कृष्णमयी ..... चकोर शाह
ते टेकडीवरचे झाड पाहिलस? एकटच उभे आहे. कधी पासून माहीत नाही.
मला आठवत तेंव्हापासून इथेच असतं .असंच आकाशाच्या कॅनवासवर सुकलेल्या फांद्यानी नक्षी उमटवत.
याच्या फांद्याना हिरव्या गार पानांनी नटलेलं कधी पाहिलं नाही, की त्यावरची फळं तोडायला कुण्यामुलांन दगड मारलेला पाहिला नाही. नाही म्हणायला हिवाळ्यात कधितरी एखादा चुकार पतंग याच्या फांद्यात अडकतो. काही दिवस फडफडत रहातो.प्रेमात पडल्यासारखा फांदीला बिलगतो. इतका की झाडाला फुल आलंय असे वाटावे. एक दोन दिवसच. वारं आलं की तो पतंग सुटायची धडपड करतो. त्याच धपडडीत फडफडून फाटून जातो. मग झाडाच्या सोबतीला उरतात नुसत्या शुष्क काड्या. कसल्याशा धाग्याने घट्ट बांधलेल्या.
कोणी म्हणतं की हे बेलफळाचे झाड होते. कोणी पांढर्या चाफ्याचे तर कोणी कशाचे. पण झाड कोणी तोडलं नाही हे नक्की.
वर्गात शंका विचारायला म्हणून मुलांनी हात वर करावा तसं त्याचं जमीनीतून बाहेर पडून वर आभाळात गेलेलं खोड. काय शंका विचारत असेल ना हे झाड?
तू विचारायच्या अगोदरपासून मलाही असंच वाटत होतं. पण कोणीतरी आपल्याला वेडं म्हणेल म्हणून कोणाला विचारलं नाही.
खरंच काय विचारत असेल आणि कोणाला विचारत असेल.
कोणाची तक्रार करत असेल ? माणसांनी दिलेल्या वागणूकीची की कोणी तरी दाखवलेल्या आशेची?
तुला विचारलं तर तू म्हणालास की हे प्रश्न एरवी पडत नाहीत. पण आपण स्वतः बद्दल विचार करायला लागलो की मग आसपासची प्रत्येक वस्तू आपल्याशीच जोडली जाते. लोक कशाचाही संबंध कशालाही लावतात. साधे बघ ना . हे एका वठलेल्या झाडाचे खोड. त्याचा तू विचार करतेस.
तू असे तोडून बोलत नाहीस. हल्ली बोलायला लागला आहेस.
मी पूर्वी असे विचार करायचे. पण हल्ली तू जसा विचार करतोस तसा विचार करायला लागलेय. बघ ना. प्रेमात असल्यावर लोक एकमेकांसारखे व्हायला बघतात.
मै तो अपने श्याम की
इक मीरा हो गयी बावरी.
श्याम रंंग मे रंग गयी इतनी.
कहने लगी सखी री मै सावरी.
गोरीपान मीरा बाई कृष्णाच्या प्रेमात पडल्यावर स्वतःला सावळी समजायला लागली.
मी तुझ्या सारखा विचार करायला लागलेय. तु जसा करतोस तसा.
तू आत्ता इथे असतास तर म्हणाला असतास की ते झाड उभे आहे कसल्या तरी आशेवर. कधीतरी आभाळ भरून येईल, ढग गडगडतील. वारा सुटून धूळ उडेल. आसपासचं दिसेनासं होईल इतकी. ही त्या अमृत वर्षावाची नांदी असेल.
कुठून तरी अचानक अंगावर शिडकावा होईल. एका थेंबानेही पूर्ण अंग शहारेल. हात पसरून जितका घेता येईल तितकी पाऊस अंगावर घेईन.आत कुठेतरी एक एक जग जागं होईल. ते बरसणारं अमृत पिऊन नवी उभारी धरेल. फांदीच्या टोकाला लाल किरमिजी रंगाची दोन पाने डोकावतील. हळू हळू उन पिउन ती मोठी होतील . सगळ्या फांद्यांना तसे फुटवे फुटतील आणि एक हिरवं जग या देखावर पुन्हा नांदायला लागेल. पांढर्या, नारिंगी रंगाची फुले फुलतील. एखादे लहानसे पाखरू येईल त्या फुलातला रस प्यायला. हिरव्या कच्च फांदीवर विसावेल. हलकेच आनंदाने तृप्तीची शीळ घालेल.
झाड त्या कल्पनेनं शहारतं. एका आशेवर मरगळ झटकून मुळं घट्ट रोवत पुन्हा उभे रहातं.
तुझी ती कविता वाचताना मी पण मीरेसारखी कृष्णमयी होते. तुझ्या भेटीच्या अमृत क्षणाची वाट पहात पुन्हा उभी रहाते.
तेरी आखोंसे पिला दे साकिया
आज तष्नगी मिटाने की आरजू है.........
ये दस्तूर था पहले कभी
के हमपियाले थे हम कभी
अब वो तवारीख बन गया है
निवाला भी हातोंसे खो गया है
... कृष्णमयी .... चकोर शाह
प्रतिक्रिया
28 Jan 2021 - 8:16 am | तुषार काळभोर
तेरी आखोंसे पिला दे साकिया
आज तष्नगी मिटाने की आरजू है.........
ये दस्तूर था पहले कभी
के हमपियाले थे हम कभी
अब वो तवारीख बन गया है
निवाला भी हातोंसे खो गया है...
वा! सुंदर! अतिशय खास!
28 Jan 2021 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है, लेखन आवडलं.
-दिलीप बिरुटे
28 Jan 2021 - 10:56 am | विजुभाऊ
धन्यवाद गुरुजी