३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
2 Apr 2009 - 12:16 pm

३ एप्रिल हा छत्रपतींचा निर्वाण दिन ! त्या पुण्यश्लोक छत्रपतींचे हे पुण्यस्मरण ! काय वाटत असेल आज त्यांना ? ही कल्पना मांडणारा हा लेख .....
उदय गंगाधर सप्रेअर्पण.....

आज ३ एप्रिल २००९ ! या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे / तारखेप्रमाणे आजपासून ३२९ वर्षांपूर्वी.....
शिवरायांचे स्वगत :
आज हनुमान जयंती - चैत्र शुध्द पौर्णिमा !
महाराज साहेब , आऊसाहेब , सई , काशिबाई.....आज आम्ही तुमच्या भेटीस निघालो.मगाशीच सर्वांशी निरवानिरव करुन झाली.सोयराबाई राणीसाहेब यांनी अशक्तम दुर्बलम अशा राजारामाच्या गुढग्याला छत्रपतीपदाचं बाशिंग बांधून ठेवलंय! आमचे सारे निरोप व खलिते - शंभूबाळांसाठी धाडलेले - रायगड उतरलेच नाहीत ! बाळाजींनी मघा नजर चुकवली , खलिते "पाठवले" म्हणाले ! अरे , दिलेरखानांस मिळून झाल्यानंतर , स्वराज्याचा खातमा होईल - आबासाहेबांच्या मनिषेच्या नरड्यालाच नख लागेल हे उशिराने लक्षात येतांच आपली चूक पदरांत घेण्याच्या विनंतीसह "आम्हांस साहेबी पायांची जोड आहे , आम्ही दूधभात खाऊन साहेबांच्या पायांचे चिंतन करून राहीन !" असे निष्कपटपणे आणि नि:स्वार्थीपणे सांगणारे शंभूराजे "आम्ही अत्यवस्थ आहोत !" असं कळल्यावरही पन्हाळा सोडून आम्हांकडे येणार नाहीत - या गोष्टीवर - एका वेळी तीन तीन बलाढ्य अश्या पादशाह्यांशी झुंजणारे छत्रपती विश्वास ठेवतील असे वाटणार्‍या सोयराबाईंच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते !
पुतळाबाई राणीसाहेबांस बोलावणे पाठवले तर "त्या स्वतःच आजारी आहेत" असं महाराणी सोयराबाई म्हणाल्या ! मूर्तीमंत वात्सल्याचा पुतळा असणार्‍या पुतळाबाई - स्वतः अत्यवस्थ असल्या तरी आमच्यासाठी यमराजांसही थांबावयांस सांगून आमच्या सेवेला धावत येतील हे काय आम्ही जाणत नाही?पुतळाबाई - ज्यांनी अहेवपणी गेलेल्या सईबाईंची हळदी कुंकवाची कोयरी - जी सोयराबाईंनी नाकारली - ती आजपावेतो जपली.....आम्ही आपले अनंत अपराधी आहोत पुतळा ! आपला दिल जाणून पण आम्ही आपल्या वाट्यास आलो नाही ! आम्ही "स्व"त्व विसरून स्वराज्य निर्माण केलं , पण हे "स्व"जनांनीच कलंकीत केलं !
गेली ३५ वर्षे अविरत हाकलेला हा स्वराज्यरथ - ज्याचा मी सारथी - तो मी पण आज कर्णासारखाच विवश ! त्याचं चाक धरेनं गिळलं , आमच्या स्वराज्य रथांस राज्याच्या असुरी लालसेनं ! जीवांस जीव देणारे हंबीरराव - त्यांस जाणूनबुजून महाराणींनी लांब धाडून दिले.....जे स्वराज्य घडविण्यात आम्ही आमची अख्खी जिंदगी खर्ची घातली , त्याचे आम्ही "राजे" होतांच एकमेव हंबीरराव सोडता समस्त अष्टप्रधान मंडळाला वंशपरंपरागत अधिकाराची हाव सुटावी? आणि सख्खी बहीण महाराणी असताना कुठलीच अपेक्षा न बाळगणार्‍या हंबीररावांच्या पाठच्या बहीणीने मात्र राज्यलालसा धरावी हा कुठला दैवदिर्विलास स्वराज्याच्या ललाटी लिहिलास रे शंभूमहादेवा ? बरे राज्यलालसा पण एकवेळ समजू शकतो , पण आजपावेतो अफूच्या मेहेरबानीवर गुंगीत ठेवलेल्या आपल्या जेमतेम १० वर्षे वयाच्या राजारामाला - स्वराज्याच्या वेशीवर दस्तक देणारा औरंगझेब आटपेल असं सोयराबाईंना वाटल्यांस नवल नाही पण या जनानी बुध्दीत बाळाजी आवजींसकट सार्‍यांचीच बुध्दी वाहून जाण्याएवढे का स्वराज्य वांझ ठरावे?
हे मृत्यो , आम्ही तुझे स्वागत करतो , ये ! समर्थ रामदांस - ज्यांनी आयुष्यभर ज्या हनुमंताची देवळे ये देशी स्थापिली , त्या रामाच्या दासाची आज जयंती ! आजच्या एव्हढा दुसरा कुठला मुहुर्त आपणाकडे येण्यांस योग्य असेल स्वामीजी? थोडा अवधी अजून देतांस हे मृत्यो , तर या जगांस आम्ही दाखवून दिले असते की आम्ही फक्त स्वराज्य निर्माण नाही केले तर ते राखणारे शंभूसारखे भावी छत्रपती पण घडविले ! पण आजन्म जे केले नाही ते आजाच आम्ही का करावे?आजच तुझ्याकडून अवधीची भिक्षा का मागावी?हे श्रीं चे राज्य घडले - या राज्यरूपी मडक्याच्या या कुंभाराच्या देहाची माती - हे स्वराज्यभूमी - हे माते , आम्हीच तुला अर्पण करतो ! देणार्‍या हतांनी अखेरीसही देतच रहावे नाही का - महारथी कर्णासारखे? ये मृत्यो , ये.....जननी जन्मभूमीच्.....जय भवानी !
आणि आता , आज , या घडीला ३२९ वर्षांनंतर , महाराष्ट्राच्या अवतीभवती घुटमळणार्‍या छत्रपतींच्या आत्म्याचे हे पण एक स्वगत.....

तलवार घेऊनी हाती
केले दीन दुबळ्यांचे रक्षण
तोच माझा वीर मराठा
मागत का फिरतो "आरक्षण" ?

मनगटांत असतां धमक
बुध्दीची अपूर्व शक्ती
"वापरांत दोन्ही नसणे"
याचेच असे हे लक्षण !

यांचसाठी झुंजलो का मी?
अन् आले कितीक कामी
पुत्रा "नागोजी" गमवून सुध्दा
करते "बाजी"स कांता औक्षण !

रानी हिंडलो धडपडलो
इतिहास घडविण्यासाठी
अन् राहिलो पुस्तकांमधुनी
देण्या बाळपणीचे शिक्षण !

मी संपलो होतो केंव्हाचा
आत्म्याची होती कण कण ,
बघुनी आजचे राजकारण
मी पुन्हा संपलो.....ये क्षण ! .....
मी पुन्हा संपलो.....ये क्षण ! .....
मी पुन्हा संपलो.....ये क्षण !

इतिहासलेख

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Apr 2009 - 1:01 pm | घाशीराम कोतवाल १.२

उदय् खरच महाराज्यांच्या निर्वाणा नंतर काय घडले हे अजुन ही लोकांना माहित नाहि
मस्त माहितीपुर्ण लेखन अजुन येउ द्यात

(महाराज्यांचा मावळा) घाशीराम कोतवाल

**************************************************************

मैत्र's picture

2 Apr 2009 - 1:23 pm | मैत्र

पण सत्य, इतिहास आणि साहित्य यातल्या सीमारेषा अजूनही खूपच धूसर आहेत... देव जाणे नक्की काय घडलं ते...

सुमीत's picture

2 Apr 2009 - 2:55 pm | सुमीत

खरेच, इतिहासात काय लपवून ठेवले आहे काळाने ते काळच जाणतो.
लेख स्वगत नाही तर चिंतन म्हणून आवडला.

विशाल कुलकर्णी's picture

2 Apr 2009 - 3:12 pm | विशाल कुलकर्णी

खुप छान, मैत्रना अनुमोदन. अजुन येवु द्यात.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

राघव's picture

2 Apr 2009 - 3:18 pm | राघव

चांगले लिहिलेत.
छावा, मृत्युंजय या कादंबरींचा प्रभाव जाणवला.

राघव

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 6:45 pm | क्रान्ति

खूप खास लिहिलंय महाराजांच स्वगत!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

पण जे काही लिहिले आहे ते वादातीत विलक्षण आहे...
अप्रतिम आहे.
खूपच आवडलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उदय सप्रे's picture

3 Apr 2009 - 7:02 am | उदय सप्रे

क्रान्ति आणि प्राजु ,
आपल्यासारख्या चोखंदळ वाचकांमुळे आणि त्यांच्या प्रतिक्रियांमुळेच तर म्या पामराचे लिहिण्याचे धैर्य होते.....
आभारी आहोत !
उदय सप्रे