुमच्या धर्मबांधवांवर तुमचा चटकन विश्वास बसतो. ‘न्यू मराठा खानावळीला’ मराठाच भाजी पुरवतो आणि ‘अंजुमन इस्लाम’ शाळेचं बांधकाम स्वाभाविकपणेच मुसलमान कंत्राटदाराला मिळतं. आंतरधर्मीय विवाह म्हणजे महदाश्चर्याचा दुख:द धक्का. ज्यू, पारशी, मारवाडी, बोहरी इत्यादी समाज दुरदूरच्या देशी, पूर्वापार व्यापार करू शकले त्याचं एक कारण धर्मानी दिलेली ही हमी, हा ‘विमा’. आज विमा आणि विश्वासार्हतेच्या तत्सम साधनांमुळे धर्माचं हे अंग आता दुर्बल झालं आहे. पण संपलेलं नाही. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापारातही, भ्रातृभावाच्या सिमेंटनी लिंपलेली आणि परभावाच्या काटेरी कुंपणांनी राखलेली, ज्यूंची चिरेबंदी धर्मवर्तुळे आहेत. टोळ्यांनी रहाण्याची आपली आदिम सवय आपल्याला आप-परभाव शिकवून गेली आहे (Kin Psychology). आपला तो जातभाई, धर्मबंधू, देशबांधव. बाकीचे ते परजातीय, परधर्मीय, काफिर, शत्रु.
टोळ्यांत एक सामाजिक उतरंड असते, खालच्यांनी वरच्यांना सलाम ठोकण्याच्या, आदर दाखवण्याच्या तऱ्हा असतात. वरीष्ठांचा अनादर म्हणजे टोळीतून बहिष्कार जणू ठरलेला. नेते, सामाजिक वरिष्ठांचा सन्मान, व्यवस्थेशी बांधिलकी हे सारं यातूनच येतं. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रमाण्य, बाबा वाक्यं प्रमाणं, हेही यातूनच येतं. आजही घरांघरांतून, शाळाशाळातून, हे मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. लहानपणी असं प्रामाण्य आवश्यक आणि संरक्षक असतं. प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक गोष्ट, पुराव्याने शाबीत करून पहाण्याची गरज नसते. एक सामायिक शहाणपणाचं संचित प्रत्येक समाजापाशी असतं. ते वापरणं नक्कीच परवडतं. पण या सवयीनी चिकित्सक विचार, जिज्ञासू वृत्ती आणि पुराव्याइतकाच विश्वास ही विचारधारा रोखली जाते.
चिकित्सक अविश्वासाला धर्मात मुळीच थारा नाही. उपजत मानवी विचारधारेतही नाही. आंधळा विश्वास हा मानवी विचारधारेचा वहिवाटीचा मार्ग आहे, धोपट मार्ग (Default Pathway) आहे. हे धर्माला सोयीचेच आहे. माणूस हा विचारी प्राणी आहे म्हणे. तेंव्हा पुढ्यात आलेल्या माहितीचा तो योग्य शहानिशा करून, खात्री करून, काटेकोर शास्त्रीय निकष लावून; मगच स्वीकार वा नकार ठरतो; असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात जे पुढ्यात येतं त्याकडे आपण आपल्या मगदुरानुसार, मतानुसार, श्रद्धांनुसार, पूर्वग्रहांनुसार बघतो. त्यातले सोयीचे तेवढे स्वीकारतो, आणि त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद शोधतो. जे गैरसोयीचे असेल त्याकडे दुर्लक्ष तरी करतो किंवा ते तर्कशुद्ध नसल्याचा तर्क लढवतो. (Biases and heuristics) अविश्वास दाखवणे, चिकित्सा करणे, कष्टसाध्य आहे, ते शिकावे लागते.
जन्मजात तर्कदुष्ट मानवी बुद्धीला शिस्त लावायचं काम विज्ञान करतं. सिद्धतेच्या प्रमाणात विश्वास ही विज्ञानाची बाजू आणि ‘संशयात्मा विनश्यति’ ही सर्व धर्मांची शिकवण. प्रत्येक बाबतीत शंका घ्या, पुरावा तपासा, असं विज्ञान सांगतं; तर डोळे मिटून आधी विश्वास ठेवा, पुरावा कसला मागता? थेट प्रचीतीच पहा, असं धर्मशास्त्र सांगतं. बहुतेक सत्तांना, अर्थसंस्थांना, सामाजिक संस्थांना, राजकीय विचारांना ही दुसरी पद्धत सोयीची असते. निमूट स्विकारवादी बरे, शंकेखोर म्हणजे शंकासूर.
समाजात रहायचं तर दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येण्याला अनन्यसाधारण महत्व आहे (थिअरी ऑफ माइंड). ही कला माणसात उदय पावली आणि माणसाची जमात फळफळली. या कलेतून समोरचा कसा वागेल याचा अंदाज बांधता यायला लागला आणि सामाजिक अभिसरण सुरळीत व्हायला मदत झाली. सामनेवाला हा स्वतंत्र मन, विचार, बुद्धी आणि हेतु असलेला जातभाई आहे ही समज उगवली. अर्थात समोरच्याच्या कृतींमागे हेतू आहे हे ओळखणं तसं सोपं गेलं माणसाला, प्रत्येक गोष्टीला हेतू चिकटवायची खोड माणसाला होतीच!
मनकवडेपणाबरोबरच इतर अनेक गुणांमुळे देवाधर्माच्या खेळात मानवी मन खिळून रहातं.
शरीर आणि मन असं द्वैत आपण गृहीत धरून चालतो. ही मूळ धारणा, धर्म द्विगुणित, त्रिगुणीत, अनंतगुणीत करतो. अशरीर आत्मे-परमात्मे, भुते-खेते सर्व धर्मात ठाण मांडून आहेत ती या मूळ गृहितकाची अपत्ये. पण शरीराशिवाय मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही अशी विज्ञानाची अद्वैतवादी शिकवण आहे.
मनुष्याला इतरांच्या वेदनेची जाणीव असते आणि परपीडेपासून दुःख होते. शिवाय आजचे मदतरूपी (सत्)कृत्य, म्हणजे उद्याच्या परतफेडीची पेरणी असते. मी तुला तेंव्हा मदत केली तू आज मला मदत कर, अशी देवघेव असते. अशी देवघेव न्याय्य असावी ह्या अपेक्षेतून न्याय, हक्क, वगैरे जाणीवा विकसित झाल्या आहेत.
आपल्या मेंदूतील चेतातंतूंच्या जाळ्यातील विवक्षित भाग समोरच्याच्या हालचालींनुसार उद्दिपीत होतो, असं आता लक्षात आलं आहे. म्हणजे समोरच्याने डावा हात वर केला, तर माझा डावा हात नियंत्रित करणाऱ्या चेतापेशी क्षणिक उद्दीपीत होतात आणि समोरच्याचा डावा हात कोणी जोरात पिरगळला तर माझ्याही मेंदूतील वेदनेच्या चेतापेशी क्षणिक उद्दिपीत होतात. स्वतःत वेदनेचे प्रतिबिंब पाहून, वेदनेला सहवेदनेचा आयाम देणारे हे दर्पण-चेतातंतू (Mirror Neurons). अनुकंपा, सहानुभूती आणि सहाय्य करण्याची उर्मी इथे उगम पावते.
हेच पहा ना, आफ्रिकेच्या गवताळ सवाना प्रदेशात, कोट्यवधी वर्षापूर्वीचा, एका होमो इरेक्टस स्त्रीचा, सांगडा सापडला आहे. हिला, बहुधा कोण्या प्राण्याच्या मांसातून, अ जीवनसत्वाची विषबाधा झाली असावी. परिणामी सांध्यात रक्तस्त्राव होऊन ती मृत्यूपूर्वी काही महीने तरी जायबंदी असावी. अर्थात काही कोटी वर्षापूर्वी, कोणी जागेवर अन्नपाणी पुरवल्याशिवाय, इतके महीने, कोणी जगूच शकणार नाही. तेंव्हा सोबतचे होमो इरेक्टस तिची सुश्रूषा करत होते खास. थोडक्यात वेदनेला कारुण्याचा प्रतिसाद धर्माने शिकवलेला नाही तो तर माणसाच्या वागणुकीत आधीच वसलेला दिसतो.
सहवेदनेबरोबर सह-सौख्यभावनाही आहे. सणासुदीला सगळेच खुशीत दिसतात, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चराचर सृष्टी आनंदाने डोलू लागते वगैरेमागेही हेच दर्पण तंतू आहेत. हा उपजत गुण धर्माच्या पुरेपूर कामी आला आहे.
माणसाच्या मनी वसलेले असे अनेक गुण धर्मभावनेला उपयुक्त ठरलेले आहेत. धर्माशी निगडीत, आभास, साक्षात्कार, सृष्टीशी तादात्म्यभाव असे अनेक घटक आधुनिक मानसाभ्यासाचे विषय आहेत.
मायकेल परसिंगर याने असं दाखवून दिलं आहे की आपली स्वत्वाची भावना, ‘आपण’ आणि ‘इतर व्यक्ती’ हा भेद करण्याची क्षमता, मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अशी दोन्ही टेम्पोरल लोबमध्ये (कानशिलापुढील भाग) असते. जागेपणी आपण फक्त मेंदूच्या डाव्या भागतील क्षमता वापरत असतो. पण भीती अथवा नैराश्याच्या छायेत, संकटकाळी, गुदमरल्यावर, रक्तशर्करा घटल्यास उजव्या बाजूची क्षमताही बरोबरीने जागृत होते आणि आपल्या सोबत ‘अन्य कोणीतरी’ आहे असा अनुभव येतो. अगदी अस्साच अनुभव ‘देव टोपडे’ (God Helmet) घालून कृत्रिमरीत्या घेता येतो. ‘देव टोपडे’ ही परसिंगरची निर्मिती. हे टोपडे घालून अंधाऱ्या, शांत, खोलीत एकटेच बसायचं, ह्या टोपड्यातील यंत्रणा त्या व्यक्तीच्या मेंदूच्या उजव्या टेम्पोरल भागाला उद्दिपीत करते आणि त्या बंद खोलीत बरोबर अन्य कोणी असल्याचा भास त्या व्यक्तीला व्हायला लागतो. मदर मेरीपासून ते मेलेल्या आत्यापर्यंत आणि साईबाबांपासून ते आईबाबांपर्यंत; आपापल्या सुप्त इच्छा अपेक्षांनुसार, कुणाचेही दर्शन होऊ शकते. इतकेच कशाला टेम्पोरल लोब एपिलेप्सीच्या (एक प्रकारचा अपस्माराचा आजार) पेशंटना अगदी असेच उद्दीपन मिळते आणि अगदी असाच अनुभव येतो. या मुळे की काय, असे पेशंट बरेचदा आत्यंतिक धार्मिक असतात.
चराचर सृष्टीशी एकरूप झाल्याचा अनुभव हा देखील असाच एक साक्षात्कारी अनुभव. ही झपूर्झा अवस्था प्राप्त होते तेंव्हा मेंदूतील फ्रॉन्टल लोब (कपाळा मागील भाग) उद्दिपीत असतो तर वामांगी परायटल लोब (डाव्या कानाच्यावरचा भाग) शांत स्थितीत असतो. हाच तो मेंदूचा भाग ज्यामुळे आपल्याला आपण सृष्टीपासून अलग आहोत ही जाणीव होत असते. आपण कुठे ‘संपतो’ आणि ‘सृष्टी’ कुठे सुरू होते, ते हा भाग आपल्याला सांगत असतो. तळमळीने केलेला देवाचा धावा, ध्यान-धारणा, नामस्मरण, भजन-कीर्तन वगैरे सांगीतिक संकेत, मंत्रजप अशा क्रियांनी या वामांगी परायटल लोबला तात्पुरती गुंगी येते, फ्रॉन्टल लोब उद्दिपीत होतो आणि ‘मी’ पण सरते.
मंत्रचळ (Obsessive compulsive disorder) नावाचा एक आजार आहे. ह्यात ती व्यक्ति अगदी निरर्थक क्रिया वारंवार करत रहाते. सतत हात धुणे, एकच वाक्य बडबडत रहाणे, येरझाऱ्या घालणे असं काहीही. देवाधर्माचे ‘करणे’ या सदराखाली धडधाकट माणसेही असे प्रकार करताना दिसतात. वारंवार तीच तीच क्रिया केल्याने चिंता, भीती, वगैरे कमी होते आणि धीर, आत्मविश्वास वाढतो. जप, प्रदक्षिणा वगैरेंनी हाच परिणाम साधला जातो. ‘धर्म हा समाजाचा मंत्रचळ आहे आणि मंत्रचळ हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक धर्म आहे’; असं फ्रॉइडने म्हणून ठेवले आहे.
भातुकली खेळताना किंवा नाटक पहाताना आपण सारासार विचार क्षणभर हेतुतः बाजूला ठेवतो. पडद्यावरच्या लटक्या जगात ठाकुर खरोखरच थोटा झाला आहे, जय खरोखरच मेला आहे, गब्बरचे हात जायबंदी झाले आहेत आणि बसंती अन् विरुचा खट्याळ शृंगार पुढे फुलणार आहे असं मानून चालतो आपण. ते विश्व आणि आपलं विश्व अशी मानसिक फारकत शक्य असते आपल्याला. (Decoupled Cognition) स्थळ, काळ, वेळेचा असा हेतुतः विसर, विपर्यास हा आपल्या मेंदूचा आणखी एक धर्म-धार्जिणा गुण आहे.
ह्या गुणाचा एरवीही उपयोग होतो आपल्याला. ऑफिस मधली बाचाबाची आपल्याला पुनःपुन्हा आठवते आणि आपण प्रतिवाद तयार ठेवतो. उद्याच्या भिशीबद्दल बायकोला काय थाप मारायची ह्याची उजळणी आपण आजच करून ठेवतो. बॉसशी, बायकोशी, काय आणि कसं बोलायचं ह्याची तालीम त्यांच्या अनुपस्थितीत करतो आपण. मनातल्या मनात अदृश्य इतरेजनांशी असा मानसिक संवाद अगदी सहज शक्य आहे आपल्याला. प्रेतात्म्यांशी संवाद, देवात्म्याशी संवाद ही सुद्धा ह्याच गुणाची प्रचिती. लहान मुलं बाहुलीशी, टेडी बेअरशी बोलतात. देव म्हणजे मोठ्या माणसांचं टेडी बेअरच आहे. दोन व्यक्तीत संवाद होताना मेंदूत जे भाग प्रदीप्त होतात तेच भाग टेडीशी संवाद होतो किंवा देवाची प्रार्थना केली जाते, तेंव्हाही प्रदीप्त होतात.
आपलेपणाची भावना, ही एक आदीम भावना आहे. या जगात माझं म्हणून कोणी आहे, मला माझे म्हणणारे कोणीतरी आहे या भावनेसाठी (Attachment) खास सर्किटस आहेत मेंदूत. कित्येक प्रार्थना काकुळतीने करूणाकराला ‘माझे म्हणा’ अशी आळवणी करतात; कित्येक भक्त, अशी आर्जवे करताना एखाद्या तान्ह्या मुलाने आईकडे ‘घे’ म्हणून हात पसरावेत तसे मूर्तीकडे किंवा आभाळाकडे हात फैलावतात, ते काही उगीच नाही. माणसं; मृत्यू, गैरसमज किंवा परदेशगमनामुळे हिरावली जाऊ शकतात पण देव कायमचा सखा, कायमचा सुहृद. आपलेपणाची ही घट्ट भावनिक गरज, देवाचा स्वीकार सुलभ करते आणि देवाचा त्याग अतिशय दुष्कर करते.
बालपणी नात्यागोत्यांच्या व्यवस्थापनाची शिकवण आपल्याला मिळत असते. पालक, वडीलधारी माणसं, यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आपण शिकत असतो. मोठं होता होता इतर नातीही आपण याच कोंदणात बसवत जातो (Transference). नसलेल्या देवाशी असलेले नातेही सर्व धर्मियांनी या कोंदणात बसवलेले दिसते. त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव; अशी प्रार्थनाही सर्व धर्मात आढळते, ती यामुळेच.
शुद्धाशुद्धतेच्या, पावित्र्य आणि अपवित्र्याच्या कल्पनांना देखील प्राचीन आयाम आहेत. स्वच्छतेकडे नैसर्गिक ओढा आहे आपला आणि शिसारी, किळस ही भावनाही नैसर्गिक आहे. वातावरण, वर्तन, विचार असं सगळंच पवित्र अथवा किळसवाणं वाटू शकतं आपल्याला.
धर्म मिथके वास्तवाला किंचित किंचित पीळ देत असतात. किंचित पीळ मानवी मन सहज स्वीकारतं. मनाच्या ह्या गुणामुळे पुराणकथा सहज सत्य मानल्या जातात. अन्यथा पुराणकथा या परिकथाच असतात. तुमचं घर तुमचे इन्कमटॅक्सचे रिटर्न भरेल आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला चहा करून देईल, असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. यात घराचं ‘घरपण’ हरवून गेलेलं आहे. पण वास्तू प्रसन्न होताच तुम्हाला गुप्तधन सापडेल, यावर चटकन विश्वास बसेल. यात वास्तूची बरीचशी गुणवैशिष्ठ्ये शाबूत आहेत आणि काही अवास्तव गुण खास चिकटवलेले आहेत.
जी कथा कथांची तीच कथानायक आणि खलनायकांची सुद्धा. सर्व देव, दानव, देवदूत, एकूणच स्वर्गलोकातील आणि पाताळलोकातील लोक, म्हणजे मानवाची किंचित सुधारून किंवा बिघडवून घडवलेली आवृत्तीच. एकाच वेळी बऱ्याचशा मानवी आणि काही अतीमानवी गुणांनी युक्त अशी ही पात्रे असतात. ही खातात, पितात, हसतात, रूसतात, झोपतात, कोपतात, दोन बायकांनी कावतात, अगदी तुमच्या आमच्या सारखीच असतात ती.
ह्या कथानायकांचे वागणे आदर्श असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार आपली वागणूक बेतावी अशी शिकवण दिली जाते पण प्राचीन कथा पुराणांचा आजच्या जगण्याशी थेट संबंध नसतोच. कोणत्याही धर्माचा कितीही कट्टर माणूस धर्मग्रंथ शब्दश: पाळतच नसतो, पाळूच शकत नाही. नीती थेट धर्मग्रंथातून येत नाही. आजच्या भिंगातून बघत, बघत, धर्मशास्त्रातले सोयीचे ते वेचले जाते. आजचे धार्मिक पुराणातली वानगी गरजेनुसार घेतात अथवा सोडून देतात. मग कर्मकांडे प्रचलित सामाजिक नीती-अनीतीच्या कल्पना घट्ट करतात. त्यामुळे पौराणिक कथानकातील विरोधाभास दाखवून, धर्मभावना फारतर तीळभर ढळते आणि हा ढळ पळभर टिकतो. विरोधाभास दाखवून देणाऱ्याबद्दल कटुता मात्र मणभर साठते आणि मनभर दाटते.
पुराणकथांबरोबरच कर्मकांडं हा तर धर्मावर हल्ला करण्यास अत्यंत सोपा, सोयीचा, सर्वात कमकुवत भाग असं नास्तिकांना वाटतं. पण काही कर्मकांडे समाजधारणा करतात, काही शेतीच्या चक्राशी निगडीत आहेत आणि काही तर चक्क मजेदार आहेत. सोडमुंज होताच, कोणी मुलगी देत नाही म्हणून मुलाने रुसून, संन्यास घेत, काशीयात्रेला प्रस्थान ठेवणे आणि मामाने मुलगी देतो म्हणताच परत फिरणे; अशी खेळकर आहेत काही.
पण वरवर निरर्थक भासणारी ही कर्मकांडं धर्माचा कणा आहेत! कित्येक कर्मकांडे ही तर उघड उघड अविवेकी, निर्बुद्ध आणि निरर्थक भासतात. असतात. पण प्रत्यक्षात अशा कर्मकांडातील सहभाग हा नि:शंक निष्ठा निदर्शक असतो. निष्ठेचे, प्रामाणिक, आचरण्यास कठीण आणि नक्कलण्यास अवघड संकेत समाजव्यवहारासाठी आवश्यक असतात. सर्व कर्मकांडे म्हणजे निष्ठेची आचमने असतात. ऋण काढून साजरे केलेले सण, स्वतःला जाच करून केलेली व्रते, कष्टप्रद तीर्थयात्रा, अव्वाच्या सव्वा दानधर्म, देवाच्या नावाने अंगावर आसूड ओढणे, स्वतःला बगाडाला टांगणे, इत्यादीमुळे सामाजिक पतप्रतिष्ठा, स्विकार, वाढत असतो. उद्यापनाला व्रतार्थीच्या पायाचे तीर्थ घेण्यापर्यंत प्रथा परंपरा आहेत त्या हेच अधोरेखित करतात. अशा सहभागातून हळूहळू इथे प्रश्न विचारायचे नाहीत, हा कुलाचार आहे, सबब असाच चालू ठेवायचा, अशी धारणा गडद केली जाते. माणूस आपोआप त्या त्या कळपात सामावून जातो. हे सामावणे कळपाला आणि त्या व्यक्तीला सोयीचे असते. स्थलकाल लंघून, कर्मकांडे धर्मश्रद्धा संक्रमित करतात, फोफावत ठेवतात, तेवत ठेवतात. इथे वाईत भोंडल्याला ‘मिडल क्लास’ म्हणून नाके मुरडणारी मुलगी वॉशिंग्टनमध्ये गेली की हौसेनी चार सख्या जमवून फेर धरते.

मानवी मन धर्मकल्पनेला धार्जिणे आहे हे आपण पाहीलंच आहे. पण कर्मकांडातून आत्मसन्मान, साफल्य, अत्यानंद, काळभय, समर्थ प्रेरणा, वेदना-शमन, तीव्र स्वकीयभाव; असे आत्यंतिक टोकाचे भावानुभाव उचंबळून येतात. सेरोटोनिन, डोपामीन, एपिनेफ्रीन, नॉर-एपीनेफ्रीन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फीन अशी अती भावानुकूल रसायने मेंदूत स्रवत जातात. अनुभव मालिकांची बेरीज होत नाही, तर चक्क गुणाकार होतो. प्रत्येक घटितामागे कोणी हेतुधारी कर्ता-करवीता असतो हा तर माणसाचा आदिम मनगुण. मग या रसायनांच्या खेळात चल-अचल सृष्टीतील कोणत्याही सोयीच्या घटकाला तन-मन-हेतु वगैरे मानवी गुणांनी मढवले जाते. देवाचे देवत्व असे घट्टमुट्ट होत जाते.

कर्मकांडानी आणि प्रार्थनेनी परिस्थितीत बदल होत नसला तरी प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला आस्तिकांना बळ मिळतं. धर्म ही खरोखरच अफूची गोळी आहे. मेंदू वैज्ञानिकांच्या मते कोणत्याही आनंदानुभूतीच्या वेळी, म्हणजे अगदी संभोगापासून ते संगीतापर्यंत आणि चॉकलेट पासून ते गांजासारख्या आनंद-औषधांच्या सेवनादरम्यान मेंदूतील जे भाग उद्दीपित झालेले दिसतात तेच देवाधर्माचं करतानाही होतात. इतकी लोकं देवाधर्माच्या भजनी लागतात ते काही उगीच नाही. आशा, आधार, सांत्वन, धीर, विश्वास, सुरक्षितता, निश्चितता, विस्मय, विरेचन, मृत्युंजय भावना आणि अडचणीच्या वेळी सामजिक आधार अशा सर्व भावभावनांचा स्त्रोत आहे धर्म.
हे सगळं सोडून उघडं, नागडं, रौद्र, सत्य, ज्याला त्याला दाखवण्याचं कारणच काय?
कारण लवकरच ह्या सकृतदर्शनी साध्या आणि उपयुक्त वाटणाऱ्या कल्पनातून शोषण सुरु होतं. अविवेकी निर्णयांची आणि चुकीच्या आडाख्यांची मालिकाच सुरु होते. उत्साहवर्धक असतात तशाच हतोत्साही करणाऱ्याही असतात ह्या कल्पना. चुकीच्या मार्गानेही ढकलतात त्या. विशेषतः देव-धर्म ही बाब वैयक्तिक न रहाता सार्वजनिक, राजकीय होते तेंव्हा तर असं होतच होतं.
व्यक्तिगत धर्मही तापदायक ठरू शकतो. साधी, दानधर्मात रमणारी, कुणाच्या अध्यात न मध्यात, स्वांत:सुखाय देव मानणारी, देवभोळी माणसं; ही व्यक्तिश: चांगलीच असतात. त्यांचा धर्मही वैयक्तिक आणि इतरांना त्रास न देणारा असतो. पण हीच माणसं त्यांच्या धर्मियांच्या टोकाच्या धर्मांध विचारांना आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतात. धर्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत वगैरे तत्वज्ञान ह्याच मंडळींना भावतं. पण असल्या बंडलबाजीमुळे विज्ञानाची समज बोथट होते.
ह्या समजावून घेण्यात तीन संकल्पना महत्वाच्या. हे विश्व निर्हेतुक आहे, ह्याची जडणघडण सुघटित आणि सुरचित वाटत असली तरी ती निव्वळ अपघात मात्र आहे आणि मीच का? हा प्रश्न बराचसा अप्रस्तुत आहे.
निर्हेतुक विश्व
इतक्या अफाट, मती गुंग करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या विश्वाची निर्मिती आपोआप, निर्हेतुकपणे झालेली आहे अशी विज्ञानाची मांडणी आहे. त्यातही ही मांडणी सध्याची आहे, कदाचित उद्या काही वेगळे प्रत्ययास आले तर ही मांडणी बदलण्यास प्रत्यवाय नाही, अशीही विज्ञानाची मांडणी आहे. थोडक्यात ‘अंतिम सत्य’ वगैरे भानगड विज्ञानाला वर्ज्य आहे. ही मांडणी, सहसा सगळ्यांना वैफल्यवादी, अर्थशून्य आणि निराशाजनक वाटते. इतकी अनिश्चितता आणि निर्हेतुक करामत ज्यांना झेपत नाही ते आस्तिक बनून हरएक नैसर्गिक अथवा मानवी घटिताला हेतू आणि कारणे डकवतात आणि ‘अंतिम सत्य’ सापडल्याची तृप्ती कुरवाळत बसतात.
अपघातमात्र विश्वरचना
विश्वाची रचना कितीही सुघटित आणि सुरचीत वाटली तरी प्रत्यक्षात ही निर्मिती देव कल्पनेविनाही समजावून घेता येते. विश्वरचनेचा संपूर्ण उलगडा झाला नसला तरी देवाची जी सर्वोच्च करामत, जी की सजीव सृष्टी, तिच्या विलासाचा उलगडा बराचसा शक्य झाला आहे.
सजीवांची शरीरे वरवर पहाता कितीही सुबक, सर्वांगसुंदर, सुघटीत आणि सुरचित वाटली तरी उत्क्रांतीचा अभ्यास असं दर्शवतो की उत्क्रांतीच्या अनाहूत ओघात सजीवांच्या शरीररचनेत कित्येक दोष, चुका, कमअस्सल कारागिरी आणि ओबडधोबड घडण उतरलेली आहे. सजीवांची शरीरे ही कोणा बुद्धीवान निर्मिकाच्या परिपूर्ण निर्मितीची सजीव लेणी नसून; निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या, खळाळत्या प्रवाहाने घडवलेले गोटे मात्र आहेत. ह्यांची गोलाई प्रवाहाने घोटवलेली आहे कोणी सहेतुक घडवलेली नाही. सजीव शरीरे हा बुद्धिमंत निर्मितीचा पुरावा नसून निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या प्रतापाचा पुरावा आहे. हाच कार्यकारणभाव निर्जीव सृष्टीलाही लागू आहे असा विज्ञानाचा दावा आहे.
मीच का?
जे भोग आपल्या वाट्याला आले ते आपल्याच वाट्याला का आले? हा तर चिरंतन प्रश्न. चवचाल बायकोपासून ते चमडीच्या कर्करोगापर्यंत कशासाठीही हा प्रश्न विचारता येतो, विचारला जातो. याला योगायोग वगळता कोणतेही कारण नाही आणि स्वीकार वगळता कोणताही उपाय नाही. हे समजावून घेणे अतिशय अस्वस्थ करणारे असले, तरीही अंतिमतः गोलमाल, निरर्थक विचारव्युहातून मुक्तीदायी असते.
पण इतकाही विचार करण्याची गरज नाही. जर देव सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि कनवाळू आहे तर मग दवाखान्यांची गरज काय? आरोग्य विम्याची गरज काय? आस्तिकांनी सीट बेल्ट लावायची गरज काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करता येतील. या प्रश्नांना श्रद्धावानांकडे उत्तरेही तयार असतील. पण सत्य हेच की देवबिव कोणी आपली काळजी घेत नसतो. आपल्या मगदुरानुसार आपल्यालाच ते करावे लागते. पण आस्तिकांना हे सत्य कळले तरी वळत मात्र नाही. तसं बघायला गेलं तर आपापले देव वगळता अन्य देवतांवर आस्तिकांचा विश्वास नसतो. थोडक्यात ‘त्यांचा देव’ वगळता इतर देवांच्या बाबतीत ते नास्तिकच असतात. अल्लाचा बंदा राम-कृष्णावर विश्वास ठेवत नाही आणि सच्च्या रामभक्त येशूच्या बापाला जगाचा बाप मानत नाही. अशा हिशोबात नास्तिकांची संख्या जास्त भरेल!!
दैनंदिन जीवनात धर्माचे स्थान पूर्वीसारखे सर्वव्यापी राहिलेले नाही. देवशरण, दैवशरण, निष्क्रिय, आंधळ्या, आस्तिकतेपेक्षा; प्रयत्नवादी, क्रियाशील, शोधक, डोळस, नास्तिक विचार उन्नत खराच. विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवादाची कास धरून माणसानी तूफान प्रगती केली आहे. पण धर्म संपेल का, या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. धर्मामागे भगवंताचे अधिष्ठान नसले तरी त्यामागे मानसशास्त्रीय आणि उत्क्रांतीशास्त्रीय अधिष्ठान आहे. तेंव्हा धर्माला हद्दपार करणे, नजीकच्या भविष्यकाळात तरी, अशक्य नसले तरी अवघड आहे, असं वाटतं.
नास्तिकांनी धर्माचा दुस्वास आणि धार्मिकांचा उपहास करण्याऐवजी दोहोंचा अभ्यास केला पाहिजे एवढं मात्र खरं.

प्रथम प्रसिद्धी:- नवभारत डिसेंबर २०२०

काही संदर्भग्रंथ :-
Why We Believe In God(S)
J. Anderson Thomson

In Gods We Trust
Scott Atran

Religion Explained
Pascal Boyer

The Skeptic’s Guide to the Universe
Steven Novella

The Faith Instinct
Nicholas Wade

A History of God
Karen Armstrong

समाजविचार

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

10 Feb 2021 - 4:13 pm | उपयोजक

डोळे मिटून आधी विश्वास ठेवा, पुरावा कसला मागता? थेट प्रचीतीच पहा, असं धर्मशास्त्र सांगतं.
हे धर्मशास्त्र कशाला कितीतरी मानसोपचारतज्ज्ञसुद्धा सांगतात की.अजिबात वैज्ञानिक आधार नसणारा 'लॉ ऑफ ऍट्रॅक्शन' मानणारे कितीतरी मानसोपचारतज्ज्ञ आहेत.असे मानसोपचारतज्ज्ञ हे विज्ञानाचे शिक्षण घेऊनही 'आकर्षणाच्या नियमा'वर विश्वास का ठेवतात? काय म्हणाल याबद्दल?

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Feb 2021 - 5:32 pm | चंद्रसूर्यकुमार

या लेखाचे मराठीत भाषांतर करून कुठे मिळेल?

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा

मी करून देईन की !*

*अटी आणि शर्ती लागू

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Feb 2021 - 5:42 pm | चंद्रसूर्यकुमार

बेशर्त सहमती :)

...
एकतर लेख अतीदीर्घ असल्याने पूर्ण वाचला नाही!
दुसरं म्हणजे उपशीर्षक - एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा

एका "अ-धार्मिक कल्पनेची धार्मिक चिकित्सा" किंवा ""अ-अध्यात्मिक कल्पनेची अध्यात्मिक चिकित्सा" जर केली तर त्या चिकित्सेचे निकाल कितपत योग्य धरता येतील?
उदा. सुर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा लघुग्रहपट्ट्यातील 'सेरेस' वर होणारा परिणाम, या अ-धार्मिक कल्पनेची चिकित्सा बारावी-बीएस्सीच्या भौतिक शास्त्राच्या पुस्तकातील थियरीप्रमाणे करावी की अथर्ववेदातील ऋचांच्या साहाय्याने?
कर्बद्विप्राणिल वायूमुळे समुद्राच्या जलपातळीवर होणारा परिणाम व त्यामुळे प्रशांत महासागरातील बेटांवर असणार्‍या जैववैविध्याला असणारा धोका, या अ-अध्यात्मिक कल्पनेची चिकित्सा भावार्थदीपिकेतील ओव्यांच्या मार्गदर्शनातून करावी की एकनाथी भागवतातून?

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 5:07 pm | मुक्त विहारि

आणि सामाजिक गरज आहे ...

1. आपल्या चुका प्रत्येक वेळी, नवर्यावर ढकलता येत नाहीत, म्हणून देव हवाच.
2. देवाला दोष दिला की मानसिक शांतता मिळते .

शा वि कु's picture

10 Feb 2021 - 7:52 pm | शा वि कु

देवाला खरोखरीच दोष दिला तर मानसिक शांतता ढळायला वेळ लागत नाही...

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 8:04 pm | मुक्त विहारि

उलट आहे.....

देवाच्या नादात, माणसे शुद्ध हरवून बसतात....

ज्यूंचे शिरकाण, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये झालेले, हिंदूंचे शिरकाण, लोप झालेली माया आणि रोमन संस्कृती... हे फक्त जमीन आणि पाण्यासाठी, झालेले नाही ....

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2021 - 5:13 pm | चौथा कोनाडा

अरे देवा !
आता परत चर्चा सुरू होणार;
अ) देव आहे की नाही
ब) आस्तिक वि. नास्तिक

धागा बहुधा शतकी होणार !

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 5:24 pm | मुक्त विहारि

तितकी, जमीन आणि पाण्या वरून, झालेली नाहीत...

हो ना.. काय काय ऐकायला आणि वाचायला लागेल काही सांगता यायचं नाही! ;-)
बाकी लेख फारच मोठा असल्यानं फुरसतीत वाचण्यासाठी ठेवतो.

हो ना.. काय काय ऐकायला आणि वाचायला लागेल काही सांगता यायचं नाही! ;-)
बाकी लेख फारच मोठा असल्यानं फुरसतीत वाचण्यासाठी ठेवतो.

इतक्या दिवसांनंतर पूर्ण वाचला लेख.
छान लिहिलंय. मुळातच देव या संकल्पनेची उत्पत्ती कशी झाली असावी यासाठीचा हा उहापोह वाटला.
अगदी संगतवार लावून शक्य तेवढ्या तार्किकतेने विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.

तर्कदुष्टतेचा दोष पत्करून काही प्रश्न मांडतो -
१. धर्ममार्तंड, विज्ञानमार्तंड हे शब्द अस्तित्वात का आले असावेत? त्यांचा अर्थ काय?
२. भोंदूगिरी / बदमाषी सर्वच क्षेत्रात नसते काय? असल्यास सर्व क्षेत्रं चुकीची म्हणावीत काय?
३. प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची काहीएक विशिष्ट पद्धत असते. सर्व विषय एकाच पद्धतीनं अभ्यासले जावेत हा अट्टहास ठेवला तर ते योग्य होईल काय? असा अट्टहास "वैज्ञानिक" म्हणता येईल काय?
४. अभ्यासाच्या पद्धतीनुसार आणि त्या अभ्यासाच्या होणार्‍या परिणामांनुसार, त्याचं आकलन आणि चिकित्सा करण्याची पद्धत बदलत जाते. असं म्हणणं चूक ठरेल काय?
५. अज्ञाताच्या शोधाबद्दल उत्सुकता असणं चुकीचं आहे काय? तर्कानं अज्ञाताचं संपूर्ण आकलन शक्य आहे काय?
६. अध्यात्म म्हणजे काय? देव म्हणजे काय? देवाचा अध्यात्माशी संबंध कसा जोडावा?
७. अध्यात्म अभ्यास जर पटला आणि योग्य वाटला तर त्या वाटेवरून आपण चालाल काय?

ही प्रश्न मांडण्याची अनेक कारणं आहेत. पण मुख्य कारण म्हणजे, चर्चा उगाच होतेय की तिचा काही उपयोगही होणार आहे ते बघावे यासाठी आहे. :-)

राघव

मराठी_माणूस's picture

16 Feb 2021 - 12:46 pm | मराठी_माणूस

चांगले प्रश्न

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2021 - 5:39 pm | चौथा कोनाडा

😊

देव नाकरावा म्हणून खूप वर्षांपासून अगदी गौतम बुद्ध च्या अगोदर पासून खूप लोकांनी प्रयत्न केले.
देव कसा नाही जे काही विश्व दिसत आहे ती देवाची करणी नसून ती नैसर्गिक क्रिया आहे हे सांगून झाले .
लोकांवर त्याचा किंचित ही परिणाम पहिला पण होत नव्हता आणि आता पण होत नाही.
लोकांच्या मनात देव ही कल्पना फिट बसलेली आहे ती निघणे केवळ अशक्य आहे.
त्या मुळे व्यर्थ दगडावर माथा आपटून फायदा नाही .लोक आपली धारणा सोडणार नाहीत.
सायन्स किती ही प्रभावी दिसत असले तरी विश्व निर्मिती चे कोडे त्याला नगण्य प्रमाणात च समजले आहे अजुन खुप प्रश्न अनूतरित आहेत .
म्हणजे सोडवकेके प्रश्न अर्धवट सोडवले ले आहेत ह्यांची उत्तर पण अजुन माहीत नाहीत फक्त काहीच स्टेप्स सोडवल्या आहेत .
आणि न सुटलेले प्रश्न पण खूप जास्त आहेत ह्यांची कोणतीच स्टेप्स सुटली नाही.
त्याच मुळे विश्व निर्मिती
हे गूढ पूर्ण उकले ल तेव्हाच देव संकल्पना नाकारली जाईल .
तो पर्यंत बिलकुल तुमचे विचार कोणी स्वीकारणार नाही.

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 5:41 am | चौकस२१२

सायन्स किती ही प्रभावी दिसत असले तरी विश्व निर्मिती चे कोडे त्याला नगण्य प्रमाणात च समजले आहे अजुन खुप प्रश्न अनूतरित आहेत .
आणि हे नास्तिक किंवा शास्तर्ण्य मान्य करतात... कोणतेही आढेवेढे ना घेता.

उलट "आस्तिक" म्हणवणारे ( किंवा जास्त करून त्याच्या आहारी गेलेलं असे म्हणूयात हवे तर ") मात्र हेच धरून बसतात कि अध्यात्माला - मग त्यात देव आले त्यांचे दलाल म्हणजे गुरु बुवा एवेन्जलिकल ख्रिस्ती गुरु किंवा पीर बाबा . याना सगळे कळलेलं आहे
त्यावर पूर्ण विश्वास ठेवाच ... नाहीतर काही खरं नाही ...
आणि इथेच तर गोची आहे
एक बाजू हे मान्य करते कि आम्हाला सगळे कळले नाही आणि कळणार हि नाही
दुसरी बाजू मात्र तेवढी मन मोकळी दिसत नाही ..
अरे बाबाबानो आहे रे देव .. पुढे काय .. उद्याची ७:१२ लोकल पकडायची टळली आहे का ? नाही ना ?

प्रचेतस's picture

10 Feb 2021 - 6:18 pm | प्रचेतस

लेख विस्तृत असला तरी उत्तम आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Feb 2021 - 6:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

अस्तिक आणि नास्तिक दोघांतही एक साम्य आहे

ते म्हणजे

दोघांच्याही डोक्यात केमिकल लोच्या झालेला असतो

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 6:33 pm | मुक्त विहारि

आपल्या चुकीचे खापर, देवावर फोडता येते ...

शा वि कु's picture

10 Feb 2021 - 6:34 pm | शा वि कु

दीर्घ लेख असला तरी अगदी ओघवता आहे. मध्ये पॅराग्राफ आणखी पाडून नवे दिली असती तर आणखी सोप्पे झाले असते.

मूकवाचक's picture

10 Feb 2021 - 6:56 pm | मूकवाचक

देवशरण, दैवशरण, निष्क्रिय, आंधळ्या, आस्तिकतेपेक्षा; प्रयत्नवादी, क्रियाशील, शोधक, डोळस, नास्तिक विचार उन्नत खराच.

- सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।। - या उक्तीप्रमाणे आचरण करणारी एकही व्यक्ती कधी निपजली नाही हे नव्यानेच समजले. वास्तव असे आहे की प्रवृत्ती आणि निवृत्ती या मनाच्या अवस्था आस्तिक आणि नास्तिक दोन्हींमधे असतात. प्रवृत्ती आंधळी असू शकती आणि निवृत्ती डोळस असू शकते. सत्य आणि सौंदर्याला शिवत्वाचे कोंदण मिळाले तर दुग्धशर्करा योग होतो असे मानणारे देखील प्रयत्नवादी, क्रियाशील, शोधक, डोळस वगैरे वगैरे लोक्स अगणित होते, आहेत आणि असतील. असो.

विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवादाची कास धरून माणसानी तूफान प्रगती केली आहे.

- हे फार फार तर अर्धसत्य आहे असे म्हणता येईल. युद्धासारख्या आव्हानात्मक प्रसंगामधे देखील मानवी सृजनशीलता पणाला लागून विज्ञान, तंत्रज्ञान तसेच मानसशास्त्रासारख्या क्षेत्रांमधे नवनवे शोध लागलेले आहेत. या सृजनाचा विधायक उपयोग देखील भरपूर झालेला आहे. धर्मनिष्ठ व्यक्ती अविवेकी, मानवतेची शत्रु आणि अनुदार असते असे सरसकट गृहीत धरणेच मुळात अनुदारपणाचे आणि अविवेकी आहे. धार्मिक वृत्तीच्या लोकांनी जीवनाच्या सगळ्याच प्रांतात भरीव, विधायक योगदान दिलेले आहे हे मान्य करण्यातच खरा विवेक आणि उदारमतवाद आहे. असो.

गोंधळी's picture

10 Feb 2021 - 7:01 pm | गोंधळी

जगाची उत्पत्ती हा प्रक्रीयेचा भाग असेल तर ही प्रक्रीया कोणी बनवली ?
वाचतो आहे.

सोत्रि's picture

10 Feb 2021 - 7:16 pm | सोत्रि

ही प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं की कोणी बनवली हे महत्वाचं?

कोणी बनवली हे कळलं तरीही प्रकिया आपोआप कळणार नाहीच ती समजावून घ्यावीच लागेल आणि एकदा का ती प्रक्रिया कळली की कोणी बनवली ह्याला काही महत्व उरत नाही.

गुरूत्वाकर्षणचा नियम कळून रॅाकेट बनवताना तो नियम समजणं महत्वाचं, तो नियम न्युटनने उलगडून दाखवला हे नुसतं कळण्याने रॅाकेट बनवता येणार नाही. आणि नियम नीट कळून रॅाकेट बनवता आलं तर न्युटनचं नावही माहिती नसलं तरी रॅाकेट उडणारच.

- (प्रक्रियक) सोकाजी

सोत्रि's picture

10 Feb 2021 - 7:05 pm | सोत्रि

सजीव शरीरे हा बुद्धिमंत निर्मितीचा पुरावा नसून निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या प्रतापाचा पुरावा आहे.

धर्मामागे भगवंताचे अधिष्ठान नसले तरी त्यामागे मानसशास्त्रीय आणि उत्क्रांतीशास्त्रीय अधिष्ठान आहे

हा लेखातला दृष्टीकोन भन्नाट आहे.

लेख खुपच विस्तृत आहे आणि शास्त्रीय चौकटीत उहापोह करणारा असली तरीही लेखाचा समारोप लेखाच्या शिर्षकाला न्याय देत नाही!

- (शहाणासुरता) सोकाजी

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Feb 2021 - 7:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

बाकी, अनुभवांती शहाणपण!

प्रकाश घाटपांडे's picture

10 Feb 2021 - 7:43 pm | प्रकाश घाटपांडे

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात? हा प्रश्न असा ही घेतात की मानतातच कसा? जी गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट तुम्ही मानताच कशी? याचा अर्थ तुम्ही यडपट आहात. तुमच्या बुद्धीचा विकास अजून व्हायचा आहे. जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती मानणे हा मनोविकार आहे. शहाणे करुन सोडावे सकल जन म्हणून आमचे ते कर्तव्य आहे की तुम्हाला सत्याची जाणीव करुन देणे. एवढ आम्ही कंठशोष करुन सांगतोय की जी गोष्ट नाहीये ती मानणे तद्दन मुर्खपणा आहे तर तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला (वैचारिक) झोडपूनच काढले पाहिजे.तुम्हाला विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? ईश्वर या गोष्टीला विज्ञानात काहीही आधार नाही ती मानायची कशाला? अंधश्रद्धाळू कुठले? संकल्पना पातळीवर तरी कशाला मानायचा? उगीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल कपोल कल्पित संकल्पना मांडत बसून फुकट वैज्ञानिक जाणीवांचा अपमान करायचा? जे विज्ञान सिद्ध आहे तेच मानावे. जर ईश्वर विज्ञानाने सिद्ध केला तर आम्ही तो तेव्हा मानू. जी गोष्ट कदापिही शक्य नाही.अन काय हो तुमचा तो निर्गुण निराकार ईश्वर मानला काय आन न मानला काय? अन जो नाहीच आहे तो काय शिक्षा देणार?तुमची सदसदविवेकबुद्धि दिलीय ना निसर्गाने ती वापरा. कशाला देव पाहिजे? मी सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून खोटे बोलणार नाही. देवाला आवडत नाही म्हणून नाही. तुम्ही देवाला आवडत नाही म्हणून खोटे बोलणार नसाल तर आम्हाला ते मान्य नाही................

ईश्वर या गोष्टीला विज्ञानात काहीही आधार नाही ती मानायची कशाला

विज्ञानाने कशाच्या आधारावार ईश्वर या गोष्टीला आधार नाही हे सिद्ध केलंय?

कोणी काय म्हणतंय किंवा आधार देतंय ह्यापेक्षा आपल्या स्वानुभूतीने जे आधारभूत ठरतं ते मान्य करणं हे जास्त शास्त्रीय नाही का?

- (स्वानुभवी) सोकाजी

प्रकाश घाटपांडे's picture

10 Feb 2021 - 8:08 pm | प्रकाश घाटपांडे

काही लोक असे असू शकतात की ज्यांना देव या संकल्पनेच्या आधाराची आयुष्यभर गरज पडली नाही. काही लोक देव या संकल्पनेचा गरजेपुरताच ( संकट काळी) आधार घेतात पण त्यात अडकून पडत नाही. ( स्वार्थी लेकाचे! ) काही लोक सर्वकाही सुरळीत चालले आहे पण हे असेच चालू राहील याची खात्री नाही तेव्हा सुखाच्या प्रसंगी सुद्धा देवाची आठवण ठेवतात व कृतज्ञता व्यकत करतात.
यावरुन एक आठवण आली.मध्यंतरी बी प्रेमानंद जे अब्राहम कोवूर यांच्या चळवळीचा वारसा चालवणारे एक निरिश्वरवादी ( विवेकवादी / बुद्धीप्रामाण्यवादी) चिकित्सक कार्यकर्ते. त्यांच्या आजारपणात शेवटच्या दिवसात एक अशी अफवा / बातमी पसरली कि त्यांनी ईश्वराची संकल्पना मान्य केली/ इश्वर मानला. त्यामुळे एक स्केप्टिक लोकांनी त्यांचे एक स्टेटमेंट घेतले की मी ईश्वर मानीत नाही व त्यांची सही घेतली व ते पत्रक प्रसिद्ध केले.( आता मला त्याचा दुवा देता येणार नाही पण मला मेल आले होते) त्यानंतर ते गेले.
नास्तिकतेच्या टप्प्यातील काही लोक सश्रद्ध व अस्तिक लोकांविषयी ममत्व बाळगून असतात त्यांना कट्टर नास्तिक लोक 'कच्चे मडके' असे संबोधतात. त्यांचे मते ईश्वर मानणार्‍यांना संधी मिळेल तिथे झोडपले पाहिजे व नास्तिकवादाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. सामाजिक दबावामुळे तसे थेट म्हणण्याचे ते धाडस करत नसतील पण त्यांच्या लेखनशैलीतून/ बोलीतून तसे जाणवते. ईश्वर मानणारा तो अंधश्रद्ध अशी ती थेट मांडणी आहे. ईश्वर ही अवैज्ञानिक संकल्पना जो मानतो तो विज्ञाननिष्ठ तर नाहीच नाही पण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाराही नव्हे.
मानवीय नास्तिक मंच याचाच शब्दोच्छल होउन सामाजिक तडजोड म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती तयार झाली. मानवीय नास्तिक मंच या नावामुळे कार्यकत्ते वा सामाजिक स्विकार मिळण्यात नक्कीच मोठ्या अडचणी आल्या असत्या.
ईश्वर या संकल्पनेच्या विविधते मुळेच ईश्वर टिकून आहे.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 8:16 pm | मुक्त विहारि

समजा ह्या जगांत, माणसांनी देव ही संकल्पनाच मान्य केली नसती तर ....

युद्धे फक्त जमीन आणि पाण्या साठीच झाली असती ...

पण, त्याच बरोबर, कौटुंबिक दोष आणि वैयक्तिक अपयश, यांचे खापर, देवावर ढकलता आले नसते ....

तर आम्ही मानू असे नास्तिक लोक म्हणतात तसे आस्तिक लोक म्हणतात देव नाही तर विश्व निर्मिती,मानव निर्मिती,योग्य सुनियोजित पने कसे चालते ह्या सर्व प्रश्नांची विज्ञाना नी उत्तर द्यावीत आणि सामान्य लोकांना पडताळून पाहता येतील अशी ती उत्तर असावीत .
मग आम्ही त्याच क्षणी देव मानणे सोडून देवू.
गृहितक,शक्यता,प्रतक्ष सिद्ध न करता येणारे प्रयोग हे काही चालणार नाही.

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 8:20 pm | मुक्त विहारि

तुमच्या देवावर तुमची मनापासून श्रद्धा आहे का?

तूम्ही, जे काही करत आहात, ते सगळे देवाच्या इच्छेनेच चालते, असे तुम्हाला वाटते का?

तुमच्या अडचणी पण देवा मुळेच येतात आणि तुमची त्या अडचणीतून सुटका पण देवा मुळेच होते का?

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2021 - 8:34 pm | श्रीगुरुजी

मला कायम काही प्रश्न पडतात.

देव मानणे, न मानणे, एखाद्या विशिष्ट स्वरूपात मानणे, एखाद्या विशिष्ट कार्यात मानणे हे पूर्णपणे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. असे असताना देव मानणाऱ्या लोकांमुळे नास्तिकांना वारंवार का त्रास होतो? देव वगैरे नाही, देवाला रिटायर करा, देव मानणे अवैज्ञानिक आहे अशा मध्यवर्ती कल्पनेचे लेख वारंवार का लिहून सार्वजनिक केले जातात? दुसऱ्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा वारंवार का अनादर केला जातो? आस्तिकांमळे नास्तिकांना का त्रास होत असतो?

जर मला निळा रंग आवडत असेल, तर वारंवार लेख लिहून निळा रंग वाईट असे सांगत राहून हे काय मिळवितात?

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Feb 2021 - 8:44 pm | चंद्रसूर्यकुमार

+१ लक्ष

आणि दुसरे म्हणजे आस्तिक म्हटले की कर्मकांडे करणारे असणारच आणि कर्मकांडे करणारे म्हणजे आस्तिक असणारच अशी सोयीची व्याख्या बनवलेली असते. म्हणजे कर्मकांडे न करणारे (किंवा केल्यास इतरांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणारे) आस्तिक असू शकतात हे त्यांच्या गावीही नसते. तसेच कुठेतरी पाप केलेले असल्यास त्याची मनाला लागलेली टोचणी असते ती कर्मकांडे करून भरून काढणारे म्हणून मोठ्या पूजांचे वगैरे प्रदर्शन मांडणारे लोक हे खरोखरच आस्तिक आहेत का की कर्मकांडांच्या बुरख्याआड लपून स्वतःचा कार्यभार उरकणारे ढोंगी आहेत हा प्रश्नही त्यांना कधी पडताना दिसत नाही.

अवांतरः सगळे नास्तिक डावे असतात असे नाही पण सगळे डावे नक्कीच नास्तिक असतात. तेव्हा नास्तिकांमधील डाव्यांना उद्देशून-- या लोकांच्या आदर्शांनी (लेनिन, स्टालिन, चे गव्हेरा, माओ वगैरे) लाखो लोकांच्या हत्या केल्या तरी त्यांना आदर्श मानतच it was not real communism म्हणून हे लोक मोकळे होतात. त्याप्रमाणेच आस्तिकतेच्या नावावर बुवाबाजी, ढोंग, रस्त्यावरील धुडगूस चालतो त्याचे स्पष्टीकरण माझ्यासारख्या आस्तिकाकडे कोणी मागायला आले तर मी पण सरळ it was not real आस्तिकता असे म्हणून मोकळा होतो.

देवाची फुले,गंध यांनी सजलेली मुर्ती आणि दिव्यांनी सजलेला गाभारा पाहून मन प्रसन्न होऊन दोन मिनिटे हात जोडून मन:शांती मिळवणे इथपर्यंत समजण्यासारखं आहे. पण तासन् तास देवाची पुजा करत बसणे, वेगवेगळे अध्याय वाचत बसणे,स्तोत्रे म्हणणे,आपल्या प्रत्येक यशाला देवाची कृपा आणि अपयशाला पापाचे फलित,प्राक्तन वगैरे समजून निराश होणे हे फलदायी नाही.हा देवगंड आहे.कालापव्यय आहे.घाबरणे आहे.
देवाचे निरपेक्ष ध्यान हे पूर्वीचे विरक्ती आलेले संत,सत्पुरुष करायचे.ती जमात आताशा लुप्त झालीये.
सामान्य गृहस्थाश्रमी माणूस हा देवपुजेवर गरजेपेक्षा जास्त वेळ देऊन , कालापव्यय करतो त्यामागे त्याच्या वैयक्तिक समस्या दूर व्हाव्यात हाच एकमेव दृष्टीकोन असतो.भरपूर पैसा मिळावा, आजार बरे व्हावेत ,वंश वाढावा, कर्ज फिटावे हेच स्वार्थी हेतू असतात. या समस्या सुटाव्यात म्हणून त्यांच्या मुळाशी जाणे, तत्संबंधी उपायांवर वेळ खर्चणे, मदत मागणे हे तुलनेने यश देऊ शकणारे उपाय असताना कोणीतरी अस्तित्वात नसलेले आपली मदत करेल या भ्रामक विचारांच्या मागे लागणे यात केवळ कालापव्यय नसून वस्तुनिष्ठ विचार न करता कोणालातरी शरण जाणे , आत्मविश्वास गमावणे हे होऊ शकते.पाश्चात्य समाजात अशा देवगंडी लोकांची संख्या भारताच्या तुलनेत कमी असल्यानेच त्या देशांची इतकी प्रगती झाली नसेल का? रां. चिं.ढेरेंच्या खंडोबाविषयीच्या पुस्तकात तर सरळ लिहिलंय की खंडोबा इतका प्रसिद्ध का? याचं कारण एकच आहे.नवसाला पावण्याची खंडोबाची क्षमता ही अन्य देवांपेक्षा जास्त आहे असे लोकांना वाटू लागले म्हणून खंडोबा दक्षिण भारतातला सर्वात प्रसिद्ध देव बनला.

या अशा प्रकारांची पुढची पायरी म्हणजे बाबा,बुवांच्या कच्छपी लागून आर्थिक गंडा घातला जाणे.आपण अमुक देवाला,बाबा,बुवाला शरण गेलो की आपल्या समस्या सुटणारच हा विचार वस्तुनिष्ठ नाहीये.

नास्तिकांनी देवगंडी लोकांना जागे केले नाही तर हे प्रकार अजून वाढत जातील.द्यायचे का वाढून?

नास्तिकांकडून असे कोणत्यातरी अस्तित्व नसलेल्या गोष्टीच्या नादी न लागल्याने त्यांचे आर्थिक , मानसिक नुकसान काहीच होत नाही.जे ज्या विज्ञानाचा आधार घेतायत ते तार्किक कसोटीवर तावून सलाखून मग सिद्ध झालेले आहे. देव , पुजा, होमहवन , अध्याय, पोथ्या वाचन हे कंडीशनिंगचे मार्ग असले तरी त्याच्या जोडीला देवभोळेपणा, देवगंड, देवभिती येते.ज्यामुळे केवळ नुकसान आणि नुकसान होऊ शकते.या उपायांऐवजी जशी समस्या त्याप्रमाणे त्यावर वैज्ञानिक उपाय करणे, वाटल्यास मानसोपचार घेणे हे अधिक शास्त्रीय उपाय आहेत.वैज्ञानिक उपाय केल्याने नुकसान होत नाही. प्रश्न व्यक्तीस्वातंत्र्याचा नसून आहारी जाण्याचा आहे.

समाज सुधारणा करणे हा नास्तिक सहितिक लोकांचा हेतू नाही.इतके तर साफ आहे.
त्या पाठी वेगळाच हेतू आहे म्हणून सांशक आणि सावध राहवे लागते.
बाकी कसे वागावे,श्रद्धा ठेवावी की नाही ठेवावी, scientific दृष्टिकोन काय असतो हे आस्तिक लोकांना चांगले माहीत असते ..
त्यांना काहीच माहीत नाही असे नाही.
नास्तिक लोकांनाच दिव्य ज्ञाना ची प्राप्ती झाली आहे आणि त्या दिव्य ज्ञाना ची प्रचिती अस्तिकाना ना द्यायला हवी .असा काहीतरी त्यांचा आविर्भाव असतो
तो चुकीचा आहे एवढेच सांगायचे आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 12:42 am | श्रीगुरुजी

पण तासन् तास देवाची पुजा करत बसणे, वेगवेगळे अध्याय वाचत बसणे,स्तोत्रे म्हणणे,आपल्या प्रत्येक यशाला देवाची कृपा आणि अपयशाला पापाचे फलित,प्राक्तन वगैरे समजून निराश होणे हे फलदायी नाही.हा देवगंड आहे.कालापव्यय आहे.घाबरणे आहे.
देवाचे निरपेक्ष ध्यान हे पूर्वीचे विरक्ती आलेले संत,सत्पुरुष करायचे.ती जमात आताशा लुप्त झालीये.

मी बराच वेळ देवपूजा व काही इतर संबंधित गोष्टी करतो. त्यातून मला आनंद मिळतो. बाकी हे देवगंड, घाबरणे, कालापव्यय वगैरे काय असते? आमचे श्री गोंदवलेकर महाराज जे सांगतात त्याप्रमाणे परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो.

असे करणे हे माझे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मी हे करताना कोणाच्याही हक्कांचा भंग करीत नाही. आस्तिक विचारसरणीमुळे नास्तिकांना वारंवार का पोटशूळ उठत असतो हे मला समजत नाही, कारण कोणी नास्तिक असल्याने मला काहीही त्रास होत नाही.

नास्तिकांनी देवगंडी लोकांना जागे केले नाही तर हे प्रकार अजून वाढत जातील.द्यायचे का वाढून?

प्रयत्न करीत रहा. तुम्हास यश यावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

प्रश्न व्यक्तीस्वातंत्र्याचा नसून आहारी जाण्याचा आहे.

असेल, पण कोणी आस्तिक असल्याने किंवा अगदी देवाच्या आहारी गेल्याने तुम्हाला नक्की काय त्रास होतो? जर खरंच काही त्रास होत असेल तर त्रास दूर होण्यासाठी एखादा वैज्ञानिक उपाय करा (म्हणजे मानसोपचार वगैरे घ्या) म्हणजे त्रास दूर होण्यास मदत होईल.

अजून एक अनाहूत सूचना - आस्तिकांना नास्तिकतेकडे नेण्यासाठी कासावीस होण्याऐवजी दारू, विडी वगैरेच्या आहारी गेलेल्यांना व्यसनापासून दूर न्यायचा प्रयत्न केल्यास जास्त बरे होईल.

। श्रीराम जयराम जय जय राम ।

उपयोजक's picture

11 Feb 2021 - 2:06 am | उपयोजक

<प्रयत्न करीत रहा. तुम्हास यश यावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना.>

मी नास्तिक नाही.मी सुद्धा मंदिरात जातो.मी देवासाठी केल्या जाणार्‍या अवडंबराच्या विरोधात आहे.मी तुफान गर्दीची देवस्थाने टाळतो.

<देवाच्या आहारी गेल्याने तुम्हाला नक्की काय त्रास होतो?>
वैयक्तिक मला काही त्रास होत नाही.मी अशा कर्मकांडी लोकांच्या कर्मकांडाकडे दुर्लक्ष करतो.ते जमते मला.नास्तिक तसे का वागतात हे वर लिहिले आहे.नास्तिकांच्या विचारसरणीला वस्तुनिष्ठ अशा विज्ञानाचा आधार असतो.आस्तिकांच्या नाही पण देवाच्या आहारी गेलेल्यांच्या वर्तनाला कोणत्या वस्तुनिष्ठ शास्त्राचा आधार असतो?

शिवाय ही काही लोकांसाठी मानसिक उपचार पद्धति आहे ...

प्रश्न व्यक्तीस्वातंत्र्याचा नसून आहारी जाण्याचा आहे.
१००% सहमत
श्रीगुरुजी आपण म्हणतआ कि " असेल, पण कोणी आस्तिक असल्याने किंवा अगदी देवाच्या आहारी गेल्याने तुम्हाला नक्की काय त्रास होतो?
सांगू..एकतर वयक्तिक श्रेद्धेबद्दल हे म्हणणे नाहीहे वारीला म्हणल्याप्रमाणे आहारी जाण्याबद्दल आहे .. तरीही तिसऱ्या व्यक्तीला किंवा एकूण समाजाला* फार त्रास होत नसेल असे मान्य करतो आधी..
प्रश्न येतो जवळच्या व्यक्तीचा
उदाहरण देऊन सांगतो ..
जीवनात कठीण काळ असताना ( उद्योग/ नोकरी यातील यश/ अपयश ) मी जे काही प्रयत्न करीत होतो त्यात यश येत नवहते .. जवळची व्यक्ती तेव्हा जर हा धोशा करत बसली कि " हा....म्म्म्म पण ते जरा अमुक अमुक प्रार्थना / देवीचे विदागार कार्याला पाहिजे होता ... तर त्या व्यक्तीने तसे करणे म्हणजे अन्याय अश्या एका स्कॅल्पवरील श्रदेहमुळे सम्रोचं जिवंत माणसाचं आणि त्याच्या प्रयत्नाचा अपमान कारण्यासारखे आहे
शेवटी मी त्या व्यक्तीला हे विचारले कि
- माझे प्रयत्न कमी पडत असतील, मी आळशीपणा करीत असें किंवा प्रयत्न चुकीचं दिशेनं चालू असतील तर जरूर बोल ना पण हे "कर्मकांडांचे तुणतुणे" का? कि ज्याच्यावर माझा काडीचाही विश्वास नाही ते मागे लावून माझ्य प्रामाणिक प्रयत्नांचा का असा अपमान केला जातोय???
हा जास्तीत जास्त "कठीण समयी मन शांत राहण्यस्तही काही एखाद म्न्त्र म्हणणे असे समजू शकतो . पण तो सुद्धा एक "सूचना" म्हणून... "ते तसे केले नाही म्हणून किंवा अमुक पोथी वाचली नाही म्हणून तुला यश येत नाही" हि ध अंधश्रद्धा आणि ती सुद्धा समोरच्याचं अस्तित्वाचा अपमान आहे
आणि समजा दव आहेच तर तो आनि मी बघून घेईन ना ! मध्ये हे बुवा , बाई , ताई महाराज कशाला पाहिजेत???

एक खुलासा मिपावरील अनेकनप्रमाणे मी हि लहानपणी एक सर्वसामान्य हिंदू मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहे माफक प्रमाणात माझ्या घरी हि सण, उत्सव, पूजा वैगरे होती , लहानपणी आणि अजूनही एखाद्या चांगली शांत हिंदू देवालयात गेल्यावर मन प्रसन्न होत.. पण या आहारी जान्याला विरोध आहे

* समाजाबद्दल: वयक्तिक श्रद्धेचा समाजाला काय त्रास होतो?
- श्रद्धा हि वयक्तिक बाब आहे हे जरी खरे असले तरी आपण व्यापक समाजात राहतो तेवहा त्या श्रद्धेचा जर सार्वजनिक जीवांवर परिणाम व्हायला लागला तर समाज बोलणारच...
- माझे म्हणे एवढेच आह एकी बाबानो आहे ना तुमची श्रद्धा ठेवा ती पण एकतर त्याचे अंधश्रेद्धेत रूपांतर करून सार्वजनिक जीवांवर परिणाम होऊ देऊ नका..

आग्या१९९०'s picture

11 Feb 2021 - 7:36 am | आग्या१९९०

श्रद्धा ही वैयक्तिकच असावी ती कुणावरही लादू नये किंवा तिचा दुसऱ्याला त्रास होऊन देऊ नये. आहे ना तुमचा गणपतीवर विश्वास मग करा त्याची तुमच्या घरात पूजा, त्याला रस्त्यावर आणून लोकांना का त्रास देता? वर्गणी पासून त्रास द्यायला सुरुवात होते ती विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंत चालू असते. ह्यात निष्कारण नास्तिक भरडले जातात. नास्तिकांमुळे असा कुणाला सार्वजनिक ठिकाणी त्रास होतो का?

मुक्त विहारि's picture

11 Feb 2021 - 9:52 am | मुक्त विहारि

सहमत आहे

आनन्दा's picture

11 Feb 2021 - 12:38 pm | आनन्दा

खरे आहे.

रोज पाच वेळा ध्वनिक्षेपक वापरून आजण द्यायची खरेच काही गरज आहे का?
आपल्या घरात डोळे मिटून बसले तर समाधान मिळणार नाही का? त्यासाठी रस्ता अडवून ट्राफिक ला त्रास द्यायची काय गरज आहे?

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2021 - 9:55 am | अनिरुद्ध.वैद्य

आणि समजा दव आहेच तर तो आनि मी बघून घेईन ना ! मध्ये हे बुवा , बाई , ताई महाराज कशाला पाहिजेत???

>>>

हे वाक्य मस्त आहे!

कोणी शिकवलं नाही तर बोलतादेखील येणार नाही अशी आपली अवस्था असतांना आध्यात्मिक मार्गदर्शकांबाबत असे प्रश्न का निर्माण होतात?

(बुवाबाजी करण्याला पुर्ण विरोध आहेच)

मुक्त विहारि's picture

11 Feb 2021 - 9:59 am | मुक्त विहारि

बुवांच्या कच्छपी लागून आर्थिक गंडा घातला जाणे.आपण अमुक देवाला,बाबा,बुवाला शरण गेलो की आपल्या समस्या सुटणारच हा विचार वस्तुनिष्ठ नाहीये.

सहमत आहे .....

बाबा महाराज यांनी घातला पाया, नेहरू झालेसे कळस

व्यक्तीपुजा किंवा व्यक्तीद्वेष अंगात भिनवायला, ही विचारसरणी योग्य पडते ....

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Feb 2021 - 10:15 am | चंद्रसूर्यकुमार

तासन् तास देवाची पुजा करत बसणे, वेगवेगळे अध्याय वाचत बसणे,स्तोत्रे म्हणणे,आपल्या प्रत्येक यशाला देवाची कृपा आणि अपयशाला पापाचे फलित,प्राक्तन वगैरे समजून निराश होणे हे फलदायी नाही.हा देवगंड आहे.कालापव्यय आहे.घाबरणे आहे.

तासनतास किंवा मिनिटोनमिनिटे मिपावर /फेसबुकवर किंवा अन्य कुठे प्रतिसाद वाचणे/लिहित राहणे हे पण फलदायी नाही आणि तो पण कालापव्यय आहे. प्रत्यक्ष जगात काय होते त्यापासून दूर पळून मिपा या आभासी जगात काय चालते याकडे लक्ष देणे हा पण पलायनवाद झाला. म्हणून तू मिपा/फेसबुक्/व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य कुठे वेळ घालवू नकोस हे मला कोणी इतरांनी सांगायचे काम नाही. तसे असेल तर कोणी (मी नाही) तासन तास देवाची पूजा करत असेल किंवा अन्य काही करत असेल तर ते तू करू नकोस हे इतरांनी सांगायचे काम नाही.

सामान्य गृहस्थाश्रमी माणूस हा देवपुजेवर गरजेपेक्षा जास्त वेळ देऊन , कालापव्यय करतो त्यामागे त्याच्या वैयक्तिक समस्या दूर व्हाव्यात हाच एकमेव दृष्टीकोन असतो.

बोल्ड फॉन्टमधील शब्दांकडे लक्ष वेधतो. इतरांची गरज नक्की किती हे तुम्हाला कसे कळले? तो कालापव्यय आहे की वेळेचा सदुपयोग आहे हे तुम्हाला कसे कळले? वैयक्तिक समस्या दूर व्हाव्यात हाच एकमेव दृष्टीकोन असतो की इतर कोणता दृष्टीकोन असतो हे तुम्हाला कसे कळले? आणि जरी वैयक्तिक समस्या दूर व्हाव्यात हाच एकमेव दृष्टीकोन असला तरी त्यात तुम्हाला प्रॉब्लेम काय?

भरपूर पैसा मिळावा, आजार बरे व्हावेत ,वंश वाढावा, कर्ज फिटावे हेच स्वार्थी हेतू असतात.

मी पण नोकरी आणि शेअर मार्केट ट्रेडिंग भरपूर पैसा मिळावा आणि कर्ज फिटावे याच स्वार्थी हेतूंनी करत असतो. त्यात इतरांना काही आक्षेप असायचे कारण नाही आणि असले तरी मला त्याची पर्वा नाही. मग एखाद्याला या स्वार्थी हेतूंच्या पूर्ततेसाठी काही दुसरे करावेसे वाटले तर त्यात इतरांना आक्षेप असायचे मला तरी कारण दिसत नाही. तो मार्ग योग्य नसेल तर यश मिळणार नाही. तो त्या माणसाचा प्रश्न. तुम्हाला (व्यक्तीशः नाही) मॉरल पोलिसिंग करायचा अधिकार कोणी दिला?

पाश्चात्य समाजात अशा देवगंडी लोकांची संख्या भारताच्या तुलनेत कमी असल्यानेच त्या देशांची इतकी प्रगती झाली नसेल का?

अजिबात नाही. निदान अमेरिकेत तरी भरपूर लोक आस्तिक असतात हे रविवारी चर्चबाहेर लागलेल्या गाड्यांवरून समजतेच.

रां. चिं.ढेरेंच्या खंडोबाविषयीच्या पुस्तकात तर सरळ लिहिलंय की खंडोबा इतका प्रसिद्ध का? याचं कारण एकच आहे.नवसाला पावण्याची खंडोबाची क्षमता ही अन्य देवांपेक्षा जास्त आहे असे लोकांना वाटू लागले म्हणून खंडोबा दक्षिण भारतातला सर्वात प्रसिद्ध देव बनला.

हा रा.चिं.ढेर्‍यांचा दृष्टीकोन झाला. आता उद्या दुसरा कोणी अशाच आस्तिक बाजूच्या पुस्तकातील एखादे वाक्य देईल म्हणजे ते लगेच प्रमाण बनते का? नसेल तर मग रा.चिं.ढेर्‍यांनी जे काही लिहिले हे (त्यांच्याविषयी आदर ठेऊन) प्रमाण आहे असे मला तरी वाटत नाही.

प्रश्न व्यक्तीस्वातंत्र्याचा नसून आहारी जाण्याचा आहे.

परत एकदा. कोण आहारी गेले आहे हे तुम्ही ठरवणार कसे आणि ते ठरविणारे तुम्ही कोण?

बाकी मी स्वतः कोणत्याही देवळात वगैरे कधीच जात नाही की नवसही बोलत नाही. पण दुसर्‍याला तसे करायचे असेल तर त्या माणसाच्या चॉईसमध्ये मी तरी नाक खुपसायला जात नाही कारण तसे करायचा मला तरी अधिकार नाही. पण तसा अधिकार आपल्याला दिला आहे हे नास्तिक लोकांना नेहमी वाटत असते म्हणून असल्या उंटावरून शेळ्या हाकणार्‍या लेखरूपी जिलब्या पाडल्या जातात.

जर दारू पिऊन गाडी चालवल्यास अपघात घडून इतरांना इजा होऊ शकते त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवायची नाही हे बंधन असलेच पाहिजे त्याप्रमाणे आपल्या तथाकथित आस्तिकतेचे प्रदर्शन रस्त्यावर लाऊडस्पीकर लावून बोंबलून केले जात असेल तर त्याला अटकाव केलाच पाहिजे. पण कोणी स्वतःच्या घराच्या चार भिंतीआड काही करत असेल तर इतरांना काही आक्षेप असायचे कारण नसावे.

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 10:31 am | चौकस२१२

पण कोणी स्वतःच्या घराच्या चार भिंतीआड काही करत असेल तर इतरांना काही आक्षेप असायचे कारण नसावे.
हो बरोबर .. चला सार्वजनिकतेचं बाजूला ठेऊ घरातीलच बोलू ...त्या घराच्या आत जर या अंधश्रेद्धेमुळे समोरच्या जिवंत माणसाच्या प्रयत्नची दखल घेण्याऐवजी "तू कुठे तरी कमी पडलास कारण तुझी श्रद्धा नाही, हे ते उपाय केलं नाहीस "असे कोणी करीत असेल तर?
माझा आधीच प्रतिसाद वाचा जरूर ... एक उप प्रश्न म्हणून विचारतो ..

आनन्दा's picture

11 Feb 2021 - 12:42 pm | आनन्दा

घरातले आहे ना, नळावर कशाला धुताय?
आधी त्यांना बदला, मग लोकांना सांगा नास्तिकता

हा का ना का!!

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 1:03 pm | चौकस२१२

आनंद अनेक :घरांमध्ये" हे वैचारिक वाद होत असतात याला तुम्ही "घरातले आहे ना मग बाहेर कशाला धुता.." असे हिणवणार असाल तर तो तुमचा प्रश्न आहे
आयुष्यातील अनुभव म्हणून आणि विषयाशी सुसंगत म्हणून लिहिले तयात कसली लाज !

आणि श्री गुरुजी... " हो व्यक्तीस्वातंत्र्य नावाचा प्रत्येकाला हक्क असतो" बरोबर पण त्या हक्का बरोबर जबाबदारी पण येते हे विसरू नका स्वतःचं श्रदेहपायी दुसऱ्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना कमी लेखणे हे मानवतेचं दृष्टितने कितीपत योग्य? जरा मी लिहिलेलले उद्धरण वाचा ..प्रसंग डोळ्यसमोर आणा

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 2:15 pm | श्रीगुरुजी

आणि श्री गुरुजी... " हो व्यक्तीस्वातंत्र्य नावाचा प्रत्येकाला हक्क असतो" बरोबर पण त्या हक्का बरोबर जबाबदारी पण येते हे विसरू नका स्वतःचं श्रदेहपायी दुसऱ्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना कमी लेखणे हे मानवतेचं दृष्टितने कितीपत योग्य? जरा मी लिहिलेलले उद्धरण वाचा ..प्रसंग डोळ्यसमोर आणा

दुसऱ्यांंच्या प्रयत्नांना कमी लेखणे, त्याची टिंगल करणे अयोग्यच आहे. मग ते श्रद्धाळूंनी केले काय किंवा विज्ञानवाद्यांनी केले काय.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Feb 2021 - 1:15 pm | चंद्रसूर्यकुमार

जर कोणाला मारहाण वगैरे होऊन कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होत असेल किंवा अन्य कोणती हानी होत असेल तर ते नक्कीच समर्थनीय नाही. पण अन्यथा काही आक्षेपार्ह नसावे.

तुला कमी मार्क पडले कारण तू अमक्यातमक्या बाईंच्या क्लासला गेला नाहीस आणि तुझा अभ्यास कमी पडला हे वाक्य अनेक घरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घरच्या शाळकरी मुलांना सांगितले जातेच. आता अमक्यातमक्या बाईंच्या क्लासला जाण्याऐवजी तू देवापुढे हात जोडले नाहीस म्हणून असे झाले ही दोन वाक्ये समकक्ष का वाटत नाहीत? तसे वाटत असल्यास तसे वाटायचे कारण की देवापुढे हात जोडले तर काही फायदा होत नाही हे गृहितक. आपल्या अभ्यासाबरोबरच कशावरून आपल्यामागे कोणीतरी आहे या भावनेतून मनशक्ती वाढून पूर्वी नसलेले बळ मिळत नसेल आणि त्या जोरावर पूर्वी अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य होत नसतील? बाकी या गोष्टी मनात शंकासूर थैमान घालत असेल अशा लोकांना कधी उपयोगी पडू शकत नाहीत. या गोष्टींचा अनुभव येण्यासाठी पूर्ण सरेंडर करायची गरज असते आणि तसे हे लोक जन्मात करणे शक्य नाही.

एखाद्याला असे बळ मिळायला कोणापुढे हात जोडायची गरज वाटत असेल तर 'नाही तू मूर्ख आहेस' हे सांगून नक्की काय मिळते? तुम्हाला नसेल ना तशी गरज वाटत तर ग्रेट. किप इट अप. पण इतरांची खिल्ली उडवायचा अधिकार तुम्हाला (व्यक्तिश: नाही तर नास्तिक कम्युनिटीला उद्देशून) कोणी दिला? बाकी असे लोकही सगळे व्यवस्थित चालू असते तोपर्यंत अशी इतरांच्या श्रध्देची खिल्ली उडवताना दिसतात पण काही संकट आल्यास त्यांचे हातही गुपचून कुठेतरी जोडले जातात हे पण बघितले आहे. :)

बाकी असल्या चर्चांना काही उपयोग नसतो. तस्मात या चर्चेत यापुढे प्रतिसाद नाही.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 11:09 am | श्रीगुरुजी

शतप्रतिशत सहमत! हेच मी आधी सांगत होतो. परंतु व्यक्तीस्वातंत्र्य नावाचा प्रत्येकाला हक्क असतो हेच बहुसंख्य नास्तिकांना मान्य नाही .

बरोबर प्रतिसाद आहे. इतरांच्या भानगडीत (ज्याचा परिणाम आपल्यावर होत नाही) आपल्याला नाक खुपसायचा अधिकार नाही हि साधी गोष्ट लोकांना समजेल तर शपथ.

शा वि कु's picture

11 Feb 2021 - 12:14 pm | शा वि कु

.

उपयोजक's picture

11 Feb 2021 - 5:25 pm | उपयोजक

१) एखादी व्यक्ती त्याच्या वैयक्तिक जीवनात काय करते ,कुठे वेळ घालवते याला कोणाचाच आक्षेप नसावा.नास्तिकच काय पण पोलिस प्रशासनही त्यात ठराविक मर्यादेपर्यंत लक्ष घालत नाही. पण घराच्या आत जे काही करत असेल त्यामुळे त्या करणार्‍या व्यक्तीचे किंवा घरातल्या इतरांचे शारिरीक किंवा मानसिक नुकसान होणार असेल तर किंवा घरात काही असे कृत्य केल्याने सामाजिक हिताला बाधा येणार असेल,शेजार्‍यांचे शारिरीक किंवा मानसिक नुकसान होणार असेल तर पोलिस हस्तक्षेप करतात,करायला हवा. आता श्रीगुरुजी हे तासन् तास पुजा करत बसले तर माझीच काय कोणाचीच हरकत नसावी. आपण त्याकडे श्रीगुरुजींना देवपुजेचा छंद आहे असे म्हणू शकतो.या छंदातून कोणाचंच कसलंही नुकसान होत नसेल तर अगदी दिवसभर त्यांनी पुजा केली तरी कोणालाच आक्षेप घेण्याचे कारण नाही.पण जगात देव मानणारी आणि तरीही त्या पुजेतून इतरांना कसलाही त्रास होऊ न देणारे लोकच सगळीकडे असतील असे नाही.उदाहरणार्थ ही बातमी पहा. अतिउच्चशिक्षित जोडप्याने त्यांच्या घराच्या आत देवाधर्माच्या आहारी जाऊन काय अघोरी कृत्य केले ते पहा.
https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/aaivadila...

आक्षेप या आणि अशा घातक प्रकारांना आहे.त्रास न देणार्‍या उपचारांना नाही.

२) तासनतास किंवा मिनिटोनमिनिटे मिपावर /फेसबुकवर ...... हे इतरांनी सांगायचे काम नाही.

देवाचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही.मिपा किंवा इतर कोणत्याही सोशल मिडियावरील व्यक्ती या अस्तित्वात असतात.त्या त्यांचे अनुभव सांगतात,मते मांडतात.काहीतरी चर्चा होते,वाद होतात,नवीन माहिती समजते,चुकीची दुरुस्ती होते. काहितरी वास्तवातली वैचारिक देवाणघेवाण होते.
देवाला तासन् तास गंध,फुले,अक्षता वाहत बसल्याने, त्याच्या पोथ्या,अध्याय वाचल्याने यातले काय होते? देवाशी संवाद होतो? देव बोलतो?
अर्थात वर सांगितले तेच परत लिहितो की यापासून कोणतीही इजा,सामाजिक हानी होत नाही तोपर्यंत कोणी आक्षेप घेऊ शकत नाही.मी देवगंड,कालापव्यय म्हटले असले तरी माझे वैयक्तिक मत आहे,आक्षेप नव्हे.किंबहूना तो कायद्यानेही मला घेता येत नाही.

३) इतरांची गरज नक्की किती हे तुम्हाला कसे कळले?.....वैयक्तिक समस्या दूर व्हाव्यात हाच एकमेव दृष्टीकोन असला तरी त्यात तुम्हाला प्रॉब्लेम काय?

जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिच्यावरील उपचारांसाठी वेळ देणे हा कालपव्यय नसेल तर अजून काय आहे? अशा गोष्टीवर २-३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ देणे हा कालापव्ययच आहे कारण त्यातून आऊटपुट काहीही नाहीये.
वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी देवाची पुजा,स्तोत्रे,अध्यायवाचन यापेक्षा जी समस्या असेल तिच्या मुळाशी जाऊन कारणे शोधून उपाय करणे हा अधिक फलदायी मार्ग नाही का? देव पौराणिक सिनेमात दाखवतात तसा भक्ताच्या समस्या सोडवायला प्रत्यक्षात कधीही येत नाही.अर्थात हे मॉरल पोलिसिंग नाही तर तुलनेने अधिक फलदायी मार्ग कोणता असू शकेल हे सांगण्याचा प्रयत्न आहे.कोणाला कोंबडा आरवला तरच सूर्य उगवतो असे म्हणायचे असेल तर माझी हरकत नाही. _/\_

जशी वारंवार भाजप विरोधकांवर टीका करावी वाटते तसाच प्रकार आहे.
देव मानणे अवैज्ञानिक आहे अशा मध्यवर्ती कल्पनेचे लेख वारंवार का लिहून सार्वजनिक केले जातात?
का करू नयेत ? देव आहेत या वर आधारित लेख, म्हणी कित्येक ठिकाणी असतात. आणि बरे, आस्तिक सुद्धा नास्तिकांशी भांडायला हिरीरीने येतातच की. कोणी वादात सहभागी व्हायला जबरदस्ती तर करत नाही ना ? मग नास्तिकांना त्यांच्या भूमिकेबद्दल जागृती करायला लेख लिहिले तर कुणाचे काय बिघडले ?

प्रचेतस's picture

10 Feb 2021 - 9:33 pm | प्रचेतस

शतप्रतिशत सहमत.

Rajesh188's picture

10 Feb 2021 - 9:02 pm | Rajesh188

1)आस्तिक सिद्ध न झालेल्या देवावर श्रद्धा ठेवतो.
२)नास्तिक देवाचे अस्तित्व नाही हे सिद्ध झाले नाही तरी त्या वर विश्वास ठेवतो
3) आस्तिक देव आहे आणि तो सर्वांनी मानलाच पाहिजे अशी वृत्ती ठेवतो
तर

4) नास्तिक देव नाही आणि तो कोणीच मानू नये अशी वृत्ती ठेवतो.
दोघांचे पण मत पुरव्यासहित सिद्ध झालेलं नसून सुद्धा.
5) आस्तिक आपल्या मताशी कट्टर असतात आणि कधी त्या साठी ते हिंसक पण होतात.
6) नास्तिक त्यांच्या मताशी कट्टर असतात आणि वेळ प्रसंगी ते त्या साठी हिंसा करतात.
7) आस्तिक पना मुळे , पाप पुण्य ह्या संकल्पना मुळे थोडा माणसाच्या क्रूर वागण्यावर निर्बंध येतात
6) नास्तिक लोकं मध्ये ही संकल्पना च नसल्या मुळे ती व्यक्ती क्रूर न वागणे हे फक्त त्या व्यक्ती च्या विवेक बुध्दी वर अवलंबून असते..
अशी खूप तुलना करता येईल आणि आस्तिक पना हा नास्तिक आसण्या पेक्षा खूप गरजेचा आहे असे वाटत जाईल.. .
कर्मकांड चा इथे आश्रय घेवू नये

अर्धवटराव's picture

10 Feb 2021 - 10:37 pm | अर्धवटराव

शिंप्याने ब्रेन सर्जनला अभ्यास करताना बघितले.
अशी फालतु मेहेनत करण्याऐवजी एक जास्तिचा खिसा आपल्याच मेंदुला शिवुन घेऊन त्यात सगळी माहिती का ठेऊ नये याचं त्याला आश्चर्य वाटलं.

जब्बरदस्त लेख. परिच्छेद पाडले असते तर वाचायला सोपा गेला असता. तरीही ओघवता आहे. देव का मानतात याचा उत्क्रांतीच्या दृष्टीने विचार केलाय तो आवडला.

ह्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत त्यांच्या धार्मिक एकत्मत्तेला सुरुंग लावणे.
Stepwise
1) पहिला देवावर च प्रश्न चिन्ह उभे करायचे लेख लिहून,सभा घेवून तसे विचार सारखे लोकांसमोर मांडायचे.
देव मानणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली की step 2
2) देव च नाही असे लोकांना पटवले की त्या नंतर रीतिरिवाज ना टार्गेट करायचे देव च नाही म्हंटल्यावर जे रीतिरिवाज आहेत त्याचा आधार च तुटतो.
रीतिरिवाज नष्ट झाले की
.
स्टेप 3
3) देव संपला ,रिती रिवाज संपले की कुटुंब पद्धती आणि भारतीय समाज मूल्य ह्यांना टार्गेट करायचे.
आणि ह्या सर्वांच परिणाम असा होणार की हिंदू संस्कृती पूर्ण संपणार .कुटुंब पद्धती,सामाजिक मूल्य सर्व संपणार.
आणि बहुसंख्य हिंदू ची दात आणि नखे काढलेल्या सिंह सारखी अवस्था होणार.
हाच मूळ हेतू असावा असा माझा दाट संशय आहे.

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 5:22 am | चौकस२१२

राजेश तुम्ही हे लिहलंय??? असो
तुमचाच तर्क अगदीच चुकीचा नसला तरी बरेच नास्तिक असे हि आहेत कि त्यांचा हेतू "हिंदू धर्म ( म्हणजे समाज ) फोडणे असा नाही.

माझेच घ्या. मी जवळ जवळ नास्तिकच झालोय पण भारतात तरी एक सामाजिक प्रश्न म्हणून हिंदू समाजाला मान असला पाहिजे आणि त्याला पाठिंबा देणारा आहे !

कानडाऊ योगेशु's picture

11 Feb 2021 - 7:50 am | कानडाऊ योगेशु

तुमचाच तर्क अगदीच चुकीचा नसला तरी बरेच नास्तिक असे हि आहेत कि त्यांचा हेतू "हिंदू धर्म ( म्हणजे समाज ) फोडणे असा नाही.

एकाच वेळी प्रखर विज्ञानवादी,कट्टर नास्तिक पण प्रचंड धर्माभिमानी अश्या व्यक्तिमत्वाच्या सावरकरांचे ढळढळीत उदाहरण समोर आहे ना.

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 8:01 am | चौकस२१२

अगदी १०००%
पण दुर्दवाने ( कि काही लोकांचं चापलुसी मुळे) त्यांच्यातील "प्रखर विज्ञानवादी,कट्टर नास्तिक" या गोष्टी विरल्या जातात
त्यांनीच पतितपावन मंदिर स्थापन केले हे विसरले जाते ...कारण काय आहे ते सर्वश्रुत आहे
जे कारण :भिडे गुरुजींना सांगली भागात बहुजन आणि मराठा समजातून पाठिंबा आहे " हे ज्या मनोवृत्तीला "पचतच" नाही तीच हि मनोवृत्ती
भाजपच्या स्थापनेत विजयाराजे "शिंदे" होत्या हे ज्या मनोवृत्तीला पचतच नाही तीच ती वृत्ती
सावरकरांनी म्हणे गांधीजींना लंडन मध्ये मत्स्य आहार कसा चांगलं हे "समजावून " सांगितले होते !

अनन्त अवधुत's picture

12 Feb 2021 - 12:07 am | अनन्त अवधुत

असे घडलेले उदाहरण मला माहिती आहे. ह्यात एक अख्खे कुटूंब आधी नास्तिक झाले, मग त्यात आई-वडील ह्यांनी धर्म बदलला. मुले नास्तिकच राहिले.

मुक्त विहारि's picture

11 Feb 2021 - 9:46 am | मुक्त विहारि

जो देवच मानत नाही, तो धर्म परिवर्तन कशाला करेल?

उलट, नास्तिकांचा सर्वात आवडता धर्म म्हणजे, हिंदू धर्म...

कारण, अशा माणसांना पण, हिंदू धर्म सामावून घेतो ....

नांव विसरलो, पण अशा नास्तिक माणसाला पण समाजाने, ऋषी म्हणून स्वीकारले होते, आणि तेही 2500 वर्षांच्या आसपास ...

व्यक्ति तितक्या प्रकृती असतात, हे हिंदू धर्मात, फार आधीपासूनच रूजलेले आहे....

दुर्दैवाने, बाबा महाराज यांनी, देवा ऐवजी स्वतःचे प्रस्थ निर्माण केले...

1000 वर्षांपुर्वीचे, एक तरी बाबा महाराज, यांचे मंदिर आहे का?

अनन्त अवधुत's picture

11 Feb 2021 - 10:50 pm | अनन्त अवधुत

नांव विसरलो, पण अशा नास्तिक माणसाला पण समाजाने, ऋषी म्हणून स्वीकारले होते, आणि तेही 2500 वर्षांच्या आसपास ...

चार्वाक ॠषी?

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2021 - 9:58 am | अनिरुद्ध.वैद्य

पोथीत तर्कटी वात्रट मंडळींचा उल्लेख आहे! त्याचे आज उदाहरण बघायला मिळाले ;)

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2021 - 10:01 am | अनिरुद्ध.वैद्य

पोथीत तर्कटी वात्रट लोकांचा उल्लेख आहे! महाराज १०० वर्षांपुर्वीही बरोबर होते हे पाहुन बरं वाटलं!!

मुक्त विहारि's picture

11 Feb 2021 - 10:35 am | मुक्त विहारि

पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, हिंदू स्त्रीयांची विटंबना होत असतांना, हे बाबा महाराज काय करत होते?

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 11:06 am | श्रीगुरुजी

हे होत असताना तेथील स्थानिक हिंदू काय करीत होते, तेथील पोलिस काय करीत होते, तेथील न्यायालये काय करीत होती, भारतातील नास्तिक हिंदू काय करीत होते?

जपानी सैन्य सिंगापूर, मलेशिया, चीन, कोरिया येथील स्त्रियांवर मनसोक्त अत्याचार करीत असताना भारतातील नास्तिक, पोलिस, न्यायालये, बौध्दधर्मी इ. काय करीत होते?

तो श्रीकृष्ण काय करत होता?

ज्यू लोकांचे हत्याकांड झाले, तेंव्हा त्यांचा देव काय करत होता?

झोराष्ट्रीयन लोकांना हाकलून लावले, तेंव्हा त्यांचा देव काय करत होता?

माया संस्कृती नाहीशी होत असतांना, त्यांचा देव काय करत होता?

रोमन संस्कृती नाहीशी होत असतांना, झ्यूस वगैरे इतर देव काय करत होते?

स्वयंरक्षणाला पर्याय नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

11 Feb 2021 - 10:35 pm | अनिरुद्ध.वैद्य

तुमचे नास्तिकवादी तेव्हा काय करत होते?

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 11:33 pm | श्रीगुरुजी

तेव्हा ते विज्ञान कसे श्रेष्ठ यावर लेख पाडत होते.

मी विज्ञानावर तरी अंधळा विश्वास का ठेवावा? विज्ञान तरी अजून कुठे परीपूर्ण आहे?

अडिच लाख वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास असलेल्या मानवाच्या आयुष्यात जेमतेम ४०० ते ५०० वर्षांपूर्वी हे विज्ञान आले. ज्याच्या कडे अजूनही सर्व प्रश्र्णांची उत्तरे नाहीत. ज्या प्रश्र्णांची उत्तरे आज आहेत असा दावा विज्ञान करते त्या प्रश्र्णांची उत्तरेही १०० वर्षांनंतर बदलणार नाहीत याची कोणतीही शश्वती नाही. (जे सहाजिकच आहे कारण जसससे नवनवे शोध लागत जातील तस तसे जुने निष्कर्ष पुन्हा पडताळावे लागतीलच.)

अशा बाल्यावस्थेत असलेल्या विज्ञानाची भलामण मात्र वैज्ञानिक अतिशय पोटतिडकिने करत असतात. पण त्या पेक्षा जास्त मोठा इतिहास असणारे "देव, धर्म, अध्यात्म इत्यादी" मात्र त्यांच्या दृष्टीने एक लोणकढी थाप असते. जगात कोणती गोष्ट सत्य असेल तर ते म्हणजे केवळ विज्ञान असा यांचा दावा असतो.

धर्माच्या उन्मादामुळे होणारा हिंसाचार ज्यांना अस्वस्थ करतो त्यांना जपान वर पडलेला अणुबाँब का बरे नाही विचलित करत? किंवा समुद्रावर तेलाचा तवंग पसरुन मरणारे हजारो मासे का बरे नाही दिसत? किंवा प्रदुषणाने भरलेला आसमंत बघून त्यांचे मन असेच का बरे उद्वीग्न होत नसावे?

दुसर्‍याच्या घरात घाण आहे हे सांगण्या आधी आपली घरे स्वच्छ करावी असे या वैज्ञानिकांना का बरे वाटत नसावे?

रस्त्यावर उलट बाजूने गाडी चालवून दहशत माजवणारे लोक ही पण विज्ञानाचीच पैदास आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरु नये. लायकी नसताना जर एखादी ताकद वापरायला मिळाली की त्याची परिणीती उन्मादातच होते आणि विज्ञान अशा माकडांच्या हाती कोलीत देण्याचे काम इमानेइतबारे करत आहे. दिवसेंदिवस हे नालयक लोक अधिक अधिक ताकदवान कसे होत जातील या कडेच विज्ञानाचे सर्वलक्ष केंद्रीत झालेले दिसते.

दरोडेखोरी म्हणाल तर ती विज्ञानात नाही का? रासायनिक खते वापरुन भरमसाठ उत्पादन काढायची आयडिया देणारे वैज्ञानिकांनी रासायनिक खतांच्या दुष्परीणामां बद्दल मात्र, अशी खते विकताना, सोयिस्कर मौन पाळले. प्लास्टीकचा भस्मासुर तर याच वैज्ञानिक लोकांनी मोठा केलेला आहे. यांच्या भयंकर उद्योगांनी हे लोक केवळ मानवजात नाही तर समस्त पृथ्वी वरची सजीव सृष्टी ला वेठीला धरत आहेत. (आठवा कोणत्या तरी देशाने समुद्रात हायड्रोजन बॉम्ब का अजून कोणतरी महाभयानक बॉम्ब फोडण्याची दिलेली धमकी. ज्याने सगळा समुद्र ढवळून निघणार होता आणि कितीतरी देश बेचिराख होणार होते. केवढा भयंकर व्हिडिओ होता तो?)

वैद्यकिय व्यवसायातील दरोडेखोरी तर सर्वश्रूत आहे. समोरच्या माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याची लुबाडणूक करणार्‍या डॉक्टर लोकांच्या कहाण्या कितीही संगितल्या तरी कमीच पडतील.

मग समाजाला खरी भिती कोणा कडून आहे? दैववाद्यांकडून का विज्ञानवाद्यांकडून?

पैजारबुवा,

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 12:05 pm | चौकस२१२

मी विज्ञानावर तरी अंधळा विश्वास का ठेवावा? विज्ञान तरी अजून कुठे परीपूर्ण आहे?
अजिबात ठेवू नका...विश्वास आंधळेपणाने विज्ञानाने सांगितलेल्या कोणत्याही
"बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" अश्या पद्धतीने हाताळा ना विज्ञानाने सांगितलेले सगळे
पण मग याचा पद्धतीने अध्यात्म वगैरे थोपवणाऱ्यांना सांगणाऱ्यांना आमच्यांकडून असेच प्रश्न येतील
फरक एवढाच आहे साहेब कि विज्ञान "मला सगळे समजले नाही " हे मान्य करायला तयार आहे .. अध्यात्म आणि त्याचे दलाल असे मोकळे पणा दाखवतात का? नाही...

आणि हो विज्ञानाचा दुरुपयोग मानवाने केला म्हणून विज्ञान आणि त्यातील पद्धती यावर का खापर फोडता
"विज्ञानाला सगळे समजले आहे" असे दावा कोण करताय हो? उगाच काय
इथे भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि श्रद्धेचं नावाखाली केलेली फसवणूक इत्यादी वर फक्त आक्षेप आहे

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 2:12 pm | श्रीगुरुजी

फरक एवढाच आहे साहेब कि विज्ञान "मला सगळे समजले नाही " हे मान्य करायला तयार आहे .. अध्यात्म आणि त्याचे दलाल असे मोकळे पणा दाखवतात का? नाही...

अध्यात्मिक अधिकारी असलेल्या कोणत्याही संतमहात्म्याने, मला विश्वाचे संपूर्ण ज्ञान झाले आहे, असा दावा केलेला नाही.

आणि हो विज्ञानाचा दुरुपयोग मानवाने केला म्हणून विज्ञान आणि त्यातील पद्धती यावर का खापर फोडता

तसेच अध्यात्माचा दुरूपयोग काही भोदूंनी केला म्हणून अध्यात्मावर खापर का फोडता?

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 2:56 pm | चौकस२१२

अध्यात्मावर खापर
नाही फोडत आहे ..त्याचा दुरुपयोग करून जे फक्त कल्पनेत आहे त्याला घट्ट कवटाळून समोरील जिवंत व्यक्तीचा एक प्रकारे अपमान करणाऱ्या वृत्तीला दोष देतोय

आता एक उदहरन देतो / अनुभव ... अध्यात्म्य वैगरे याच सदरात मोडणारे म्हणजे अंधश्रद्धा ... हिला कवटाळणे हे जरी "वयक्तिक स्वातंत्र्य" असले तरी त्याचा कधी कधी दुसऱ्याला त्रास होऊ शकतो याचे उदाहरण

होंशी संस्थेत एक नाटुकलं बसवत होतो , आधीच छोट्या संस्थेत कलाकार मिळणे अवघड , त्यामुळे संच जमा झाल्यावर तालमी सुरु zalyaa
२-३ तालमी नांतर त्यातील मुख पुरुष पात्राने मी काम करू शकत नाही हे सांगतले ( माणूस ४०+ उत्तम शिकलेला ) का विचारले तर म्हणाला आई नाही म्हणाली.. मीत्र होता म्हणून जरा रेटून विचारले कि आई का नाही म्हणाली.. काही अश्लील वैगरे आहे म्हणून?
नाही ... तसे काही नाही यात "मरणाचा" उल्लेख आहे म्हणून नको ! अशुभ असत.. म्हणाल अरे ठीक आहे उठल्याउठल्या बद्दल "मरण बद्दल बोलू नये हे ठीक पण याचा संधर्भ तरी बघ ..
प्रसंग असा होता विनोदी पद्धतीचा नाट्यप्रवेश , रात्री चोरी करायला आलेलया चोराला घराची मालकीण चोरी तर करून देतच नाही वर उलट "तू असा रात्री भिंती वरून उड्या टाकतोस , पाय मोडशील, मरशील सुद्धा आणि म्हणून जीवन विमा घे ". हे कसे पटवून देते आणि चोर, चोरी न करता उलट त्या हुशार बाईला ५ हजार कसे देऊन जातो ते दाखवलाय . यात "तू मरशील सुद्धा .. पायपवरून चढत उतरताना " हे या वाक्य काहीतरी अपशकुनी अशी श्रद्धा आईंची असल्यामुळे त्यांनी मुलाला तू काम करू नकोस असं सांगितले ..
आणि मला ऐनवेळी दुसऱ्या कलाकाराला शोधावं लागलं... म्हणजे त्यांच्या या "श्रद्धेमुळे" दुसऱ्याला त्रास झाला कि नाही ?
बरं असं हि नवहते कि काही अति वास्तववादी तिरडी चा रंगमंचावर वापर... त्यात हा आडवा असले काह्ही नाही.. एक विनोदी प्रसंगातील वाक्य.. फक्त

जाऊदे तुम्हाला नाही पटणार..
एवढंच सांगतो कि विचारसरणी अशी आहे कि
मला नवीन देऊळ कधी बांधवेसे वाटणार नाही किंवा सत्यनारायणाची पूजा केली किंवा नाही याने फरक पडणार नाही पण जर आजूबाजूच्या समाजाला या दोन गोष्टी हव्या असतील आणि त्याचा अतिरेक होत नसेल तर माझ्यासारखा त्याला पाठिंबाच देईल.. मग तो "शारदेचा" भाग असलं अंतरी " भाग असला तरी
भोंगळ झापड बांधलेल्या नास्तिकांशी ते जाणीवपूर्वक हिंदूंनाच फक्त लक्ष्य करीत असतील तर विरोध करेन पण त्याच बैठकीत आस्तिकांतील अंधश्रद्धेला (खास करून पांढरपेशी अंधश्रद्धा ) याला उघडे करण्याचा प्रयत्न करेन

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 3:04 pm | श्रीगुरुजी

असे अनेक ठिकाणी होत असते. नोकरीचे पत्र घेतलेले काही जण नोकरीवर दिलेल्या तारखेला येतच नाहीत व चौकशी केल्यावर काही तरी थातुरमातुर कारण सांगून तोंडघशी पाडतात. ठरलेले लग्न साखरपुड्याच्या आदल्या दिवशी मोडून व्याह्यांना तोंंडघशी पाडणारी काही उदाहरणे मी पाहिली आहेत. जेवायला सहकुटुंब येण्याचे मान्य करून आयत्यावेळी न फिरकून यजमानांची पंचाईत केलेले मी अनुभवले आहे.

हा मनुष्यस्वभावदोष आहे. येथे अध्यात्माचा संबंध नाही.

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 4:57 pm | चौकस२१२

नाही कसा ...
त्याने "आईची श्रद्धा, हे कारण दिले " पण आपल्या सर्व तांत्रिक शिक्षणाचा आणि अनुभवाचाच विचार करून हा तर्क नाही लावत आलं कि असे वाक्य असल्याने लगेच काही अशुभ होत नाही...
उगाच मानवाची स्वभाव वैग्रे काय कारण देताय !

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2021 - 5:09 pm | श्रीगुरुजी

आडमुठ्यांना कोणतेही कारण पुढे करता येते याची मी काही उदाहरणे दिली आहेत. हा स्वभावदोष असतो.

आनन्दा's picture

11 Feb 2021 - 4:46 pm | आनन्दा

आयला हे भारी आहे! म्हणजे त्याच्या दॄष्टीने आपण चोरी करत होतो नाटकात ते पाप नाही का? असल्या लोकांपुढे साक्षात परमेश्वर पण हात टेकेल!.

यांच्यावरून जर तुम्ही जनरलायझेशन करत असाल तर तुम्च्यापुढे पण आइनस्टाइन हात टेकेल! मी दाभोळकर म्हणत नाही, कारण दाभोळकर्प्रणित विवेकवादावर माझा विश्वास नाही :)

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 5:00 pm | चौकस२१२

यांच्यावरून जर तुम्ही जनरलायझेशन करत असाल
हे मला उद्देशून म्हणता आहात कि काय ते कळले नाही.. असाल असे गृहीत धरून पुढे उत्तर देतो
या अनुभवातून एक "श्रद्धा/ अंधश्रदेचा" आजूबाजूंचायवर कसा परिणाम होऊ शकतो याचे एक सूक्ष्म उदहरन दिसले म्हणून मांडले

शा वि कु's picture

11 Feb 2021 - 12:07 pm | शा वि कु

बाकी सगळे ठीक.

पण बॉंब फोडणारे, गाड्या धडकावणारे, पेशंटना लुटणारे लोकं विज्ञानवादी कसे बरं ?

बरं, विज्ञानवादी असणे, या एकमेव गोष्टींमुळे कोणी सर्वगुणसंपन्न नैतिक माणूस तयार होतो असे नक्कीच नाही. तसा दावा कोणी करत सुद्धा नाही. विज्ञानवादी असणे म्हणजे काय- माझ्या मते- तर्क आणि पुरावा यांपैकी एकाची तरी जोड असण्यापूर्वी कशावर विश्वास ठेवू नये असे मानणे म्हणजे विज्ञाननिष्ठ, किंवा विज्ञानवादी.

हे लक्षात घ्या, कि दैववादी असणे किंवा विज्ञानवादी असणे माणसाला नैतिक किंवा अनैतिक बनवत नसते. त्यासाठी आपली नैतिक जाणीवच पाहिजे.

विज्ञान (तंत्रज्ञान) एक साधन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विचारपद्धती. हि गोष्ट मुळात नीतिमत्ता वाढवण्यासाठी बनली नाहीच आहे. (कारण ही गोष्ट अशी काही अस्तित्वातच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जगाकडे पाहण्याची एक नजर आहे फक्त.) त्यामुळे तिच्यातून नीतिमान जग तयार होईल हि अपेक्षा फोलच आहे. त्यामुळे विज्ञानाने कधीही न केलेले प्रॉमिस आपण त्याच्या माथी मारतो, आणि त्याने ते पूर्ण नाही केले म्हणून नंतर त्यालाच दोष देतो.

धर्माच्या उन्मादामुळे होणारा हिंसाचार ज्यांना अस्वस्थ करतो त्यांना जपान वर पडलेला अणुबाँब का बरे नाही विचलित करत? किंवा समुद्रावर तेलाचा तवंग पसरुन मरणारे हजारो मासे का बरे नाही दिसत? किंवा प्रदुषणाने भरलेला आसमंत बघून त्यांचे मन असेच का बरे उद्वीग्न होत नसावे?

कोण म्हणतं उद्विग्न होत नाही ? Either or आहे काय , कि एकावरच उद्विग्न व्हायला पाहिजे ?? संसाधनांचा वापर (विज्ञान एक संसाधन आहे.) वाईट प्रकारे नक्की केला जाऊ शकतो. ह्यात दोष कुणाचा ? त्या संसाधनांचा कि व्यक्तीचा ?

विज्ञानवादी असण्याचा आणि विज्ञानातून तयार झालेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर यांचा काडीचा संबंध नाही. तुम्ही विज्ञानवादी असल्यावर तुम्हाला अणुबॉंबचे समर्थन करण्याची जबरदस्ती होत नसते. तुम्ही विज्ञाननिष्ठ आणि नैतिक असाल, तर तुम्हाला हिरोशिमा नागासाकी इतिहासातले काळेकुट्ट दिवस म्हणूनच आठवतील.

माणसाने अणुबॉंब बनवला तो आपले ज्ञान आणि बुद्धी वापरून बनवला. मान्य, बऱ्याचदा वाईट कारणासाठी हि बुद्धी लावली गेली. स्वतःचा आणि सभोवतालचा तर्कशुद्ध अभ्यास, म्हणजेच विज्ञान , वापरून माणसाने आपल्या अचाट क्षमतेचे सामर्थ्य दाखवले, मानवी बुद्धीचे सामर्थ्य. यातून त्याने नैतिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आणि अत्यंत विकृत गोष्टी घडवल्या. पण, अणुबॉंब बनणे टाइप कारणावरून जर तुम्हाला "विज्ञानवाद्यांची" भीती वाटत असेल, तर हे लक्षात घ्या, कि नैतिकता आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांची सरमिसळ झाल्यामुळे माणसाच्या सर्वोत्कृष्ट क्षमतेची तुम्हाला भीती वाटत आहे.

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 12:13 pm | चौकस२१२

विज्ञानवादी असण्याचा आणि विज्ञानातून तयार झालेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर यांचा काडीचा संबंध नाही.
बरोबर अगदी , सहमत

मुक्त विहारि's picture

11 Feb 2021 - 12:23 pm | मुक्त विहारि

सहमत आहे...

सोत्रि's picture

11 Feb 2021 - 12:24 pm | सोत्रि

दैववादी असण्याचा आणि दैववादातून तयार झालेल्या भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांचा काडीचा संबंध नाही.

सहमत?

- (कन्फ्यूज्ड) सोकाजी

मुक्त विहारि's picture

11 Feb 2021 - 12:28 pm | मुक्त विहारि

काही उदाहरणे बघीतली आहेत, त्यामुळे, ह्या वाक्याशी मी सहमत नाही ...

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Feb 2021 - 10:56 am | अनिरुद्ध.वैद्य

बरीच वैज्ञानीक दुरुपयोगी करणारी उदाहरणे बघीतलीत.

चौकस२१२'s picture

11 Feb 2021 - 12:38 pm | चौकस२१२

दैववादातून तयार झालेल्या भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि श्रद्धा...
हाहाहा म्हणजे हे असे समीकरण होऊ शकते हे मान्य तर !