***
फकीराबरोबर असलेली ती तीन मुलं म्हणजे वेषांतर केलेल्या शुजाच्या तीन मुली होत्या. मक्केला जाण्यासाठी शुजा चट्टग्राम बंदरावर गेला मात्र वादळी पावसामुळे त्यादिवशी एकही जहाज निघाले नाही. वाटेत परत येताना, पुन्हा किल्ल्यात गोविंदमाणिक्यांची भेट झाली. काही दिवस किल्ल्यात राहिल्यानंतर सम्राटाचे सैनिक अजूनही शुजाच्या शोधात फिरत आहेत अशी बातमी आली. गोविंदमाणिक्यांनी आपले बरेच सेवक बरोबर पाठवून शुजाला त्यांचा मित्र असलेल्या आराकानच्या राजाकडे पाठवले. तिथून निघताना शुजाने आपली अनमोल तलवार महाराजांना भेट दिली.
त्याचवेळेस रघुपती आणि बिल्वनने पुन्हा एकदा गाव उभे केले. राजाचा किल्ला गावाचे प्राण झाला.
अशाप्रकारे सहा वर्षं गेली. छ्त्रमाणिक्यचा मृत्यू झाला. त्रिपुराच्या सिंहासनावर पुन्हा बसण्यासाठी गोविंदमाणिक्यांना बोलवायला दूत आला. त्यांनी प्रथम परत जाण्यास नकार दिला. तेव्हा बिल्वन त्यांची समजूत काढत म्हणाला, “महाराज, धर्म स्वतः तुमच्या दारी येऊन प्रार्थना करत आहे, तेव्हा त्याची उपेक्षा करू नका.”
राजा आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहून म्हणाला, “माझी इतक्या दिवसांची आशा, इतक्या दिवसांची मेहनत पूर्ण होणार नाही.”
बिल्वन म्हणाला, “इथे तुमचे काम मी पूर्ण करेन.”
राजा म्हणाला, “आणि तू इथे राहिलास तर माझे तिथले काम पूर्ण होणार नाही.”
बिल्वन - “नाही महाराज, तुम्हाला आता माझी गरज नाही. तुम्ही योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहात. मला वेळ मिळेल तसा मी तुम्हाला भेटायला येतच राहीन.”
राजाने ध्रुवला बरोबर घेऊन राज्यात प्रवेश केला. ध्रुव आता लहान नाही. बिल्वनच्या कृपेने संस्कृत पारंगत होऊन आता त्याने शास्त्रांच्या अभ्यासात मन रमवले आहे. रघुपतीने पुन्हा पौरोहित्य करायला सुरवात केली. यावेळेस मंदिरात परतल्यावर जणूकाही मृत जयसिंह त्याच्यासाठी पुन्हा नवीन आयुष्य घेऊन परत आला.
इकडे विश्वासघातकी आराकान राजाने शुजाची हत्या करून त्याच्या सगळ्यात लहान मुलीशी लग्न केले.
दुर्दैवी शुजाला आराकानच्या राजाने दिलेली निर्दयी वागणूक आठवून गोविंदमाणिक्य दुःखी होत असत. शुजाचे नाव अजरामर करण्यासाठी त्यांनी तलवारीच्या विक्रीतून आलेले बरेचसे धन कुमिल्ला गावात एक उत्कृष्ट मशीद उभी करण्यासाठी वापरले. ही मशीद आजही शुजा मशिदीच्या नावाने प्रसिद्ध आहे.
गोविंदमाणिकयांच्या प्रयत्नांनी मेहेरकूल स्वतंत्र झाले. तिथल्या ब्राह्मण वर्गाला त्यांनी बरीच जमीन सनद म्हणून दिली होती. कुमिल्लाच्या दक्षिणेला असलेल्या बातिशा या गावामध्ये त्यांनी एक विशाल तलाव खोदला. अनेक महान कामांची सुरवात त्यांच्या हातून झाली मात्र बरीच कार्यं ते पूर्ण करू शकले नाहीत. या गोष्टीचे शल्य मनात ठेवतच इ.स १६६९ (विकीवर १६७६ अशी नोंद आहे ) मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
***
ही मालिका पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सर्व मिपाकर वाचकांची व प्रतिसादकर्त्यांची मी ऋणी आहे. अनुवाद करण्याच्या अडखळत सुरु झालेल्या या प्रवासात सर्व वाचकांनी सांभाळून घेतले. मध्यंतरी लिखाणात पडलेल्या मोठ्या गॅपनंतरही वाचकांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे पुन्हा मालिकेला प्रतिसाद दिला. लेखनात ज्या काही चुका असतील, काही दोष असतील तर ते पूर्णपणे माझ्या लेखनाची मर्यादा आहेत. या लेखमालिकेतून जर काही उत्तम वाचल्याचा अनुभव आला असेल तर याचं संपूर्ण श्रेय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखणीचंच आहे. अजून काय सांगू? खरंतर माझाच विश्वास बसत नाहीये. हा शेवटचा भाग प्रकाशित करताना आनंदही होतोय आणि वाईटही वाटतंय. वाईट यासाठी की ही मालिका पूर्ण करणे हे माझ्यासाठी एक प्रकारचं मोटीव्हेशन होतं, ते पूर्ण झाल्यावर रितेपण आल्यासारखं वाटतंय. म्हणजे शाळेत, कॉलेजमध्ये असताना वर्षभर अभ्यासाचा कंटाळा यायचा पण शेवटच्या पेपरनंतर पुस्तकांचा कप्पा आवरताना उगीच मळभ दाटून यावं तसं काहीसं. असो. एक ना धड भारंभार चिंध्या करण्याच्या माझ्या स्वभावाला केवळ मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहांनी मुरड घालायला लावली, यातंच सगळं काही आलं! असाच लोभ असू द्यावा ही विनंती. :)
प्रतिक्रिया
8 Aug 2020 - 12:41 pm | प्रचेतस
उपसंहारपण आवडला. आराकान म्हणजे कुठला प्रांत?
राजयोग उत्कृष्टच झाली.
8 Aug 2020 - 8:45 pm | रातराणी
अरेच्या हा संदर्भ द्यायचा राहून गेला वाटतं, आराकान ही भारत आणि म्यानमारच्या सीमेवरील पर्वतरांग आहे.
आराकान - योमा
11 Aug 2020 - 6:44 pm | प्रचेतस
धन्यवाद.
तरीच आराकान हा शब्द ऐकल्यासारखा वाटत होता पण कशाच्या संदर्भात काहीच स्मरत नव्हतं.
8 Aug 2020 - 4:32 pm | आनन्दा
अरे मला वाटायचं की काळाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली काल्पनिक कथा आहे..
पण पात्रे खरी आहेत तर..
कथा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.. खूप दिवस लागले पुर्ण करायला. आणि आम्हाला पण खूप प्रतीक्षा करावी लागली..
आवडली हेवेसानल
8 Aug 2020 - 4:39 pm | विजुभाऊ
मलाही ही कथा काल्पनीक वाटली होती. आनि काल्पनीक कथेत इतिहासातली पात्रे कशी काय ते समजत नव्हते.
पण खूप छान रम्गवून सांगितलीत कथा
8 Aug 2020 - 8:03 pm | श्वेता२४
तुम्ही ही लेखमाला चिकाटीने पूर्ण करुन आम्हा वाचकांना मोठी पर्वणीच दिली. त्याबद्दल अभिनंदन व मन:पूर्वक आभार
8 Aug 2020 - 9:02 pm | रातराणी
सर्वांना धन्यवाद :)
@आनंदा आणि विजुभाऊ, या कादंबरीत उल्लेख केलेल्या सर्वच घटना तशाच घडल्या आहेत का हे इतिहास अभ्यासकच सांगू शकतील. प्राचीन बंगालच्या इतिहासाचे काही संदर्भ वाचायला हवे होते मी पण वेळेअभावी शक्य झाले नाही.
8 Aug 2020 - 10:34 pm | विजुभाऊ
आपल्याला पूर्व भारताचा इतिहास फारसा माहीत नसतो.
9 Aug 2020 - 11:31 pm | Gk
छान
10 Aug 2020 - 12:56 pm | अनिंद्य
@ रातराणी,
प्रतिसादांच्या दुर्भिक्षात न कंटाळता सुदीर्घ 'राजयोग' पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !
अनुवाद ओघवता, चपखल आणि सुंदर भाषेत आहे, कोठेही अडखळला नाहीत तुम्ही हे ग्रेट आहे. तुमचे मनापासून कौतुक वाटले.
पुढील लेखनास / अनुवादास भरभरून शुभेच्छा माझ्यातर्फे _/\_
अनिंद्य
10 Aug 2020 - 11:04 pm | रातराणी
धन्यवाद अनिंद्य :)
प्रतिसादाचा दुष्काळ असल्यामुळेच आलेला एक एक प्रतिसादही मोलाचा वाटला. त्यामुळेच पूर्ण करायचा चंग बांधला :)
आणि अडखळले हो मी.. मागचे काही भाग सहज डोळ्याखालून घालताना काही चुका सापडल्या :)
11 Aug 2020 - 4:27 pm | एस
प्रतिसादांचा पाऊस हवा असेल तर नेहमीच्याच यशस्वी विषयांवर ने. य. काड्या घातल्या की ने. य. कलाकार त्यांचे काम चोख बजावतात. त्यापेक्षा मोजकेच, पण मनापासून प्रतिसाद आलेले बरे. ते जास्त मोलाचे असतात. होय की नाही? :-)
11 Aug 2020 - 9:06 pm | अनिंद्य
अगदी पाऊस पडला नाही तरी कौतुकाचे दोन शब्द हवेहवेसे असतात हो :-)
...... मोजकेच, पण मनापासून प्रतिसाद आलेले बरे.... +१
12 Aug 2020 - 11:26 am | रातराणी
हाहा पाऊस नको आपली रिमझिम बरी :)
10 Aug 2020 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार
अनुवाद झकास झाला आहे. शेवट पर्यंत गुंतवुन ठेवले अनुवादाने, बंद पडलेली मालिका परत सुरु झाली तरी परत मागे जाउन वाचावी लागली नाही इतकी लक्षात राहिली होती.
नेटाने पुर्ण केल्या बद्दल विषेश अभिनंदन.
पैजारबुवा,
10 Aug 2020 - 11:12 pm | रातराणी
धन्यवाद माऊली. :)
बराच मोठा गॅप पडूनही लक्षात ठेवून वाचलीत त्याबद्दल खूप आभार.. :)
11 Aug 2020 - 1:15 am | वीणा३
तुम्ही खूप छान लिहिता. कथा पूर्ण लक्षात होती त्यामुळे काही भाग उशिरा आले तरी मागचे भाग वाचायची गरज वाटली नाही. लिहीत रहा !!!
11 Aug 2020 - 2:35 am | रातराणी
धन्यवाद वीणा :)
10 Aug 2020 - 11:13 pm | रातराणी
@श्वेता आणि जीके, खूप खूप धन्यवाद :)
11 Aug 2020 - 9:20 pm | अभ्या..
सगळे भाग काढले वाचून.
अप्रतिम पेललं आहेस कथेला.
जियो
12 Aug 2020 - 11:25 am | रातराणी
खूप खूप धन्यवाद अभ्या.. :)
चोखंदळ वाचक आणि स्वतः उत्तम लिहणाऱ्यांची दाद सुखावून जाते फार _/\_
12 Aug 2020 - 8:00 pm | अनिंद्य
लेखमालेत उल्लेख आलेल्या कुमिल्ला आणि आसपासच्या भागातल्या ऐतिहासिक बांधकामांचे अनेक वर्ष दुर्लक्षित असलेले अवशेष आता जतन करण्यात आले आहेत. त्याचे काही फोटो :-
(जालावरून साभार)
(जालावरून साभार)
(जालावरून साभार)
7 Oct 2020 - 1:24 am | diggi12
सुंदर अप्रतिम