नम्रतेचा अमुल्य धडा.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
5 Mar 2009 - 9:10 am

"शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं."

माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी वागणूक या विषयावर चर्चा होत असताना,रोजच्या घाईगर्दीच्या जीवनात बारीक बारीक कारणावरून बाचाबाचीचेच प्रकार जास्त होत असतात.असा त्याचा बोलण्याचा सूर होता. शक्यतो नम्रतेने राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो असं म्हणाला. आणि ह्याचं स्पष्टीकरण करताना त्याला मुंबईत आल्याआल्याच्या आठवणी येऊन त्याचा अनुभवाची मला गंमत सांगू लागला.
मला मोहन म्हणाला,
"काही वर्षापूर्वी मी मुंबई पहाण्यासाठी आलो असताना, शहरातली आणि देशातली धनसंपत्ती पाहिली. आणि तसेच रसत्यावर झोपडीत राहणारे,कमनशिबी भिकारी पण पाहिले.एकदा गेटवेऑफ इंडिया जवळ गेलो असताना समोरच्या एलिफंटाकेव्हझचा
डोंगर पहाण्यात गर्क झालो असताना,मागून एक आवाज आला म्हणून वळून पाहिल्यावर, एक वृद्ध बाई हात पुढे करून उभी राहिलीली पाहिली.नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून मी माझ्या खिशात हात घालून जेवढी म्हणून मोड होती ती तिच्या हातात ठेवली. तिचा चेहरापण पाहिला नाही.भिकारी म्हणून तिच्या त्रासाला कंटाळून मी असं केलं.
पण ती आंधळी बाई हंसली आणि मला म्हणाली,
"तुमचे पैसे मला नकोत मला तुमच्याकडून रस्ता ओलांडण्याची मदत हवीय."

माझ्या क्षणात लक्षात आलं मी काय केलं ते.मी पूर्वग्रहदूषित होऊन दुसर्‍या व्यक्तिची पारख माझ्या मनात आलेल्या कल्पनेशी जुळती घेऊन पाहिलं म्हणून हे झालं.
माझी मलाच घृणा आली.ह्या घटनेमुळे माझ्या मनातला श्रद्धेबद्दलचा महत्वपूर्ण मुद्दा जागृत झाला.मी नम्रतेला किती महत्व देतो त्याला पुष्ठि मिळाली. अगदी क्षणासाठी जरी ती नम्रता मी विसरलो असेनेही.

मी माझ्याविषयी विसरलो असेन ते म्हणजे मी एक खेडूत होतो.मी माझं गाव सोडून मुंबईला आलो त्यावेळी अवघा सतरा वर्षाचा होतो.दोन नव्या बॅगा, माझा भाऊ आणि बहिण,आणि खंबीर मनाची माझी आई असं सर्व गोतावळ माझ्या बरोबर होतं.
ह्या सर्व काळात मी हॉटेलात बश्या धुण्याच्या कामापासून वेटर होऊन गल्ल्यावर बसे पर्यंत कामं केली.नंतर थोडं शिक्षण घेत घेत असेच मामुली कामं करता करता नेटवर्क इंजिनीयर झालो.

माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी असे पुर्वग्रहदुषित प्रकार अनुभवले आहेत.मला आठवतं मी अठरा वर्षाचा असताना हॉटेल मधला कपबशी उचलणारा पोर्‍या म्हणून कामाला होतो. एका मुलाचा पिता आपल्या मुलाला सांगत होता की शाळा शिकून यशस्वी झाला नाहीस तर माझ्या सारखी कामं करावी लागतील. अशीच वागणूक माझ्या नातेवाईकांकडून आणि
मित्रमंडळीकडून मला मिळाल्याचं आठवतंय.त्यामुळे ते काय आहे ते मला कळलं होतं.खरं म्हणजे मला आणखीन चांगल माहित असायला हवं होतं.

शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगीकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं.
त्या गेटवे वरच्या आंधळ्या बाईने मला मी स्वतःहून माझ्यात प्रेरीत केलेल्या आंधळेपणा पासून माझी मुक्तता केली.तिनेच मला नम्र राहाण्याची आठवण करून दिली.आणि बरोबरीने माझ्या डोळ्याची आणि मनाची कवाडं उघडी ठेवायलाही स्मरण करून दिल.
खरं म्हणजे हे आता सांगताना त्या बाईला रस्ता ओलांडून जायला मी मदत केली याची आठवण येऊन तिने अमुल्य धडा शिकवल्याबद्दल तिच्याजवळ माझी उपकृतता प्रकट करावीशी वाटते."

एखादी बारीकशी गोष्ट जीवनात आपल्याच वागणुकीला कशी कलाटणी देतं हे मोहन कडून ऐकून गंमत वाटली.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

5 Mar 2009 - 1:54 pm | नरेश_

आपण जणू मनातलंच बोललात.
खूप आवडले आपले लेखन !!
धन्यवाद.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2009 - 2:27 pm | प्रकाश घाटपांडे

माझ्या क्षणात लक्षात आलं मी काय केलं ते.मी पूर्वग्रहदूषित होऊन दुसर्‍या व्यक्तिची पारख माझ्या मनात आलेल्या कल्पनेशी जुळती घेऊन पाहिलं म्हणून हे झालं.

असे अनेक पुर्वग्रह जगताना असतात. वेळीच आत्मपरिक्षण केलेले केव्हाही चांगले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसुनाना's picture

5 Mar 2009 - 2:33 pm | विसुनाना

संवेदनशील लेखन

शितल's picture

5 Mar 2009 - 6:54 pm | शितल

सहमत. :)

विंजिनेर's picture

5 Mar 2009 - 4:52 pm | विंजिनेर

वाईज् अँड अदरवाईज् !! :)

लवंगी's picture

5 Mar 2009 - 4:53 pm | लवंगी

आवडला लेख

रेवती's picture

5 Mar 2009 - 7:21 pm | रेवती

हे पूर्वग्रह मांजरीसारखे आडवे येतात बर्‍याचवेळा.
(पण मागच्या कुठल्या अनुभवावरून निर्णय घेऊन तो बरोबर आला की आपण म्हणतो अनुभवाचा फायदा!)
गोष्टं आवडली सामंतकाका!

रेवती