माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा..
लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा..
किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही
त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन
दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...
त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी
अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी..
पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने
कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने...
म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा
शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...
प्रतिक्रिया
18 Jan 2008 - 12:23 am | स्वाती राजेश
खुपच मस्त ओळी लिहिल्या आहेत.
अशाच कविता संग्रही असतील तर जरूर पोस्ट करा.
स्वागत आहे...
म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा
शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...
या मस्त ओळी आहेत.
18 Jan 2008 - 1:09 am | प्राजु
स्वातिशी सहमत आहे..
- प्राजु
18 Jan 2008 - 5:05 am | मुक्तसुनीत
तुमच्या कवितेमधील रचनेचे दोष लक्षात घेऊनही (किंबहुना, रचनेचा, सौष्ठवाचा अभाव आहे हे जाणवत असतानाही) त्यातील सूचितार्थाचा , त्यामागील संवेदनशीलतेचा मला स्पर्श झाला. माणसाच्या आयुष्याबद्दल विचार मांडताना काव्यात अनेक रूपके येतात. समुद्र , किनारा, लाटा ही रूपके काही नवी नव्हेत. पण , या पारंपारिक रूपकांचा इतका चपखल वापर क्वचितच दिसतो.
मला तुमच्या ओळी आवडल्या. त्या लिहीण्याने काहीतरी नवे सत्य मांडल्यासारखे वाटले.
18 Jan 2008 - 5:41 am | धनंजय
ही रूपके पारंपारिक आहेत पण तशी थोडीशी चपखल नाहीतही.
"किनारा" आणि "समुद्र" यांची आदलाबदल करूनही ही कविता वाचता येते, हे रूपके चपखल नसण्याचे द्योतक आहे :
> माणसाने किनारा होण्यापेक्षा समुद्र व्हावे ..
> तुटणार्या लाटेसारखे प्रत्येक दु:ख प्रवाही होऊन झेलणारा..
> समुद्राला नसतातच कुणी मित्र वा वैरीही
> त्याच्या नशीबात असतात फक्त लाटा अन
> दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...
> त्यातला एखादा वाळूचा किनारा लाट हळुवारपणे पांघरतो
> अलगदपणे सागराशी हितगुज करतो..
> पण त्या किनार्यात गुंतायचे नसते समुद्राने
> कारण खडक लाटा फोडून परतवतात नविन किनार्याचे...
> म्हणुनच म्हणतो किनारा होण्यापेक्षा समुद्र व्हावे
> शेवटी तोच असतो सोबती दुःख प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...
18 Jan 2008 - 6:14 pm | पेशवे बाजीराव तिसरे
नमस्कार,
स्वाती राजेश,प्राजु,मुक्तसुनीत,धनंजय तुमच्या प्रतिक्रिया बद्दल आभारी आहे मी.... धनंजय मी काही कवि नाही... चपखल रूपके रचना सौष्ठव हे असले काही कविते मध्ये असते हे मला माहीती नाही... जे मनात आले जे शब्द सुचले ते लिहीले... कविता करण्यामागचा माझा एकच हेतु आहे...
प्रतिमा जरी सुख-स्वप्नांच्या अशा
अवेळीच भंगल्या...
भरकट्लेले विचार व्यसनात बुडवण्यापेक्शा
कविता केलेल्या चांगल्या...
18 Jan 2008 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिमा जरी सुख-स्वप्नांच्या अशा
अवेळीच भंगल्या...
भरकट्लेले विचार व्यसनात बुडवण्यापेक्शा
कविता केलेल्या चांगल्या...
हे मात्र बरं आहे !!! कविता करत राहा :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
18 Jan 2008 - 8:28 pm | धनंजय
कल्पना छानच आहे. फक्त पूर्ण घासलेली-पुसलेली नाही, त्यामुळे कच्चा खर्डा समोर ठेवल्यासारखा भास झाला इतकेच.
कल्पनास्फूर्ती होऊन ती लिहिण्याचे कार्य करणे म्हणजे कवित्वाचा अर्धा-अधिक भाग तुमच्यापाशी आहेच. उरले फक्त मनन, स्व-संपादन, आणि वाचकाच्या दृष्टिकोनातून तेच शब्द वाचून घेण्याची संवेदनाशक्ती. तीही बहुधा तुमच्यापाशी आहे. कारण कविता सांगितली म्हणजे केवळ आपल्या मनाच्या भावनांना स्वतःसाठी सुचलेले शब्द राहत नाहीत. त्याच भावना उत्कटतेने वाचकात निर्माण करायचा मानस असतो. त्यामुळे तो वाचक कोण ते ठरवून, त्याच्या नजरेतून कविता वाचता आली पाहिजे. हेदेखील तुम्ही बहुधा केले असावे - येथेही काही वाचकांच्या मनाला तुमची कविता भिडलीच आहे.
"प्रतिमा जरी ... चांगल्या" ही चारोळी बरी जमली आहे, याबाबत प्राडॉ यांच्याशी सहमत :-)
18 Jan 2008 - 10:23 pm | स्वाती महेश
चांगली कविता.