आजतागायत आपण अनेक भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या त्यातील काही गोष्टी नंतर आठवल्या कि काहीवेळा हसुही पण अशा कथा ऐकण्यास अनुकूल वातावरण असेल तर मात्र अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. अशीच वातावरण निर्मिती कशी असते आणि त्याला जोडून आलेली एक कथा लिहीतोय.
वातावरणनिर्मिती:
ठिकाण मामाचं गाव खेडेगाव असल्यान सहाजीकच जेवणं लवकर झालेली असतात जेवण झालं कि भाचरांचा पत्ते खेळायचा मुड येतो सगळेजण खळात(अंगणात) एकत्र येतात घरातली लहान मुलं भलत्याच उत्साहात असतात गप्पा, पत्ते सुरु होतात पण जसजशी रात्र मी म्हणू लागते, थंडीचा जोर वाढू लागतो तसं लहान मुलाना झोपवलं जातं राहतात ते मामा, मामी, भाचरं, मामाचा मुलगा आणि सुनबाई. पत्त्यांचा खेळ ऐन रंगात आलेला असतो थोड्यावेळाने गरमागरम चहा सगळ्यांच्या दिमतीला हजर होतो आणि साधारण बाराच्या सुमारास लाईट जातात माजघरात लावलेल्या दिव्याचा मंद प्रकाश खळापर्यंत पोचून आपली शक्ती दाखवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असतो. आता पत्त्यांचा खेळ पूर्ण थांबलेला असतो त्यातच मामी बत्ती लावण्याचा विचार बोलून दाखवते पण भाचरांच्या मनात मात्र वेगळाच विचार येत असतो ती मामीला म्हणतात "मामी राहुदे गं बत्ती कैक दिवसात मामाच्या तोंडून भूताची गोष्ट ऐकली नाय्ये ती काळोखात ऐकण्यातच खरी मजा, काय मामा" या वाक्यावर बरेच दिवसांनी सासरेबुवांच्या तोंडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून सूनबाईही विचार उचलून धरते आणि मामीचा विचार मागे पडतो.
भयानक थंडी पडलेली असते रातकिड्यांची किरकिर निरव शांततेचा भंग करत असते एखाद वटवाघूळ हूल देऊन जात असते मामा आज काय सांगणार म्हणून सर्वांची उत्कंठा शिगेला पोचलेली असते आणि मामा भाचरांच्या विनंती मान्य करुन कथा सुरु करतो ती पुढीलप्रमाणे:
एका शहरवजा गावातील घटना थंडीचे दिवस असतात अमावास्येची रात्र असते.
रात्र बर्यापैकी झालेली असते घरातील प्रत्येकजण चिरनिद्रेत असतो प्रत्येक व्यापारी सगळा कारभार आटपून घरी गेलेला असतो राहतो तो फक्त रिक्षावाला त्यातच स्थानिक रिक्षावाले कधीच गुल झालेले असतात. अशात जवळच्या गावातला एक रिक्षावाला सोबत किंवा एखादं भाडं मिळेल म्हणून थांबतो पण रात्र फार व्हायला लागते तेव्हा घरी असलेल्या बायकापोरांचा विचार करुन तो जायला निघतो भाडं काय आज नाही उद्या मिळेल अशा विचारात तो निघतो थोडं अंतर गेल्यावर एक म्हातारं जोडपं रिक्षा थांबवतं म्हातारा म्हणतो बाबा आम्ही अमुक अमुक गावाला चाललोय नेतोस का आम्हाला तुझे काय ते पैसे देउ आम्ही यावर रिक्षावाला म्हणतो अहो मी पण तिकडेच चाललोय मला पण तुमची सोबत मिळेल आणि पैसे कुठे जातायत हो बसा तुम्ही. रिक्षावाला कितीही बोलला तरी का कोणास ठाऊक एक भिती त्याचा मनाला स्पर्श करुन जाते.
ती म्हातारा म्हातारी रिक्षात बसतात रिक्षा चालू लागते म्हातारा आणि रिक्षावाला गप्पा मारत असतात रिक्षात सुन्न करणारी बोचरी थंडी लागत असते. ते जिकडे जात असतात तिकडचे दोन चार दाखले दिल्यावर मात्र रिक्षावाल्याला हायसं वाटतं तोही आता मनमोकळेपणाने बोलू लागतो पण म्हातारी मात्र एकदम शांत असते.
निम्म अंतर रिक्षा ओलांडते आणि रस्त्याचा कडेला एक माणूस रिक्षावाल्याच्या दृष्टीस पडतो आणि रिक्षावाला अक्षरश: चरकतो पण शांत बसतो; तो माणूस म्हातारा म्हातारीला कसा दिसला नाही असा विचार करतो आणि रिक्षा चालवत राहतो थोडं पुढं गेल्यावर तो म्हातार्याला म्हणतो आजोबा तो माणूस पाहीलात? त्याचे पाय उलटे होते. यावर उत्तरादाखल म्हणून इतका वेळ गप्प असलेली म्हातारी म्हणते मग त्यात विशेष काय आमचेही पाय उलटेच आहेत. रिक्षावाला काचकन ब्रेक मारुन रिक्षा थांबतो, पाठी वळून बघतो आणि तत्क्षणी रिक्षावाल्याचा आत्मा त्याला सोडून जातो आणि जाताना बरोबर त्याने पाठी वळल्यावर काय दिसलं हे ही घेऊन जातो.
प्रतिक्रिया
17 Dec 2008 - 11:13 pm | प्रियाली
वातावरण निर्मिती भयकथेचा मोठा भाग व्यापते. बरेचदा मूळ कथाबीज दमदार नसले तरीही वातावरण निर्मिती त्या कथेत अपेक्षित रंग भरून कथा उठावदार करते.
परंतु भीती दाखवण्यासाठी रात्र, अमावास्या, वटवाघुळे यांचीच गरज असते असे नाही. एखादा साधा प्रसंग, ठिकाणही भीती घालू शकते.
खालचा किस्सा इंश्टंट आहे, फारसा जमला नसावा पण भर दिवसाचे वातावरण आहे.
सूर्य डोक्यावर आला आहे. एसटी खडखडत थांबते आणि मी खाली उतरतो. उन्हाचा झोत गपकन डोळ्यात जातो आणि क्षणभर अंधारी येते. धुळीचा लोट उडवत एसटी निघून गेली तरी मी तिथेच उभी असतो. थोडंसं पाणी हवं होतं. आजूबाजूला नजर टाकली तर सर्वत्र शुष्क माळ पसरला दिसतो. चिटपाखरू नजरेस पडत नाही. सुकलेला, उजाड माळ नुसता. माणसं याच्या वाटेलाही फिरकत नसावीत. उन्हाच्या गरम झळा बसतात. माझ्या घशाला कोरड पडते..पाणी. दूरवर एक झाड स्तब्ध उभं असतं. नरक कसा दिसत असेल? या माळापेक्षा वेगळा तर नसेलच. डोळे किलकिले करून मी झाडापलीकडे बघायचा प्रयत्न करतो.
झाडापलीकडे माळावर मृगजळ पसरलं आहे. पाणी... पाणी तोंडात घेतल्याशिवाय या काहिलीतून सुटका नाही. त्या मृगजळात एक आकृती वाकून काहीतरी करताना दिसल्यासारखं वाटतं. पाणी... पाणी मागायला हवं, तिथे जे कोणी आहे त्याच्याकडून. त्या आकृतीच्या दिशेने मी चटचट पाऊले उचलतो. अंगाची काहिली होते आहे. घामाच्या धारा वहात आहेत पण तोंड साफ सुकलं आहे. आता ती आकृती स्पष्ट दिसू लागते. म्हातारा आहे, त्याच्या कामात मग्न. लाकडाचा ढिग रचतो आहे. मी जवळ जवळ धावतच त्याच्याकडे जातो आणि धापा टाकत विचारतो -
"बाबा पाणी मिळेल का हो? तहानला आहे जीव पाण्यावाचून."
म्हातारा मागे वळतो आणि निरागस हसतो.
"हो रे बाळा, तुझ्या तोंडात पाणी घातल्याशिवाय पुण्य नाही लागणार. सकाळपासून कामाला लागलो तेव्हा तुझ्यासाठी चिता रचून झाली. तुझ्या तोंडात पाणी घालायला घेऊन येतोच मी."
मी लाकडांच्या ढिगार्याकडे निरखून बघतो. माझं अचेतन शरीर त्यावर पहुडलेलं असतं.
17 Dec 2008 - 11:16 pm | छोटा डॉन
स्सह्ही गं प्रियालीताई ...
आज खुप दिवसांनी भितीचा तडाखा, ह्यावेळी अंगाला दरदरुन घाम सुटला नस्सला तरी "सरसरुन काटा" मात्र नक्कीच आला ...
------
छोटा डॉन
17 Dec 2008 - 11:36 pm | अवलिया
प्रियालीताईंनी प्रतिसाद टाकला आहे असे कोणीतरी तिकडे म्हणाले आणि मी आधीच घाबरलो.
प्रियाली नाव हजर सभासदांमधे नाही ही खात्री झाल्यावरच लेख उघडला.. हो पटकन येवुन भोः केले तर काय ?
लेख आणी परतिसाद लय भारी
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
18 Dec 2008 - 10:58 am | धमाल मुलगा
घे व्यंक्या,
तुला गायडन्ससाठी दस्तुरखुद्द भयालीदेवी जातीनं हजर! येड्या, अजुन काय पाहिजे?
रिक्षावाल्याची श्टोरी अजुन खुलव...वरचा प्रियालीतैचा प्रतिसाद अभ्यासुन तुझ्या गोष्टीत काही बदल करता येत अस्तील तर पहा...होऊन जाऊदे अजुनएक भ्याव-दाखवी गोष्ट :)
प्रियालीतै,
ही गोष्ट पण लय भारी! पण मला ती गाडीचीच गोष्ट जास्त आवडलेली..रस्त्याच्या वळणावरच्या तरुणीची :)
अवांतरः व्यंकोबा, परिक्षेचा अभ्यास सोडून भुताखेताच्या गोष्टी कसल्या सांगत फिरतोय रे? मराठीच्या पेप्रात काय भयकथा लिहा असा १० मार्कांचा प्रश्न येणारे का?
17 Dec 2008 - 11:42 pm | शितल
सह्ही..
प्रियाली ताई,
एक क्षण काहीच सुचत नाही.
व्यंकु,
कथा चांगली लिहिली आहेस पण शेवट लवकर गुंडाळास का?
18 Dec 2008 - 12:14 am | धनंजय
एक सोडून दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके.
अंधार-थंडी->एकटेपणा-धोका
रखरख-उजाड->एकटेपणा-धोका
अशा वेगवेगळ्या प्रकारे भयाण वातावरणनिर्मिती जमली आहे.
18 Dec 2008 - 9:47 am | अनंत छंदी
व्यंकूशेठ
प्रयत्न चांगला आहे. लिहीत रहा. सध्या नाहीतरी मराठीत भयकथा लेखकांची वानवाच आहे. नारायण धारप गेले, मतकरींनी लेखन जवळजवळ थांबविल्याचे दिसते अशा स्थितीत मराठीत ताज्या दमाचे भयकथा लेखक हवेच आहेत. :))
18 Dec 2008 - 10:10 am | सहज
व्यंकुजी प्रियालीतैंच्या भयकथा वाचा आणी मग तुमची पण एक नवी भयकथा येउ दे.
18 Dec 2008 - 5:05 pm | विसोबा खेचर
हेच म्हणतो..
आमची भयालीदेवी भयकथा एक्स्पर्ट आहे! :)
तात्या.
18 Dec 2008 - 7:21 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुले शु
----
सखाराम गटणे