पाचवी सावित्री

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
20 Oct 2016 - 10:16 am

सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात.

पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.

एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.

मृत्युशी गप्पागोष्टी करत स्वत:च्या हुषारीने सत्यवानाचे प्राण परत मिळवणारी सावित्री. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: करणारी, बाह्य गोष्टींपेक्षा स्वत:च्या सहचराचे आंतरिक गुण पाहणारी, यमाशी न घाबरता संवाद करणारी सावित्री. तिचे हे सगळेच गुण विलक्षण वाटत लहानपणी; आणि खरे तर अजूनही.

पण कधीकधी असेही वाटते की परिस्थितीपुढे एवढी शरणागती पत्करणे हे सावित्रीने का स्वीकारले असेल? तिच्या स्वत:त असामान्य क्षमता असतानाही? काहीही करून, तडजोड स्वीकारून लग्न केलेच पाहिजे या मानसिकतेतून तिला बाहेर का पडता आले नाही? कदाचित काळाच्या फार पुढे कोणालाच जाता येत नाही हेच तात्पर्य याही कथेतून द्यायचे असेल त्या काळच्या समाजधुरिणांना!

शिवाय यमाकडून सावित्री जे तीन वर मागते तेही जरासे मजेदार आहेत. पहिला वर सावित्री मागते तो सास-याची दृष्टी परत येऊन त्याचे राज्य त्याला परत मिळावे हा. दुस-या वरानुसार स्वत:च्या पित्याला शंभर मुलगे व्हावेत अशी ती मागणी करते. तिस-या वरानुसार सत्यवानापासून तिला स्वत:ला शंभर मुलगे व्हावेत असे ती मागते. यमासारख्याकडून हुषारीने स्वत:च्या मागण्या मान्य करून घेणे हे नि:संशय वादातीत कौशल्य आहे. पण यात सावित्री स्वत:च्या बाईपणाला कमी लेखते असे वाटत राहते नेहमीच मला ही गोष्ट वाचताना! मागून मागायचे, तर स्वत:सारखी एखादी तरी मुलगी तिने मागायला हवी होती अशी हळहळ मला लहान वयात वाटत असे. सावित्रीचा सगळा लढा वैयक्तिक स्वरूपाचा होता - जरी तो तेजोमय असला तरी व्यक्तिगत स्वरूपाचा होता हे जाणवते.

सावित्रीच्या गुणांची झलक परिस्थितीशी हसतमुखाने दोन हात करणा-या अनेक स्त्रियांकडे पाहताना आजही मिळते. स्वत:ला कमी लेखून कुटुंबाचे भले करण्यासाठी कितीतरी असंख्य स्त्रिया स्वत:ची हुषारी खर्च करत असतात. ते करत असताना त्या स्वत:ला कमी लेखण्यात त्यांची ताकद खर्च होते. महाभारतात वर्णन केलेली अशी सावित्री खरोखर होऊन गेली असेल, ती केवळ कविकल्पना नसावी असे भक्कमपणे वाटावे इतक्या स्त्रिया - समाजातल्या अनेक घटकांतील, वयोगटातील, आर्थिक परिस्थितीतल्या स्त्रिया मला पाहायला मिळाल्या.

दुसरी सावित्री म्हणजे जोतिबांच्या बरोबरीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी! हिचा लढा वेगळाच होता. ती यमाला इतर सर्व मर्त्य माणसांसारखीच सामोरी गेली. पण समाजाला सामोरी जाताना मात्र त्या आधीच्या सावित्रीचा तेजाचा वसा तिने चालवला. भारतातल्या स्त्रियांच्या पहिल्या शाळेची पहिली शिक्षिका, अस्पृश्य मुलींसाठी पहिली शाळा चालविणे, अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरची विहीर खुली करणे, विधवेचे मूल दत्तक घेणे असे कितीतरी ’पहिले’ प्रयत्न या स्त्रीने केले. त्यात तिला तिच्या पतीची जोतिबांची साथ होती, किंबहुना त्यांची प्रेरणाही होती हे आहे. पण त्या काळात एका स्त्रीने समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी इतका सक्रिय पुढाकार घेणे हे असामान्यपणाचे लक्षण होते यात शंकाच नाही. जे इतर कोणाला सुचू नये ते सुचणे, इतकेच नाही तर इतरांचा विरोध असताना ते काम आयुष्यभर सातत्याने आणि निष्ठेने करत राहणे हे विलक्षणच आहे. त्या काळात ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ चालवणे हा क्रांतीकारक कार्यक्रम होता. सामाजिक काम करत असताना तिने कविताही लिहिल्या. आधुनिक मराठी कवितेतला तिचा वाटा अगदी नगण्य मानता येणार नाही. १८४८ म्हणजे आता फार जुना काळ वाटतो, पण त्या काळच्या वर्तमानाचे चटके सावित्रीबाईंनी सोसले.

जोतिबांच्या निधनानंतर शेतकरी कामकरी वर्गाकरता विचारांचे आणि संधींचे नवे दालन उघडणा-या ’सत्यशोधक समाजाची’ धुरा सावित्रीने यशस्वीपणे सांभाळली. शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे काम करत असताना या सावित्रीची दृष्टी अधिक व्यापक होती, त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता असे जाणवते. ’स्व’ विस्तारला की काय होते याचे चित्र या सावित्रीच्या आयुष्यात दिसून येते. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची, काळाच्या पुढे जाऊन कृती करण्याची एक नवी परंपरा या सावित्रीने निर्माण केली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. सत्यवानाच्या सावित्रीइतकीच हीदेखील तेजस्वी आणि स्वयंपूर्ण होती - पण हिच्या तेजाचा अविष्कार दीनदुबळयांसाठी होत राहिला, स्वत:साठी नाही.

काही वर्षांपूर्वी तिसरी एक सावित्री भेटली. ती म्हणजे पु.शि. रेगे यांची सावित्री. त्यात पहिल्या वाचनात खरे तर सावित्रीपेक्षा ’मोर यावा’ म्हणून आजीजवळ हट्ट करणारी, ’मी येईन तेंव्हा आधी लच्छीनं नाचलं पाहिजे’ ही मोराची अट लक्षात ठेवून सदैव आनंदात राहणारी आणि त्या ओघात मोराचे भान न उरणारी लच्छी जास्त भावली होती. पुढे कधीतरी त्या कथेचा ’म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपणच व्हायचं’ असा अर्थ लावणारी सावित्री वेगळीच आहे हे जाणवलं आणि तिच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली.

रेगेंची सावित्री आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मलाही तिच्यासारखी स्वगतात्मक पत्र लिहायला आवडतात. पूर्वी पत्र लिहायचे; आजकाल ई-मेल लिहिते मी, इतकाच काय तो फरक! शिवाय असा मनमोकळा संवाद साधायला समोरच्या माणसाची आणि आपली फार ओळख असायला पाहिजे असा माझा कधीच आग्रह नसायचा, आजही नसतो. किंबहुना जोवर ओळख कमी असते तोवरच मनमोकळा संवाद होतो, असा माझा अनुभव आहे .असो. हा अतिशय वादाचा मुद्दा होऊ शकतो याची मला जाणीव आहे.

ही सावित्री म्हटले तर आत्ममग्न आहे, म्हटले तर स्वत:ला विसरून दुस-यासाठी काही करणारी आहे. तिला वीणा वाजवता येते, लेखन करता येते. स्वत:च्या मर्यांदांची तिला जाणीव आहे तशीच स्वत:च्या सामर्थ्याचीही. स्वत:च्या भावनांना ती निखळपणे सामोरी जाऊ शकते, पराभवाचे तिला दु:ख होते, पण त्या पराभवाला स्वीकारून तिला पुढेही जाता येते. ही सावित्रीही गूढच आहे, पण ती पुष्कळशी तुमच्या आमच्यासारखी वाटते. मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्रत्येकच तरूण मुला मुलीत या सावित्रीचा अंश दडलेला असतो. काही त्याच्यासह पुढे जगतात, काही तो गाडून त्याच्या पायावर जगण्याची इमारत रचतात.

आणखी काही काळाने पॉंडिचेरीच्या वास्तव्यात आणखी एक सावित्री भेटली, ती व्यक्ती म्हणून नाही तर एक असामान्य कल्पना म्हणून! योगी अरविंदांनी सत्यवान – सावित्री कथेचा आध्यात्मिक स्तरावरून एक वेगळाच अर्थ लावला आहे. त्यांच्या मते वैदिक ऋषींनी या कथेद्वारे शाश्वत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंदांच्या मते सत्यवान आंतरिक दैवी सत्य असलेल्या पण अंध:कारात आणि अज्ञानात अडकलेल्या मानवजातीचा प्रतिनिधी आहे. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन (हा अंध आहे) हे अंध झालेले दैवी मन आहे. सावित्रीचा पिता अश्वपति तपस्येचे प्रतीक आहे. तर स्वत: सावित्री तपस्येतून उदय पावणारी आणि दैवी सत्याला अज्ञानातून मुक्त करणारी दैवॊ शक्ती आहे. सावित्री शाश्वततेचं, अनंतत्त्वाचं रूप आहे. योगी अरविंदांच्या मतानुसार सावित्री हा परिवर्तनाचा मंत्र आहे - आणि ते येथे कोणत्याही सामाजिक परिवर्तनाबाबत बोलत नाहीत तर मनुष्यत्वाकडून ईशत्वाकडे नेणा-या मार्गाबद्दल बोलत आहेत. मानव्याकडून महामानव्याकडे होणा-या प्रवासाबाबत बोलत आहेत.

अरविंदांची सावित्री मला जवळची वाटली, पण ती मला समजली नाही. तितकी प्रगल्भता माझ्यात बहुधा तेव्हा नव्हती - आणि कदाचित आजही नाही. अरविंद सांगतात त्या दृष्टीकोनातून सावित्रीची कथा वाचली, की वरती मी उल्लेख केला होता ते सारे प्रश्न गायब होतात. आजवर न दिसलेले, न भावलेले, न कळलेले काही नवे कळल्यासारखे वाटते - पण ते क्षणभरच! एक भव्य दिव्य स्वप्न डोळ्यांसमोर यावे पण क्षणार्धात नाहीसे होऊन आपले मोडके तोडके जगणे शिल्लक राहिले आहे अशी विषण्णता मला अरविंद वाचताना येते. म्हणून माझ्यापुरता मी एक नियम केला आहे - मी फक्त अरविंदांची पत्रे वाचते. त्यात एक वेगळेच अरविंद समोर येतात – मिस्किल, साधे, मानवी, दुस-यांच्या मर्यादा समजून घेणारे. ते मग जवळचे वाटतात – मित्रासारखे वाटतात.

या सगळ्या सावित्रींची आठवण मागचे काही दिवस सातत्याने माझ्यासोबत आहे.

त्याचं काय झालं, काही मित्रमैत्रिणींच्या प्रोत्साहनाने मी संगीत ऐकण्याकडे एकदम वळले. माझ्या नादिष्ट स्वभावानुसार मग दिवसातला (आणि रात्रीचाही) जमेल तितका काळ मी संगीत ऐकण्यात घालवायला लागले. कुमार गंधर्वांनी गायलेल्या कबीराच्या रचना ऐकताना मला अनेक गोष्टी आठवल्या. त्यात प्रकर्षाने आठवली ती पु. शि. रेगेंच्या ’सावित्री’मधली लच्छी. म्हणून प्रवासात असतानाही रात्री दहा वाजता एका मैत्रिणीला फोन करून मी तिच्याकडचं ’सावित्री’ माझ्यासाठी आणायला सांगितलं आणि तिने ते आणलही.

तो दिवस चांगला गेला होता माझा. त्या आनंदात ’सावित्री’ वाचायला घेतली. लच्छीची गोष्ट संपली आणि मला एकदम बावचळल्यासारखचं झालं. कारण त्या ’सावित्री’शी माझा काही सूर जुळेचना. जेमतेम १२० पानांच पुस्तक आहे ते - त्यामुळे तासाभरात वाचून झाल. आणि ते झाल्यावर फार रिकामं वाटल मला - उदास नाही (ते चाललं असतं मला!) - रिकामं!

रात्रभर माझी चिडचिड झाली. एक दोन जणांना ई मेल लिहून उगाच माझा वैताग त्यांच्यावर ढकलायचा प्रयत्न केला. ’सावित्री मला कळलीच नाही’ अशी तक्रारही मी काही जणांकडे गेली. त्यावर सगळे फक्त हसले - समंजसपणे हसले - त्यामुळे मला जास्तच रिकामं वाटायला लागलं!

मला वाटतं मी ’सावित्री’ला बाहेरच्या जगात शोधायचा प्रयत्न करते ही आत्ताच्या घटकेला सगळ्यात मोठी अडचण आहे. खरी ’सावित्री’ बहुधा आपल्यातच असते. ज्या ज्या टप्प्यावर जी जी सावित्री समजण्याची माझी लायकी होती, ती ती सावित्री मला भेटली. बुद्धीची तलवार परजून मी विश्लेषण केल्याने त्यातल्या कोणत्याच सावित्रीचे काही बिघडले नाही - अर्थात माझेही काही बिघडले नाही म्हणा, उलट काही घडतच गेले. सावित्री वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येते, कारण त्या त्या वेळच्या माझ्या गरजा वेगळ्या असतात. मी बदलते म्हणून मला भावणारी ’सावित्री ’ बदलते. आता माझी गरज बदलल्याने जुनी ओळखीची सावित्री मला अनोळखी वाटण अगदी स्वाभाविक आहे. म्हणून जुनं नातं चुकीचं होतं, गैरवाजवी होतं, अवास्तव होतं .. असे कोणतेही निष्कर्ष घाईने काढायचीही गरज नाही. त्या सगळ्यांच ऋण घेऊनच आता पुढची वाटचाल करायला हवी. सावित्रीचा वसा घ्यायचा म्हणजे स्वत:च भानं राखून जगायचं...

सावित्री हवी, तर स्वत:च सावित्री व्हायला हवं............ते अद्याप जमेल की नाही हे माहिती नाही.

पण आता बहुतेक पाचवी सावित्री भेटण्याची वेळ आलेली दिसते आहे.

पूर्वप्रसिद्धी

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Oct 2016 - 10:27 am | पैसा

:)

यशोधरा's picture

20 Oct 2016 - 10:38 am | यशोधरा

:)

राजाभाउ's picture

20 Oct 2016 - 11:07 am | राजाभाउ

मस्त लिहलय पण अजुन दोनदा वाचल्या शिवाय आत उतरणार नाही, तेंव्हा वाखु साठवत आहे.

नाखु's picture

21 Oct 2016 - 9:22 am | नाखु

नीट आकलनासाठी पुन्हा वाचणे जरूरी

सही रे सई's picture

21 Oct 2016 - 11:31 pm | सही रे सई

मी पण पुन्हा वाचेन तेव्हा जास्त चांगले कळेल. योगी अरविंदांचे स्पष्टीकरण फारच भावलं आहे मनाला.. कळतंय पण अजून वळत नाहीये.

प्रचेतस's picture

21 Oct 2016 - 8:46 am | प्रचेतस

सहजसुंदर मुक्तक.

अजया's picture

21 Oct 2016 - 9:22 am | अजया

फार सुंदर मुक्तक.
रेगेंची सावित्री माझी पण लाडकी.ती अजून उमजतेच आहे असं वाटतं!

सावित्रीची कथा ही मला नेहमीच स्त्रीच्या गुलामगिरीचे प्रतीक वाटत आलेले आहे. ज्योतिबांच्या सावित्री मात्र प्रेरणेचे विलक्षण स्फुल्लिंग आहे.

मुक्तक छान आहे. आवडले.

सस्नेह's picture

21 Oct 2016 - 10:43 am | सस्नेह

पुन्हा वाचल्यावर पुन्हा आवडले.

मित्रहो's picture

21 Oct 2016 - 10:51 am | मित्रहो

वाचायला छान वाटले, न वाचलेल्या सावित्रीविषयी सुद्धा माहीती मिळाली. फक्त सावित्री फुले आणि सत्यवाण सावित्री माहीती होते. शेवटला परिच्छेद मात्र फारसा कळला नाही.

गामा पैलवान's picture

21 Oct 2016 - 12:47 pm | गामा पैलवान

अतिवास,

काहीही करून, तडजोड स्वीकारून लग्न केलेच पाहिजे या मानसिकतेतून तिला बाहेर का पडता आले नाही?

उपवर कन्येचा विवाह करण्याची त्या काळी रीतंच होती. यांत तडजोड आलीच कुठे? सावित्रीने वडिलांच्या आज्ञेने नवऱ्याचा स्वत:हूनच शोध घेतला. माझ्या मते सावित्री हे स्त्रीस्वातंत्र्याचं प्रतीक आहे.

आ.न.,
-गा.पै.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Oct 2016 - 2:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ओघवत आणि मनस्वी!!
वाह...

सूड's picture

21 Oct 2016 - 5:11 pm | सूड

वाचनखूण साठवली आहे.

मारवा's picture

21 Oct 2016 - 6:56 pm | मारवा

आत्मीयतेने प्रांजलपणे लिहीलेला
उत्क्रुष्ठ लेख आवडला
हा लेख "सावित्री" संदर्भात पुनर्विचार करायला भाग पाडतो त्याची व्याप्ती दाखवतो.
या लेखासाठी धन्यवाद

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2016 - 7:01 pm | पिलीयन रायडर

मला शेवट कळाला नाही, पण वाचायला खुप आवडलं!

स्वाती दिनेश's picture

21 Oct 2016 - 9:35 pm | स्वाती दिनेश

सावित्री आवडली,
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2016 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहिलंय !

मला वाटतं की कोणतीच बोधकथा सार्वकालीक सत्य व्हावी म्हणून लिहिली जात नसावी. ज्या काळात ती लिहिली गेली त्या काळातले संदर्भ पुढे ठेवून ती लिहिली जात असावी, कारण तसे असले तरच ती जनमानसाला हात घालू शकेल आणि ती लिहिताना लेखकाच्या मनात असलेला उद्येश साध्य होण्याची शक्यता वाढेल.

ज्या बोधकथा प्रदीर्घ काळ प्रसिद्ध राहतात त्यांचा भविष्यातल्या प्रचलित काळाप्रमाणे आणि / किंवा संदर्भ लावणार्‍याच्या कुवती व उद्द्येशाप्रमाणे अर्थ लावला जातो, जसा अरविंदांनी लावल्याचे या लेखात लिहिले आहे... तोच अर्थ मूळ लेखकाला अभिप्रेत होता असे म्हणणे धारिष्ट्याचे होईल.

मात्र, दीर्घकालासाठी जनमानसात जिवंत राहिलेल्या प्रत्येक बोधकथेत असा काहितरी अंश असतोच असतो, जो तिचा बदलत्या कालाबरोबर बदलत जाणार्‍या वास्तवाबरोबर काही ना काही संबंध लावण्यास मदत करतो व त्यामुळे बोधकथेच्या (कदाचित बदललेला का होईना) बोध देण्याच्या शक्तीला कमीजास्त प्रमाणात कायम (रिलिव्हंट) ठेवतो.

कथेत असा अंश जेवढा जास्त आणि मनाला शिवणारा अर्थ लावण्याची ताकद ज्या वाचकात/विश्लेषकात जेवढी जास्त; तेवढी ती बोधकथा त्याच्या/इतरांसाठी जास्त प्रेरणादायक होते !

पिशी अबोली's picture

22 Oct 2016 - 12:36 am | पिशी अबोली

फार फार आवडलं.

आज एका काहीशा फिक्शनल, काहीशा खऱ्या अशा सावित्रीचा चित्रपट बघून आले 'Belle' नावाचा. जाण्या आधी हा लेख वाचून गेल्याने याचा संदर्भ कुठेतरी सतत होता डोक्यात. आता परत वाचला. अजून थोडा कळल्यासारखा वाटला..

३.५ टक्के लोकांनी फार त्रास दिला बिचा-या ज्योतिबांच्या सावित्रीला

राही's picture

22 Oct 2016 - 6:44 am | राही

मुक्तक आवडलं.
रेगेंची सावित्री नवथरपणात आवडतेच. तेव्हा मनमोर थुई थुई नाचत असतो.
नंतर पिसारा मिटून घेण्याच्यावेळीही आवडते, स्वतःच मोर कसं व्हायचं ते समजण्याची वेळ. शिवाय समज्ञानी होता होता त्या आनंदात आपणच मोर आहोत हे समजतच नाही ही मजेशीर गुंतागुंत. 'आमोद सुनांसि जाले..श्रुतीशी श्रवण..' वगैरे.

पद्मावति's picture

22 Oct 2016 - 2:50 pm | पद्मावति

सुरेख लेख.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Oct 2016 - 3:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

कालातीत कालजयी सवित्रीत्व आवडले :)

आतिवास's picture

26 Oct 2016 - 8:43 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसाददात्यांचे आभार.