जेमतेम ५ फूट उंची असलेली, सावळी, गोल चेह-याची, काळेभोर बोलके डोळे असलेली, खांद्या पर्यंतचे केस कधी मोकळे सोडलेले, कधी एक पॉनीटेल बांधलेली, तिच्या गोड हास्याने अजून गोड वाटणारी, बडबडी "छाया", तिची ही दुर्दैवी कहाणी. एका निष्पाप, गोड मुलीचा एक दुर्दैवी अंत आठवून आजही मन अस्वस्थ होते.
त्यावेळी मी शाळेत असेन, आणि ती कॉलेज मध्ये. आमच्या मध्ये ५/६ वर्षाचे अंतर असेल. त्यावेळी आम्ही एका वाड्यात राहत होतो. आमच्या शेजारी दोन मुली राहत होत्या, दोघी बहिणी - बहिणी. एकाच कॉलेज मध्ये एकाच वर्गात होत्या, त्यांची छाया ही मैत्रीण. छाया कॉलेजला जाताना नेहमी त्या दोघींच्या घरी यायची, मग तिघी मिळून कॉलेजला जायच्या. त्यांची आर्टस साइड असल्याने कॉलेज सकाळी असायचे. त्यांची कॉलेजला जायची वेळ आणि माझी ट्युशनला जायची एकच वेळ आणि माझी ट्युशन ही त्यांच्या कॉलेजच्या रोडवर असल्याने ब-याच वेळा आमचे हाय-बाय होत असे, तर कधी जुजबी बोलणे, हसणे. एवढीच काय ती छायाची आणि माझी ओळख.
कॉलेज संपल्यावर तिचे लग्न झाले. नवरा इंजिनिअर मिळाला म्हणून घरातले सर्वजण खूप खूश होते. मोठ्या थाटा माटात तिचे लग्न लावून दिले. लग्ना नंतर ७/८ महिन्यातच तिच्या बद्दलच्या बातमीने मात्र मी खूप अस्वस्थ झाले. मृत्यूशी झुंज देत असलेल्या छायाला भेटायला जायचीही माझी हिंमत झाली नाही.
मध्ये २/३ वर्ष लोटली, छायाचा असा दुर्दैवी अंत मनात घर करून राहिला होता नंतर आम्ही घर बदलले त्यामुळे काही गोष्टींचा विसर पडला.
आमच्या ग्रुप मध्ये एक काळा सावळासा, सर्वांना मदत करणारा एक मुलगा सामील झाला. थोडा लाजरा, मितभाषी पण ग्रुप मध्ये सतत असणारा असा हा मुलगा म्हणजे छायाचा भाऊ होता. त्याच्यामुळे पुन्हा छायाच्या जीवनपटाला उजाळा मिळाला. एके दिवशी तो आम्हाला त्याच्या फॅमिली बद्दल आणि छायाबद्दल सांगत होता.
घरी वडिलांनी दोन लग्ने केली. दोघीही बायका एकाच घरात एकत्र मुलाबाळांसहित नांदत होत्या. छाया ही भावंडात एकटीच मुलगी. त्याच्या मोठया आईची म्हणजे त्याची सावत्र बहीण, पण घरात सावत्रपणा मुलांच्यात कधी वाटलाच नाही, छायाला सख्खा एक आणि सावत्र दोन असे तीन भाऊ पण ही सर्वात मोठी आणि एकटी मुलगी त्यामुळे घरात सर्वांची खूप लाडकी होती.
तिचे लग्न झाले तेव्हा ती जेमतेम २१ वर्षाची असेल. पहिलेच स्थळ चांगले सुशिक्षित आणि सुस्थितीतील आलेले पाहून घरच्यांना आनंद झाला. सावळी, बडबडी छाया ही पटकन पसंत पडण्या सारखी असल्याने मुलाकडच्या कडून होकार आल्यावर मुलाची बाकीची कोणती चौकशी न करता तिचे लग्न लावून दिले आणि येथूनच तिच्या दुर्दैवी आयुष्याला सुरुवात झाली.
ती लग्न झाल्या नंतर हनीमूनसाठी महाबळेश्वरला फिरून आली, त्या नंतर ती हसणेच विसरली. स्वत:च्या विचारात सतत असायची, मन मोकळे पणाने बोलायची नाही. तिच्यात हा बदल झालेला तिच्या घरच्या लोकांच्या नजरेत आला पण मुलगी नवीन घरात गेल्या मुळे लाजत, घाबरलेली असेल असे त्यांना वाटले. नंतर नंतर मात्र तिचे माहेरी येणे कमी झाले, लोकांशी बोलणे कमी झाले, सतत घाबरलेली राहू लागली. नव-याचे समोर उभे राहायला, त्याच्याशी बोलायला सुद्धा घाबरू लागली. तिने नव्या संसाराची सजवलेली सर्व स्वप्ने कोमजून जाऊ लागली. माहेरी तिने तिच्या आईला तिच्या नव-या बद्दल थोडे फार कानावर घातले पण तू समजून घे, चांगली वाग असे सांगून तिच्या आईने तिची समजूत काढली.
एके दिवशी नव-याने प्रेमाने तिला जवळ घेतले, नवऱ्याच्या प्रेमाला आसुसलेली छाया त्याच्या प्रेमाने हरखून गेली. नव-याने प्रेमाने विचारले, "तुला काय हवे? आपण आज पिक्चरला जाऊ आणि येताना बाहेरून जेवूनच येऊ! " त्याचे बोलण्याने ती आनंदित झाली, तिच्या साध्या भोळ्या मनाला वाटले आपला नवरा बदलला, आपल्यावर प्रेम करू लागला. त्याच्या खोट्या प्रेमाला हरखून जाऊन ती त्याच्यावर विश्वास ठेवून रात्री पिक्चर पाहायला गेली, पिक्चर पाहून झाल्यावर हॉटेल मधून जेवून आनंदात घरी आली. आज तिचा स्वत: वरच विश्वास बसत नव्हता, नवरा इतका प्रेमाने का वागतो आहे त्याची तिला पुसटशीही कल्पना आली नव्हती. त्याने गप्पा मारत मारत तिला एका लाकडी खुर्चीवर बसविले, गप्पा मारण्यात गुंतवून पटकन तिचे हात- पाय दोरीने लाकडी खुर्चीला बांधले, तेव्हा तिला त्याचा पुढचा हेतू कळला. आता आपले काही खरे नाही हे समजल्यावर जीवाच्या आकांताने गयावया करणा-या छायाच्या अंगावर त्याने रॉकेल ओतले आणि तिला पेटवून देऊन स्वत: पळून गेला.
७५% भाजलेल्या छायाला हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर देखिल ती वाचण्याचे चान्स कमी आहेत असे त्यावेळीच सांगितले होते, तिच्या घरातले भेटल्यावर तिच्या प्राणांची ज्योत मावळली.
लग्ना आधी पासून एका मुलीवर प्रेम असलेल्या तिच्या नव-याने त्याच्या घरच्यांसाठी तिच्याशी लग्न केले आणि तिला जाळून पळून गेला.
तिच्या भावाच्या तोंडून छायाचा असा दुर्दैवी अंत ऐकून मनात एकाच वेळी राग, आणि दु:ख मिश्रीत अश्रू खूप वेळ वाहत होते.
प्रतिक्रिया
31 Mar 2009 - 4:54 am | रेवती
असल्या राक्षसाशी लग्न होणं म्हणजे फारच दुर्दैव!
त्याला शिक्षा तरी झाली की नाही?
त्यालाही जिवंतपणी जाळून मारण्याची शिक्षा द्यायला हवी होती.
रेवती
31 Mar 2009 - 5:47 am | भाग्यश्री
अरे बापरे... काय हे क्रौर्य... :(
खरंच त्यालाही शिक्षा मिळालीच पाहीजे.. !
31 Mar 2009 - 6:36 am | समिधा
वाचुन खुप वाईट वाटले. त्यालाही शिक्षा मिळालीच पाहीजे..
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
31 Mar 2009 - 7:51 am | प्राजु
अशा कितीतरी छाया अजूनही यातून जात आहेत.
त्या नराधमाला शिक्षा मिळाली की नाही?? काय झालं पुढं त्याचं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Mar 2009 - 5:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खूपच त्रास झाला ही गोष्ट वाचून!
खरं आहे प्राजूचं! अजूनही रूढी, परंपरा, समजूती, यांच्या बंधनांतून आपण मोकळं होऊ शकत नाही. एका छायाच्या उदाहरणातून आपण शिकणार नाही का याचा विचार करून फारच त्रास होतो.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
31 Mar 2009 - 8:17 am | अनामिक
माझ्या बहिणीच्या मैत्रीणीचा अंतही असाच झाला. लग्नानंतर वर्षभरातच सासरच्यांनी जाळून मारलं तिला.
शितल ताई, तुझा लेख वाचला आणि मन १३-१४ वर्ष मागे भुतकाळात गेले. मन अतिशय सुन्न करणारे हे प्रसंग. खरंतर या नराधमांना भर चौकात जाळून मारले पाहिजे!
-अनामिक
31 Mar 2009 - 8:27 am | सुनील
सुन्न करणारी घटना.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Mar 2009 - 9:13 am | दशानन
हेच म्हणतो, असल्या नपुंसकांना शिक्षा ही होणे अत्यंत गरजेचे.
व लग्न लावताना / करताना पुर्ण माहीती गोळा करुनच मग पुढील कार्याला लागावे ह्या माझ्या मतावर मी पुन्हा एकदा ठाम झालो.
एकदम सुन्न करणारी घटना.
31 Mar 2009 - 12:46 pm | जयवी
शितल..... वाचल्यावर इतका संताप आला ना तिच्या नवर्याचा.....!! समजतात काय हे लोक दुसर्यांच्या मुलीला....!!
काय झालं पुढे त्याचं ? शिक्षा मिळाली की नाही त्याला ?
31 Mar 2009 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
लग्न झाले की सासर हेच बाईचे कायमचे घर. मग कितीही त्रास झाला तरी सोसलाच पाहिजे आणी नवर्याला देव मानलेच पाहिजे, हा दृष्टिकोन सुद्धा ह्या दु:खद घटनेला कारणीभुत आहे.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
31 Mar 2009 - 5:07 pm | टारझन
अशा घटणा नविन नाहीत ... राग येणे साहाजिक आहे .. पण पोलिस टाईम्स वाचला की .... शितल ने लिहील्या प्रमाणे २०-१ लेख वाचायला मिळतील .. अर्थात ते लोक शितलएवढं भारी नाही लिहू शकणार .
31 Mar 2009 - 5:14 pm | चिरोटा
मन अस्वस्थ करणारी कथा.प्रेम्,पैसा ह्यासाठी काही माणसे वाटेल त्या थराला जायला तयार असतात.
---------------------------
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Apr 2009 - 6:10 pm | शितल
ही सत्यकथा मनाचा संताप करणारीच आहे,तिचा नव-या विरूध्द गुन्हा दाखल झाला पण तो त्यावेळी फरार होता, त्याला शिक्षा झाली की नाही ते मला माहित नाही पण त्याला शोधुन मग त्याच्यावर केस चालवुन, त्याच्या विरूध्द गुन्हा शाबित होण्यास बराच कालावधी लागला असता हे नक्की.
सर्व वाचकांचे मनापासुन धन्यवाद !
1 Apr 2009 - 7:55 pm | संदीप चित्रे
च्यायला... लग्न नसेल करायचं तर नका करू ... पण जीव का घेताय?
आपल्या माहितीतल्या कुणाचे तरी असे झाल्यावरचा तुझा अस्वस्थपणा समजू शकतो शितल.