पहिल्याच दिवशी सैराट पाहिला, त्यामुळे काहीही माहित नसल्याने भयंकर परिणाम झाला.अक्षरशः शेवट पाहिल्यावर तर एकदम गार पडलो. बराच वेळ कुणाशी बोललोच नाही. परश्या , अर्ची, लंगड्या अन साल्या एकदमच भन्नाट. त्याबद्दल काही लिहित नाही कारण मिपा वर त्याबद्दल पाऊस पडला आहे , अन मला भर घालण्यासारखे काहीच नाही. असो.
खरे तर मला पिक्चर पाहिल्यानंतर त्याच्या पात्रांचे आणि खुद्द नागराज चे मनोगत जाणून घ्यायचे होते . कारण सोशल मेडिया वर चाललेला धिंगाणा. आपल्याकडे एक गोष्ट फार आहे ती म्हणजे कोणी काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न केला अन त्यात तो यशस्वी झाला तर त्याचा इतका खल केला जातो कि त्या मुळे गोष्टीची मजा तर निघून जातेच पण काहीही असंबंध , अतार्किक निरीक्षण आणि अनुमाने निघू लागतात. अर्थात हे हानिकारक असतेच.
ए बी पी वाल्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. सगळ्या सैराट टीम चा कट्टा च त्यांनी आयोजित केला अन त्यामुले त्या टीम चे खरे मनोगत समजले. त्यासाठीच हा प्रपंच. पहिली वेळ आहे एवढे लिहितोय सांभाळून घ्या .(आतापर्यंत फक्त प्रतीक्रीयांबाबातच मर्यादित होतो..असो)
सगळी पोर परश्या,अर्ची,प्रदीप आणि सल्या हि नवोदित च .काहीही आगापिछा नाही.पण नागराज ने त्यांच्याकडून जे पाहिजे ते काढून घेतले. या बद्दल नागराज ला १० पैकी १० मार्क. कट्ट्यात तर विचारलेले काही प्रश्नही त्यांना समजत नव्हते . इतकी ती नवखी.पहिल्याच फटक्यात त्यांना महाप्रचंड यश भेटले. पण ती हुरळून गेली नाही कारण त्यांचा गुरु नागराज . पुढे चित्रपटातच काम करायचेच असे हि नाही कारण ती शक्यता अत्यंत कमी . पण पोरही भारी , त्यांनाही ते ठाऊक आहे. परत याला कारणीभूत नागराज. त्याने ती फन्तूस हवा डोक्यात जाऊन द्यायचे प्रकर्षाने टाळलेले दिसत होते. सगळे संभाषण एकदम अनौपचारिक आणि वास्तवात होते . असो , पोरांबद्दल एव्हढेच.
आता नागराज बद्दल. स्वतःच्या कामाबद्दल त्याला जबर आत्मविश्वास आहेच पण तो सडेतोडपने मतही मांडायला कचरत नाही. अभिनयाबद्दल त्याचे स्पष्ट मत आहे कि हे सर्व दिग्दर्शकाचे कसब आहे . त्याचीच स्पष्टता नसेल तर अभिनय हि तसाच.आणि हे त्या एकदम पाटी कोरी असणार्या पोरांकडे पाहिल्यावर कळतच.त्याच्या विचारात सुस्पष्टता आहे . भले मांडायला त्याला वेळ लागतो.
पण तो दुटप्पी वाटत नाही , माझा पिक्चर एक कलाकृती म्हणून पहा म्हणतो अन ते खरेच आहे.
आपणच भंकस निर्माण करतो. आता हा नागराज ज्या पार्श्वभूमीतून आला आहे त्याचा थोडा फार तरी प्रभाव असणारच त्याच्या गोष्टींवर , ते काही गैर नाही . पण त्यातून आपण आपल्या मनाप्रमाणे अर्थ काढायचे अन त्याच्या नावावर खपवायचे . बाष्कळ पणा आहे हा. मग त्याने दाखवलेल्या जातीभेद बद्दल टिप्पणी , मग मुद्दामहूनच त्याने ; पोरगी मोठ्या घरातील आणि पोरगा गरीब आणि खालच्या जातीचा दाखवला वगैरे ..अरे पण एक निखळ कलाकृती म्हणून नाही आनंद घेऊ शकत ? खुद्द नागराज च्या देखील एव्हढे काही मनात नसेल .
नवा माणूस आहे , काहीतरी वेगळे करतो आहे अन चांगले भन्नाट करतो आहे .करून द्या त्याला. कश्याला त्याला या फालतू जंजाळात अडकवता ? मान्य अगदी दारिद्र्यातून आला , वडार जातीतून आला मग काय ? आताचे ग्लोबल जग आहे . त्यात कला हि कुणाची मक्तेदारी नाही. ज्याला त्याची थीम सापडली तो मनसोक्त संचार करतो त्यात. नागराज ला नेमकी मेख सापडली आहे , फुकट नाही दुसराही सिनेमा हिट.
सोशल मेडिया वर जे धुणे धुतले जाते आहे त्याचे त्याला घेणेही नसेल कदाचित , पण जो तो त्याला इकडे तिकडे ओढायला लागला आहे. पण या बाबतीतही नागराज तटस्थ आहे . तो म्हणतो मी जात पात मनात नाही यातच सगळ आलं.पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले थोडीच ऐकतात.उलट अश्या भंपक वागण्याने त्या नागराज चीच गोची व्हायची .असो.
पण एक मात्र खरे भरपूर चित्र विचित्र परिस्थितून आला पुढे हा नागराज. त्यामुळे त्याचे अनुभव विश्व संपन्न आहे. त्याचे कौतुक झालेच पाहिजे.त्याला संकुचित करू नये. परंतु आपल्याकडे असे आहे कि एखाद्याने काही विशेष केले कि एव्हढे वारेमाप कौतुक होते कि जर उत्सव मूर्ती भंपक असला तर झालेच त्याचे फुगून वाटोळे. परंतु नागराज समतोल वाटतो . अन त्याने असायलाच हवे.
आता त्याच्या चित्रपटाबद्दल. स्थानिक भाषा,जशी न तशी , थोडाही बडेजावपणा नाही कि उगीचच ताणाल्यासारखी नाही म्हणून तडक मनाला भिडते. एकदम नैसर्गिक अभिनय. चपखल पात्र. आजूबाजूला घडल्यासारखी वेगवान कथा अन अतिशय अनपेक्षित शेवट त्यामुळे चित्रपट विलक्षण पकड घेतो. चित्रपटाचा शेवट कसा करावा हि एक अतिशय कठीण कला आहे , बर्याच जणांना जमत नाही . नागराज ला ती साधलेली आहे . अगदी फ्यान ड्री तही सुन्न करणारा शेवट होता .
ठीक आहे आता नागराज ने जरा दुसरीकडे पाहावे , सामाजिक चित्रपट झाले आता जरा विषय बदलावा. कारण ते विश्व अफाट आहे अन त्याची त्यावर हुकुमत आहे. काय सांगावे नागराज एकदम चकचकीत चित्रपट काढून अच्छर्याचा सुखद झटका सुद्धा देईन अन त्याने द्यावा.
प्रतिक्रिया
13 May 2016 - 10:51 pm | चौथा कोनाडा
सैराट पाहिला नाही, गेले चारपाच दिवस झाले योग हुकतोय.
त्या मुळे लेख सिनेमा पाहिल्या नंतर वाचेन.
रुमाल टाकून ठेवत आहे.
13 May 2016 - 10:58 pm | चंद्रनील मुल्हेरकर
पटले ,काही फड्तुस टिनपॉट मराठा संघटनांनी विरोध चालवला आहे ते अजिबात रुचले नाही.कालच् एका चॅनलला प्रविण मिसाळ नावाचा टपरीछाप माणुस मराठा समाजाचे वकीलपत्र घेतल्यासारखा बडबडत होता.राजन खान यांनी सडेतोड उत्तर देऊन त्या टीनपॉटला निष्प्रभ केला.
13 May 2016 - 11:51 pm | कानडाऊ योगेशु
यु ट्युबबर सैराट मधले काही सीन्स यायला सुरवात झाली आहे.
मराठीत बोललेलं कळत न्हाय?
नखे प्रेमपत्र सीन
आर्ची आली रे
बाकी प्रा.डाँच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
13 May 2016 - 11:53 pm | कानडाऊ योगेशु
पहील्या सीनमध्ये पोर व मग पोरी काय धपाधप उड्या मारताहेत. बघुनच भन्नाट वाटले.
आणि आर्ची आली रे मधल्या सीनमधली परश्याचा होडीतून मारलेला सूर तर लाजवाब.
14 May 2016 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>>बाकी प्रा.डाँच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
आहे, आहे, वाचतो आहे. आत्ताच स्नेहांकिता यांना सांगून आलो. सैराट बद्दल लिहा....!
-दिलीप बिरुटे
(सैराट फ्यान क्लब सदस्य)
14 May 2016 - 11:25 am | नेत्रेश
शेवट नि:शब्ध करुन गेला. मला तरी सीनेमात काही आक्षेपार्ह आढळले नाही.
सुरवातीला शाळा कॉलेजातली लहान आर्ची नंतर बाळाची आई म्हणुन पण पर्फेक्ट दीसते. तेच परशाचे पण.
14 May 2016 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकूण १२ वा धागा. हेही परीक्षण आवड़लं. सैराट चित्रपटाबद्दल अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
14 May 2016 - 2:01 pm | कानडाऊ योगेशु
पोर विहीरीत उड्या मारतानाच्या सीनबद्दल.
जातीबाबत विषय हाताळाला आहे ही इतक ओरड झाली आहे ह्या चित्रपटामधुन त्यामुळे प्रत्येक सीन त्याच चष्म्यातुन पाहण्याची खोड लागली आहे. ह्या सीन मध्ये एकाही पोराच्या गळ्यात जानवे नाही आहे. मला वाटले शेवटचा जो मुलगा आहे ज्याची चड्डी फाटलेली असते त्याच्या गळ्यात तरी जानवे अडकावयाला हवे होते त्यानिमित्ताने तथाकथित उच्चवर्णीयही आर्थिक पातळीवर इतरांसारखेच आहेत हे दाखवता आले असते.
बाकी हा प्रतिसाद काडीसारु वाटला व म्हणुन उडवण्यात आला तरी माझी हरकत नाही.
14 May 2016 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धाग्याला काश्मिरकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आवडला.
-दिलीप बिरुटे
14 May 2016 - 3:50 pm | कानडाऊ योगेशु
काश्मिरकडे नाही सर ह्यावेळेला करमाळ्याकडे न्यायचा प्रयत्न आहे. ;)
14 May 2016 - 5:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या पावसळ्यात तुम्ही मी, अभ्या, तजो आणि आपलं मिपा सैराट मित्रमंडळ करमाळ्याला जाऊनच येऊ, हाय काय अन नाय काय ? :)
सल्ल्या आणि मि. प्रदीपला भेटून येऊ.
-दिलीप बिरुटे
14 May 2016 - 5:47 pm | अभ्या..
सल्य्या कुर्डुवाडीत, प्रदीपचा लागलाय पत्त्या. करमाळ्याचा न्हाय गडी ह्यो. आपण तर भेटून येणार.
14 May 2016 - 3:19 pm | काळा पहाड
जानवे धारण करणारे तथाकथित उच्चवर्णीय सध्या खेड्यांमध्ये राहत नाहीत.
14 May 2016 - 3:49 pm | कानडाऊ योगेशु
डाऊब्ट हय!
सगळेच नसतील पण त्या उच्चवर्णीयातल्या ही त्यातल्या त्या उतरंडीवर असणारे लोक्स अजुन गावात असतातच.
वैसेही फक्त बलुतेदार जातींपैकीही काही (का सगळ्या?) जातीत जानवे घालण्याची प्रथा अजूनही आहे. त्यामुळे तो चड्डीफाटलेलामुलगा त्यापैकी एका जाती मधुन आहे असाही निष्कर्ष काढता आला असता.
17 May 2016 - 1:45 am | इष्टुर फाकडा
राहतात, जानवे घालत नाहीत :) घालायची गरजही नाहीच. मंजुळे पुढचा चित्रपट तुम्हाला 'सल्लागार' म्हणून बरोबर घेऊनच काढतील बहुतेक.
17 May 2016 - 1:46 am | इष्टुर फाकडा
तुम्हाला: का.यो. यांना !
14 May 2016 - 4:05 pm | किसन शिंदे
15 May 2016 - 7:37 pm | मारवा
नागराज मंजुळे एका विशिष्ट वर्गातुन आलेला आहे ही जाणीव तुम्ही स्वतः सतत बाळगुन लिहिलेला आहे.
मात्र वाचकाने ती जाणीव ठेउ नये हा ही आग्रह करत आहात
ही विसंगती तीव्रतेने जाणवते.
16 May 2016 - 4:55 pm | भम्पक
मारवा जी ,
हा लेख तर खर मिपा च्या किंवा कोणत्याही सुज्ञ वाचकांना उद्देशून नाहीच मुळी . हे प्रकटन आहे ...स्वगत म्हणा हव तर. कारण दोन्ही किंवा तिन्ही बाजूच्या अर्धवट लोकांनी इतका वैताग दिला आहे कि हा लेख खर्डावा लागला. खाली मी त्या लोकांचे उदाहरण देतो -
प्रकार १ - नागराजने चांगलीच जिरवली ,
प्रकार २ - आमच्या नादी लागले तर असा शेवट होणारच ,
प्रकार ३ - समाज बिघडणार बरे आता .....
17 May 2016 - 12:58 am | खटपट्या
सहमत