काही महिन्यांपूर्वीची गोष्ट....
नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्य्क्रमाच्या ब्रेकनंतर येणार्या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो कारण सारेगमच्या सेलिब्रिटी पर्वाचे जुने भाग दाखवत होते. आणि गुप्त्यांच्या 'वंदनाताई' अमृता सुभाषला सांगत होत्या....
"तू गाणं छानच गायलंस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं. पण ज्या गाण्याबद्दल त्या बोलत होत्या ते गाणं होतं "जैत रे जैत" मधलं...
'मी रात टाकली, मी कात टाकली'
मी बावळटासारखा त्या गाण्याचा संबंध 'या डोळ्याची दोन..." शी लावला आणि मनातल्या मनात आश्चर्य करायला लागलो. या गाण्यात वंदनाताईंना 'हाँटींग' असं काय आढळलं असावं? ब्रेक संपेपर्यंत कसाबसा दम धरला आणि 'सारेगामा' सुरु झालं. समोर आधी 'जैत रे जैत' मधले त्या गाण्याचे दृष्य झळकले. स्मिताचे ते ओझरते दर्शन आणि कॅमेरा वर्तमानात आला. अमृता सुभाष 'मी रात टाकली, मी कात टाकली' गात होती... पण माझे मन वर्तमानात यायला तयारच नव्हते. मी कुठेतरी तिथेच लिंगोबाच्या डोंगरावर, कदाचित स्मिताच्या त्या गहिर्या डोळ्यात हरवलो होतो. लताबाईंचा दैवी आवाज, बाळासाहेबांचं धुंद करणारं संगीत आणि त्यावर स्मिताची ती मुक्त, थोडीशी स्वैर भासणारी, नाग्यासाठी वेडी झालेली, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत ......
"मी रात टाकली, मी लाज टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली..."
म्हणत बेभान होणारी चिंधी.
मला क्षणभर वाटले की ते स्वर, ते सुर, ते संगीत , ते शब्द , स्मिताच्या चेहर्यावरचे ते उन्मुक्त, स्वैर भाव नकळत एखाद्या तीराप्रमाणे माझ्यावर झेपावताहेत, माझ्याही नकळत मी त्यांच्या आहारी जातोय. त्यांची शिकार बनतोय. त्याच क्षणी जाणवले 'आपण वंदनाताईंच्या हाँटींगचा अर्थ मुर्खासारखा 'हाँटेड' असा लावला होता चुकून. ते शब्द, ते सुर खरोखर हाँटींग होते. प्रचंड गर्दीतही बरोबर तुमचा वेध घेण्याची ताकद त्या सुरात होती. यापुर्वीही खुप वेळा ऐकलेय हे गाणे मी. पण काल वंदनाताईंनी त्या गाण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. भानावर आलो तेव्हा अमृताचा परफॉर्मन्स संपला होता. हो, मी त्याला परफॉर्मन्सच म्हणेन कारण ते अमृताचे स्वर कानावर पडत असताना माझ्या डोळ्यासमोर मात्र जैत रे जैतमधली 'स्मिता' होती आणि स्मिताच्या त्या रापलेल्या (चित्रपटातील) चेहर्यावरच्या अवखळ निरागसतेला अमृताचे स्वर कुठेच योग्य वाटत नव्हते. मला वाटले आता नेहमीप्रमाणे कौतुक करुन दोन्ही गुप्ते अमृताला 'नी' नाहीतर 'वरचा सा' असे काहीतरी गुण देणार. पण वंदनाताईंनी धक्काच दिला. मला खटकलेल्या गोष्टीच, म्हणजे नको त्या ठिकाणी शब्दांवर दिलेला जोर, शब्दांचे चुकीचे उच्चार, काही ठिकाणी घसरलेला सुर याबद्दल सांगत वंदनाताईंनी अमृताला शुभेच्छा दिल्या.
मी लगेचच वाहिनी बदलुन टाकली आणि पुन्हा रिमोटशी खेळायला लागलो. पण आता त्या खेळण्यात अजिबात मजा येत नव्हती कारण डोळ्यासमोरच्या विस्तृत कॅनव्हासवर चिंधी आणि कानावर हळुवारपणे येत मनावर कब्जा करणारे ना.धो. महानोरांचे शब्द पिच्छा सोडायला तयारच नव्हते.
कसं होतं ना, बर्याच वेळा आपली अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी होवून जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की अरे याला बाळासाहेबांचं संगीत आहे जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय तोवर लक्षात येतं की अरे हे आपल्या आवडत्या कविचे शब्द आहेत. आपण नकळत त्या शब्दात गुरफटायला लागतो आणि तेवढ्यात डोळ्यासमोर उभा राहतो तो जिवंत, नैसर्गिक अभिनयाचा मुर्तीमंत आविष्कार साक्षात स्मिता पाटील, जरा कुठे स्मिताच्या डोळ्यात हरवून जायला बघावं तर मागे स्क्रीनवरची लिंगोबाची हिरवीगार झाडी, निसर्गाचं ते मनोहारी, नयनरम्य दृष्य खुणावू लागते. अरे माझी झोळी एवढी मोठी नाहीये रे परमेश्वरा. तू देता है तो छप्पर फाडके देता है ये तो सुना था, पण सगळ्या जाणिवांना भेदूनही असं काही हवंहवंसं देवून जातोस हे पहिल्यांदाच अनुभवतोय. मग अलगद मन हळू हळु मागे जायला लागतं. 'जैत रे जैत' बद्दल संबंधित दिग्गज कलावंतांकडून ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर फेर धरायला लागतात.
या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा अनुभव सांगताना श्री. रवींद्र साठे यांनी सांगितलं होतं ...
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्टय़ म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते. पण त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हटकेच आहे. मी जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलो. मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकात गात असू आणि जब्बार पटेल यांनी आमचं नाव पंडितजींना सुचवलं. मी रात टाकली या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं त्यावेळी माझं वय २७ र्वष आणि अनुभवही कमीच. पण ते गाणं झाल्यानंतर खुद्द लतादीदींनी सांगितलं की, खूप दिवसांनी एवढा सुरेल कोरस ऐकला. जैत रे जैत या एका चित्रपटातील गाणी ऐकली, तरी पंडित हृदयनाथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कल्पना येते.
गंमत बघा हे गाणं अजरामर झालं त्यात लताबाईंचा वाटा सिंहाचा होता. पण त्यांना मात्र कौतुक गाण्यातल्या कोरसचं. ही सगळी मोठी माणसं इतकी साधी, विनम्र कशी काय राहू शकतात बुवा?
चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेबद्दल सांगताना सांगितलं होतं...
काही दिवसांनी बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, ‘तुम्ही गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ ही कादंबरी वाचली आहे काय? नसल्यास जरूर वाचा. त्या कथानकात संगीताला उत्तम वाव मिळेल असं मला वाटतं. हवं तर आपण अप्पासाहेब दांडेकरांशी बोलू या.’
मी कादंबरी वाचली. चित्रपटाच्या दृष्टीनं मला ती आवडली. पण मला ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती. मी मुळात नाटकातला माणूस असल्यामुळे त्याचा फॉर्म बदलावा असं मला वाटलं. त्या आधी केलेल्या घाशीराम, तीन पैशाचा तमाशा या नाटकांमुळे या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देता येईल काय, यावर मी विचार केला. ‘जैत रे जैत’ ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा विचार झाला. दीदी आणि उषाताई यांनादेखील ही कल्पना आवडली. त्यांनी काम सुरू करायला सांगितलं.
संगीतिकेचं रूप चित्रपटाला द्यायचं असेल तर किमान वीसएक गाणी तरी चित्रपटात घ्यावी लागणार होती. गीतलेखनासाठी ना. धों. महानोर यांना सांगायचं ठरलं. त्या नंतर महानोर आणि बाळासाहेबांसोबत बैठका सुरू झाल्या. ‘प्रभुकुंज’मधल्या छोटय़ाशा खोलीत बाळासाहेब हार्मोनिअम घेऊन बसायचे. महानोर झराझरा गाणी लिहून द्यायचे. बाळासाहेब गाण्याच्या ओळीवर विचार करत डोळे मिटून बसलेयत.. मधूनच त्यांची बोटं हार्मोनिअमवर फिरतायत आणि एकेक चाल ते गुणगुणतायत.. अधूनमधून दीदी, उषाताई याही लक्षपूर्वक ऐकतायत.. चहाचे कप, खाण्याचे पदार्थ यांच्या साथीनं तासनतास कसे निघून जातायत हे कळत नाही. मधूनच बाळासाहेबांनी दुसऱ्या एखाद्या अल्बमसाठी केलेल्या चाली ऐकविल्या की मला हेवा वाटायचा आणि ती चाल आपल्याला वापरता येईल का, असं मी विचारायचो. पण बाळासाहेबांचं उत्तर असे, ‘नाही नाही, तुम्हाला या चालींवर मी तुम्हाला डल्ला मारू देणार नाही.’ तरीदेखील एक चाल मी अक्षरश: ‘ढापली’च.
दीदींसाठी केलेल्या ‘मी रात टाकली’ या गाण्यात एक कोरसचा तुकडा आहे, ‘हिरव्या पानात, हिरव्या पानात..’ ही चाल बाळासाहेबांनी दुसऱ्या एका अल्बमसाठी राखून ठेवली होती, पण ती या गाण्यात वापरावी असा हट्टच मी धरला. अखेर ते राजी झाले.
हे गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादु तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पं. हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतात आणि ते जेव्हा जुळून येतात तेव्हा इतिहास घडतो. 'जैत रे जैत' च्या गाण्यांनी असाच इतिहास घडवला. गोनिदांनी जेव्हा ही कादंबरी लिहीली तेव्हा त्यांना वाटले तरी असेल का? की ही कादंबरी पुढची कित्येक दशके चित्रपटाच्या माध्यमातुन रसिकांना विलक्षण आनंद आणि तृप्ततेची जाणिव देत राहणार आहे. असे म्हणतात की या चित्रपटासाठी महानोरांनी एकुण १९ गाणी लिहीली होती. मला खात्री नाही पण यापैकी प्रत्यक्ष चित्रपटात बहुदा १२ च गाणी वापरली गेली. निदान माझ्या माहितीत तरी तेवढीच आहेत. ही बारा गाणी तुम्हाला खालील दुव्यावरून उतरवून घेता येतील.
मुळात हा चित्रपट म्हणजे एक छान प्रेमकथा आहे. त्याबरोबरच ती एक सुडकथाही आहे, त्याबरोबरच ती एक सामान्य माणसाच्या जिद्दीचीही कथा आहे. राणीमाशीला नमस्कार केल्यानंतरही ती नाग्याचा डोळा फोडते म्हणून राणीमाशीला उध्वस्त करायच्या जिद्दीने पेटलेला नाग्या, मला पुण्येवंत व्हायचय या इच्छेन पछाडलेला नाग्या, लग्न करीन तर स्वतःला आवडलेल्या पुरुषाशीच म्हणून जिद्द करणार्या, त्यासाठी ठरलेल्या नवर्याला सोडून येणार्या, राणीमाशीने डोळा फोडल्यावरही कुरुप झालेल्या नाग्यासाठी आपले सर्वस्व शेवटी प्राणही पणाला लावणार्या चिंधीची कथा !
असो, थोडा भरकटलोच मी. आपण बोलत होतो... चिंधीबद्दल, खरेतर मी रात टाकली.." या अजरामर गाण्याबद्दल....!
शब्द अर्थातच ना.धों.महानोरांचे, संगीत पं. हृदयनाथ, स्वर साक्षात कोकिळेचे पण या गाण्यात आपल्याला वेड लावतो तो रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा कोरस !
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
लताबाई बेधुंद करत गात असतात. आपल्या डोळ्यासमोर असते चिंधी. मुक्त आणि मनस्वी स्त्रीचा एक मुर्तीमंत आविष्कार. मला आवडेल त्या पुरुषांचीच होणार अशी ठामपणे सांगनारी चिंधी. आपल्या नवर्याला सोडून आपल्या प्रियकराच्या शोधात निघालीय. आपला भुतकाळ तीने मागेच कुठेतरी सोडून दिलाय. जो कधी आपला वाटलाच नाही, त्या मोडक्या संसाराबद्दलची आसक्ती, लाज कधीच सोडून दिलीय. जुनाट झालेली कात टाकून देवून नागीण जशी नव्या रसरशीतपणाने पुढचे आयुष्य जगायला सिद्ध होते तशी तिने आपली जुनी जिनगानी त्यागून टाकलीय. तिला जगाची फिकर नाही, तथाकथित रुढी परंपराची चाड नाही. या क्षणी ती फक्त एक प्रिया आहे, आपल्या प्रियकराकडे मिलनाची मागणी करणारी एक प्रेमवेडी प्रेयसी.
इथे आपण लताबाईंच्या सुरात गुंतत जात असताना अचानक कानावर कोरसचे सुर घुमायला लागतात. स्पेलबाऊंड म्हणजे नेमके काय असते त्याचा जिवंत अनुभव देणारी ती जाणिव असते. जैत रे जैत हा संपुर्ण चित्रपट पटेलांनी सुत्रधाराच्या नजरेतुन आपल्यासमोर मांडलाय. हे सुत्रधारच आपल्यालाच नाग्या आणि चिंधीची कथा गाण्यांमधुन सांगत जातात. एखाद्या संगीतीकेसारखी ही कथा आपल्यापुढे उलगडत जाते.
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती...
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती....
खुपदा कसं होतं ना... काही गोष्टी अगदी अलवारपणे आपल्याला येवून भिडतात. त्या आपल्याला येवुन भिडेपर्यंत आपल्याला त्यांची जाणिवही होत नाही. हिरव्या गवतात नाही का, कसली तरी सळसळ कायम जाणवत असते, कुठलीतरी चाहूल कानावर येत असते, पण दिसत मात्र काहीच नाही. एखादी नागिण आपल्या शरीराला नागमोडी झोके देत सळसळ करत गवतातून निघुन जाते, आपल्याला दिसत नाही पण तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत राहते. इथे महानोरांनी चिंधीच्या चालण्यात तीच अदा, तीच नजाकत तर जाणवली नसेल. खरेतर गाण्याचे बोल पाहता हा प्रसंग खुप मादक करता येवु शकला असता. स्मितासारखी देखणी, रुपगर्विता त्यात अभिनयसम्राज्ञी जब्बारजींच्या दिमतीला हजर होती. पण जब्बारजींनी तो मोह आवरलाय. इथे स्मिता 'चिंधी'च वाटते. तिच्या चालण्या-बोलण्यातून चिंधीची गावरान तरीही अवखळ अदाच समोर येत राहते. त्यामुळे चिंधी कुठेही मादक वाटली तरी अश्लील वाटत नाही. हे जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाचे आणि स्मिताच्या अभिनयाचे यशच म्हणावे लागेल.
ह्या पंखांवरती , मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई , चांदन्यात न्हाती
सगळे पाश मागे सोडून चिंधी निघालीय आपल्या प्रियकराला भेटायला. जणू चांदण्याचे पंख लावून त्यावर नीळेशार आभाळ पांघरून. आता त्या संसाराच्या चार भिंतींची बंधने नाहीयेत, उंबरठ्याचा अडसर नाहीये. एखाद्या मुक्त मोरणी (लांडोरी) किंबहुना आनंदाने बेधुंद होवून नाचणार्या मोरासारखी ती आपल्या प्रियाशी मिलनाच्या आनंदाच्या शीतल चांदण्यात न्हातेय. विरहाचे उन्ह कधीच ओसरलेय आता फक्त त्याच्या मिठीत लाभणारी गोड, आश्वासक शीतलता.
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगर भिवरी, त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी , मनमानी , बाई फुलांत न्हाली ....
तिच्या तना-मनात, गात्रा-गात्रात तिचा साजण भिनलाय. इथे नाग्या हा ठाकरवाडीचा ढोलिया आहे. म्हणजे देवाचा प्रतिनिधी. चिंधी पुर्णपणे नाग्यामय झालीय. स्वतःचे असे काही अस्तित्वच उरलेले नाहीये. गंमत बघा स्वतःच्या नवर्याला, स्वतःच्या संसाराला सोडून येण्याची प्रचंड हिंमत असलेली ही भिंगर भिवरी प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रियकरासाठी सर्वस्व सोडायला निघालीय. चिंधीचं हेही एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्यक्षात ती अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीची, बंडखोर स्वभावाची स्त्री आहे. आपल्या विचारांसाठी, आवडी निवडीसाठी सगळ्या जगाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे. पण हि सगळी ताकद, हे सामर्थ्य तिला तिच्या नाग्यावरच्या प्रेमाने दिलेले आहे. त्याच्या प्रेमासाठीच ती एवढी हट्टी, मनमानी करणारी झाली आणि आता त्याच्याच प्रेमामुळे ती स्वतःला विसरून त्याच्यात सामावून जाऊ पाहतेय.
ना. धों. तुम्ही खरोखरच ग्रेट आहात. मुळात चिंधीचे हे जगावेगळे पात्र उभे करणारे गोनिदा महान. त्या चिंधीला तिचा खराखुरा चेहरा देण्यासाठी धडपडणारे जब्बार पटेल महान, तिला तिचं अस्तित्व मिळवून देणारी स्मिता महान.....
" जैत रे जैत" च्या माध्यमातून ही संगीतमय मेजवानी आपल्याला देणारे मंगेशकर कुटूंबीय महान ! तुम्ही लेख वाचा, कसा वाटला ते सांगा, मी जातोय पुन्हा एकदा 'शिकार' व्हायला, या 'हाँटींग' गीताची !
हा अनुभव हवाच असेल तर ....
https://www.youtube.com/watch?v=ZsvfFniNrUY&
विशाल...
प्रतिक्रिया
2 Feb 2015 - 12:11 am | मुक्त विहारि
एका अप्रतिम गाण्याची फार सुंदर ओळख...
दंडवत
2 Feb 2015 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा
+++++१११११
2 Feb 2015 - 12:44 am | खटपट्या
+१११
2 Feb 2015 - 5:20 am | अर्धवटराव
.
2 Feb 2015 - 9:08 am | बोका-ए-आझम
+१०००००
2 Feb 2015 - 9:32 am | कैलासवासी सोन्याबापु
मायला!!! तुझा व्यासंग !! _/\_
2 Feb 2015 - 9:47 am | विशाल कुलकर्णी
मनःपूर्वक आभार मंडळी _/\_
2 Feb 2015 - 2:46 pm | सूड
आवडलं!!
2 Feb 2015 - 3:44 pm | नाखु
अलवार ओळख !
2 Feb 2015 - 4:49 pm | प्रचेतस
अफाट सुंदर......कादंबरी, चित्रपट, गाणी आणि तुझं मुक्तकही....सगळंच
2 Feb 2015 - 5:05 pm | हाडक्या
मुक्तक मस्तच आहे हो.
पण.. पण संक्षींची आठवण आली आणि इथल्या गोग्गोड प्रतिक्रिया पाहून काय लिहिलेय यापेक्षा कोणी लिहिलेय हे पाहिलं जातं हे पुन्हा एकवार पटलं.
(तुम्ही कोण आहात ते माहीत नाही आणि तुमच्याबद्दल कोणताही आकस नाही. फक्त एक निरिक्षण नोंदवतोय या धाग्यावर)
2 Feb 2015 - 10:30 pm | हाडक्या
काडी टाकूनही (खरेतर खरे बोलूनही) एकही विरोधी मत न आल्याचे पाहून खालील शक्यता संभवतात.
१. जे बोललो ते खरेच होते.
२. जे बोललो ते पटले नाही तरी संक्षींचे नाव वाचून सगळ्यांनी गप्प बसायचे पसंत केले.
३. विशाल कुलकर्णी हा आयडी आम्हाला वाटला तसा नवोदित नसून त्याबद्दल बोलणे कोणास मान्य नसावे. (हेच नव्या आयडींच्या मागे काठी घेऊन लागतात तेव्हा मात्र चालून जाते.)
3 Feb 2015 - 11:01 am | विशाल कुलकर्णी
तुमचा आक्षेप नक्की कशाबद्दल आहे ते कळेल का ?
मी मध्ये २-३ वर्षे मिपावर नव्हतो. पण मिपावर सदस्यत्व घेवून किमान पाच वर्षे तरी होवून गेली असावीत. हे संक्षी कोण ते मला माहीत नाही. तुमचा आक्षेप जरा स्पष्ट कराल तर मग पुढे बोलता येइल.
3 Feb 2015 - 3:44 pm | हाडक्या
तुमच्याबद्दल नाहीये हो.. तुम्ही मस्तच लिहिलय. पण थोडं अलंकारीक निबंधासारखं झालंय पण छान लिहिलय. आणि हेच थोडे फार, इथे एक सदस्य होते "संजय क्षीरसागर" त्यांच्या लेखनशैलीची आठवण करुन देणारं झालंय, जसे की,
माझा प्रतिसाद सगळ्या गोग्गोड अशा प्रतिसादकांना आणि इथे वाचून गप्पपणे पुढे जाणार्या दांभिक मिपाकरांना होता जे अशाच प्रकारच्या संक्षीच्या लेखाची लांडगेतोड करायचे आणि त्यांनी उत्तरे द्यायला सुरुवात केली की मग पिसे काढायचे.
संक्षी साधे होते अशातला भाग नाही (त्यांच्यासाठी कोणतीही सहानुभुती नाही) पण लोकांचा दुजाभाव जाणवून येतोय तो मी स्पष्ट मांडला इतकंच. हेच नव्या लोकांच्या बाबतीतही घडतं. कोणी लिहिलंय हे पाहून प्रतिसाद देणार्यांची चीड येते आणि इथे इतरांच्या मौनाचा अर्थ एकप्रकारे मी म्हणालो ते बरोबर होते असाच होतो.
(परत सांगतो, व्यक्तिशः तुमच्याबद्दल आणि तुमच्या लिखाणाबद्दल काहीही आक्षेप नाही. तुमच्याकडून काहीही अपेक्षित नाही.)
फक्त दांभिकपणाची चीड येते आणि ती व्यक्त करणारे (सगळेच मिपाकर) इथे तेच करताना पाहून गप्प बसणे मला पटले नाही. बाकी वाटल्यास संमं (नेहमीप्रमाणे) "अयोग्य" प्रतिसाद उडवू शकतेच. :)
3 Feb 2015 - 3:52 pm | विशाल कुलकर्णी
तसं असेलही कदाचित. पण तसंच बघायला गेलं तर जुनी काही टाळकी सोडली तर इथे मलाही ओळखणारे फारसे कोणी असतील असे नाही वाटत मला. कारण तात्याने मिपा सोडायच्या सुद्धा आधी वर्षभर मी मिपावर येणं सोडलं होतं. ;)
3 Feb 2015 - 6:16 pm | जेपी
हाडक्या यांच्याशी सहमत आहे.
एकतर रोजचा रतीब चालु आहे.
दुसरी कडे लिवलेल आणुन टाकताय का ?
3 Feb 2015 - 6:46 pm | विशाल कुलकर्णी
जेपी,दुसरीकडे लिहिलेले इथे लिहू नये ऐसा नियम आहे का मिपाचा ?
3 Feb 2015 - 6:52 pm | जेपी
असा काय नियम नाय.
तरी रोजचा रतीब कुठुन येतोय ते लक्षात येतच.
3 Feb 2015 - 6:57 pm | विशाल कुलकर्णी
येवु द्या ना. ज्यांनी वाचले नसेल ते वाचतील ज्यानी वाचलेय ते इग्नोर करतील. वाचाच अशी सक्ती तर नाहीये केलेली कुणी.
3 Feb 2015 - 7:03 pm | जेपी
तेच तर आहे.
ज्यांनी वाचलय ते पुना वाचतायत आणी बाकीचे इग्नोर मारतात. *wink*
यानिमीत्त एक लक्षात आल.
ते इग्लींश मध्ये म्हणतात की more than equal तस काय तर वाटल.
बाकी चालु द्या.
3 Feb 2015 - 7:04 pm | वैभव जाधव
जेपी आन हाडक्याभावशी सहमत हाय.
3 Feb 2015 - 4:21 pm | प्रभाकर पेठकर
हाडक्या ह्यांच्याशी १०० टक्के सहमत.
गाणं भावणं, हाँटिंग असणं वगैरे वगैरे सर्वकाही मान्य आणि पटले आहे. मात्र लिखाण फारच शब्दबंबाळ, पाल्हाळीक आणि भक्तीरसाने परिपूर्ण आहे. जरा थोडक्यात आणि मोजक्या शब्दात असते तर जास्त परिणामकारक झाले असते असे वाटते.
3 Feb 2015 - 4:28 pm | विशाल कुलकर्णी
ते गाण्याचं रसग्रहण नाहीये पेठकर. ते गाणं ऐकताना मला काय वाटलं? माझा अनुभव काय होता? त्याबद्दल मला काय माहिती मिळाली याचं वर्णन आहे.
आणि माफ करा पण 'शब्दबंबाळ' या शब्दाच्या तुमच्या व्याख्या काय आहेत ते मला माहीत नाही. पण माझ्या व्याख्येत तरी हे बसत नाही. असोच
धन्यवाद !
3 Feb 2015 - 5:15 pm | प्रभाकर पेठकर
'शब्दबंबाळ' शब्दाच्या माझ्या व्याख्या, तुमच्या व्याख्या, ह्यांच्या व्याख्या, त्यांच्या व्याख्या अशा वेगवगळ्या नसतात. जे मोजक्या शब्दात मांडता येतं त्यासाठी अकारण शब्दांचा फापटपसारा मांडला की त्याला 'शब्दबंबाळ'ता प्राप्त होते.
मी माझे परखड मत दिले आहे तुम्हाला पटले नसेल तर सोडून द्या. त्यावर विचार करावाच असा आग्रह नाही.
3 Feb 2015 - 5:21 pm | विशाल कुलकर्णी
ज्याला तुम्ही परखड मत म्हणताय ते फक्त 'तुमचं' मत आहे. शब्दांचा फाफट पसारा आणि त्यांची मांडणी यात फरक असतो. जेव्हा एखाद्या आवडलेल्या गोष्टीबद्दल, अनुभवाबद्दल माणूस लिहीतो तेव्हा तो मनापासून व्यक्त होतो. प्रत्येक गोष्ट मोजून मापून करायला मला आवडत नाही. आणि हा लेख जर तुम्हाला फाफट पसारा वाटत असेल तर बोलणेच खुंटले. धन्यवाद आणि शुभेच्छा !
3 Feb 2015 - 5:22 pm | विशाल कुलकर्णी
'शब्दबंबाळ' शब्दाच्या माझ्या व्याख्या, तुमच्या व्याख्या, ह्यांच्या व्याख्या, त्यांच्या व्याख्या अशा वेगवगळ्या नसतात.
तुमच्या प्रतिसादावरून तरी तसेच दिसतेय.
3 Feb 2015 - 5:39 pm | प्रभाकर पेठकर
>>>ज्याला तुम्ही परखड मत म्हणताय ते फक्त 'तुमचं' मत आहे.
>>>>मी माझे परखड मत दिले आहे..
अहो मी स्वतःच 'ते' माझे स्वतःचे मत आहे म्हणून म्हंटले आहे. तुम्ही नव्याने काय सांगताय?
3 Feb 2015 - 5:42 pm | प्रभाकर पेठकर
एकूणात तुम्हाला तुमच्या लेखावर इतर सदस्यांची मते नको आहेत फक्त 'व्वा! व्वा! छान छान' असे प्रतिसाद हवे आहेत.
3 Feb 2015 - 4:43 pm | जागु
छान लिहीलय.
3 Feb 2015 - 5:25 pm | किसन शिंदे
पुन्हा वाचलं! मजा आली रे विशाल
3 Feb 2015 - 6:10 pm | कैलासवासी सोन्याबापु
मला, एक सांगा विशाल कुलकर्णी, तुम्हाला इतके रसाळ लिहावे का वाटले!!! (काहींच्या मते शब्दबंबाळ, तर काहींच्या मते तुमचा आयडी पाहुन "गोग्गोड" प्रतिक्रिया आल्या आहेत) !!!, मला एक कळले नाही कोण संक्षी ? (ह्यात "तुमच्या लिखाणा बद्दल काहीच नाही हो! पण मिपाकर दांभिक" ह्याच्च चालीवर ) अर्थात त्यांच्या बद्दल मला माहिती ओळख काहीच नाही सो कमेंट्स ही नाही!! इकडे येऊन एक असे मेंबर ज्याना आपण ओळखत नाही, लोक त्यांची कशी लांडगेतोड़ करत ह्यावर भाष्य करणे, हे कसे संयुक्तिक झाले?? तुम्ही अक्षता वाटने बंद करा बुवा! कमेंट करायला अक्षता वाटू वाटू लोकांस बोलवता तुम्ही असे काहीसे फीलिंग आले मला!!
आता ह्याच अनुषंघाने, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडेलच असे नाही!!!, मी जैत रे जैत वाचणे सोडाच पण पाहिलेला ही नाही! तरीही "स्मिता" ह्या एका गोष्टीपाई हा धागा वाचला! अन एक इच्छा झाली ते वाचायची अन बघायची!!, दोन दृष्टिकोण असू शकतात!,
१. वाईटातुन चांगले शोधणे (अर्थात इथे मुद्दलच नितांत सुंदर आहे)
२. उठसुठ टिका करणे!
ह्याहून घातक एक तीसरी वृत्ती असते!!!, "आव आणुन पिंका टाकत बसणे" ! ह्या परी काय बोलावे!!!
3 Feb 2015 - 6:51 pm | विशाल कुलकर्णी
चालायचेच बापु ! आणि पुन्हा त्याला विरोध करावा तर तुम्हाला फ़क्त वा वा वालेच प्रतिसाद हवेत हां आरोप आहेच.
3 Feb 2015 - 9:04 pm | हाडक्या
@ विशाल कुलकर्णी,
"चालायचेच " असा मानभावीपणा करून एकप्रकारे "तुम्हाला फ़क्त वा वा वालेच प्रतिसाद हवेत" हा मुद्दाच सिद्ध करताय. तरी पण, मला जरा जास्त अलंकारीक निबंधासारखा वाटला एवढीही टिका जर चालणार नसेल तर असोच.
@सोन्याबापू,
एकतर धागा माझा नाही आणि ना धागाकर्ता माझा कुणी मित्र/ शत्रु आहे की मी अक्षता वाटाव्यात.. ( आणि तसे जर तुम्हाला वाटतच असेल तर) तुम्हाला नको असतील तर तुम्ही पुढे होऊ शकताच की.
हे पब्लिक व्यासपीठ आहे, इथे काय आमंत्रण पत्रिका छापत नाहीत "या" म्हणून. आणि हो, फक्त "चान चान" म्हणावे अशी कोणाची इच्छा असल्यास तसा ढिस्केलमर टाकतील ते, तुम्ही उगी चिंता नका करु राव.
जर इथे काही घटना झाली असेल आणि त्यावर अगदी धागे काढून चर्चा झाली असेल तर त्या अनुशंगाने भाष्य करणे अजिबात असंयुक्तिक ठरत नाही. जर लेखावर प्रतिक्रिया देऊन नंतर लोकांच्या दांभिकपणाबद्दल मत-प्रदर्शन केले असेल तर तुम्हाला खटकण्यासारखे काय आहे त्यात ?
असे सढळपणे लिहिले आहेच की. अजून काय संमंला पण अक्षता द्यायच्या काय, तुमच्या भाषेत ?
फार काही टिका करतोय असा उद्देश नाही हे लेखकास स्पष्ट लिहिलेय (काय पटलं नाही ते पण लिहिलेय.)
पण हे घातक वगैरे लेबले लावायचं काय कारण ? तुम्हीच इथे आव अणून पिंका टाकताय असेही म्हणू शकतो की राव.
आणि कोणत्याही मताला असली "घातक" वगैरे विशेषणे लावून नक्की काय सिद्ध करताय? लोकांनी "चान चान" शिवाय काही बोलूच नये ?
मग त्या मोजींच्या किंवा त्यांच्यासारख्या लेखकांच्या धाग्यावर टिका करणार्यांना बोला की मग. त्यांनी काय लिहिलेय ते पण अगदी "त्यांच्या जीवन परिप्रेक्ष्याचा व्यामिश्र आरसा असेल" तुमचीच बुद्धी ते समजायला कमी पडत असेल असे सांगा ना त्यांच्यावर टिका करणार्यांना. तसाही मुद्दा तो नाही. लोकांच्या दांभिकतेबद्दल टिका केली तर तुम्ही "घातक वृत्ती" वगैरे म्हणण्याचे काही प्रयोजन नाही.
तुम्हाला माहित नसतील संक्षी, मोजी आणि इतर तर अभ्यास वाढवा. नसेल वाढवायचा तर जे नेहमी करता ते करा, इतरांना टिका केली म्हणून घातक वगैरे लेबले लावत फिरू नका.
3 Feb 2015 - 7:41 pm | प्रचेतस
तू लिही विशाल.
तुझे अगदी कमी लेख इतर संस्थळांवर वाचलेले आहेत.
3 Feb 2015 - 7:46 pm | जेपी
लिवा लिवा बिंधास लिवा.
आपल काय म्हणणे नाय.
जरा तो रोजचा रतीब कमी करा.
मंजे आमला पण निवांत एक एक लेख वाचता येईल.
3 Feb 2015 - 8:53 pm | पैसा
आवडती कादंबरी, आवडते संगीतकार आणि गायिका लता मंगेशकर! लताबाईंचा आवाज या गाण्यात असा काही लागलाय की वा! आश्चर्य म्हणजे हा सिनेमा मी अजून पाहिला नाही. गाणीच पाहिलीत. स्मिता चिंधी नक्कीच दिसली होती पण डॉ. आगाशे नाग्या म्हणून जरा मोठे वाटले असतील ना?
3 Feb 2015 - 8:58 pm | प्रचेतस
अजिबात नाय.
उलट नाग्याच्या थोराड, बलदंड पात्राला अगदी अचून पात्रनिवड.
जब्बार पटेल अगदी सूरुवातीच्या सीनला दिग्दार्शनात चुकलेत असे म्हणावेसे वाटते.
जेव्हा मोठा भगत( निळू फुले) लहानग्या नाग्याला समुद्रकिनार्यावरुन लिंगोबाचा सुळका दाखवत आहेत. तेव्हढी एक स्थळाची गल्लत त्यांनी केली. बाकी चित्रपट पूर्णपणे निर्दोष.
3 Feb 2015 - 9:14 pm | पैसा
कादंबरी वाचताना नाग्या हा एरवी किरकोळ दिसणारा आणि वयाने लहान, नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा कोवळा तरूण असा वाटतो. शिवाय हे ठाकर, कातकरी वगैरे लोक तजेलदार काळसर वर्णाचे, आणि काटक शरीर असणारे असतात. कारण त्यांचं रहाणं असं असतं की कष्ट खूप, आणि आहार कमी. त्यामुळे गोरे- घारे, उंच, बलदंड शरीरयष्टी असलेले डॉ. आगाशे देखणे असले तरी कादंबरीतला किरकोळ नाग्या मनात ठेवून बघायला गेलं तर वेगळे वाटतील.
3 Feb 2015 - 9:18 pm | अनुप ढेरे
आपल्याला अत्यंत आवडणार्या कादंबरीचा चित्रपट पाहूच नये असं वाटायला लागलं आहे. वाचताना आपल्या मनात पात्र जशी उमटत असतात तशीच सिनेमात उमटतील असं नाही. दिग्दर्शकाला ती आपल्यासारखीच दिसलेली असतील असं नाही. आपण आणि आपली पात्र एवढच ठेवावं.
3 Feb 2015 - 9:24 pm | प्रचेतस
अगदी सहमत.
मात्र येथे जब्बार पटेलांनी कथेला पूर्णपणे न्याय दिलाय.
स्वत: गोनिदा चित्रपटासंबंधीच्या चर्चेत असत. आणि पटकथाकार, संवाद लेखक सतीश आळेकर आणि अनिल जोगळेकर. मग एक दर्जेदार कलाकृती नक्कीच निर्माण होणार.
3 Feb 2015 - 9:16 pm | हाडक्या
पै तै.. वल्लींशी सहमत. पुस्तकानुसार नाग्यासाठी मोहन आगाशे चपखल आहेत.
खरेतर मला ते पात्र जरा अजून भरभक्कम अपेक्षित होते चित्रपटात.
समुरकिनार्याची गोष्ट कधीच नोटिस केली नव्हती हो . :)
शाळेत असताना पुस्तक वाचले तेव्हा तसे इतर पुस्तकांसारखेच वाटले होते. यावर हा चित्रपट आहे हे जेव्हा कळाले तेव्हा प्रथम आश्चर्य वाटले होते. पण चित्रपट देखील सुंदर झालाय. बाकी असले चित्रपट कधीतरीच जमून येतात हे पण तेवढंच खरं. :)
4 Feb 2015 - 9:24 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
4 Feb 2015 - 9:37 am | पिंपातला उंदीर
मस्त लेख. लिहित राहा हो.
4 Feb 2015 - 9:40 am | विशाल कुलकर्णी
_/\_