पाट्या

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
10 Jun 2024 - 11:17 am

पाट्या!

जग बदलत चाललं आहे हे वाक्य मला वाटतं वेदांमध्ये सुद्धा असेल कदाचित! म्हणजे प्रत्येक पिढी हे वाक्य कधी ना कधी म्हणतच असते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. काय बदललं आहे? तर बरच काही! पण असं असलं तरी काही जुन्या गोष्टी एकदमच दिसून येतात. पण बऱ्याच गोष्टी आठवायला लागतात.

त्याच असं झालं की सध्या मला एक नवीनच छंद लागला आहे. सांगतो. पाट्या वाचायचा. मी पुण्यात राहत नाही हे आधीच सांगतो. पाट्या काही फक्त पुण्यातच आहेत असं नाही. मला दुकानांच्या नावाच्या पाट्या वाचायला आवडत आहेत कारण मी नवी भाषा शिकतो आहे. त्यामुळे इयत्ता दुसरीत जेव्हा जोडशब्द लिहायला आणि वाचायला शिकत होतो तेव्हा बाजारात गेलो की मी त्या पाट्या वाचायचो. ते सगळं परत एकदा अनुभवतो आहे.

त्यामुळे काही भन्नाट पाट्या आठवल्या आणि त्यांची गंमत सुद्धा. सुपर मार्केट, मॉल आणि ऑनलाईन शॉपिंग ह्यामुळे आता दुकानात जाणं होत नाही. पूर्वी बाजारात जाणं हा एक event असायचा. आता मॉल मध्ये जाणं असतो तसा.

बऱ्याच दुकानांमध्ये पाट्या असायच्या बहुदा एक वाक्याच्या.काही उदाहरणं म्हणजे कपड्यांच्या दुकानात असणारी हमखास पाटी फैशन की इस दौर मे गारंटी की इच्छा ना करे! आता मालक आणि गिऱ्हाईक दोघंही मराठी असताना ही पाटी हिंदीत का असायची हे त्या मालकाला पण सांगता यायचं नाही. त्यात पुन्हा फैशन हा शब्द उच्चारापेक्षा वेगळाच लिहिलेला. कुठं कुठं फ्याशन असं पण लिहिलेलं असे. माझ्या लहानपणी लेकरानी कोणते कपडे घालावेत हे १०० पैकी १०५ वेळेला आयाच ठरवायच्या. लेकरांना फक्त size समजण्यासाठी घेऊन जायचे. त्यातही स्वस्त, टिकाऊ आणि वाढत्या मापाचे ह्या तीन अपेक्षा पूर्ण करणारे कपडे लगेच निवडले जात. वाढत्या मापाचे असल्यामुळे जवळपास सगळी लेकरं ढगळ शर्ट, आतून फुगा ठेवल्या सारख्या चड्ड्या, एकाच वेळी दिड किंवा २ मुली मावतील असे फ्रॉक ह्याच अवतारात असायचे. ह्या कारणामुळे त्या पाटीला कोणीही ढुंकून वाचत नसे. उलट दुकानदाराला धमकावून, दरडावून हे कपडे ३ वर्षे तरी वापरता येतील ह्याची कबुली घेतली जात असे.

उधारी बंद, एकच भाव अशा काही निर्थरक पाट्या बऱ्याच दुकानात असत. त्यांचा नेमका कोणाला उपयोग असे हे आजही माहिती नाही. कारण त्याच पाट्या खाली बसून उधारीची वही लिहिता लिहिता मालक घासाघीस करत असत. काही काही दुकानदार थोडे जास्त Sarcastic असत त्यामुळे ग्राहक हा राजा असतो आणि राजा कधीही उधार मागत नाही असं लिहायचे.

हॉटेलात पण काही पाट्या असायच्या. आमच्या इथे नोकरांना रोज पगार दिला जातो ह्या पाटीचा कष्टंबरला काय उपयोग आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. मेन्यू कार्ड हे फारच दुर्मिळ असल्यामुळे एक मोठा बोर्ड आणि त्यावर पदार्थांची यादी हे अगदी घट्ट नातं होतं. त्या यादीत कितीही पदार्थ असले तरी जे पदार्थ तयार असतील तेच मिळतील हे महत्वाचं वाक्य असायचं. त्यामुळे ती पाटीही काही उपयोगाची नसायची. आमच्याकडे सगळे पदार्थ refined तेलात बनवले जातात, ही पाटी बरेचदा हॉटेलच्या जवळपास बाहेर उभा राहून समोसे तळणाऱ्या आचाऱ्याच्या मागच्या भिंतीवर लावलेली असायची. बाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई अशी पण पाटी असायची. आमच्या कॉलेजच्या जवळ असणारा जो हॉटेल मधला अड्डा होता तिथे ही पाटी होती. तिथे बसून आम्ही घरून आणलेले डबे खायचो.

डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा पाट्या असायच्या. त्यात MR लोकांना कधीही आत सोडता येणार नाही, शांतता राखा, ह्या नेहमीच्या पाट्या असायच्या. उधारी बंद ही पाटी सुद्धा मी काही दवाखान्यात पाहिली आहे.

मी पाट्या वाचण्यासाठी अधून मधून इकडल्या जुन्या मार्केट मध्ये जात असतो. तिथे अजूनतरी काही पाट्या शिल्लक आहेत पण मला नीटशा वाचता येत नाहीत. पण मला खात्री आहे की त्या तशाच पाट्या असणार. शेवटी जग कितीही बदललं तरी काही गोष्टी कुठेतरी दडून बसतात आणि शिल्लक राहतात, हे नक्की!

विनोद

प्रतिक्रिया

सुरिया's picture

10 Jun 2024 - 12:02 pm | सुरिया

आमच्या इथे नोकरांना रोज पगार दिला जातो ह्या पाटीचा कष्टंबरला काय उपयोग आहे हे मला जाणून घ्यायचे आहे.

ही पाटी लेबर इन्स्पेक्टर लोकांसाठी असते, म्हणजे त्याचा अर्थ इथे कोणी पगारी नोकर नाहीत, जे आहेत ते रोजंदारीवर काम करतात. कारण जास्त कामगार पगारी असले की वेगळे नियम, पगार आकाउंट, मस्टर, सुट्ट्या अशा बर्‍याच गोष्टी म्यानेज कराव्या लागु नये म्हणून ही पाटी लावले जाते. (भले कित्येक वर्षे तीच वेटर आणि आचारी मंडळी वर्‍शानुवर्षे दिसत असली तरीही)

आमच्याकडे सगळे पदार्थ refined तेलात बनवले जातात, ही पाटी बरेचदा हॉटेलच्या जवळपास बाहेर उभा राहून समोसे तळणाऱ्या आचाऱ्याच्या मागच्या भिंतीवर लावलेली असायची.

ही पाटी अन्न औशध प्रशासन (एफ्डीए) साठी असते. त्यांचे पण इन्स्पेक्टर पाहणी करतात उपहारगृहांची.
.
बाकी लेख फारच जुनाट आणि भाबडा आहे हे वेगळे सांगणे नलगे.

लेख जुनाट नाही त्यातला काळ जुना नक्कीच आहे. तसा उल्लेख सुद्धा केला आहे. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्याविषयी मनात असलेले प्रश्न विचारले आहेत. मला वाटतं माझ्यासारख्या कुठल्याही सामान्य माणसाला हे प्रश्न पडत असावेत. त्यामुळे कदाचित विद्वानांना हे प्रश्न भाबडे वाटतील. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! बऱ्याच वर्षांचं कुतूहल होतं.

किसन शिंदे's picture

17 Jun 2024 - 2:56 pm | किसन शिंदे

"इथे १८ वर्षांखालील बालकामगार काम करीत नाही" ही सुद्धा एक पाटी असते बर्याचश्या हॉटेल्समध्ये.

अशा पाट्यांमुळेच भारताचे वेगळेपण जपलं आहे.

भुवनेश्वरला खानावळीच्या नावाच्या पाटीवर कांदा लसूण नसलेले पदार्थ मिळण्याबद्दल लिहिलेलं असतं.

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2024 - 12:21 pm | चौथा कोनाडा

नॉस्टेलिजिया आवडला !

किसन शिंदे's picture

17 Jun 2024 - 2:58 pm | किसन शिंदे

रच्याकने, इंदुरला राजवाड्याजवळ प्रशांत नाष्टा कॉर्नरमध्ये "आपण महाराष्ट्रीयन असाल तर मराठीतून बोला" अशी पाटी वाचली गल्ल्यावर.

भम्पक's picture

22 Jun 2024 - 12:53 pm | भम्पक

इकडे दिल्लीतही एक अजब प्रकार सार्वत्रिक आढळतो ,तो म्हणजे जर तुमचे गादीचे दुकान असेल तर पाटीवर "गद्दे हि गद्दे ..!"...असेच म्हणजे 'दवाईयाँ हि दवाईयाँ ', 'मूर्तियां हि मूर्तियां ', 'मिठाईयाँ हि मिठाईयाँ '.....असे.

नठ्यारा's picture

22 Jun 2024 - 1:28 pm | नठ्यारा

आयशप्पत, दिल्लीत मयताच्या सामानाच्या दुकानाची काय पाटी असेल हे चिंतून अंगावर रोमांच उभे राहिले! ;-)
-नाठाळ नठ्या

गवि's picture

22 Jun 2024 - 3:24 pm | गवि

बांबूच बांबू?

नठ्यारा's picture

24 Jun 2024 - 6:16 pm | नठ्यारा

अवांतर :

एक किस्सा आठवला. बहुधा कल्पित आहे. शांता शेळके एकदा दादा कोंडक्यांना म्हणाल्या की तुमच्या चित्रपटांत द्व्यर्थी संवाद फार असतात. तेव्हा दादा म्हणाले की तुम्ही लिहिलेल्या 'बांबूचे घर पाहायला हवे बांबूच्या घरात रहायला हवे' या ओळींतला बांबू कसला हो?

नाठाळ नठ्या

मुर्दे ही मुर्दे ... हमारे यहां हर किसम के मुर्दों को जलाने हेतु उचित सामग्री हर समय गारंटी के साथ मिलती है. सपेशल पैकेज भी उप्लब्ध है, जिसमे पंडितजी, हवन सामग्री, वाहन, शमशान घाट पर चाय-नाश्ता आदि की व्यवस्था है.
संपर्क करें: प्रो. भूतनाथ जलानेवाले. पुरानी हवेली, शमशान रोड (कूडेदान के सामने)
.

रिश्ते ही रिश्ते - दुल्हन वही जो पाठक जी दिलाये
पूर्वी दिल्ली परिसरात मोठमोठ्या भिंतीवर लिहीलेले असायचे.

स्टेशनातून ट्रेन निघाली, की दोन्ही बाजूच्या कारखान्यांच्या लांबलचक भिंतींवर हमखास असणारे 'शादी से पहिले या बाद' .. 'कमजोरी का शर्तिया इलाज' 'बिना आपरेशन बवासीर का शर्तिया युनानी ईलाज'... मिलीये प्रो. अमूक तमूक ... अश्या पाट्या खासच असतात. पूर्वी 'सपन दोष' 'सफेद पानी' 'मिर्गी' वगैरेवरील 'शर्तिया ईलाज'च्या पण असायच्या. आताचे ठाऊक नाही. याशिवाय 'शादी- संतान- नोकरी - कोर्टकचहरी- लाटरी - बीमारी' वगैरेंसाठी अमूकतमूक शास्त्री, ज्योतिषाचार्य वगैरे.
लेख आणि प्रतिसाद रोचक आहेत.

कर्नलतपस्वी's picture

24 Jun 2024 - 8:28 pm | कर्नलतपस्वी

डॉक्टर,झेलम मधून जाताना रेल्वेरूळाच्या दोन्ही बाजुला असलेल्या भिंतीवर चुन्याने लिहीलेले असायचे. आता नाव विसरलो.

प्रोफेसर भुतनाथ हवेली मस्तच.

चित्रगुप्त's picture

25 Jun 2024 - 12:37 am | चित्रगुप्त

रैगरपुरावाल्याचे नाव मी पण विसरलो. आठवेल कधीतरी अचानक.
पाठक जी तर नव्हे?

चित्रगुप्त's picture

25 Jun 2024 - 12:44 am | चित्रगुप्त

लहानपणी मलाही वाटायचे की, ते प्रोफेसर असावे. पण गादीवाला, हजाम, उंदीर पकडण्याचे
पिंजरे विकणारेही प्रोफेसर कसे असतील? मग समजले की ते प्रोप्रायटर शब्दाचे लघुरुप आहे.

चित्रगुप्त's picture

25 Jun 2024 - 12:51 am | चित्रगुप्त

लहानपणी मलाही वाटायचे की, ते प्रोफेसर असावे. पण गादीवाला, हजाम, उंदीर पकडण्याचे
पिंजरे विकणारेही प्रोफेसर कसे असतील? मग समजले की ते प्रोप्रायटर शब्दाचे लघुरुप आहे.

अथांग आकाश's picture

24 Jun 2024 - 11:43 am | अथांग आकाश

मस्त मजेशीर लेख! आवडला!!

पॅट्रीक जेड's picture

24 Jun 2024 - 9:22 pm | पॅट्रीक जेड

छान लेख.
त्यात पुन्हा फैशन हा शब्द उच्चारापेक्षा वेगळाच लिहिलेला. >>>
हिंदी भाषकांत एक विकृती असते. जिथे जातात तिथे आपली भाषा लादतातच वरून स्थानिक किंवा इंग्रजी शब्दांची नावेही बदलतात. ह्यात सर्वात जास्त बळी पडलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. कारण भाषेबद्दल इथे अतिशय बुळचट लोक राहतात. महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावे हिंदी भाषिकांनी बदललीच. जसे धुळेचे धुलिया, ठाणेचं थाना, सोलापूरचे शोलापुर. काही ठिकाणी स्थानिक नावे जसे आंबेगाव चे अंबेगांव, कात्रजचे कत्राज. पण नेत्यांचीही नावे बदलली. पुण्यातल्या टिळक रोड वरील सर्वच बँकांच्या शाखांवर टिळक ऐवजी “तिलक” रोड लिहिलय. अगदी बँक ऑफ “महाराष्ट्राच्या” शाखेवरही.

नठ्यारा's picture

24 Jun 2024 - 9:32 pm | नठ्यारा

सहमत आहे. पण काये की ते पडले उपरे. आपणच आपले उच्चार रुळवायला हवेत. हाथला हात म्हणणं. हाथीस हत्ती. घडियालास मगर/सुसर. भैशीस म्हैस. इत्यादि.
-ना.न.

पॅट्रीक जेड's picture

24 Jun 2024 - 9:37 pm | पॅट्रीक जेड

न सुधारणारे काही लाळघोटे मराठी माणसे मराठी वापरा म्हटले की संतापतात.

इकडे दक्षिणेत हिंदीची जी कत्तल केली आहे त्याला तोड नाही. शुद्ध हिंदी वगैरे बोलणारा इकडच्या हिंदीतल्या पाट्या पाहून एकतर ह्यांचा जीव घेईल किंवा आत्महत्या तरी करेल, इतकी भयाण अवस्था करतात हे. त्यामानाने महाराष्ट्रात बरं आहे.

पॅट्रीक जेड's picture

25 Jun 2024 - 1:52 am | पॅट्रीक जेड

हिंदीची जी कत्तल केली आहे त्या महाराष्ट्रातही हिंदीची कत्तलच करायला हवी. काय संबंध महाराष्ट्राचा/दक्षिण भारताचा हिंदीशी?

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज उत्तर भारतीय सिसोदिया घराण्यातील होते.
संबंध नव्हता तर पानिपत मोहिमेवर महाराष्ट्रातून मराठे का गेले?

पेशवे कालात हिंदी भाषी मुलखात होळकर, शिंदे, पवार वगैरेंनी आपला अंमल बसवला तेंव्हा पासून अनेक मराठी कुटुंबे तिकडे कायमची स्थायिक झाली. मराठी आणि हिंदीचा भरपूर संबंध आहे.ग्वाल्हेर - इंदुरात अजून हिंदीभाषिक लोक मराठी भाषा समजतात. महाराष्ट्रात शिक्षणासाठी येणारे तरुणही मराठी बोलतात. असे अनेक. लोक माझ्या ओळखीचे आहेत. उगाच भाषा, जाती वगैरेत अडकून राहिले आपल्या पुढल्या पिढ्यात सगळे तैमूर, कासिम, शबाना वगैरे असतील.

पॅट्रीक जेड's picture

25 Jun 2024 - 9:54 am | पॅट्रीक जेड

काका, तुमचा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले. ते ह्या साठी की इतर कुणी हा प्रतिसाद दिला असता तर समजून शकलो असतो. असो.
सिसोदिया घराणे मूळचे राजस्थानचे आहे. आणी तिथली मूळ भाषा त्या काळी आणि आजही हिंदी नाही. हिंदीचे वय उणेपुरे दीडशे वर्षे आहे. हिंदी राजस्थानात शिरून तिथल्या बाडमेरी, बिकानेरी, माळवी , मारवाडी ह्या भाषा संपवू पाहत आहे. राजस्थानचा आणी हिंदीचा काहीही संबंध नाही. ती त्यांच्यावर “लादलीय”

पेशवे कालात हिंदी भाषी मुलखात होळकर, शिंदे, पवार वगैरेंनी आपला अंमल बसवला तेंव्हा पासून अनेक मराठी कुटुंबे तिकडे कायमची स्थायिक झाली. मराठी आणि हिंदीचा भरपूर संबंध आहे. हा देखील बादरायन संबंध आहे. मुळात पेशवे होते तेव्हाही हिंदी भाषाच अस्तित्वात नव्हती. ज्याला तुम्ही
हिंदी भाषिक मुलुख घोषित केले तो तेव्हाही नव्हता नी आजही हिंदी भाषिक मुलूख नाही. होळकरांचा मुलुख म्हणजे इंदूर हे माळवा प्रांतात येते नी तिथे आजही माळवी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. तसेच ग्वाल्हेर हा भाग बुंदेलखंड नी बाघेलखंड ह्यापैकी एका भगत येतो. आणि बुंदेलखंडी नी बघेलखंडी ह्या स्वतंत्र भाषा आहेत. दोन्ही मूर्ख राज्यांनी आपल्या भाषा जपायच्या सोडुन हिंदी राज्यभाषा केलीय.
मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक आहे. तरीही काही लोक स्थानिक भाषा संपवा नी हिंदी बोला म्हणूण प्रयत्नशील असतात ते का? हे समजले नाही..

उगाच भाषा, जाती वगैरेत अडकून राहिले आपल्या पुढल्या पिढ्यात सगळे तैमूर, कासिम, शबाना वगैरे असतील. हिंदूनी जातीपाती कधीच सोडल्यात. पण भाषेबद्दल हे म्हणणे म्हणजे अति झाले. भाषीक अस्मिता जपली तर तैमूर, शबाना कसे होणार बुवा?? मग भारतातील भाषेबद्दल सर्वात कट्टर असलेले
हिंदी भाषिक आतापर्यंत का झाले नाहीत असे?? हिंदी भाषिकांनी भाषिक अस्मिता जपावी पण मराठी माणसाने आपल्याच राज्यात जपून नये असे का?

चित्रगुप्त's picture

25 Jun 2024 - 1:04 am | चित्रगुप्त

चिपळूणकरकालीन मराठी पुस्तकांमधे फ्याशन, प्यारीस, क्यारम, ब्यांडबाजा, ब्यारिष्टर असेच शब्द असतात कारण तोवर इंग्रजीतील उच्चार लिहीण्यासाठी तशा वेलांट्या /मात्रा देवनागरीत नव्हत्याच. सुमारे साठ वर्षांपूर्वी मराठी व्याकरणात त्यांचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु हिंदीत मात्र अजूनही फैशन, बैंड वगैरेच लिहिले जाते.
गुजराती लोक बॅंडला बेंड, फॅशनला फेशन... आणि "रॅप कर देना" ला "रेप कर देना" म्हणतात.

कांदा लिंबू's picture

25 Jun 2024 - 6:46 am | कांदा लिंबू

हिंदी भाषकांत एक विकृती असते. जिथे जातात तिथे आपली भाषा लादतातच वरून स्थानिक किंवा इंग्रजी शब्दांची नावेही बदलतात.

पटना == पाटना
लखनऊ == लखनौ
असम == आसाम
हरयाणा == हरियाणा
भोपाळ == भोपाल

चौकस२१२'s picture

25 Jun 2024 - 2:03 pm | चौकस२१२

चित्रगुप्त जी तुम्ही इंदोर / इंदौर चे आहात म्हणून विचारतो
१) अनेक हिंदी भाषिक विशषतः इंग्रजी शब्दात सुरवातीला जोडाक्षर असले कि त्याचा उच्चार करताना तरी मागे ई का लावतात ? ( अगदी शुद्ध हिंदी बोलणार / देहाती / खडी बोली, नव्हे. बिहारी नव्हे तर हिंदि चा मुख्य गाभा असेलला उत्तर आणि मध्य प्रदेश )
म्हणजे ईस्कुल ?
पुढे विचारणार होतो कि स्कुटर ला इस्कुटर का म्हणतात पण आता खरेच इस्कुटर मिळत असल्याने हा प्रश्न गौण होतो बहुतेक !
२) हिंदीत लिहताना बैंक असे का लिहितात ? हिंदी ला वापरल्या जाणाऱ्या देवनागरीत बॅ नाही का ?
३) पंचायत या प्रसिद्ध अश्या वेब मालिकेत एका व्यक्तिरेखेला उद्देशून / त्याचे टोपण नाव "बनरकास " असे आहे ? म्हणजे "वन राक्षस" का?
पंचायत बघत असाल तर त्यातील जी बोली भाषा आहे ती कोणत्या प्रदेशातील असावी ? चित्रकूट ?
४) एक विधान मी मध्ये ऐकले ( राजकीय आहे ) कोणीतरी म्हणले कि मध्यप्रदेश गुजराथ ची प्रत ( कॉपी ) झाले आहे ( जन संघ प्रभाव या अर्थाने ) तर त्यावर तो जाणकार म्हणाला , उलट आहे मुळात माळवा प्रांत हा जनसंघाची मातृभूमी आहे ( विजयाराजे शिंदे ) गुजराथ नंतर झाला संघमय
तुमचे काय मत
५) इंदोर / इंदौर मधील जीवन यावर लिहा कधीतरी ( अगदी पुलंच्या तुझं आहे तुझ पाशी सारखे कल्पावे का?)

चित्रगुप्त's picture

25 Jun 2024 - 3:56 pm | चित्रगुप्त

१. उत्तर माहीत नाही मला स्वता:ला असे गावठी उच्चार आवडतात आणि कानाला गोड लागतात. ते कोणत्याही भाषेतले असोत. उदा. मराठीतले म्हमई (मुंबई) लई ब्येस, अदुगर (अगोदर) प्रोफेश्वर, वगैरे. खरेतर मला भाषांविषयी कसलेच ज्ञान नाही.
२. हिंदीला वापरल्या जाणार्या देवनागरीत बॅ, बॉ च्या मात्रा नाहीत. याबद्दल माझ्या एका विद्वान हिंदी प्रोफेश्वर /लेखक मित्राला विचारले होते, त्याने असेच सांगितले.
३. पंचायत बघितली नाही त्यामुळे काहीच ठाऊक नाही.
४.अजिबातच माहित नाही. माझ्या बहात्तर वर्षे वयापैकी सत्तर वर्षे राजकारणात मला मुळीच रूचि नव्हती आणि आताही नाही, फक्त अलिकडली दोन-तीन वर्षे यूट्यूब, कायप्पा मुळे काहीबाही कळायचे.. आता पुन्हा ते सुद्धा बघणे बंद केले.
५. इंदौर (आणि माळवा) बद्दल अधून मधून काही लिहीले आहे मिपावर विविध ठिकाणी. उदाहरणार्थ :

श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे
https://www.misalpav.com/node/47344

महेश्वरचा किल्ला: अहिल्याबाई होळकरांचे मूळ दस्तावेज नष्ट होण्याच्या मार्गावरः कुणी वाचवू शकेल का?
https://www.misalpav.com/node/21680

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
https://misalpav.com/node/18587

एका चित्रकाराच्या आठवणी...
https://www.misalpav.com/node/21369

चौकस२१२'s picture

25 Jun 2024 - 4:52 pm | चौकस२१२

पंचायत नक्की बघा , सरळ सहज सुंदर, निरागस त्यात मधय भारतातील छोटे गाव , इरसाल गाव आणि लोक असले तरी " गँग्स ऑफ वस्यापूर" किंवा "मिरझापूर" किंवा "पाताळ लोक" या पासून विरुद्ध टोक तसेच गुल्लक पण ,

माझा १९५१ - १९७७ या काळात इंदौरला व्यतीत झालेला काळ फार आनंदाचा होता. पैकी १९६७-७७ काळात लिहीलेल्या रोजनिश्या माझ्याकडे आहेत. अधून मधून वाचायला फार बरे वाटते. १९७७-२०२२ दिल्लीत. त्याविषयी कधीच काही लिहावेसे वाटलेले नाही.
-- २०२२ पासून पुन्हा इंदुरात, पण त्यापैकी बराचसा काळ परदेशात वास्तव्य. लहानणीच्या इंदुरातल्या जवळजवळ सगळ्याच खुणा आता पुसल्या जाऊन काँक्रीटचे अवाढव्य जंगल बनलेल्या मुख्य शहरात मला जावेसे वाटतच नाही. आताचे घर राजवाड्यापासून १७-१८ कि.मी. वर आहे. तिकडे मोकळे आहे.
-- आता त्या पूर्वीच्या इंदुराबद्दल काही लिहायचे म्हणजे अरण्यरूदनच, लिहीताना मला आनंदाऐवजी वेदना आणि औदासिन्य येण्याची शक्यताच जास्त.

पॅट्रीक जेड's picture

25 Jun 2024 - 6:14 pm | पॅट्रीक जेड

तरीही लिहाच.इंदौर बद्दल नेहमी एक सुप्त आकर्षण आहे.