- डॉ. सुधीर रा. देवरे
आपल्यातल्याच काही विभूती दैनंदिन स्तुत्य कृतीतून विकास पावत इतिहासात लोकदेव झाले. कृतीतून त्यांनी लोकांना त्यांच्यातला देवत्वाचा दृष्टांत दिला. परोपकार देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आयुष्यातील कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येतं. कृतीतून देवमाणूस होत जाणं साधी सोपी गोष्ट नाही. आपण अशा देवमाणसांचा आदर्श न घेता मंदिरं बांधून दानपेट्या ठेवत कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरु करतो.
माणसाला एकुलतं एक आयुष्य मिळतं. त्यातलं निम्म्याधिक आयुष्य झोपेत निघून जातं. बालपणातलं आयुष्यही बेरजेत नसतं. उरलेल्या आयुष्यात माणूस कष्ट करत दोन वेळचं जेवण कमवतो. आयुष्यात हावही स्वस्थ बसू देत नाही. सुख मिळवण्यासाठी रोज दु:खं पचवत जगायचं. मोहाची स्वप्न उबवायची. वयात येताच वासनेचा डंख. अहंकार फणा काढतो. जातीचा अहंकार, धर्माचा अहंकार, सत्तेचा अहंकार, श्रीमंतीचा अहंकार, राजकीय विचारसरणींचा अहंकार. काहींना तर ज्ञानाचाही अहंकार असतो! (विशेष म्हणजे अहंकार आपल्याला अप्रत्यक्षरित्या समाजाकडूनच शिकायला मिळतो.) अहंकार पचवणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अहंकार पचवला तो देव झाला.
व्देष हा माणसाच्या खूप आत दबा धरुन बसलेला असतो आणि तो उथळ कारणानंही उफाळतो. मानसिक स्वास्थ्य बिघडताच व्देष रंग दाखवतो. पहिल्यांदा निंदा- नालस्ती व्देषाला मोकळी जागा करुन देतात. व्देषाला बाहेर निघता आलं नाही तर भयंकर विकृत घटना घडतात. क्रोधाचंही तसंच. क्रोधाने जगात रोज अनेक अमानुष घटना घडतात. आपण वर्तमानपत्रांतून आणि न्यूज चॅनल्सवरुन वाचतो- पाहतो. वरवरचा क्रोध मनुष्य टाळू शकतो पण आत खोलवर साचलेला क्रोध कशानंही शमत नाही.
या सगळ्या षड्रीपूंना हद्दपार करणारा माणूस स्थितप्रज्ञ ठरतो. जिथं मरणात- जीवनात भेद दिसत नाही. आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात राहणार नाही तर आपल्या खिशातले हजार रुपये आपल्याला काय उपयोगाचे, हा विचार करता आला पाहिजे. आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात नसणार आणि परिवाराचं काय होईल? ही चिंता ज्याला नाही. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही तरीही आपण उद्याच्या आर्थिक व्यवहारांचा विचार करतो. माझ्याकडे याचक आला आहे, तो या क्षणाला भुकेला आहे आणि मी सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे मृत्यूपर्यंत पैसे कसे शिल्लक राहतील, म्हणजे मी कोणाकडे हात न पसरता दोन वेळचं जेवण जेऊ शकेल याचं नियोजन करतो. (कोणी दान करताना, सामाजिक काम करताना वाजागाजा करतो. अशी समाजोपयोगी कामं कोपर्यात करुन आपण कॅमेर्यात येणार नाही याची काळजी घेतली जात नाही.)
हेवा वाटण्यातून असमाधान जागृत होतं. कोणाच्या दु:खात आनंद होणं ही भयंकर विकृती. वैयक्तीक राजकारण आपल्याला माणूसपणापासून रोधून धरतं. इथं राजकीय पक्षांचं राजकारण अभिप्रेत नाही. मित्राचं वागणं पटत नाही तरी आपण त्याला तोंडावर सांगतो, तुझा स्वभाव छान आहे. एखाद्याचं वागणं बोलणं मनापासून आवडतं पण आपण ते कबूल करत नाही. एखाद्याचे विचार पटत असूनही त्याचं आचरण- अनुकरण करणं लांबच ते मान्य करण्याचाही आपण मनाचा मोठेपणा दाखवत नाही. एखाद्याचं यश आपल्याला हुलकावणी देतं. त्याचं यश आपलं दु:खं आणि तेच यश आपल्याला मिळालं तर लोकांना ते आवडावं असं आपल्याला वाटणं. मान्य करु नये ते आपण मान्य करतो आणि जे मान्य करायला हवं ते करत नाही. कोणाला दुखवू नये म्हणून नावाजत राहतो. ज्याला दुखवायला नको त्याला दुखावलं जातं. जिथं स्पष्ट बोलायला हवं तिथं ‘री’ ओढली जाते- हाजी हाजी केली जाते. जिथं बोलू नये तिथं मुद्दाम टोचून बोललं जातं, हे राजकारण. सारांश, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ या षड्रिपूंच्या पाशात अडकलेल्या माणसाला माणूसपण निभावता येत नाही. खरंखुरं कोणाचं चांगुलपण त्याला सहन होत नाही.
अशातून आपल्यात साधं माणूसपणही दिसून येत नाही. जास्तीतजास्त माणूस दिखाऊ सज्जन होऊ शकतो. जो कोणाच्या खिजगणतीत नाही त्याला आपण सज्जन म्हणतो. असा माणूस नैसर्गिक माणूसही राहात नाही मुळात. जो योग्य जागी स्पष्ट बोलतो त्याला ‘अतिशहाणा’ ठरवलं जातं, त्याला अनेक शत्रू निर्माण होतात. आणि ‘वाचाळा’पुढे कॅमेरे हात जोडून चोवीसतास उभे राहतात. माणसाची बुध्दी यावेळी वरदान नव्हे तर शाप ठरते. मोठा बुध्यांक नसलेला माणूस वा फक्त आजचाच विचार करणारा माणूस नैसर्गिक जीवन सरळपणे जगतो, कारण अज्ञानातलं सुख. त्याच वेळी बुध्दीवान- संवेदनाशील माणूस आतल्याआत आपणच दाह निर्माण करत जगताना दिसतो. व्यवस्था बदलता येत नाही म्हणून उदास होतो. कारण ‘बुडते हे जन, न देखवे डोळा’.
आधी केलं मग सांगितलं, हे संतत्वाचं ब्रीद. सर्वसामान्य जीवांत संतांना देव दिसतो. सर्वसामान्य जीव म्हणजे केवळ मनुष्य नाही, सगळेच प्राणी वा वनस्पतीही. असे लोक जिथं राहतात, तिथं कृती करतात. (अशा माणसांचे मित्र कमी होत शत्रू वाढत राहतात.) परिणामांचं भय न बाळगता कोणत्याही माणसाच्या जगण्यातून ही सगुणता दिसायला हवी. अन्यायाच्या विरोधात उघड भूमिका घेता यायला हवी. सारांश, निष्क्रिय सज्जन म्हणजे देवमाणूस नव्हे!
(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com
प्रतिक्रिया
15 Jun 2021 - 7:03 pm | खेडूत
150 वाचक धन्यवाद... असं आपण लिहायच्या आत प्रतिसाद देत आहे... :)
लेख म्हणजे सुविचार संग्रह वाटतो. नक्की काय विचार आहे तो समजलाच नाही.
मी जर शाळेत वर्गशिक्षक वगैरे असतो तर तक्ते करायला याचा खूप उपयोग झाला असता. अर्थात आपल्या परवानगीने....
15 Jun 2021 - 7:32 pm | गॉडजिला
निष्क्रिय = सज्जन
16 Jun 2021 - 11:19 am | डॉ. सुधीर राजार...
तसं म्हणावं अशी परिस्थिती
16 Jun 2021 - 11:18 am | डॉ. सुधीर राजार...
खूप खूप धन्यवाद.
16 Jun 2021 - 8:20 am | गुल्लू दादा
विचार चांगले पण विस्कळीत वाटले. लिहीत रहा. धन्यवाद.
16 Jun 2021 - 11:20 am | डॉ. सुधीर राजार...
आशीर्वाद असावा
17 Jun 2021 - 11:46 am | कॉमी
सदर हार्मलेस लेखावर इतक्या तिरकस प्रतिक्रिया का येत आहेत ?
17 Jun 2021 - 11:54 am | गॉडजिला
ते सज्जनाना न पटल्यास सज्जन लोक सज्जपणे अशा सज्जन प्रतिसाद देतात
17 Jun 2021 - 11:58 am | डॉ. सुधीर राजार...
काही लोकांना आतून वाटू शकतं की यातली सज्जनाची व्याख्या आपल्यावरुन केली आहे की काय?
17 Jun 2021 - 12:06 pm | गॉडजिला
हे जरा स्पष्ट करता काय ?
17 Jun 2021 - 5:32 pm | चौथा कोनाडा
बहुधा धागालेखक साहेब इतर कोणाच्या धाग्यवर प्रतिसाद देत नाहीत अथवा चर्चेत भाग घेत नाहीत त्यामुळे लेखकराव "लोका सांगे" क्याट्यागिरितले आहेत असा समज होऊन जनता रोष व्यक्त करतेय असं दिसतंय !
17 Jun 2021 - 11:56 am | डॉ. सुधीर राजार...
गॉडजिला यांनी बरोबर उत्तर दिले
17 Jun 2021 - 12:49 pm | नावातकायआहे
बाडिस. काय कारण असावे?
17 Jun 2021 - 5:45 pm | वामन देशमुख
हा निबंध पाहून दहावीच्या नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंचाची आठवण आली.
17 Jun 2021 - 5:47 pm | वामन देशमुख
नाही, म्हणजे हा एकच निबंध पाहून तशी आठवण आली असे नाही, सदर लेखकाचे या आधीचे चार-दोन लेख पहिले होते तेंव्हाही तशीच दहावीच्या नवनीत २१ अपेक्षित प्रश्नसंचाची आठवण आली होती.
17 Jun 2021 - 7:07 pm | कॉमी
१. पहिला मुद्दा- आपण केलेल्या समाजकार्याची जाहिरात करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्याविरुद्ध आलेला मुद्दा हा- कि लेखसोबत आपले नाव घेतले जावे अशी त्यांची अपेक्षा का आहे ?
विश्लेषण-
अ.)समाजकार्याची जाहिरात करू नये हे पटत नसल्यास हरकत नाही. मला व्यक्तिष: जाहिरात करण्यात वावगे दिसत नाही. पण व्ह्यू पॉईंट आक्षेपार्ह आजिबात नाही आहे.
ब.) दुटप्पी असण्याचा मुद्दा- लेखकाच्या ब्लॉगवरून असे दिसते कि त्यांचे इथले लेखन पुस्तकरूपात पुन:प्रकाशित होते. तेव्हा कॉपीराईट अनुषंगाने केलेली विनंती काहीच चुकीची नाही.
दुटप्पीपणाचा आरोप अतार्किक आहे. समाजकार्याची जाहिरात करू नये असे मत असणे म्हणजे स्वतःच्या आर्थिक स्त्रोतावर आणि बौद्धिक मालमत्तेवर पाणी सोडून द्यावे असा होत नाही. म्हणजे डॉ. देवारे यांचे जे मत आहे तसे मत ठेवण्यासाठी आपला पगार, बँकेतून मिळणारे व्याज, मालमत्तेवरचा हक्क सगळ्यावर पाणी सोडणे गरजेचे आहे, त्याशिवाय तसे मत ठेवता येणार नाही. अत्यंत हास्यास्पद मुद्दा आहे. (त्याचू वैलपान, नो ऑफेन्स !)
२. दुसरा मुद्दा- लेखक इतरत्र प्रतिसाद देत नाहीत. ट्रॅक रेकॉर्ड वरून हे खरेच म्हणावे लागेल, स्वतःच्या (आणि नवीन अपवाद- सुबोध खरे यांच्या) लेखावरच केवळ प्रतिसाद दिसतात.
हे संस्थळ एक उपहारगृह आहे असे समजू. इथे डिशेज लेख आणि प्रतिसाद ह्या आहेत. सदर लेखकाने पुष्कळ लेख लिहिले आहेत.
प्रतिसाद कवचितच, स्वतःच्या लिखाणावर सुद्धा विस्तृत प्रतिसाद
नसतात. पण हे काही त्यांच्यावर तुटून पडण्याचे योग्य समर्थन नाही. इतरांच्या लेखावर प्रतिसाद देणे ही काही सक्ती नाही. किंवा ते न केल्यास उद्धटपणे आडवे तिडवे बोलण्याचा अधिकार सुद्धा मिळत नाही. कारण सदर लेखकाने आपले पुष्कळ लिखाण वाचकांसाठी पेश केले आहे. ते सर्वाना अवडण्याची सक्ती होऊ शकत नाही, किंवा न आवडले तर का न आवडले सांगणारे प्रतिसाद देण्यास हरकत नाहीच. पण ती लाईन या धाग्यात क्रॉस होऊन त्यांच्या वर व्यक्तिगत टीका/प्रश्न विचारणे झाले आहे. एकूणच, मागच्या धाग्यात न पटलेले मत डॉ. देवारे यांनी मांडले असल्याने त्यांच्या पुढील लेखाची थट्टाच उडवायची, खवचट शेरे मारून लेखकाचा तेजोभंग करायचा असे इम्प्रेशन काही प्रतिसाद वाचून आले.
तर हे माझे मत.
17 Jun 2021 - 8:41 pm | गॉडजिला
१) लेखकाप्रमाणे जो कोणी नाही त्या सर्वांना अप्रत्यक्षपणे जसे या लेखात वेठीला धरले गेले आहे तो सुर लोकांना पटलेला नाही...
२) तसेच त्यांचे जे म्हणने आहे की माझ्या नावाच्या संदर्भासहीत माझे लेखन कुठेही दिले तरी हरकत नाही ही रास्त अपेक्षा ठेवताना ते जे व्यक्ती काही समाजोपयोगी काम करत असेल त्याचा तो गाजावाजा करणे त्या व्यक्तीची रास्त अपेक्षा असु शकते ही बाब लेखक अमान्य करतो हा विरोधाभास आहे (डॉ. खरे यांचे कीतीतरी लिखाण जालावर त्यांच्या नावाशिवाय फिरत असते आणि त्याबद्दल ते स्वतः उदासीनता राखतात पण लेखक स्वतः तशी उदासिनता राखु शकत नाहीत याचा ते विरोध करतात)
३) लेखकाने इथे लिहल्याप्रमाणे निष्क्रिय न राहण्याची वर्तणुक कुठे केली असेल तर त्याबाबत डॉ खरे व इतर लोक अनभिज्ञ आहेत त्यामुळेही हे घडले असावे. पण लेखात त्यासंबंधी काहीच रेफरन्स न आल्याने असे घडने अनैसर्गीक म्हणता येणार नाही.
17 Jun 2021 - 8:55 pm | संगणकनंद
@कॉमी - माझा हा मुद्दा आहे. आता मी तुम्हाला वेगळा प्रतिसाद देत नाही.
17 Jun 2021 - 10:00 pm | कॉमी
हो, बरोबर आहे, त्यांच्या मुद्द्यासोबत असहमती असू शकते. पण ती आणखी गुड फेथ मार्गाने दर्शवणे शक्य होते, थेट लेखकावर दुटप्पी आहे असा आरोप करणे मला चूक वाटले.
पण तसही ते प्रतिसाद उडालेले दिसतात, सो.
17 Jun 2021 - 10:19 pm | Rajesh188
लेखातील मजकूर अपुरा आहे.
इतक्या कमेंट का आल्या .
ह्याचे आश्चर्य वाटत आहे.
हिंदू धर्माचा उल्लेख करायची जास्त उर्मी लेखकाला असेल तर.
ह्या रांगेत करावा
.
बौध्द धर्म,ख्रिस्त,मुस्लिम,शीख , जैन आणि सर्वात सर्व समावेशक श्रेष्ठ धर्म हिंदू.
हे मान्य नसेल तर हिंदू ह्या धर्माचा बिलकुल उल्लेख नको.