***** कल्याणम् (भाग २)

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
21 Oct 2010 - 6:48 am

***** कल्याणम् (भाग २)

***** कल्याणम् (भाग १)

"आमच्या या एवढ्याशा पोरीनं खुनाचा प्रयत्न केलाय् म्हणता, शुध्दीवर आहात ना?" वरुण ओरडतात.
"वरुणराव, आधी तुम्ही भानावर या. तुमच्याच घरातली दुसरी एक मुलगी आज मृत्यूच्या दारात उभी आहे याचं गांभीर्य ओळखा." शिंत्रे
"म्हणून काय तुम्ही या चिमुरडीवर आळ घेणार?"
"छे, छे, उलट या प्रकरणात तिचा नाहक बळी जाण्याची शक्यता मला दिसते आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे."
"म्हणजे?"
"जाऊ दे, या घरातला कर्ता पुरुष म्हणून मी तुम्हाला काही साधे प्रश्न विचारतो त्यांची उत्तरे घरातल्या कोणीही दिली तरी चालेल. आता नसतील द्यायची तर तुम्हालाच ती पोलिस कचेरीत येऊन द्यावी लागतील."
"विचारा."
"तुम्ही स्वतः चिन्मयीला चालतांना बोलतांना शेवटचं केंव्हा पाहिलं आहे?"
"काल रात्री जेवायच्या वेळी."
"त्यानंतर तिनं काय केलं?"
"थोड्या वेळानंतर झोपायला गेली."
"कुठे? मला ती जागा दाखवा."
वरुण इन्स्पेक्टरांना मुलांच्या राहण्याच्या खोलीत घेऊन जातात.
"इथल्या कुठल्या बिछान्यावर ती झोपली होती?" शिंत्रे
"अलीकडे ती माडीवरच्या गॅलरीत झोपते, काल ती तिकडेच झोपायला गेली होती." प्रेमाने माहिती पुरवली.
"मला ती जागा दाखवा."
एकापाठोपाठ एक सगळे जण जिना चढू लागतात. वरच्या पायरीवर आल्यावर शिंत्रे थांबून म्हणतात, "इथून सगळी गॅलरी दिसते आहे. आज तिथे काय घडलं याच्या खुणा इथे दिसत आहेत. इथे उभे राहून वाटले तर त्या पाहून घ्या. पण आता या पायरीच्या पलीकडे कोणीही जायचे नाही. हवालदार, इथे दोरी बांधून सील लावा आणि पहारा ठेवा. आमची टीम येईल, फोटो काढेल, बोटांचे ठसे घेईल, पंचनामा करून इथल्या महत्वाच्या वस्तू ताब्यात घेईल. चला आता आपण खाली जाऊन बोलू या."
"तुमच्या घरात रोज सकाळी सगळे लोक चहा पितात ना?" शिंत्रे विचारतात
"हो" वरुण
"आज सकाळी चिन्मयीनं चहा घेतला?"
सारे जण स्तब्ध......
"तिनंही चहा घेतला असं मी मघाशी ऐकलं. तिनं तो कुठे बसून घेतला? म्हणजे ती खाली आली होती की चहा तिच्याकडे पाठवला गेला होता?"
पुन्हा शांतता.........
"ठीक आहे. त्या गॅलरीत एक चहाचा कप दिसत आहे. त्याचं निरीक्षण केल्यावर त्यातला चहा केंव्हा बनवला होता ते आमचे तज्ज्ञ सांगतील आणि तो कप तिथे कोणी नेला होता हे त्या कपावरच्या बोटांच्या ठशावरून समजेल आम्हाला." शिंत्रे
"इतक्या भानगडी कशाला? चिन्मयीसाठी प्रेमाच चहा घेऊन वर गेली होती हे सगळ्यांना माहीत आहे. कोणी सांगत का नाही आहे? बहिणीला चहा नेऊन देणं हा गुन्हा आहे का?" स्वाती
"मुळीच नाही. बरं, इतक्या प्रेमानं तुमची प्रेमा चहाचा कप घेऊन गॅलरीत गेली ...... आणि तिथं जाऊन तिनं काय केलं?" करड्या आवाजात शिंत्रेनी विचारलं.
"मी काही केलं नाही.... आधीच.... आपणच... " भीतीने थरकाप झालेली प्रेमा तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती.
"आधीच काय? आपणच काय?" शिंत्रे विचारतात, पण स्वातीचे वटारलेले डोळे पाहून प्रेमा चुप्प बसते.
"ठीक आहे. प्रेमानं काही केलं नाही. पण चिन्मयीनं काय केलं? प्रेमानं तिथं काय पाहिलं?"
"आई, मी सगळं स्वातीला सांगितलं होतं गं"
"अहो आधीच चिन्मयी आपणहूनच उठली होती. तिनं प्रेमाशी छान गप्पा मारल्या. आज मैत्रिणींबरोबर बाहेर जाऊन ती खूप मज्जा करणार होती म्हणून ती छान मूडमध्ये होती. हो ना ग प्रेमा?"
स्वातीकडे अविश्वासाने पहात गोंधळलेली प्रेमा पुटपुटली, "अं .. हो... नाही.. माहीत नाही."
"नंतर चिन्मयी मैत्रिणीकडे गेली होती ना? इथं गॅलरीत तर बाथरूम, बेसिन वगैरे काही दिसत नाही आहे. त्यामुळे बाहेर जायला तयार होण्यासाठी चिन्मयी खाली आली असेलच. तिला हात पाय तोंड धुतांना, केस विंचरतांना, कपडे बदलतांना कुणी तरी पाहिलं असेलच ना. किती लोकांनी पाहिलं?" शिंत्रे विचारतात
पुन्हा शांतता........
"स्वातीताईंनी तरी नक्की पाहिलं असेल ना? चिन्मयी बाहेर गेली आहे असं मघाशी त्याच म्हणाल्या होत्या." शिंत्रे
"छेः, मला कुठे एवढा वेळ आहे? मी तर माझ्या खोलीत होते आणि ऑफिसला जायची तयारी करत होते. प्रेमानं मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं." स्वाती
"अं.. नाही... हो... माहीत नाही.. आई गं... " प्रेमाला आता रडू कोसळलं आहे
"या स्वातीताई किती सफाईनं या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताहेत आणि प्रेमाला यात अडकवत आहेत पाहिलंत?" शिंत्रे उद्गारले. " काहीही करून या कदाचित निसटून जातील, पण प्रेमाताईंचं कसं होईल? काही हरकत नाही. उद्या पोलिस स्टेशनमध्ये जबानी द्यायची वेळ येईल तेंव्हा त्यांच्यामागे असलेला हा रिमोट कंट्रोल नसेल आणि अशा नवनव्या थापा त्यांना सुचणार नाहीत. तेंव्हा आपसूक त्या खरं सांगतील आणि निर्दोष असल्या तर त्याचा त्यांना फायदाच मिळेल."
"म्हणजे?" वरुण
"चिन्मयीच्या अंथरुणावरचे हे रक्ताचे डाग आहेत ना?" शिंत्रे
"रक्त कसलं, साधं नेल पॉलिश असेल ते." प्रेमा
"ते काय आहे हे आमचे सायंटिस्ट सांगतील हं. ते कुणाचं रक्त आहे आणि त्या व्यक्तीच्या शरीरातून ते केंव्हा बाहेर निघालं ते सगळं तपासणी केल्यावर समजेल. समजा ते रक्त कपातल्या चहापेक्षा जुनं निघालं, म्हणजेच प्रेमाताई चहा घेऊन गॅलरीत गेल्या त्याच्या आधीच चिन्मयीनं रक्त ओकलं होतं असं त्यातून सिध्द झालं तर त्यासाठी आम्ही प्रेमाताईंना जबाबदार धरणार नाही."
"नक्की तसंच झालं असणार. माझी खात्री आहे." वरुण
"पण मग अशा रक्तबंबाळ अवस्थेत चिन्मयीचा मूड चांगला कसा होता ते मात्र त्यांना सांगावं लागेल."
"आई गं... मी काय करू?" प्रेमा विव्हळते.
"सगळं ठीक होईल हं बाळ. तू शांत हो बरं." मनूकाकू प्रेमाला समजावतात. पण त्यासुध्दा भेदरलेल्या आहेत.
"तुला स्वतः थापा रचून मारायला जमणार नाही. त्यापेक्षा चौकशीच्या वेळी सगळं खरं खरं सांगून टाकलेलं बरं असं तुझं तुलाच वाटेल. तर वरुणराव, या जागी काय काय घडलं असणार याचा अंदाज मला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास जवळ जवळ संपायला आला आहे. आता पुरावे गोळा करणं आणि जबान्या घेणं शिल्लक उरलं आहे. ते काम आम्ही आमच्या पध्दतीनं करून घेऊ."
"वरचा जिना तर तुम्ही सील केला आहेच. आता आणखी काय राहिलं आहे?" वरुण
"एक अगदी लहानसा पण महत्वाचा पुरावा बाहेर आहे. स्वातीताई, जरा तुमचा मोबाईल फोन मला पहायला देता का?" शिंत्रे
"इथे आल्यापासून तुम्ही हात धुवून माझ्या मागे लागला आहात. आता मी काही देणारही नाही आणि सांगणारही नाही." स्वाती
"तुमच्या सेलफोनवरून कोणकोणत्या नंबरांना फोन लागले त्याची यादी मला मिळणारच आहे, पण त्यांची नावे शोधून काढण्यात उगाच वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही आपणहून आपला मोबाइल फोन दिला तर ठीक आहे, नाही तर आम्हाला तुमची झडती घेऊन तो जप्त करावा लागेल."
"हा घ्या. यात तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे." स्वाती फणका-याने म्हणाली. शिंत्र्यांनी त्यातला एक नंबर शोधून फोन लावला आणि स्पीकरफोन सुरू केला.
"हॅलो, अप्पासाहेब सुभेदार का?"
"हो. आपण कोण?"
"मी इन्स्पेक्टर शिंत्रे"
"अरे वा, कुठून बोलताय्?"
"तुमच्याच वाड्यातून. तुम्हाला भेटायला आलो होतो, पण भेट झाली नाही म्हणून फोनवरच बोलावं म्हंटलं."
"छान. इथे आल्यापासून हे यंत्र मी आपल्यासोबत बाळगतो आहे, पण पहिल्यांदाच वाजलं बघा."
"तुम्ही कसे आहात?"
"मस्त. तिकडे सगळं ठीक आहे ना?"
"बाकी ठीक आहे, पण तुमच्या चिन्मयीकडे मात्र बघवत नाही हो. घरातल्यांचा तिच्यावरचा राग अजून गेला नाही. त्यांनी तिला वाळीतच टाकलंय्."
"तरी माझ्याबरोबर चल असं मी तिला म्हंटलं होतं. तिनं नाही ऐकलं. सगळं ठीक होईल असं म्हणाली होती."
"यावेळी तिचा अंदाज चुकला असं दिसतंय्. तुम्ही येऊन तिला आधार दिलात तर बरं होईल."
"येईन ना. आता लगेच निघालो तर संध्याकाळपर्यंत तिकडे पोचेनसुध्दा."
"सांभाळून या हं. ती तशी सुखरूप आहे. तिची काळजी करू नका. आणखी एक गोष्ट. तिच्याबद्दल तुम्हाला कुणीही काहीही वेडंवाकडं सांगितलं तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. स्वातीताईंनी सांगितलं तर मुळीसुध्दा नाही. एवढं पक्कं लक्षात ठेवा. संध्याकाळी भेटू आपण."
एवढे सांगून शिंत्र्यांनी फोन बंद केला. घरातली मंडळी दिग्मूढ होऊन त्यांच्याकडे पहात होती. वरुणने विचारले, "आत्ता तुम्ही कुणाशी बोलत होतात?"
"तीर्थरूपांचा आवाज नाही ओळखलात? आणि काय हो, इतक्या दिवसात घरातल्या कुणालाच एकदाही त्यांची आठवण झाली नाही का?"
"अप्पांच्याकडे मोबाइल फोन आहे हेच घरात कुणालाही माहीत नाही हो."
"पण स्वातीताईंना होतं. त्यांच्याशिवाय आणखी एकीला होतं. म्हणून तर ते मला समजलं."
"ते कसं शक्य आहे?" स्वाती आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच पुटपुटली
"ती बेशुध्द आहे म्हणून का? अहो चिन्मयीनं शक्य तोवर हे कुणालाही कळू दिलं नसतंच, पण बेशुध्दावस्थेत ती जे बडबडली त्यातून तुमचं हे गुपित बाहेर पडलं. पण वरुणराव, मला एक सांगा. ही स्वाती अप्पांची खूप लाडकी आहे कां हो आणि चिन्मयी तिची अगदी खास जवळची आहे का? मला तर तसं काही वाटत नाही आहे म्हणून आपलं विचारलं. या केसशी त्याचा काही संबंध नाही."
यावर कुणाच्याही तोंडातून शब्दही फुटला नाही.
"याला एक गोष्ट सांगायची, त्याला नाही सांगायची असली लपवाछपवी तुम्ही नेहमीच खेळत असता का हो?" शिंत्रे
"तुम्हाला काय म्हणायचंय्?"
"हेच बघा, चिन्मयीला कँसर झाला आहे असं जेंव्हा तुम्ही सगळे समजत होता तेंव्हा ही गोष्ट तुम्ही अप्पासाहेबांना सांगितली होतीत का?"
"नाही. त्यांना धक्का बसू नये म्हणून सांगितली नव्हती."
"चिन्मयीनंसुध्दा सांगितली नसेल."
"ती तर नाहीच सांगणार. सर्वांपेक्षा तिला अप्पांची जास्त काळजी वाटायची."
"मग तिचा कँसर खोटा आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं? आणि तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवलात?"
"स्वातीनं ते अगदी पुराव्यासकट सिध्द करून दाखवलं ना. शंकेला तिनं जागाच ठेवली नव्हती. चिन्मयीही काही बोलली नाही. याचा अर्थ तिनंही ते मान्य केलं. खुद्द अप्पांनी तिला दुजोरा दिला. आणखी काय पाहिजे?"
"समजा की ते पुरावे खोटे आहेत आणि कँसर खरा आहे असं चिन्मयीनं सांगितलं असतं तर ती गोष्ट अप्पासाहेबांना कळली असती आणि त्यांना धक्का बसला असता. तसं व्हायला नको म्हणून तिनं आपले ओठ घट्ट मिटून घेतले असतील."
"मग ती मूर्ख आहे."
"आहेच. अप्पांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः इतकं सोसणं हा जगाच्या दृष्टीनं निव्वळ मूर्खपणाच आहे. पण असे वेडे लोक असतात. चिन्मयी त्यातलीच आहे आणि हे तुम्हाला ठाउक आहे."
"पण अप्पा परगावाला गेल्यानंतर तरी तिनं सांगायचं होतं. ते का केलं नाही?"
"त्याचं रहस्य या मोबाइलमध्ये दडलेलं आहे."
"काय?"
"चिन्मयीच्या समोर स्वातीनं अप्पांना एक मोबाईल फोन दिला आणि चिन्मयीला वेगळे बोलावून अशी धमकी दिली की जर काही तिनं तिच्या कँसरबद्दल घरच्यांना सांगितलं, तर लगेच ती बातमी स्वाती अप्पांच्या कानावर घालेल आणि ते एकटे परगावी असतांना त्यांना धक्का बसून त्यांचं काय होईल त्याचा विचार चिन्मयीनं करावा. गेले काही दिवस ती रोज अशा धमक्या देत आली आहे आणि चिन्मयीला घाबरून गप्प बसायला भाग पाडत आली आहे. स्वाती आणि प्रेमा या दोघी मिळून तिला सतत छळत आले आहेत."
"पण मग ती माझ्याकडे का नाही आली? मला विश्वासात घेऊन तिनं सगळं सांगायचं होतं." वरुण
"नीट आठवून पहा. ती तुम्हा दोघांकडे आली होती. तिला स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे मला समजून घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा अशा कळकळीच्या विनवण्या ती करत होती. तुम्ही त्यावर काय केलंत? तिला सरळ धुडकावून लावलंत ना?" शिंत्रे
तेवढ्यात देशमान्यांचे सहाय्यक धावत आत येऊन सांगतात, "सर, आता बातम्यांची वेळ झाली आहे. आजचा बाइट सांगताय् ना"
कॅमेरासमोर उभे राहून देशमाने बोलू लागतात, "दोनशे वर्षांपूर्वी शनिवारवाड्यात नारायणराव पेशव्यांना मारायला गारदी आले होते तेंव्हा त्यांनी आपल्या राघोबाकाकांना घट्ट मिठी मारली आणि काका मला वाचवा असा धावा केला. पण राघोबाने त्यांना गारद्यांच्याच हवाली केलं. या घटनेची आजच्या कालानुरूप पुनरावृत्ती या सुभेदारवाड्यात झाली आहे. चिन्मयी नांवाची एक अत्यंत सालस आणि सद्गुणी पण अनाथ मुलगी इथे राहते. तिच्या अंगातल्या गुणांमुळे तिचं कौतुक होत असे पण त्यामुळे तिच्या बहिणीचा मात्र जळफळाट होत असे. राक्षसी महत्वाकांक्षा बाळगणा-या तिच्या वहिनीला चिन्मयी ही आपल्या मार्गातला अडसर वाटत असे. मत्सरग्रस्त बहीण आणि पाताळयंत्री वहिनी या घरातल्या दोघींनी मिळून एक कपटकारस्थान रचलं. दुर्दैवाने एका भयंकर रोगाने शारीरिक रीत्या जर्जर झालेल्या चिन्मयीविरुध्द कुभांड रचून बनावट पुराव्यांच्या आधाराने या दोघींनी मिळून तिला खोटारडी, विश्वासघातकी, फसवणूक करणारी, ढोंगी वगैरे ठरवलं. बिचा-या चिन्मयीने आपल्या दोन काकांकडे आशेने पाहिले, पण त्या दोघांनीही तिच्याकडे पाठ फिरवली आणि तिला या कैदाशिणींच्या हवाली केलं. त्यांनी चारपाच दिवस तिचा अनन्वित मानसिक छळ करून तिची जगण्याची इच्छाच मारून टाकायचा प्रयत्न केला. तरीही ती जीवंत राहिली आहे हे त्यांना सहन न झाल्यामुळे आज त्यांनी तिला बेशुध्दावस्थेत अडगळीमध्ये फेकून दिलं आणि औषधपाण्यावाचून तिनं तडफडून मरावं अशी व्यवस्था केली. चिन्मयीचं पुढे काय झालं हे पुढच्या बातमीपत्रात पहा."
-------------------------------------------------------------------------------------
(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सदाची पहुणी's picture

21 Oct 2010 - 8:46 am | सदाची पहुणी

कथा दूरदर्शन वरच्या शुभ-करोती च्य वळणावर जाते आहे.

चटोरी वैशू's picture

21 Oct 2010 - 10:38 am | चटोरी वैशू

शुभम करोति कल्याणम्.... असेल कदाचित...

आनंद घारे's picture

21 Oct 2010 - 9:21 pm | आनंद घारे

या मालिकेच्या स्रोताबद्दल मी पहिल्या भागाच्या प्रस्तावनेतच लिहिले आहे.