दिल्लीच्या रिज रोड वर शंकर रोड पासून बुद्ध गार्डन पर्यंत पसरलेले जंगल आहे. जंगलाचा चारी बाजूला भिंत आहे. हे वेगळे, भिंतीत कित्येक ठिकाणी भगदाड आहेत. गुज्जर लोक आपली जनावरे जंगलात चरविण्यासाठी या भगदाडांचा वापर करतात. रिजच्या बस स्टैंड वर तो उतरला. त्याच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत बायकोची एक जुनी साडी होती. भिंतीत पडलेल्या एका भगदाडातून आत जंगलात शिरला. दुपारचे १२ वाजलेले होते, त्यात मईचा महिना. ऊन मी-मी म्हणत होते. त्याचे सर्वांग घामाने भिजलेले होते. त्याच्या मनात विचारांचा काहूर माजलेला होता. आपल्या माथ्यावरचा घाम पुसत त्याने दूरवर पसरलेल्या जंगलावर एक नजर टाकली. पिंपळाचे किंवा किंवा मजबूत फांदीचे झाड असेल तर झाडाच्या फांदीला साडीचा दोरी सारखा वापर करून आत्महत्या करण्याचा त्याचा मनसुबा होता.
दोन एक वर्षांपूर्वी बिहारहून दुसर्या जातीच्या एक मुली सोबत पळून तो दिल्लीत आला होता. इथे आल्यावर त्याने आर्यसमाज मंदिरात लग्न केले. त्याची किस्मत चांगली होती. बाह्य दिल्लीत एका अवैध कालोनीतल्या एका चाळीत त्याला खोली मिळाली. त्याच कोलोनीत एका ठिकाणी पुलाचे काम सुरु होते. तो तिथे दिहाडीवर काम करू लागला. अर्थातच रोज काम मिळायचे नाही. गावात कळल्यावर पंचायतीच्या आदेशानुसार, दोघांच्या परिवारांनी त्यांच्या सोबत आपले सर्व संबंध तोडून टाकल होते. दोन एक महिन्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले. त्याचा रोजगार केला. तेंव्हा पासून तो कामाच्या शोधात भटकत होता. पण दोन-चार दिवसापेक्षा जास्तीचे काम त्याला मिळाले नाही. घरी बायको आणि सहा महिन्याची मुलगी होती. बनियाने उधारी देणे बंद केले. घरात खायला तर सोडा, पोरीच्या दुधासाठी हि पैशे काही उरले नव्हते. या वरून काल घरात भयंकर भांडण झाले होते. बायकोने जात काढली, 'पोसू शकत नव्हता तर लग्न का केले, मीच मूर्ख होते, तुमच्या नादी लागुन आयुष्याचा सत्यानास केला. बायकोचे असे जहरी बोलणे त्याला बोचले. आपण नालायक आहो, आपल्या परिवाराचे पोषण करू शकत नाही.आपल्या वर विश्वास ठेऊन जी स्त्री सर्वस्व सोडून आपल्या सोबतआली तिला काही सुख देऊ शकलो नाही. आपल्यासोबत आपण तिच्या हि आयुष्याचा सत्यानाश केला.
मन घट्ट करून आत्महत्या करण्याचा निश्चय केला. दूर पिवळ्या फुलांनी नटलेले अमलतासचे झाड दिसले. जिथे जंगलातली सर्व झाडे पर्णहीन, शुष्क आणि कोरडी दिसत होती. अमलतासचे झाड ऐन उन्हाळ्यात हि वासंतिक रंग उधळत होते. उन्हाळ्याने हि अमलतासच्या पुढे घुटने टेकले होते. अमलतासच्या झाडाजवळ पोहचल्यावर त्याने पाहिले तिथे एक बाईक उभी आहे. झाडाखाली अमलतासच्या फुलांचा पिवळा गालीचा पसरलेला होता. एक २० एक वर्षाचा मुलगा आणि तेवढ्याच वयाची एक मुलगी दोघे झाडाखाली बसले होते. दोघांच्या बोलण्याचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. तो कान लाऊन ऐकू लागला.
तो: तुझे लग्न टाळता नाही का येणार.
ती: मी अनेक वेळा आई-बाबाना म्हंटले शिक्षणाचे शेवटचे वर्ष आहे, एकदा बीए झाले कि लग्न ठरवा. पण बाबा म्हणतात, कुठला तरी तारा बुडणार आहे, पुढच्या महिन्यातच लग्न करणे गरजेचे. शिवाय लग्नंतर हि तू शिक्षण पूर्ण करू शकते. तुला माहित आहे, राजा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत नाही. आपली जाती वेगळी. घरचे लग्नाला तैयार होणार नाही. आता दोनच मार्ग कुठेतरी पळून जाऊ किंवा आत्महत्या....
तो: माझ्या हि घरच्यांना तुझ्या सोबत लग्न मान्य होणार नाही. घरातून पळून जाऊन लग्न करावे लागेल. पण लोचा एकच आहे, माझे ग्रेजुएशन पूर्ण झाले नाही आहे. कोण नौकरी देईल मला. मला हि तुझे मत पटते, आपण एकत्र जगू शकत नाही पण एकत्र आत्महत्या तर करू शकतो.
मुलगी: मला मरण्याची भीती वाटते, त्या पेक्षा पळून मुंबईला जाऊ. म्हणतात, मुंबई शहरात सर्वांना काम मिळते. माझ्या जवळ दोन हजार रुपये आहेत, काही दिवस पुरतील.
मुलगा : जशी तुझी इच्छा. माझ्या हि मनात हा विचार येत होता. मी हि घरून ५००० रुपये घेऊन आलो आहे.
मुलगी: आज संध्याकाळच्या गाडीनेच मुंबईला निघू. तुझ्या सोबत कुठल्या हि परिस्थितीत मी राहायला तैयार आहे.
आता त्याला राहवले नाही. तो एकदम त्यांच्या समोर आला आणि रागानेच त्या मुलाला म्हणाला, पळून जाणार, ठेवणार कुठे हिला? पोसणार कसा? काही विचार केला आहे का? तुझ्या सारख्या सिंगल हड्डीच्या माणसाच्या हातून शारीरिक श्रम होणार नाही, बिना शिक्षणाचे कारकुनी काम हि मिळणार नाही. काय खाऊ घालेल हिला. प्रेमाचा बुखार उतरल्या वर हीच रोज शिव्या देईल तुला.
मुलगा: आम्ही आत्महत्या करू कि पळून जाऊ, तुला काय करायचे. नजर ठेवायला आला आहे का, आमच्या वर. कुणी पाठविले तुला.
तो: रागातच, नजर ठेवण्यासाठी नाही, मी या झाडा खाली आत्महत्या करायला आलो आहे. आपल्या पिशवीतून साडी काढत, ह्या साडीचा उपयोग दोरी सारखा करून फासावर लटकणार आहे. दोघे हि क्षणभर स्तब्ध राहतात आणि मग विचारतात, का म्हणून?
दोन वर्षांपूर्वी मी शिक्षण अर्धवट सोडून मी तिच्या सोबत पळून आलो होतो. दिहाडी मजदूरी करून कसाबसा संसाराचा गाडा रेटू लागलो. पोटाची भूक प्रेमापेक्षा मोठी असते. काही महिन्यातच प्रेम आटलं. तिला हि वाटू लागले चूक झाली. पण केलेल्या चुकीचे भोग भोगावेच लागतात. हाड-हाड निघाले आहे, तिचे. अर्धपोटी राहते ती. शिवाय सहा महिन्याची मुलगी हि आहे. पण रोज काही काम मिळत नाही. काही पैशे असते तर, भाजीचा ठेला टाकला असता. पण कोण उधार देणार? घरभाडे हि तुंबले आहे. त्या छोट्या पोरीसाठी दुधाचा बंदोबस्त हि करणे शक्य नाही. विचार केला, आत्महत्या करावी, सुटकारा मिळेल यातून.
मुलगा: भैया, तू तर सुटेल, पण तिचे काय होईल, जिने तुझ्यावर विश्वास टाकला. प्रेम केले.
तो: हाच प्रश्न मी तुला विचारला तर. काही क्षणाची शांतता.
मुलगा: भैया, आत्महत्या करू नको, हे ५००० रुपये घे. पैशे जास्ती नाही आहे, पण तुझा काही दिवसांचा बंदोबस्त होईल. तो पर्यंत कदाचित तुला कुठल्या कारखान्यात काम हि मिळेल. किंवा या पैश्यात भाजीचा ठेला हि लाऊ शकतो.
तो : पैशे हातात घेत, नाही करणार आत्महत्या, पण तुम्ही काय करायचे ठरविले आहेत?
मुलगी: भैया, तुमची कहाणी ऐकून, मला तुमचे म्हणणे पटते. आत्महत्या करणे किंवा पळून जाने योग्य मार्ग नाही. पुन्हा आई-बाबांशी बोलून पाहते किंवा ज्या मुलाशी लग्न होणार आहे, त्याचाशी बोलून पाहते. काही मार्ग निश्चित निघेल.
मुलगा: मार्ग निघे पर्यंत मी हि थांबेल. नाही निघाला तरी आम्ही आमचे प्रेम हृदयात जपून ठेऊ. ते कुणी आमच्या पासून हिरावून शकत नाही.
तेवढ्यात वार्याची एक झुळूक आली. पिवळीधम्म फूलेंं त्यांच्या अंगावर पडली. जणू अमलतासने कौल दिला होता. त्याने झाडाकडे पहिले. अमलतास हसत होता. त्याचे मन शांत झाले. आपल्या बायको मुलीची आठवण आली. तो त्या मुलाकडे पाहत म्हणाला, हे ५००० रुपये उधार. उद्या पासून मी भाजीचा ठेला लावणार. जमले तर पुढच्यावर्षी याच दिवशी तुमचे पैशे परत करेल.
प्रतिक्रिया
14 May 2016 - 1:56 pm | कंजूस
अमलतासला सुगंधही असतो.
14 May 2016 - 1:56 pm | कानडाऊ योगेशु
सो धिस स्टोरी इज अबाऊट सैराट मीट्स अ रेसेन्ट सुसाईड इन दिल्ली!
चांगला कल्पना विस्तार केला आहे.
पटाईतकाका तुमची ही कथा एका एकांकीकेचा उत्तम प्लॉट होऊ शकतो.
14 May 2016 - 2:39 pm | उगा काहितरीच
दूरदर्शनवर मॕच पावसामुळे बंद पडला, किंवा काही तांत्रिक बिघाड असला की काही गोष्टी दाखवत होते. तशा टाईपची गोष्ट वाटली. या कथानकावर निश्चित तशी शॉर्टफिल्म होऊ शकते .
14 May 2016 - 2:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सारांश, प्रेम करुन लग्न करायचे असेल तर नोकरी-रोजगार महत्वाचा आहे.
-दिलीप बिरुटे
14 May 2016 - 2:48 pm | यशोधरा
किती मस्त लिहिले आहे पटाईत काका! अगदी हृद्य.
तुमची ही मिश्र भाषा फार आवडते.
14 May 2016 - 11:54 pm | रुस्तम
+१
14 May 2016 - 3:10 pm | चंद्रनील मुल्हेरकर
पळुण जाऊन लग्न करणे हा तद्दन गाढवपणा आहे.किमान पुढच्या पाच वर्षाची आर्थिक शाश्वती असल्याशिवाय लग्न करु नये.
14 May 2016 - 3:12 pm | सिरुसेरि
छान कथा . +१ . पुर्वी दुरदर्शनवर "मिट्टीके रंग" सिरीअलमध्ये अशा कथा दाखवत असत .( उदा. आज चले है दंडासा )
14 May 2016 - 5:45 pm | अजया
छान लिहिलीये कथा.
-पटाईत काकांच्या भाषेच्या लहेजाची फॅन!
14 May 2016 - 11:53 pm | रुस्तम
+१
14 May 2016 - 6:13 pm | बोका-ए-आझम
मस्त! एकदम डोळ्यासमोर उभी राहिली. त्या आत्महत्या करू इच्छिणाऱ्या माणसाच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी चांगला शोभेल.
14 May 2016 - 6:45 pm | उगा काहितरीच
चला कास्टिंग डायरेक्टर , लेखक फिक्स झाले बाकी ?
14 May 2016 - 8:10 pm | कानडाऊ योगेशु
लघुपटाचे नाव "अमलताश" ठेवले तर?
14 May 2016 - 8:07 pm | विवेकपटाईत
प्रतिसाद बाबत धन्यवाद. खर म्हणाल तर मी काही कल्पनाशील लेखक नाही. पळून दिल्लीत येणार्या एका परिवाराची व्यथा मी स्वत: बघितली आहे. नुकताच सैराट सिनेमा आला. दोन दिवस आधी पळून जाण्याची एक घटना कानात पडली. पंख फुटल्या शिवाय पक्षी हि घरटे सोडत नाही. त्यात तर आपण मनष्य आणि सैतान लोकांनी भरलेले महानगर. पळण्या एवजी आपल्या जागेवर घट्ट पाय रोवून आपण विपरीत परिस्थितीशी सामना करू शकतो. भर उन्हाळ्यात फुलणार्या अमलतासचे झाडापासून विपरीत परिस्थितीशी झगडण्याची मला प्रेरणा मिळते. म्हणून अमल्तासचे झाडा भोवती हि कहाणी गुंफली आहे.
14 May 2016 - 8:34 pm | पैसा
सुरेख कथा आणि आशा दाखवणारी सकारात्मक.
18 May 2016 - 11:12 am | शित्रेउमेश
+१११
18 May 2016 - 11:32 am | मृत्युन्जय
उत्तम कथा. सैर्राट च्या वार्यात या वादळाचाही विचार करायलाच हवा की.
18 May 2016 - 12:04 pm | नाखु
जाण आल्यावरच जानम शोधावी हेच खरे !!
पटाईतांची लेखन्शैली आवडणारा नाखु