पंढरपूर
इसवी सन २२२२ , महिना आषाढ, दिवस एकादशीचा.
दोनशे वर्षांपूर्वी पंढरपूर कसं होत काय माहित, आज विठ्ठल मंदिराचे भग्नावशेष राहिले होते. विठ्ठल अजून गाभाऱ्यात होता पण रखुमाई नव्हती. विठ्ठल जणू काळाच्या माऱ्याने दमून मागे टेकला होता. वरच्या छताला तात्पुरता आधार दिला होता. त्यात एक फट राहिली होती जिच्यातून वाऱ्याची झुळूक खाली येत होती. बलदंडाने हात जोडले आणि त्या टेकलेल्या विठ्ठलाला झुकून नमस्कार केला. याच माऊली समोर हजारो लाखो वारकरी नतमस्तक व्हायचे आणि वाट चुकलेले योग्य दिशेला लागायचे. आज हेच काही शे वारकरी मंदिराच्या आवारात जमले होते आणि त्यांचं रक्षण करायची जबाबदारी बलदंडाच्या खांद्यावर होती. झुकलेल्या मस्तकाने आणि बंद डोळ्यांनी बलदंडाने विठ्ठलाला डोळ्यासमोर आणलं. जोडलेले हात त्याने कपाळाला लावले आणि त्या माउलीला आयुष्यात पहिल्यांदा प्रार्थना केली. कालचा दिवस त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेला.
दिवसाच्या सुरुवातीला त्याच्याबरोबर सात सैनिक होते. दिवस संपल्यावर फक्त तिघे उरले होते, तो धरून. बलदंड , मारूत आणि सर्वशेष. सर्वशेष जखमी होता पण लढायची खुमखुमी त्याला सगळ्यात जास्त होती. तिघांनाही माहिती होत की ही त्यांची शेवटची लढाई आहे म्हणून. समोरचा शत्रू या पृथ्वीवरचा तर सोडा पण या सूर्यमालेतील सुद्धा नव्हता. एका वैश्विक घटनेने मानवजातीच नशीब पार उलटं पालट करून टाकलं होतं. बलदंडाने दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. त्याच्या नसानसात ऑक्सिजन भिनला आणि दंडाच्या शिरा टराटरा फुगल्या. झुकलेल्या मस्तकाने, बंद डोळ्यांनी आणि हात जोडून त्याने त्या माऊलीला शेवटचा नमस्कार केला.
बलदंड बाहेर आला तर वारकर्यानी त्याच्याकडे पाहिले. नमस्कार झडले आणि वाट मोकळी झाली. बाहेर मारूत स्थिर उभा राहायचा प्रयत्न करत होता. एका बाजूला चबुतऱ्यावर सर्वशेष बसला होता. बलदंडाने परत दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि स्वतःला हलकं केलं. हळूहळू त्याचे पाय जमिनीवरून उचलले गेले आणि तो त्या मंदिराच्या आभाळात वर जाऊ लागला. कालच्या लढाईत जरी वारकऱ्यांनी त्याला उडताना पाहिलं होतं तरी आजही त्याच्यावर नजरा खिळल्या होत्या हे त्याला जाणवत होतं. एका उंचीवर गेल्यावर त्याला आजूबाजूचा परिसर नीट दिसायला लागला. चंद्रभागेच्या पात्रातले पाणी कधीच कोरडे पडले होते. चंद्रकोरीच्या आकारात पाण्याऐवजी मोठाली विवर पडली होती. ते शेवटचे राहिलेले बॉम्ब विवरांच्या स्वरूपात निशाणी ठेवून गेले होते. मारुतच्या भावाने जेव्हा ते विमान स्वतःचे बलिदान देऊन पाडले तेव्हा ही विवर निर्माण झाली. आज त्यांची लढाई विषम होती, तीन विरुद्ध तीनशे. एका उंचीला जाऊन बलदंड स्थिर झाला. समोरच्या बाजूने हळूहळू एक आकृती वर येऊ लागली. ती ही त्याच्या उंचीला येऊन स्थिर झाली.
दोघांनीही एकमेकांना पाहिले, फक्त एकमेकांच्या आकृत्या दिसत होत्या. मानवी बलदंड आणि अमानवीय समोरची आकृती. त्या आकृतीला दोन हात आणि दोन पाय होते, परंतु पाठीतून वळवळणाऱ्या चार शेपटी सदृश्य अवयवांमुळे ती आकृती विचित्र दिसत होती. बलदंडाने डोळे मिटले आणि परत उघडले. यावेळेस त्याच्या स्थिर नजरेने त्या शत्रूच्या पसरलेल्या सागराकडे पाहिले. तीनशे आहेत का जास्त? क्षणभर त्याने विचार केला. काय फरक पडतो? त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, लढाई तरी विषमच होती. शत्रूसागरात सतत हालचाल चालू होती. त्याला काही आकार उकार नव्हता. प्रत्येक अपृथ्वीय प्राण्यांची स्वतःची एक वेगळीच हालचाल चालू होती. त्याला जरी दोन हात आणि दोन पाय होते तरी पळताना, हल्ला करताना ते चार पाय असलेल्या प्राण्यांसारखीच हालचाल करत. ते शेपटीसदृश्य अवयव स्वतः एक वेगळा प्राणी होते. त्यांना स्वतःचा एक मेंदू होता. ज्याच्या पाठीवर ते चिकटले होते त्याचा एक आणि शेपटीचा एक, असे दोन वेगळे मेंदू होते. म्हणून स्थिर राहणे शक्य नसावे. त्याच्या समोर हवेत येऊन स्थिर झालेला प्राणी मात्र वेगळा होता. त्याच शरीर आणि त्याचे ते शेपटी सारखे अवयव यात एक सुसंधता होती. वर उडायला त्या अवयवांनी मिळून दोन पंख बनवले होते. हा 'सेनापती' म्हणजे ते दोन मेंदू एकत्र येऊन काम करू शकत असणारा जनुकीय उत्क्रांती मधला वरच्या दर्जाचा प्राणी असावा. बलदंडाला हसायला आलं, इथे मरण वाट पाहते आहे आणि मी जनुकीय उत्क्रांती बद्दल विचार करतोय. मग त्याच्या कारण लक्षात आले. खाली असलेल्या वारकरींमध्ये आणि या तिघांमध्ये तोच तर फरक होता. ती 'साधी माणसं' होती आणि ही तिघे जनुकीय उत्क्रांती मधला पुढचा टप्पा. हवेतल्या हवेत बलदंडाने त्या शत्रूकडे पाठ केली. मंदिराच्या मागे ओसाड पडलेली जागा होती. तेवढ्यात लांबून सणसणत येणारे एक रॉकेट दिसले. त्याच्या आकारावरून ते संदेशवाहक असावे हे बलदंडाने ताडले. मंदिराच्या बरेच पाठी ते पडले. एव्हाना मारूत तिथे पोचलासुद्धा होता. दीर्घ श्वास सोडत बलदंड खाली उतरू लागला. अश्या वेळी कोणी संदेश पाठवला असावा? आणि तो काय आहे? कोण येते आहे का मदतीला? का आम्ही अजून लांब आहोत हे लिहिलं आहे? बलदंडाच्या मनात प्रश्नांचा काहूर माजला.
तरंगत बलदंड जेव्हा मारुत जवळ पोचला तोपर्यंत मारुतने रॉकेटमधून संदेशनळी बाहेर काढली होती. ती हातात घेऊन बलदंडाने रोटर वर कोड टाकला आणि आतला कागद बाहेर काढला. 'अजून दोन तासांनी ताफा पोचेल' बलदंडाने संदेशाचा कागद गुंढाळत मारुतला सांगितले. 'तोवर इथे मृतदेह राहिले असतील जेमतेम' नेहमीप्रमाणे मारुतचा टोमणा आला. बलदंड त्याकडे बघून हसला, तेवढ्यात मंदिराकडून एकजण पळत आला. 'साहेब तुमचा तो साथी जमिनीवर आडवा पडून मोठमोठ्याने श्वास घेतो आहे, लौकर चला', त्याच वाक्य पूर्ण होण्याआधी मारुत निम्म्या रस्त्यावर पोचला होता. बलदंड त्या माणसाबरोबर पळत निघाला, सतत उडून त्याला शक्ती वाया नव्हती घालायची. इकडे सर्वशेष पासून लांब अंतरावर लोक स्तब्ध उभी होती आणि सर्वशेष कान जमिनीला लावून काहीतरी ऐकत होता. या सातही जणांमध्ये सर्वशेषचे कान तीक्ष्ण होते. आज तो जखमी होता पण त्याची जबाबदारी विसरला नव्हता. पाच मिनिटे सलग ऐकल्यावर सर्वशेष परत उठून बसला. मारुतच्या अस्थिरतेकडे बघत त्याने बलदंडाला उद्देशून म्हटले 'हल्ला होणार अस दिसत आहे, पलीकडच्या गोटात प्रचंड हालचाल आहे. ती जनावरे काहीतरी ठरवत आहेत.' बलदंडाला परत एकदा वर जाऊन बघावेसे वाटले पण जर ते हल्ल्याच्या तयारीत असतील तर काहीही कळणार नाही हे ही त्याने जाणले. सर्वशेष हलक्या आवाजात बोलला तरी जवळच्या माणसांनी ते ऐकलच. वारकऱयांमध्ये कुजबुज चालू झाली. बलदंड विचारात मग्न झाला, 'आता काय करायचे?' अजून दोन तास किल्ला लढवायचा आहे, पण ते तीन विरुद्ध तीनशे? कस शक्य होणार? स्वतःच्या नकळत बलदंड वळला आणि त्याच लक्ष कोरड्या पडलेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे गेलं. तो उंचीवर असताना त्याने एक घळ पाहिली होती, जी स्फोटकांमुळे तयार झाली होती. जर हिचा वापर केला तर सर्व बाजुंनी येणाऱ्या लाटा एका छोट्या जागेवरून संकुचित करू शकतो. म्हणजे फक्त समोरून शत्रू येत राहील. पण त्यांना इथे कस आणायचं? विचार करता करता बलदंड परत वळला. नजर उचलल्यावर त्याच्या लक्षात आलं की सगळी लोकं त्याच्याकडेच बघत आहेत. वीज लखलखावी तसा प्लॅन डोक्यात चमकला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण दमलो आहोत. हात पाय जड झाल्यासारखे वाटले. 'अजून किती लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलायचा मी?' 'बलदंडा' त्याला सैन्यशाळेतल्या गुरुजींचा आवाज आठवला 'बलदंडा, जो नेतृत्व करतो त्याला वाईट निर्णय घ्यावे लागतात. खूप लोकांसाठी थोड्या लोकांचा बळी द्यावा लागतो'. अचानक त्याच्या घश्याला कोरड पडली. मंदिराजवळ जाऊन त्याने भरपूर पाणी प्यायले. जेव्हा तो जमलेल्या लोकांसमोर आला तोवर त्याच मन घट्ट झालं होतं.
पहिली लाट मंदिराच्या दिशेने येऊ लागली तसा मारुत अधिकच अस्वस्थ होऊ लागला. त्याच लक्ष दूर पळत जाणाऱ्या लोकांकडे होतं. एकीकडे तो हातात घातलेले शस्त्र घट्ट करत होता. जशी जशी लाट जवळ येऊ लागली तिची दिशा बदलू लागली. मारुतला हसू आले. बलदंडाचा अंदाज खरा ठरला. जिथे जास्त लोक आहेत त्या दिशेने ही जनावर जात होती. दूरवर पळणारी माणसं आता चंद्रभागेच्या उदरात गडप झाली होती. त्याने कमरेचा पट्टा घट्ट केला आणि शेवटचा 'रन' पळायची तयारी केली.
इकडे चंद्रभागेच्या उदरात बलदंडाने बरोबर आलेल्या लोकांना घळीच्या मागच्या बाजूला पाठवले आणि सर्वशेषला त्यांच्याबरोबर राहायला सांगितले. तो खुश नव्हता, त्याला पुढच्या बाजूला, अग्रभागी राहायचे होते. ते प्राणी पळत असल्याचे त्याला कळत होते. जमिनीवर पळणाऱ्या त्यांच्या त्या लाटांची धडधड त्याला जाणवत होती. जमिनीवर हादरे कळत होते. मंदिराकडे जाणारे ते आवाज, ते हादरे आता इकडे वळल्याचे त्याला कळलं. 'एक भाग तरी सफल झाला, आता दुसरा होतो का ते बघायचं', बलदंडाच्या मनात आशेचा किरण चमकून गेला. तेवढ्यात लांबून त्या प्राण्यांचा ओरडण्याचे, चित्कारांचे आवाज येऊ लागले. मारुतने काम चालू केल होत.
पळतापळता मारुतने परत हातातले शस्त्र घट्ट केले आणि तोंडावर उडालेले ते गरम रक्त पुसले. त्याच्यासाठी ती जनावर फारच हळू धावत होती. पळताना त्यांची खांद्यावरची नाडी टरारून फुगत होती आणि मारुत आपल्या शस्त्राने ती अलगद फोडत होता. असं एकेकाला मारणं वेळखाऊ आणि धोकादायक होतं पण तोच प्लॅन होता. लाट अजूनही चंद्रभागेच्या दिशेनेच जात होती पण मारुतकडे लक्ष विचलित झालं होतं त्या जनावरांच. 'जरा आत जायला पाहिजे' असा विचार करून मारुतने रनअप घेतला. यावेळी तो दोन पळणार्या प्राण्यांच्या मधून थेट आत घुसला. एवढ्या सगळ्यांच चारही पायावर एकत्र पळणे धुळीचे लोट उठवत होतं, त्याचाच वापर करून , अंदाजाने तो आत घुसला. बाहेरील बाजूला काहीही न करता त्याने आतल्या बाजूला फुगलेल्या नाड्या फोडायला सुरुवात केली. दोन, चार, सहा, आठ असं मोजताना समोरून येणारा तो सापासारखा अवयव त्याने जेमतेम चुकवला. त्याच्या त्या भरघाव वेगात दिशा आणि स्वतःच्या शरीराचं कोन बदलणे कठीण काम होते पण यावेळी ते त्याने घडवून आणले. संख्या थोडी अजून कमी होईस्तो मरायला घाई नव्हती करायची त्याला, बलदंडाने स्पष्ट सांगितले होते. अजून नशीब नको आजमावायला असा विचार करून त्याने दिशा चांद्रभागेकडे वळवली. यावेळेला तो फक्त ते वळवळणारे अवयव चुकवायचाच प्रयत्न करत होता. तो आत आल्यावर अचानक सगळ्यांनी आपले अवयव वर करून त्याची वाट बंद करायचा प्रयत्न चालवला होता. त्याच्या वेगामुळे तो प्राण्यांच्या जवळजवळ मध्ये पोचला होता. इथे त्याला चार प्राण्यांवर तोल सांभाळून बसलेला पण त्यांच्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला प्राणी दिसला. त्याने चक्क मांडी घातली होती आणि ते चार प्राणी त्याचा तोल सांभाळत होते. त्याच्या पाठीवर ते अवयव शेषनागा प्रमाणे फणा धरून होते. अचानक त्यातल्या एका अवयवाने त्याच्या बाजूला दिशा बदलली. जोपर्यंत मारुत त्यांच्यातून बाहेर पडला नाही तोपर्यंत तो अवयव त्याच्या दिशेने वळत होता. रडारने एखाद्या विमानाचा माग धरावा असे मारुतला वाटले. 'बलदंडाला सांगायला हवे.' मारुतने मोर्चा घळीकडे वळवला.
मारुत जेव्हा बालदंडापाशी पोचला तेव्हा बलदंड त्याच ते भाल्यासारखे शस्त्र तोलवीत स्नायू मोकळे करत होता.
मारुतने जे सांगितले ते ऐकून बलदंड विचारात पडला. त्याच्याबरोबर वर आलेला प्राणी मुख्य असावा. विचार करायची वेळ संपली होती कारण चंद्रभागेच्या चिंचोळ्या घळीतून पहिली लाट आत शिरत होती. जेमतेम चार प्राणी आत शिरु शकत होते. त्यांनी एकत्र किंकाळी फोडली आणि लढाईला सुरुवात झाली. ते फार पुढे येण्याच्या आत, बलदंडाने एकाचे मुंडके फोडले, दुसर्याचे डोळे, तिसरा बाजूने आत शिरु पाहत होता त्याच्या पोटातून कोथळा बाहेर काढला आणि चौथ्याने जरा मागून, खडकावरून उडी घेतली, त्याला झेंड्यासारखे हत्यारावर पकडले. बलदंडाच्या अंगात युद्धज्वर भिनायला सुरुवात झाली. उन्हे मावळतीकडे झुकायला सुरुवात झाली पण सूर्यास्त लांब होता. तो आज बघू शकू असे बलदांडाला वाटत नव्हते. दुसऱ्या लाटेतसुद्धा चार प्राणी आले, यावेळेला मधले दोन बलदंडाने आणि बाजूचे दोन मारुतने टिपले. मारुतला छोट्या जागेत वावरायला अवघड जात होतं. बलदंडाने त्याला मागे जायला सांगून सर्वशेषला पुढे पाठवायला सांगितले. मागच्या विवरात त्याला त्याच्या शक्तीचा वापर करता येईल एवढी जागा होती. सर्वशेष पुढे येईस्तोवर तिसरी लाट आली. यावेळी त्यात जास्त जनावर होती. घळीच्या तोंडाशी मृतदेहांचा खच पडू लागला होता. ती जनावरे त्यावरून पळत येत होती, सपाट जमिनीवर डोंगर तयार होत होता. आता बलदंड त्या डोंगराच्या पायथ्याशी लढत होता आणि जनावर वरून खाली येत होती. लाटांची संख्या वाढू लागली आणि त्यात येणारी जनावरे सुद्धा. त्याच्याच एका वारामुळे उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीने बलदंड क्षणभर आंधळा झाला आणि ती संधी साधून दोन जनावरांनी त्याला ओलांडून पुढे जायचा प्रयत्न केला. तो सावरुन मागे वळणार तोच मागून दाह जाणवला. जेव्हा बलदंड वळला तेव्हा त्याला सर्वशेष दोन्ही पाय रोवून उभा होता. त्याच्या आजूबाजूला ती दोन जनावरे आगीत जळत होती. त्यांच्या त्या कर्णकर्कश्श किंकाळ्या छोट्या जागेत घुमत होत्या. सर्वशेषाचे डोळे मोठे झाले आणि बलदंड वेगाने पण वेळेत वळला. वेग आणि वेळ जेमतेम साधला होता कारण मानेवर होणारा वार खांद्यावरून निसटत गेला. शेवटच्या लढाईतील पहिली जखम झाली होती. त्याला जखम करणाऱ्याला मारण्याच्या नादात अजून तीन जनावरांनी त्याच्यावर एकत्र हल्ला केला. दोन्ही पायात आणि खांद्यात ते वळवळणारे अवयव रुतले होते. त्या अवयवांच्या तोंडात धारदार दात होते , जे त्याचा लचका तोडायचा प्रयत्न करत होते. बलदंड त्यांच्याशी झुंजत असतानाच तो मृतदेहांचा ढीग पेटला. ती संधी साधून बलदंडाने खांद्यात रुतलेल्या त्या प्राण्याला हिसकावून काढले आणि आगीत भिरकावून दिले. उरलेले दोघे त्याच्या शस्त्राने जमिनीवर गारद केले. आता त्या घळीच्या तोंडाशी आगीचा डोंब उसळला होता. ती मेलेली जनावरे तडतड करून जळत होती आणि त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली अर्धमेली जनावर किंकाळ्या फोडत होती. थोडावेळ का होईना आत शिरायचा मार्ग बंद झाला होता. बलदंड सर्वशेषाकडे वळला तेव्हा तो त्याला गुडघ्यांवर बसलेला दिसला. बलदंडाने सर्वशेषला हात लावला तेव्हा त्याच शरीर खूपच गरम होतं. सर्वशेषाने मान वर करून त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याचे डोळे लाल झाले होते. डाव्या पायाच्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते. 'आतातरी मला हवं तसं मरू दे बलदांडा' सर्वशेषचा आवाज क्षीण झाला होता. बलदंडाने त्या धगधगत्या चितेकडे पाहिले आणि दीर्घ श्वास घेऊन सोडला, दुसरा भाग चालू होणार होता आणि अजून दीड तास बाकी होता.
हातातले शास्त्र पारजित बलदंड आता घळीत शिरू लागला, त्याची पाठ घळीकडे आणि चेहरा समोर जळणाऱ्या चितेत केशरी झाला होता. चितेची तडतड वाढू लागली होती आणि ज्वाळा कमी कमी होत होत्या. सर्वशेष जमिनीवर पाय रोऊन उभा होता आणि त्याच्या आजूबाजूच्या हवेत मृगजळ दिसत होते. अचानक तो पेटता ढीग हलू लागला आणि पलीकडून किंकाळ्या आणि चित्कार ऐकू येऊ लागले. बलदंडाच्या मनात क्षणभर चलबिचल झाली, की आपण बरोबर करतो आहोत की नाही, पण परतीची वेळ निघून गेली होती. समोर सर्वशेष लालबुंद होऊ लागला होता आणि श्वास घेणं कठीण होऊ लागले होते. जश्या अचानक किंकाळ्या चालू झाल्या होत्या तश्या त्या थांबल्या आणि क्षणभर नीरव शांतता पसरली. क्षण आला होता, सर्वशेष नी त्याच्याकडे वळून पाहिलं. स्फोटाच्या फटक्याने मागे फेकले जाणाच्या आधी बलदंडाला दोन गोष्टी दिसल्या. तो शवांचा डोंगर कोसळला आणि परत ती जनावरे आता शिरू लागली. मागे घळीत तो इतक्या जोराने फेकला गेला की काहीवेळ त्याची शुद्ध हरपली होती. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला जाणवलं की त्याच्या जोराने एक अख्खा खडक दुभांगला होता. सर्वशेषाने बलिदान दिले होते आणि ते वाया जाऊ न देणे बलदंडाच्या हातात होते.
बलदंडाच्या कानाला दडे बसले होते आणि डोळ्यासमोर अजून मृगजळ तरळत होते. घळीच्या पलीकडे हालचाल होत नव्हती. समोर लक्ष ठेवून, चाचपडत त्याने शस्त्र उचलले आणि त्याच्यावर जोर देऊन बलदंड उभा राहिला. पायातून रक्त वाहत होते पण खांद्यातून वहायचे थांबले होते. जखमा ठसठस करत होत्या पण त्यांना बघायला वेळही नव्हता आणि मलमपट्टी करायला सामग्री. अचानक त्याला मारुतची आठवण झाली आणि तो मागे वळला. विवराच्या दुसऱ्या टोकाशी मारुत आता शुद्धीत येत होता. "मारूत" बलदंडाने आवाज दिला. मारुताने हात केला की ठीक आहे म्हणून. पुढचा आणि कदाचित शेवटचा टप्पा चालू झाला होता. हातातले घड्याळ अजून तासभर दाखवत होते, ताफा पोचायला. मागच्या खिंडीत किती प्राणी मारले गेले कोण जाणे परंतु ढीग लागला होता म्हणजे शेकड्याने तरी कमी झाले असावेत. अजून पलीकडे शांतता होती. बलदंडाने मारूतने निवडलेल्या विवराकडे नीट पाहिले, पहिल्यांदाच. स्फोटाने खडक उघडे पडले होते आणि त्यावरून वरती जायला मार्ग नव्हता. त्या प्राण्यांना रुतवून वर चढायला मार्ग कमी होते. सर्वशेष मरण्याच्या वेळेस मारुतने वारकऱ्यांना लांब पाठवले होते. वारकरी मागच्या घळीतून निघून परत मंदिराकडे लांब वळसा घालून जात असावेत, असा त्याचा प्लॅन होता. आता ते त्यांच्या आणि त्या विठू माऊलीच्या भरोश्यावर होते. आज मारुतचे आणि त्याचे थडगे किंवा चिता किंवा समाधी, जे काही म्हणाल ते, याच विवरात होते. विचारांच्या भरात बलदंड आणि मारुत विवराच्या मध्यभागी आले होते. बलदंड आपल्या शस्त्राचे दोन भाग करत होता. मारुत आपली शस्त्र सज्ज करत होता. तेवढ्यात आकाशातून एक चिरकी पण कर्कश्य किंकाळी ऐकू आली. दोघांनीही चमकून वर पाहिले. वरती आकाशात तो प्राणी तरंगत होता. त्याने परत एकदा किंकाळी फोडली. शेवटच्या लढाईचे रणशिंग फुंकले गेले होते.
तो मुख्य प्राणी तरंगत बलदंडाच्या समोर उतरला. त्या घळीत आता दोन गट दिसू लागले. मध्यभागी बलदंड आणि त्यांचा मुख्य, त्याच्या आजूबाजूला अर्धचंद्राकृती रचनेत ते प्राणी आणि दोन्ही हातातली शस्त्र परजत तयार असलेला मारुत. अर्धा क्षण सगळ्यांनी एकमेकांची पारख केली आणि मुख्य प्राण्याने कर्कश्य किंकाळी फोडली. कुमकेची आशा संपली होती. प्राण्यांनी या दोघांना सोडून मारूत कडे दिशा धरली. मारुतने वेग पकडला आणि किंकाळ्या घुमू लागल्या. मारुतच्या वेगाला एक आवाज होता, त्यावरून बलादंडाला कळत होते की तो कुठे आहे. त्याने जर वळून पाहायचा प्रयत्न केला असता तर तो बघू शकला असता की मारुत त्या क्षणाला कुठे आहे पण त्याची नजर समोर खिळली होती. बलदंडाला आपण एकटे शेवटी राहणार याची आता खात्री झाली होती. प्राणी त्याला सोडून फक्त मारुत कडेच जात होते आणि बलदंडाला माहिती होते की एका सीमेनंतर मारुतला थांबावेच लागते. दीर्घ श्वास घेत, जखमांच्या वेदना मागे सारत, बलदंड दोन्ही हातात शस्त्रे घेऊन सज्ज होता. मारुतचा आवाज येत होता. त्याचा वेग कमी होऊ लागला होता त्यामुळे त्याला जखमा होत होत्या. त्याने दिलेले शिव्याशाप आता मोठमोठ्याने ऐकू येत होते. आणि एका क्षणात आवाज बंद झाला, दीर्घ शांतता पसरली. अंदाजाने बलदंडाने मारूतच्या दिशेने पाहिले. मारुत कधीच पृथ्वीलोक सोडून गेला होता. ज्या वेगाचा तो राजा होता त्याच वेगाने त्याचा घात केला होता. त्याच्या शरीरात चार प्राण्यांचे अवयव घुसले होते आणि एक छाती फोडून आरपार गेला होता. मारूतला मृत्यू कधी आला हे कळले सुद्धा नसावे. बलदंड बघत असतानाच ते चार अवयव मारूतच्या शरीरातून बाहेर आले आणि मारुतचे शरीर जमिनीवर पडले. मारुत फार वेळ लढत नव्हता पण त्याने केलेले काम मोठे होते. आता तो मुख्य प्राणी आणि त्याच्या आजूबाजूला असलेली शेवटची फळी, इतकेच प्राणी शिल्लक होते. ' वेळ मला मारून न्यायची आहे आता ' बलदंडाच्या मनात विचार आला. त्याने श्वास आणि नजर स्थिर करत समोर पाहिले. मुख्य प्राण्याच्या चारही अवयवात धारदार शस्त्रे होती. त्याने एक चिरका आवाज काढला आणि बाकीचे प्राणी मागे सरकले. बलदंडाने शस्त्र घट्ट पकडली आणि वार करायची तयारी सुरू केली. परत एका चिरक्या परंतु वेगळ्या आवाजा नंतर मुख्य प्राण्याने हल्ला चढवला.
दोन हातातल्या शस्त्रानी बलदंडाने दोन वार अडवले परंतु उरलेल्या दोन अवयवांनी आपले उद्देश्य साध्य केले. एका शस्त्राचे टोक त्याच्या डाव्या बाजूच्या पोटात घुसले होते आणि दुसऱ्याचे उजव्या खांद्यावर. बलदांडाने समोर पाहिले, त्या मुख्य प्राण्याला चार डोळे होते. दोन निळे आणि दोन लाल. तोंडाच्या ठिकाणी एक सरळ रेषा होती, ती हळूहळू वक्राकार होऊ लागली होती. बहुतेक तो प्राणी हसत असावा. अजूनही बलदंडाने अडकलेले वार तसेच होते आणि त्यांचा जोर वाढत होता, का याचा जोर कमी होत होता? बलदंड विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि ते करण अजून कठीण होत चालले होते. पोटात आणि खांद्यात घुसलेली हत्यार हळूहळू वळत होती, बलदंडाच्या अंगात वेदनेचे आगडोंब उसळत होते, डोळे मिटायला लागले होते आणि मेंदू थंड पडायला लागला होता. त्याच्या डाव्या हातातले शस्त्र गळून पडले आणि उजवा हातही लटकला पण शस्त्र सोडले नाही त्याने. शॉर्ट सर्किट झाल्या सारखे झाले आणि त्याच्या लक्षात आले की आपले पाय जमिनीवरून उचलले जात आहेत. मेंदू क्षणभर तल्लख झाला. बलदंडाने डोळे उघडले आणि त्या निळ्या डोळ्यात भिडवले. तोंड असलेली रेषा अजून वक्र झाली होती. बलदंडाला विठू माऊलीचा चेहरा आठवला, त्याच्या ओठातून माऊलीचे नाव येऊ लागले.
पुढच्या गोष्टी वेगाने घडल्या.
त्याच्या उजव्या हातातले शस्त्र त्या मुख्य प्राण्याच्या मानेत रुतले होते. लाल डोळे पाहिले मिटले आणि मग निळे. अंगात रुतलेल्या शस्त्रा सकट बलदंड खाली पडला. त्याच्या समोरच तो प्राणी निर्जीव झालेला त्याला दिसला. एक चिरकून किंकाळी ऐकू आली आणि तीव्र वेदना शरीरभर पसरली.
बलदंडाचे अवतार कार्य संपले होते.