ती सुंदर होती. अप्रतिम लावण्यवतीच. आंतरराष्ट्रीय 'वोग' मासिकात जगातील सर्वांत सुंदर स्त्रियांत तिची गणना झाली होती. ती उच्चशिक्षित होती. ती त्या काळात सफाईने कार चालवायची. ती पडदा पाळत नव्हती. तिने बाराव्या वर्षी वाघाची शिकार केली होती. तिला पोलो पाहायला आवडायचे. ती मुक्त, स्वच्छंद आयुष्य जगली, तरीही राजपरिवारातील आदब तिने सोडली नाही. खरे तर विलासी सुखासीन आयुष्य जगली असती, तशी ती जगलीही, पण समाजासाठी, स्त्रीशिक्षणासाठी तिने स्वतःला गुंतवून घेतले. आपले प्रयत्न यशस्वी करून दाखवले. ती लोकसभेत सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येणारी उमेदवार ठरली. तिच्या लोकप्रियतेमुळेच हे शक्य झाले. ती परिकथेसारखे आयुष्य जगली. तिच्या या सुंदर आठवणी तिने 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' या आत्मचरित्रात सुंदर रितीने मांडल्या आहेत. ती होती जयपूरची लाडकी महाराणी 'गायत्रीदेवी'.
(https://www.missmalini.com/wp-content/uploads/2016/03/12331715_528539180...)
या सुंदर राजकन्येचा जन्म मेमध्ये झाला, म्हणून लहानपणी 'प्रिन्सेस मे' असणार्या राजकन्येचा जन्म १९१९ साली लंडनचा. अतिपूर्वेकडील आणि आता बांगला देशात असणार्या कुचबिहार संस्थानचे राजे जितेंद्रनारायण आणि देखणी आई इंदिरा राजे यांची ही कन्या. भव्य राजवाडा, सुंदर बागा, ५०० नोकर आणि सोबत दोन भाऊ, दोन बहिणी यांच्या सहवासात बालपण गेले. मात्र वडिलांच्या अकाली जाण्याने संस्थानाची संपूर्ण जबाबदारी आईवर - इंदिराराजेंवर आली. इंदिराराजे बडोद्याच्या पुरोगामी विचारांच्या राजा सयाजीराव गायकवाडांची कन्या. सयाजीराजेंच्या उदारमतवादी वातावरणात वाढलेल्या अत्यंत रूपवान इंदिराराजेंनी कुचबिहारच्या राजपुत्राशी धाडसी प्रेमविवाह केलेला. त्या काळात स्त्रीस्वातंत्र्य मिळवलेल्या या राणीने आपल्या ले़कीला, गायत्रीदेवीलाही मोकळ्या वातावरणात वाढवले. घोडेस्वारी, खेळ, शिक्षण सगळ्यांचे स्वातंत्र्य मिळत होते. लहानपणी अनेकदा गायत्रीदेवी भावंडांसह बडोद्याला जात. कलकत्ता ते बडोदा रोमहर्षक रेल्वेप्रवास, बडोद्याचा भव्य राजप्रासाद, तिथल्या विस्तीर्ण बागा, मेजवान्या, आजी-आजोबांचा प्रेमळ पण शिस्तप्रिय सहवास, मराठी रितिरिवाज याच्या मोहक आठवणी राणीने लिहून ठेवल्या आहेत. कुचबिहारच्या राजवाड्याखेरीज कलकत्त्याच्या वुडलँडस या घरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात.
(https://s4.scoopwhoop.com/anj/rajmata/977215311.jpg)
अशाच एका प्रसंगी वयाच्या बाराव्या वर्षी गायत्रीदेवींची ओळख झाली जयपूरच्या देखण्या, धडाडीच्या राजाशी - जयशी. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोलो खेळाडू असलेला जय गायत्रीदेवींना पहिल्या भेटीतच आवडला. त्या काळातील बहुपत्नित्वाच्या चालीनुसार या राजपुत्राचे आधीच दोन विवाह झालेले होते. त्याला चार मुलेही होती, तरी गायत्रीदेवी जयच्या प्रेमात पडल्या होत्या. गायत्रीदेवी त्या वेळेस शांतिनिकेतनमध्ये बंगाली शिकत होत्या. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांबद्दलच्या सुखद आठवणी गायत्रीदेवींच्या मनात कायम राहिल्या. त्यानंतर लंडनला, स्वित्झरलंडमध्ये पुढील शिक्षण, तिथे जयने लग्नाबद्दल विचारणे, भेटी-गाठी, बडोद्याच्या आजीबरोबरच्या युरोप ट्रिप आणि अखेरीस १९४०मध्ये विवाहाला मिळालेली संमती गायत्रीदेवींसाठी फारच आनंददायक ठरली. राजपुत्र जयची तिसरी महाराणी होण्यास इंदिराराजेंचा विरोध होता. पण शेवटी गायत्रीदेवी जयपूरच्या तिसर्या महाराणी म्हणून सिटी पॅलेसमध्ये आल्या.
जयपूरच्या संस्थानच्या चालीरिती, परंपरा कुचबिहारपेक्षा खूप वेगळ्या होत्या. कडक, कर्मठ रितीरिवाज, पडदा याच्याशी जुळवून घेताना गायत्रीदेवींना पतीची पुरेपूर साथ लाभली. जयपूरमधील समारंभ वगळता या नव्या राणीला इतर ठिकाणी पडदा न पाळायचा आग्रह जयने केला. गायत्रीदेवींचे समॄद्ध व्यक्तिमत्त्व आणि राजाच्या आधुनिक विचारांची साथ यामुळे पारंपरिक चौकटीतून बाहेर येण्यास सुरुवात झाली. जुन्या वळणाच्या अमीर-उमरावांना अगदीच परके वाटू नये, म्हणून फक्त जयपूरमध्ये काही समारंभांमध्ये पडदा पाळायचे गायत्रीदेवींनी ठरवले. जयपूरच्या अंबर पॅलेस, रामबाग पॅलेस, जयगड या वैभवशाली राजवाड्यांत, पतीच्या आधीच्या दोन राण्यांबरोबर, मुलांबरोबर जुळवून घेत ती आत्मविश्वासाने वावरू लागली.
दुसर्या महायुद्धाच्या वेळी इतर संस्थानिकांप्रमाणे जयलाही युद्धस्थळी जावे लागले. त्याच्याबरोबर राणीही काही काळ राहिली. तिथेही युद्धकार्य करण्यासाठी जयने सतत प्रोत्साहन दिले. राणीने रेड क्रॉस मीटिंग्जना उपस्थित राहायला सुरवात केली. जयपूरला तिने पतीच्या दुसर्या राणीच्या मदतीने कपडे शिवण्याचे, विणकामाचे काम सुरू केले. युद्धातील सैनिकांना सोयी विकत घेता याव्यात यासाठी निधी उभा करायचा त्यामागे हेतू होता. यासाठी पुराणवादी स्त्रिया मदतीला घेतल्या. त्या इतरत्र कुठेही काम करू शकत नव्हत्या. त्यांना संधी मिळाली. याशिवाय जत्रा, नाटकांचेही आयोजन केले. यामुळे या पडद्यातील स्त्रियांना काही नवीन करण्याची संधी मिळाली. या गोष्टीने गायत्रीदेवींनाही खूप उत्साह आणि आत्मविश्वास मिळाला.
राणीने आता रामबागचा घरकारभारही चालवायला घेतला. गृहसचिव, लष्करी सचिव, एडीसीज सर्वांची कामे जाणून योग्य मार्गदर्शन करू लागली. रामबाग राजवाड्याची देखरेख करताना अकारण होणारी उधळपट्टी पाहून राणी चक्रावून गेली. या सगळ्याला आळा घालण्यासाठी, अनिर्बंध अमर्याद थाटमाटाला योग्य पद्धतीने लगाम घालण्यासाठी राणीने अनेक गोष्टी केल्या आणि त्यामुळे नोकरवर्गाचा रोषही ओढवून घेतला. आतापर्यंत कुठल्याच राणीने न केलेला हा कारभार चांगलाच गाजला. यासंबंधी एका तपासनीसाने लिहिले आहे की 'नवी महाराणी अकल्पित गोष्टी करत होती. तिने स्वयंपाकघरात जाऊन देखरेख करायला सुरुवात केली होती. ती कोर्टवर जाऊन बॅडमिंटन आणि टेनिस खेळली. तिने केसांचा बॉबकट केला, स्लॅक्स घातल्या, कार चालवली, पोलो पाहिले, घोडदौड केली. अशा निग्रही स्त्रीला चांगल्या-वाइटाची पारख असली, तरी तिच्या सजग दृष्टीने सगळा गृहकारभार जणू धारेवर धरला होता. सबंध राजवाड्यात तिची नियमित फेरी असे. ती हिशेब तपासायची. तिने राजवाड्याची रचना बदलली. पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी ती बदलत होती.'
पडदा पद्धत बंद करण्यासाठीही तिने प्रयत्न केले. खोलवर रुजलेली ही परंपरा एकाएकी बदलेल अशी आशा अर्थातच नव्हती. सुरुवात म्हणून उमरावांच्या बायकांनाही मेजवानीला बोलवायला सुरुवात केली. पण त्या स्त्रियांनी पडद्यात राहणेच पसंत केले. ही अवघड परिस्थिती शिक्षणाने बदलेल या विश्वासाने तिने जयपूरमध्ये शाळा सुरू करण्याचे ठरवले. मध्यमवर्गात मुली शिक्षण घेत होत्या, गरज होती ती उच्चभ्रू समाजातील मुलींना रूढिप्रियतेतून बाहेर काढण्याची. या समस्यांना तोंड देत १९४३ साली 'महाराणी गायत्रीदेवी स्कूल' सुरू झाली. सुरुवातीला फक्त २४ मुली असलेली ही शाळा आज उत्तम शैक्षणिक संस्था आहे.
नंतरच्या युद्धकाळात राणीचे सार्वजनिक आणि सामाजिक आयुष्य विस्तारत गेले. युद्धसमाप्तीनंतर भारतात वेगाने घडामोडी झाल्या. भारतास मिळालेले स्वातंत्र्य, त्यामुळे संस्थानांचे विलीनीकरण,अधिकारांवर मर्यादा याचा क्लेश झाला. विलीनीकरणाच्या वाटाघाटी आणि ठराव यामुळे आयुष्य बदलून गेले. त्यातही महाराजा जयच्या मुलीचे लग्न, इंग्लंड-अमेरिकेचा दौरा, तिथले वेगळेच सामाजिक जीवन असे बरेच काही राणीने अनुभवले.
विलीनीकरणानंतर जयपूर राजस्थान राज्याची राजधानी झाले. राजकारण नवे वळण घेऊ लागले. १९५२ साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पुढे चार वर्षांतच राजा जयचे राजप्रमुखपद रद्द करण्यात आले. शिवाय रामबाग आणि इतर पॅलेसचे हॉटेलात रूपांतर करण्याचा अवघड निर्णय घ्यावा लागला. राजवाड्यातील अमूल्य वस्तूंचे काय करायचे, हा एक प्रश्न निर्माण झाला. शेवटी काही वस्तूंचा लिलाव, तर काही वस्तुसंग्रहालयात ठेवण्याचा निर्णय झाला. अनेक मौल्यवान वस्तू, सोन्याचांदीची भांडी, अगदी हत्ती-उंटांचे दागिने यांचा लिलाव करायचा की संग्रहालयात ठेवायचे, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. या सगळ्या कामात महाराणी गायत्रीदेवींनी पुढाकार घेऊन आर्ट गॅलरी, रॉयल लायब्ररी, म्युझियम तयार केले. नोकरवर्गात इतर कामात व्यवस्थाही केली.
महाराणी गायत्रीदेवींचे राजकीय आयुष्यही हळूहळू नवीन वळणावर येत होते. १९६२ साली स्वतंत्र पक्षातर्फे निवडणूक लढवून जनजागृती सभा घेऊन राणीने सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक जिंकली. विक्रमी मतांनी निवडणूक जिंकणारी उमेदवार म्हणून राणीचे नाव गिनिज बुकात नोंदवले गेले. राणीची लोकप्रियता पुन्हा एकदा दिसून आली. राजकारणात स्थिरता मिळवून जयपूरच्या लोकांसाठी अनेक लोकोपयोगी काम करताना खाजगी आयुष्यात अनेक दु:खद घटना घडल्या. महाराजा जयचा अपघाती मृत्यू, अणीबाणीच्या काळात क्षुल्लक आरोप ठेवून झालेली अटक, सहा महिन्यांचा तुरुंगवास, पॅरोलवर झालेली सुटका या घटनांना समर्थपणे सामोरे जात राणीचे सामाजिक कार्य सुरूच राहिले. आधी शाळा, नंतर महाविद्यालय, पोलो खेळास प्रोत्साहन देण्यासाठी सामन्यांचे आयोजन, बक्षिस समारंभ यात राणीने उर्वरित आयुष्य घालवले.
अत्यंत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य, अतुलनीय वैभव, यश यात सुखासीन आयुष्य जगणारी महाराणी वयाच्या नव्वदाव्या वर्षी २९ जुलै २००९ला मृत्यू पावली. शेवटपर्यंत कार्यरत राहून जनमानसात अफाट लोकप्रियता, सामाजिक जाण असणार्या या राणीच्या कार्याला महिला दिनानिमित्त उजाळा द्यायलाच हवा. तिच्या या सर्व आठवणी तिने 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात सुंदर रितीने मांडल्या आहेत.
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 7:53 pm | पिशी अबोली
खूप भारी, यांच्याबद्दल वाचायचंच होतं.
खऱ्या प्रिन्सेस या अशा असताना परिकथांमधल्या राजकुमारासाठी आसुसलेल्या तेवढ्याच राजकुमारींबद्दल का सांगावं बरं मुलांना?
8 Mar 2017 - 10:26 pm | पद्मावति
सुरेख ओळख.
+१००००००
9 Mar 2017 - 12:17 am | गामा पैलवान
इशा१२३,
फारच सुंदर चित्रण. आज राजस्थानात उच्च जातींच्या बायकांना पडदा पाळावा लागंत नाही. यामागे बहुधा महाराणी असाव्यात. सिमी गरेवाल यांनी महाराणींची (इंग्रजीतनं) मुलाखत घेतली आहे. ती इथे पाहायला मिळेल : https://www.youtube.com/watch?v=3jAVc3P7UVo
आ.न.,
-गा.पै.
9 Mar 2017 - 11:32 am | इशा१२३
धन्यवाद!पडदा पद्धती बंद करण्याचे श्रेय गायत्रीदेवींचेच.
हि मुलाखत छान आहे. लिंक दिलयाबद्ल धन्यवाद.
9 Mar 2017 - 11:34 am | इशा१२३
धन्यवाद!पडदा पद्धती बंद करण्याचे श्रेय गायत्रीदेवींचेच.
हि मुलाखत छान आहे. लिंक दिलयाबद्ल धन्यवाद.
9 Mar 2017 - 12:25 am | आनंदयात्री
लेख आणि ओळख अतिशय आवडली. गा.पै.नी दिलेली मुलाखत बघायलाही आवडेल.
9 Mar 2017 - 4:48 am | पुष्करिणी
छान लेख,
मी सद्ध्या जिथे राहते तिथे एक जवळच एक सेवनिवृत्त प्राध्यापक राहतात, त्यांचे वडिल महाराजा जय चे स्वीय सचिव होते, त्यांच्या घरात महाराणी गायत्रीदेवी आणि राजेसाहेबांचे फार सुंदर सुंदर फोटो आहेत
9 Mar 2017 - 10:41 am | इशा१२३
अरे वा!अनेक सुंदर दुर्मिळ फोटो असतील त्यांच्याकडे.त्याचे फोटो काढून घे जमल तर आणि दाखव इकडे.
9 Mar 2017 - 5:32 am | पर्णिका
सुंदर परिचय.
शेवटपर्यंत कार्यरत राहून जनमानसात अफाट लोकप्रियता, सामाजिक जाण असणार्या या राणीच्या कार्याला महिला दिनानिमित्त उजाळा द्यायलाच हवा.
अगदी अगदी... आमच्या जयपूर भेटीत महाराणी गायत्रीदेवी अजूनही जनमानसांत किती लोकप्रिय आहेत, हे अनेक वेळा जाणवले होते.9 Mar 2017 - 7:06 am | त्रिवेणी
मस्त जमलाय लेख. गायत्रीदेवींच आत्मचरित्र वाचून आठ - दहा वर्ष झाली. आवडल होत. त्याच दरम्यान बहुतेक विजयादेवींच ही पुस्तक वाचल होत. त्यामुळे दोन्ही पुस्तकांच्या मजकुराची आता थोडी सरमिसळ होतेय. सिंदिया घराण्याची परंपरा, चालीरिती नंतर राजकारण प्रवेश या बद्दल होत सगळ.
तुला आठवत असेल तर सांग विजयाराजेंच आजोळ नेपाळचे होते ना.
9 Mar 2017 - 11:26 am | इशा१२३
हो त्यांचे आजोळ नॆपाळचे राणा घराणे.विजया राजे गायत्रीदेवींच्या समकालीनच .साधारण सारखे अनुभव घेतलेल्या.दोघिही राजकारणात आल्या,आणिबाणी काळात एकत्र तुरुंगवास भोगलेल्या.या काळातील.त्यांचा बरोबरीच्या आठवणी गायत्रीदेवींनी लिहिल्या आहेत.
9 Mar 2017 - 10:29 am | सविता००१
लेख इशा. पुस्तक वाचून बरेच दिवस झाले. छान उआळा मिळाला या निमित्ताने त्या आठवणींना. मस्त
9 Mar 2017 - 10:50 am | पियुशा
अशा भारावुन टाकनार्या व्यक्तिब्द्द्ल वाचय्ला खुप आवडते मला :)
9 Mar 2017 - 11:44 am | वरुण मोहिते
बडोद्याच्या पॅलेस मध्ये एक फोटो आत्मचरित्र आहे त्यांचं . दुर्मिळ आहे खूप . कुचबिहार ला केलेल्या शिकारीचं पण वर्णन आहे त्यात .
9 Mar 2017 - 1:10 pm | मितान
उत्तम लेख इशा !
9 Mar 2017 - 2:40 pm | हाहा
छान आढावा घेतला आहे.
9 Mar 2017 - 3:18 pm | सस्नेह
खरीखुरी महाराणी !
9 Mar 2017 - 3:30 pm | मंजूताई
अशा भारावुन टाकनार्या राजे, राण्यांबद्दल वाचय्ला खुप आवडते मला :)
9 Mar 2017 - 3:47 pm | स्मिता श्रीपाद
खुप मस्त परिचय एका खर्याखुर्या महाराणी चा.
काय अप्रतिम देखण्या आहेत या खरच....आत्ताच मी हा लेख वाचुन झाल्यावर यांचे काही फोटो नेट वर पाहिले.
अत्ताच्या जमान्यातल्या सगळ्या सो कॉल्ड सौदर्यवती फिक्या पडतील यांच्यापुढे.
'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' नक्की वाचणार
9 Mar 2017 - 3:51 pm | कविता१९७८
अतिशय सुंदर लेख , छान परीचय
9 Mar 2017 - 3:53 pm | मोनू
गायत्रीदेवींबद्दल बरेचसे ऐकले होते. त्यांचे सौंदर्य जादूइ आहे. त्याचबरोबर त्या काळात स्त्रीने इतके धाडसी असावे हेही कौतुकास्पद आहे.
खूपच छान लिहीले आहेस ईशा... 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' वाचायला हवे आता...उत्सुकता वाढली.
9 Mar 2017 - 4:09 pm | अनिंद्य
@ इशा१२३
छान ओळख - मुळातच महिलांनी महिलांच्या उत्कर्षासाठी केलेले प्रयत्न फार महत्वाचे !
राजमाता गायत्रीदेवींना प्रत्यक्ष भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. त्यांची स्त्रीशिक्षणाविषयीची, राजस्थानातील परदाप्रथा / बालविवाह - विधवाविवाह आणि स्त्रियांवर असलेल्या अन्य अन्यायकारक परंपरांच्या जोखडाबद्दलची भूमिका अगदी रोखठोक होती.
माझी मोठी आत्या महारानी गायत्री देवी गर्ल्स स्कूलच्या अगदी सुरवातीच्या बॅचची विद्यार्थिनी होती. माझ्या अन्य आत्या, मामे-आते-बहिणी, मैत्रिणी, त्यांच्या मुली अश्या अनेकजणी त्याच नावाजलेल्या शाळेच्या विद्यार्थिनी!
एक छोटी दुरुस्ती - कूच / कोच बिहार आजही भारतातच आहे, पश्चिम बंगालचा एक जिल्हा म्हणून. तेथील कोच / 'माणिक्य' राजपरिवाराचा भव्य शुभ्र प्रासाद (गायत्रीदेवींचे माहेर) आणि लाल रंगाच्या एकाहून एक सरस- सुंदर ब्रिटिशकालीन इमारती आजही सुस्थितीत आहेत ! अगदी An Architect’s Delight !
9 Mar 2017 - 11:05 pm | इशा१२३
वा प्रत्यक्ष भेट ! फारच भाग्यवान.
कुचबिहारचे संदर्भ तपासले.तुम्ही म्हणता तसे कुचबिहार प.बंगालातच आहे.धन्यवाद!
9 Mar 2017 - 4:10 pm | प्रीत-मोहर
खूप सुंदर लेख इशा!!
10 Mar 2017 - 12:20 am | जुइ
महाराणी गायत्रीदेवींच्या जीवनाचा थोडक्यात घेतलेला आढावा आवडला. माझ्या बाबांनीही हा लेख वाचून त्याचे कौतुक केले आहे.
11 Mar 2017 - 7:12 pm | इशा१२३
जुई बाबांनाहि धन्यवाद सांग ग !
10 Mar 2017 - 8:26 am | अजया
इशाने विषय सांगितल्यापासून लेखाची उत्सुकता वाटत होती. सर्वच प्रकारे देखणी राणी ही!
10 Mar 2017 - 8:46 am | पैसा
खरी महाराणी ही!
लेख खूप आवडला.
10 Mar 2017 - 5:24 pm | पूर्वाविवेक
मी पण आधीपासूनच यांची फॅन आहे.
लेख उत्तम जमलाय.
10 Mar 2017 - 5:38 pm | प्राची अश्विनी
फार छान ओळख. आता पुस्तक वाचेन.
10 Mar 2017 - 6:03 pm | सुचेता
हि मुलाखत छान आहे.लिंक पण पाहिली खुप्च सुंदर लोहल आहेस
10 Mar 2017 - 10:11 pm | नूतन सावंत
जनमानसावर राज्य करणारी खरी लाडकी राणी,जिने सयाजीराव महाराजांच्या परंपरा पुढे नेल्या.
ईशा,सुरेख झालाय लेख.
11 Mar 2017 - 9:21 pm | Maharani
देखण्या महाराणीचा देखणा लेख.. 'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' खरच छान आहे..त्या काळात घेऊन जाते आपल्याला.
13 Mar 2017 - 3:40 am | रेवती
राणीसाहेबांच्या आयुष्याचा आढावा आवडला. किती सुंदर होत्या त्या, उत्साही आणि नवमतवादीही.
13 Mar 2017 - 6:01 pm | आरोही
खरीखुरी महाराणी! लेख आवडला.
13 Mar 2017 - 6:34 pm | मारवा
१-
राजपुत्र जयची तिसरी महाराणी होण्यास इंदिराराजेंचा विरोध होता. पण शेवटी गायत्रीदेवी जयपूरच्या तिसर्या महाराणी म्हणून सिटी पॅलेसमध्ये आल्या.
सयाजीराजेंच्या उदारमतवादी वातावरणात वाढलेल्या अत्यंत रूपवान इंदिराराजेंनी कुचबिहारच्या राजपुत्राशी धाडसी प्रेमविवाह केलेला. त्या काळात स्त्रीस्वातंत्र्य मिळवलेल्या या राणीने आपल्या ले़कीला, गायत्रीदेवीलाही मोकळ्या वातावरणात वाढवले.
आई चे व्यक्तीमत्व मुलीपेक्षा जास्त उजवे भासले. दुसरा भाग म्हणजे गायत्रीदेवी राजपुत्राशी विवाहासाठी किती "डेस्परेट" होत्या हे त्यांच्या स्वीकारलेल्या "तडजोडी" वरुन स्पष्ट आहे. यावरुन मुलांना गायत्रीदेवी सारख्या टिपिकल राजकन्येचे उदाहरण देणे तितकेसे समर्पक वाटत नाही.
२- दुसरा सर्वात रोचक भाग या लेखातला तो असा की हा लेख महिला दिनानिमित्त व एक स्त्री आदर्श या भुमिकेतुन आलेला आहे असे गृहीत धरतो. तर या लेखिकेविषयी नाही मात्र इन जनरल एका गोष्टीची फार गंमत वाटते.
स्त्री वाद स्त्री पुरुष समानता ही आधुनिक मुल्ये आहेत असे सर्वसाधारणपणे मानले. म्हणजे एक आधुनिक व्यक्ती स्त्रीपुरुष समता एक आधुनिक मुल्य असे मानले. तर त्या अनुषंगाने गायत्रीदेवी एक सिम्बॉलिक म्हणुन निवडलेल्या आहेत.
आता याच एका आधुनिक मुल्याच्या अनुषंगाने मांडणी करतांना एक जुनाट मुल्य असलेली " राजेशाही" व्यवस्थेचे येत असलेले उदात्त उल्लेख
तिला पोलो पाहायला आवडायचे. ती मुक्त, स्वच्छंद आयुष्य जगली, तरीही राजपरिवारातील आदब तिने सोडली नाही.
जयपूरच्या अंबर पॅलेस, रामबाग पॅलेस, जयगड या वैभवशाली राजवाड्यांत, पतीच्या आधीच्या दोन राण्यांबरोबर, मुलांबरोबर जुळवून घेत ती आत्मविश्वासाने वावरू लागली.
वैभवशाली राजवाड्यात जुळवुण घेता येणे ही मोठी अॅचीव्हमेंट आहे !!!!
दुसर्या महायुद्धाच्या वेळी इतर संस्थानिकांप्रमाणे जयलाही युद्धस्थळी जावे लागले.
संस्थानिकांना साहेबाच्या आदेशाने जावे लागणे भाग होते.
असो
14 Mar 2017 - 8:58 am | इशा१२३
गायत्रीदेवींची आई धाडसी होत्या खर्याच . त्या काळात त्यांनी ग्वाल्हेर महाराजांशी ठरलेल लग्न पत्राने नकार देऊन मोडले व स्वतःच्या पसंतीच्या राजपुत्राशि लग्न केले.गायत्रीदेवींनीही त्यांना पसंत असलेल्या जयशीच लग्न केल बहुदा बाराव्या वर्षीच प्रेमात पडण आणि ते आकर्षण टिकण, त्या वयात बहुपत्नित्व महत्त्वाच वाटले नसावे शिवाय अनेक राण्या असणे भारतात तरि सर्वमान्य बाब होती.
बाकी लेख महिलादिनानिमित्त गायत्रीदेवींच्या कर्तृत्वाविषयी त्यांच्या एकुण आयुष्याविषयी आहे.स्त्रीपुरूष समानता हा विषय नाहीच. त्याकाळातील अत्यंत बुरसटलेले रीतिरिवाज असलेल्या राजघराण्यात बरोबरीची वागणूक मिळणे कठीणच होते. पण तरीही राणीला बर्यापैकि स्वातंत्र्य मिळाले होते आणी त्या संधिचा तिने वापर केला हे महत्त्वाचे.
वैभवशाली राजवाड्यात जुळवून घेणे तेही आधिच्या राण्या असताना हे कसरतीचेच काम होते असे स्वतः राणीनेच आत्मचरित्रात नमूद केलय.तिने ते स्विकारुन स्वतःचा ठसा उमटवला हे कर्तृत्वच.
महाराजा जयच्या युद्धात सहभागाचे म्हणाल तर तो मुद्दा नाहीच आहे त्याकाळात राणीने जबाबदारी ओळखून सैनिकांसाठि केलेल्या कार्याविषयी आहे.
14 Mar 2017 - 7:30 pm | गामा पैलवान
मारवा,
राजेशाही हे जुनाट मुली आहे हे कशावरून?
आ.न.,
-गा.पै.
23 Mar 2017 - 1:36 pm | भुमी
आता पुस्तक वाचेन.