उत्कल दिवस २०१२
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती. असो, आता वळू मुख्य कार्यक्रमाकडे.
भाषिक रचनेच्या आधारे भारतातील स्वतंत्र राज्य म्हणून उदयास येणारे पहिले राज्य म्हणजे सध्याचे ओदिशा/ओडीशा. १ एप्रिल १९३६ रोजी इंग्रजांनी उत्कल प्रांतास स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. प्रचंड वनसंपत्ती, खनिज विपुलता, बौद्ध धर्माचा ऐतिहासिक वारसा व जोडीला नृत्यनाट्यनिपुण कलाकारांची खाण असलेल्या या राज्याची प्रगती डोळ्यात भरेल अशी झाली नाही.
एरवी राज्यस्थापनादिवस म्हणले की स्वत:ची पाठ थोपटून घेण्यापलिकडे काही न करणारे राज्यकर्ते बघितले असलेने, इथे काही विशेष घडेल असे वाटले नव्हते. पण निदान या निमित्ताने तरी ओदिशाची ओळख तरी होईल इतकाच उद्देश ठेवून मी कार्यक्रमास हजेरी लावली होती. अन इथेच माझा अंदाज चुकला.
कार्यक्रमाची सुरवात जरा चुकलीच माझी. सुरवातीस उत्कल जननीचे स्तवन गाणारे गीत गायले गेले. यानंतर थोडा धक्का देणारा एक सेमिनार झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते डॉ. मृणाल चॅटर्जी, जे इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ़ मास कम्युनिकेशन (भारतीय जन संचार संस्थान), धेनकानल येथे प्रोफ़ेसर व केंद्रप्रमुख म्हणून काम करतात. विविध वर्तमानपत्रांमधून काम करत असताना सामाजिक जाणीव आपसूकच कशी वाढत जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मृणाल चॅटर्जी. त्यांच्या खात्यावर ११ ललित पुस्तके, ३ mass media शी संबंधित पुस्तके, ६ भाषांतरीत पुस्तके जमा आहेत. विविध दूरदर्शन मालिकांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. प्रचंड अभ्यास, शैक्षणिक अर्हता व वृत्तपत्रातील संपादकीय कामाचा अनुभव या जोरावर अल्पावधीतच भारतीय जन संचार संस्थान येथे ते केंद्रप्रमुख बनले आहेत.
चित्र १: डॉ. मृणाल चॅटर्जी बोलण्यासाठी उभे असताना
आपल्या सेमिनारमध्ये त्यांनी ओदिशाच्या विकासाचा मार्ग या विषयाचा अत्यंत सुरेख पद्धतीने उहापोह केला. संयत व साधी भाषा, बलस्थानांची व संभाव्य धोक्यांची जाणीव करुन देणे याची सांगड घालत सामान्य जनतेने काय केले पाहिजे हे अगदी सुरेख शब्दात सांगितले. या सगळ्यात तासभर कधी निघून गेला हे कळलेही नाही.
चित्र २: डॉ. मृणाल चॅटर्जी बोलताना:
त्यानंतर ओरिया हास्यकवी डॉ. कुलंगार यांनी आपली कला सादर केली. ओरिया कळत नसल्याने इथे जरा कंटाळा आला. अन यानंतर ज्या कार्यक्रमासाठी मी कॅमेरा सज्ज करुन गेलो होतो तो ओडीसी नृत्याचा कार्यक्रम चालू झाला. प्रसिद्ध नर्तकी पुष्पिता मिश्रा व सहकारी यांनी हा कार्यक्रम सादर केला. ओडिसी नृत्य हे भारतातील सर्वात जुना व अद्याप टिकून असलेला नृत्यप्रकार मानला जातो. त्याची काही दृष्ये:
ओदिशातील प्रमुख आदिवासी नृत्य म्हणजे संबळपुरी नृत्य. याची झलक दाखवली शशांक दुबे व सहकारी यांनी. त्याची काही दृष्ये:
महाराष्ट्रात राज्य पातळीवर असा आढावा कदाचित घेतला जात असेलही; पण शाळा-महाविद्यालयांमध्ये आपला संबंध फ़क्त सुट्टीपुरताच असतो. फ़ारफ़ार तर ५०० लोकांच्या समूहासाठी आयोजित केलेला, कोणताही गाजावाजा न करता, आम्हीच महान वगैरे असा आवेश न आणता ज्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला, त्यामुळेच मला जास्त भावला. फ़क्त इतिहासात रमण्याची मनोवृत्ती सोडून काय केले पाहिजे हे यातून शिकायला मिळाले. म्हणूनच कदाचित येणाया १ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वेगळेपण दाखवून गेला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हांगाश्शी
मंग आप्ल्या म्हाराष्ट्र दिसा
लेख आवडला!
मस्त लेख
हेच म्हणतो.
असंच म्हणतो.. सुंदर
+1
नृत्यातल्या भावमुद्रांचे सुरेख चित्रण
अन्या लेका , नशीबवान आहेस !!
मस्त कार्यक्रम आणि तितकाच मस्त लेख...
या कार्यक्रमामागच्या डोक्याचे
वृत्तांत आणि छायाचित्रे
छान..