✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६)

A
Anand More यांनी
Sat, 02/27/2016 - 20:20  ·  लेख
लेख
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ -------------------------------------- पर्शियन ऐवजी इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर व्हावा या मागणीचे खंदे समर्थक, इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचा आणि इंग्रजी भाषेतून शिक्षणाचा पाया घातल्याने भारतात कुप्रसिद्ध झालेल्या मेकॉले साहेबांनी Indian Penal Code म्हणजे भारतीय दंड संहितेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या समितीने बनविलेला मसुदा १९५६ साली ब्रिटीश सरकारकडे मंजुरीसाठी दिला गेला होता. पण त्याला मंजुरी मिळायच्या आधीच भारतात १८५७ चे बंड किंवा उठाव झाला. म्हणून मेकॉले साहेबांच्या मसुद्याचे बार्न्स पीकॉक यांनी बारकाईने पुनरावलोकन केले आणि १८६० मध्ये ब्रिटीश सरकारची मंजूरी मिळालेला हा कायदा, १ जानेवारी १८६२ पासून ब्रिटीश अमलाखाली असलेल्या भारतात लागू झाला. तेंव्हापासून त्यात आजतागायत ७६ वेळा दुरुस्त्या / सुधारणा करण्यात आल्या आहेत. शेवटली सुधारणा २०१३ ला निर्भया अत्याचारानंतर झाली. या कायद्याचा (Offences against the State) राज्याविरुद्धचे गुन्हे, या शीर्षकाखाली असलेल्या (Chapter VI) सहाव्या विभागात, १२१ ते १३० पर्यंत कलमे आहेत. त्यातील १२४A हे कलम Sedition ज्याचे शब्दशः भाषांतर "राजद्रोह" असे होते त्या गुन्ह्याची व्याख्या करते आणि त्याबद्दल शिक्षा काय ते सांगते. हे कलम वेळोवेळी बदलले गेले आहे. सर्वात प्रथम ते १८७० ला बदलले गेले, नंतर १८९८ ला बदलले गेले. भारतीय स्वातंत्र्यानंतर नवीन भारत सरकारने भारतीय दंड संहिता अनेक दुरुस्त्यांसह चालू ठेवायची ठरवले. त्यानुसार १९५० ला या कायद्यात अनेक दुरुस्त्या केल्या गेल्या. कलम १२४A मधून देखील “Queen, Her Majesty, Representative of Crown” हे शब्द काढून टाकण्यात आले; आणि त्याजागी, "The Government Established by Law in India" किंवा सोप्या मराठीत सांगायचं झालं तर “भारतात कायद्याने प्रस्थापित झालेले सरकार" असा शब्दप्रयोग करण्यात आला. या दुरुस्तीमुळे, कलम १२४A चे नाव जरी Sedition असले तरी हे कलम आता राजद्रोहाशी किंवा देशद्रोहाशी संबंधित नसून लोकनियुक्त सरकारद्रोहाशी संबंधित आहे हे स्पष्ट होते. त्यानंतर १९५५ च्या दुरुस्तीमुळे या गुन्ह्याची शिक्षा, "काळ्या पाण्याची जन्मठेप किंवा त्यापेक्षा कमी" वरून “पाच वर्षाचा कारावास” अशी करण्यात आली. यावरून हे लक्षात येते, की जेएनयु वरील विवादात काही जणांनी मांडलेला "कालबाह्य झालेले आणि ब्रिटीश सरकारने स्वातंत्र्य सैनिकांना त्रास देण्यासाठीचे कलम" हा मुद्दा किंचित मूळ धरतो. वाचकांच्या सोयीसाठी, ते कलम आणि त्यातील दुरुस्त्या खाली देतो आहे. 1*[124A. Sedition.- -Whoever by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards, 2***the Government established by law in 3*[India], a 4***shall be punished with 5*[imprisonment for life], to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine. Explanation 1.-The expression "disaffection" includes disloyalty and all feelings of enmity. Explanation 2.-Comments expressing disapprobation of the measures of the Government with a view to obtain their alteration by lawful means, without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section. Explanation 3.-Comments expressing disapprobation of the administrative or other action of the Government without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section.] --------------------------------------------------------
  1. Subs. by Act 4 of 1898, s. 4, for the original s. 124A which had been ins. by Act 27 of 1870, s. 5.
  2. The words "Her Majesty or" rep. by the A.O. 1950. The words "or the Crown Representative" ins. after the word "Majesty" by the A.O. 1937 were rep. by the A.O. 1948.
  3. Subs. by Act 3 of 1951, s. 3 and Sch., for "the States".
  4. The words "or British Burma" ins. by the A.O. 1937 rep. by the A.O. 1948.
  5. Subs. by Act 26 of 1955, s. 117 and Sch., for "transportation for life or any shorter term".
१२४A हे कलम आणि त्याखाली दिलेले स्पष्टीकरण वाचल्यावर, काही गोष्टी सहजपणे ध्यानात येतात की खालील बाबींना कायद्याने देशद्रोह मानले जाते. लिखित किंवा उच्चारीत किंवा चिन्ह - खुणा - चित्रांच्या द्वारे किंवा इतर दृश्य माध्यमातून किंवा तत्सम प्रकारे, भारतात कायद्याने प्रस्थापित झालेल्या सरकारचा दुस्वास किंवा अपमान करणे, इतरांच्या मनात अश्या सरकारबद्दल अप्रीती निर्माण करणे, (पहिल्या स्पष्टीकरणाने यात बेईमानीची किंवा शत्रुत्वाची भावना निर्माण करणे हे देखील अंतर्भूत आहे) किंवा तसा प्रयत्न करणे, या गोष्टी अपराध मानल्या जाऊन त्याबद्दल शिक्षा होऊ शकते. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पष्टीकरणाने त्यापुढे हे देखील सांगितले आहे की, कायदेशीर मार्गाने सरकारच्या धोरणांचा किंवा सरकारी व्यवस्थेचा विरोध करणे, सरकारविरोध मानले जाणार नाही. १९६७ मध्ये इंदिरा गांधींनी काँग्रेस - आर (ज्यातील आर म्हणजे "रिक्विझिशन") या पक्षाची स्थापना केली आणि १९७१ मधल्या निवडणुकीतील निर्विवाद यशानंतर या फुटीर पक्षाला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणून नाव वापरण्यास परवानगी मिळाली असली तरी यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षाचे राज्य संपले आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारने, १९५० पासून तयार झालेले कलम १२४A चे सरकारद्रोह हे स्वरूप कधी आपल्या फायद्यासाठी तर कधी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी तर कधी देशहितासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. ३१ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दिवशी बलवंत सिंघ आणि भूपिंदर सिंघ या सरकारी कर्मचाऱ्यांना चंदीगडमध्ये "खलिस्तान झिंदाबाद", "राज करेगा खालसा", "हिंदुआ नू पंजाब छोन कढ के छड्डेन्गे, हुन मौका आया है राज कायम कारना दा" या तीन घोषणा दिल्या म्हणून; २००३ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडियांना राजस्थान सरकारने प्रतिबंध हुकूम मोडला म्हणून; २००५ मध्ये शिरोमणी अकाली दल चे सिमरनजितसिंग मान यांना खलिस्तानला समर्थन देणाऱ्या घोषणा दिल्या म्हणून; २०१० मध्ये लेखिका अरुंधती रॉयना काश्मीर च्या स्वातंत्र्यासाठी, फुटीरतावादी नेता सैयद आली शाह गिलानी यांच्याबरोबर परिसंवादात भाग घेतला म्हणून; २०१० मध्येच छत्तीसगड येथे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते बिनायक सेन यांना माओवाद्यांना समर्थन दिले म्हणून; २०११ मध्ये असीम त्रिवेदी नावाच्या व्यंगचित्रकाराला राष्ट्रध्वज, संसद आणि चार सिहांचे राष्ट्रचिन्ह यांना आक्षेपार्ह अवस्थेत चितारले म्हणून; २०१३ मध्ये अकबरुद्दिन ओवैसी यांना धार्मिक तेढ वाढविणारे भाषण दिले म्हणून; ऑक्टोबर २०१५ मध्ये "पोलिसांना मारा" अशी चिथावणी दिली म्हणून हार्दिक पटेल यांना सुरत मध्ये तर कोवन नावाच्या गायकाला सरकारपुरस्कृत दारूच्या दुकानांवर टीका करणारी गाणी आंतरजालावर टाकून तामिळनाडूचे राज्यसरकार आणि जयललितांच्या बद्दल बदनामी केली म्हणून सरकारद्रोहाच्या कलमाखाली आरोपी केले गेले आहे. यातले जवळपास सगळे आरोपी न्यायालयाने मुक्त केले आहेत किंवा हार्दिक पटेल सोडल्यास, जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. प्रत्येक वेळी सरकारवर संकुचित मनोवृत्ती दाखविल्याबद्दल न्यायालयाने ताशेरे देखील ओढले आहेत. कायदा जरी सरकारद्रोहाचे कलम लावीत असला तरी सर्वोच्च न्यायालय मात्र त्याचा अर्थ देशद्रोह असाच लावून निर्णय देते आहे असे चित्र दिसते. कायदेपंडितांच्या भाषेत त्याला कायद्याचा आत्मा / गाभा / मूळ उद्देश समजून, कायद्याच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून न्यायदान करणे असे म्हणतात. मग एक प्रश्न तयार होऊ शकतो की सर्वच सरकारे या कलमाचा दुरुपयोग करीत असतात का? याचे स्पष्ट उत्तर कठीण आहे. ते हो आणि नाही या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे. इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे की आपल्या राज्यघटनेद्वारे आपण आपल्याला जे प्रजासत्ताक बहाल केले आहे ते घटनेला सर्वोच्च स्थान देते. इंग्लंडप्रमाणे संसदेला नाही. त्यामुळे संसद (कायदे बनविण्यासाठी), प्रशासनिक सेवा (व्यवस्था सांभाळण्यासाठी) आणि न्यायालये (न्यायदान करण्यासाठी) अशी अधिकारांची विभागणी आपल्या घटनेने केलेली आहे. त्यामुळे संसदेने चुकीचे कायदे बनविले तरीही त्यांना न्यायालयात आव्हान देता येते. तसेच तसेच सरकारने स्वतः कुणावर कायद्याचा गैरवापर केला तरीही त्यावर न्यायालयात दाद मागता येते. ज्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आपल्याला जनतेने निवडून दिले त्यांना पूर्ण करण्यासाठी, आपल्या पक्षाची विचारधारा पसरवण्यासाठी आणि आपली प्रतिमा जनमानसात उंचावण्यासाठी प्रत्येक सत्ताधारी पक्ष आपल्या पद्धतीने व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक आहे.भारतासारख्या देशात, जिथे ६० वर्षांनी जुन्या विरोधी पक्षाला प्रथमच एकहाती बहुमत मिळून त्याचे सरकार आलेले आहे, सध्याच्या सत्तारूढ पक्षाने १२४A चा वापर करणे मला नवीन किंवा अनैसर्गिक वाटत नाही. ज्या सोशल मिडिया चा प्रभावी वापर करून जुना विरोधी पक्ष आज सत्तारूढ झाला आहे, तोच सोशल मिडिया भस्मासुराचे रूप धारण करून सत्तारूढ पक्षावर उलटतो आहे असे कधी कधी वाटते. निवडणुकीच्या काळात विरोधकांवर केलेला जहरी आणि बरेचदा सत्याचे एकांगी रूप दाखवणारा प्रचार, आता सत्तारूढ पक्षावर होताना दिसतो आहे. जे सत्तारूढ पक्षाने निवडणुकीआधी केले, सरकारचे विरोधक आता ते तर करत आहेच पण त्यापुढे जाऊन ज्या गोष्टी पूर्वी कधी झालेल्या नव्हत्या त्या देखील करताना दिसत आहेत. सरकारद्रोहाच्या कलमाला न्यायालयात लढण्याऐवजी विरोधक ही लढाई; आपले समर्थक, सरकारचे इतर विरोधक आणि बोलभांड जनता यांच्या सहाय्याने टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियावर लढताना दिसते आहे. या संपूर्ण प्रकरणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा जोडून सरकारला कायद्याबरोबरच एका तात्विक लढाईला देखील तोंड द्यावे लागते आहे. ज्या घोषणा जेएनयु मध्ये दिल्या त्यांबद्दल बोलण्याआधी आपण भारतीय दंड संहितेचा उगम ज्या देशात झाला त्या इंग्लंड मध्ये असे देशद्रोहाचे कलम लावले जाते का? ते थोडक्यात पाहूया. इंग्लंड मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शेवटचा खटला तीन नागरिकांवर १९७२ ला लढला गेला. उत्तर आयर्लंड ला रिपब्लिकनांच्या सहाय्याला जाऊन लढण्यास लोकांची भरती केल्याचा आरोप या तिघांवर होता. शेवटी राजद्रोहाचे कलम वगळून त्यांना प्रलंबित शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर इंग्लंड मध्ये राजद्रोहाचे कलम रद्द व्हावे म्हणून १९७७ पासून मागणी होत राहिली आणि २०१० च्या सुमारास ते कलम रद्द झाले. या उदाहरणातून मला एकच सांगायचे आहे की राजद्रोह किंवा सरकार द्रोह हे कलम काढायला सर्व देशातील सर्व राजकीय पक्ष नाखूष असतात, चालढकल करतात. त्याबाबतची हालचाल कूर्मगतीनेच होत असते. कदाचित सध्याच्या घटनेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा रंग लागल्याने आपल्या देशातह ही प्रक्रिया थोडी वेग पकडू शकते. आता राहिला प्रश्न जे एन यु मधील घोषणांचा. पोलिसांच्या रिपोर्ट बद्दल इंडियन एक्स्प्रेस मध्ये जी बातमी आली होती त्यात असे म्हटले आहे की २९ घोषणा दिल्या गेल्या पण त्यात "पाकिस्तान झिंदाबाद" ही घोषणा नव्हती. विचाराच्या सोयीसाठी आपण असे समजूया की पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणादेखील जे एन यु कॅंपस मध्ये दिली गेली होती. त्याबाबत कायद्याची भूमिका आणि माझ्या मते सरकारची अपेक्षित भूमिका काय असायला हवी यावर पुढील भागात लिहून माझे हे दीर्घ मत संपवीन. क्रमश

Book traversal links for भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६)

  • ‹ भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)
  • Up
  • भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ७) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
9499 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

मत मांडण्याऐवजी जास्त भर हा

एस
Sat, 02/27/2016 - 20:49 नवीन
मत मांडण्याऐवजी जास्त भर हा तथ्ये व घटनांचे विश्लेषण करण्यावर दिल्यामुळे तुमच्या लेखमालेला निश्चितच वजन प्राप्त झाले आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो +१

तर्राट जोकर
Sat, 02/27/2016 - 21:16 नवीन
असेच म्हणतो +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मोरेसर....१+

पगला गजोधर
Mon, 02/29/2016 - 14:56 नवीन
तथ्ये व घटनांचे विश्लेषण करण्यावर दिल्यामुळे तुमच्या लेखमालेला निश्चितच वजन प्राप्त झाले आहे. पुभाप्र.
१००००००००००००००००००००००००००००+
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

तुम्हाला काय म्हणायचे आहे

आरोह
Sat, 02/27/2016 - 21:12 नवीन
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे साहेब? देशाविरुद्ध घोषणा हे समर्थनीय आहे असे सांगायचे आहे का तुम्हाला? मग सांगा एका वाक्यात.त्यासाठी एव्हडे शब्दांचे बुडबुडे कशासाठी? भारतीय दंडसाहित, जागतिक दंडसाहित, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उद्या तुमचा बंड्या शेजारच्या काकांचे गुणगान गाऊन तुम्हाला शिव्या घायाला लागला तर?..कंमोन्सेन्स,लॉजिक काही वापराचे आहे कि नाही. तुम्हाला पण intellectual,पुरोगामी ह्या पदव्या हव्यात काय?
  • Log in or register to post comments

तर काय?

नेत्रेश
Sat, 02/27/2016 - 22:26 नवीन
> "उद्या तुमचा बंड्या शेजारच्या काकांचे गुणगान गाऊन तुम्हाला शिव्या घायाला लागला तर?.." तर काय? बंड्याला 'बापद्रोहाच्या' आरोपाखाली तुरुंगात टाकणार? की घरातुन हाकलुन देणार (घर वडीलोपार्जीत असेल, किंवा बंड्या लहान असेल तर तेही करता येणार नाही) न्यायालये ही कॉमनसेन्स वर चालत नाहीत, कायद्यावर चालतात. तेच कायदे, त्यांचा उगम, त्याची कारणे आपल्याला समजतील अशा सोप्या भाषेत मोरे सर सांगत आहेत. मोरेसर, अत्यंत माहीतीपुर्ण लेखमाला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

तर काय? बंड्याला

आनन्दा
Sun, 02/28/2016 - 15:35 नवीन
तर काय? बंड्याला 'बापद्रोहाच्या' आरोपाखाली तुरुंगात टाकणार? की घरातुन हाकलुन देणार (घर वडीलोपार्जीत असेल, किंवा बंड्या लहान असेल तर तेही करता येणार नाही)
हे दोनच उपाय आहेत का? बंड्याच्या कानाखाली वाजवणे हा पण एक उपाय आहे, आणि मला खात्री आहे कोणताही बाप हा अधिकार नक्कीच वापरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

बंड्या १) शेजारचे काका

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/29/2016 - 13:14 नवीन
बंड्या १) शेजारचे काका झिंदाबाद २) आपला बाप मुर्दाबाद ३) वरील १ व २ अशा तीन प्रकारात काय अन्वयार्थ काढायचा असा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

बाप आणि बंड्या हे उदाहरणच

तर्राट जोकर
Mon, 02/29/2016 - 13:40 नवीन
बाप आणि बंड्या हे उदाहरणच चुकतंय. इथे बाप कोण आणि बंड्या कोण हेच ठरत नाही अजून. हे उदाहरण देणारे देशभक्त स्वतःला बाप समजतायत आणि देशद्रोही घोषणा देणार्‍यांना बंड्या. लॉजिक चुकतंय असं कुणालाच वाटत नाही. भारतीय संस्कृतीत मुलांना आपली संपत्ती समजल्या जाते तेच इथं दिसतंय. देश हा बाप, त्याचे देशवासी ही त्याची मुले हे ते लॉजिक. देशद्रोह्यांना दंड देण्याचा मनमानी अधिकार हवा असल्याकारणाने हे उदाहरण निखालसपणे पसरवलं जातंय. आता देश म्हणजेच देशवासी, स्वतःच स्वतःची मुले कशी? इथे सगळेच बंड्या आहेत, बाप कोणीही नाही. बंड्यांचा कळप आहे. काही बंडे बंड करत आहेत, त्यांना वेगळा कळप आणि वेगळी जागा पाहिजे. त्यांना समजवावं की संपवावं ह्याबद्दल उरलेल्या बंड्यांमधे वाद चालु आहे. संपवाबंड्यांच्या लेखी समजबंडे हे बंडखोर बंड्यांच्या सोबत आहेत असे समजतायत. समजबंडे हे बंडखोरांना आपल्यात ठेवून कळप आणि जागा फुटण्याचा धोका टाळण्यासाठी आग्रही आहेत. संपवबंडे बंडखोरांना ठेचून कळप आणि जागा धोक्यात टाकतायत. परिस्थिती उन्मादाच्या भरात बिघडत जाईल. कोण बंडखोर आणि कोण कळपबंडे कळणार नाही. एक दिवस कळपच राहणार नाही अशाने. खुलासा: इथे समजबंडे म्हणजे डावे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

इथे सगळेच बंड्या आहेत, बाप

मार्मिक गोडसे
Mon, 02/29/2016 - 19:44 नवीन
इथे सगळेच बंड्या आहेत, बाप कोणीही नाही
इथे सरकार ही खाजगी मालमत्ता व तिच्यावर फक्त आमचाच अधिकार आहे असे वाटणारे असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मग त्या बंड्याचे काय करायचे

आरोह
Sun, 02/28/2016 - 01:18 नवीन
मग त्या बंड्याचे काय करायचे? कि ह्या बापद्रोह बद्दल त्याचा सत्कार करायचा? न्यायालये कॉमन्सन्सवर चालत नाहीत ..कायद्यावर चालतात आणि त्यांनीच अफजल ला फाशी दिली का दिली फाशी? उगाच दिली का? याकुब, अफजल जर कोणाचे हिरो असू शकतात तर त्या लोकांकडे तुम्ही कशा नजरेने बघणार? कसाब ला पण घ्या बरोबर आणि ह्या सगळ्यांना विरोध करणाऱ्यांना कायदेशीर तत्वज्ञानाचे डोस पाजयचे. सादया सरळ गोष्टींचा किस पाडत राहायचे..
  • Log in or register to post comments

एकदा स्वतःची भूमिका स्पष्ट्ट करा

आरोह
Sun, 02/28/2016 - 01:40 नवीन
देशा विरुद्धच्या घोषणा (सरकार विरोधी नाही) समर्थनीय आहेत कि नाही ? हे एकदा स्पष्ट्ट सांगा ... एका वाक्यात सांगितले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

समर्थनीय

कपिलमुनी
Sun, 02/28/2016 - 07:09 नवीन
समर्थनीय नाही. बंड्याचे समर्थन नाही पण बंड्याच न्यायालयात गेला तर बापाला बंड्याचे हक्क द्यावे लागतात . मग बाप किंवा बंड्याच पेक्षा कायदा काय म्हणतो ते अशा प्रसंगी महत्वाचा ठरते.तिथे त्या घोषणा कायदेशीर ठरल्या तर ? ( पूर्वी तसा झाला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

विचारातली कमालीची सुस्पष्टता

असंका
Sun, 02/28/2016 - 14:15 नवीन
विचारातली कमालीची सुस्पष्टता आणि इतकी मुद्देसूद मांडणी दिस्णारे लेख फारच क्वचित दिसलेत. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

म्हणजे देशाला शिव्या घालण्याचे हक्क

आरोह
Sun, 02/28/2016 - 14:48 नवीन
उद्या न्यायालयाने सांगितले कि बाबारे घाला देशाला शिव्या तो तुमचा हक्क आहे. तुम्ही काही गुन्हा केलेला नाही. मग काय होईल.. असो, देशाला शिव्या घालणे वेगळे आणि सरकारला वेगळे. देशाला शिव्या घालणे हे चूक कि बरोबर इतका साधा प्रश्न आहे, लेखन मुद्दे सून आहे , लेख माहितीपूर्ण आहे हे सगळे ठीक पण नक्की त्याचा उद्देश काय आहे? समर्थनीय आहे कि असमर्थनीय? हा तो प्रश्न आहे. सरकारला विरोध करायला कोणी रोखलाय?
  • Log in or register to post comments

शेवटच्या भागाच्या प्रतीक्षेत.

आनन्दा
Sun, 02/28/2016 - 15:26 नवीन
शेवटच्या भागाच्या प्रतीक्षेत.. त्यानंतरच यावर मत मांडेन.
  • Log in or register to post comments

"व्यक्ती/पक्ष/संस्थेला

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 02/28/2016 - 15:31 नवीन
"व्यक्ती/पक्ष/संस्थेला शिव्याशाप देणे" आणि "देशाचे विभाजन करण्याच्या, देशाला बरबाद करण्याच्या, न्यायव्यवस्था खुनी आहे, अश्या घोषणा देणे" या दोन्हीत जमीन-अस्मानाचा फरक आहे, हेच समजत नसेल किंवा समजून घ्यायचे नसेल किंवा मान्य नसेल तर मग... ते एक वाक्यात सांगितले काय आणि शब्दांची महाप्रचंड उतरंड मांडून त्यावरून फसवत घसरत तिथपर्यंत नेलं काय, मुद्दलात काहीच फरक नसतो... पण कृतीत, कृतीमागच्या भावनेत आणि अंतिम परिणामात जमीन-अस्मानाचा फरक असतो !
  • Log in or register to post comments

+१

प्रदीप साळुंखे
Mon, 02/29/2016 - 12:26 नवीन
मताशी सहमत, पुढच्या भागात काय सांगतात त्यावर प्रतिक्रिया देईनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फरक

आरोह
Sun, 02/28/2016 - 16:11 नवीन
फरक असतो ना,intelectuals हि पदवी मिळते. गरीब बिचार्या लोंकाना (कोकरांना !)काय वाटत, वा वा काय मुद्देसूद, विचारात सुस्पष्टतात(?),माहितीपूर्ण, लेखन..आणि काय काय..
  • Log in or register to post comments

इथे बाप कोण आणि बंड्या कोण

तर्राट जोकर
Sun, 02/28/2016 - 16:22 नवीन
इथे बाप कोण आणि बंड्या कोण जरा सम्जावून सांगेल काय कोण?
  • Log in or register to post comments

जाऊद्या हो

आरोह
Sun, 02/28/2016 - 16:39 नवीन
तुमच्यासाठी नाही ते..तुम्ही काहीतरी ह्याच्यापेक्षा सोप्या गोष्टी वाचा.. उगाच हा पण dose जास्त होईल तुम्हाला
  • Log in or register to post comments

अरे हो की. बर्‍याच सोप्या

तर्राट जोकर
Sun, 02/28/2016 - 16:41 नवीन
अरे हो की. बर्‍याच सोप्या गोष्टी केल्या गेल्यात आजकाल. दाढी, टिळा, टोपी, निळा. एकदम सुटसुटीत.
  • Log in or register to post comments

भारताचे महाधिवक्ता श्री सोली

सुबोध खरे
Sun, 02/28/2016 - 18:42 नवीन
भारताचे महाधिवक्ता श्री सोली सोराबजी यांचे या विषयाबद्दलचे मत खाली वाचा There are reports about ‘anti-India slogans’ such as “Bharat ki barbaadi tak’ in JNU Who said it? When did he say it? It has to be established in a court of law. Mind you, you must make allowance in the context, circumstances. Apna country mein toh (In our country,) everyone says so and so zindabad, murdabad. Take it in context. Don’t be hyper-sensitive. But if it goes to that nature where someone says cut India into pieces... that certainly would amount to sedition. There is a feeling that freedom of expression is under siege in the country. What is your view? Who prevented the citizens from criticising the government? Those who have criticised the government have they been put in jail as was done during the Emergency? Tell me, those who returned awards against intolerance and those speaking daily against government, have they been penalised or faced any consequences? Even a person like (Arvind) Kejriwal calls the PM a ‘psychopath’, ‘coward’, ‘liar’. This is in bad taste, but nobody has taken any action against him... What intolerance is there? I can’t understand. पूर्ण मुलाखत खालील दुव्यावर वाचा http://www.hindustantimes.com/india/strike-down-misuse-not-sedition-law-former-attorney-general-sorabjee/story-cnWjKkvGIjHGpJ58i3OKcP.html
  • Log in or register to post comments

छान माहीती.

मार्मिक गोडसे
Mon, 02/29/2016 - 20:03 नवीन
छान माहीती.
स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षाचे राज्य संपले आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारने, १९५० पासून तयार झालेले कलम १२४A चे सरकारद्रोह हे स्वरूप कधी आपल्या फायद्यासाठी तर कधी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी तर कधी देशहितासाठी वापरण्याचा प्रयत्न केला.
आजच्या मटातील 'धावते जग' सदरात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी असेच काही म्हटले आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा