"सूर निरागस हो..." शंकर महादेवन यांच्या प्रसन्न स्वराने कट्यार चित्रपटाची सुरुवात होते.. आणि पुढील ३ तास ही सुरेल कथा अक्षरशः गुंतवून ठेवते.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पं. जीतेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, इत्यादी दिग्गजांनी अजरामर केलेल्या या कलाक्रुतीची मोहिनी आजही लोकांच्या मनावर कायम आहेच. सुबोध भावे सरख्या अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकाराने, तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या साथीने, ही कथा चित्रपटरूपात आणून त्यांस अधिकच उंचावर नेऊन ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल.
ब्रिटिशांच्या अमलाखालिल हिंदुस्थानातील विश्रामपूर हे सर्व कलागुणांचा योग्य मानमरातब व कदर करण्यासाठी नावाजलेले संस्थान. सुरांचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे,नम्र स्वभावाचे, मितभाषी पंडित भानुशंकर शास्त्री (शंकर महादेवन), हे तर संस्थानच्या, तिथल्या जनतेच्या गळ्यातले ताईतच. मिरजेतील एका कार्यक्रमाच्या दर्म्यान पंडितजींची भेट आफताब हुसेन, या मनस्वी गायकाशी होते. प्रथम भेटीतच खाँसाहेबांच्या गायनाचे चाहते झालेले पंडितजी, त्यांना विश्रामपुरास येण्याचे आमंत्रण देतात. बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेले खाँसाहेब राजाश्रय मिळवण्याच्या आशेने विश्रामपुरास येतात खरे, पण राजदरबारातील एका मुकाबल्यात त्यांची गायकी पंडितजीपेक्षा काकणभर कमीच सिद्ध होते. राजगायकाचा किताब, राहण्यास प्रशस्त हवेली, व मानचिन्ह असलेली एक नक्षीदार कट्यार, असे भरघोस इनाम असलेली स्पर्धा हरल्याची खंत घेऊन खाँसाहेब परततात, पण या पराभवाची सल त्यांना स्वस्थ बसू देत नाही. काहीही करून आपल्या घराण्याच्या गायकीचे श्रेश्ठत्व सिद्ध करायचे, व राजगायकाची पदवी मिळवायचीच, या इरेला ते पेटतात. परंतू सलग १४ वर्षं कसोषीचे प्रयत्न करूनही, पंडितजींवर मात करण्यात मात्र त्याना यश काही मिळत नाही. आधिच पराभवाचे शल्य, त्यात बिकट आर्थिक परिस्थितीचे चटके, आणि सततच्या पराभवामुळे होणारी कुचेष्टा, यामुळे, त्यांच्यातिल जिंकण्याची ईर्षा, राक्षसी महत्वाकांक्षेचं रूप घेते, आणि शेवटी, पंडितजींवर कुरघोडी करण्यासाठी त्यांना एक अत्यंत हीन क्रुत्य करण्यास भाग पाडते.
गायनस्पर्धेत खाँसाहेब विजयी होतात, राजगायकाचा किताब व हवेली जिंकतात व विजयोन्मादात आकंठ बुडून जातात. पंडितजी मात्र पुरते खचून, विश्रामपूरातून नाहिसे होतात. १४ वर्षांनंतर मिळालेल्या मानसन्मान व ऐश्वर्यामुळे खाँसाहेबांचा अहंकार अधिकच वाढीस लागतो. अशातच आगमन होते सदाशिव (सुबोध भावे) या पंडितजींच्या शिष्याचे. आपल्या गुरुंवर झालेल्या अन्यायाची, त्यांच्या झालेल्या अवहेलनेची कथा ऐकून सदाशिव पेटून उठतो, व थेट खाँसाहेबांची हत्या करण्यासाठी हवेलीवर पोचतो. खाँसाहेबांची कन्या झरीना त्याला अडवते. "हाडामासाच्या माणसाची हत्या कोणीही करू शकतो. पंडितजींवरच्या अन्यायाचा सूड घ्यायचा असेल, तर खाँसाहेबांच्या अहंकाराचा नाश करून दाखव." हे त्याच्या मनावर बिंबवते. सूडाने पेटलेला सदाशिव, खाँसाहेबांच्या गायकीचे श्रेष्ठत्व मोडून काढून त्यांच्या अहंकाराला संपवण्याचा विडा उचलतो. आपल्या गुरुंवरच्या अन्यायाचा सदाशिवने घेतलेला प्रतिशोध, खाँसाहेबांचा चिरडलेला अहंकार .. याची कथा म्हणजे "कट्यार.."
पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलेल्या नातकाची ही नितांतसुंदर कथा बहुतेकांना ठाउक आहेच. नव्हे, तिचे लाखो चाहते आहेतच. अशात, हे कथानक चित्रपट स्वरूपात आणणं हे एक मोठंच आव्हान असतं (आठवा.. दुनियादारी चित्रपटात मूळ कलाक्रुतीचा केलेला सत्यनाश. असो.).योग्य पटकथा लेखन या बाबतीत सर्वात महत्वाचं. अगदी "मेक ऑर ब्रेक" ठरवणारं. सुबोध भावे आणि टीमने यात चांगलीच बाजी मारलेली आहे. अतिशय ओघवत्या पटकथेमुळे, आणि तितक्याच उत्तम संवादलेखनामुळे, चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात १००% यशस्वी ठरतो.
कलाकारांची योग्य निवड, ही कट्यारची सर्वात उजवी बाजू. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावेंपासून अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वर पर्यंत सर्वच कलाकार आपापल्या भूमीकेत अगदी चपखल बसलेत.
सचिन पिळगावकरांना मिळालेली ही आजवरची सर्वोत्तम भूमीका असावी. सततच्या पराभवाने खचलेले, ईर्षेने, आसुयेने उद्विग्न, गर्वाने मग्रूर झालेले खाँसाहेब त्यांनी अविस्मरणीय केले आहेत. शंकर महादेवन यांचा पडद्यावरील वावर हा त्यांच्या गायनासारखाच, प्रसन्न, सुखावह. सदाशिवचे पडद्यावर आगमन जरी मध्यांतराच्या थोडेच आधी होत असले, तरी, सुबोध भावे पुरता भाव खाऊन जातो. इतक्या सहजतेने त्याने सदाशिव साकारला आहे, की अभिनय खरोखर खूपच सोप्पा असावा की काय असं क्षणभर वाटतं. बालगंधर्व, लोकमान्य, या पाठोपाठ सदाशिव तितक्याच ताकदीने उभा करणारा सुबोध, आजच्या घडीला मराठी सृष्टीतील सर्वोत्तम अभिनेता असावा यात शंकाच नाही.
मूळ नाटकाप्रमाणेच, संगीत हा या चित्रपटाचादेखील आत्मा आहे. पं अभिषेकी, व वसंतराव देशपांडेंच्या मूळ रचना शंकर महादेवन, राहुल देशपांडे, आणि महेश काळे इतके सुंदर गायले आहेत, की एखाद्या सुरेल मैफिलीत बसल्याचा कित्येकदा भास होतो, आणि तशीच दाद प्रेक्षकांतूनही येत राहते.
याचबरोबर, शंकर-एहसान-लॉय या त्रयीने रचलेली इतर गाणीही चित्रपतातील मूळ रचनांमध्ये कुठेही विसंगत अथवा अप्रस्तुत वाटत नाहीत इतकी समर्पक.
अभिनयाइतकीच दिग्दर्शनातही आपली या क्षेत्रावर मजबूत पकड आहे हे सुबोध भावेने पदार्पणातच दाखवून दिले आहे. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेले नाही, किंवा जे संगीताचे दर्दी श्रोते नाहीत, अशांनाही कट्यार अतिशय मनोरंजक वाटेल हे निश्चित. मूळ नाटकाच्या, त्या संगीताच्या चाहत्यांसाठी तर ही एक मेजवानीच आहे.
अतिशय उच्च निर्मितीमूल्यं, व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, चित्रपटाची भव्यता रेखीवपणे साकारली गेली आहे. "झी"चे त्याबद्दल खरोखरच अभिनंदन. दिवाळीच्या मुहूर्तावर, खानमंडळींच्या भव्य बॉलिवुडपटांच्या गर्दीत मराठी निर्मात्यांनी आत्मविश्वासाने टाकलेलं हे धाडसी पाऊल चित्रपतगृहांमध्ये घट्ट रोवलेले राहील, व त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, यात कोणताच संदेह नाही!
प्रतिक्रिया
12 Nov 2015 - 7:51 pm | अजया
अरे वा.छान परीक्षण.वाचून बघावासा वाटतोय सिनेमा.
12 Nov 2015 - 7:53 pm | काकासाहेब केंजळे
काय सांगता ?म्हागुरुंनी चांगली ॲक्टींग केली आहे??????
12 Nov 2015 - 8:11 pm | श्रीरंग
हाहाहा! होय काकासाहेब. अजिबात ओव्हरअॅक्टींग केली नाहिये या भूमिकेत.
12 Nov 2015 - 7:57 pm | संदीप डांगे
सुंदर... चित्रपट पाहिल्या जाईलच...
12 Nov 2015 - 7:58 pm | एक एकटा एकटाच
फार छान समीक्षण लिहिलय
12 Nov 2015 - 8:02 pm | एस
परीक्षण सुंदर आहे. तस्मात् चित्रपट पाहण्याची इच्छा वाढीस लागली आहे!
12 Nov 2015 - 8:10 pm | मदनबाण
चित्रपट पहावयास हवा... :)
जाता जाता :- * शाकुंतल ते कट्यार *
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam
12 Nov 2015 - 10:23 pm | परिकथेतील राजकुमार
बाण्या हा चित्रपट बघणार असेल तर मी बघणार नाही.
13 Nov 2015 - 8:54 pm | मदनबाण
ठीक आहे मी पाहत नै जा... आता तू पहा आणि तुझ्या इष्टाइलने "रस ग्रहण " करुन "परिक्षण " लिही. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh
14 Nov 2015 - 7:09 pm | विशाल कुलकर्णी
आता तू पहा आणि तुझ्या इष्टाइलने "रस ग्रहण " करुन "परिक्षण " लिही.
मग त्यापेक्षा तुच लिही बाबा. ताम्हनकरांची प्रतिभा लैच उफाळून येते म-हागृबद्दल बोलताना.
14 Nov 2015 - 10:43 pm | मदनबाण
ताम्हनकरांची प्रतिभा लैच उफाळून येते म-हागृबद्दल बोलताना.
तेच तर... बरेच दिवसांनी परासेठ लिहते झाले आहेत, तर आम्हीही अधीर झालो आहोत त्यांचे शब्दमोती वाचण्यास... होउन जाउंदे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira
12 Nov 2015 - 8:11 pm | कविता१९७८
परीक्षण सुंदर आहे.
12 Nov 2015 - 8:21 pm | प्रमोद देर्देकर
अजुन पाहिला नाहिये. म्हाग्रु साठीच टाळत होतो. पणआता नक्की पाहतो. धन्यवाद.
12 Nov 2015 - 8:46 pm | रेवती
परिक्षण आवडले. संधी मिळताच सिनेमा पाहणार.
12 Nov 2015 - 9:11 pm | आनंद
महागुरुनीं खरच चांगला अभिनय केला आहे.
पुन्हा पुन्हा बघण्या सारखा आहे.
12 Nov 2015 - 9:15 pm | जव्हेरगंज
चित्रपट आधीपासुनच दर्जेदार असेल असं वाटत होतं!
बघणारच!!
12 Nov 2015 - 9:20 pm | पैसा
छान ओळख करून दिलीय. सिनेमा नक्की बघणार!
12 Nov 2015 - 9:26 pm | निनाद मुक्काम प...
आधी अनेक ठीक येथे व जालावर महागुरूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह लोकांनी उभे केले. पण थंड डोक्याने विचार केला तर त्यांची ह्या भूमिकेसाठी योग्य सुबोध ने केली , ही भूमिका साकारण्यासाठी महागुरूंना अजिबात कष्ट पडले नसावे किंवा अभिनय करावा लागला नसावा. गर्वाने मग्रूर झालेले खाँसाहेबांचे जीवन महागुरू प्रत्यक्ष जगतात. आपल्याला काय ती अक्कल आहे आपण म्हणजे कोणीतरी मोठे असे डोक्यात ठेवून गुर्मीत वागणारे महागुरू ह्यांची बॉलीवूड मधून उचलबांगडी झाल्यावर मराठीत इनोद इनोद खेळायला लागले तेथे सुद्धा महेश कोठरे ह्यांच्याशी त्यांचे शीत युद्ध कंपूबाजी जोरात चालू असायची
तसे ह्यांचे शिनेमे बरे चालायचे मात्र महेश च्या सिनेमातील खलनायक त्यांच्या डायलॉग सहित लोकप्रिय व्हायचा. लक्ष्याचा हुकमी कट्टर चाहता वर्ग सिनेमांना गर्दी करायचा ,आजही हा कट्टर चाहता वर्ग टिकून आहे तसेस महेश च्या सिनेमातील नवनवीन प्रयोगांचे कौतुक झालेले पाहून महागुरुंची जी तगमग व्हायची त्याची उजळणी त्यांनी कट्यार मध्ये केली. असावी बहुतेक त्यांच्या अलीकडच्या मुलाखती पाहिल्या की सुंभ ….
असो
13 Nov 2015 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा
अत्यंतिक सहमती! हीच एक शक्यता जोरात खरी वाट्टे.. कारण, हाच माझा मार्ग एकला.. मधला त्याचा(बाल कलाकार म्हणून) निरागस अभिनय(डान्स सहित) आणि नदीयां कें पांर मधला साधा सरळ नायक.. पर्यंतचा सचिन सर्वस्वी वेगळा होता.. तो नंतर म्हाग्रु परेंत रेंगत रेंगत गेला.. याच सध्याच्या अवस्थेचा न्याय भुमिकेला मिळाला असावा..ही शक्यता खरी वाट्टे
16 Nov 2015 - 11:20 am | मनस्वी
+१ अत्रुप्त, निनाद
16 Nov 2015 - 11:56 am | मनस्वी
अजुन एक जाणवणारी त्रुटी म्हणजे १४ वर्षांच्या कालावधीनंतर खाँसाहेब आणि पंडितजी अतिवृद्ध झाल्यासारखे दाखवलेत. १४ वर्षांनंतर (अंदाजे, त्यांच्या मुलींच्या वयावरून) ४५-५० च्या आसपास असणार्या खाँसाहेब आणि पंडितजीना रंगभूषेने वय वर्षे ६५-७० च्या आसपास दाखवले आहे. राजकवि मात्र जसेच्या तसे.
12 Nov 2015 - 9:36 pm | प्रीत-मोहर
आधीपासुनच बघायचा असे ठरवले होते. आता संधी शोधुन बघण्यात येईलच
12 Nov 2015 - 9:46 pm | उगा काहितरीच
बरेच लोक शंका सचिनच्या ॲक्टिंग बद्दल शंका घेत आहेत . त्या अगदीच निराधार आहेत असं नाही . पण तरीही हा चित्रपट नितांत सुंदर झालेला आहे. सर्वच कलाकारांनी (सचिनला धरून) अतिशय मेहनत घेतलेली आहे. गायक राहुल देशपांडे , शंकर महादेवन क्या कहने केवळ लाजवाब. हा चित्रपट पाहून एखाद्या सामान्य व्यक्तीलाही शास्त्रीय संगीताची गोडी लागू शकते.
अजून एक मुद्दा - जे की माझे वैयक्तिक मत आहे , इतकी मेहनत घेऊन , इतके पैसे खर्च करून कुणी मराठी व्यक्ती इतका धाडसी प्रयोग करीत असेल तर इतर बाजारू चित्रपट पाहण्यापेक्षा हा पाहावा.
(टिप: मला सुबोध भावे चेक देणार नाहीये!)
12 Nov 2015 - 10:05 pm | स्रुजा
वाह ! काय सुंदर परिक्षण आहे. सिनेमा बघणार होते च. महागुरुंकडुन पण संयत अभिनय करवला असेल तर सुबोध खरोखरच चांगला दिग्दर्शक आहे !
कट्यार ची गाणी सध्या डोक्यात नुसती घुमतायेत. मी मराठी आहे म्हणजे किती नशिबवान आहे हे या गाण्यांनी पुन्हा एकदा पटवलं, मला जर मराठी समजत नसते तर मी केवढ्या मोठ्या खजिन्याला मुकले असते !!
12 Nov 2015 - 10:24 pm | प्रचेतस
उत्तम परिक्षण. चित्रपट कदाचित बघेन.
12 Nov 2015 - 11:56 pm | अविनाशकुलकर्णी
दिवाळी पाडवा....
गरमागरम पु~या...
अन नारळाचे दुध घातलेली "मटार उसळ"
उसळीचा पहिला घास घेतला...अन
"मटार काळजात घुसली"
13 Nov 2015 - 5:55 pm | प्रदीप
दोन पातेले भरून शिकरण करा, व त्या काळजात झालेल्या जखमेवर ओता. कट्यार त्यात विरघळून जाईल.
13 Nov 2015 - 7:03 pm | अभ्या..
कट्यार विरघळेल..
मटारीचे काय?
नंतर केळ्याचे काय?
13 Nov 2015 - 8:17 pm | प्रदीप
त्यांचे आत्मे तळमळत राहतील !
13 Nov 2015 - 12:02 am | वेल्लाभट
महागुरूंना ज्यांना काही म्हणायचंय ते म्हणोत.
पण सचिनचा अभिनय एक नंबर आहे आणि हे पिक्चर बघितला की कळेलच.
पिक्चर अप्रतिम आहे ! जरूर जा असं म्हणतो. संगीत, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, अभिनय, वेशभूषा सगळं काही ग्रँड झालंय. सुबोध भावे चं सॉलिड कौतुक आहे.
13 Nov 2015 - 8:53 am | सिरुसेरि
मुळ नाटकाच्या कथेमध्ये बरेच बदल केलेले दिसत आहेत . मुळ नाटकामध्ये खाँसाहेब यांची पत्नी पंडितजींवर कुरघोडी करण्यासाठी एक कारस्थान रचते . खाँसाहेब यांना आपल्या पत्नीचे हे कारस्थान समजते तेव्हा खुप उशीर झालेला असतो व ते पंडितजींना वेळीच सावध करु शकत नाहीत . हा सल त्यांच्या मनात कायम राहतो .
तसेच मुळ नाटकामध्ये सदाशिव हा कसलीही सुडबुद्धी नसलेला ,व संगीत शिकण्याची मनापासून तळमळ असलेला तरुण आहे . त्याला खाँसाहेब व पंडितजी या दोघांबद्दल ही समान आदर आहे. दोन्ही घराण्यांच्या गायकीमध्ये असलेल्या संघर्षामध्ये त्याच्यासारख्या सच्च्या कलाकाराला संगीत शिकण्याची संधी नाकारली जाते.
त्यामुळे , मुळ 'कट्यार' ची अपेक्षा न ठेवता एक स्वतंत्र कलाकृती असाच प्रकार दिसत आहे .
13 Nov 2015 - 9:13 am | रमेश आठवले
सबंध सिनेमात मी फक्त उर्दू मधेच बोलतो असे सचिन म्हणाले. अशी पटकथा असेल तर नसिरुद्दीन शाह यांच्या सारखा कसदार नट घ्यायला काय हरकत होती ? त्यांची सरफरोश सिनेमातील गझल गायकाची भूमिका अप्रतिम होती.
13 Nov 2015 - 10:07 am | श्रीरंग
आठवले साहेब, तुम्ही चित्रपट अवश्य पहा. तुम्हालाही नक्की जाणवेल, की सचिन पिळगावकर यांनी भूमीकेला १००% न्याय दिलाय. आजवर त्यांना मिळालेल्या सर्वोत्तम भूमिकेचं सोनं केलंय.
13 Nov 2015 - 10:03 am | श्रीरंग
मूळ नाटक बर्याच काळापूर्वी पाहिले असल्याने, माध्यमांतर करताना काही तपशीलात बदल केले असल्यास माझ्या लक्षात आले नाहीत.
चित्रपटात देखील, खाँसाहेबांच्या पत्नीसच पंडितजींविरुद्ध ते कारस्थान करताना दाखवले आहे. मात्र त्यांना त्याची सल त्यांच्या मनात असल्याचे, अथवा त्याबद्दल खेद असल्याचे जाणवत नाही. हा तपशील माझ्या लेखनातून निसटला हे मान्य करतो.
सदाशिव हा चित्रपटातही संगीत शिकण्याच्या उद्देशानेच वेश्रामपुरात येतो, पण पंडितजींविरुद्ध झालेल्या कारस्थानाबद्दल समजताच सूडभावनेने पेटून उठतो.
14 Nov 2015 - 2:36 pm | राजाभाउ
अगदी हेच म्हणायचे होते. मुळ नाटका मध्ये सदाशीवला केवळ संगीता बद्द्ल तळमळ आहे सुडबुद्धी वगैरे काही नाही. त्या मुळे ते पात्र एका वेगळ्या उंचीवर जाते तर खाँसाहेब हे येव्हड्या डार्क शेड मध्ये नाहीत ते अहंकारी आहेत पण वाइट नाहीत. माझ्या मते या खुप महत्वाच्या गोष्टी होत्या त्यामुळे त्या खटकल्या.
अर्थात चित्रपट खुपच सुंदर जमला आहे यात वाद नाही
14 Nov 2015 - 7:31 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख परिचय !
सहमत आहे सिरुसेरि. मुळात खानसाहेबांचे पात्र पूर्णत:
अहंकारी नाहीये. मुळ नाटकात पंडीतजी जिंकू नयेत म्हणून आपल्या पत्नीने त्यांना कसलासा विषारी पदार्थ खायला दिला होता हे कळते तेव्हा खाँसाहेबांची होणारी उलाघाल, सदाशिवचे गाणे ऐकताना त्या सच्च्या कलावंताची होणारी ओढाताण हे सगळे नाटकात पाहायला मिळते. नाटकातले खाँसाहेब हे गाण्यावर, त्याचबरोबर स्वत:वरही प्रेम करणारे एक मनस्वी गायक आहेत. अहं आहे पण तो त्यांच्या स्वभावाचा फ़क्त एक पैलू आहे, तो माणूस पूर्णपणे अहंकारी नाहीये. आपण आपल्या पत्नीच्या कारस्थानामुळे जिंकलो आहोत हे कळल्यावर होणारी अस्वस्थता लपवण्यासाठी ओढलेला तो अहंकाराचा मुखवटा आहे कारण राजगायक या पदाचा मोहही सूटत नाहीये...
चित्रपटाची कथा पाहता सचिनला अकोमोडेट करण्यासाठी खाँसाहेबांचे पात्रच बदललेय की काय (स्वभाव) असे वाटतेय. विनोदाचा भाग सोडा. पण खुप बदल केलेले दिसताहेत. सिरूसेरि यांनी म्हटल्याप्रमाणे सदाचे पात्र सुद्धा अतिशय साधे, सरळ निव्वळ गाणे शिकण्याची ओढ़ असलेले आहे, त्याला सूडाचा स्पर्शही नाहीये.
अर्थात तरीही निव्वळ गाण्यासाठी म्हणून चित्रपट पाहणार आहेच. :)
15 Nov 2015 - 6:20 am | निनाद मुक्काम प...
सचिनला अकोमोडेट करण्यासाठी
मला बी असेच वाटते
महाग्रू चा स्वतःबद्दल चा अंदाजे बयान ... वायफळ बडबड स्वतःबद्दलचे आत्मपुराण ह्या बद्दल माहिती असल्याने त्यांना डोळ्यासमोर ठेवून मूळ पटकथेत बदल केला. विशेतः त्यांच्या पात्राबाबत व त्या अनरूप आपल्या भूमिकेत बदल केला असेल.
जसा महेश कोठारे लक्ष्याला समोर ठेवून पटकथा लिहायचा.
महाग्रू ने माझ्या मुलीस मीच लॉंच करणार असा हेका धरून त्यांच्या ९० च्या दशकातील शैलीनुसार एकुलती एक शिनेमा काढला होता. तो सुद्धा कार्टी काळजात घुसली ह्या नाटकचे रुपांतरण होते. मात्र तो सिनेमा पाहून मोहन जोशी व स्वाती चिटणीस ह्यांनी डोके फोडून घेतले असते.
त्या सिनेमाच्या पूर्व प्रसिद्धी करतांना त्यांची बडबड स्वतःची लाल करणे पहिले तेव्हा ठरवले मिपावर कंपू कशाला हवा नि कशाला हवे दु आयडी
आपलंच आपल्यावर स्तुती सुमने उधळावी आपणच आपली लाल करावी
काय गरज आहे दुनियेची हम से हे जमाना जमानेसे ,,, असो
अशी माझ्या जर्मन आख्यानाची सुरवात झाली, आणि एका पेक्ष्या एक सरस भागांची वाख्यानमाला लिहिल्या गेली.
आज सुद्धा लोक्स तिचे भाग नव्हे तर त्यावरील प्रतिसाद वाचण्यासाठी आवर्जून आमचे आख्यान वाचतात.
तेव्हापासून
सचिन व मी असे दोघे माझा आदर्श आहेत.
13 Nov 2015 - 9:37 am | DEADPOOL
Sur niragas ho kaljat ghusale.
13 Nov 2015 - 10:00 am | तिमा
परीक्षणाशी सहमत. कालच चित्रपट पाहिला. सचिन विषयीचे मत बदलावे लागले सिनेमा बघितल्यावर.
एकच गोष्ट खटकली. कव्वालीचा प्रसंग कृत्रिम वाटतो. एवढे मोठे खाँ साहेब एकदम कव्वाली म्हणतील हे पटले नाही.
13 Nov 2015 - 10:11 am | सुमीत भातखंडे
चित्रपट नक्की पहिला जाईल.
13 Nov 2015 - 12:22 pm | मोगा
Kavvali is the Best
13 Nov 2015 - 2:16 pm | शरभ
मुवी ट्रेलर पाहिलं २-३ वेळा. मला सचिनजींची अॅक्टींग भावली. त्यांच मराठी चित्रपटातील योगदान वादातीत आहे. मला वाटतं त्या बद्दल दुमत नसावं. And that cannot be undone by things like Mahaguru etc. त्यासाठी त्यांची कलाक्रुती गढुळ होउ नये/करु नये. आता एखाद्याला "मी" असतो थोडाबहुत, पण स्वभाव म्हणुन सोडुन द्यायचं. १-२ मुलाखतीदेखील पाहिल्या त्यांच्या, प्रमोशनच्या निमित्ताने आलेल्या, त्यातदेखील कुठेही गर्विष्ठ्पणा आढळला नाही.
गाण्यांबद्दल बोलायची लायकी नाही माझी. पण शंकर-एहसान्-लॉय मुळे संगीत पदं STEREO झाली आणि वेगळीच मजा घेउन आली.
Note: मलादेखील सचिनजींकडून चेक मिळणार नाहीये.
13 Nov 2015 - 2:41 pm | मोगा
सचिन मनसेमध्ये गेल्यानंतर मायबोली व मिपा लोकाना तो अचानक बोअर वाटू लागला आहे.
( काँग्रेसात गेला नाही हे त्याचे नशीब . ! नैतर बिचार्याची यथेच्छ धुलाई झाली असती इथे. )
... काँग्रेसी मोगा हातगावकर
13 Nov 2015 - 4:00 pm | मुक्त विहारि
"बोअर वाटू लागला आहे."
मस्त तर्क....
सलाम तुमच्या तर्कशास्त्राला.
बाद्वे,
तुमच्याकडून अज्जुन थोडी माहिती मिळेल का?
१. "सचिन मनसेमध्ये गेल्यानंतर..." ====>
१.अ.) सचिन आधी कुठल्या पक्षांत होता?
१.ब.) सचिन त्याचे पक्ष-बदलण्याचे निर्णय तुम्हाला आधी सांगतो का?
१.क.) सचिन आता "मनसे" कधी सोडणार?
१.ड.) सचिनने मनसेत का प्रवेश घेतला?
१.इ.) सचिन मनसेत खूष आहे का?
ह्या प्रश्र्नांची उत्तरे आपण द्यालच अशी आहे.उगाच ज्ञान पाजळणे, ही आपली वृत्ती नाही, हे आम्हाला ठावूक आहे.
तुमची उत्तरे मिळेपर्यंत थोडी बियर पिवून येतो.
14 Nov 2015 - 12:47 pm | नाखु
तूर्तास "हात दाखवून अवलक्षण" असा दिर्घ काव्य लिहितायेत मोगाजी त्यानंतर बघतील ते इकडे!
सध्या त्यांच्या साठी खास हे गाणे. महामहीम मोगा खानत्यात महामहीम मोगा खान काळ्याशर्ट्वर चौकटीच्या अंगरख्यात मस्त बागडताना दिसतील तुम्हाला.
हातसफाईवाला नाखु
14 Nov 2015 - 9:06 pm | मुक्त विहारि
सध्या आम्ही मात्र,
"अगाध तर्कशास्त्र हो आमुचे" असे काव्य रचायच्या विचारात आहोत.
शिवाय, "आमची ख्याती, हज्जार खाती." असा दिव्य ग्रंथ पण पाडायच्या विचारात आहोत.
15 Nov 2015 - 12:29 am | मोगा
नवीन सरकार आल्यावर साक्षात महागुरू साईबाबांवर शिंतोडे उडले.
तिथं हे महागुरू सचिन किस झाड की पत्ती !
म्हणून तर्क केला !
15 Nov 2015 - 9:22 am | मुक्त विहारि
"नवीन सरकार आल्यावर साक्षात महागुरू साईबाबांवर शिंतोडे उडले.
तिथं हे महागुरू सचिन किस झाड की पत्ती !
म्हणून तर्क केला !"
===========================
चान चान
मग आता तुमच्याच "सचिन मनसेमध्ये गेल्यानंतर मायबोली व मिपा लोकाना तो अचानक बोअर वाटू लागला आहे."
आणि "नवीन सरकार आल्यावर साक्षात महागुरू साईबाबांवर शिंतोडे उडले." ह्या दुसर्या वाक्याचा संबंध लावल्यास....
तुमचे तर्कशास्त्र हे मूळ तर्कशास्त्र नसुन ते "वसापिंलामोगा" आहे, असे समजतो.
वसापिलामोगा ===> वडाची साल पिंपळाला लावणार्या मोठ्या गाढवकथा.
15 Nov 2015 - 9:28 am | मोगा
मोठा गाढव = मोगा™
धन्यवाद
15 Nov 2015 - 9:47 am | मुक्त विहारि
"मोठ्या गाढवकथा"
असे आहे ते....
त्यात उगाच मोगाला गुंतवू नका....
13 Nov 2015 - 3:45 pm | मुक्त विहारि
पण...
श्रीरंग जोशी ह्यांच्या "(आठवा.. दुनियादारी चित्रपटात मूळ कलाक्रुतीचा केलेला सत्यनाश. असो.)" ह्या वाक्याला सहमत.
13 Nov 2015 - 10:27 pm | श्रीरंग
हाहाहा. तो मी नव्हेच. श्रीरंग जोशी वेगळे.
13 Nov 2015 - 3:52 pm | चौकटराजा
मी अजूनही हां चित्रपट पाहिलेला नाही पण तो सचिन साठीच मी पहाणार कारण एरवी फारसा सखोल अभिनय तो करीतच नाही पण मला खात्री आहे की आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम भूमिका हीच असणार आहे याची त्याला पुरती जाणीव असणार !
13 Nov 2015 - 3:52 pm | चौकटराजा
मी अजूनही हां चित्रपट पाहिलेला नाही पण तो सचिन साठीच मी पहाणार कारण एरवी फारसा सखोल अभिनय तो करीतच नाही पण मला खात्री आहे की आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम भूमिका हीच असणार आहे याची त्याला पुरती जाणीव असणार !
13 Nov 2015 - 5:37 pm | बोका-ए-आझम
नटरंग प्रमाणेच झीवर दाखवून चावून चोथा केला जाईलच. तेव्हा पाहू. दिवाळीत मिपा आणि इतर दिवाळी अंक वाचणे आणि फराळ करणे वगैरे पुष्कळ चांगली कामं आहेत. उगाचच घाम गाळून कमावलेले पैसे आणि मुष्किलीने मिळणारा वेळ घालवावा एवढी कट्यारची ओढ नक्कीच नाहीये. वर निनादजींच्या मताशी सहमत.
13 Nov 2015 - 5:57 pm | मोगा
आम्ही अमर , चेंबूरला पाहिला. ५० रु बाल्कनी
13 Nov 2015 - 11:45 pm | निनाद मुक्काम प...
सामान्य माणसालाही ....
म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकणारे असामान्य असतात असे म्हणायचे आहे का
अमर गोवंडी मध्ये आहे ना रे
सहकार ते अमर सगळो राजन ची टोकीज
14 Nov 2015 - 10:22 pm | मोगा
त्यामुळे अमरला जाताना गोवंडीतून जावे लागते.
पण ते टॉकीज मात्र चेंबूरच्या हद्दीत आहे. मागे केळकरवाडी , घाटला , शंकराचार्य मठ वगैरे चेंबूरचा भाग येतो.
13 Nov 2015 - 7:43 pm | _मनश्री_
आजच पहिला
खूप छान आहे
सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे
सचिनने खरच खूप छान काम केलंय
13 Nov 2015 - 9:49 pm | नितीनचंद्र
कालची सर्व शो हाऊसफुल झाल्याची बातमी आणि मिपावरचे परिक्षण यावरुन तरी क्ट्यार चाहत्यांच्या अपेक्षा, कलाकारांना आनंद आणि निर्मात्यांना व्यावसायीक गणित जमल्याचा आनंद एकत्रीत मिळवुन देणार असे दिसते.
आधीच्या लेखाकरता मलाही चेक मिळालेला नाही. कट्यारचा एक चाहता म्हणुन ही धडपड होती. अजुन सिनेमा पहायला दिवाळीत जमले नाही. रविवारी शांतपणे पाहिन म्हणतो.
13 Nov 2015 - 11:48 pm | शिव कन्या
इतकं तपशीलवार लिहिलंय कि बघणं आलं.
13 Nov 2015 - 11:48 pm | निनाद मुक्काम प...
थोडे अवांतर
आम्हा अनिवासी लोकांना थोडे मुंबई पुणे मुंबई २ बद्दल सुद्धा सांगा ना भाऊ
कोणी तरी परीक्षण लिहा त्याला प्रतिसादांनी सजवा
गेला बाजारभाव राम रतन बद्दल एकोळी धागा काढा
त्यांच्या मध्यंतरात मोदीराज च्या एकवर्ष कामगिरीची जाहिरात कशी वाटली ते लिहा.
14 Nov 2015 - 12:26 am | सागरकदम
प्रेम रतन
http://www.misalpav.com/node/33671
13 Nov 2015 - 11:51 pm | शिव कन्या
इतकं चांगलं लिहीलंय... म्हणजे बघणं आलं.
14 Nov 2015 - 1:25 am | रेवती
हे सगळं वाचून शिनेमा लवकरात लवकर पहायला मिळावा असे वाटत आहे. काल मीही महाग्रुंची अॅक्टींग प्रोमोजमध्ये काळजीपूर्वक पाहिली व खरच चांगली वाटली पण म्हणून सचीन या कलाकाराचे चित्रपटसृष्टीत योगदान वगैरे म्हणण्यासारखे काही आठवत नाही. काही विनोदी चित्रपट आहेत पण ते तेवढेच लक्ष्मिकांत बेर्डे व अशोक सराफ यांचेही आहेत. कट्यारमुळे आता सचीन पिळगावकर आवडते अभिनेते वगैरे बनणार नाहीत. त्यांचा या चित्रपटातील अभिनय आवडेल इतकेच! आणि हो, ते मनसेत गेले वगैरे आत्ता समजतेय. त्याने काही फरक पडलेला नाही. कट्यारच्या निमित्ताने त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला आणि त्यात त्यांनी सत्रांदा आपण ग्रेट असल्याचे सांगितले आहे.
https://www.youtube.com/watch?v=TBRscGrfz_Y
14 Nov 2015 - 11:36 am | जगप्रवासी
थंड डोक्याने विचार केला तर त्यांची ह्या भूमिकेसाठी योग्य सुबोध ने केली , ही भूमिका साकारण्यासाठी महागुरूंना अजिबात कष्ट पडले नसावे किंवा अभिनय करावा लागला नसावा. गर्वाने मग्रूर झालेले खाँसाहेबांचे जीवन महागुरू प्रत्यक्ष जगतात. आपल्याला काय ती अक्कल आहे आपण म्हणजे कोणीतरी मोठे असे डोक्यात ठेवून गुर्मीत वागणारे महागुरू >>>> एकदम सहमत, "चला हवा येऊ द्या" मध्ये प्रमोशन च्या वेळेला सचिनने शंकर महादेवन यांची स्तुती करताना देखील स्वतःची पाठ थोपटून घेतली.
हा पिक्चर नक्की पाहणार, "सूर निरागस हो" हे गाणं तर अप्रतिम झालंय, या गाण्याचा विडीओ देखील प्रेक्षणीय झालाय.
14 Nov 2015 - 1:28 pm | यशोधरा
काल कट्यार पाहिला. चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे. मूळ संहितेमध्ये चित्रपटात बदल केले आहेत. सदाशिवाची व्यक्तिरेखा बदलून टाकली आहे. चित्रपटाच्या मुख्य प्रवाहात लागी करेजवा कटार सारखे गाणे गाळले आहे.
तरीही चित्रपटाचा गोळाबेरीज परिणाम वाईट नाही. कव्वालीची गरज नव्हती बहुधा. सूर निरागस हो आणि मनमंदिरा ही दोन्ही गाणी उत्तम जमली आहेत.
शंकर महादेवनने उत्तम अभिनय केला आहे, एक प्रकारची सहजता जाणवते त्याच्या पडद्यावरच्या वावरण्यामध्ये. स्वतः गाणारा असल्याने त्याला पंडितजी अधिक कळले असावेत का, असे वाटून गेले त्याचे काम पाहताना. अमृता खानविलकरनेही चाम्गले काम केले आहे, तसेच मृण्मयीनेही.
साक्षी तन्वर आणि पुष्करला मात्र फुकट घालवले आहे. सिनेमाभर महागुरुनी बराच संयत अभिनय केला आहे पण गातानाचे अतिरेकी हातवारे आणि वेडेवाकडे चेहरे टाळले असते तर बरे झाले असते. सुबोधलाही गातानाचा अभिनय जमला नाहीये, बाकी सहज वावरला आहे नेहमीप्रमाणेच.
एकूण सिनेमा एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.
14 Nov 2015 - 1:53 pm | याॅर्कर
.
.
चेहर्यावरील हावभाव आणि केलेले हातवारे हे शास्त्रीय संगीतात स्वाभाविकच आहे.
आपण भीमसेन जोशी गाताना त्यांचे चेहर्यावरचे हावभाव बघितले असतीलच.असो
(मिपाकरांनीही उगाचाच स्वतः पराकोटीचे अनुभवी परीक्षक असल्याचा आव आणू नये.)
14 Nov 2015 - 2:11 pm | यशोधरा
हो नक्कीच पाहिले आहेत आणि स्वतः भीमसेनजी गात असताना ते स्वाभाविक आणि सहज वाटले आहे, महागुरुणा ते जमलेले नाही, हे माझे मत आणि ते मी मांडले आहे.
अवांतर: मिपाकरांशी काही वैयक्तिक दुश्मनी आहे की काय?
15 Nov 2015 - 9:28 pm | रमेश आठवले
भीमसेनजी किंवा इतर गायक यांचे स्वर आणि हातवारे यांचा समन्वय त्यांच्या मेंदूत सारखा होत असल्याने ते दोन्ही एकमेकांशी विसंगत वाटत नाहीत. महागुरुंचे हातवारे आणि पार्श्व गायकाचे स्वर यांच्यात तसेच तादात्म्य होऊ शकत नाही आणि ही विसंगती आपल्याला जाणवते.
14 Nov 2015 - 2:43 pm | अत्रन्गि पाउस
भीमसेनजीचा उल्लेख इथे नको...ते गायक होते
14 Nov 2015 - 2:55 pm | यशोधरा
अगदी अगदी.
14 Nov 2015 - 4:45 pm | याॅर्कर
"गायकाची" भूमिका वटवण्यासाठी ते हावभाव करावे लागतात.
सचिन आणि सुबोध हे सिनेमामध्ये "गायक" आहेत हो.........
ते वास्तविक आयुष्यातले सचिन आणि सुबोध आहेत,या पूर्वग्रह दृष्टिने पाहिल्यास त्यांच्या अभिनयाची मजा नाही घेता येणार.
त्यांना याआधी कधी पाहिलेच नाही यादृष्टिकोनातून सिनेमा बघा म्हणजे ते खर्या आयुष्यातही गायकच आहेत असे वाटेल.
14 Nov 2015 - 11:35 pm | अत्रन्गि पाउस
अभिनय आहे हे ठौक आहे आणि म्हणूनच ....सचिन प्रत्यक्ष आयुष्यात स्वत;ला गायक समजतात आणि ते निदान तालासुरात गातात ...पिळगावकर घराण्यात बाकीचे सुद्धा गायक आहेत ...त्यामुळे निदान त्यांनी तरी mandrek सारखे हात वारे आवरायला हवे होते ...
बाकी भीमसेनांचे गाणे, त्यात ..नेमके पणाची आस होती...तो एक अखंड शोध होता, सुखाच्या अतीव वेदना होत्या ती समाधी होती आणि ह्या सगळ्याचा आणि त्यांचे हाताचे नर्तन चेहेऱ्यावरच्या मुद्रा ह्यात एक प्रमेय होते
14 Nov 2015 - 11:50 pm | याॅर्कर
आता तुम्ही पुढचा सिक्वल काढा आणि स्वतः खाँसाहेबांची भूमिका करा.
काहीही दुमत नाही.
15 Nov 2015 - 9:13 am | अत्रन्गि पाउस
महिरलोय !!!
हल्ली त्या स्मायल्या नैत ...२ ४ टाकल्या असत्या ...
रागौ नका बुवा !!!
14 Nov 2015 - 2:17 pm | राजाभाउ
१००% सहमत
14 Nov 2015 - 2:23 pm | राजाभाउ
वरील प्रतिसाद हाअत्रुप्त यांच्या प्रतिसाद खाली लीहीला होता. तो इथं कसा आला कोणास ठाउक
14 Nov 2015 - 4:15 pm | चौकटराजा
मी १९७० सालापासून इन्ग्रजी मराठी व हिन्दी मिळून ३५०० इतके चित्रपट पाहिले आहेत. व महाराष्ट्रराज्य नाट्यस्पर्धेच्या माण्डवाखालूनही गेलो आहे. मला नाटक हे माध्यम त्याच्या अनेक मर्यादांमु़ळे आवडलेले नव्हते सबब प्रथमच सांगतो की मला चित्रपट अगदी सर्वार्थाने ( संगीतासह ) नाटकापेक्षा सरस वाटला. काहीसे याचे श्रेय शन्कर एहसान लॉय याना द्यायलाच हवे.हे नाटक मी राहुल देशपांडे १० वर्षाचा छोटा सदाशिव असताना अगदी विगेतून ही पाहिले आहे. मूळ कथेत केलेले बदल स्वाभाविक व कथेला जास्त धार आणणारेच आहेत. या चित्रपटाचा भार संगीताने प्रामुख्याने वाहून नेला आहेच पण सचिन पिळगावकर यानी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. संपूर्ण चित्रपटात वेगळाच खर्जाकडे झुकणारा आवाज त्यानी लावला आहे. हा चित्रपट अभिनयात खान साहेबाचा असला तरी सदाशिव ला (भावे ना ) ही उत्तम वाव मिळालाय ! मिरजेचे वातावरण, दरबारातील वातावरण, नदीकाठचे वातावरण यात दिगदर्शकाने कमाल केलीय. संवाद फार सुरेख व अगदी आत पोहोचणारे आहेत. मॄणाल व अमॄताची कामे ही लाजबाब. त्यामाने मूल नाटकापेक्षा बाकेबिहारी कवि हे पात्र इथे नीरस वाटते. गायनामधे सर्वच गायकानी तुफान फटकेबाजी केलीय अर्थात राहुल येक नम्बर. सुरुवातीचे केदार रागातील पारम्पारिक चाल असलेले खासाहेबाच एन्ट्री गीत त्यागोदर भूप रागातील गणेश स्तवन आपली पकड घेते मग किरवानीतील अफाट बंदिश जलद लयकारी व तानबाजीच्या गायकीचे दर्शन घडवते. मनमंदिरा ( बहुतेक तिलक कामोद) हे गीत व त्यावेळचे चित्रिकरण अत्यंत बहारदार आहे. कवाली शिवरंजनी रागातील आहे त्यात सदाशिव उर्दूला जे संस्कॄत मिश्रित हिदीचे उत्तर देतो त्यातील शब्द वर्णनापलिकडचे आहेत. बाकी पुरिया रागातील मुरलीधर शाम तसेच भीमपलासी केदार मालकन्स बहार अशी रंज्कक संगीत माला असलेले घेई छंद सालग वराली रागातील मध्य लय झपतालातील याच गीताचे आगळे स्वरूप मूळ नाटकातील अभिषेकी मौसिकीशी इमान राखणारे असे आहे. पूर्ण चित्रपटात कट्यार कथेचे निवेदन करते तिच्यावरच शेवटची फ्रेम आहे. मी आज रक्ताचा सडा पाडायला दरबारात आलेली शेवटी स्वरांच्या वर्षावात आनंदाने चिम्ब झाले अशा अर्थाची ओळ सात स्वरामधील नादब्रम्हाची जादू अधोरेखित करणारी अशी आहे.महाराष्ट्रात चित्पावन व मुसलमान याना एकत्र नांदवणारे असे जे नादब्रम्ह आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी हा चित्रपट पहावाच.
14 Nov 2015 - 7:07 pm | _मनश्री_
श्री . चौकट राजा
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत
पण एक गोष्ट खटकली
तुमच्या प्रतिसादात तुम्ही शंकर महादेवन यांचा उल्लेख सुद्धा केला नाहीत
शंकर एहसान लॉय या त्रिकुटाने अतिशय उत्तम संगीत दिलाय या चित्रपटाला ,शंकर महादेवन यांच गायन उत्कृष्ट आहे
आणि पहिल्यांदाच अभिनय करत असूनही खूप छान झालाय शंकर महादेवन यांचा अभिनय
16 Nov 2015 - 1:12 am | श्रीरंग
वाह! माझ्या संगीताच्या तोकड्या ज्ञानामुळे, चित्रपतातील संगीताबद्दल, रागांबद्दल इतकं विस्तृत लिहिता आलं नाही. आपण खूपच सुंदर वर्णन केलेत. धन्यवाद! :)
14 Nov 2015 - 7:11 pm | _मनश्री_
मला चित्रपट अगदी सर्वार्थाने ( संगीतासह ) नाटकापेक्षा सरस वाटला. काहीसे याचे श्रेय शन्कर एहसान लॉय याना द्यायलाच हवे
सॉरी ,
तुमच्या प्रतिसादातील ' शंकर एहसान लॉय ' यांचा उल्लेख नजरेतून निसटला होता
14 Nov 2015 - 7:24 pm | मोगा
कट्यारचा निवेदनाचा आवाज कुणाचा आहे ? रीमा लागू?
14 Nov 2015 - 7:27 pm | _मनश्री_
हो
14 Nov 2015 - 7:44 pm | विशाल कुलकर्णी
बादवे हे परिक्षण लगेच व्हाटसएप वर आलं सुद्धा, अर्थातच श्रीरंगजींना अजिबात श्रेय न देता, त्यांचा साधा नामोल्लेखही न करता ...
14 Nov 2015 - 7:52 pm | त्रिवेणी
मस्त परिक्षण.
मला संगीतातले काहीही कळत नाही पण उद्या बघणार आहे.
सचिन पिलगावकर यांच्या बद्दल निनाद यांच्याशी सहमत, अतिशय डोक्यात जातात ते.
14 Nov 2015 - 8:14 pm | याॅर्कर
ते कसे?हनुमानसारखे सूक्ष्म रूप घेवून?नाकातून?कि कानातून?
.
.
संगीतातले काही कळत नसल्यास ठीक आहे,पण शास्त्रीय संगीत आवडत नसल्यास सिनेमा न पाहणे.
15 Nov 2015 - 6:36 am | निनाद मुक्काम प...
योर्केर साहेब
सिनेमातील गाणी तू नळीवर उपलब्ध आहेत ती पाहून माझे तरी असे मत आहे
संगीत ज्याला आवडते त्याने हा सिनेमा पहावा त्यासाठी शास्त्रीय संगीत आवडले पाहिजे असा कायदा नाही.
नवीन पिढीला आजच्या तरुण पिढीने आपल्या वाड वडिलांच्या कडून ह्या अजरामर कलाकृतीबद्दल एवढे ऐकले होते की ते स्वतःसोबत नव्या पिढीला सुद्धा दाखवले तर निदान त्यांना चांगले संगीत म्हणजे नक्की काय प्रकार असतो ते तरी कळेल.
नाही तर त्यांची नशिबी हनी सिंग कमाल का उसकी चार बॉटल भी कमाल कि अशी अवस्था होईल
आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
16 Nov 2015 - 2:19 pm | वेल्लाभट
मजेशीर युक्तिवाद.
असल्या सॉल्लिड समजुती तुम्ही करून घेतल्यात हे ठीक. पण त्या जाहीरपणे सांगताय सुद्धा? खिखिखि
14 Nov 2015 - 8:31 pm | त्रिवेणी
ही ही ही. अस नाही हो पण त्यांच्या बोलण्यात खुप attitude असतो अस मला आपल् वाटते.
आणि नवर्याला आवडते संगीत वैगरे सो त्याच्यासाठी जाणार.