कथा
या विषयावरची चर्चा
आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे .
कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात .
मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा .
पूर्वी मराठी कथा त्या वेळच्या काही एक पद्धतीने मांडली जात होती. आता ती तशीच राहिलेली नाही . ती काळानुरुप बदलली आहे आणि बदलायला देखील पाहिजे. पण ज्या नेमक्या ठिकाणी नवकथेची दखल घेतली गेली पाहिजे, तिथे ती घेतली जात आहे का ? की अजूनही तीच पद्धत, त्याच कथा आणि जुने कथाकार यामध्येच ती ठिकाणं अडकून पडली आहेत ? …
सध्या सामाजिक माध्यमांवर खूप जण लिहीत आहेत . जे ‘ चांगलं ’ लिहितात त्यांची दखल घ्यायला काय हरकत आहे ? विशेषतः जेव्हा मासिकं बंद पडत आहेत . वर्तमानपत्रं साहित्याला आक्रसून घेण्यात मग्न आहेत. एकूण गंभीर परिस्थिती आहे . विशेषतः रीडर्स डायजेस्टसारखं मासिक बंद पडतं तेव्हा ! ...
अमुक एक कथा चांगली , असं काही नाही . ती कशी लिहिली गेली आहे हे महत्त्वाचं . कौटुंबिक कथा आवडत असतील त्यांना गुन्हेगारी कथा आवडणार नाहीत. हा भाग वेगळा. ही आवडनिवड व्यक्तिनुरूप . पण लोकांना गोष्टी आणि कथा नेहमीच आकर्षित करतात. हे नक्की!
कथेचे अनेक प्रकार आहेत . शशकपासून ते दीर्घ कथेपर्यंत , जीवनावर भाष्य करणाऱ्या अगदी छोट्या कथांपासून ते मोठ्या घडामोडी मांडणाऱ्या कथांपर्यंत.
मराठीमध्ये उत्कृष्ट कथांचं संकलन करण्याचे प्रयोग केले गेले आहेत . उदाहरण म्हणजे राम कोलारकर संपादित काही खंड.
आजही मराठीमध्ये कथा स्पर्धा आयोजित केल्या जातात. जातात… पण आयोजक आणि परीक्षक स्वतःच आयोजित केलेल्या त्या स्पर्धांकडे नक्की कितीशा गांभीर्याने बघतात ?
अलीकडे कथा स्पर्धांमधील पुरस्कार प्राप्त कथा पाहिल्यावर... अरे बापरे! हाती सुतळी बॉम्ब यावा अशी अपेक्षा असताना हाती सुटा लवंगी फटाका येतो. मराठी भाषा मागे पडते आहे ही चर्चा नेहमीच चालते. या चर्चेमध्ये एक अगदी छोटासा का होईना पण हा मुद्दादेखील असावा का ?
माझी अशी विनंती आहे की तुम्ही इथे कथा या विषयावर चर्चा करावी . तुम्ही कथेकडे कसं पाहता याबद्दल व्यक्त व्हावं . कथास्पर्धा, वेगवेगळ्या कथा , वेगवेगळ्या ठिकाणच्या कथा याबद्दल बोलावं.
तुमच्या आवडत्या , लक्षात राहिलेल्या कथा , हे संस्थळ, इतर संस्थळं, सामाजिक माध्यमं , मासिकं - पुस्तकं , भारतीय कथा ते जागतिक पातळीवरची कथा असं सगळं या परिघात येऊ शकतं .
वाचक, प्रतिसादक , विशेषतः कथालेखक - लेखिका आणि इतरही सर्वांसाठी हे आवाहन.
प्रतिक्रिया
20 May 2024 - 6:25 pm | नठ्यारा
बिपीन सुरेश सांगळे,
मला साहित्यातलं फारसं कळंत नाही. पण तुमची तळमळ पोहोचली.
-नाठाळ नठ्या
20 May 2024 - 7:19 pm | गवि
कथा हा माझ्या मते अत्यंत मनोरंजक फॉरमॅट आहे. अत्यंत आवडता देखील. प्रत्येक मनुष्याला कथा ऐकायला आवडते. ती ऐकवल्यासारखी लिहिली तर वाचायला देखील तितकीच आवडते. कथा वाचताना आपण वाचकाच्या मनाचा रंगमंच वापरून घेत असतो. चित्रदर्शी वर्णन वगैरे ही मिथ आहे. तुम्ही हलकासा तपशील पुरवावा. वाचक आपणहून प्रसंग आणि चित्र डोळ्यासमोर उभे करतो. यात तोही आत ओढला जातो. आणि हेच कथेचे मर्म आहे.
चांगली जमून आलेली कविता हा सर्वात ताकदीचा आविष्कार ठरू शकतो. पण तो बहुतांश लोकांच्या आवाक्यात नसतो. कथा सर्वांना आवडते, पचते.
जेफ्री आर्चर, बोकील किंवा अन्य अनेक लेखकांच्या कथांचे एखादे पुस्तक घेऊन एकामागून एक कथा वाचत जाणे हा अनुभव व्यसन लावणारा असू शकतो.
आंतरजालावर ताज्या दमाचे खूप लेखक आहेत. आणि हे फार चांगले आहे. शेतकरी ते ग्राहक थेट योजना. पॉलिश कमी असेल, पण नैसर्गिक ...
एक लठ्ठंभारती नावाची कथा बहुधा उपक्रम किंवा मनोगत इथे वाचली होती. खूप वर्षांपूर्वी सहज आंतरजाल शोधताना सापडली आणि अनेकदा पुन्हा पुन्हा वाचली. आता मात्र शोधावी लागेल. अशाच इतरही अत्यंत सुंदर कथा आंजावर मिळाल्या. त्यात अर्थात रामदास यांची, खुद्द तुमच्या काही कथा, चाफा या लेखकाच्या काही असे पटकन आठवणारे.
22 May 2024 - 12:23 pm | कानडाऊ योगेशु
इथे आहे ती कथा.
22 May 2024 - 2:58 pm | गवि
येस.
धन्यवाद...
22 May 2024 - 10:33 pm | सतिश गावडे
प्रत्यक्ष स्कंदगिरी चढताना लागत नसेल इतका दम ही प्रदीर्घ कथा वाचताना लागला. तरीही कथेने खिळवून ठेवल्याने एका दमात वाचून काढली.
कथा वाचताना उगाचच आमचा एक लठ्ठ असलेला पूर्वाश्रमीचा ट्रेकर मित्र पुन्हा पुन्हा आठवत होता. किंबहुना कथालेखकाने आमच्या या मित्राला समोर ठेवूनच सोनू हे पात्र चितारले असावे असे राहून राहून वाटत होते.
22 May 2024 - 3:36 pm | कांदा लिंबू
काय उपमा (की उत्प्रेक्षा?) आहे! आवडली हं.
22 May 2024 - 3:46 pm | कांदा लिंबू
कथा हा माझाही अत्यंत आवडता साहित्यप्रकार आहे. सध्या ही पोच पावती देतोय, सविस्तर नंतर.
---
अवांतर: मिपावरील रामदासांच्या शिलाई मशीनीनं अनेकदा मन हेलावून जातं.
22 May 2024 - 3:56 pm | अमरेंद्र बाहुबली
कथेची लिंक?
22 May 2024 - 9:30 pm | कर्नलतपस्वी
असं कसे कुणी म्हणू शकते.
पं विष्णू शर्मा यांचे पंचतंत्र, बृहतकथा,जातक कथा, सिहांनबत्तीशी, गुलबकावली यांच्यापेक्षाही आगोदर पासून मौखिक अथवा कागदावरच्या कथांचा इतीहास आहे का?
कीर्तन,कथकली,तिसऱ्या चौथ्या शतकापासून सुरू असलेल्या छाया कठपुतली,राजस्थान मधील कठपुतळी द्वारे कथा कथन इ. सर्व कथेचे पुरातन रूप म्हणले तर कथा हा साहित्य प्रकार आपलाच म्हणला पाहिजे. कदाचित उपनिषदे,आरण्यके सुद्धा याच प्रकारात मोडत असावे असे माझ्या अल्प मतीला वाटते. असो बरेच काही लिहीता येईल, जाणकारांनी प्रकाश टाकावा.
मला वाटते कवीता आणी कथा हे असे साहित्य प्रकार आहेत कि जे थोडक्या शब्दात वाचकाच्या मनात घर करून जातात.
पुर्वी वाचनालयात कथासंग्रहाचे वेगळे दालन असायचे. बर्याच दिग्गज लेखकांचे कथासंग्रह यात असायचे. दिवाळी अंकात कथा हे मुख्य आकर्षण असायचे.
व पु काळे यांचे बरेचसे कथासंग्रह संग्रही आहेत, माडगूळकर,गोनिदा चे एखाद दोन आहेत. आणखीन नावे सुचवावीत.
कथा म्हणजे पाणीपुरी, एक जरी खाल्ली तरी चव बराच वेळ जिभेवर रहाते ,आजुन खावीशी वाटते. किती खाल्ली तरी मन भरत नाही.
गावाकडल्या गोष्टी ,माडगूळकर हा कथासंग्रह कितीतरी वेळा वाचला पण पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो पटकन संपतो. जि ए चे कथासंग्रह खुप बारकाईने वाचावे लागतात. शंकर पाटील, द मा,चि वी याच्या विनोदी कथा आता कालबाह्य वाटतात. पु लं च्या आजुनही मनाला भिडतात.
असो.सध्या तरी इथेच थांबतो.
23 Jun 2024 - 2:18 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी
खूप आभार .
मी यावर लिहीत नाही . आत्ता तरी .
मी अजूनही विचारमंथनातच असतो .
म्हणून तर हा प्रपंच .
23 Jun 2024 - 2:19 pm | बिपीन सुरेश सांगळे
कर्नलजी
आपण विस्तृत लिहिता आणि चांगलं .
आपल्याला लेखन शुभेच्छा .
23 Jun 2024 - 4:46 pm | चित्रगुप्त
अगदी लहानपणापासून आजवर कितीतरी कथा वाचल्या असतील, तरी सातवी-आठवीत वाचलेले 'चिमणरावाचे चर्हाट' काही डोक्यातून जात नाही (तेही जुने, सी.ग.जोशी यांची चित्रे असलेले. नंतरच्या काळात शि. द. फडणिसांच्या चित्रांनी चिमणरावाचे 'कार्टूनिकरण' केले ते अजिबात आवडले नाही)
-- बाकी माझा सर्वात मोठा नातू आता १४ वर्षांचा आहे. तो साधारणपणे तीन ते दहा वर्षांचा असतानाच्या काळात त्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी एकतरी गोष्ट सांगावी लागायची. घरात मराठी 'बाल-साहित्य' मोठ्ठी पिशवी भरून होते, पण त्यातले काहीच ना त्याला आवडायचे ना मला. मग ऐनवेळी काहीतरी रचून खूप मोठ्ठी गोष्ट सांगायचो. त्यासाठी आधी तो विषय सांगायचा. त्यात 'शातो (महाल), बातो (होडी) आणि नदी' हे बरेचदा असायचे, 'सायक्लोप' पण पुष्कळदा. या आणि त्याने संगितलेल्या विषयांवर मी येवढ्या अफाट कल्पनारम्य गोष्टी सांगितलेल्या आहेत, की त्या लिहील्या असत्या तर अद्भुत संग्रह झाला असता. गोष्ट सांगताना वेगवेगळ्या पात्रांचे संवाद वेगवेगळे आवाज काढून म्हणायचो. एकदोनदा काही जणांनी त्या गोष्टी ऐकल्या, तेंव्हा ते चकित झाले होते. त्याकाळी आवाज रेकॉर्ड करायची सोय होती की नव्हती कुणास ठाऊक, पण तसे कधीच सुचले नाही.
-- आता जी लहान नातवंडे आहेत, त्यांना गोष्ट सांगायला मला काहीही सुचत नाही. तो कप्पाच जणू बंद झाला आहे. तेंव्हाचा तो काळ फार अद्भुत होता, हे आता जाणवते.
-- हा प्रतिसाद लिहीताना धागाकर्त्याला अपेक्षित असलेल्या मुद्द्यांपासून फार भरकटल्यासारखे झालेले आहे, पण जे सुचले, ते लिहीले आहे.