Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Anand More on Fri, 02/12/2016 - 17:35
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
लेख
मत
विरंगुळा
ही लेखमाला वाटली, तरी प्रत्यक्षात ३ आणि ४ ऑक्टोबर २०१५ रोजी मंदार काळे ऊर्फ रमताराम आणि माझी फेसबुकवर जे साद प्रतिसाद झाले त्यांची तीन भागातील मालिका आहे. यातील संदर्भ समजून घ्यायचा असेल तर रमतारामांची मिपावर पूर्वी प्रसिद्ध झालेली राशोमोनवरची जंगलवाटांवरचे कवडसे ही आठ भागांची लेखमाला वाचायला हवी. संदर्भ सोडून वाचल्यास कदाचित फक्त पहिला भाग थोडा कठीण जाईल पण किंचित प्रयत्नाने दुसरा आणि तिसरा भाग मात्र समजू शकेल. ------------------------------------- जेंव्हा आपण शिक्षकाच्या खिजगणतीत देखील नसतो तेंव्हा त्यांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो पण जेंव्हा तो शिक्षक आपण बेसावध असताना अख्ख्या वर्गासमोर एकदम "हां, तू पुढे ये रे, तुला हे माझ्यासाठी करायचे आहे" असे सांगतो तेंव्हा आपली जी काही पाचावर धारण, तंतरणे, बोबडी वळणे, पोटात खड्डा पडणे अश्या शब्दात व्यक्त होण्यासारखी अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था आज सकाळी मंदार काळेंचे नोटिफिकेशन पाहून मी अनुभवली. नेमका मोकळा वेळ होता आणि बऱ्याच दिवसापासून मनात ठरवून ठेवलेली कामगिरी काळे गुरुजींनी सोपवली म्हणून गांगरलेल्या अवस्थेतही आनंद झाला. आणि राशोमोनच्या मागे लागलो. काही काही गोष्टी जुळून येतात. मी आधीच राशोमोन पाहिलेला असता तर कदाचित तो मला इतका भिडलादेखील नसता. पण माझ्या सुदैवाने मी आधी तुमची लेखमाला वाचली आणि मग चित्रपट यु ट्युबवर पाहिला म्हणून मी त्याला एका वेगळ्या पातळीवर अनुभवू शकलो. कदाचित मी शब्दचित्र समजणारा माणूस असीन आणि तुम्ही अतिशय चांगले शब्दचित्रकार असल्याने चित्रपट पाहताना त्यातील बारकावे, त्यात वापरलेली प्रतीकांची भाषा, दिग्द्शर्काचे चित्रभान आणि पटकथेची रंगत अगदी चटकन समजत होती. एका जाणकार रसिकाकडून एखादा चित्रपट पूर्ण समजून घेऊन मग तो पाहण्याचा माझा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो कमालीचा आनंददायी होता. हा कल्पनातीत आनंद माझा अगदी हात धरून आग्रहाने भरभरून दिल्याबद्दल तुमचे आभार, अगदी मनापासून आभार. तुमच्या लेखमालेबद्दल बोलायचे झाल्यास मला त्याचे दोन भाग दिसतात. एक म्हणजे तुमचे अतिशय अभ्यासपूर्ण आणि समर्पक प्रास्ताविक जे पहिल्या लेखात आहे आणि दुसरा म्हणजे तुम्ही संपूर्ण चित्रपटाचे केलेले वर्णन जे उरलेल्या सात भागात आहे. सत्य निश्चिती / प्रस्थापना लेखमालेचे प्रास्ताविक तुमच्या व्यासंगाची प्रचीती देणारे आहे. एखादी गोष्ट सत्य म्हणून प्रस्थापित करण्याच्या तुम्ही पाच पद्धती सांगितल्या आहेत. १) सिद्ध करूच द्यायचे नाही, आणि हे स्वयंसिद्ध आहे म्हणूनच सत्य आहे असेच मांडायचे. २) जे आपण समजतो ते आपल्या मनात नैसर्गिकरीत्या आले म्हणजे ते सत्यच असणार ही समजूत. ३) जे विश्वासार्ह व्यक्तींकडून आले ते सत्य असणारच ही समजूत. ४) जास्तीत जास्त लोक जे मानतात ते सत्य असे लोकशाहीसारखे सत्य. ५) जास्तीत जास्त लोक जे सत्य मानत असतील असा आपला समज असतो ते आपोआपच आपल्याला सत्य वाटू लागते. यात मला अजून एक सांगावेसे वाटते की सर्वसामान्य माणूस त्याच गोष्टीला सत्य म्हणून मान्यता देतो जी त्याला त्याच्या परंपरांच्या सरळ रेषेत ठेवता येते. उदाहरणार्थ सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक दही हंडी उत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव; मान्य करायला आपल्याला प्रेषिताची गरज लागली नाही कारण हे सगळे आपल्या परंपरांच्या सरळ रेषेत होते. हे सत्य चटकन प्रस्थापित होते कारण ते परंपरांच्या सरळ रेषेत असते. परंपरांना छेद देणारी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रेषितांची गरज भासते. असे प्रेषित जे केल्या कामाची फळे चाखत नाहीत, बलिदान देतात किंवा मग त्यांच्या कामाला त्यांच्या हयातीतच इतकी प्रचंड फळे येतात की त्यांनी चाखलेली फळे नगण्य वाटू लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, मोझेसने त्याच्या हयातीत ज्यू लोकांना इजिप्त मधून बाहेर काढले नसते आणि यहोवाच्या प्रार्थनेत वळवले नसते तर अजून हजारो वर्षे ज्यू लोक इजिप्शियन देवांची पूजा करत गुलामीचे जीवन जगणे सत्य मानत राहिले असते. जर येशूने नवा करार आणला नसता तर ख्रिश्चन जुन्या कराराखाली ज्यू म्हणूनच जगणे सत्य मानून राहिले असते. जर मुहम्मदांनी त्यांच्या हयातीत जेरुसलेमच्या दिशेने प्रार्थना करणे बंद करून मक्केची दिशा पकडली नसती तर आजही मुस्लिम समाज जेरुसलेमच्या दिशेने नमाज अदा करणे आपल्या ईश्वराप्रती समर्पणाची सत्य अभिव्यक्ती आहे असे समजून राहिला असता. किंवा अनेक अरबी टोळ्या काबाच्या देवालयात आपापल्या कुल / टोळी देवतेच्या मूर्तीची पूजा करत राहिल्या असत्या. परंपरांना छेद देणारी गोष्ट प्रेषिताशिवाय गळी उतरवण्याचा प्रयत्न केला की त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढीत रहातात. मग ती सतीबंदी असो किंवा अस्पृश्यता असो किंवा जाती प्रथा असोत. एका झटक्यात प्रवाहाचे सत्य बदलत नाही, त्यासाठी प्रेषिताचे बलिदान लागते किंवा विजयी संस्कृतीचा पराभूतांवर सर्वंकष विजय लागतो. सत्याचे अन्वेषण / आकलन या प्रस्तावनेत तुम्ही सत्याचे खंडश: प्रकट होणारे आणि अंशात्मक सत्य (या ठिकाणी मला 'अंशतः सत्य' हा शब्द जास्त चपखल वाटतो) असे दोन प्रकार सांगितले आहेत, ते या विषयावर मी आत्तापर्यंत वाचलेले सर्वात परिष्कृत विचार आहेत. सत्याचे अन्वेषण करण्याच्या संदर्भात आपण जी मते मांडली आहेत त्या संदर्भात मला अजून एक सांगावेसे वाटते की, एखाद्या गोष्टीचे आकलन आपल्याला ज्ञानेन्द्रीयांद्वारे होते. म्हणजे ज्ञानेन्द्रीयांद्वारे घटना आपल्याला जाणवतात. ही ज्ञानेंद्रिये सगळ्यांना सारखी असतील याची खात्री नाही. त्यामुळे डोळस, आंधळा, रंगांधळा यांची होणारी फसगत आणि त्यामुळे होणारे सत्याचे अपूर्ण दर्शन हा मुद्दा आपण छान मांडला आहे. त्यापुढे जाऊन मी असे म्हणीन की, जरी आपण सर्व साक्षीदारांना सर्व ज्ञानेंद्रिये सारख्याच क्षमतेची दिली, त्यांची आकलनक्षमता सारखीच असू दिली तर त्या सर्वांना होणारे सत्याचे दर्शन सारखेच असले तरी ते पूर्ण सत्य असेल याची खात्री नाही. कारण ज्ञानेद्रीयांची सत्य ग्रहण करण्याची मर्यादा हा मुद्दा आपण विचारात घेतला नाही. आत्ता या क्षणी माझ्या घरात आम्ही पाच जण नाक, कान, डोळे यांची पूर्ण क्षमता वापरू शकणारे असलो तरीही आम्ही या क्षणी घरात फिरणाऱ्या रेडीओ लहरींना रेडीओ न लावता ऐकू शकत नाही आणि केबल कनेक्शन व टी व्ही शिवाय आम्हाला वेढून टाकणाऱ्या टी व्हीच्या लहरी आम्हाला जाणवत नाहीत. पूर्ण विकसित ज्ञानेंद्रिय असून देखील आम्हा पाचजणांना या लहरींचे सत्य अस्तित्व जाणवत नाही. थोडक्यात आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा हा देखील आपल्याला सत्याचे संपूर्ण स्वरूप समजून घेण्याच्या मार्गातील अडथळा असतो. सत्याचे प्रकटीकरण जी गत ज्ञानेन्द्रीयांची तीच गत कर्मेंद्रियांची. जर जाणवलेच अर्धे मुर्धे, त्यातले आकळलेच अजूनही थोडे मग त्याचे पुन्हा प्रकटीकरण करण्यासाठी वापरायची साधने शब्द, चित्र, शिल्प, नृत्य, अभिनय अशी एकांगी आणि तुटपुंजी तर मग आपल्यासमोर प्रकटलेले सत्य इतरांसमोर जसेच्या तसे प्रकट करण्यात आपण अपयशी ठरलो नाही तरच नवल. वर ते सत्य जर आपल्या स्वतः संबंधी असेल तर मग अहंकार आणि स्व- प्रतिमा प्रेम, जाणवलेल्या सत्यावर आरूढ होतात. समाजाने मानलेल्या आदर्शांप्रमाणेच आपले वागणे होते हे दाखवण्याच्या नादात आपण जे प्रकट करतो ते जाणवलेले सत्य (experienced truth) नसून आपण उत्पादन केलेले सत्य (manufactured truth) असते. जंगल वाटांवरचे कवडसे चित्रपटाचे मध्यवर्ती सूत्र म्हणजे एकच प्रसंग विविध व्यक्तींच्या दृष्टीकोनातून वेगवेगळा दिसत असताना त्यातले त्या प्रसंगाचे सत्य स्वरूप कोणते मानायचे? हा आहे. आणि मग या मध्यवर्ती सूत्राची, तुम्ही, मला माहित नसलेला बंडखोर हा प्रवचन संग्रह, माझ्या आवडीच्या, जी एंच्या ठिपका, कळसूत्र, विदूषक आणि यात्रिक या कथांबरोबरच ऑस्कर वाईल्डचा डोरायन ग्रे; या विविध संदर्भांबरोबर, केलेली गुंफण तुमच्यातील सृजनशीलतेची साक्ष देणारा आहे. इथे एक प्रश्न येतो की, सृजनशीलता म्हणजे तरी नक्की काय? दोन गोष्टींमधला संबंध चटकन जाणवत नसला तरीही तो उलगडून दाखवणे किंबहुना विस्कळीत, स्वयंपूर्ण गोष्टींना एका सूत्रात गोवून त्यांची एक सुसंगती निर्माण करणे म्हणजेच सृजनशीलता. जेंव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीचे सृजन करीत असतो तेंव्हा प्रत्यक्षात विस्कळीत आणि स्वयंपूर्ण गोष्टींना एकत्र रचत असतो. जितकी आपली रचना मनाला सुसंगत वाटते तितकी ती कृत्रिम न वाटता सत्य वाटू लागते. या अर्थाने सृजन हे देखील एक प्रकारे सत्यापलाप ठरते. परंतू स्वभावतः विसंगत गोष्टींमध्ये सुसंगती मानून त्यात अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची मानवाची प्रवृत्ती नैसर्गिक असल्याने आपण सृजनशीलतेला सत्याचा अपलाप करणारा दुर्गुण न मानता; निरर्थक सत्याला मान्य करण्यासाठी, त्याची दाहकता कमी करण्यासाठी निसर्गाने माणसाला दिलेले वरदान समजूया. या अर्थाने जेंव्हा मी संपूर्ण लेखमालेचे शीर्षक वाचतो तेंव्हा मला खरेच तुमच्या समर्पक शब्दयोजनेने अतिशय आनंद होतो. आपला सत्याला जाणण्याचा प्रवास म्हणजे, जंगलात पडलेल्या पाचोळ्यात जन्म घेऊन त्या पाचोळ्यातच मरण पावणाऱ्या क्षुद्र किड्याने, प्रकाशाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने तयार झालेल्या कवडश्यांकडे पाहून त्या प्रकाशाचा स्त्रोत कसा असेल याचे आडाखे बांधण्यासारखा आहे. भलेही आपण या सत्यान्वेषणामध्ये असफल होऊ आणि भलेही जी एंच्या यात्रिक मधला न्हावी सॅंचोला सांगत असेल की 'शेवटी अंधारात सगळीच मांजरे काळी'. तरीही प्रकाशात ती कशी दिसत असतील याचा शोध आपण घेतच राहू. मग तो प्रकाश कवडशांच्या रूपात का असेना. क्रमश
  • Log in or register to post comments
  • 40908 views
  • राशोमोन (भाग - २) चित्रपट
  • राशोमोन (भाग - ३) भिक्षू

Book traversal links for राशोमोन (भाग - १) प्रास्ताविक

  • राशोमोन (भाग - २) चित्रपट ›

प्रतिक्रिया

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 02/12/2016 - 19:03

Permalink

इंटरेस्टिंग!

यात अजून एक मुद्दा हा मांडावासा वाटतो की सत्य जाणून घ्यायचा हेतू काय आहे? दुस-या शब्दांत - सत्य का जाणून घ्यायचं? जर माझ्या आयुष्यात सत्य काय हे जाणून घेतल्यामुळे फरक पडत असेल तर मी जरुर त्यासाठी प्रयत्न करीन पण जर मला काहीही फरक पडत नसेल तर सत्य काय आणि असत्य काय - हे दोन्हीही माझ्यासाठी सारखेच. मी जर उंदीर असेन तर एखादं मांजर प्रकाशात कसं दिसतं हे जाणून घेण्याने मला फरक पडतो. मी जर माणूस असेन (मांजर हा ज्याचा भक्षक नाही असा प्राणी या अर्थाने हा शब्द घ्यावा) तर who cares?
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 02/12/2016 - 19:36

In reply to इंटरेस्टिंग! by बोका-ए-आझम

Permalink

बेग टू डिफर

सत्य शोधण्यामागचे कारण हे वैयक्तिक असायलाच हवे असे नाही. सत्य जाणून घेण्यामागच्या जिज्ञासेच्या मुळाशी मानवी जीवात नैसर्गिकरित्या असलेले कुतूहल आहे. यात माझ्या जीवनात काय व किती फरक पडला हा इतर अनेक उद्देशांपैकी एक उद्देश असू शकतो, परंतु एकमेव नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 02/12/2016 - 21:11

In reply to बेग टू डिफर by एस

Permalink

हो. तुमचं बरोबर आहे.

हाच सामान्य आणि असामान्य माणसांमधला फरक आहे. अर्थात नोबेल पारितोषिक आणि इतर मानमरातब मिळवणं हा हेतूही आज असू शकतो. पूर्वी जेव्हा असं काही नव्हतं तेव्हाच्या शास्त्रज्ञांनी ज्ञान या एकाच उद्देशाने संशोधन केलं. मेंडेलीफने सर्व मूलद्रव्यांची आवर्तसारणी बनवली किंवा गॅलिलिओने Law of Falling Bodies ची प्रयोगाने सिद्धता दिली त्यामागे तुम्ही म्हणताय तशी निरपेक्ष वृत्ती असावी. रच्याकने युक्लिडने भूमितीची रचना आमचा छळ करण्यासाठी केलेली आहे असं शाळेत वाटायचं. आता अर्थात त्याचं महत्व समजतं. :)
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/13/2016 - 10:45

In reply to इंटरेस्टिंग! by बोका-ए-आझम

Permalink

सत्य जाणून घ्यायचा हेतू

सत्य जाणून घ्यायचा हेतू कुतूहल हाच असावा. आणि कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्यामुळे माझ्या लेखी सत्यशोधन ही देखील मुळातील नैसर्गिक प्रवृत्तीच ठरते. कुतूहलाच्या मागे आपले अस्तित्व टिकवणे ही आदिम प्रेरणा असावी. इतर प्राण्यांप्रमाणे आपण केवळ नैसर्गिक निवान जगत नसून आपण सामाजिक जीवन जगत असतो, त्यामुळे आपल्या कुतूहलाच्या मागे अस्तित्व टिकवण्याच्या नैसर्गिक प्रेरणेबरोबरच इतरही अनेक प्रेरणा काम काम करीत असतात . वर सांगितल्याप्रमाणे सत्यशोधन ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे हे मान्य झाल्यास ती सर्व प्राण्यात त्यांच्या आयुष्याच्या लांबीप्रमाणे आणि अस्तित्व टिकवून ठेवायला लागणाऱ्या धडपडीप्रमाणे आढळून येते हे मान्य करायला सोपे जाईल. पण सत्यप्रस्थापन हा मात्र सामाजिक जीवन जगणाऱ्या मनुष्य प्राण्याचा गुणविशेष आहे. एकाच समाजात राहणाऱ्या आणि परस्परावलंबी असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या सत्यशोधनानंतर त्यांना जाणवलेले सत्य जेंव्हा ते प्रकट करतात तेंव्हा त्या व्यक्त सत्याचे रूप एकच रहात नाही तर ते वेगवेगळे दिसते. मग कुठले सत्य खरे हा प्रश्न पडतो आणि सत्य प्रस्थापना हा एक नवीनच उद्योग मानवाला करावासा वाटतो. आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात. रमतारामांची आणि माझीलेखमाला मुख्यत्वे या सत्यप्रस्थापनेबाबत आणि त्यात येणाऱ्या अडचणीबाबत आहे. शक्य झाल्यास माझ्या याच लेखातील "सत्याचे अन्वेषण / आकलन" आणि "सत्याचे प्रकटीकरण" या शीर्षकाखाली लिहिलेले परिच्छेद पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला या लेखनामागची भूमिका जाणवेल.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/13/2016 - 11:32

In reply to सत्य जाणून घ्यायचा हेतू by Anand More

Permalink

वरच्या माझ्या प्रतिसादातील,

वरच्या माझ्या प्रतिसादातील, "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य अंतिम मानून तेच इतरांनी मानावे , जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." या वाक्याला "आपल्यापैकी बरेच जण निसर्गातील सत्य समजून घेण्याच्या रस्त्याला लागण्याच्या ऐवजी इतरांनी व्यक्त केलेले सत्य त्यांना पटले तर तेच अंतिम मानून उरलेल्या इतरांनीदेखील त्याला मान्य करावे, जेणेकरून व्यवस्थेवर पकड बनवून ठेवता येईल, या विनाशकारी रस्त्याला लागतात." असे वाचा, ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by सटक on Wed, 02/17/2016 - 02:30

In reply to वरच्या माझ्या प्रतिसादातील, by Anand More

Permalink

सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला

सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला आहे आपण. सत्य हे तुम्ही सांगितलेल्या मर्यादांनी बाध्य आहेच परंतु इतर सर्व गोष्टी बरोबर असतानाही सत्याचे आकलन हवे तसेच होईल असे म्हणणे धाडसाचे आहे. सत्य हा शेवटी संवाद आहे असे मला वाटते. घटनाक्रमाचे सुसुत्रीकरण करण्यासाठी आपण जे framework बनवतो त्याला ढोबळमनाने सत्यान्वेषण असे म्हणता येइल. ह्या अर्थाने ती आदिम प्रेरणा आहे हे बरोबर आहे आणि नाईलाजाने मानवाच्या अस्तित्वाबरोबरच ते अस्तित्वात येते. तरीही सत्य हे personal असतेच. वैज्ञानिक सत्याचा येवढा बोलबाला असण्याचे कारण असे आहे की ते काही विशिष्ठ स्थितींमध्ये पुनर्गठित होऊ शकते. कितीही अवघड आणि हास्यास्पद वाटले तरी. वानगीदाखल म्हणायचे तर JFK assassination ज्या प्रसिद्ध single bullet theory चा वापर करून विषद केले गेले ती प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवली होती (म्हणे!). पण येवढा एकच निकष सत्याला लावता येत नाही. "मी रात्री २ वाजता फलाटावरून बाहेर आलो..चिटपाखरूही नव्हते..काय करणार ह्या विचारात असतानाच स्वामींनीच रिक्षा पाठवली!" हे ही सांगणार्‍याच्या द्र्ष्टीने सत्यच आहे हे विसरून चालणार नाही. पुन्हा सत्य आकलन होण्यात आपण "उपस्थित" असणे हा ही महत्वाचा भाग आहे..ज्ञानेंद्रिये उत्तम काम करत असली तरी आपण गाडी चालवत चालवत घरी येतो आणि कसे आलो ते आठवत नाही हा ही सार्वत्रिक अनुभव आहे. सत्याचे आकलन हे अजूनही बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. उदाहरणादाखल Thumbs Up ची खूण आपल्याकडे ठेंगा दाखवणे अशी वापरली जात असल्याने तिचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि पाश्चातत्य लोकांना अभिप्रेत असलेला अर्थ वेगवेगळे आहेत; हा झाला सांस्कृतिक गोंधळ! (हे उदाहरण साक्ष देण्याच्या दृष्टीने वाचावे. कुणी कुणाला अंगठा वर करून दाखवला तर भारतीय माणूस म्हणेल की तो त्याला वाकुल्या दाखवत होता आणि पाश्चात्य म्हणेल की त्याला प्रोत्साहन देत होता) Total Blackout नावाच्या एका कार्यक्रमात अंधारामुळे माणसाच्या आकलनशक्तीत कसे फसवे बदल होतात ह्याचे उत्तम उदाहरण बघायला मिळते. याच मर्यादांनी बाध्य सत्याचे प्रकटीकरणही असणे ओघाने आलेच! मुद्रा ज्यांना कळत नाहीत त्यांना भारतीय नृत्यातून काही सांगण्याचा प्रयत्न करणे(म्हणजे काही कळण्याची अपेक्षा करणे) अवघडच! त्यामुळे, प्रत्येक सत्य हा सादरकर्त्याचा स्वतःचा अविष्कार असते असे मला वाटते. आता हे आपणास महिती असलेले सत्य दुसर्‍यास सांगणे ह्या अर्थाने पाहिले तर अर्थातच ते बदलणार! म्हणजे बदलेलच असे नाही पण बदलणार नाहीच असे कसे म्हणणार? प्रत्येक कलाकार स्वतःच्या कलाकृतीमधून दर्शकाला (प्रेक्षकाला) आपल्याला जाणवलेल्या सत्याचे दर्शन घडवत असतो. दुर्बोधता ही केवळ lack of reference असते असे मला वाटते. येथे जाणवलेले हा शब्द ह्यासाठी की ते सत्य त्याला व्यक्त पातळीवर कळले असेलच असे नाही, पण जाणवणे शक्य आहे. (म्हणजे मातेचा स्तन जवळ आल्यावर तान्ह्या बाळाला आता स्तनपान करायचे आहे हे जाणवते तसेच.) कलाकार जेवढा प्रेक्षकाच्या frame of reference च्या बाहेर जातो तेवढा तो अधिकाधिक abstract किंवा दुर्बोध होत जातो. (येथे किंवा हा शब्द either/or असा नाही तर..आकळला तर abstract आणि नाकळला तर दुर्बोध असा वापरला आहे) महत्वाची गोष्ट अशी की आकळणे आणि नाकळणे ह्या दोन्ही गोष्टी दर्शकावर (प्रेक्षकावर) अवलंबून आहेत. कलाकारावर नाहीत. अंततः सत्य हे संवादाशिवाय अस्तित्व राखत नाही असे वाटते. जे मला जाणवले तेच माझ्यासाठी सत्य! अगदी नैसर्गिक सत्य जरी घेतले तरी ते निसर्ग व साक्षी (nature and observer) ह्यांचा संवाद आहे. म्हणूनच कितीही सफरचंदे पडत असली तरी त्यामागचे गुरुत्वाकर्षण न्यूटनला जसे कळले तसे इतरांना नाही कारण इतरांचा संवाद नाही. आता येते सामाजिक सत्य प्रस्थापन. हे तर केवळ सोय आहे! ज्या समूहाला जे जे ज्या ज्या वेळी सोयीचे वाटते ते सामाजिक सत्य म्हणून स्वीकारण्यात येते. सर्व धर्म हे ह्या प्रकारच्या सत्याची प्रमुख उदाहरणे आहेत. सामाजिक सत्याला सत्य (पुराव्याने शाबित करता येण्यासारखे या अर्थाने) ह्या दृष्टीने फारसे महत्व नाही. अर्थात हे तेव्हा चूक ठरते जेव्हा अश्या एखद्या सत्याचा अंगिकार केलेला समाज दुसर्‍या एखाद्या समाजाच्या दु:खाला कारणीभूत होतो. मग त्याच्या विरोधात अजून सत्ये मांडली जातात आणि त्यांचा पुरस्कारही होतो. पुन्हा हे ही सत्य संवादात्म झाले. टीपः हे सर्व केवळ आपला लेख व प्रतिसाद वाचून लिहिले आहे..मूळ चित्रपट पाहिलेला नाही आणि लेखही वाचलेले नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Wed, 02/17/2016 - 22:46

In reply to सत्य हा तसाच मोठाच विषय घेतला by सटक

Permalink

आपण छान विचार मांडलेत. इतक्या

आपण छान विचार मांडलेत. इतक्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण मी सत्य अन्वेषणाबद्दल काहीही बोललो नसून सत्याचे आकलन आणि नंतर त्याचे प्रकटीकरण याबद्दल माझे विचार मांडले आहेत. तुमचा सत्य म्हणजे संवाद हा विचार देखील त्याच अंगाने जातो. जमल्यास चित्रपट पहाल का ? आणि माझे लेखन पण एकदा नजरेखालून घालून त्यावर प्रतिसाद दिलात तर वाचायला आवडेल मला.
  • Log in or register to post comments

Submitted by सटक on Wed, 02/17/2016 - 23:42

In reply to आपण छान विचार मांडलेत. इतक्या by Anand More

Permalink

सत्यशोधन ही जर का नैसर्गिक

सत्यशोधन ही जर का नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर मग सत्याचे आकलन हे सत्याच्या अन्वेषणाचे फलितच असेल असा विचार माझ्या लेखनामागे होता. सत्याचे अन्वेषण आधी आणि मग आकलन हा नैसर्गिक ओघ आहे. आकलनात अन्वेषण अंतर्भूत आहे असे आपणास वाटत नाही का? प्रकटीकरणावरही मी त्याच अंगाने बोललो आहे. अन्वेषण-आकलन-सात्मीकरण-प्रकटन हा माझ्यामते जास्ती पटणारा Process Flow असावा. सात्मीकरणाशिवाय प्रकटन शक्य नसल्याने आकलन झालेले सत्य आणि नंतर प्रकट होणारे सत्य ह्यात फरक अपेक्षित आहे. असो. चित्रपट बघून काही वेगळेही वाटू शकेल कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on गुरुवार, 02/18/2016 - 13:12

In reply to सत्यशोधन ही जर का नैसर्गिक by सटक

Permalink

तुमचे टोपणनाव असे आहे की मी

तुमचे टोपणनाव असे आहे की मी तुम्हाला दादा, साहेब, ताई, बाई, वहिनी, जी वगैरे काहीही अतिरिक्त संबोधन लावू शकत नाही. म्हणून केवळ टोपणनाव वापरून संबोधतोय. त्यात कुठेही एकेरीवर यायचा इरादा नाही. आपल्याबद्दल आणि आपल्या लेखनाबद्दल पूर्ण आदर राखूनच मी प्रतिसाद देतो आहे. माझ्या या लेखमालेत सत्यशोधन हा मुद्दा कधीच नव्हता. आता मागे वळून बघताना मी एका मुद्द्याला शीर्षक म्हणून "सत्याचे अन्वेषण / आकलन" हा शब्द प्रयोग केला तो चुकला असे मला वाटू लागले आहे. त्या शीर्षकाखाली माझे सगळे मुद्दे केवळ "सत्याचे आकलन" या संकल्पनेभोवतीच गुंफलेले आहेत. एकदा वाटले की संपादकांना विनंती करून ते शीर्षक बदलून घ्यावे. पण त्याने अनेक प्रतिसाद निरर्थक वाटले असते म्हणून मी तशी विनंती करीत नाही आहे. मी सत्य शोधन एक नैसर्गिक प्रवृत्ती मानतो आणि तुम्ही आधी मांडलेला, संवादाचा आणि सत्याच्या व्यक्तिगत आविष्काराचा मुद्दा मला पूर्णपणे पटलेला आहे. किंबहुना, माझा मुद्दा अजून स्पष्ट करण्यासाठी मी असे म्हणीन की, नैसर्गिक सत्यांबद्दल सत्यशोधन ही विचारपूर्वक केलेली गोष्ट नसावी. याउलट, स्वभावानुसार, ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेसनुसार, आणि बाह्य वातावरणानुसार माणसाला अशी नैसर्गिक सत्ये जाणवत असावीत. नंतर माणूस त्याबद्दल जो काही विचार करतो ते त्या सत्याच्या प्रकटनाची त्याच्या मनात झालेली सुरवात असते. थोडे अलंकारिक बोलायचे झाले तर मी "नैसर्गिक सत्य जाणवणे ही बर्फाचा कडा तुटण्यासारखी अचानक घडणारी घटना मानतो. त्यात शोधन किंवा अन्वेषण याचा भाग कमी आणि केवळ त्या क्षणाला साक्षी असणे हीच त्या माणसाची मोठी उपलब्धी मानतो" असे म्हणेन. आता रहाता राहिला या लेखाचा, चित्रपटाचा आणि लेखमालेचा मुद्दा. ह्या तीनही गोष्टी गुरुत्वाकर्षण, आण्विक बल अश्या संकल्पनांच्या नैसर्गिक सत्याबद्दल बोलत नाहीत. याउलट एका घटनेचा वेगवेगळ्या लोकांनी कसा लावला आणि प्रत्येकाला आपली बाजूच सत्य आहे असे वाटते, या बद्दल बोलत आहेत. या सर्व लोकांपैकी कोण सत्य बोलतोय? कोण असत्य बोलतोय? याबद्दल स्वत: कुरोसावा, नंतर ररा आणि त्यानंतर मी कुणीच काहीही भाष्य केलेले नाही आहे. तर ज्या गोष्टी आपण करतो किंवा आपण बघतो त्याबद्दलचे आपले मत (ज्याला आपण आपले वैयक्तिक सत्य म्हणू शकतो) ते मूळ सत्यापासून भिन्न असू शकते. त्यात आपल्या स्वप्रतिमेचा, स्वप्रतिमाप्रेमाचा, संस्कारांचा, पूर्वग्रहांचा, आयुष्यातील तत्कालीन गरजांचा किती मोठा प्रभाव असतो त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. खून झालाय ही एक सत्य घटना आहे. पण तो का झाला? त्यामागची भूमिका काय होती? तो होण्यापूर्वी कोण कसे वागले याबद्दलचे सर्व लोकांचे आकलन पूर्णतया भिन्न आहे. कारण हे सर्व लोक, मी वर उल्लेखिलेल्या प्रभावांपासून मुक्त नाहीत. जेंव्हा मनुष्य कोणत्याही व्यवस्थेची उभारणी करतो, तेंव्हा त्यासाठी मूळ घटक जर निर्जीव असेल किंवा असल्या प्रभावांपासून मुक्त असेल तर ती व्यवस्था उभी करणे आणि तिला तिच्या मूळ स्वरूपात ठेवणे सोपे असते. पण जर ती व्यवस्था कुटुंबाची किंवा समाजाची असेल तर तिचा लघुत्तम एकक म्हणजे मनुष्य असतो आणि तो या प्रभावांपासून कधीच मुक्त नसतो. त्यामुळे अश्या व्यवस्थांमध्ये सत्य कायमच धूसर असते आणि जाणवलेले सत्य (Realized Truth) आपोआप मागे पडून उत्पादन केलेले सत्य (Manufactured Truth) बाजी मारते असा या पहिल्या लेखाचा सूर आहे. आणि असे का होत असावे त्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण मी तिसऱ्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी तुम्हाला चित्रपट पहा आणि तीनही लेख वाचा अशी विनंती केली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by सटक on गुरुवार, 02/18/2016 - 20:54

In reply to तुमचे टोपणनाव असे आहे की मी by Anand More

Permalink

म्हणजे माझे संदर्भाविरहित

म्हणजे माझे संदर्भाविरहित स्पष्टीकरण झाले तर.. ;) आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले.. दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील. तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही. असो, आपले विचार पटताहेत, थोडे fine tuning सोडल्यास. पुढील लेखनास शुभेच्छा! आणि संबोधन जाऊद्या हो..संवाद महत्वाचा!
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Fri, 02/19/2016 - 11:32

In reply to म्हणजे माझे संदर्भाविरहित by सटक

Permalink

शेवटी "असो" म्हणून थांबलात

शेवटी "असो" म्हणून थांबलात तरीही काही सांगावेसे वाटले म्हणून लिहितोय.
आता असे झालेच आहे तर काही शंका..सत्यशोधन हा शब्दप्रयोग बारकावे जाणून घेणे (refinement) ह्या अर्थाने आहे, का शोध घेणे ह्या अर्थाने आहे? वरच्या प्रतिक्रियेत तुम्ही शोधन किंवा अन्वेषण असा शब्दप्रयोग केलेला आहे म्हणून विचारले..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
दुसरे, नैसर्गिक सत्ये जाणवणे आणि मानवीय/सामाजिक (for the lack of a better term) सत्ये जाणवणे ह्यात फरक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तसे वाटत नाही. ज्या process मी सत्याला आकलन करायला वापरतोय, (म्हणजे वापरल्या जातात, naturally) त्यांना असे म्हणण्याची गरज दिसत नाही. स्प्ष्टीकरणास सोपे म्हणून नैसर्गिक सत्य घेतले आहे, पण इतरही तशीच मांडता येतील.
हे तुमचे मत मला पटले आहे.
तिसरे म्हणजे, विचार हे प्रकटीकरणाची मनातली सुरुवात हे थोडे धाडसाचे वाटते, सात्मीकरण (absorption) ह्या प्रक्रियेत विचार येतो. प्रकटीकरणातही विचार असतोच, पण वेगळ्या स्वरूपाचा. माध्यम, परिणामकारकता, कौशल्य ह्या अंगाने जाणारा. कलाकाराच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, चित्रातून जास्ती चांगले, की गाण्यातून किंवा काही वेगळ्याच पद्धतीने, ह्या स्वरूपाचा, पण ह्यात सत्याचा (आकलनाच्या पातळीवरचा) विचार नाही.
कदाचित मी थोडा धाडसी असीन ;-) सात्मीकरणात देखील व्यक्ती आपल्या पूर्वानुभवांना आणि कल्पनेला वापरून सत्याचे एक सुसंगत चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत असते असे मला वाटते. म्हणजे इथे आपले आकलन इतरांपुढे प्रकट करावे की नाही याचा विचार जरी नसला तरी ते आकलन विचारांच्या सहाय्याने सुसंगत करून स्वतःच्या मनात प्रकट करणे सुरु होते. म्हणून मी त्याला प्रकटीकरणाची पहिली पायरी असे म्हटले. आपले विचार थोड्या ट्युनिंग च्या फरकाने बरेचसे जुळतात अश्या अर्थाचे तुमचे विधान मला पटले आहे. आपल्याशी संवाद करून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by सटक on Sat, 02/20/2016 - 00:13

In reply to शेवटी "असो" म्हणून थांबलात by Anand More

Permalink

संवादाची अशी गंमत आहे पहा.

संवादाची अशी गंमत आहे पहा. रेषा येत रहातात आणि आकृती उमटत रहाते! तर..
शोधन किंवा अन्वेषण ह्या शब्दामुळे नैसर्गिक प्रवृत्तीमुळे किंवा बाह्य हेतूमुळे केलेली कृती असावी असा भास होतो. यात मी "कुतूहल ही नैसर्गिक प्रवृत्ती" किंवा "आरोपीला शिक्षा देणे, पारितोषिक मिळवणे, इतरांना खोटे ठरवणे, स्वतःला बरोबर ठरवणे हे किंवा अश्यासारखे बाह्य हेतू", व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करतात असे मानतो. म्हणून सत्यशोधन किंवा सत्याचे अन्वेषण बारकावे जाणून घेणे आणि शोध घेणे या दोन्ही अर्थाने वापरता येईल. याउलट आकलन शब्दामुळे ती आपोआप होणारी गोष्ट आहे असे मला वाटते. घटनेत दैववशात सहभागी असलेल्या किंवा घटनेला केवळ अपघाताने साक्षी असलेल्या माणसाला देखील तिचे आकलन होतंच असते. पुढे तिच्या कारणांचे किंवा मूळ स्वरूपाचे शोधन / अन्वेषण करावे यासाठी वर सांगितलेली कारणे व्यक्तीला कृतीशील करतात. या अर्थाने बघितल्यास राशोमोनचा गाभा सत्याच्या आकलना भोवती आणि त्यानंतर आपले सत्यच खरे सत्य म्हणून प्रकट करण्याच्या प्रवृत्ती भोवती फिरतो.
तुमची ही भूमिका स्पष्ट केलीत हे फार छान केलेत. आकलन हे मी ह्यापूर्वी estimate/calculate अश्या अर्थाने वापरलेले जास्ती पाहिले आहे. त्यामुळे सहजलब्ध झालेले ज्ञान अशी आपण जी त्याची फोड करता आहात ती मला दिसली नाही चटकन. आकलनामध्ये कार्य अपेक्षित आहे. म्हणजे माहिती ताडून बघणे, त्यावर आधारित अदमास बांधणे इ. इ. शोधन ह्या शब्दाचेही तसेच आहे. "धातू शोधन" हे जास्ती वेळा वाचल्याने, शोधणे हा मराठी अर्थ मी त्याला सहसा लावलेला पाहिलेला नाही. शुद्धीकरण असाच जास्ती. आपण म्हणता त्याप्रमाणे अपघाती मिळालेले ज्ञान ह्याला वेगळा शब्द सुचवू म्हणेन तर तो ही चट्कन आठवत नाही! वेगवेगळ्या माणसांनी बघितलेले एकच दृश्य ही संकल्पना वापरून Vantage Point नावाचा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जमल्यास बघा. चांगला आहे. अर्थात तुम्ही भरपूर खोल संकल्पनेबद्दल बोलताय. तुम्ही आता पुरेसे कुतुहल वाढवल्यामुळे मी आता राशोमान बघेन. जमल्यास सांगेन कसा वाटला ते. सत्याचे सुसंगत चित्र, हम्म्म्म..चांगली संकल्पना आहे! शक्य आहे. प्रत्यक्ष दृश्य असेल तर मग तर नक्कीच! अवांतर: आपल्या शेवटच्या वाक्यातले आनंद आवडले...येवढे लिहून मी ही 'सटक"तो!
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/20/2016 - 13:11

In reply to संवादाची अशी गंमत आहे पहा. by सटक

Permalink

तुम्ही माझे लेखन बारकाईने

तुम्ही माझे लेखन बारकाईने वाचले आहे हे जाणवून खूप बरे वाटले. असे जाणकार वाचक असतील तर मी शब्द अधिक विचार करून वापरायला हवेत हे देखील जाणवले. तुम्ही सांगितलेले शब्दार्थ पटले आहेत पण माझ्या प्रतिसादामुळे, माझ्या शब्द प्रयोजनाच्या मागील भूमिका समजून, माझ्या विचारांची दिशा लक्षात येत असावी असे वाटते आणि माझे शब्दप्रयोग अगदीच मूर्खपणा वाटत नसावेत याची खात्रीदेखील वाटते आहे. तुम्ही ज्या दृष्टीने हा पहिला लेख वाचला त्यामुळे थोडासा धीट होऊन, मी तुम्हाला तिसरा भाग वाचण्याची विनंती करीन. कारण तो लिहिल्यानंतर माझा मीच खूप खूष झालो होतो. त्यावरच्या प्रतिसादांमध्ये सिरुसेरी यांनी कमल हसनच्या "वीरुमंडी" (सांदीयार)या तामिळ चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तो तू नळीवर शोधून ठेवला आहे. पण बघायचा बाकी आहे. आता त्या बरोबर Vantage Point पण बघीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 02/12/2016 - 19:09

Permalink

वाचतेय.पुभाप्र

वाचतेय.पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 02/12/2016 - 19:14

Permalink

मी याचे एक स्वैर भाषांतर केले

मी याचे एक स्वैर भाषांतर केले होते.. त्यातील कथेचा अंत तोच ठेवला होता. तो एकदा वाचून घ्यावा... झिरना गेट
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 02/12/2016 - 19:24

In reply to मी याचे एक स्वैर भाषांतर केले by जयंत कुलकर्णी

Permalink

त्यातून काही वेगळा अर्थ

त्यातून काही वेगळा अर्थ निघतोय का पहा....पण मला आवडलेली एक गोष्ट ती असी की तुम्ही त्यावर एवढ्या गंभीरपणे विचार करताय ते. श्री रमताराम यांनीही fantastic| लिहिले आहे यात काही शंकाच नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 02/13/2016 - 11:39

In reply to त्यातून काही वेगळा अर्थ by जयंत कुलकर्णी

Permalink

श्री. कुलकर्णी, लिंक बद्दल

श्री. कुलकर्णी, लिंक बद्दल धन्यवाद आणि कौतुकाबद्दल देखील. आपले लेखन वाचले. खूप छान आहे. आपण राशोमोनचे भारतीयीकरण अतिशय समर्थपणे केले आहे. पण मी अजून राशोमोनच्या धुंदीत असल्याने मला तो शेवटचा झिरना गेटचा सांधा मनात मूळ गोष्टीशी जुळवता आला नाही. ही लेखमाला संपल्यावर पुन्हा वाचीन आणि माझे विचार मांडेन. तोपर्यंत तुमची त्या शेवटच्या भागाच्या सांध्याची भूमिका मांडलीत तर माझ्या विचाराला दिशा मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 02/14/2016 - 15:11

Permalink

रमताराम सध्या इथे दिसत नाहीत म्हणून कमेंट करणं उचित नाही

तरीही इतकी भुक्कड लेखमाला मी त्यापूर्वी कधीही वाचली नव्हती. आता विषय निघालाच आहे तर लिहीतो, सत्यशोधन म्हणजे फॅक्ट फाइंडींग नव्हे. एक काल्पनिक कथा घेऊन त्यावर आठ क्लिष्ट भाग लिहून, सतरा बाजूंनी डोकेफोड करायची आणि पुन्हा `सत्य तुम्हीच शोधा' असा भोंगळपणा करत, वाचकांची वाट लावायची याला थोर कलाकृती म्हणत नाहीत. कलेनं लोकरंजन झालं पाहिजे, रसिकांनी तुमच्यासाठी स्वतःचा वेळ दिलायं, त्यांना आनंद मिळायला हवा असं माझं मत आहे. लेखकानं भारंभार लिहून किंवा त्यावर चित्रपट वगैरे काढून, स्वतःचं कन्फ्यूजन वाचकांच्या माथी मारणं आणि त्याला `सत्यशोधन वगैरे म्हणणं ही केवळ भंकस आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 15:31

In reply to रमताराम सध्या इथे दिसत नाहीत म्हणून कमेंट करणं उचित नाही by विवेक ठाकूर

Permalink

मनोरंजनाच्या व्याख्या

मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात... बाकी काय बोलू?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 02/14/2016 - 16:37

In reply to मनोरंजनाच्या व्याख्या by Anand More

Permalink

मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ?

सदर चित्रपटात उत्तर प्रेक्षकांवर सोडून काय मनोरंजन साधलंय ? खुद्द रमतारामांनी शेवटच्या लेखात, स्वतःच्या प्रतिसादातच स्वतःचा मानसिक गोंधळ नकळतपणे उघड केला आहे : पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल. कसले घंट्याचे मूलभूत प्रश्न? त्याला न आगा ना पिछा. आणि पुढे तर हद्दच केली आहे! त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा) तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल म्हणजे मर्म अजून यांना सुद्धा गवसलेलं नाही! आणि अपेक्षा काय तर वाचकांची पुरती काशी झाल्याशिवाय त्यांना `मर्म' कळणार नाही. पण इतका पसारा बघून, इथले सदस्यही बावरलेले दिसतात. मूळ प्रश्नाचीच जर उकल होत नाही तर नवे प्रश्न (आणि तेही मूलभूत?) निर्माण करुन काय मनोरंजन साधलंय? थोडक्यात, मूळ प्रश्न टांगणीला आणि नवे `मूलभूत प्रश्न' जोपर्यंत वाचकांच्या मनाचा `ताबा' घेत नाही तोपर्यंत त्यांना, लेखकानं `ओरिजनल' काशी काय घातलीये तेच कळणार नाही! याला तुम्ही लोकरंजन म्हणता?
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 16:44

In reply to मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ? by विवेक ठाकूर

Permalink

मी मला जे हवं ते घेतो... कधी

मी मला जे हवं ते घेतो... कधी कधी ते समोरच्याने दिलेही नसेल..त्या बाबतीत मी एकलव्य आहे... तुम्ही माझा तिसरा लेख वाचला का? रमतारामांना दिसलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या गोष्टी मला दिसल्या असे मी नमूद केले आहे... ते देखील तुम्हाला आवडलेच पाहिजे असा माझा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 02/14/2016 - 16:50

In reply to मी मला जे हवं ते घेतो... कधी by Anand More

Permalink

बाकी सर्व राहूं द्या

चित्रपटाच्या शेवटाबद्दल आणि ररांच्या या प्रतिसादाबद्दल तुम्हाला प्रामाणिकपणे काय वाटतं? पुन्हा एकवार नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट मर्डर मिस्टरी नव्हे. त्यामुळे शिक्षा झाली की नाही, झाल्यास एका गुन्ह्याबद्दल की दोन्ही हे प्रश्न चित्रपट पाहून संपल्यावर मनात उमटले नाहीत (कारण तोवर त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा तरच चित्रपटाचे मर्म तुम्हाला गवसले असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 02/14/2016 - 17:00

In reply to मनोरंजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात ? by विवेक ठाकूर

Permalink

श्री ठाकूर,

श्री ठाकूर, जो चित्रपट जगात आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांना भुरळ पाडत आला आहे, आणि जो चित्रपटसृस्टीतील एक माईलस्टोन म्हणून ओळखला जातो त्या सिनेमाला भुक्कड म्हणणे याला काय म्हणावे हे कळत नाही. शिवाय प्रतिसादात "घंट्याचे" "काशी घालणे" या असल्या शब्दांचा मी निषेध करत आहे. असो. अर्थात याचा उपयोग होणार नाही याची कल्पना आहे पण सगळ्यांनीच हे चालवून घेतले असे उद्या कोणी म्हणायला नको म्हणून हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 02/14/2016 - 17:03

In reply to श्री ठाकूर, by जयंत कुलकर्णी

Permalink

* व त्यावर आलेल्या चांगल्या

* व त्यावर आलेल्या चांगल्या लेखाला पर्यायाने त्या चित्रपटाला भुक्कड... असे वाचावे.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 02/14/2016 - 17:47

In reply to * व त्यावर आलेल्या चांगल्या by जयंत कुलकर्णी

Permalink

जयंतराव

तुम्ही ररांच्या प्रतिसादाबद्दल किंवा चित्रपटाच्या शेवटा बद्दल जर काही पटेलसे लिहू शकलात तर मी सुद्धा उपरोक्त शब्दांचा पुनर्विचार करीन . ररांच्या नांवामुळे सदस्य बोलले नसतील इतकंच . एनी वे , वरच्या प्रतिसादाबद्दल तुमचं किंवा आनंदश्रींच मत काय आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 18:01

In reply to जयंतराव by विवेक ठाकूर

Permalink

आनंदश्री.... मला तर कुस्तीचा

आनंदश्री.... मला तर कुस्तीचा फड मारून आल्यासारखं वाटतंय... अहो ठाकूर साहेब माझं मत मी खाली दिलं आहे.. आणि मी तितकंच सांगू शकेन असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 02/14/2016 - 18:16

In reply to आनंदश्री.... मला तर कुस्तीचा by Anand More

Permalink

तुमच्या दोघांचंही नुसतं गोलगोल चाललंय !

तुम्ही माझ्या तीन साध्या प्रश्नांची उत्तरं द्याल का? १) तुम्हाला चित्रपट नक्की काय सांगतो ते कळलंय का? २) `त्याहून मूलभूत प्रश्नांनी तुमच्या मनाचा ताबा घ्यायला हवा' हे प्रश्न कुठले? ३) त्या प्रश्नांनी मनाचा ताबा घेण्याचा (कारण ते चित्रपटाचा भागच नाहीत) आणि चित्रपट समजण्याचा काय संबंध आहे? आणि तुमच्याकडे उत्तरं नसतील तर ते प्रामाणिकपणे मान्य कराल का?
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 18:42

In reply to तुमच्या दोघांचंही नुसतं गोलगोल चाललंय ! by विवेक ठाकूर

Permalink

देतो की,

देतो की, 1) नाही 2) ररांच्या मनातले प्रश्न मी ओळखू शकलो नाही 3) प्रश्न कुठले हेच ओळखले नाही तर त्यांचा चित्रपटाशी संबंध काय ते मी सांगू शकत नाही.. हत्ती आणि सात आंधळ्याच्या गोष्टीतील मी एक आंधळा म्हणून घ्यायला तयार आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Sun, 02/14/2016 - 21:35

In reply to देतो की, by Anand More

Permalink

तुमच्या प्रामाणिकापणाला दाद देतो !

खालच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलंय तसा तुमची पीसं वगैरे काढण्याचा अजिबात उद्देश नव्हता. ररांनी लोकांना उगीच गुगली टाकून स्वतःचं अज्ञान झाकण्याचा प्रयत्न केला होता अशी माझी खात्री आहे. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही तसं काही केलं नाहीत. तुमच्या हलक्या फुलक्या लेखनाचे इथे अनेक फॅन्स आहेत. तुमच्याकडे सुरेख शैली आणि उत्तम मांडणी आहे. तस्मात, तुम्ही तुमच्याच स्टाइलनं लिहीत राहा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 21:39

In reply to तुमच्या प्रामाणिकापणाला दाद देतो ! by विवेक ठाकूर

Permalink

धन्यवाद... भेटत राहू... :-)

धन्यवाद... भेटत राहू... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 17:03

Permalink

ररांना जे भावले ते त्यांनी

ररांना जे भावले ते त्यांनी लिहिले..मला हा चित्रपट समजला आहे... या तुम्हालापण समजावतो आणि मी सांगीन तोच त्याचा अंतिम अर्थ आहे असा त्यांचा अभिनिवेश मला कुठे जाणवला नाही... आणि मी थोडा गुण गाईन आवडी वर विश्वास ठेऊन व्यक्त होणारा आहे... त्यामुळे माझे विचार त्याच दिशेने धावतात
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 02/14/2016 - 17:10

Permalink

श्री मोरे,

श्री मोरे, तुम्हाला जे भावले, जे आवडले त्याबद्दल आपण लिहीत रहा. आपण म्हटलेलेच आहे की ते सगळ्यांना आवडावेच असा तुमचा आग्रह नाही आणि ते शक्यही नाही. असे वितंडवाद घालणारे प्रतिसाद आले तर त्याला उत्तर देत बसू नका. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 02/15/2016 - 12:54

In reply to श्री मोरे, by जयंत कुलकर्णी

Permalink

सुंदर प्रतिसाद

कारण मनोरंजनाला अनेक Dimensions (आयाम ही शब्द बरोबर आहे का ?) असतात हेच मुळी काहींना मान्य नसते. खरे तर प्रत्येक गोष्टीकडे अनेक बाजूने बघता येते..हेच या चित्रपटात व लेखात चांगल्या पद्धतीने मांडले आहे.... मनोरंजना च्या जागी सत्याला अनुभवाला हे शब्द टाकले तरी चपखल बसेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सिद्धेश महाजन on Sun, 02/14/2016 - 17:20

Permalink

जंगलवाटांवरचे कवडसे ह्या

जंगलवाटांवरचे कवडसे ह्या मालिकेची ८ भागान्ची लिन्क मिळेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 17:30

In reply to जंगलवाटांवरचे कवडसे ह्या by सिद्धेश महाजन

Permalink

मिपावरच्या लेखमालेच्या

मिपावरच्या लेखमालेच्या पहिल्या भागाची लिंक माझ्या वरील लेखाच्या सुरुवातीला दिली आहे... आणि ही ररांच्या ब्लॉगची लिंक http://ramataram.blogspot.in/2012/02/blog-post.html?m=1
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sun, 02/14/2016 - 19:00

Permalink

एकूणच भिकार प्रकार वाटतोय ,

एकूणच भिकार प्रकार वाटतोय , ज्यांच्या कडे बराच वेळ आहें त्यांनी आनंद घ्यावा , थाकुरांशी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 19:17

Permalink

तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे

तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे... पण ठाकूरांचे आडनाव बदललेले त्यांना चालेल का? चला... जाऊद्या हो... मला आपलं वाटलं, हलकं फुलकं न लिहिता, ज्याला सगळे पटकन वैचारिक, तात्विक, विश्लेषणात्मक वगैरे म्हणतील आणि मग माझी किर्ती वाढेल असे काही पोस्टून थोडा भाव खावा... पण तुम्ही तर माझी पिसंच काढलीत... तरीदेखील, अगम्य असल्याने इतरांनी दुर्लक्षिलेला माझा हा धागा तुमच्या प्रतिसादांमुळे वर येतोय, म्हणून धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sun, 02/14/2016 - 22:09

In reply to तीव्र शब्दांची लयलूट चालू आहे by Anand More

Permalink

;)

;)
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sun, 02/14/2016 - 23:06

Permalink

तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून

तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून हुरूप वाढलाय म्हणून थोडे लिहितोय. पण मला पुस्तकांची आणि चित्रपटांची आवड आहे. त्यांचे मी दोन प्रकारात वर्गीकरण करतो. १) जे विशिष्ट प्रश्न मांडून त्याचे उत्तर देतात. त्यामुळे ते अर्थवाही असतात. सुखांत किंवा दु:खांत असतात. त्यांचे निष्कर्ष आपल्याला पटणे किंवा न पटणे इतकेच होऊ शकते. २) जे केवळ गोष्टी मांडतात. प्रश्न पण आपले आपण ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण आपली आपणच ठरवावीत अशी काहीशी त्यांची योजना असते. त्यामुळे ते अनेकांना निरर्थक वाटतात. वेळकाढू देखील. अशी दुसऱ्या प्रकारची पुस्तके वाचणे किंवा चित्रपट पाहणे आणि नंतर त्यावर विचार करणे म्हणजे ढगात प्राणी किंवा विविध आकार शोधण्यासारखे खुळचट आहे असे अनेकांना वाटू शकते. पण ज्यांना तो खेळ आवडतो त्यांना मात्र त्यात खूप मजा येते. मला स्वतःला दुर्बोध कविता कमी कळतात आणि त्यांना अर्थ लावण्याचे प्रयत्न आनंददायी वाटत नाहीत. तसेच काहीसे नृत्य आणि शिल्प आणि नवचित्रकलेच्या बाबतीत. याचा अर्थ फक्त इतकाच की मला त्यांची भाषा कळत नाही. त्या कलाकाराला त्या कलाकृतीतून त्याला पडलेला प्रश्न आणि त्याचे त्याला गवसलेले उत्तर मांडायचे असेल तर मी त्याचा रसास्वाद घेऊ शकतो. पण या कलांच्या कलाकाराला, मीच प्रश्न ठरवावेत आणि त्यांची उत्तरे पण मीच शोधावीत असे वाटत असेल तर मात्र मी तिथून पळ काढतो. मला न कळलेल्या चित्राला जेंव्हा कोणी देहभान विसरून पहात राहिलेला दिसतो तेंव्हा मी पण त्या रसिकावर, त्या कलाकृतीवर आणि त्या कलाकारावर थोडा वैतागतो. आणि थोडासा जळतो देखील. पण ते तितकेच. कारण त्याचा अर्थ मी उत्क्रांतीमध्ये किंवा रसिकपणामध्ये कुठे कमी आहे असा होत नाही. फक्त आपल्याला ती भाषा येत नाही असे समजून मी शरणागती पत्करतो आणि जी जमते तिच्याकडे पुन्हा वळतो. मला संगीत आवडते पण कोणी रागांची नावे, सम, मिंड, ताल वगैरे बोलू लागला, किंवा फक्त रागाची आलापी ऐकवू लागला की मी बहिरा असल्यासारखा त्याच्याकडे बघत राहतो. कारण त्या रागाच्या आलापीत मला आनंद आपोआप मिळत नाही आणि तो शोधताही येत नाही. कदाचित या चित्रपटाने अनेकांना ढगात प्राणी आणि आकार शोधण्याचा आनंद दिला असेल आणि तितक्याच अनेकांना आपली फसगत झाली, हाती काहीच आले नाही असा वैतागवाणा अनुभव देखील दिला असेल. ज्यांना आनंद दिला त्यांना ढगात सारखेच प्राणी दिसले असतील याची खात्री ते लोक स्वतः पण देऊ शकत नाहीत. पण याचा अर्थ त्यांचा आनंद खोटा ठरत नाही. ररांना आणि मला या चित्रपटाने वेगवेगळे रूप दाखवले आहे हे तुम्ही वाचलेच असेल. पण त्यामुळे ररांचे किंवा माझे आकलन अंतिम ठरत नाही. त्यात कोणी उजवे किंवा डावे ठरत नाही. आणि दोन आकलने निघाली म्हणून चित्रकृती दुय्यम ठरत नाही. फक्त कुरोसावाने चित्रपट जगासमोर मांडला. तर आधी ररा आणि मग मी आमचे स्वतंत्र आकलन मिपावर मांडले. ते तुम्हाला भिडले नाही इतकेच. त्यात चांगले - वाईट, रसिक - अरसिक, परिष्कृत - अपरीष्कृत असे काहीच नाही. माझा खेळ मला अजूनही आवडतो. पण तो तुम्ही पण आवडून घ्या त्याला चांगले म्हणा अशी माझी काही जबरदस्ती नाही. त्याला वाईट म्हणायचे की नाही, आणि मला किंवा माझ्यासारख्यांना खुळ्यात काढायचे की नाही तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही दोघांनी स्पष्टपणे तुमचा मुद्दा मांडलात त्यामुळे तुमच्याशी बोलता येईल असा विश्वास वाटला. आणि माझ्या, तीन लेखात विभागलेल्या कल्पनाविस्ताराला जोड म्हणून हा एक लांब प्रतिसाद दिला आहे. तुमच्याशी बोलून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Mon, 02/15/2016 - 12:24

In reply to तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचून by Anand More

Permalink

कलाभिव्यक्ती आणि सौंदर्यशास्त्र हे अवघड विषय नाहीत

कोणत्याही कलाविष्कारात कलाकार आणि रसिकांची कनेक्टीविटी प्राथमिक आहे. ती नसेल तर विषयच संपला ! माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते. जर अनुभव सच्चा असेल तर साध्या शब्दातून सुद्धा तो रसिकांना भिडतो. फर्स्ट हँड अनुभवाला दुर्बोधतेचं डेकोरेशन लागत नाही. अर्थात, उक्तट अनुभवासमवेत सौंदर्याचा परिपोष करणारी अभिव्यक्ती असेल तर ती अविस्मरणीय ठरते.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 02/15/2016 - 12:47

Permalink

विवेक जी

माझ्या अनुभवानं, जे कलाकार दुर्बोध अभिव्यक्ती देतात ते स्वतःचा अनुभव त्या दुर्बोधतेमागे दडवून रसिकांच्या काँप्लेक्सचा वर्षानुवर्ष फायदा उठवतात. कारण आतापर्यंत मानवी अनुभव विश्वाचे जवळजवळ सर्व विषय कुठे ना कुठे तरी व्यक्त झाले आहेत आणि या ना त्या फॉर्ममधे हाताळून झालेत. त्यामुळे दुर्बोध अभिव्यक्तीवाले कलाकार मुलाखती देणं किंवा पब्लिक इंटरअ‍ॅक्शन टाळतात, जेणे करुन, त्यांच्या अनुभवात काही तरी `ग्रेट' आहे, हा लोकांचा गैरसमज कायम राहातो आणि लोक, कलाकृतीतून कलाकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची जीवंतपणी, आणि मृत्यूनंतर तर आणखीच जोरात चलती राहाते
आपण बर्यापैकी सुबोध आहात तर आपल्या मते वरील प्रकारात मोडत असलेल्या कलाकारांची एखाद उदाहरणे द्याल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Mon, 02/15/2016 - 12:58

In reply to विवेक जी by मारवा

Permalink

इथे आधीच सनी लिऑनवरनं गोंधळ झाला आहे

तुम्ही सूज्ञ आहात त्यामुळे नांवं घेत नाही पण मुद्दा पटला ना?
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 02/15/2016 - 13:22

Permalink

विवेकजी मतभेद आहे म्हणून समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय

आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 02/15/2016 - 13:22

Permalink

विवेकजी मतभेद आहे म्हणून समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय

आपल्या मांडणीशी सहमत नाही. उदा. औदुंबर ही कविता आहे बालकवींची. ह्या कवितेचा एक मुळ अर्थ आहे प्रथम अर्थ म्हणुया कविला अभिप्रेत असणारा. बालकवींचा एक व्यक्तीगत अनुभव आहे एक भाव आहे त्याला त्यांनी शब्दांच साधन वापरुन कवितेचा फॉर्म वापरुन एक क्रिएटीव्ह अभिव्यक्ती केली. आता त्यांचा अनुभव त्याचे संपादन व अभिव्यक्ती ही अत्यंत इंडिव्हीज्युअल आहे ही कविता त्यांनाच वाचायची आहे स्वतःला तर काहीच अडचण नाही. मात्र ते जेव्हा ही कविता व हा अनुभव कम्युनिकेट करण्याचा इतरांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जो वाचक आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव संवेदनशीलता आहे . त्याच्या पातळीवर तो अनुभव घेतांनाच तो त्या कवितेला नकळतच एक नविन आयाम देत असतो. कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते. आपण म्हणता तस कोणी मुद्दाम दुर्बोध केल्याने होतेच असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Mon, 02/15/2016 - 14:33

In reply to विवेकजी मतभेद आहे म्हणून समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय by मारवा

Permalink

औदुंबर !

कुठलाही संवेदनशील वाचक कविता वाचतांना त्याच्या नकळत एक पुन:निर्मीती अनुभवाची करतच असतो. ही दोन्ही बाजुंनी होत असलेली एक सुंदर क्रिएटीव्ह प्रोसेस आहे. तर आता वाचकाला गवसलेला त्याच्या पुरता सत्य असलेला एक दुसरा अर्थ आहे त्याच कवितेचा. दोन्ही अस्तित्वात असण्यात काहीच अडचण नाही. अडचण तेव्हा जेव्हा आग्रह येतो. असे काहीसे मला वाटते कवितेतल्या पहिल्या तीन कडव्यांमधे बालकवी आणि वाचक यांच्या अनुभवविश्वात फारसा फरक नसतो. ते एक साध्या शब्दात केलेलं, लयबद्ध आणि उत्तम असं, चित्रदर्शी निसर्गचित्रण आहे. ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे. अनुभवांची फारकत या कडव्यात आणि त्यातल्या त्यात, शेवटच्या ओळीत होते : झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर. आणि इथे बालकवी दुर्बोध होत नाहीत तर अभिव्यक्तीशी इमान राखून व्यक्तीगत होतात. म्हणजे त्यांची निसर्गाशी इतकी तद्रुपता साधते की त्यांना औदुंबर ही व्यक्ती वाटते. त्याहूनही थोर म्हणजे कवितेत, `असला औदुंबर' ही `जळात बसला'शी, बालकवींनी साधलेली शब्दांची लयकारी! मूळात ही कविता दुर्बोध नाही तर मोनालिसाच्या हास्यासारखी गूढ आहे. कारण `झाकाळुनी जळ गोड काळिमा' ही ओळ, जीवनातल्या सर्वात रहस्यमयी काळ्या रंगाचा निर्देश करते. आणि कवितेच्या शेवटाला सॉलिड स्पेस निर्माण करुन देते. जर बालकवींची मुलाखत घेतली असती आणि त्यांनाच अर्थ विचारला असता, तर इतकी सरळ कविता लिहीणार्‍यानं मनातलं सरळ सांगून टाकलं असतं. मग या कवितेचे रसिकांनी वेगवेगळे अर्थ काढले सुद्धा नसते. किंवा तुम्ही म्हणता तसा स्वतःच्या अर्थाचा आग्रह कुणी धरला नसता. तस्मात, प्रश्न अर्थाच्या दुराग्रहाबद्दल नाही, अभिव्यक्तीच्या दुर्बोधतेबद्दल आणि कलाकारनं ती, कोणतंही क्लॅरिफिकेशन न देता, हेतुपुरस्सर तशीच ठेवून, रसिकांना चकवण्याबद्दल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/15/2016 - 14:40

Permalink

दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा

दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा आणि? ग्रेस दुर्बोध म्हणजे वर जे वर्णन केलय तसे "फेक" होते? की मोनालिसा सारखे गुढ? हे कोण ठरवणार? त्यांनीच एका कवितेत "दुर्बोधतेची बेसरबिंदी" असा शब्दप्रयोग केलाय..
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक ठाकूर on Mon, 02/15/2016 - 17:19

In reply to दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा by पिलीयन रायडर

Permalink

दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा ?

मोनालिसाचं हास्य गूढ आहे त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यावर ते हास्य कळत नाही असं नाही, तर तिच्या हास्याची अनेक कारणं वाटतात. ती प्रत्येक वेळी दर्शकाच्या मूडप्रमाणे बदलत जातात. पिकासोची चित्रं दुर्बोध आहेत, कितीही वेळा पाहिली तरी पिकासोला काय व्यक्त करायचंय, ते नक्की काहीच कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/15/2016 - 17:44

In reply to दुर्बोध आणि गुढ ह्यात फरक कसा करायचा ? by विवेक ठाकूर

Permalink

ग्रेसची कविता काय आहे मग?

ग्रेसची कविता काय आहे मग? तुमच्या म्हणण्याप्रमाणॅ गुढ? ते स्वतः तर दुर्बोध आहे म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/15/2016 - 14:41

Permalink

मोरे.. मला तुमचा लेख खरंच

मोरे.. मला तुमचा लेख खरंच फारसा कळला नाहीये. मुळ रमताराम ह्यांचाही लेख वाचलेला नाही. मला जेव्हा जमेल तेव्हा हे वाचुन मी तुमच्या लेखावर प्रतिसाद देईन. सध्या तरी माझा पास!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 02/15/2016 - 15:10

In reply to मोरे.. मला तुमचा लेख खरंच by पिलीयन रायडर

Permalink

हायला. मला वाटले पिरातैला तरी

हायला. मला वाटले पिरातैला तरी कळले असेल. तिला माहीती असते बरीच. मी प्रस्तावनेनंतर हात वर केले. सविस्तर वाचायचीच कॅपॅकिटी नाही माझी कळणे लांबच राहिले.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com